Monday 21 October 2013

रस्ते सुरक्षा साक्षरतेची निकड


रस्त्यावर होणा-या अपघातांचे प्रमाण वाढतच आहे. गेल्या वर्षाभरामध्ये भारतात रस्ते अपघातात मृत्यूंची संख्या साधारण दीड लाख इतकी होती.मात्र अपघात जखमी झालेल्यांची संख्या त्याहीपेक्षा जास्त आहे. त्याखेरीज चिंतेचा विषय म्हणजे राष्ट्राची अब्जावधींची संपती यात नष्ट झाली. या सर्व पार्श्वभूमीवर विचार करताना एकच बाब जाणवते ती म्हणजे रस्ता सुरक्षा विषयक जागृती आपल्याकडे जवळपास नाही. 
चित्रपट आणि वास्तव यात फरक असतो पण चित्रपटात भन्नाट वेगाने गाडी चालवताना बघून त्या धूम चे अनुकरण रस्त्यावर केल्‍यास अपघात होतो. यामुळेच रस्त्‍यावरील अपघातात दुचाकीस्वारांच्या मृत्यूचे प्रमाण  अधिक आहे. त्याहीपेक्षा अधिक चिंताजनक बाब म्हणजे यात 18 ते 30 वर्षे वयोगटातील तरुण मुलांचे प्रमाण सर्वाधिक आहे.
रस्त्यांवर वाहन चालवताना ज्या प्रकारची काळजी घ्यायला हवी त्‍याप्रकारची काळजी घेतली जात नाही. याला कारण अर्थातच प्रशिक्षणाचा आभाव हेच आहे. चारचाकी वाहन परवाना मिळवायचा असेल तर काही प्रमाणात त्याला प्रशिक्षणाची जोड आपणाकडे देण्यात आलेली आहे. मात्र दुचाकीच्या बाबतीत असं औपचारिक प्रशिक्षण दिलं जात नाही.
चारचाकी वाहनात चालवताना किमान संतुलन करण्याची आवश्यकता नसते. संतुलन दुचाकीवर आवश्यक ठरते. यामुळेच गतीचे वाहन चालविताना अचानक खड्डा आल्‍यास किंवा गतीरोधकावर संतुलन बिघडून अपघात होण्याची शक्यता असते. खड्डे चुकविताना होणारे अपघात आणि रस्त्यावर कुत्रा आडवा आल्याने होणारे अपघात टाळण्यासाठी वाहणाचे नियंत्रण व वाहन चालविण्याचे कौशल्य महत्वाचे असते. प्रशिक्षण नसल्याने कौशल्य येत नाही आणि गती असल्याने नियंत्रण जमत नाही त्यामुळे अधिक अपघात घडतात.
धाडस हे देखील अशा अपघांताच्या कारणांपैकी एक कारण आहे. अतिघाई इतकाच अपघाताचा धोका विनाकारण धाडस दाखविल्याने होतो. तरुण वयात ही धाडसाची प्रवृत्ती प्रबळ असते. आपण एकदम कुशल चालक आहोत या फाजिल आत्माविश्वासापोटी असे धाडस आणि त्यातून अपघात हा प्रवास असतो.
अपघाताच्या कारणांमध्ये आणखी एक कारण ते मद्य आणि वाहन. मद्य पिल्यानंतर वाहनाचा अपघात होण्याची शक्यता 8 पट अधिक वाढते हे लक्षात न घेता मद्यप्राशन करुन वाहन चालविण्या-यांची संख्या खूप मोठी आहे. अपघाताच्या कारणांमध्ये मद्यासोबत आता भर पडली ती मोबाईलची. आपण जगात सर्वात महत्वाचे आहोत असा भाव आणून मोबाईलवर बोलत वाहन चालविल्याने हल्ली अपघात अधिक प्रमाणात आहेत.  
मध्येंतरी कोल्हापूरवरुन गोव्याला जाताना निवास व्यवस्थेसाठी ट्रॅव्हल एजन्टला मोबाईल केला. त्याने माहिती दिली व फोन बंद करताना सांगितले मला सव्वातास फोन करु नका मी बाहेर जातोय आणि कार चालवताना फोन बंद असतो. चला एक तर सुरक्षा साक्षर भेटला. पण अशी साक्षरता सर्वांपर्यत पोहचली तरच रस्त्यांवर  कुत्ते की मौत मरणं बंद होईल.


