Thursday 24 November 2011

काहीच तं नी ....!


     महाराष्‍ट्राचं शेवटचं टोक असलेल्‍या बेळगाव जवळील निपाणीला आम्‍ही पोहोचलो. मी आणि माझा मित्र अश्‍वीन अर्थात अश्‍वीन वसंतराव देशपांडे कारने भटकण्‍याचा  दोघांनाही छंद जडलेला. अख्‍खा महाराष्‍ट्र आम्‍ही त्‍याच्‍या 766 क्रमांकाच्‍या मारुती कार मधून फरलो, सकाळी कोल्‍हापूरात दर्शन झालं होतं. महालक्ष्‍मीला नमन करुन निघालो. ब्रेकफास्‍ट बेळगावजवळ कुठंतरी करायचा आणि जेवण बेळगावात असा बेत.
     चांगलं मराठी पाटी असलेलं हॉटेल दिसलं. चला थांबू या म्‍हणत आम्‍ही  गाडी पार्क केली. खांद्यावर कळकट झालेल्‍या कपड्यासह वेटर आला त्‍यानं त्‍या  कपडयानं टेबल पुसलं आणि काय आणू साहेब असं विचारलं. अश्‍वीनने सांगितलं दोन प्‍लेट आलू वडा आणि रस्‍सा आण. हा आमच्‍या दोघांचा आवडता पदार्थ. त्‍यावर त्‍या वेटरनं सांगितलं ते उपलब्‍ध नाही. बरं दुसरं काय मिळेल असं विचारल्‍यावर त्‍यानं सांगायला सुरुवात केली इडली, सांबार, मेदू वडा, दोसा और आलूबोंडा है साहब.
     आलूबोंडा क्‍या होता है असं विचारल्‍यावर आम्‍हाला कळलं की आलूवड्याला इथं आलू बोंडा म्‍हणतात. भाषा बदलते तसं नावं बदलतात हेच खरं.
     असं भाषिक अंतर पडलं की कधी कधी धक्‍का बसतो. असाच काहीसा प्रकार वर्धेत माझ्याबाबतीत घडला. एक पत्रकार मित्र भेटायला घरी आले त्‍यांच्‍या हातात पेढ्यांचा डबा होता. मला मुलगी झाली असं आनंदात सांगताच मी अभिनंदन केलं त्‍यापुढचं त्‍यांच वाक्‍य मला धक्‍का देणारं होतं. मुलगी झाली सांगायला यायचंच होतं, म्‍हटलं की सायबाले पेढे चारु या .... चारु या .... ?  माझ्या तोंडातला पेढा घशात अडकला आणि जोरदार ठसका लागला. चारायला आपण काय गाय किंवा बकरी आहोत का आणि पेढे म्‍हणजे चारा हे का ?  माझा चेहरा प्रश्‍नांकित होता. पण ते पत्रकार सहजरित्‍या बोलत होते. त्‍यांना आपण काही वावगं बोललो असं वाटलेलं नव्‍हतं.
     सुरुवातीला ही विदर्भाची भाषा मला थोडी ऑड वाटली तरी महिनाभरात मी सरावलो. आणि आता कुठे गेलो तर तुम्‍ही वर्धेचे का ? असं लोक विचारतात इतकी इथली भाषा पक्‍की रुजली.
     लहेजा वेगळा असला तरी या भाषेत एक आगळा गोडवा आहे. इथले काही शब्‍द सहज कळतील काही कळायला अवघड जातात. जोरु का भाई अर्थात साला... म्‍हटलं की शिवी दिल्‍यासारखं वाटतं इथं मात्र साळा म्‍हणतात. त्‍यात गोडवा नक्‍कीच आहे पण साडभाऊ अन् अक्‍कडसासू सारखी नाती समजून घेतल्‍याशिवाय कळत नाही.
     याकाळात सिरोंचा पासून अगदी पत्रादेवीपर्यंत सारा महाराष्‍ट्र फिरुन झाला त्‍यात वर्धेची ही भाषा  आताशा आपुलकीची आणि आपली भाषा वाटायला लागली. कोरडेपणा, औपचारिकता न ठेवता थेट होणारा संवाद काळजाला भिडणार आणि कायम त्‍याचा गोडवा राहणार हेच खरं कुणी विचारलं आता काय चालू ... तर चटकन उत्‍तर निघतं काहीचतनी... (काहीच नाही).
                                     - प्रशांत दैठणकर

Sunday 20 November 2011

आयटम है हम दोनो..

