Tuesday 24 April 2012

Life On Hold... Please..

याला काय म्हणायचं हे मात्र कळलं नाही.. जन्माला आणि मृत्यूला आपण आपल्या ताब्यात मिळवलं... काही प्रमाणात तरी आपण हे साध्य केलय मात्र याचा गैरफायदा तर आपण घेत नाही ना असं वाटलं...
      दवाखान्यातला तो क्रिटीकल केअर युनिटचा भाग.. स्क्रीन लावलेले.. यावर –हदयाचं आलेखन चालू होतं दुस-या बाजूला विविध यंत्रांमधून आयुष्य उधारीवर ओतून त्या देहात प्राण फुंकले जात होते.. का.., जगणं संपलं की नाही याची कल्पना नाही अशा स्थितीत व्हेंटीलेटरवर ठेवलेले ते शरीर.. माझ्या शरीरावरच रोमांच आले.. मन मला आठ वर्षे मागे घेऊन गेले.. आई.. हो आई होती ती माझी..
      आई.. झालं  तर ते संपवावं.. एका क्षणात संपायला हवं.. आप मरे दुनिया डुबे असं ती नेहमी सांगायची.. ब्रेन ट्युमरचं ऑपरेशन होवून  आठ दिवस झालेले.. पण आता ते जगणं रोजचं मरणं होतं.. अपंग होवून जगणं .. रोजचंच मरण ठरावं.. तिच्या मनानं ठरवलं आणि सर्व उपचारांना प्रतिसाद पुर्ण बंद झाला.. तिची इच्छा.. आपण त्याचा आदर केला पाहिजे.. नाही पटला हा निर्णय सा-यांना पण तो खंबीरपणाने घ्यावाच लागतो.. आज दोन्ही चित्र मनात उभी आहेत..     
काय बरं आणि काय चांगलं.. मनात प्रश्नांनी फेर धरला होता. मन वारंवार त्याच बाबीकडे धावत होतं. आपणास काय अधिकार आहे मरण रोखण्याचा.. मरणा-यालाही आपण वेटींगवर ठेवायचं हे मनाला पटत नाही. कृत्रिम यंत्रांनी माणसाला होल्डवर टाकता येतं.. हा काय मोबाईल फोन आहे का.. मरण हे देखील सुखानं यावं लागतं.. आज त्यालाही माणुस पारखा झालाय.. हेच खरं..
काळ आला पण वेळ आली नाही ...
हे मरण टळण्याचं कारण आपण अनेकदा बघतो आणि सांगतो.. पण आता
काळ आला आणि वेळही आली तरी त्यालाही पॉझ देता येतो ही स्थिती आणि आलेलं हे स्थित्यंतर मनाला सुन्न करणारं असंच होतं.. इथल्या व्यावहारीक जगात भावनांना महत्व नाही आहे ते आजच्या व्यवस्थेला आणि आपल्या सोईला.. त्यासाठी नैसर्गिक मरणही गैरसोय होता कामा नये इतकी सोय विज्ञानानं केलीय त्या फायदा घेतला तर वावगं ते काय ही प्रतिक्रीया देखील अशीच सुन्न करणारी.. आपण त्यात केवळ प्रेक्षक ही आणखी त्रास देणारी बाब इतकच..
प्रशांत दैठणकर