                                     -प्रशांत अनंत दैठणकर-

Monday 7 October 2013

प्रवास आपला टपालासोबतचा...!

नव्या पिढीला फारसा परिचित नसला तरी जाणत्या पिढीमधील तुमच्या-आमच्या पिढीत साऱ्यांनी खेळलेला खेळ म्हणजे मामाचं पत्र हरवलं आता त्या वयात निरागस असल्याने खेळताना कधी प्रश्न पडला नाही की मामाचंच पत्र का हरवायचं आणि ते नेमकेपणने मलाच का सापडायच ? यातला विनोदाचा भाग बाजूला ठेवला तर मामाचं पत्र म्हणजे आईच्या माहेरचा दुवा होता. त्यात माहेर म्हटलं की सगळ्याच स्त्रिया हळव्या होत असतात माहेरुन ख्याली खुशाली सांगणारं त्याकळचं ते 15 पैशांचं पोस्टकार्ड जगण्याचा घटक होता आणि तो पत्र आणणारा पोस्टमन आपल्या घराकडे कधी येतो याची सर्वांना वाट असायची.
स्वातंत्र्य प्राप्तीनंतर नागरिकरणाला वेग आला आणि गावातली तरुण पिढी शहराकडे वळली. ज्यांनी मातीशी नातं जपलं अशी मोठी पिढी गावातच राहिली. त्याकाळी टेलिफोन फक्त श्रीमंताघरची वस्तू होती म्हणून पत्रव्‍यवहार हा जगण्याचा घटक होता.
मुंबईत नोकरीसाठी कोकणातून आलेल्या चाकरमानी लोकांसाठी संदेशवहनाचा तो खात्रीलायक आणि स्वस्त मार्ग होता.
संदेशवहनाच्या पध्दती काळानुसार आणि तंत्रज्ञानानुसार बदलत गेल्या आता व्होडाफोनचा जमाना असला तरी पूर्वी घोडाफोनचा जमाना होता. घोड्यावरुन संदेशवाहक पाठवून राजे एकमेकांशी पत्रव्यवहार करीत तर प्रशिक्षित कबुतरांकडूनही संदेश पाठविले जात होते.
युरोप आणि अमेकरकेत टपाल व्यवस्था सुरु झाली. ब्रिटीश भारतात आले त्यावेळी त्यांनी हे साधन भारतात आणले टपालाची शिस्तबध्द वितरण व्यवस्था असणारी टपाल कार्यालये दिडशे वर्षांपूर्वी थाटायला लागली त्याकाळी तार अर्थात टेलिग्राफ ही गतीशील संदेशवहनाची यंत्रणा टपाल कार्यालयाचाच भाग होती.
अशाच 15 पैशांच्या पोस्टकार्डमुळे विलंबाने का होईना शुभवर्तमान, ख्याली खुशाली, लग्न जुळल्याच्या बातम्या कधी निधनाच्या बातम्या कळायच्या पत्र जमवून ठेवायला घराघरात तारकेट असत. याच टपाल विभागाच्या तिकिटांमुळे हजारो जणंनी तिकिट संग्रह गोळा केलेले दिसतात निरनिराळया देशांची टपालाची तिकिटे गोळा करणे हा एक चांगला छंद आहे.
पोस्टमनला बऱ्याच वेळा इतरांची पत्रे लिहून देणे तसेच आलेल्या पत्राचं वाचन करुन देणे करावे लागे. न शिकलेल्या पिढीला त्यामुळे पोस्टमन अर्थात डाकिया घरातलाच सदस्य मानत होते. त्याला दिवाळीला आवर्जून पोस्त दिली जायची.
