Friday 11 December 2015

संघर्षयात्री

वक्तृत्व अणि संघटन यांच्या जोडीला मनमिळाऊपणा आणि रुबाबदार व्यक्तीमत्व असे सारे शब्द ही अल्पशी ओळख आहे एका संघर्षयात्रीची. संघर्ष आणि संघटनातून शालेय राजकारणापासून राज्याचे उपमुख्यमंत्रीपद आणि नंतर केंद्रीय मंत्रीपद असा आलेख असणारं मराठवाड्यातील व्यक्तीमत्व अर्थात दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे.

गोपीनाथराव आज हयात नाहीत हे मराठी माणसाचं दुर्दैव म्हणावं लागेल. काळाच्या ओघात हवी हवी वाटणारी माणसं नेमकी निघून जातात हा अनुभव त्यांच्या जाण्याने आला. राजकारणात असतांना पक्क्या मित्राला देखील कडवा विरोध करुनही मैत्री जपणारा हा खरा मैत्र अशीही त्यांची ओळख.

बुलंद मुलख मैदानी तोफ असं हे नेतृत्व सर्वमान्य असं नेतृत्व होतं. महत्वाकांक्षा सारेच बाळगतात मात्र ती पूर्ण करण्यासाठी ज्या अग्नीपथावरुन चालावं लागतं आणि जो संघर्ष करावा लागतो त्यासाठी कुणाचीच तयारी नसते. मात्र या नेत्याचा आयुष्याचा प्रवास वेगळा आणि सर्वांनी आदर्श घ्यावा असाच राहिलेला आहे.

मराठवाडा ही संतांची भूमी म्हणून ओळखला जातो. दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख म्हणायचे मराठवाडा ही संथांची भूमी आहे. त्या संथ झालेल्या समाजप्रवाहाला जागृत करुन प्रगतीच्या दिशेला नेण्याचं काम गोपीनाथरावांनी केलं. आपल्या उपमुख्यमंत्रीपदाच्या काळात धाडसी निर्णय काय असतात ते कसे घ्यावे हे दाखवून दिलं. विलासराव आणि गोपीनाथराव राजकीय पटलावर दोन वेगवेगळ्या पक्षाचे नेते होते. मात्र त्यांच्या मैत्रीमध्ये हे राजकारण कधीच आलेले आपणास दिसणार नाही. दिवंगत केद्रीय मंत्री प्रमोद महाजन हे नात्यातीलच झाले मात्र त्याआधी त्यांची असणारी मैत्री अखेरच्या क्षणापर्यंत जपण्याचं काम गोपीनाथरावांनी केलं. या तीन राजकारणी व्यक्तीमत्वांनी मराठवाड्याला मराठवाडा ही नेत्यांची भूमी आहे असं सिध्द करण्याचं काम केलं.
वक्तृत्व हा गोपीनांथरावांचा खास गुण होता. नेते अनेक होतात अनेकांनी अनेक पध्दतीने राजकारणात यश प्राप्त केलं पण त्यातील सारेच जण वक्ते नव्हते. सभेला गर्दी होणं ही खरी लोकनेत्याची ओळख होती. या बाबतीत कुणाचंच दुमत असणार नाही की गोपीनाथराव खरे लोकनेते होते.

सत्तेत असताना त्यांना जितका आदर मिळाला तितकाच आदर विरोधी पक्षात बसतांनाही सर्वांनी दिला. अभ्यासपूर्ण भाषनांनी विधासभेत आवाज बुलंद करतांना देखील अधून-मधून मार्मीक भाषा वापरण्याची त्याची शैली सगळयांनाच भावणारी होती.

सत्तेचा सोपान चढल्यानंतरही जमिनीवरच पाय ठेवणे आणि माणुसकी जपणे ही गोपीनाथरावांची खास ओळख. राजकारणी व्यक्तीमत्वामागे एक हळवं मन जपलेला असा हा आगळा संघर्षयात्री ... अशा या लोकनेत्याला विनम्र अभिवादन.

प्रशांत अनंतराव दैठणकर
9823199466

साहेब ... !

काही व्यक्तीमत्वे आयुष्याहून अधिक उंच होत असतात आणि अशी उंची गाठणारी माणसं असणारा प्रांत म्हणून आपल्या महाराष्ट्राचे नाव घेता येईल. एक कुशल राजकारणी संवेदना असणारा नेता, उत्तम प्रशासक, उत्कृष्ट वक्ता आणि संघटक .. शब्द कमी पडतील इतक्या गुणांसह वाढणारं हे व्यक्तीमत्व राजकारणासोबत कला, क्रीडा आणि संस्कृती यातही आपली छाप टाकतं असं एक आणि एकमेवाव्दितीय व्यक्तीमत्व अर्थात साहेब..!

पश्चिम महाराष्ट्रात साहेब म्हटलं की बाकी काही ओळख देण्याची गरज नसते ती ओळख हळूहळू संपूर्ण राज्याने आणि आता देशानेच नव्हे तर जगाने मान्य केलीय. होय साहेब 75 वर्षाचे होत आहेत. आरंभी अमृतमहोत्सवाच्या शुभेच्छा द्यायलाच पाहिजे. "शरदचंद्र पवार" हे त्या उत्तुंग अशा व्यक्तीमत्वाच नाव.

शरद पवार यांच्या व्यक्तीमत्वाला अष्टपैलू नाहीतर सहस्त्रपैलू आहेत असं म्हणावं लागेल. राजकारण सारेच करतात परंतु राजकारणातील गट-तट बाजुला ठेऊन या नेत्याच्या अमृतमहोत्सवाला राष्ट्राच्या प्रथम नागरिकापासून साऱ्या पक्षांचे सारे बडे दिग्गज उपस्थित राहतात. हा आदर उगाच प्राप्त होत नाही त्यामुळे साहेब म्हणतांना आनंद वाटतो आणि मराठी मातीतला माणूस हिमालयाची उंची गाठतो. या अभिमानाने प्रत्येक मराठी माणसाची छाती रुंदावते.

मराठी माणसाने या आधीही खूप उंची गाठली त्यात शरद पवारांच स्थान माझ्या मते खूप वेगळं आहे. ते वेगळेपण आपण जाणूनच घेतल पाहिजे. काँग्रेसची सत्तासुत्रे हायकमांड चालवते हे काही नवं नाही. ज्या काळात अर्जूनसिंग आणि इतर नेत्यांच्या रांगेत राज्याचा क्रमांक खूप खाली यायचा आणि नवं नेतृत्व मान्य करणाऱ्या काँग्रेसने सोनिया गांधींना नेता म्हणून स्वीकारलं त्यावेळी त्या रांगेत न उभ राहता स्वतंत्र पक्षाची निर्मिती करुन या नेतृत्वाच्या बरोबरीने बसण्याची ताकत कमावली. इतकंच नव्हे तर नंतरच्या काळात सत्ता चालवतांना त्या नेतृत्वापेक्षा मोठं होवून आपण राजाकारणातील "चाणक्य" आहेत हे साहेबांनी दाखवून दिलं.

अठरा पगड जाती, धर्म, प्रांत, भाषा आणि तितकेच राजकीय पक्ष अशा स्थितीत बहुपक्षीय सरकार चालविण्यासाठी सर्वमान्य नेतृत्व लागतं अशी मोट बांधण्याची ताकद गेल्या काळात दोनच महाराष्ट्रीयन माणसांकडे आहे हे देशानं बघितलं. यात भाजपासाठी चाणक्य असणारे दिवंगत प्रमोद महाजन आणि दुसरे अर्थातच शरद पवार.

सर्वात कमी वयात मुख्यमंत्रीपद प्राप्त करतांना देखील काँग्रेसच्या विरोधात जावून स्वत: पक्ष बांधण्याची आणि तो यशस्वी करण्याची किमया करणारा किमयागार ही साहेबांची ओळख.

1993 च्या लातूर भूकंपात तातडीने धावणारा त्यांच्यातील माणूस अतिशय जवळून बघितला. संवेदनशिलता हे खरं यशाचं गमक हे त्याच क्षणी जाणवलं. अजातशत्रू अशा साहेबांनी ज्या क्षेत्रात पाऊल टाकलं त्याचं सोनं केलं अगदी क्रिकेटचं देखील. आयुष्यात याच अजातशत्रुपणामुळे त्यांना कधी पराभवाचं तोंड पहावं लागलं नाही. बीसीसीआय च्या अध्यक्ष पदापासुन आयसीसी च्या अध्यक्षपदापर्यंत पोहोचतांना त्यांनी बीसीसीआय ला जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट नियामक मंडळ बनवून दाखवलं.

सत्तेत असतांना देशाच कृषीमंत्री पद आणि नसतांनाही आपत्ती व्यवस्थापन व देशाचं नेतृत्व साहेबांनी केलं. इतकी उंची गाठल्यावरही दौऱ्यावर फिरतांना कार्यकर्त्यांस नावानिशी ओळखणारा आणि आत्मीयतेने संवाद साधणारा नेता साऱ्यांनाच भावतो हेच साहेबांच्या यशाचं गमक आहे. अशा या मोठया मनाच्या साहेबांना मनापासुन अमृत महोत्सवी सदिच्छा .. !
प्रशांत अनंतराव दैठणकर
9823199466

Monday 7 December 2015

कॉफी पेस्ट आणि फॉरवर्ड ....!

आपण आपल्याशी संवाद कधी केला अखेरचा? हा प्रश्न खुप महत्वाचा आहे. धावपळ आणि नाही त्या गोष्टी मागे पळणे आधीच सुरु आहे. अशा स्थितीत आज इन्टरनेटच्या जाळयात सारेच अडकले आहेत. आपलं स्वत:चं काय बघण्यापेक्षा संगणक आणि मोबाईलच्या त्या खिडकीतुन जगाच काय चाललय हे बघण्याची उत्सुकता अधिक आहे. काही जणांच आयुष्यच या जाळयात फसलेलं दिसतयं.

सकाळ व्हावी ती निसर्गाच्या साथीनं. पुर्वेला निसर्गाची ती रोजची रंगपंचमी बघत सूर्याच्या साक्षीनं. तो रोजच येतो पण त्याच्या येण्याच्या छटा रोज वेगळ्या असतात. तो पहाट वारा आणि त्याला साथ देणाऱ्या पक्षांचा किलबीलाट हे सारं काही भुरळ पाडणारं असच आहे. मात्र इथं पहाट होते ती गुड मॉर्निंग च्या संदेशाने अणि दिवसाचा शेवटही गुडनाईट स्वीट ड्रीम म्हणत. थकवा इतका येतो की हल्ली स्वप्न देखील पडत नाहीत.

आपण इतर प्राण्यांप्रमाणे असलो तरी काळाच्या प्रवाहात आपण आपल वेगळं स्थान निर्माण केलय. हे शक्य झालं ते आपल्या सामाजिक जाणीवा विकसित झाल्यामुळे. आता या जाणिवा आपण अधिक प्रमाणात दाखवतो. पण त्यात कोरडेपणा वाढला याला कारण अर्थातच आजकालचं हे सोशल नेटवर्कीगचं असणार फॅड होय.

आपण आपल्या जाणिवा आणि भावना व्यक्त कराव्यात यासाठी धडपड करीत असतो. सोशल नेटवर्कींग माध्यमांनी हीच बाब नेमकेपनान हेरली आणि त्यांनी अभिव्यक्तीसाठी नवं व्यासपीठ उपलब्ध करुण दिलं. आता आपण आपल्या सोईनुसार हा अर्थ सहज लावत असतो मात्र या नाण्याला व्यावसायिकरणानी दुसरी बाजू देखील आहे याचा आपल्या मनात विचार देखील येत नाही.


या व्यवसायिकरणाचा उलगडा 13 वर्षेपुर्वीच आपणास झाला शताब्दीचा महानायक अमिताभ बच्चन यांच्या "कौन बनेगा करोडपती" या रियलीटी शो मध्ये आपण एस एम एस केला की आपल्याला किमान लाख रुपये तरी मिळतील या अशेपायी कोटयवधी जणांनी एस एम एस केले. साधारण एसएमएस आणि हे एसएमएस यांच्या दरात तफावत होती. त्या एका कार्यक्रमात कोटयवधी रुपये कमावून केवळ दिवसाला एक लाखाच प्रसंगी तीन लाखाच बक्षिस दिलं गेलं हे या माध्यमानी लोकांच्या भावनांशी खेळून पैसे कमावणं होत.

