Tuesday 26 March 2013

रंगांचा हा उत्सव


आठवते ती प्रत्येक होळी त्या वयातली ज्या वयात रंगात रंगण्याचं वेड होतं मनात. ते रंग उडवण्याचे आणि रंग उधळत त्या रंगात रंगण्याचे दिवसही अगदीच ताजे आहेत मनात. ते रंग अंगावरून उतरले असले तरी मनातून कधीच उतरणार नाहीत हे देखील तितकंच खरं हे सांगावच लागेल. बेंबीच्या देठापासून बोंबाबोंब करताना आनंद वाटायचा. दुस-या वर्गात असताना धुळवडीला मोठ्यांच्या होळीत नाचून घरी परतल्यावर काय बे असं अनाहुतपणे तोंडातून बाहेर पडल्यावर बापाने रागात पाठीवर बे एके बे .. बे दाही वीसपर्यंत रंगवलेला पाढा अनेक दिवस मिरवला.. त्याच दिवशी शिवी नावाच्या शब्दाशी आयुष्यभरासाठी काडीमोडही झाला..
      शिमगा संपला तरी रंगांचं नातं मात्र आजही कायम आहे.. अगदीच रंगिला नसलो तरी हळव्या मनाने आयुष्याचे नाना रंग आजवर बघितले आणि ते जपले.. आजवर धुळव़डीला धुंद होवून रंगात रंगणं कायमच आहे.
गोरे रंग पे ना इतना गुमान कर.. असं म्हणत आपल्या प्रितीला चिडवण्यातली मजा काही औरच आहे इतकं रंगीत मन आजही आहे. सकाळ संध्याकाळ निसर्ग खेळत असलेल्या रंगाचा खेळ असो वा दारात रोज रंगणारी रंगावली.. रंगांची साथ कायमच आहे त्याही पेक्षा रंग आपला पाठलाग करतात असं म्हणावं लागेल असं हे आयुष्य.... प्रेमात पडल्यावर हे रंगीत आयुष्य सप्तरंगी झालं आणि मनही त्या रंगांनी वेडावलं.. ते आजही कायम आहे.. तरीही इतर रंगांचं प्रेम आहे हे का याला काही उत्तर नाही. काही प्रसंग कधी कधी रंगाचा बेरंग करीत असले तरी ते मुळचे रंग पुन्हा मनाला उभारी देत असतात. आधार देत राहतात.. स्वप्नांनाही रंगीत करीत असतात.
एरव्ही नाना रंगाचा अंहंकार मिरवणारे चेहरे याच एका दिवशी समान दिसायला लागतात. आपण सर्व एकच आहोत याची जाणीव करून देणारा रंगांचा हा उत्सव.. मनाला रंगवून आत्मभान आणि आत्मपरिक्षण करायला लावणारा हा  रंगोत्सव...
रंगा या जगाच्या रंगात रंगा...
प्रशांत दैठणकर 26 मार्च 2013

Tuesday 19 March 2013

फसवं बूक !


संपर्काचं नवं लोकप्रिय साधन बनलेल्या फेसबूकच्या माध्यमातून जसे जिवाभावाचे मित्र सापडतात तसेच हे मायेचं महाजाल अनेक तरुणींसाठी सापळा देखील ठरत असल्याने या विषयाकडे गांभिर्याने बघण्याची गरज आज निर्माण झाली आहे.
     सायबर गुन्हेगारी हा पोलिसांकरिताही नवा प्रकार आहे. साधारणपणे एखादा चोरीसारखा गुन्हा घडतो. त्यावेळी गुन्हेगार त्याच परिसरात सापडू शकतो त्वरीत हालचाली झाल्यास त्याला लगेच जेरबंद करणे शक्य आहे. मात्र इंटरनेटचं हे महाजाल वैश्विक स्वरुपाचं आहे. समोरुन आपणाशी गप्पा मारणारी व्यक्ती जगाच्या कोणत्या कोपऱ्यात आहे हे आपणास सांगणं शक्य नसतं.
     नेटवरुन संपर्क प्रस्थापित करुन मुलींना नको त्या ठिकाणी बोलावून प्रेमाच्या नाटकाआड त्यांच्यावर अत्याचार करण्याचे प्रकार आता घडत आहेत. त्यामुळे पालकांनी सजग होण्याची आज गरज निर्माण झाली आहे.
     काही वर्षांपूर्वी भाकित होतं की यापुढील काळात वाद आणि भांडणं प्रसंगी युध्द झाले तर ते पाण्यासाठी होईल. हे भाकित आता खरं होताना जाणवतय 70 टक्के पृष्ठभागावर पाणी असणाऱ्या आपल्या या वसुंधरेवर आज अनेक भागात पाण्यावरुन भांडणे होत आहेत. देशांमधील याबाबतचे वाद युध्दही आमंत्रित करु शकतात अशा स्थितीत आहेत.
     सायबर क्राईम मध्ये गुन्हेगार जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असू शकतो हे लक्षात घेऊन यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील कायदा करण्यात आला आहे. हा कायदा पहिला असा कायदा आहे जो जम्मू आणि काश्मीरसाठीही लागू करण्यात आला आहे. याचा उद्देश या प्रकारचा गुन्हा कोठेही होईल हे गृहीत धरुन तपासाच्या मर्यादांचा विस्तार करणे असाच आहे.
     या गुन्हेगारीच्या सापळ्यात आपली मुलं सापडणार नाहीत याची काळजी आपल्यालाच घ्यायला लागेल यासाठी आपली मुलं संगणकावर काय बोलतात याची माहिती आपण ठेवणं अत्यंत आवश्यक झालय. मुलांचे फेसबूक सारख्या सोशल नेटवर्कींग ग्रुप मध्ये कोण दोस्त आहेत हे आपणास सहज कळू शकणे त्या मित्रांचे प्रोफाईल पाहून आपणास त्याबाबत ठरवता येईल.
     एकच सांगणं फेसबूक वापरा त्याचं फसवंबूक होवू नये याची काळजी घ्या.

                                           -प्रशांत दैठणकर-