काळ बदलला तसं संदेश वहनाचं स्वरुप बदललं मात्र आजही व्यापारी वर्ग आणि ग्रामीण भागात राहणाऱ्यांना पोस्टकार्ड जवळचं वाटतं. नव्या पिढीत आता मोबाईलवर मेसेज पाठविणं, चॅटींग करणं, फेसबुक वर केलेलं स्टेटस् अपडेट आणि व्टिटरवर केलेलं व्टिट आदी मार्ग उपलब्ध आहेत त्यातच ही मंडळी रमते. पत्र लिहिणे आता भाषा विषयात काही मार्कांपूरतं उरलं आहे.
पत्र लिहिताना मोठ्यांना केलेला नमस्कार मग पत्राचा मायना. पत्र पूर्ण झल्यावर लिहायचं राहून गेलं म्हणून लिहिलेलं ता.क. अर्थात ताजा कलम. निधनाची वार्ता कळवणं आलं की त्यात टाकलेली टीप हे पत्र वाचताच फाडून टाकणे आणि आपणही ते फाडायचं ही पध्दत या पत्रालाच तार समजून लवकर निघावे या आशयाची खास टिप आदी अनेक बाबी टपाल आणि पोस्टकार्डशी जुळलेला आहे.
याच टपाल खात्यमुळे आवर्ती ठेव अर्थात आर.डी. रिकरिंग डिपॉझिट च्या रुपाने अनेकांना व्यवसायची संधी लाभली आजही टपाल खात्याशी ही माणसं निगडीत आहेत. भविष्य निर्वाहासाठी पीपीपी. अर्थात टपाल भविष्य निर्वाह निधीच्या रुपाने अनेकांनी सुरक्षित गुंतवणुकीसाठी टपाल खात्यावर विश्वास टाकला.
9 ऑक्टोंबर हा या टपाल खात्याची आठवण देणारा टपाल दिन. आज तंत्र बदलल्यावर टपाल विभागाने  ई-ट्रान्सफर आणि ई-मनी ऑर्डर सुरु केली पण शहरात व वसतीगृहात राहून हॉस्टेल लाईफ ज्यांनी जगलय यंना या मनी ऑर्डर म्हणजे लाईफ लाईन असायची. या मनी ऑर्डरच्या भरवशावर होणरी उधारी आणि पार्ट्या यांचं सान त्यांच्या आयुष्यात एखाद्या आठवणीच्या कुपीसारखं आहे.
लष्करी सेवेत असणाऱ्यांना सिमेवरुन घरी पैसे पाठवणं आणि आपली खुशाली कळवणं या साठी टपालाचाच आधार आहे. संदेसे आते है हमे तडपाते हे हे बॉर्डर चित्रपटातलं गाणं याचा भावनेला व्यक्त करणारं आहे.नाम चित्रपटात पंकज उधासने गायलेल व त्याच्यावरच चित्रित झालेल चिठ्ठी आई है या गाण्यावर हॉस्टेल मधले मित्र रडताना मी बघितले आहेत. डाकिया डाक लाया हे काका अर्थात सूपरस्टार राजेश खन्नावर चित्रित झालेलं गाणं असो की स्मिती पाटीलचं हमने सनम को खत लिया ही गाणी डाकिया, डाकबाबू अर्थात पोस्टमन आणि टपालाचं महत्व अधोरेखीत करतात.
आजही टपाल खातं महत्वाची कामगिरी बजावत आहे. अंगडिया सेवा आल्यवर खाजगी सेवेचा दर्जा पाहून अनेक जण कुरिअरकडे वळले असले तरी महत्वाचे दस्तऐवज पाठविण्यासाठी आजही टपाल खात्याची स्पीडपोस्टसेवा पसंद केली जाते. 
टपाल खात्यात असणारा आरएमस अर्थात रेल मेल सर्व्हीस आजही गतीमान प्रवास तुमच्या-आमच्या आयुष्यात अगदी महत्वाचा आहे. घरोघरी जाऊन टपाल वाटप करणारा पोस्टमन आणि त्याच्याशी निगडीत यंत्रणेला टपालदिनी सलाम आणि चौकातल्या लाल रंगाच्या टपाल पेटीलाही सलाम.