रुपयाचं मुल्य घसरलय म्हणत काय होतय दहा रुपयात असं तुम्ही - आम्ही म्हणायचं आणि शक्कल लढवण्याची अक्कल असणाऱ्यांनी करोडपती व्हायचं असाच हा खेळ. यातूनच आता हातात आलेल्या स्मार्टफोननं क्रांती घडवली. भावना खरेपणानं किती जण व्यक्त करतात? यातील नव्वद टक्के हे "कॉपी पेस्ट आणि फॅारवर्ड" अशा गटातील आहे.हे फॉरवर्ड म्हणजे पुरोगामी नाहीत. त्यातूनच नाही नाही ते विषय चर्चेला येतात आणि मेसेजची राळ उठते. सलग दोन वर्षे तोटयांत राहणारी बीएसएनएल सारखी शासकीय कंपनी यामुळे यंदा चक्क नफ्यात आली आहे. जय हो नेटवर्कींग असच म्हणावं लागेल.

गेल्या काही दिवसात झालेले वाद बघतांना वाटतं की भारतात असणाऱ्या सर्व समस्या संपल्या सारं काही "ऑल इज वेल" आहे. म्हणून आपण समाजाच्या प्रश्नावर चर्चेची गुऱ्हाळं लावत आहोत. आजचा चर्चेचा विषय राष्ट्राचा विकास, संपन्नता आणि सधनता नसून आमीर खान ची बायको काय म्हणाली आणि इम्रान खानची बायको विमानाच्या कॉकपीटमध्ये कशी बसली असे आहे. राष्ट्रभक्तीवर मला आक्षेप नाही तो कुणालही असनार नाही. पण चेन्नईत भुतो न भविष्य ती राष्ट्रीय आपत्ती असता आपण आपला वेळ कुठे व कसा घालवतो यावर आहे.

सध्या चर्चेचा विषय अर्थातच असहिष्णूता आणि सहिष्णू भारत . नाक्यावर ठेला लाऊन फळ विकणारा संध्याकाळी घरात खायला मिळेल का या चिंतेत आहे. पाण्याअभावी महाराष्ट्रात अनेक भागात शेतकरी संकटात आहे. चेन्नई पुराने त्रस्त आहे. यात अडकलेल्या कुणालाही विचारा त्यांना या आपत्तीत सावरणं महत्वाच आहे. दिलेले पुरस्कार परत करणाऱ्यांनी सोशल नेटवर्कींगच्या माध्यमातुन चर्चा घडवून आणली ती नेमक्या कोणत्या हेतुने याचा आपण वेध घेतच नाही "फक्त कॉपी पेस्ट आणि फॉरवर्ड" चा उद्योग सुरु राहतो.

माहिती तंत्रज्ञानाच्या युगात‍ सैनिक कमी लढतील सारी युध्दे याच तंत्रज्ञानाने लढली जाणार आहेत याच भान आपल्याला आल पाहिजे. "पीके" वरुन गाणि डाऊनलोड करुन ऐकणाऱ्या आपल्या मुलांना त्या वेबसाईडवरचा धोका कधी समजाऊन सांगितला का, मुळात तो आम्हालाच माहित नाही. शत्रु राष्ट्रे आपणास गाफील करुन आपली महत्वाची माहिती नेत आहेत हे वास्तव आहे. याला कारण आम्हीच. आम्ही इतके बिझी आहोत कार चालवण्यात की आम्हाल थांबून पेट्रोल भरायलाही वेळ नाही.

कुठेतरी थांबून आपण यावर विचार केला पाहिजे आल भान जागवलं पाहिजे यासाठी हा लेखनप्रपंच

प्रशांत अनंतराव दैठणकर
9823199466





Saturday 7 November 2015

तमसो मा ज्योतिर्गमय

आज दिवाळी... दिवाळी म्हटलं की खूप काही ... मुळात आयुष्याचा उत्सव करणारे तुम्ही - आम्ही शेतीप्रधान संस्कृती जपणा-या  देशात शेती झाल्यानंतर चा काळ फुरसतीचा काळ म्हणून त्यात सण - उत्सवांची रचना सृजनात्मक कामांसाठी केली. उत्सवांची परंपरा जोपासतांना त्यातील सर्वात मोठा सण अर्थात उत्सवांचा उत्सव म्हणजे महाउत्सव  असणारा हा दिवाळीचा सण


दिवाळी प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात निरनिराळया अनुभव आणि अनुभूतीचा काळ पहाटवा-यात कुडकुडत अंधारात घरात आई अंगाला तेल लावून द्यायची मग त्या सुंगधी उटण्याचा दरवळ. त्या थंडीत अंगावर पडणारं ऊन-ऊन पाणी मग त्यामुळे अंगभर दाटणारी थंडी अशी दिवाळीची पहाट जागवली जायची .

दिवाळीचे फटाके आणि आपटबार हल्ली अधिक आवाज करायला लागले.... त्याकाळी केवळ साध्या आवाजी टिकल्यांचा निनाद असायचा काळाच्या ओघात त्या देखील टिकल्या नाहीत. आलेल्या पैशांच्या सधनतेतून त्याच्या जागी कानाच्या पाळयादेखील हादरवरणारे बॉम्ब आले आणि दिवाळीत सर्व ठिकाणी बॉम्बाबोंब सुरु झाली.

दिवाळी सण म्हणजे आठवणींची एक वाठवण आहे. स्वच्छ अंगण करुन टाकलेला सडा, दारासमोर रांगोळी काढणा-या सुवासिनींच्या रांगा .. कष्टानं कितीही थकल्या तरी त्या आपल्या पध्दतीनं " आली माझ्या घरी ही दिवाळी म्हणत आपली कला दाखवायच्या दिवाळी म्हटलं की दिवाळीच्या सुट्टया आणि मग बाजारातून बांबुच्या काडया आणायच्या रंगीत ताव आणि काडयांचा केलेला तो आकाश कंदील... होय आकाश कंदीलच दिवे म्हणजे चैन आणि चायनामेड दिव्यांचा माळा हल्ली आलेल्या. त्या अष्टकोनी आकाश कंदीलाची जुळवणी आणि मांडणी दिवाळी आधीचा मुख्य उद्योग होता.


दिवाळीत बागडणारं बालपण वेगळयाच धुंदीत असायचं माती कालवून तो गारा लिंपत चार पाच चिमुकल्यांची डोकी अंगणामध्ये किल्ला बनवण्यासाठी भिडायची. त्या चिमुकल्या हातांनी अल्पशा कल्पनाशक्तीवर बनवलेला तो किल्ला बघतांना सा-यांच्याच आनंदाला भरतं यायचं. दिवाळीच्या चार - पाच दिवसात तो किल्ला पणतीच्या उजेडात उजळून निघायचा आणि बिटींग द रिट्रीट करावं तसं दिवाळीला अलविदा करतांना मोठा फटाक्याचा बार करुन तो किल्ला उडवून देताना झालेला आनंद आयुष्यभराची आठवण असायचा.

काळाच्या ओघात आणि गतीत आम्ही शब्दाचे अर्थ बदलले सोबतच जगण्याचे संदर्भ देखील नकळत बदलत गेले. अठरा विश्वे दारिद्रय असं आपण म्हणतो मुळात ते अठरा -विसावे म्हणजे 18X20 अर्थात 360 दिवस या अर्थाने आहे. आणि मुळ वाक्प्रचार अठरा विसावे दारिद्रय अन् पाच दिसाची दिवाळी असा आहे. अर्थात कितीही गरिबी असली तरी ती व्यक्ती देखील पाच दिवसांची ही दिवाळी साजरी करतांना आपणास दिसतो.
शेतीप्रधान आणि खेडयात राहणारा देश स्वातंत्र्या नंतर झपाटयानं बदलला.. बापू म्हणत खेडयाकडे चला पण सगळे शहराकडे धावायला लागले. शहरात वाढलेल्या गर्दीमुळे मला सगळयांचीच धावाधाव सुरु झाली ही इतकी की आपण कशासाठी धावतोय हे कळत नाही अशा स्थितीपर्यंत सारे धावायला लागले... मी गाडी चालवण्यात इतका बीझी आहे की मला पेट्रोल भरायला थांबायची देखील फुरसत नाही. ...
असं वेडेपणानं धावणारेही यात आहेत. 
दिवाळी आपल्या जीवनशैलीचा भाग आहे. शेतात पिकलेलं धान्य आणि त्यातून आलेलं धन याचा आनंद साजरा करण्याचा हा काळ शेतकरी ज्याच्या आधाराने स्वत:चेच नव्हे तर इतरांचे उदरभरण करण्यासाठी मातीतून मोती पिकवतो त्या शेतक-यानं बघितलेल्या हिरव्या स्वप्नाच्या पूर्ततेचा हा क्षण.

वसु- बारस. दिवाळीची सुरुवात शेतीप्रधान संस्कृतीत गाय आणि तिचं वासरु यांच्या पूजनाने होणारी सुरुवात याचंच द्योतक आहे. प्रात:काळीच्या त्या गर्द तिमिरावर मात करण्या-या इवल्याशा पणतीच्या टिमटीमत्या ज्योतीची ताकद कळते आपल्यातील आळस झटकून चतुर्दशीला या क्षणाची सुरुवात करायची. दिवाळीची आमावस्या अर्थात लक्ष्मीचं पूजन. आयुष्यात आवश्यक असणा-या बाबींचं पूजन मग यामध्ये झाडूची देखील पूजा होते. स्वच्छता ही आपण आरंभापासून पूज्य मानली. आज दुर्दैव की धावताना आपण ते विसरतो आपल्या अंगणातला कचरा शेजारी टाकण्याची सवय लागली म्हणूनच आपणाला स्वच्छता अभियान राबवावे लागते. आयुष्याच्या अविभाज्य घटक म्हणून आपण याकडे बघायला
पाहिजे.
 अमावस्येनंतरचा दिवस म्हणजे नवर्षाचा अर्थात प्रतिपदेचा दिवस हा दिवस बलीप्रतिपदेचा दिवसआपण बळीराजाच्या नावे बलीप्रतिपदा म्हणून देखील साजरा करायचा. शेतक-याला आपण बळीराजा म्हणतो तेयासाठीच प्रत्येक खाणा-या तोंडाला अन्न देणारा हा अन्नदाता आज बदलेल्या निसर्गचक्राने हतबल होवून नैराश्याच्या मार्गावर आहे. यात नैराश्याच्या सिमेवरुन कडेलोट झालेले मृत्युला कवटाळताना दिसत आहेत. त्याची वेदना जाणून त्यांना साथ द्यायला पाहिजे धीर आणि मदतीला हात द्यायलाच हवा. तरच बलीप्रतीपदा आपण मनापासून साजरी करु शकतो.

जीवन -मृत्यू हे दोन बिंदू यातील प्रवास म्हणजे जीवन आहे. जन्माला आलेला प्रत्येक जीव मरणार आहे. चिरंजीव कुणीच नाही. ना कुणी अविनाशी आहे. काळाच्या या न्यायाची आठवण करुन देणारी यमव्दितीया अर्थात भाऊबीज. आपल्या भावाचं औक्षण करुन त्याच्या जगण्याचं दान मागणारी बहीण असं हे भावाबहिणीचं नातं जपणारी दिवाळी. शहरीकरणाच्या आघाताने विभक्त झालेली कुटुंब संस्कृती आज चौरस कुटुंब पधदतीत जगतेच अशा कुटुंबात प्रत्येक घरात भाऊ -बहिण नातं आहे अशी परिस्थिती नाही त्यामुळे औपचारिकतेमुळे संकुचित होणा-या स्वभावाप्रमाणे दिवाळीहा सणही अनेक कुटुंबसांठी संकुचित होताना दिसत आहे.

सा-यांची ही दिवाळी आठवणींना साद घालते.

दिवाळी म्हणजे ... अभ्यंगस्नान आणि उटण्याचा दरवळ

दिवाळी म्हणजे ... तो मोठा गोलाकार मोती साबण

दिवाळी म्हणजे... लाडू -चिवडा नी चकली, करज्यांचा फराळ

दिवाळी म्हणजे.... आकाश दिवा नी पणत्यांची आरास

दिवाळी म्हणजे.... नव नवीन कपडयांचा पेहराव

दिवाळी म्हणजे.... पंच पक्वान्नांची मेजवानी

दिवाळी म्हणजे .... साहित्य नी दिवाळी अंकांची पर्वणी

दिवाळी हा सण सा-यांचा आवडता सण या दिवाळीत सा-या जागवत जुन्याचं कौतूक करत नव्याचं स्वागत करुन दिवाळी साजरी करुया ......