कलाकार कसा मनस्वी आणि आपल्यातच जगत असतो याचं उत्तम चित्र रॉकस्टारच्या रुपानं बघायला मिळालं आणि मी एका वेगळ्याच विचारानं वेगळ्या विश्वात निघालो. आजकालचा जमाना हेवी पेरेंटींगचा जमाना आहे. यात आपण कलाकार घडला जावा हा प्रयत्न मुलांबाबत करीत असतो. त्यापाय़ी त्या बिचा-यांना आपण खुप बाबीत एकाच वेळी गुंतवतो.
माझा मुलगा सिंगर झाला पाहिजे, मुलगी डान्सर झाली पाहिजे असं आपल्याला वाटतं आणि आपण मुलांना आपल्या आवडीच्या क्षेत्रात ढकलतो. मुलांचा कल कशात आहे हे जाणुन घेणारे काही पालक आहेत पण त्यांचे प्रमाण खुप कमी आहे. 
प्रत्येक जण कलंदर असत नाही. तसं असतं तर त्यांच्या कलंदरपणाचं कौतुकही झालं नसतं. काही जण कलंदर आणि आपल्यातच मग्न राहणारे असतात.
रणवीरनं त्यात उभा केलेला जॉर्डन खरच खुप काही आठवणी जाग्या करणारा होता असं म्हणता येईल. कधी काळी आपणही हा कैफ जगला होता असं प्रत्येकाला आत्मसंवादात जाणवेल. धकाधकीच्या या काळात नोकरी हेच ध्येय्य मानत आपल्यापैकी अनेकांनी आपल्यातील जेजेच पुढे नेला आणि त्यामुळेच आपल्यातील ज़ॉर्डन आतच राहून गेला असं वाटून जाईल इतकं नक्की.
बंदीस्त आयुष्याची आपणास सवय झालेली असते. हेच सुरक्षित आहे असं आपण मानतो आणि पुढच्या पिढीलाही त्याच मार्गावर नेतो असं मला जाणवायला लागलय हल्ली. जगण्यात असणारा खरा आनंद कधीच मिळवत नाही आणि खरं जग आपण बघतच नाही आपण आपल्याच जगाला मोठं मानतो. बिनधास्तपणा प्रत्येक नव्या जीवात असतो. आपणच त्याच्या मनात आपलं जग मोठं हे बिंबवतो हेच खरं.
चित्रपटात एक संवाद आहे.. हम दोनो आयटम है.. मनस्वीपणासाठी वापरलेला शब्द मनाला खुप भावला. आजच्या पिढीची भाषा वेगळी. त्यांचे शब्दही वेगळे.. पण हा आयटम थेट मनाला भिडला. आपणही कधी असेच जगायचं ठरवलं आणि आज मात्र वेगळ्या मार्गावर आहोत हे देखील लक्षात आलं. तारूण्यातली धुंदी आणि तो बेधडकपणा व बिनधास्तपणा पुन्हा मनासमोर आलं आणि मन नव्याने तरूण झालं असं म्हणायला हरकत नाही. शरीराचं वय वाढतच जाणार आहे मन मात्र तरूण ठेवता येतं आणि ते ठेवायलाच पाहिजे.
प्रशांत दैठणकर