                             -प्रशांत अनंत दैठणकर- 

Tuesday 26 March 2013

रंगांचा हा उत्सव


आठवते ती प्रत्येक होळी त्या वयातली ज्या वयात रंगात रंगण्याचं वेड होतं मनात. ते रंग उडवण्याचे आणि रंग उधळत त्या रंगात रंगण्याचे दिवसही अगदीच ताजे आहेत मनात. ते रंग अंगावरून उतरले असले तरी मनातून कधीच उतरणार नाहीत हे देखील तितकंच खरं हे सांगावच लागेल. बेंबीच्या देठापासून बोंबाबोंब करताना आनंद वाटायचा. दुस-या वर्गात असताना धुळवडीला मोठ्यांच्या होळीत नाचून घरी परतल्यावर काय बे असं अनाहुतपणे तोंडातून बाहेर पडल्यावर बापाने रागात पाठीवर बे एके बे .. बे दाही वीसपर्यंत रंगवलेला पाढा अनेक दिवस मिरवला.. त्याच दिवशी शिवी नावाच्या शब्दाशी आयुष्यभरासाठी काडीमोडही झाला..
      शिमगा संपला तरी रंगांचं नातं मात्र आजही कायम आहे.. अगदीच रंगिला नसलो तरी हळव्या मनाने आयुष्याचे नाना रंग आजवर बघितले आणि ते जपले.. आजवर धुळव़डीला धुंद होवून रंगात रंगणं कायमच आहे.
गोरे रंग पे ना इतना गुमान कर.. असं म्हणत आपल्या प्रितीला चिडवण्यातली मजा काही औरच आहे इतकं रंगीत मन आजही आहे. सकाळ संध्याकाळ निसर्ग खेळत असलेल्या रंगाचा खेळ असो वा दारात रोज रंगणारी रंगावली.. रंगांची साथ कायमच आहे त्याही पेक्षा रंग आपला पाठलाग करतात असं म्हणावं लागेल असं हे आयुष्य.... प्रेमात पडल्यावर हे रंगीत आयुष्य सप्तरंगी झालं आणि मनही त्या रंगांनी वेडावलं.. ते आजही कायम आहे.. तरीही इतर रंगांचं प्रेम आहे हे का याला काही उत्तर नाही. काही प्रसंग कधी कधी रंगाचा बेरंग करीत असले तरी ते मुळचे रंग पुन्हा मनाला उभारी देत असतात. आधार देत राहतात.. स्वप्नांनाही रंगीत करीत असतात.
एरव्ही नाना रंगाचा अंहंकार मिरवणारे चेहरे याच एका दिवशी समान दिसायला लागतात. आपण सर्व एकच आहोत याची जाणीव करून देणारा रंगांचा हा उत्सव.. मनाला रंगवून आत्मभान आणि आत्मपरिक्षण करायला लावणारा हा  रंगोत्सव...
रंगा या जगाच्या रंगात रंगा...
प्रशांत दैठणकर 26 मार्च 2013

Tuesday 19 March 2013

फसवं बूक !


संपर्काचं नवं लोकप्रिय साधन बनलेल्या फेसबूकच्या माध्यमातून जसे जिवाभावाचे मित्र सापडतात तसेच हे मायेचं महाजाल अनेक तरुणींसाठी सापळा देखील ठरत असल्याने या विषयाकडे गांभिर्याने बघण्याची गरज आज निर्माण झाली आहे.
     सायबर गुन्हेगारी हा पोलिसांकरिताही नवा प्रकार आहे. साधारणपणे एखादा चोरीसारखा गुन्हा घडतो. त्यावेळी गुन्हेगार त्याच परिसरात सापडू शकतो त्वरीत हालचाली झाल्यास त्याला लगेच जेरबंद करणे शक्य आहे. मात्र इंटरनेटचं हे महाजाल वैश्विक स्वरुपाचं आहे. समोरुन आपणाशी गप्पा मारणारी व्यक्ती जगाच्या कोणत्या कोपऱ्यात आहे हे आपणास सांगणं शक्य नसतं.
     नेटवरुन संपर्क प्रस्थापित करुन मुलींना नको त्या ठिकाणी बोलावून प्रेमाच्या नाटकाआड त्यांच्यावर अत्याचार करण्याचे प्रकार आता घडत आहेत. त्यामुळे पालकांनी सजग होण्याची आज गरज निर्माण झाली आहे.
     काही वर्षांपूर्वी भाकित होतं की यापुढील काळात वाद आणि भांडणं प्रसंगी युध्द झाले तर ते पाण्यासाठी होईल. हे भाकित आता खरं होताना जाणवतय 70 टक्के पृष्ठभागावर पाणी असणाऱ्या आपल्या या वसुंधरेवर आज अनेक भागात पाण्यावरुन भांडणे होत आहेत. देशांमधील याबाबतचे वाद युध्दही आमंत्रित करु शकतात अशा स्थितीत आहेत.
     सायबर क्राईम मध्ये गुन्हेगार जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असू शकतो हे लक्षात घेऊन यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील कायदा करण्यात आला आहे. हा कायदा पहिला असा कायदा आहे जो जम्मू आणि काश्मीरसाठीही लागू करण्यात आला आहे. याचा उद्देश या प्रकारचा गुन्हा कोठेही होईल हे गृहीत धरुन तपासाच्या मर्यादांचा विस्तार करणे असाच आहे.
     या गुन्हेगारीच्या सापळ्यात आपली मुलं सापडणार नाहीत याची काळजी आपल्यालाच घ्यायला लागेल यासाठी आपली मुलं संगणकावर काय बोलतात याची माहिती आपण ठेवणं अत्यंत आवश्यक झालय. मुलांचे फेसबूक सारख्या सोशल नेटवर्कींग ग्रुप मध्ये कोण दोस्त आहेत हे आपणास सहज कळू शकणे त्या मित्रांचे प्रोफाईल पाहून आपणास त्याबाबत ठरवता येईल.
     एकच सांगणं फेसबूक वापरा त्याचं फसवंबूक होवू नये याची काळजी घ्या.