सा-यांना दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा

प्रशांत अनंतराव दैठणकर

9823199466




Tuesday 13 October 2015

हुई और भी मुलायम...!

सहजपणे बोलतांना टपली मारावी त्या पध्दतीनं काल तिनं माझ्या कानावर फोनव्दारेच टपली मारली. संवाद प्रेमाचा चालू असताना हो ना ते प्रेम 20 व्या वर्षी कळत-नकळत होतं असं म्हणताना...उरलेलं 40 व्या वर्षी होतं आणि 80 व्या वर्षी बॅलन्स NIL होतो अशी पुस्ती जोडली. फोनवरलं संभाषण सरलं मात्र आता सुरुवात झाली ती आत्मसंवादाची.

महाविद्यालयातले ते दिवस...शाळेत असतांना कुतूहल असणारा तो विषय प्रत्यक्षात शाळेतून लाजत - बावरत किंचितसं घाबरतच ती महाविद्यालयाची पायरी गाठली त्या क्षणी जाणवलं की शाळेचे ते दिवस कसे चिमण्यांचा थवा उडून जावा आणि फांदी रिकामी व्हावी असे नजरेसमोर उडाले...झाड रिकामं आणि पारंब्या...त्या वडाला बांधलेला सुवासिनींचे धागे तितके उरावे अशी स्थिती.

त्या धाग्यांप्रमाणे स्मृतीचे धागे आणि त्यांचं रिंगण झाडाभोवती सातत्याने गहिरं होत होतं वर्षागणिक त्या भाविकतेने साता जन्माचा पती का मागतात याचं बालसुलभ कुतूहल संपून तारुण्यात पाऊल ठेवताना स्त्रियांचा तो ' सूता वरुन स्वर्गा ' चा मार्ग जरा खटकला पण जगरहाटी...चालायचं तसं...आणि आपल्यालाही थांबता येत नाही काळाची गती आपण पकडली नाही तरी लोककला लटकलेल्या गर्दीमध्ये आपसूक पुढे ढकलला जातो आणि फलाटावर उतरतो तसा काळ आपल्याला चालवत असतो.

चालत चालत इथवर आल्यावर मागे वळून बघतांना आपण स्वत:लाच धुंदीत जगताना बघायचं धुंदी असते वयाची एक प्रकारचा तो कैफ म्हणतात ना वय वेडं असतं...म्हणून काय इतका वेडेपणा करायचा असं टोकणारे होतंच ना पण त्यांचं ऐकायला वेळ आहे कुणाला...विषय नसताना रंगणाऱ्या त्या गप्पांच्या मैफली नेमक्या कसल्या होत्या आज कुणालाच सांगता येणार नाही...सारं कसं मंतरलेलं जग होतं.

ती पाहताच बाला...असा कलिजा खलास झालेल्या त्या खलाशांचे जहाज आज स्थिरावलेले दिसते कारण त्यावेळी असणारं Love at first Sight खरं असलं तरी तो पहाटवाऱ्यात प्राजक्त फुलांवर पडलेल्या दवबिंदूचा आनंद होता...झाडाच्या पानापानांवर पडणारी ती 'ओस की बुंदे ' कोवळया उन्हात विरुन जायची तशी स्वप्नं ही अनेकांना दवबिंदूच्या रुपातलं मृगजळ ठरली होती…… आसपास हिरवळ आणि सुगंधाचा दरवळ असताना काही वेडे पार या स्वप्नांच्या मृगजळामागे धावताना दिसले.

मुकद्दर का सिकंदर मधला तो सिकंदर मेमसाबच्या मागे अन मेमसाब वकिल बाबूच्या प्रेमात आणि प्रेमवेडया सिकंदरच्या प्रेमात हिरा चाटून (हे कसं काय बुवा आजवर कळलेलं नाही) जीव देणारी जोहराबाई आणि त्या जोहराच्या प्रेमाने वेडा झालेला दिलावर.... असं न पुरं होणारं वर्तूळ आणि त्याचं ते " धकाधकी " चं आयुष्य...बघता बघता त्या मेमसाब कुण्या वकिलबाबूचा हात धरुन पाखराप्रमाणं उडून गेल्या याची चिंता करणारे लढवय्ये सिकंदर मित्र आसपास वावरत होते...नुसतं गंमत म्हणून बघायचं दुसरं काय.

खरच वय वेडं असतं...त्या वयात प्रेमात पडलो आणि काय...पडतच गेलो. आज त्याबाबत टोचणी देण्याचा प्रयत्न करणारे कमी नाहीत शेवटी 'कुछ तो लोग कहेंगे...' म्हणत बेधूंदपणाने आपण आपलं चालत रहायचं इतकंच त्या वयात कळत होतं. सुखावलेले कमी आणि दुखावलेले प्रेमभंग झालेले जीव अधिक...तुला कसं Character नाही असं हिणवतात तेव्हा हसू येतं...चारित्र संपन्न व्यक्तीमत्वाचा धांडोळा घेतांना मग अधिकच हसू यायला लागतं...संपन्न असं चारित्र वगैरे सारं अंधश्रध्दा असतात…….. जगणाऱ्याला ते जाणवतं Character by Choice आणि Character by Force यात फरक असतो... " हमसे आया ना गया तुमसे बुलाया ना गया" असं म्हणत या सैन्याच्या अनेक फळया धारातिर्थी होवून अपरिहार्यपणे चारित्र्यसंपन्न झाल्या...... त्यांचाही सार्थ ( ? ) अभिमान वाटतो.
ती माझ्या राशीची नाही...अपने को नही पसंद,..... म्हणत तिची ओळख न होताच तिला बिनलग्नाचा घटस्फोट देणारे अनेक जण आता चारित्र्यसंपन्नतेची झुल पांघरलेले बघतो त्यावेळी अधिकच हसू येतं...त्यातही जहाल - मवाळ अशी गटवारी होती. जहाल गटवारीतील युवक छाती पुढे काढून ' वो मेरे दिलमे प्यार की तरह और मै उसके दिल मे नासूर की तरह रहूंगा' असं म्हणत शैार्यपूर्वक शहादत स्विकारुन शौर्यपदकाच्या सन्मानासह चारित्र्याच्या महामार्गावर मार्गस्थ झालेले बघितले त्या बिचाऱ्यांना आज बाजारात बायकोसोबत हातात पिशव्यांच्या ढाली घेऊन लढणाऱ्या ' भाजीप्रभू ' च्या रुपात लढताना बघून वाईट वाटतं...आधीच पावन झालेल्या या नश्वरांनी खिंड लढवायचा विचार करायच्या पूर्वीच स्वत:ला खिंडीत सापडलेलं बघून सभ्यपणाचं पांढर निशाण काढलेलं बघितलय...


खरच वय वेडं असतं... "नशीब प्रत्येकाचं असतं असं नाही आणि नशीब प्रत्येकावर रुसतं असही नाही " ...कोणाचं कसं हा ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग म्हणावा लागेल.

अर्धांगिनीला अर्धसत्य सांगा असं म्हणणाऱ्यांना माझं पूर्ण सत्य पटणार नाही...प्रेमात पडून आता वीस वर्षांच्या खंडानंतर अगदी खरोखर 'वीस साल बाद' सारं पूर्णसत्यात अर्धांगिनीला सांगितल्यामुळे काय काय घडू शकतं याची अनुभूती घेताना अचानक चाळीशीच्या उंबरठयावर ती दिसते...आणि हो दगडं कशी पाझरणार...वितळायलाही मेणासारखं मऊ असावं लागतं कदाचित खंबीर असणारं मन अधिक हळवं होतं की हळवेपणात कणखरपणा अधिक असतो ...पण पुन्हा प्रेमाचं विश्व तरुण मनातलं तारुण्य शरीरालाही तरुण ठेवतं असंच काहीसं...

धुंद वाऱ्याच्या लहरींसोबत अलवारपणे खांद्यावर दोलायमान खांद्यावर रुळणारे गेसू ... बाईकवर वय विसरुन एक्सलेटरचा कान पिळून वाऱ्याशी युध्द खेळणारं शरीर आणि त्यातलं मन आजही त्याच वयाचा 20 व्या वर्षात जगायला भाग पाडतं आणि वय वेडं असतं...आणि मावळतीला जाणाऱ्या सूर्यासोबतच्या प्रवासात ती हळूवार गाणं गुणगुणते कानावर शब्द तालासह नाचायला लागतात.

हुई और भी मुलायस मेरी शाम ढलते ढलते......

प्रशांत अनंतराव दैठणकर

9823199466

Friday 9 October 2015

प्रवास आपला टपालासोबतचा...!

नव्या पिढीला फारसा परिचित नसला तरी जाणत्या पिढीमधील तुमच्या-आमच्या पिढीत साऱ्यांनी खेळलेला खेळ म्हणजे मामाचं पत्र हरवलं आता त्या वयात निरागस असल्याने खेळताना कधी प्रश्न पडला नाही की मामाचंच पत्र का हरवायचं आणि ते नेमकेपणने मलाच का सापडायच ? यातला विनोदाचा भाग बाजूला ठेवला तर मामाचं पत्र म्हणजे आईच्या माहेरचा दुवा होता. त्यात माहेर म्हटलं की सगळ्याच स्त्रिया हळव्या होत असतात माहेरुन ख्याली खुशाली सांगणारं त्याकळचं ते 15 पैशांचं पोस्टकार्ड जगण्याचा घटक होता आणि तो पत्र आणणारा पोस्टमन आपल्या घराकडे कधी येतो याची सर्वांना वाट असायची.
स्वातंत्र्य प्राप्तीनंतर नागरिकरणाला वेग आला आणि गावातली तरुण पिढी शहराकडे वळली. ज्यांनी मातीशी नातं जपलं अशी मोठी पिढी गावातच राहिली. त्याकाळी टेलिफोन फक्त श्रीमंताघरची वस्तू होती म्हणून पत्रव्‍यवहार हा जगण्याचा घटक होता.
मुंबईत नोकरीसाठी कोकणातून आलेल्या चाकरमानी लोकांसाठी संदेशवहनाचा तो खात्रीलायक आणि स्वस्त मार्ग होता.
संदेशवहनाच्या पध्दती काळानुसार आणि तंत्रज्ञानानुसार बदलत गेल्या आता व्होडाफोनचा जमाना असला तरी पूर्वी घोडाफोनचा जमाना होता. घोड्यावरुन संदेशवाहक पाठवून राजे एकमेकांशी पत्रव्यवहार करीत तर प्रशिक्षित कबुतरांकडूनही संदेश पाठविले जात होते.
युरोप आणि अमेकरकेत टपाल व्यवस्था सुरु झाली. ब्रिटीश भारतात आले त्यावेळी त्यांनी हे साधन भारतात आणले टपालाची शिस्तबध्द वितरण व्यवस्था असणारी टपाल कार्यालये दिडशे वर्षांपूर्वी थाटायला लागली त्याकाळी तार अर्थात टेलिग्राफ ही गतीशील संदेशवहनाची यंत्रणा टपाल कार्यालयाचाच भाग होती.
अशाच 15 पैशांच्या पोस्टकार्डमुळे विलंबाने का होईना शुभवर्तमान, ख्याली खुशाली, लग्न जुळल्याच्या बातम्या कधी निधनाच्या बातम्या कळायच्या पत्र जमवून ठेवायला घराघरात तारकेट असत. याच टपाल विभागाच्या तिकिटांमुळे हजारो जणंनी तिकिट संग्रह गोळा केलेले दिसतात निरनिराळया देशांची टपालाची तिकिटे गोळा करणे हा एक चांगला छंद आहे.
पोस्टमनला बऱ्याच वेळा इतरांची पत्रे लिहून देणे तसेच आलेल्या पत्राचं वाचन करुन देणे करावे लागे. न शिकलेल्या पिढीला त्यामुळे पोस्टमन अर्थात डाकिया घरातलाच सदस्य मानत होते. त्याला दिवाळीला आवर्जून पोस्त दिली जायची.
काळ बदलला तसं संदेश वहनाचं स्वरुप बदललं मात्र आजही व्यापारी वर्ग आणि ग्रामीण भागात राहणाऱ्यांना पोस्टकार्ड जवळचं वाटतं. नव्या पिढीत आता मोबाईलवर मेसेज पाठविणं, चॅटींग करणं, फेसबुक वर केलेलं स्टेटस् अपडेट आणि व्टिटरवर केलेलं व्टिट आदी मार्ग उपलब्ध आहेत त्यातच ही मंडळी रमते. पत्र लिहिणे आता भाषा विषयात काही मार्कांपूरतं उरलं आहे.
पत्र लिहिताना मोठ्यांना केलेला नमस्कार मग पत्राचा मायना. पत्र पूर्ण झल्यावर लिहायचं राहून गेलं म्हणून लिहिलेलं ता.क. अर्थात ताजा कलम. निधनाची वार्ता कळवणं आलं की त्यात टाकलेली टीप हे पत्र वाचताच फाडून टाकणे आणि आपणही ते फाडायचं ही पध्दत या पत्रालाच तार समजून लवकर निघावे या आशयाची खास टिप आदी अनेक बाबी टपाल आणि पोस्टकार्डशी जुळलेला आहे.
याच टपाल खात्यमुळे आवर्ती ठेव अर्थात आर.डी. रिकरिंग डिपॉझिट च्या रुपाने अनेकांना व्यवसायची संधी लाभली आजही टपाल खात्याशी ही माणसं निगडीत आहेत. भविष्य निर्वाहासाठी पीपीपी. अर्थात टपाल भविष्य निर्वाह निधीच्या रुपाने अनेकांनी सुरक्षित गुंतवणुकीसाठी टपाल खात्यावर विश्वास टाकला.
9 ऑक्टोंबर हा या टपाल खात्याची आठवण देणारा टपाल दिन. आज तंत्र बदलल्यावर टपाल विभागाने  ई-ट्रान्सफर आणि ई-मनी ऑर्डर सुरु केली पण शहरात व वसतीगृहात राहून हॉस्टेल लाईफ ज्यांनी जगलय यंना या मनी ऑर्डर म्हणजे लाईफ लाईन असायची. या मनी ऑर्डरच्या भरवशावर होणरी उधारी आणि पार्ट्या यांचं सान त्यांच्या आयुष्यात एखाद्या आठवणीच्या कुपीसारखं आहे.
लष्करी सेवेत असणाऱ्यांना सिमेवरुन घरी पैसे पाठवणं आणि आपली खुशाली कळवणं या साठी टपालाचाच आधार आहे. संदेसे आते है हमे तडपाते हे हे बॉर्डर चित्रपटातलं गाणं याचा भावनेला व्यक्त करणारं आहे.नाम चित्रपटात पंकज उधासने गायलेल व त्याच्यावरच चित्रित झालेल चिठ्ठी आई है या गाण्यावर हॉस्टेल मधले मित्र रडताना मी बघितले आहेत. डाकिया डाक लाया हे काका अर्थात सूपरस्टार राजेश खन्नावर चित्रित झालेलं गाणं असो की स्मिती पाटीलचं हमने सनम को खत लिया ही गाणी डाकिया, डाकबाबू अर्थात पोस्टमन आणि टपालाचं महत्व अधोरेखीत करतात.
आजही टपाल खातं महत्वाची कामगिरी बजावत आहे. अंगडिया सेवा आल्यवर खाजगी सेवेचा दर्जा पाहून अनेक जण कुरिअरकडे वळले असले तरी महत्वाचे दस्तऐवज पाठविण्यासाठी आजही टपाल खात्याची स्पीडपोस्टसेवा पसंद केली जाते. 
टपाल खात्यात असणारा आरएमस अर्थात रेल मेल सर्व्हीस आजही गतीमान प्रवास तुमच्या-आमच्या आयुष्यात अगदी महत्वाचा आहे. घरोघरी जाऊन टपाल वाटप करणारा पोस्टमन आणि त्याच्याशी निगडीत यंत्रणेला टपालदिनी सलाम आणि चौकातल्या लाल रंगाच्या टपाल पेटीलाही सलाम.