Friday 18 November 2011

झिरो फीगर


 काही शब्‍द गंमत करणारे असतात तर काही व्‍याख्‍या गंमत करतात. नव्‍याने भाषेचा परिचय झालेल्‍या व्‍यक्‍ती नेमकेपणानं शब्‍द मांडून सांगू शकत नाही. तर काही व्‍यक्‍तींची विचार करण्‍याची पध्‍दत वेगळी असते आणि यातून काही खुमासदार किस्‍से तयार होतात. काही गंमती, विनोद घडतात आणि अशा किश्‍शांनी  आयुष्‍याच्‍या प्रवासाला अनोखी रंगत येत असते.
VEDANT... Look the naughty eyes
     माझा मुलगा चिरंजीव वेदांत अर्थात घरातलं चैतन्‍य. काही तरी आऊट ऑफ कॅनव्‍हास पध्‍दतीने तो विचार करतो आणि बोलत असतो. त्‍यानं लावलेली व्‍याख्‍या ऐकूण धमालच झाली. टि.व्‍ही. वर कुठलासा शो चालू होता. त्‍यात विषय आला करिना कपूरच्‍या झिरो फिगरचा याला ऐकता ऐकता सूचलं आणि नंतर सगळे जण खो-खो हसत राहीले.
     आई, झिरो म्‍हणजे गोल असतो मग गोल आकार असलेल्‍या हिरोईनला झिरो फिगर म्‍हटलं पाहिजे करिना तर गोल नाही .. झालं आता वेदांतने केलेली ही व्‍याख्‍या लावायची ठरवलं तर चाळीशी गाठणा-या बहुतांश व्‍यक्‍ती झिरो फिगरच्‍या म्‍हणाव्‍या लागतील. लठ्ठपणा आहे म्‍हणून न लाजता अभिमानानं सांगता येईल. आम्‍ही कसे झिरो फिगर वाले. तुमच्‍या सारखे काडी फिगर नाही. ही व्‍याख्‍या  लावल्‍यास  लठ्ठपणामुळे चिंतेत जगणारे चिंतामुक्‍त होतील. अशी गंमत असते या चिमखड्या बोलांची.
     अशी वेदांतच्‍या व्‍याख्‍येतली झिरो फिगर गाठणं आणि ती मेंटेन करणं अगदी सहज शक्‍य आहे. यालाच मी आऊट ऑफ कॅनव्‍हास विचार करणं म्‍हणतो.
 मिश्‍कीली करायला जमणं आणि ती उपजत असणं यात खूप मोठा फरक आहे. यावरुन आठवलेला एक किस्‍सा औरंगाबादला पत्रकारांच्‍या बैठकीनंतर पार्टी सुरु होती. त्‍यावेळी नागपूर विभागाचे संचालक असलेले आमचे शरद चौधरी हे देखील बैठकीला आले होते. त्‍यांच्‍या स्‍वभावातच मिश्‍कीलपणा आहे.
     पार्टीत आमच्‍या कार्यालयाचे सर्व कर्मचारी लगबग करीत होते. शरद चौधरींनी कोल्‍ड्रींकबाबत विचारणा केली तिथं सलीम हा निवृत्‍तीकडे झुकलेला आमचा ऊर्दू अनुवादक उभा होता. साहेबांनी कोल्‍ड्रींक मागितलय म्‍हटल्‍या वर तो धावत बाहेर गेला. तो परत आला त्‍यावेळी त्‍याच्‍या  हातात अख्‍खा कोल्‍ड्रींकचा क्रेट होता. वजनाने वाकलेल्‍या सलीमला शरद चौधरी लगेच म्‍हणाले ओ सलिम थोडा और लाते... त्‍यांच्‍या या वाक्‍याने सलिम गोंधळला... क्‍या  असा प्रश्‍नांकीत शब्‍द त्‍याच्‍या  तोंडून  बाहेर पडला. आमचीही अशीच प्रतिक्रिया होती. थोडा और लाते तो मै नहा लेता असं शरद चौधरींनी म्‍हटल्‍यावर अख्‍ख्‍या हॉलमध्‍ये सगळे खळखळून हसले.
हसणे आणि हसविणे शब्‍दांचाच खेळ आणि चपखलपणाने जमलेला शब्‍दांचा मेळ असतो. अशा मिश्‍कीलबाजांना मनापासून सलाम.
-         प्रशांत दैठणकर

Thursday 17 November 2011

मुलगी झाली हो... !