                                           -प्रशांत दैठणकर-

Wednesday 13 February 2013

रेडिओचं कात टाकणं ...!

       काळ झपाट्याने बदलतोय त्यासोबत बदलणारं तंत्रज्ञानही बदलत आहे. या गतिमान बदलाच्या काळात गेल्या 3 दशकात खुप मोठे बदल झाले याचे स्वागत झाले. कधी विरोध झाला पण बदल होतच राहिले कधी-काळी जिवनाचा अविभाज्य भाग बनलेला रेडिओ, टि.व्ही. आल्यानंतर अडगळीत गेला मात्र आता पुन्हा कात टाकून हे संवाद संपर्क माध्यम आता पुन्हा नव्या रुपात झपाट्याने आपलं महत्व सिध्द करीत आहे.

            कधी काळी हा रेडिओ संपन्नतेचं लक्षण होता गावातल्या तालेवार व्यक्तीकडेच रेडिओ असे. नंतर हा रेडिओ इराण्यांच्या हॉटेलचं आकर्षण बनला. या आकर्षणातून इराणी हॉटेल्स खच्चून भरलेली असायची त्याकाळात रेडिओला स्पर्धा होती ती केवळ ग्रामोफोन अर्थात फिरत्या तबकडीची याला रेकॉर्ड म्हणायचे नंतरच्या काळात टिव्हीच्या आगमनापूर्वी ग्रामोफोनचं युग मॅग्नेटीक कॅसेटनी सरकवलं हा काळ मेड इन जापान च्या लोकप्रियतेचा होता.

            टेपरेकॉर्डर वर कॅसेट टाकून गाणी ऐकायची आणि आपलाही आवाज  आपण ध्वनीमुद्रीत करुन ऐकायचा याही काळात रेडिओची क्रेझ अबाधित असल्याने रेडिओ आणि टेपरेकॉर्डर असा टू-इन वन घराघरात दिसायला लागला ज्यावेळी बुधवारी आवाज की दुनिया के दोस्तों अशी साद ऐकण्यास सारे अतुर असायचे त्याचवेळी टिव्हीचा चंचूप्रवेश झाला परंतु तो उमरावांच्याच दिवाणखाण्याची शान होता.

            या बदलाच्या काळात अनेक गोड स्मृती या रेडिओने अनेक पिढ्यांच्या मनात जागवल्या. रेडिओ सिलोनवर दर महिन्याच्या एक तारखेला आज पहिली तारीख.. खुश है जमाना हे गाणं जितक्या आवर्जून ऐकायचे तेच चाकरमानी के.एल.सहगल या गायकीतल्या भिष्मपितामहाचं 7.55 चं सकाळंचे गाण ऐकल्याशिवाय दिवस सुरुच करीत नसत.

            ऑल इन्डिया रेडिओ की उर्दु सर्व्हीस असो की विविध भारती, रेडिओ सिलोनच्या बरोबरीने सारा दिवसच संगीताच्या सुत्रात बांधला गेलेला तो काळ होता भाटापारा झुमरीतलैया ही गावं अख्ख्या जगाला याच रेडिओमुळे कळाली.