                             -प्रशांत अनंत दैठणकर- 

Thursday 8 October 2015

सिनेसृष्टीचा हा मिडास राजा



त्याची आणि माझी ओळख अर्थातच मला कळायला लागलं त्या वेळेपासूनची वयानं बापापेक्षाही मोठा असणारा तो आजही मला तो म्हणावा इतका जवळचा आहे याला कारण त्याच्यातलं आणि माझ्यातलं नातं. हे नातं माझंच नाही तर या भारतवर्षात अनेक पिढयांनी ते जगलय आणि अनुभवलं आहे. तो शतकाचा महानायक. आपल्याला जगायला निरनिराळया पध्दतीनं प्रेरणा देणारा...नाही म्हणायला महत्व कमी असणाऱ्या जगातला तो अनेक पिढयांचं विचार विश्व कधी व्यापून बसला तेच कळलं नाही तो म्हणजे अमिताभ हरिवंशराय श्रीवास्तव उर्फ अमिताभ बच्चन.

'हम जहां खडे होते है वहीं से लाईन शुरु होती है' अशा करारी बाण्याची सवय त्याच्याच व्यक्तिमत्वाने लावली. रुपेरी पडद्याचं ते विश्व जगणारे अनेकजण आहेत पण त्याची तोड नाही आणि तुलना देखील नाही. कालातील व्यक्तीमत्वांपैकी एक व्यक्तीमत्व अमिताभचं. 11 ऑक्टोंबर 2015 ला वयाची 73 वर्षे पूर्ण करणाऱ्या या महानायकाला आणि त्याच्या प्रवासाला बघताना जाणवतं की त्याचा प्रवास तसा साधारण अशा चित्रपट आणि कथानकातून सुरु झाला असला तरी त्याचं स्वत:चं व्यक्तीमत्व त्या भूमिकांना मोठं करणारं होतं. त्याच्या असण्यानं अनेक भूमिका अजरामर झाल्या. त्याला विशिष्ट पठडीत बांधायचा प्रयत्न झाला मात्र त्याची उंची त्याहीपेक्षा अधिक निघाली. काही प्रतिमा अशा असतात ज्या चिरतरुण असतात त्यापैकी एक प्रतिमा अमिताभची आहे. राखी सारखी अभिनेत्री त्याची नायिका म्हणून आली आणि त्यानंतरच्या काळात त्याचं नायकपण बदललं नाही परंतु राखीला त्याच्या आईच्या भूमिकेपर्यंत वृध्दत्व आलं...यासाठीच त्याला चिरतरुण म्हणायचं.

त्यानं चित्रपटात स्ट्रगल केला तो साऱ्यांनाच करावा लागला आणि आजही अनेकजण करीत आहेत मात्र त्याची तुलना करणं अशक्य आहे इतकी मोठी झेप त्याने घेतली.

आजच्या पिढीला अमिताभचं ते वलय आणि त्याच्यातल्या त्या 'ॲग्री यंग मॅन ची क्रेझ' फक्त पुस्तकात आणि लेखांमध्ये वाचायला मिळेल प्रत्यक्षात तो काळ ज्यांनी बघितला त्यांनाच त्याची अनुभूती आली.

सलिम खान आणि जावेद अख्तर या जोडीने अर्थात सलिम-जावेद यांनी हा अँग्री यंग मॅन घडवला असला तरी त्याचं सातत्यपूर्ण नायक रहाणं 'Entertainment' च्या माध्यमातून जारी राखलं ते कादरखान या लेखक अभिनेत्याने अमिताभला स्वत:च्या व्यक्तीमत्वाला अधिक खुलवण्याचं काम शब्दांनी केलं. नुसते शब्द असून चालत नाहीत तर त्या शब्दांना व्यक्त करण्याचं म्हणजे शब्दफेकीचं कौशल्य असावं लागतं ते अमिताभमध्ये ठासून भरलेलं आहे.

बोलतांना शब्द जितके महत्वाचे त्यापेक्षा त्या शब्दांच्या उच्चारात असणारं योग्य अंतर (पॉझ) अधिक परिणाम साधत असतं ते अमिताभने दाखवून दिलं त्यामुळे त्याच्या समकालीन नायकांमध्ये त्याला आपलं स्वत:चं वेगळं स्थान निर्माण करता आलं.

प्रत्येक व्यक्ती स्वत:वर प्रेम करते आणि आपलं व्यक्तिमत्व श्रेष्ठ असं मानते अशा या जगात प्रत्येकाच्या मनातल्या 'मी' ला साद घालून आपली प्रतिमा त्याच्या मनात बसवण्यात अमिताभ यशस्वी ठरला.

सर्व दृष्टीने श्रेष्ठ असं अमिताभला म्हणता येणार नाही. नृत्य हा त्याचा 'विक पॉईंन्ट' त्यात तो कच्चा लिंबू मात्र आवाज हा त्याचा सर्वात स्ट्राँग पॉईन्ट म्हणून त्यानं स्वत:च्या मर्यादा ओळखून वाटचाल आजवर केली.

कथानक लिहून त्यात अभिनेते घ्यायच. गाणं लिहून त्याला संगीत द्यायचं हे सारे प्रघात अमिताभने आपल्या करकिर्दीत कालबाहय केले. लेखक लिहितांना अमिताभ नायक आहे याची जाणीव ठेवून कथानक लिहायचे, गाणीदेखील त्याच्यासाठी लिहिली जात होती. नृत्यामध्ये ता कमजोर आहे हे जाणून त्याच्यासाठी नृत्यदिग्दर्शक त्याच स्वरुपाची रचना करायचे नायक म्हणून वाटचाल करताना वेगवेगळे टप्पे या महानायकाच्या प्रवासात आले त्यात सर्वात महत्वाचा टप्पा अभिनेत्री रेखा सोबत आला अमिताभच्या कर्तृत्वाला वलय होतंच पण त्याला स्वप्नवत यश मिळवून देणारा अभिनेता बनवण्याइतपत खुलवण्याचं काम रेखा गणेशनने केलं.


अमिताभने आपल्याच क्षेत्रातील दिग्गज अभिनेत्री जया भादुरी सोबत विवाह केला मात्र त्याची चर्चा अधिक झाली नाही. अधिक चर्चा अमिताभ रेखा यांचीच झाली. अमिताभने अभिनेत्री रेखापेक्षा अणिक चित्रपट जयाप्रदाच्या सोबत केले असले तरी आजही चर्चा अमिताभ आणि रेखाचीच होते.

अमिताभ म्हटल्यावर त्याचे संवाद आठवतात आणि त्याची गाणी आठवतात अमिताभ्‍ म्हणजे जय-विरु ची जोडी आठवते. त्याचा प्रत्येक चित्रपट आगळा ठरलेला आहे. शोले असो कि दिवार त्याला सलिम जावेदची संवाद साथ होती मात्र नंतरच्या काळात व ही जोडी नसली तरी केवळ स्वत:च्या बळावर अमिताभने चित्रपट हिट केलेले दिसतात.

मनमोहन देसाई, आणि प्रकाश मेहरा यांचा तो फेवरेटच राहिला. त्याच्या चित्रपटात सर्वोत्तम बघायला आणि ऐकायला मिळायचं 'ओ साथी रे' ची धून देणारे. कल्याणजी-आनंदजी यांचा उल्लेख केल्याशिवाय हा प्रवास अपुरा ठरेल नंतरच्या काळात बप्पी लाहिरी व आदेश श्रीवास्तवपर्यंतचा संगीतप्रवास झाला असला तरी कल्याणजी-आनंदजीच्या म्युझीकला चॅलेंजच नाही. याच काळात या संगीतकार जोडीने असंच अवीट संगीत फिरोजखानच्या ही चित्रपटांना दिलं हे इथं आवर्जून सांगावं लागेल.

मिडास राजाच्या कथेप्रमाणे सिनेसृष्टीचा हा मिडास राजा, ज्याला स्पर्श करेल त्याचं सोनं करीत गेला मात्र त्यालाही अडचणींचा सामना करावाच लागला गांधी घराण्याशी असलेले घरोटयाचे संबंध आणि राजीव गांधींशी असणारी मैत्री यातून त्याने राजकारणात येण्याचा प्रयत्न केला आणि रसिकांनी त्याला अव्हरेलं त्यावेळी त्याचा उतरणीचा काळ सुरु झाला नंतरच्या काळात 250 रुपयांत अभिनेता होणारी अमिताभ बच्चन कार्पोरेशन लिमिटेड अर्थात एबीसीएल चा घाट देखील त्याला धक्का देणाराच होता.