Thursday 19 April 2012

माठ

उन्ह वाढायला लागली आता पाण्याची गरजही वाढली. पाणी हवं ते गारच हवं वाटतं. माठ घ्यायचा विचार दोन आठवड्यांपासून करतोय पण सोबत कोणी नसल्यानं माठ टू व्हीलरवर आणणं अवघड होतं. आज अपार्टमेंटच्या खालीच गाडीवर माठ विकायला आले आणि महाग पडला तरी चालेल पण घेऊन टाकू म्हणत घेतला.. दहा लिटरचा तो माठ चक्क बारगेन करीत निम्म्या किंमतीला अर्थात १०० रूपयांना घेतला.. काय ही महागाई.. घरात आणल्या आणल्या माठाची रवानगी नळाखाली.. भिजला पाहिजे चांगला......
      माठात पाण्याची धार पडायला लागली आणि डोक्यात माठाचे उपयोग तरळायला लागले. पहिले आठवला तो कन्या जान्हवीच्या हातून फुटलेला माठ. असाच घरी आणला आणि पाणी  भरायचं म्हणून तिची एकच घाई. वय आठ आणि हातात न मावणारा माठ.. झालं.. तोल गेला आणि माठही, पन्नास रूपयांचा माठ आणि तिचं रडणं पाचशे रूपयांचं.. तिला समजावता समजावता नाकी नऊ.. दहा,, अकरा.. सगळे एकदम आले.
कितीही चांगले फ्रीज आले तरी माठाच्या पाण्याचा गोडवा आणि गारवा याची तोड त्याला येतच नाही. मातीतून घडवलेला हा माठ आपल्या भारतीय जीवनशैलीचं एक अभिन्न अंग आहे.
कृष्ण गोपिकांची खोडी काढताना मटकी फोडणारा जसा समोर येतो तसाच तो बाळगोपाळांना गोळा करून दही हंडी  दही पळवणाराही समोर येतो.
हिंदी सिनेमात जितेंद्र आणि कंपनीला घेऊन दहा वर्षे चित्रपटांचा रतिब लावणा-या दाक्षिणात्यांनी आपल्या चित्रपटात माठाचा भरपूर वापर केलेला आहे.
वर्गात एखाद्याला सर.. काय माठ आहे असं म्हणायचे त्यावेळी सारा वर्ग हसायचा आणि ते माठाचं लेबल एखाद्या गोंदणाप्रमाणे आयुष्यभरासाठी चिटकायचं... त्यावेळी गंमत वाटायची. आता ती मंडळी माठाप्रमाणे गोल झालेली पाहून सरांच्या दूरदृष्टीचं कौतुकच वाटतं....
लग्न असो की अंत्यसंस्कार तिथं माठाचं महत्व आहे नावात फरक पडतो इतकंच. लग्नात वापरताना त्याला मंगलमाथनी म्हणतात तर संक्रांतीच्या पूजेत सुगडे. जगाचा संबंध कायमचा संपल्यावर उरतं ते शव. याच्यावर अंत्यसंस्कार केले जातात त्यावेळी मडक्यात पाणी भरून प्रदक्षिणा मारून ते मडकं मागील बाजूस टाकून फोडतात. याच्या आवाजाला घटस्फोट म्हणतात. आता लग्नसंबंध तोडण्याच्या कृतीला हा शब्द कधीपासून आणि का वापरला जातो याची मात्र माहिती मला नाही.
मातीचं हे भांड म्हणजे माठ. याला आवा देखील म्हणतात हे अनेकांना माहिती नसेल. संक्रांतीला गावातल्या कुंभाराला सांगून अनेक माठ व इतर भांडी बनवायची. तिथं सर्व सुवासिनींना हळद कुंकू कार्यक्रमासाठी बोलवायचं. त्यानंतर त्या प्रत्येकीने आपल्याला हवं ते भांड लुटायचं म्हणजे आवा लुटायचा ही पध्दत आहे. काळाच्या ओघात हे अनेकांना माहिती नाही हे खरं.
आकाराप्रमाणे हा मातीच्या भांड्याचे नावही बदलते. छोटा आकार असेल तर बोळके हे दिवाळीत वापरतात. संक्रांतीला याचं नाव सुगडे होते. माठाची छोटी बहिण सुरई तर मोठा भाऊ म्हणजे रांजण होय. ग्रामीण भागात रांजण अर्धा जमिनीत गाडण्याची पध्दत आहे. तंदूरसाठी देखील याचप्रकारचा तोंड नसणारा रांजण वापरला जातो. कधी मडकं कधी माठ, हिंदीत याला मटका किंवा मटकी म्हणतात. हा मटका रतन खत्री नावाच्या वल्लीनं मराठीत आणला तो वेगळ्या रुपात. त्या मटक्यानं लाखोंना बरबाद केलय.
माठाचा माझा परिचय हा अगदी बालपणीचा.. पहिल्या पावसातला..
ये रे ये रे पावसा म्हणत पावसाला लाच देण्यापासून घर-घरात या जगात जगायचं कसं याचा धडा गिरवला जातो. यातच पावसाच्या सरीला मडके भरण्याचं आर्जव आहे... ये गं ये गं सरी.. माझे मडके भरी.. ते आर्जव  ऐकून सर धावून येते आणि मडके वाहून जाते... बालपणाचंही असंच असतं ते असच शिक्षणाच्या पावसात कधी वाहून जातं ते कळत नाही.
बुध्दी नाही तो माठ मात्र बुध्दीमत्ता काय हे समजावी यासाठी सांगण्यात येणा-या कथेत कावळा आणि माठच आहे. बिरबलाने माठात वाढवलेल्या भोपळ्याची बुध्दीमत्ताही या निमित्ताने आठवते. मानवी शरीरालाही देवानं घडवलेला माठच म्हणतात.. जसं
फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार..
विठ्ठला तू वेडा कुंभार..
सारं आठवताना माठ कधीच भरून वहायला लागला होता.. आपणही एका मर्यादेपर्यंतच कमवावं.. बाकी सारं वाहून जाणार असतं असा एक विचार मनात आला आणि मन  तिकडे वळलं..