            रेडिओ ऐकणं हा आयुष्याचा अविभाज्य घटक बनलेल्या काळातच टिव्हीनं प्रवेश केला आणि हा इडियट बॉक्स घराघरात शिरायला लागला त्यावेळी रेडिओ अडगळीत पोहचला. आधी कृष्णधवल व नंतर रंगीत झालेल्या या टिव्हीची मोहिनी इतकी होती की अगदी कृषीदर्शनही सारे बघत बसायचे... हा मुंग्या टू मुंग्या टिव्ही ऑन ठेवण्याचा सुरुवातीचा काळ, नंतर यानं तुमची आमची संध्याकाळ कायमची चोरुन घेतली.

            दूरदर्शनच्या मोनोपलीनंतर आकाश खुलं होताच चॅनलचा पूर आला यात आघाडी घेणाऱ्या झी वाहिनीला आता 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. या झी ने खूप मोठं नेटवर्कच उभारलय आता म्हणाल त्या विषयावर आपणाला चॅनल दिसतात फूड ते फॅशन, भक्ती ते संजीवन वृत्त ते मनोरंजन काय म्हणाल ते अगदी खेळाच्या वाहिन्यांमध्येही क्रिकेटला वाहिलेल्या वाहिन्यांचा काळ आला.

            या काळात रेडिओची काही काळ पिछेहाट झाली असली तरी एफ.एम. वाहिन्यांच्या रुपात रेडिओने जोरदार कमबॅक केलं आणि चालता-बोलता मनोरंजन अन माहिती देण्यातली आपली उपयुक्तता सिध्द केली. वर्ल्डस्पेस रेडिओ सारखी कंपनी प्रतिसादाअभावी दिवाळखोरीत गेली असली तरी एफ.एम.च्या क्रांतीने पुन्हा नव्या पिढीच्या कानांचा ताबा घेतलाय. हातात आवश्यक झालेल्या स्टाईल स्टेटमेन्ट असणाऱ्या मोबाईलमधला रेडिओ आणि त्यावर चालू काळातली चालू गाणी असा योग या रेडिओने साधला असल्याने रेडिओ पुन्हा एकदा लाईम लाईट मध्ये आलाय. चटर-पटर करीत निवेदन करणाऱ्या आर.जे.नी आकाशवाणीचे धीमे गतीके बुलटीन कधीच मागे टाकले. आता चटपट-झणझणीत पिढीचा हा काळ आहे. येत्या काळात समुदाय अर्थात कम्युनिटी रेडिओ वाढीस लागणार हे स्पष्टच दिसतय शासनही सकारात्मक पध्दतीने स्पेक्ट्रम शुल्क माफ करण्याच्या विचारात आहे असं झाल्यास महाविद्यालय स्तरावरली रेडिओ केंद्र उदयास येतील.. तो दिवस दूर नाही हे स्पटच दिसत

                      --                                                                  -प्रशांत दैठणकर-