संपला-संपला अशी चर्चा असताना या महानायकाने नवी इनिंग सुरु केली ती आजवर दिमाखात सुरु आहे. छोटा पडदा अर्थात टिव्ही या छोटया पडद्यावर पदार्पण करणाऱ्या शाहरुख खानने रुपेरी पडद्यावर आल्यावर पुन्हा वळून छोटया पडद्याकडे पाहिले नव्हते अशा काळात अमिताभने 'कौन बनेगा करोडपती ' अर्थात केबीसीच्या माध्यमातून छोटया पडद्यावर पदार्पण केले आणि छोटा पडदा आपल्या अस्तित्वाने मोठा करुन दाखवला.

अमिताभ हे सिनेदृष्टीला मिळालेलं वरदान आहे कारण त्याने ज्या-ज्या क्षेत्रात यायचा निर्णय घेतल ते गाजवलं त्यात गायनाचाही समावेश आहे. आरंभीच्या काळात चित्रपटात गायकांनाच नायक म्हणून घेत मात्र नंतर पार्श्वगायन पध्दती सुरु झाली आणि नायकांना गायकाचा उसना आवाज मिळायला लागला. अमिताभने गाणं म्हणायला सुरुवात केली आणि इतिहास घडवला. ज्या आवाजाला ऑल इंन्डिया रेडिओने नाकारलं तो आवाज साऱ्यांचा आवडता आवाज बनला.

अमिताभला राजकीय अडथळयांमुळे वाटचाल करताना अडचण कायमच आली आहे. शतकाच्या या महानायकाला भारतरत्न मिळाल नसले तरी तो बऱ्या अर्थाने भारतरत्न आहे. सचिन तेंडूलकर च्या कर्तृत्वाला ज्याप्रमाणे तोड नाही त्याचप्रमाणे भारताचं नाव जगभरात नेण्यात अमिताभचा मोठा वाटा आहे.

अशा या महानायकाला त्याच्या नव्या वाटचालीकडे वाट बघतोय इतकच प्रत्येक चाहता म्हणेल.

प्रशांत अनंतराव दैठणकर

9823199466

Saturday 3 October 2015

"कट्टा"... आणखी काय हवं आयुष्यात ?

गावातला कारभार चालणारा गावचा "कट्टा" हा कधीकाळी लहानपणी बघितला होता. हाच कट्टा चित्रपटांमधून बघायला मिळतो. गावातल्या भल्या-बुऱ्यांची खबरबात, गावतल्यांचं दुखणी - खूपणी इथं चर्चिल्या जायची. या गप्पांचं, मजांचं रोजचं असणं गावाच्या कारभा-यांच्या दृष्टीकोणातून राजकारणाचा अड्डा होतं.

अशाच अड्डयांवर कधी-कधी केवळ कुटाळक्या होतांना दिसत मग त्याचा अर्थ आणि स्वरुप बदलायचं. चणे कितीही भिजवून खूप शिजवले तरी एखादा चणा निसर्गाचे नियम मानत नाही आणि तो दगडासारखा कडकच राहतो. चणे खातांना दातांनी मऊ-मुलायम रवंथ करणाऱ्याला अचानक असा चणा दाताखाली आदळून दणका देतो. या दणक्याने थेट डोक्यापर्यंत सणक भरते अशा दाण्याला कुच्चर असं म्हणायचे. गप्पांच्या कट्टयांवर असे समाजाचा परिणाम न होणारे काही महाभाग आणि त्यांचे त्याच पध्दतीने कुच्चर विचार या ओटयाला "कुच्चर ओटयात" बदलून टाकायचे असा एक भाग जालना शहरात आहे. पण त्याचं नावं याच रुढार्थाने पडल्याची साक्ष किंवा पुरावा नाही.

औरंगाबाद सारख्या शहरात शिक्षण घेतांना अधून-मधून ग्रामजीवनाचं दर्शन घडलं तरी ते जगायची संधी मिळाली नाही नंतर एसबी ला (माझं महाविद्यालय आणि त्याचा हाच खरा परिचय) सायन्सला ॲडमिशन घेतली आणि एक नवा कट्टा जीवनात आला. अजिंठा आणि वेरुळात कातळावर कोरुन शिल्प घडवावं तसं त्या काळातल्या प्रत्येकाच्या मनावर तो कट्टा कायमचा कोरला गेलाय. आज 25 वर्षे झाली कट्टा सुटला पण आठवणींमध्ये तो कट्टा रोज भरतो, मुलं-मुली जमतात आणि कट्टयावरल्या गप्पा आठवणींमध्ये रंगतात.

आज माझी मुलगी महाविद्यालयात शिकते परंतु इथला सारा रिवाज बदलता असल्याचं दिसतं महाविद्यालये आणि क्लासेसवाले यांच्या युतीतून शिक्षण क्षेत्रात गुणवत्तेची नाही तर फक्त गुणांची सत्ता रंगताना दिसते. मुलांना आवश्यक असल्याने महाविद्यालयात नाव नोंदवावं लागतं बाकी सारं क्लासेसमध्ये हे क्लासेस देखील आर्थिक कुवतीमुळे नवी वर्णव्यवस्था तयार करुन बसले आहेत. अमाप फी भरण्याची ताकद असेल तरच अमक्याची शिकवणी त्यामुळे आर्थिक स्तरावर आधारित मैत्रीचा अध्याय सुरु झाला आहे.

कोणाच्या घरची आर्थिक क्षमता काय याचं आम्हाला काही देणं-घेणं नसायचं असायची ती मैत्री, निखळ मैत्री, आणि एकमेकांच्या व्यक्तीमत्वाची अंतर्बाहय अशी ओळख तिथे कट्टयांवर पैसा हा विषय कधी आलाच नाही. चर्चा व्हायची ती कला-गुणांवर, अवगुणांवरही होत होती हे विशेष. यात एकमेकांची टर उडविणे हा जणू राष्ट्रीय कार्यक्रमच होता त्यावेळचा. ‘कट्टा बोले तो थट्टाʼ हे स्लोगन. याचं कुणाला वाईट वाटलं म्हणून मैत्रीत अंतर आलं असा प्रकार कधीच घडला नाही सगळं कसं निरागस, निर्व्याज आणि निरागस होतं.

त्या कट्टयावर आम्हाला बघून त्यावेळची तथाकथित गुणवंत मंडळी अभ्यास आम्ही बीझी असतांना तुम्हाला कसं बुवा इथं टुकारक्या करायला वेळ मिळतो असा कट्टा टाकून आमच्यात पसरलेला ‘टाईमपासʼ रोगाचा संसर्ग होवू नये याची काळजी घेत लांबूनच जाणं पसंद करीत असत. त्यांच्या दृष्टीने बिघडलेला ( तंत्र की मन:स्वास्थ ?) लोकांचं ठिकाण म्हणजे हा कट्टा होता.

काळाच्या ओघात जाणवतं की त्यांचं ते विचार करणं काय साध्य करुन गेलं ? ते आम्हाला बिघडलेले म्हणत असले तरी आनंद मिळवायला शिकवलं आणि ओळख देखील दिली. त्यांनी काय घडवलं असं म्हणून वाद करणं म्हणजे वेडेपणा असतो हे देखील त्याच कट्टयाने शिकवलं.

गाडी है, गलेलठ्ठ पगार, बँक-बॅलन्स, बिल्डींगे और कारोबर सबकुछ है मेरेपास...तुम्हारे पास क्या है या दिवारचा सीन आठवतो... माझ्या कट्टयावरचा प्रत्येक जण सांगेल हमारेपास शांती है, सुकून है...अजून काय पाहिजे असतं माणसाला ?

वयाची चाळीशी संपन्नता-समृध्दी आणते हे ठिक पण शुगर, बी. पी आणि दुखणी आणणार असतील तर अशा जगण्यापेक्षा आमचं कट्टयावरलं बिघडणं चांगलं होतं. पाण्याला पाणी, आणि मातीला माती मानून पाय जमिनीवर राहिले, निसर्गाचं प्रेम मिळालं आज खळखळून हसायची लाज वाटत नाही आणि ताण घालवण्यासाठी कपिल शर्माचा कॉमेडीचा शो बघण्याची वेळ आपल्यावर येत नाही. आणखी काय पाहिजे माणसाला आयुष्यात ?

बी. पी नही, शुगर नही, सुबह श्याम टेन्शन नाही या नसण्याचं कौतूक अधिक आहे असण्याच्या दु:खापेक्षा आयुष्याचं चित्र काढताना आहे त्यावर रेघोटया मारायच्या की मनाजोगतं चित्र रंगवता येईल इतका कॅनव्हासचा आकार वाढवत न्यायचा...चित्र कोणतं आणि किती चांगलं काढलं याचं समाधान महत्वाचं...वेळेत जमेल तसं पूर्ण करुन इथं मार्क मिळवायचेत कुणाला आयुष्याला हा विचार त्या कट्टयानं दिला आणखी काय पाहिजे माणसाला आयुष्यात ?

आजच्या पिढीकडे कट्टा नाही असं नाही. त्यांनी तो व्हॉटस्ॲप सारख्या नव्या तंत्राने बनवलाय परंतु तो शेवटी आभासीच आहे. तिथं फक्त फिल येतो अनुभव नाही. कट्टयांवरुन TTMM करुन घेतलेला
एक कटींग चहा आणि कांदयांच्या गरमागरम भज्यांसोबत पावसाळी वातावरणात रंगलेली पावसाळी कवितांची मैफल आजही अंगावर रोमांच उभा करते...आभासी जगातही TTMM आहेच ना...तू तूझ्या खोलीत मी माझ्या खोलीत तिथं पाठीवर धप्पा मारता येत नाही की खळखळून हसणं आणि इतरांना हसतांना बघणं जमत नाही...तिथं फक्त इमोजीचे गुद्दे आणि काविळी रंगाच्या त्या स्माईली त्यातून अनुभव सुध्दा आभासीच.

ऑनलाईन जमाना आणि सारं काही ऑनलाईन झाल्यावर तिथं पर्सनल टच राहत नाही...एखाद्याच्या मर्जीशिवाय त्याच्या पर्सनल स्पेसवर अतिक्रमण करुन आपण तिथं स्पेस बनवणं ही खरी मैत्री...आभासी जगात "स्पेस" च्या गप्पा ते देखील एकमेकांशी "स्पेस" सांभाळत...

पैशाने सारं काही मिळालं असतं तर इतरांना जगायला साधनच राहिलं नसतं. जेब खाली हूवा तो क्या दिल से तो अमीर है म्हणत समोरच्याला झटकून ‘चल हवा आने देʼआता सिनेमातच बघावं लागणार बहुतेक. कधी हवा असताना बहुतप्रसंगी जबरदस्तीने लादलेला सहवास सहन करणं म्हणजे मैत्री. नको असताना स्वीकारण्याचाही उत्सव व्हायला लागतो ते ठिकाण म्हणजे ‘कट्टाʼ असा कट्टा आयुष्याला लाभला आणखी काम हवं माणसाला आयुष्यात?

खूप कडक उन्हानं अंगाची काहिली होतेय आणि घामाच्या धारा वाहत आहे अशात वाऱ्याची येणारी एखादी झुळूक सुखावून जाते आणि यानंतर ‘अच्छे दिनʼ येणार हे आश्वासित करते तसा हा ‘कट्टाʼ मनात उलथापालथ झाल्यावर जरा कुठं एकाकी वाटायला लागल्यावर पुन्हा संजिवनी द्यायला येतो.

काळाच्या ओघात जुन्याचं नवं रुप दिसतं तसा हा कट्टा नव्या पिढीनं आभासी जगात जमवलेला आहे तसाच तो आमच्याही आयुष्यात येता झाला कधी काळी लाजरे-बुजरे असणारे मित्र मैत्रिणी...चेहरा नाहीच आठवत अशी फक्त नावाची ओळख असणारी व्यक्तीमत्वं आज प्रगल्भपणे आयुष्याच्या अनुभवानं संपन्न होवून भिडभाड न बाळगता खुलेपणानं पुन्हा आपली मतं मांडायला लागतात, मनातली गुपितं सांगायला लागतात आणि मनापासून प्रेमाची साक्ष देत मनापासून भांडायला लागतात.पुन्हा कट्टा ताजा होतो. ‘अनसिकेबल टायटॅनिकʼ शिप सारखं काळाच्या सागरात हरवलेलं फ्रेंडशिप पुन्हा पाण्यावर येतं. एक लंकेर छेडत मन गायला लागतं.

My heart will go on n on….!
 
Prashant anantrao daithankar
9823199466
let me know you reactions on my blog please.



Tuesday 15 September 2015

Candhy Crush ची क्रेझ..