रुपेरी पडद्यावर अनभिषिक्त सम्राट असणा-या महानायक अमिताभ बच्चनने केलेला व्टिटर वरच्या चिवचिवाटाचा मोबाईलवर संकेत मिळाला. त्याचा सुपूत्र अभिषेक बच्चन याला मुलगी झाल्याचा असीम आनंद या महानायकाने आपल्या दोन ओळीच्या संदेशात होता. अभिषेक-ऐश्वर्या दाम्पत्याला मुलगी झाली हे आजच्या सामाजिक स्थितीत खूप चांगलं झालं.
      मुलींच समाजातील झपाटयाने घटणांरे दरहजारी प्रमाणे खूप मोठया चिंतेची बाब आहे. बच्चन परिवारात आलेली ही छोटी ' गुड्डी ' अनेक कुटुंबियांना प्रेरणा देईल अशी आशा वाटते. समाजात चित्रतारकांना नजरेसमोर ठेवून त्यांच्या जीवन पध्दती प्रमाणे जगण्याचा प्रयत्न करणारे फॅन लाखोंच्या संख्येने आहेत. ही छोटी गुड्डी येणा-या काळात काही प्रमाणात का होईना स्त्री भ्रृण हत्त्यांचे प्रमाण कमी करेल अशी आशा या निमित्ताने व्यक्त करता येईल.
      भारतात पोलिओ मुक्तीसाठी पल्स पोलिओ अभियान घेताना याच महानायकाची मदत आरोग्य मंत्रालयाने घेतली होती संपूर्ण देशात असलेल्या अमिताभच्या प्रतिमेला फायदा या मोहिमेला मिळाला आणि अशक्य वाटणारी बाब आपणास साध्य करता आली आज पोलिओ भारतातून पूर्णपणे आणि कायमचा संपवण्याच्या शेवटच्या टप्प्यात आपण पोहोचलो आहोत.
      या बाबत अधिक असं सांगता येईल की अमिताभ सारख्या महानायकाला घरात नात जन्माला येण्याचं कौतूक आहे. त्याचं अनुकरण इतरांनी करायलाच हवी शेवटी निसर्ग नियम हेच सांगतो की स्त्री-पुरुष याचं जन्माचं प्रमाण निसर्गत: समसमानच आहे.
      मुलगी झाली हो म्हणताना कौतुक वाटायला हवं चिंता वाटायला नको कारण आज सर्व क्षेत्रात स्त्रियांनी आघाडी घेतलेली आहे. आपल्या देशाचं राष्ट्रपती हे सर्वोच्च पद भुषविणारी व्यक्ती महिला आहे. माननीय प्रतिभा पाटील यांचं कर्तृत्व सर्वांनी मानलय संसदेत ही लोकसभेचं अध्यक्षपद मीराकुमार यांच्या रूपानं एका महिलेकडेच आहे. राजकारणाप्रमाणे इतरही क्षेत्रात महिलांची आघाडी हेच सिध्द करते की मुलगा-मुलगी हा भेद आपण मनातून काढला पाहिजे.
     बेटी धन की पेटी अशी एक म्हण प्रचलित आहे. पण आज समाजात जे चित्र दिसतय ते चिंताजनक आहे त्या पार्श्वभूमीवर आजा मुलीच्या जन्माचं कौतुकच व्हावं मुलगी अभिषेक-ऐश्वर्याची असो की सर्वसाधारण घरातली आपण सजगपणे या घटनेकडे बघावं
                                  -प्रशांत दैठणकर  

Friday 11 November 2011

हिरव्या पानाचा देठ की हो...