Saturday 19 January 2013

औपचारिकतेकडून औपचारिकतेकडे

       झपाट्याने बदलत जाणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात काय  आणि कसं घडेल याचा अंदाज बांधणं कठीण झालं आहे. संवाद साधनांमधील मोठी क्रांती जग जवळ आलं हे सांगत आहे. प्रत्यक्षात मात्र आपण अधिक औपचारिकहोत आहोत आणि दुसऱ्या बाजूला खुलेपण स्वीकारत आपली स्वत:ची पर्सनल स्पेस घालवत आहोत असं फेसबुकवर बघताना जाणवतं.
            मुंबैकरांचं अधिक आयुष्य लोकलच्या प्रवासात जातं म्हणून त्या प्रवासात जिवाभावाचे मैत्र होणं त्यातून लोकलच्या उब्यात गणेशोत्सव साजरा करणं हे समजण्यासारखं आहे. पण आज फेसबुकवर जी पोस्ट दिसली ती निश्चितपणानं विचार करायला लावणारी होती.. लिहिलं होतं मैत्रिणींनो फेसबूकवर संक्रांत हळदीकुंकू कार्यक्रम ठेवला आहे...! छानच म्हणजे एकमेकांच्या घरी जाण्याचे निमित्त देखील नाकारणं असं याला म्हणावं का. नाण्याची दुसरी बाजू.. जगाच्या कानाकोपऱ्यातल्या सखींसोबत हळदीकुंकू करता येईल.
            या व्हर्च्युअल दुनियेत आपण किती गुंतायचं हा खरा सवाल आहे.. हे म्हणजे एक व्यसनच आहे. कालच गप्पांच्या ओघात सातत्याने फोनचा अडथळा आल्यावर माझे एक पत्रकार मित्र झटकन म्हणाले, साहेब या मोबाईल फोनलाही लोडशेडींग असायला पाहिजे.
            संवाद साधनं जीवनात उपयोगी आहेत हे खरं पण ही साधनं आपल्यातला औपचारिकपणा वाढविण्यासोबतच आपला प्रामाणिकपणाही संपवत आहेत... फोन वर पहिला प्रश्न असतो.. कुठे आहात..? फोन हे संपर्काचं साधन आहे ते पत्ता विचारण्याचं किंवा सांगण्याचं साधन नाही. आपणास नको त्या व्यक्तीचा फोन आल्यावर आपलं स्थान खूप दूर आहे, बाहेरगावी आहे असं खोटं सांगणं आताशा सर्वांना अंगवळणी पडलय.
            मोबाईलचा वापर प्रतिष्ठेचं लक्षण झालय मात्र पैसा नसल्यानं केवळ मिसड् कॉलवर भर देणारे अनेकजण इथं आहेत. तीच बाब फेसबूकची इथं खरा कोण हे ओळखणं खरच अवघड आहे. फेक प्रोफाईल असणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे आणि त्यातूनच सारे एकमेकांशी अंतर राखून असतात. सारे औपचारिक असतात.
            आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा नवा वैश्विक टप्पा म्हणून फेसबूककडे बघतो मात्र औषधाच्या परिणामांसोबतच दुष्परिणामांकडेही तितक्याच सजगपणे आपण बघायला हवं असं मला वाटतं.
 
                                                                                              -प्रशांत दैठणकर

Thursday 10 January 2013

चालायचं... चालत रहायचे...!


चालणं हा आपल्या आयुष्याचा भाग आहे. चालणं कसं आणि त्यातील लकबी याबाबत एक-दोन नव्हे तर अनेक म्हणी तसेच गाणी आपणास सापडतात अगदी चटकन आठवणारं गाणं म्हणजे.. हिची चाल तुरु तुरु किंवा तितकच लोकप्रिय राहिलेलं.. नको चालूस दुडक्या चाली.. जीव होतोय वरती खाली.. चालण्याचे संदर्भ आपल्या मनात अनेक असतील.
     आशाबाईंचं चांदण्यात फिरतांना.. धरलास हात म्हणणाऱ्या प्रेमिकेच ते, चांदण्यात चालणं श्रवणीय असं आहे. मूल चालताना पहिल्यांदा बघितलेला क्षण प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा क्षण असतो.. मूल रांगणं म्हणजेच त्याची पुढे जाण्याची धडपड आणि  चालण्याचा जोरदार प्रयत्न असतो आणि त्याचा पुढचा टप्पा पळण्याचा / धावण्याचा असतो.
     बापूंची दांडीगावार्यंतची यात्रा आणि त्यातून रुढ झालेला दांडीयात्रा हा शब्द मिठासाठीचा हा सत्याग्रह मराठीला नवा शब्द देणारा ठरला. बापू चालले आणि देश चालला आणि पुढे स्वातंत्र्य चालतच आलं असं म्हणावं लागेल.
     चालणारे आपण कसे जाणार असं विचारल्यावर 11 नंबरची गाडी असा शब्दप्रयोग गंमतीने करतात. लहानपणी आजी अंगणात चांदण्या मोजताना गोष्ट ऐकवायची त्यातला राजकुमार निबिड अरण्यातून राक्षसाच्या गुहेपर्यंत जायचा त्यावेळी त्याला असणारे दोन रस्ते एक छोटा पण संकटांनी भरलेला तर एक विना अडचणीचा आणि लांब रस्ता.. त्या अडचणीच्या रस्त्यावर चालत संकटाचा मुकाबला करीत आपणही डोळे मिटून जंगलात चालायचोच ना.
     वाहनं उपलब्ध नाहीत अशा काळात पायी चालण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यावेळी काशीचा प्रवास म्हणजे काशी यात्रा ही आयुष्यातील शेवटची यात्रा म्हणूनच सर्वजण घरातून निघायचे वाटेवरले वाटसरु, पथिक कधी कधी वाटमारीचे बळी ठरायचे त्यामुळे बेरड हा साऱ्यांच्या आठवणीचा एक भाग होवून गेला आहे.
     चलते चले.लहरोंके साथ ... आदमी मुसाफिर है चालमे झटका.. लगे पचासी झटके.. अनेक अनेक गाणी हिंदी चित्रपटात आहे. काही गाणी आपल्या मनात उभं राहणाऱ्या चित्रापेक्षा वेगळी असतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे रुक जा ओ जानेवाली रुक जा, मै तो राही तेरी मंजील का..या गण्यातला नायक चक्क हातातून घसरुन गेलेल्या दारुच्या बाटलीला उद्देशून हे गाणं म्हणतोय हे चित्रपट बघितल्यावरच कळतं.
     हे असं चालायचचं, चाल करुन जाणे... केवढा हा चालूपणा...! पायात-पायात चालू नको..., कसं चाललय आपलं..? चालूगिरी, चालूपणा, चवचालपणा अशा अनेक अर्थानं मराठीत यातून आलेल्या शब्दांना आपण चालवून घेतो.. कुठं कुठं तर पैसेही चालतात बघा. हे सारं चालू पुराण संपवताना एक संदेश आठवतो. तूम्ही आम्ही ठाकूर रविंद्रनाथांचा संदेश कायम स्मरणात ठेवून आयुष्याची वाट चाल करायची तो म्हणजे एकला चलो रे...!