एखाद्या बाबीची आवड असणे समजू शकतो मात्र ती आवड आपली मर्यादा ओलांडून इतर बाबींवर अतिक्रमण करते त्यावेळी ती चिंतेचा बाब बनत असते. याला वेड लागलं असं म्हणता येऊ शकेल.. त्याच्याही पलिकडे जाणारी अवस्था ही पिसं लागण्याची असते.. आपल्याकडे कुत्रा पिसाळला असं जे म्हणतात ते या ठिकाणी अपेक्षित नसलं तरी त्याच अर्थाने बोललं मात्र जातं.. इंग्रजीत याला योग्य प्रकारे सांगता येते.

The is a word crazy and such kind of behavior is nothing but the crazy one..

मी आपल्या याच क्रेझ बाबत आज बोलत आहे असं समजा. आता ही क्रेझ नेमकी कशाची.. हजारो जणांची डोकेदुखी असणारी ही क्रेझ आहे. Candy crush saga game ची. सोशल नेटवर्कींगचा वापर करणारे नेटकर या Candy crush saga game मुळे त्रस्त झालेले आहेत.

मराठीत काही म्हणी खुप चांगल्या आहेत.. भीक नको पण कुत्रा आवर... अशा आशयाची एक म्हण आहे तर दुसरी .. म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतोय.. एक ना अनेक.. वैताग आल्यावर अशाच म्हणींची आठवण फेसबूक वापरणा-यांना या Candy crush saga game मुळे आल्याशिवाय रहात नाही.

हे सारं आठवण्याचं कारण म्हणजे आजच या फेसबूकचा जनक असणा-या मार्क झुकरबर्गने केलेले ताजे स्टेटस् अपडेट होय. भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच अमेरिका दौ-यावर जात आहेत. या काळात ते या जगप्रसिद्ध अशा सोशल नेटवर्कचे मुख्यालय असणा-या फेसबूकच्या कार्यालयालाही भेट देणार आहेत. या पार्श्वभूमीवर नेमके कोणते विषय या दोघांमध्ये चर्चेला येणार याचं कुतूहल सा-या नेटकरांना आहे..


आपल्या फेसबूक फीडवर सातत्याने येणा-या Candy crush saga game च्या विनंत्याना सारेच भारतीय वैतागले आहेत हे नक्की आणि या प्रकारच्या विनंती पाठविणा-यांचा बंदोबस्त कसा करता येईल याची विचारणा मोदी यांनी झुकरबर्गना करावी असे संदेश आपल्याकडे येत आहेत असे आज स्वतः झुकरबर्ग याने स्टेटस् द्वारे अपडेट केले आहे.

या निमित्ताने विनोदाचा भाग सोडला तरी कितीजण या Candy crush saga gamच्या मागे क्रेझी आहेत याचा अंदाज आपणास येतो. सारेच रिकामटेकडे नेटवर असतात आणि हे नेट पडिक Candy crush saga game सारखे खेळ खेळून टाइमपास करीत असतात असा एक होरा मांडला जातो त्याला काही ना काही अर्थ आहे हे जाणवतं.

फेसबूकने नुकतंच जाहीर केलं होतं की एका दिवसात ७०० कोटी लोकसंख्येच्या आपल्या या जगातील १०० कोटी लोकांनी फेसबूकचा वापर केला. ही बातमी केवळ आकडेवारीची गंमत आहे असे नाही तर याला अनेक सामाजिक आणि आर्थिक पैलू आहेत.


“For the first time ever, one billion people used Facebook in a single day. On Monday, 1 in 7 people on Earth used Facebook to connect with their friends and family,” wrote Zuckerberg in a post on his personal profile.

The news is no great surprise: Facebook has been growing steadily, and in the second quarter of 2015 it averaged 968 million daily active users, and 1.49 billion monthly active users.

२८ ऑगस्ट २०१५ रोजीची ही घटना आहे. केवळ एक विद्यापीठाचा प्रकल्प करता करता मार्कने याची सुरूवात केली त्याला यामुळे नंतर ब-याच न्यायालयीन लढायांना सामोरं जावं लागलं मात्र २००४ साली झालेली ही सुरूवात आता कुठे पोहाचली आहे हे आपण बघत आहोत.. आणि याचा वापर करण्यात भारतीय आघाडीवर आहेत.

आपल्या लोकांनी तंत्राच्या वापरात अव्वल रहावं ही चांगलीच बाब आहे. तंत्राचा जसा लाभ होतो तसा तोटाही असतो नाण्याची ही दुसरी बाजू अधिक त्रासदायक असते. त्याची प्रचिती या Candy crush saga game च्या रुपाने येते.

या गेमने आता संवाद देखील बदलले आहेत. नवरा बायको एकमेकांशी बोलताना घरात दुध आहे का याची विचारणा करण्याऐवजी फोनवर आधी कोणती लेव्हल.. अशी विचारणा करताना बघून हसू येणार नाही तर नवल... बायकोची एखादी गंभीर समस्या नव-याने सोडवावी आणि तिलाही त्याचा अभिमान वाटावा या पद्धतीने बायकोची अडकलेली Candy crush saga game ची लेव्हल नवरा पुर्ण करतो... कित्ती कित्ती हे पत्नीप्रेम... मुलांचीही अवस्था काही वेगळी नाही.


या Candy crush saga game ने एक नवी वर्णव्यवस्था निर्माण केली की काय याचा संशय यायला लागतो.. दोनशे लेव्हल झाल्याचे अपडेट टाकणारे समाधान मानतात मात्र त्यांच्यापेक्षा शंभर लेव्हल पुढे असणारे त्यांना वर्ग तीनचे कर्मचारी समजून वागतात.. यांचही काही खरं नाही कारण चारशे ओलांडलेले फर्स्ट क्लास वाले त्याही पुढे आहेत आणि त्यांच्यावरील वर्णात हाय क्लास... आपल्याला एक लेव्हल पार करता आली यातच हायसं वाटणारे आम्ही पामर तर त्यांच्या खिजगणतीस नाही.. ज्यांना खेळता येत नाही त्यांनी तर हाय खाल्ली आणि आता आयसीयूत दाखल व्हावं अशा प्रतिक्रिया हे नेटकर देतात.

झपाटलेला असा एक शब्द याचे वर्णन करण्यास अपुरा आहे.. अरे बाबा तुला खेळायचे तर तू खेळ आम्हाला का त्रास विनंत्यांचा हा सवाल इतरांना आहे... पण ....तुरांनां भयं ना लज्जा तशा पद्धतीने Candy crush saga game वीरांना ना.. असा अतिरेक गेल्या काळात झालेला आपणास दिसत आहे.

असा हा सवाल आपले पंतप्रधान विचारणार की नाही हा सवाल नाही तर खरा सवाल आहे अशा प्रकारच्या विनंत्या पाठविणा-यांना कसे रोखायचे...


... आणि मग वेताळ म्हणाला विक्रमा तू बोललास.. तू बोलला मी निघालो.. असा पंचवीशीतला हा सवाल पुन्हा उद्या आपल्या पेजवर येणार की काय याच अपेक्षेत विक्रमाप्रमाणे पुढच्या कथेसाठी मी आज थांबतो.

प्रशांत अनंतराव दैठणकर

9823199466


Saturday 12 September 2015

विकासाची मानसिकता ...


बदल ही संसार का नियम है अस भगवदगीतेतलं एक वचन आहे. ही संज्ञा सर्वत्र लागू होते. या बदलाची दुसरी बाजू म्हणजे विरोधाची असते. जितका मोठा बदल अधिक मोठा विरोध ही मानवी भूमिका अनुभवास येत असते.

लोककल्याणकारी संकल्पनेतील लोकांनी लोकांसाठी चालविलेलं राज्य म्हणजे लोकशाही होय. या संकल्पनेनुसार राज्य चालवताना एकत्रित झालेल्या या समाजघटकांच्या उन्नतीसाठी लोकांकडून प्राप्त करातून उपाययोजना करणे अपेक्षीत असते. ही उन्नतीसाठी करावी लागणारी प्रक्रिया म्हणजे विकास होय. आता या विकासाच्या नाण्याची दुसरी बाजू अविकसितपणा असायला हवी मात्रआजकाल त्याची दुसरी बाजू विरोधाची बनली आहे. कारण अर्थात विकास ही बदलाचीच प्रक्रिया असते.

माझ्या घराचा, वस्तीचा आणि गावाचा विकास मला नक्कीच हवा आहे असं आग्रहाने प्रत्येक व्यक्ती सांगते मात्र त्या विकासासाठी येणाऱ्या बदलांना विरोध करणाऱ्यांची संख्या मोठया प्रमाणावर वाढल्याने विकास होत नाही अशी स्थिती थोडयाफार फरकाने सगळीकडे दिसते.

विकासाच्या या प्रक्रियेत जे अडथळे आहेत त्यात भूमिकेचे आकलन न होणे ही बाब महत्वाची आहे. आजची स्थिती याच "डेडलॉक" वर आली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी असणारी त्यागाची भूमिका आता विस्मरणात गेली आहे. दूरदृष्टी असेल तर विकास शक्य होतो मात्र त्याच्या अभावाने short sight फायद्यासाठी होणाऱ्या विकासकामांना विरोध झाल्यामुळे विकासाची गती खुंटते आणि अल्पकालीन व दिर्घकालीन दोन्ही लाभ दूर राहतात व तेहही गेले, तुपही गेले म्हणत धुपाटणे हाती राहते व विकास झाला नाही, अन्याय होत आहे अशी ओरड करीत धोपटण्याचा कार्यक्रम सुरु होतेा.

विकास हवा पण कोणते मोल देवून ही आता परवलीची भूमिका मांडणारे समोर आले आणि त्यामधून प्रवाह अडला हे सर्वांनी ध्यानी घेतले पाहिजे. विकास घडवून आणण्यासाठी प्रत्येकाला काही ना काही योगदान द्यावे लागत असते. काही जणांना त्याग देखील करावा लागतो मात्र प्रत्येक जण केवळ फायद्याचा विचार करीत असेल तर विकास होणारच नाही.

आपण ज्यावेळी हक्काची लढाई म्हणतो त्यावेळी आपण आपल्या कर्तव्यांचे किती पालन करतो असा सवाल आपण अंतर्मनाला करावा लागणार असल्याने आपण comfort zone न सोडण्याची भूमिका घेतोय असही जाणवेल.

आपण आपली मानसिकता काय हे तपासले पाहिजे. गरज असल्यास त्यात बदल केला पाहिजे म्हणजे बदल होईल. प्रत्येक व्यक्तीने या दृष्टीकोनातून विचार केला तरच समाजाची मानसिकता बदलेल आणि असे झाल्यानंतर आपण विकासाची पहिली पायरी गाठू. शिखर गाठायला फारसा वेळ लागणार नाही हे देखील तितकंच खरं.

प्रशांत अनंतराव दैठणकर
9823199466

Thursday 10 September 2015

Status अपडेट करताना

काळ बदलतो आणि संदर्भ देखील बदलत्या काळात जग बदलत असतांना जे बदल येतात त्यातील अनेकांनी जाणीवही आपणास होत नसते. आपण ते दररोज जगत असतो मात्र केवळ आलं तसं जगणं ही वृत्ती असल्यानं साध्या -साध्या अशा बदलांकडे आपलं लक्ष जात नाही असाच एक बदल आणि खूप मोठा असूनही अंगळणी पडलेला बदल म्हणजे आपलं स्वत:च Status होय

आज नेटसॅन्ही म्हणण्यापेक्षा नेटक्रेझी पिढी काहीही झाल्यावर प्रथम फेसबूक सारख्या सोशल नेटवर्कीग साईटवर Status update करतांना आपणास दिसतात. काळाच्या ओघात या शब्दाचे अवमुल्यन झाले म्हणायचे की याचा अर्थ बदलला असं म्हणायचा असा सवाल पडतो.