     कशाचं मुल्य काय असतं हे फक्त श्रीमंतांना कळतं मात्र कशाची किंमत काय असते ही केवळ आणि केवळ मध्यमवर्गीयाला आणि गरीबांना कळतं असं महणावं लागतं.
     काही बाबी नजरेसमोर आल्यावर विचारांना त्या आपोआप चालना देतात आणि आपण विचार करायला लागतो. संध्याकाळी जेवण करुन तारावर पान खाताना असंच माझं झालं. अरे हो तारा म्हणजे औरंगाबाद शहरातील उस्मानपुरा भागात असणारं तारा पान सेंटर. आपण साधारण पानटप-या किंवा पानाचे ठेले बघतो मात्र काही बाबतीत औरंगाबाद शहर आजही नबाबी थाटाचं आहे. माणसं शौकीन आहेत आणि त्त्यांची पानाची आवड पुरविणारं हे पान सेंटर म्हणजे पानाचा भला मोठा कारखानाच आहे.
     लांबलचक हजार चौरस फुटांचा व्याप आणि त्यात एकावेळी काम करणारे किमान 70 ते 80 जण असा ताफा. इथं शौकीन येत राहतात आणि पानाची फॅक्टरी सुरुच राहते. गुटखा आल्यावर पानाची विक्री कमी झाली अशी ओरड सर्व पान टपरीवाले करतील मात्र या ठिकाणचं चित्र निराळच आहे.
     रात्री आठनंतर हा भाग फुलायला लागतो. जुन्या उस्मानपु-यातील त्या तंग गल्लीत गाड्यांच्या रांगा लागायला सुरुवात होते. गाडीत कुटुंबासह आलेली मंडळी गाडीत बसूनच पान खाणं पसंत करतात आणि सेवाही अगदी कारमध्ये पुरविली जाते. पार्कींग सांभाळण्यासाठी 3 जण राबताना इथ दिसतील.
     ओरंगाबादेत अगदी राष्ट्रपती आले तरी तारा पान चं पान जेवणानंतर देण्याची परंपरा आहे. आणि त्यामुळेच याचे मालक शरफुद्दीन ज्यांना सारं शहर शरफुभाई म्हणून ओळखतं, त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. प्रचंड पैसा येवूनही यश आणि पैसा डोक्यात न जाऊ देता शरफूभाई मान खाली घालून सकाळ-संध्याकाळ व्यवसाय सांभाळतात. शरफूभाईंची पानं मुंबई आणि दुबईपर्यंत जातात. त्यांच्या मेहनतीचं फळ म्हणजे `तारा` औरंगाबादच्या महत्वाच्या ठिकाणांपैकी एक ठिकाण बनलय.
     खाणारे हौशी आणि हौसेला मोल नसतं या उक्तीप्रमाणं इथं पानाचे खवय्ये... खईके पान बनारसवाला म्हणत तोंड रंगवत असतात. पान खाणे आणि पार्सल घरी नेणे हा माझा नित्याचा उपक्रम आहे त्यामुळे शरफुभाईंची रोजी भेट. याच ठिकाणी मध्यरात्रीच्या गमतीजमती आगळ्याच नाटकाच्या प्रयोगाला आलेल्या विजय कदमला सारंग नावाच्या मित्रानं पान खायला इथं आणलं. याला कुठतरी पाहिलय अशी आसपास कुजबूज पण विचारायला कुणी पुढं आलं नाही.
     एका रात्री ड्युटीवरुन परतताना याच ठिकाणी सुदेश भोसलेची झालेली भेट आणि त्याने सादर केलेली एक तासाची मिमिक्री आयुष्याची आठवण याला प्रेक्षक आम्ही तीनच  मी, बाबा गाडे आणि जयप्रकाश दगडे.
     असं सारं नजरेसमोर येण्याचं कारण अर्थात तिथं लावलेला दरफलक मसाला कलकत्ता पान 10 रुपयांपासून आणि अधिकात अधिक किंमत किती असावी तर 3000 रुपये हा चक्क 3000 रुपये. ज्या रकमेत गरीबाचं घर महिनाभर चालतं त्या रकमेचं पान अन् विडंबना ही की   शेवटी  पान खाऊन थुंकायचच ना .... ते देखील विकतच ना ....!काही गोष्टी मनाला कायम टोचत राहतात त्यापेकीच हे 3000 रुपयाचं पान. चालायचच आपला देश असा विषम समाजाचा आहे. आणि विचारांच्या  नादात त्या दिवशीचं पान रंगलच नाही असं मनाला उगाच वाटत राहीलं.
प्रशांत दैठणकर