                                                                                                            --प्रशांत दैठणकर--

Wednesday 9 January 2013

Digital Devide


जगातला हा डिजिटल दुभंग आज अँग्री यंग मॅनची आठवण करुन देणारा असाच आहे. या जगाच्या चव्हाट्यावर आपले गुण मांडण्यासोबत आपला आक्रोशही व्यक्त करण्याचा प्रयत्न नवी पिढी करते आहे आणि तोच फेसबुकच्या पानापानावर उमटलेला दिसतोय.
     ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली होती आता नव्या पिढीचे ज्ञानेश्वर वॉल चालवताना आपणास दिसतात. अमेरिकेत भिंतीवर रंगांची ग्राफिटी करणारी पिढी आहे त्याच पिढीला कॅनव्हास देण्याचे आणि अमर्याद कॅनव्हास देण्याचं काम फेसबूक सारखा मिडिया आणि विविध ब्लॉग्जनी केलेलं आहे.
     या माध्यमाची ताकद अमर्याद अशीच आहे. यात पालकांनी जागरुक रहायची गरज आहे. नागरिक म्हणून आपण स्वत: आपल्या सुरक्षेची काळजी घ्यायला हवी आणि पालक या नात्यानेही माध्यम सुरक्षा असणं ती जपणं याची खबरदारी आपण घेण्याची गरज मान्य केली पाहिजे.
     सोशल मिडियाची आपल्या पुढच्या पिढीला आवश्यकता आहे. जसा भेद मोठ्या शहरातील मुले आणि ग्रामीण मुले यांच्यात आहे तसा आणखी एक भेद आता जन्माला येत आहे. केवळ इंग्रजी बोलता येत नाही म्हणून ग्रामीण भागातील मुलामुलींना कमीपणा वाटतो. मुलांना हा मिडिया उपलब्ध करुन देणं गरजेच त्यासाठीच आहे. काय साधं फेसबूक अकाऊन्ट नाही तुझं किंवा तुझं मेल अकाऊन्ट नाही किंवा स्मार्टफोन नाही असं आताच मुलं बोलताना दिसतात. आपण मुलांना इंटरनेट वापरु न दिल्यास त्यांच्यातही ही कमीपणाची भावना लवकरच निर्माण होणार आहे हे लक्षात ठेवा.
     प्रत्येक घरात टिव्ही सोबत आता कॉम्प्युटरही आवश्यक झालाय. आपल्या मुलांना आत्मविश्वास देण्यासाठी आधीच्या पिढीने काळाची पावलं ओळखून मुलांसाठी ही साधनं द्यायला हवी अन्यथा ही मुलं वैफल्यग्रस्तही होण्याचा धोका आहे. तेव्हा हा डिजिटल डिव्हाईड स्वीकारा आणि ही दरी कमी करण्याचा प्रयत्न करा इतकच सांगण.

-       प्रशांत दैठणकर