आपलं समाजात असणारं स्थान नेमकं काय आहे याची स्थिती म्हणजे Staus अशी मुळ धारणा मात्र आता दहा मिनिटांचा पाऊस देखील स्टेट्स अपडेटचा विषय असतो. आपल्या आसपासची नवी पिढी लोकल ते ग्लोबल असा प्रवास करित नसून ती पिढी पूर्णपणे ग्लोबल झाली आहे. मात्र या तंत्रज्ञानाचा नेमका वापर करायचा कसा हे कुणालाच माहिती नाही त्यामुळे असं घडत असावं

चार आंधळया व्यक्तींनी हत्तीचं वर्णन करतांना हा हत्ती खांबासारखा आहे. असं म्हणणं किंवा तो दोरीसारखा भासणं हे जसं नैसार्गिक आहे. तस. हे सोशल मिडियातील स्टेट्स बाबतही घडताना दिसत आहे. मुळ इंग्रजी भाषेत Statusman किंवा Status

स्टेटस् या शब्दाला छेद देणारे अपडेटस् आपणास या साईटस् वर बघायला मिळतात. कुणाचा वाढदिवस असेल तर त्याला शुभेच्छा देण्यापासून त्या वाढदिवसाला केकचा फोटो पाठवून या (virtual) आभासी दुनियेत जन्मापासून मृत्यूपर्यंतचे सर्व सोहळे स्टेटस् बनलेले आपणास दिसतात. या सर्व जंत्रीत " स्टेटस " चा अर्थ आम्ही पूर्णपणे बदलून टाकला आहे.

असाच काहीसा प्रकार इतरही सोशल नेटवर्कींग माध्यमांबाबत आपणास बघायला मिळतो आहे. या एकाच गोष्टी सोबत विनाकारण पडणारा कवितांचा पाऊस हा तर एक मोठा चर्चेचा विषय आहे. अगदी र ला ट आणि ट ला प अशा स्वरुपात लिखाण करुन कविता टाकल्या जातात त्यावेळी खूप मनोरंजन होते.

यातच वेगवेगळया साईटसवर चोरी केलेली छायाचित्रे आणि कोटेशन्स आपल्या पध्दतीने अर्थ बदलून तर कधी अर्थाचा अनर्थ करीत टाकली जातात त्यावेळी आणखी हसू येतं.

तसं नाही म्हणायला काहीजण गांभीर्याने याकडे बघतात पण ते खूप कमी आहे. ठिक आहे अस असो की feeling low……. ते देखील आता एक status झालय...... चला ते पण अपडेट करु कारण अपडेट राहणं ही काळाची गरज आहे.

status चा आपल्याला अभिप्रेत अर्थ या नव्या माध्यमाने बदलून टाकलेला आपणास दिसतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपण मान्य केले असले तरी त्याला वाट करुन देणे आपणास जमलं नव्हतं. अशी वाट करुन देण्याचं काम या सोशल मिडियाने केलेलं आहे. त्यामुळे अभिव्यक्तीचा प्रवाह किंवा पूर सोडा तर चक्क त्सुनामी आलेली आपणास दिसते.
 प्रशांत अनंतराव दैठणकर
9823199466

Friday 4 September 2015

श्रवण संस्कृती




आजकाल एक शब्द नव्याने प्रचलनात आला आहे. श्रवणसंस्कृती हा नवा नाही तर जुनाच शब्द आहे. मात्र गेल्या काही दशकात हा मागे पडला होता. श्रवण म्हणजे ऐकणे. आता हे ऐकण्याची काय संस्कृती असू शकते. मुळात केवळ ऐकणं हे मानवी स्वभावास पटणारं नाही.

एखादी व्यक्ती जर बोलत असेल तर दुसरी व्यक्ती केवळ एकत नाही. ती यक्ती त्यावर प्रतिक्रिया देते. हा झाला संवाद मात्र आपल्याकडे विद्वान व्यक्तींची संख्या कमी नाही त्यामुळे संवादावरुन वादाकडे नंतर वादविवाद आणि अखेरीस विसंवाद असा प्रवास सुरु होतो. "मी का म्हणून ऐकून घ्यायचं" असा अविर्भाव असेल तर संवाद होणार नाही आणि श्रवणसंस्कृती या शब्दाचा संबंध येणार नाही.

आजचा जमाना माहिती तंत्रज्ञान विस्फोटाचा जमाना आहे. प्रत्येकाच्या हातात तंत्रज्ञान स्मार्टफोनच्या रुपाने खेळतय. उचलला फोन लावला कानाला या उक्तीप्रमाणे सहजरित्या फोन उचलून लावणारी ही आजची पिढी आहे. सत्तरच्या आणि ऐंशीच्या दशकात ही स्थिती नव्हती भारतात दूरदर्शनचं जाळं विस्तारण्यापूर्वी केवळ रेडिओ हे एकच मनोरंजन आणि माहितीचं साधन होतं. त्यावेळी जी संस्कृती अस्तित्वात होती ती म्हणजे श्रवण संस्कृती.

कुतूहल हा मानवाचा स्थायीभाव आहे. रेडिओच्या त्या छोटयाश्या डब्ब्यामध्ये माणसं नेमकं कुठं बसून बोलतात या कुतूहलापायी रेडिओचं पोस्टमार्टेम मी लहानपणी केलं. आपणापैकी अनेकांना हा प्रश्न पडला असेल आणि काही जणांनी ही कृती देखील केलेली असेल. त्यावेळी एक आणि एकमेव पर्याय म्हणून याला स्वीकारणं भागच होतं

त्या काळात चित्रपट गृहांची संख्या देखील मर्यादीत अशीच होती. यामुळे नाक्यांवरील हॉटेल्सवर रेडिओवर गाणी ऐकणे आणि चित्रपटातील डायलॉगच्या ग्रामोफोन तबकडया ऐकणे हा "टाइमपास" होता आता ते चित्र डोळयासमोर आल्यावर हसू येईल मात्र हे सत्य आहे.


रेडिओने निर्माण केलेल्या या संस्कृतीने रेडिओ श्रीलंका अर्थात रेडिओ सिलोन वरील अमीन सायनीच्या बिनाका गीतमालाला सर्वाधिक श्रवणीय कार्यक्रमाचे स्थान दिले होते. आजच्या भाषेत त्याला टिआरपी म्हणता येईल. गावांमध्ये सणासुदीला भरणा-या यात्रांमध्ये वाजणारे भोंगे हे यात्रांची ओळख होते.

श्रवण संस्कृतीचा एक निराळा अर्थही त्याकाळात लागू होता. कमी शिक्षित समाजात एखादया जाणकार व्यक्तीने आणि तज्ञाने दिलेली माहिती लोक ऐकायचे त्यासाठी गर्दी व्हायची. साहित्यिक क्षेत्रात याच श्रवण संस्कृतीने व्याख्यानमालांची मुहूर्तमेढ रोवली व अशा व्याख्यानमाला रुजल्या त्यातून प्र.के.अत्रे यांच्यासारख्या अष्टपैलू व्यक्तीमत्वाने श्रोत्यांना भूरळ घातली त्यामुळेच त्यांना वक्ता दशसहस्प्रेशु नामाविधान देण्यात आलं.

या व्याख्यानमालांच्या नंतरच्या काळात या श्रवणसंस्कृतीचा ताबा राजकारणाने घेतला अठरापगड जातीच्या या समाजात आसेतूहिमाचल अशा आपल्या भारत देशात राजकीय सभांच्या माध्यमातून श्रवणसंस्कृती फोफावली याचा विनियोग मात्र केवळ सत्तेसाठी झालेला दिसून येतो. नंतरच्या काळात तंत्रज्ञानात झालेल्या क्रांतीमुळे टि.व्ही. नावाचा इडियट बॉक्स घराघरात आला आणि सायंकाळी मोकळया हवेत खेळणारं तरुणपण आणि निसर्गाला साद घालत रपेट करणारं प्रौढपण घरात या इडियट बॉक्ससमोर विसावलं त्यामुळे ज्यांना खेळण्याची नितांत आवश्यकता आहे अशी खेळण्याच्या वयातही मुलं देखील खेळण विसरली. ऐकण्यासोबतच दिसण्याची ताकद असणारं हे टिव्हीचं माध्यम घराघराचा ताबा घेतं झालं.

यावेळी जी सर्वांची प्रतिक्रिया होती ती अनिल कपूरच्या मिस्टर इंडिया चित्रपटात चांगलीच उमटली आहे. असं आपणास जाणवतं

मिलना क्या जो दिखाई ना दे

सारा का सारा सिर्फ सुनाई दे,

क्या करना है मिलके

ऐसे मिस्टर इंडियासे. 





खरच आहे. आजकालच्या स्वाईप आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग च्या जमान्यात नुसतं ऐकण्याचं कोणतं ते कौतूक असं म्हणावं लागतं.

टिव्हीच्या अतिक्रमणानंतर श्रवणसंस्कृतीला उतरती कला लागली. राज्याला नेतृत्व देणारे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख, दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे आदींचे नेतृत्व याच संस्कृतीने वादविवाद स्पर्धांच्या रुपाने समोर आले होते. टिव्हीचे आगमन झाल्यानंतरच्या काळातही डॉ. शिवाजीराव भोसले यांच्या ओघवत्या शब्दांची व्याख्याने ऐकायला गर्दी जमतच होती. मात्र समाजातले बदल झपाटयाने होत होते. "जुने जाऊ द्या मरणालागुनी" अशा आशयाची एक म्हण मराठीत आहे. त्याप्रमाणे सभांना आणि व्याख्यानांना होणाऱ्या गर्दीचे प्रमाण घटले. यातच दररोज मालिका अर्थात डेली सोपच्या रतीब इडियट बॉक्सवर सुरु झाला आणि त्यातून निर्माण झाली केवळ दर्शन संस्कृती.

दर्शन संस्कृतीत दूरदर्शनवरील आरंभीच्या काळात प्रक्षेपित हमलोग सारख्या मालिकेपासून ये जो है जिदंगी, खानदान, बुनियाद नंतरच्या काळात रामायण - महाभारत असा काळ गाजला या क्षणी जर कुणी म्हटलं असतं की श्रवण संस्कृती पुन्हा येणार आहे. तर त्याला उपचाराची गरज आहे. अशी प्रतिक्रिया इतरांनी दिली असती.

या स्थितीत "जुनं ते सोनं" या मराठी म्हणीचा प्रत्यय आला आणि पुन्हा एकदा श्रवण संस्कृतीला उभारी मिळाली ती एफएम रेडिओमुळे. "नव्याचे नऊ दिवस" अशी म्हण देखील यामुळेच सिध्द झाली.आपणास एका ठिकाणी अडकवून ठेवण टि.व्ही. ने साध्य केलं मात्र आपण एका जागी स्थिरावत नाही. दैनंदिन कामं करताना मनोरंजन व माहिती यासाठी रेडिओ हेच माध्यम उत्तम आहे हे नव्याने सिध्द झालं.

ऑल इंडिया रेडिओ ज्याला आपण आकाशवाणी म्हणून ओळखतो हा 86 वर्षापासून सेवा देत आहे. मात्र गेल्या दशकात आलेल्या खाजगी मनोरंजन एफएम वाहिन्यांनी सादरीकरणाच्या आधारे खूप मोठी आघाडी घेतली. यातील अर्थकारणाचा भाग बाजुला सोडला तरी एक बाब महत्वाची ती म्हणजे श्रवणसंस्कृती शाबूत आहे.

दोन व्यक्तींमधील संवादात एकानेच बोलणे म्हणजे संवाद होतच नाही. त्यात क्रिया-प्रतिक्रिया असा आलेख अपेक्षित असतो. मार्मिक पध्दतीने पती-पत्नी यांचे संवाद संबध आपल्याकडे सांगतात त्यावेळी हा संवाद


एक सवाल मै करु

एक सवाल तुम करो

हर सवाल का जवाब

सवाल ही हो.

अस असलं तरी ऐकण्याची ही नैसर्गिक सवय एक प्रकारची संस्कृती बनली आहे.

इंग्रजीत म्हणतात you should be a good listener to be become a good editor. यात इंतरांच ऐकुन घेणं अपेक्षित आहे. आपण व्यक्तीमत्व आणि त्याचा विकास यांच्या प्रवासात या श्रवण संस्कृतीच महत्व देखील जाणून घेतलं पाहिजे.

समर्थ म्हणतात दिसामाजी काही तरी लिहावे आणि पुढे प्रसंगी अखंडीत वाचित जावे असंही म्हटलयं.

वाचन म्हणजे इतरांच कथन आपण आपल्या नजरेतुन ग्रहण करणं हा देखील श्रवण संस्कृतीचाच एक पैलु आहे. त्यामुळे वेळ काढून वाचन करावं त्याहीपेक्षा महत्वाच आपण आपल्या अंतरंगाचं म्हणणं ऐकून घ्यावं.