Monday 7 November 2011

कलईची भुरळही


तो एक जादुगार वाटायचा लहानपणी. घराघरात त्याची वाट बघितली जाते अशी स्थिती होती. लहानपणी त्याचे ते पाठीवरचे दुकान अंगणात लावायचा त्यावेळी आमच्यासाठी ती मनोरंजन होतं खूप मोठं. ते सारं काही वेगळं अनुभव देणारं आणि चमत्कारीकच होतं. तो होता कलईवाला. भांड्यांना कलई केली जायची कारण तांबे आणि पितळेची भांडी त्यावेळी मोठ्या प्रमाणात वापरात होती.
साधारणपणे तांब्याच्या भांड्यात आंबट पदार्थ ठेवता येत नाहीत. या धातूची आंबट पदार्थावर रासायनिक प्रतिक्रिया होते आणि पदार्थ विषारी बनतात. असे पदार्थ खाणं घातक आहे म्हणून भांड्यांना कलई करणं आवश्यक असायचं. याचसाठी हा कलईवाला गरजेचा होता.
तो गल्लीत आरोळी ठोकायचा ए कलईवाला... मग कुठल्या ना कुठल्या बि-हाडातून त्याला आवाज दिला जायचा... मग त्याचं दुकान सुरु. सायकलवरुन छोटा भाता काढायचा. जमिनीत छोटासा खड्डा करीत तो भाता तिरका लावायचा आणि समोरच्या खड्ड्यात कोळसे ओतायचे. तोवर आसपासच्या घरांमधून दराबाबत घासाघिस झाल्यावर भांडी आणली जायची.
त्यानंतर भात्याने कोळशाचे निखारे फुलवले जायचे. ताजा रेफरंस असल्याने खरे शोले बघण्याचा आनंद आमच्या चेह-यावर असायचा. बच्चे कंपनी त्या कलईवाल्याला गराडा घालून बसायचो. तो सराईत जादुगाराप्रमाणे भांड निखा-यावर ठेवून गरम करायचा. त्याच्या खास चिमट्यानं धरीत त्यात नवसागर टाकुन कापडाने आत हात घालून फिरवायचा त्यावेळी पितळी भांड्याचा पिवळा रंग मिटला जाउन सुंदरसा रूपेरी रंग आणि लकाकी त्या भांड्याला यायची.. ही सारी जादुच वाटे. नंतर ते गरम भांडे पाण्याच्या बकेटमध्ये टाकल्यावर त्याचा खास होणारा चर्र... आवाज आजही कानात ताजाच वाटतो.
काळ बदलला आणि स्टेनलेसचा चकचकीतपणा घराघरात आला. आता तो बिचारा कलईवाला कोणता व्यवसाय करीत असेल असा सवाल आज माझ्या मनाला कायम पडतो आणि त्या वयातली ती कलईची भुरळही जाणवत रहाते.
प्रशांत दैठणकर
छायाचित्रे मायबोलीवरून साभार

Thursday 3 November 2011

मी चांदभूल व्हावे ...!