Sunday 15 April 2012

जिंदादिल ललितदादा

काही घटना अचानक घडतात आणि आपण काही क्षण काय घडतय.. ते का घडतय असं आपल्याला विचारत राहतो.. उत्तर मात्र आपणाकडे काय तर कुणाकडेच असत नाही याचं उत्तर फक्त काळ हेच असतं. आजची सकाळ अशीच उजाडली... वर्तमानपत्र वाचत होतो.. अर्थात याला वर्तमानपत्र हा शब्द वापरणं चुक आहे असं माझं मत आहे. यात जे छापलेलं असतं ते घडून गेलेलं असतं म्हणजेच ताजा भूतकाळ यात असतो.. वृत्तपत्र हा काहीसा योग्य शब्द ठरावा... फेसबुकवर अनिरूद्दने लिहीलेलं वाचताना आपण काय वाचत आहोत हा सवाल मला पडला होता..
      काही व्यक्ती खरच इतरांपेक्षा वेगळया असतात.. जिंदादिल या शब्दाची व्याख्या जगणारं व्यक्तीमत्व असलेल्या ललित देशपांडे .. ललितदादा पुण्याला जाताना त्याला अपघात झाला आणि त्यात त्याचं या जगातलं भौतिक अस्तित्व संपलं... काही क्षण मन सुन्न होतं... दादा .. खरा दादा होता. आपण आपल्या आयुष्यात अनेकांना भेटतो. यातील अनेकजण आपल्या आयुष्यात बदल होईल अशी घुसखोरी करताना दिसतात. आपण त्यांना नाकारतो... काही असे की त्यांना आपण नकळत स्वीकारतो.. का.. याचं उत्तर देता येणार नाही पण हे घडतं... असं ललितदादाला माझ्या मनानं पहिल्याच भेटीत स्वीकारलं होतं हे आज जाणवतं. त्याचा स्वभावच मुळात तसा लाघवी होता..
      आयुष्याचं गाणं गायचं की त्याबाबत कुरकुरत रहायचं ही ज्याची त्याची मानसिकता असते. आव्हानं कमी नसतात.. ती स्वीकारणारी माणसं खुपच कमी असतात त्यापैकी दादा हा एक होता. त्याच्या वैयक्तिक आयुष्यात आव्हानांची मालिकाच दैवानं मांडली होती... यासाठी नशीबाला बोल न लावता आणि देवाशी न भांडता आहे त्यात आयुष्य किती सुंदर आणि ते उत्तमरित्या जगायचं कसं याचा परिपाठ तो घालत होता. हो... असही जगता येतं हे त्याच्याकडूनच मी शिकलो आहे असं सांगायला काहीच हरकत नाही.
      दादाची भेट अश्वीन देशपांडे या माझ्या मित्रामुळे झाली. ललित त्याचा चुलत भाऊ एकाच भेटीत तो माझाही भाऊच झाला.. परभणीला जायला निघताना पहिला फोन दादाला ही नंतर सवयच होवून गेली होती. तासा दोन तासांच्या भेटीत तो प्रसन्न करुन टाकायचा... दादा खरा दादा.. अचानक अर्ध्यावर मैफल सोडून निघाला यावर या क्षणीही विश्वास बसत नाही हे वेगळं सांगायला नको.. एक सलाम.. एक श्रध्दांजली.. दादा अलविदा...
प्रशांत दैठणकर