आपल्या बाह्यरंगात आपण वेगळे आणि अंतरंगात वेगळे असतो. आपल्या मनातही संवाद होत असतो. आपल्यापैकी कितीजण तो ऐकतात? आसपासची परिस्थिती आणि आपली भूमिका याला न्याय देण्याच्या प्रयत्नात आपण आपला स्वत:चाच अंतर्मनातील आवाज ऐकत नाही हे देखील वास्तव आहे. आपण आपला आवाज ऐकणं हा या श्रवण संस्कृतीचा कळस असतो.

बॉस म्हणाला म्हणून करावं लागतं, कौटुंबिक गरजा म्हणून ऐकाव लागतं याच्या पुढे जाऊन आपला आतला आवाज ऐकणारी माणसं जग बदलतात असा अनुभव आहे.

"ऐकावे जनाचे, करावे मनाचे"

अस वचन तेच सांगत. त्याच महत्व वेगळं आहे. पण ऐकतो कोण?

ही स्थिती न आणता तांत्रिक श्रवणाच्या या संस्कृती प्रमाणेच या श्रवण संस्कृतीकडे वळण्याची हीच वेळ आहे.

--- प्रशांत अनंतराव दैठणकर

मो. 9823199466

जिल्हा माहिती अधिकारी,

गडचिरोली 



Wednesday 2 September 2015

त्रिमितीतून चौथ्या मितीकडे

आयुष्य ही अनुभवांची एक अखेरच्या क्षणापर्यंत चालणारी मालिका आहे. यात कोणता प्रसंग कसा येणार याचं नियोजन प्रत्येक व्यक्ती करते मात्र तो प्रसंग जसाच्या तसा उभा राहणं अत्यंत अवघड असतं कारण काळ हा चौथ्या मितीत चालतो तुम्ही - आम्ही त्रिमितीच्या जगात जगतो. अगदी चित्रपट देखील त्रिमितीमध्ये बघायचा असेल तर आपणास वेगळी मेहनत घ्यावी लागते आणि वेगळया चष्म्यांचा आधार देखील घ्यावा लागत असतो.

या जगात आपण आपली प्रतिमा म्हणून जो फोटो बघतो तो देखील त्रिमितीत असत नाही त्यामुळे काळाची गती आणि चौथी मिती आपल्या आकलनापलीकडील असते हे मान्य केलेलं चांगलं. त्यामुळे आपलं आयुष्य आणि त्याचा प्रवास कदाचित अनाकलनीय होत असतो.

आपल्या हिंदू संस्कृतीत कर्माचं महत्व सांगितलं आहे. कर्म काय आहे याचही आकलन प्रत्येक व्यक्तीला होईलच असं नाही मात्र त्यापायी कर्म करण्यात कमी होत नाही. आपण जे काम करतो त्याला कर्म म्हणणार का ? नाही अर्थातच नित्य कामाला कर्म म्हणता येणार नाही. मग कर्म आहे तरी काय ? आणखी एक सवाल आणि मग सुरु होतो तो कर्माचा शोध.

कर्म ज्याला कळलं अशी व्यक्ती कोणाला म्हणायचं या प्रश्नांच उत्तर अर्थात ज्याला आपल्या जन्माचा बोध झाला आहे अशी व्यक्ती असं म्हणता येईल आपला जन्म इथं काही तरी वेगळ करण्यासाठी झाला याची जाणीव झाल्यावर काळाच्या चौथ्या मितीची ओळख होते. ते केवळ एक परिमाण नसून ती एक सिमारेषा आहे. याची जाण होते मग या त्रिमितीच्या सिमा ओलांडून चौथ्या मितीत प्रवेशाचा प्रयत्न सुरु होते. अर्थातच कालसापेक्ष जगणं विसरुन काळाच्याही पलिकडे विचार पोहोचतात हीच सृजनशीलतेची सुरुवात असते.

ज्याला काल आणि उद्या याचा प्रवास साधताना सुखदुख: जाणवत नाही अशीच माणसं सृजनातून जगाला वेगळा आयाम देण्याचा प्रयत्न करतात. यात प्रत्येक व्यक्ती यशस्वी होईलच असे नाही मात्र तसा प्रयत्न करण्यात अनेकांनी आयुष्य घालवल आहे. अशा प्रत्येक व्यक्तीसाठी हा प्रवास दैनंदिन अनुभवाची मालिका ठरते आणि यातूनच वैराग्याची भावना येत असते.

सामान्य आणि असामान्य यातील फरक कोणता असं विचारल्यावर सांगता येईल की आयुष्यामधील या प्रवासात चढ उतार सारख्याच मानसिक पातळीवर जगण्याची क्षमता ज्या व्यक्तीत येते ती वैराग्याचा अनुभव घेते व दरक्षणी नव्या संकटांचा मुकाबला करायला तयार असते. अशी व्यक्ती असामान्य होय. आयुष्यात आनंदाने काळ व्यतीत केल्यावर काही कडू प्रसंग येतात त्यावेळी मानसिक पातळीवर तितकी सक्षम प्रतिक्रिया देणं जमत नाही म्हणून ज्याला वैफल्य येतं ती व्यक्ती सामान्य व्यक्ती होय. जन्माला येणं ही मृत्यूकडील प्रवासाची सुरुवात आहे. आलेली प्रत्येक व्यक्ती जाणार हे नक्की मात्र वैराग्यातून येणारा मृत्यू आणि वैफल्यातून येणार मृत्यू यात खूप मोठं अंतर असतं वैराग्याचा पुढील प्रवास निरपेक्ष कर्माच्या दिशेने जातो ज्यालाच कदाचित मोक्षमार्ग म्हणणे अपेक्षित असेल.

वैफल्याचा प्रवासमात्र बहुतेक प्रसंगी स्वनाश अर्थात आत्महेत्त्येकडे जाणारा असतो. जन्माला येताना प्रत्येक व्यक्तीला निसर्ग काही अपवाद वगळता सारं दान देवून टाकतो मात्र ते दान सत्पात्री पडलं की नाही हे कर्माच्या मार्गावर कळतं कर्मकांड करणं म्हणजे कर्म नाही हे सुध्दा वेगळं सांगावं लागेल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात तसं

मनी नाही भाव

म्हणे देवा मला पाव......

देव अशानं पावायचा नाही रे

देव बाजारचा भाजीपाला नाही रे

केवळ देव - देव करणं म्हणजे कर्मकांड होय. आपण आपल्याप्रती आणि आपल्या जीवनात असणा-या प्रत्येक व्यक्तीप्रती जपलेली भावना म्हणजे कर्म होय आपली अंगी असणारी भूतदया अर्थात प्राणीप्रेम म्हणजे कर्म होय...त्याही पलिकडला विचार करुन जगणं म्हणजे कर्म होय आणि असे कर्म करणारे कालातीत असतात... काळ बदलला तरी आपण न बदलणं हा स्थायीभाव म्हणजे कर्म होय.

प्रशांत दैठणकर

Wednesday 19 August 2015

या जन्मावर......या जगण्यावर



                सौंदर्य..... याची परिभाषा कुणाला करता आली आहे आजवर. चित्रपट सृष्टीतलं शापित सौंदर्य अर्थात मधुबाला असो की हॉलीवूडची मर्लिन मन्रो......प्रत्येक सौंदर्याला शाप असू शकत नाही......तसं पाहिलं तर सौंदर्य हे आपल्या बघण्याच्या नजरेवर अवलंबून असतं.
               छत्रपती शिवरायांनी सुरतेवर चढाई केली त्यावेळी राजांसमोर हजर करण्यात आलेल्या सूरतच्या सुभेदाराच्या पत्नीच्या सौंदर्याची वाखाणणी राजांनी अतिशय आदरानेच केली होती. सौंदर्य आणि त्याकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन आपलं व्यक्तीमत्व कसं आहे ते सांगत असतो.
              सौंदर्य प्रत्येकाच्या ठायी आहे पण म्हणतात ना हि-याची पारख फक्त जोहरी करु शकतो. पारखी नजर म्हणजे सौंदर्य शोधणं. आज बखरकारांनी केलेलं मस्तानीचं वर्णन आपल्या नजरेसमोर तेच सौंदर्य नव्यानं साकार करतं.
              तसं म्हटलं तर कबरस्थान काही फिरायला जाण्याची जागा होवू शकत नाही मात्र त्यातही सौंदर्य असेल तर जगातल्या सात आश्चर्यापैकी एक असणारा ताजमहल हे त्याचचं प्रतिक आहे. आपल्या लाडक्या मुमताज च्या प्रेमाखातर हा सुंदर ताजमहल उभा करून तिच्या स्मृतीला अजरामर करुन ठेवलय असचं म्हणता येईल.
            सौंदर्य आणि प्रिती हे हातात हात घालून चालतात असं म्हटल्यास वावगं ठरु नये मर्लिन मन्रोचे आणि जे.एफ.के.यांच्यातील बंध याच सौंदर्याच्या धाग्यात गुंफले होते. इकडे हॉलीवूडच्या चर्चा हल्ली जास्त होत आहे कारण माध्यमांचा विस्तार झाला आहे.मर्लिन पेक्षाही अधिक सौंदर्य असणारी अभिनेत्री म्हणजे एन्ग्रीड बर्गमन होय. तिचं सौंदर्य ख-या अर्थाने आरसपानी असं होतं.
         
   सौंदर्याचं बखाण करताना त्याच सुंदर शब्दांचा वापर करावा लागतो पंकज उधास यांच्या आवाजातील एक गाणं इन्ग्रीडचं सौंदर्य आपल्यासमोर उभं करतं
चांदी जैसा रंग है तेरा सोने जैसे बाल.........
 एक तू ही धनवान है गोरी बाकी सब कंगाल
              काय ती कविकल्पना.....खरचं जो न देखे रवि ते देखे कवी असचं म्हणावे लागेल.
               उगवत्या सूर्याची प्रभा आणि मावळतीचा सूर्य यांच्या जोडीला पौर्णिमेच्या एक दिवस आधीचा चौदहवी का चांद म्हणजे सौंदर्य......त्याचं वर्णन देखील शब्दातीत
               बॉलीवूड मध्ये निरनिराळया शायर लोकांनी या सौंदर्याच्या वर्णनात शब्दांचा जो वापर केला आहे त्याला काही तोडच नाही असं म्हणता येतं ते यासाठीच
              जुल्फे......हा शब्द म्हणजे सौंदर्य.......बलखाती लट, गेंसू असे निरनिराळे उर्दू शब्द सौंदर्याचं रुप आपल्या डोळयापुढे उभं करीत असतात.
              सौंदर्य म्हणजे एक आंतरिक भावना......मनाला जे भावतं ते सौंदर्य असतं......पावसानंतर हिरवाईने नटलेल्या डोंगर रांगा......पहाटेच्या उन्हात चमकणारे गवतांवरील दवबिंदू म्हणले सौंदर्य......दूरपर्यंत पसरलेल्या पिकांमधून वाहणारा वारा आणि त्याच्या तालावर डोलणारी ती कणसांची रांग म्हणजे सौंदर्य.....हसताना गालावर पडणारी खळी अर्थात डिंपल म्हणले सौंदर्य.....अनेक रुपात आपणास ही अनुभूती येते.
             लता मंगेशकरांचा आवाज आणि आशाबाईंचा सूर देखील सौंदर्यच.....सौंदर्य नजरेतूनच कळतं असं नव्हे तर ते श्रवणातून, गंधातून आणि स्पर्शातून देखील कळत असतं. एखादा मनाला भावणारा आणि सतत ऐकत रहावं असा वाटणारा आवाज म्हणजे देखील सौंदर्य.
            माझे एक मुस्लीम सहकारी सांगायचे की, फल, सब्जी, अनाज यह जिस्म का खाना है| तो सुगंध रुह का......तप्त अशा धरतीवर पावसाचे थेंब पडायला लागतात आणि तापलेल्या मातीशी थेंबांचे मिलन झाल्यावर जो दरवळ येतो तो मृदगंध म्हणजे देखील सौंदर्यचं.......

    असं आयुष्य जगणा-यांचे काही अनुभव आपणास वेगळ्या जगात नक्कीच नेणारे असतात. पण त्यातून एकच जाणवत की जगताना धुंद होवून जगायचं असतं.. जगात असणारी सुंदरता आपण टिपायची असते. जग जाणायचं असतं.. कारण इथलं इथंच संपणार आहे.
   सौंदर्य एक अनुभूती असते आपल्या जगण्याची......जगत राहण्याची आशा तर कधी प्रेरणा असते म्हणूनच म्हणावं.

इथल्या पिंपळपानांवरती.................................

....... या जन्मावर या जगण्यावर..शतदा प्रेम करावे.

                                                                                    - प्रशांत दैठणकर