          त्या मावळत्या सूर्याचं प्रतिबिंब घरातल्या आरशात पडलेलं आणि त्याची प्रभा घरभर पसरलेली. दिवसभर चैतन्याचा सूर आळवून रजा घेणारा दिनकर मला निराश भासत होता. पण त्याचंही मोठेपण कबूल करावं लागतं कुठलीही अपेक्षा न ठेवता तो आपली दिनचर्या पार पाडत असतो.
     त्या सूर्याचं प्रतिबिंब प्रत्येक तासाला वेगळं रुप दाखवणारं मन त्या रुपाकडे बघत कुठतरी विचारांच्या धारेत वहायला लागलं. खरच मलाही कधी असं जगता येणार आहे का, निरपेक्ष वृत्तीने निसर्गात मानव प्राणी सोडला तर सा-यांची जगण्याची वृत्ती ही निरपेक्ष आहे असं मला जाणवायला लागलं.
     काळ आपलं दळण दळत असतो त्याबर हुकुम ऋतू येतात आणि जातात. नभ त्यांच्या क्षमतेने पूर्ण बरसून सर्वार्थानं रिते होवून या धरतीला आयुष्याचं दान देवून जातात. मग ही धरती देखील रोज मानवाने पायाखाली तुडवली म्हणून न रागावता आपले पणानं पेरल्या बियांमधून धान्य देते. आपल्या उदरातून साठवलेलं पाणी देते.तिला काहीच मागावं असं वाटत नसेल का ? इतक्या निरपेक्ष वृत्तीने मलाही कधी जगता येइल का ?
     विचार आणि त्याचं वर्तुळ याचा भोवरा होवून मन त्यात गरा-गरा फिरायला लागतं. नभीचा तो चंद्र... बालपणीचा चंदामामा, चांदोबा मोठेपणी नातं बदलून आपण त्या चांदण्या रात्रीत फिरताना त्याला वेगळं स्थान दिलं. तो प्रितीचं प्रतिक झालेला. अन् चंद्र आहे साक्षीला असं आळवत आपण तिच्यासवे घराच्या टेरेसवर मारलेल्या चकरा, तिचं ते हळूवारपणे चाललेलं प्रणयाचं गीत  ` चांदण्यात फिरताना माझा धरलास हात ... सखया रे आवर ही सावर ही चांदरात.... ते चंदेरी लेणं मनसोक्त प्रकाशाचं धरतीवर सांडणं... असं मनसोक्त प्रेम ओतायला जमेल का ? समजा ते जमलं तर सगळ्यांना ते रुचेल का...
      चांद रात येते आणि जाते नाही म्हणायला रात्रीच्या त्या सावल्यांच्या खेळाला एका आमावस्येच्या दिवसाचा अडसर असतोच ना. कसं दिवसा नाही बघता आलं तर रात्री बघावं जगून.. रात्र जागत जागत बिछान्यावर तळमळत संपता संपत नाही असं नेहमीच का होतं ? पुन्हा प्रश्नांचं मनात पाझरणं सूरुच राहातं.
     मनातल्या या आंदोलनातून मग शब्द नकळतपणे मनाच्या टोकापासून बाहेर पडतात.
              मी सूर्य फूल व्हावे
              मी चांद भूल व्हावे
              वाटे प्रिये मला मी
              आयुष्य धुंद हे जगावे
          काव्य सुरु होतं ते न संपण्यासाठी अन् मन पुन्हा वेगानं आतल्या मनाचा वेध घेत विचारत रहातं.. असं मुक्त छंदातलं यमक आयुष्यात कधी जुळणार माझ्या... !

Tuesday 1 November 2011

अलविदा ना कहना ... !


            प्रवास ... हा शब्द आपल्या आयुष्यात अपरिहार्य बनलेला आहे. कोण पोटासाठी तर कोणी मौजेसाठी पण प्रवास अटळ आहे. दिवाळी संपल्यावर.. औरंगाबाद सोडलं आणि पुन्हा प्रवास सुरु झाला. प्रवासात मी कार चालवताना बाजूला चित्र अनेक प्रवाशांचं दिसत होतं. सगळेच आपापली दिवाळी आटोपून आपापल्या नोकरीच्या ठिकाणी निघालेले. मनही मग प्रवासाच्या विचारात गुंतलं.
     आयुष्य हा देखील एक प्रवासच आहे. पहिल्या श्वासापासून शेवटच्या श्वासापर्यंतचा. या प्रवासात सारेच व्यस्त आहेत पण त्याचा हेतू किती जणांना कळला आहे असा प्रश्न पडतो. या प्रवासात प्रत्येकाला वेगळं जग जगायचं असतं.
     प्रवास हा शब्द समोर आल्यावर मला डोळ्यासमोर मुंबईत सी.एस.टी.च्या बाहेर पडणारी गर्दी दिसत असते. ही सारी जनता आपल्या स्वत:च्या आणि कुटुंबाच्या पोटासाठी दररोज न चुकता प्रवास करतात. त्यातून त्यांची एक प्रवासी मानसिकता तयार झालेली दिसते. गर्दीत लोंबकळत प्रवास करणं प्रारंभी मजबूरी असते नंतर ती सवय होवून जाते.
     प्रवास... दर्यावर्दी वेगळा प्रवास करीत कोलंबस सारख्या दर्यावर्दी नव्या जमिनीच्या शोधात प्रवास करायचा. लहानपणी गोष्टी वाचल्या होत्या त्या सिंदबादच्या सात सफरींची तो प्रवास असो की हातीमताईचा चमत्कारी शाब्दीक कोडे पूर्ण करण्याचा प्रवास... सारं रोमहर्षक असच होतं.
     अलेक्झांडर असो की नेपोलियन सा-यांनाच जगाच्या साम्राज्यपदाचं वेड त्यातून त्यांचा घडलेला प्रवास हा इतिहासच आहे. मोहनदास करमचंद गांधी यांच्यातील बापू जागा झाला तो दक्षिण आफिकेत प्रवास करताना झालेल्या अपमानातूनच आपल्या कोणत्या प्रवासात माझ्यातला मी मला सापडणार असा प्रश्न माझ्या मनात तरळत असतो.
     प्रभू श्रीरामचंद्रांनी 14 वर्षे वनवासाचा प्रवास केला त्यात पत्नी या नात्यानं सितेने साथ दिली हे कळतं पण लक्ष्मणाने दिलेली साथ अतुलनीय अशीच होती. असा लक्ष्मण आजच्या प्रवासात भेटत नाही हे देखील कबूल करावच लागतं.

     प्रवास  आणि त्याचे पर्याय अर्थात प्रवास कसा होतो. कधी पायपीट कधी सायकल नंतर मग मोटारसायकल. काही प्रसंगात हा प्रवास रिक्षा किंवा बसच्या रुपाने करता येतो तर रेल्वेचा प्रवास ही अजब कहाणी ठरते. मध्यमवर्गीयांचे स्वप्न असणारा हवाई प्रवास हल्ली स्वस्त विमानसेवांमुळे आवाक्यात येत आहे. सागरी प्रवास प्रत्येकाला हवा वाटतो पण ते शक्य नसतं यात एक प्रवास सा-यांनाच अटळ तो अर्थात मरणानंतरचा पण तिथं आपणच नसतो तो प्रवास इतरांनी घडवयाचा असतो.
     प्रवास आणि त्याचं वर्णन आणि त्यावर उभा असलेला पर्यटनाचा व्यवसाय लाखोंना यातून रोजगार मिळतो लाखो कुटुंबांचं भरण पोषण यावरच होतो. त्यात बसस्थानक- रेल्वेस्टेशनवर ते फेरीवालेही आले.
     चला जाता हूं किसी की धून में....
असं म्हणत सुरु झालेला प्रवास कधी सांगायचं
     आदमी मुसाफिर है !
अशी अनेक गाणी त्याच्यावरची सापडतील आणि या प्रवासात एकदा भेटलेली व्यक्ती पुन्हा भेटेलच याची खात्री असत नाही जग कालच 700 कोटींचे झालय. तरी देखील आशा ठेवायची की अशी व्यक्ती पुन्हा कधी ना कधी भेटेल आणि मनाला बजावायचं.
     चलते चलते मेरे ये गीत याद रखना
     कभी अलविदा ना कहना .....
अशा प्रवासाला निघालेल्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा... सायोनारा.
-          प्रशांत दैठणकर