Tuesday 13 October 2015

हुई और भी मुलायम...!

सहजपणे बोलतांना टपली मारावी त्या पध्दतीनं काल तिनं माझ्या कानावर फोनव्दारेच टपली मारली. संवाद प्रेमाचा चालू असताना हो ना ते प्रेम 20 व्या वर्षी कळत-नकळत होतं असं म्हणताना...उरलेलं 40 व्या वर्षी होतं आणि 80 व्या वर्षी बॅलन्स NIL होतो अशी पुस्ती जोडली. फोनवरलं संभाषण सरलं मात्र आता सुरुवात झाली ती आत्मसंवादाची.

महाविद्यालयातले ते दिवस...शाळेत असतांना कुतूहल असणारा तो विषय प्रत्यक्षात शाळेतून लाजत - बावरत किंचितसं घाबरतच ती महाविद्यालयाची पायरी गाठली त्या क्षणी जाणवलं की शाळेचे ते दिवस कसे चिमण्यांचा थवा उडून जावा आणि फांदी रिकामी व्हावी असे नजरेसमोर उडाले...झाड रिकामं आणि पारंब्या...त्या वडाला बांधलेला सुवासिनींचे धागे तितके उरावे अशी स्थिती.

त्या धाग्यांप्रमाणे स्मृतीचे धागे आणि त्यांचं रिंगण झाडाभोवती सातत्याने गहिरं होत होतं वर्षागणिक त्या भाविकतेने साता जन्माचा पती का मागतात याचं बालसुलभ कुतूहल संपून तारुण्यात पाऊल ठेवताना स्त्रियांचा तो ' सूता वरुन स्वर्गा ' चा मार्ग जरा खटकला पण जगरहाटी...चालायचं तसं...आणि आपल्यालाही थांबता येत नाही काळाची गती आपण पकडली नाही तरी लोककला लटकलेल्या गर्दीमध्ये आपसूक पुढे ढकलला जातो आणि फलाटावर उतरतो तसा काळ आपल्याला चालवत असतो.

चालत चालत इथवर आल्यावर मागे वळून बघतांना आपण स्वत:लाच धुंदीत जगताना बघायचं धुंदी असते वयाची एक प्रकारचा तो कैफ म्हणतात ना वय वेडं असतं...म्हणून काय इतका वेडेपणा करायचा असं टोकणारे होतंच ना पण त्यांचं ऐकायला वेळ आहे कुणाला...विषय नसताना रंगणाऱ्या त्या गप्पांच्या मैफली नेमक्या कसल्या होत्या आज कुणालाच सांगता येणार नाही...सारं कसं मंतरलेलं जग होतं.

ती पाहताच बाला...असा कलिजा खलास झालेल्या त्या खलाशांचे जहाज आज स्थिरावलेले दिसते कारण त्यावेळी असणारं Love at first Sight खरं असलं तरी तो पहाटवाऱ्यात प्राजक्त फुलांवर पडलेल्या दवबिंदूचा आनंद होता...झाडाच्या पानापानांवर पडणारी ती 'ओस की बुंदे ' कोवळया उन्हात विरुन जायची तशी स्वप्नं ही अनेकांना दवबिंदूच्या रुपातलं मृगजळ ठरली होती…… आसपास हिरवळ आणि सुगंधाचा दरवळ असताना काही वेडे पार या स्वप्नांच्या मृगजळामागे धावताना दिसले.

मुकद्दर का सिकंदर मधला तो सिकंदर मेमसाबच्या मागे अन मेमसाब वकिल बाबूच्या प्रेमात आणि प्रेमवेडया सिकंदरच्या प्रेमात हिरा चाटून (हे कसं काय बुवा आजवर कळलेलं नाही) जीव देणारी जोहराबाई आणि त्या जोहराच्या प्रेमाने वेडा झालेला दिलावर.... असं न पुरं होणारं वर्तूळ आणि त्याचं ते " धकाधकी " चं आयुष्य...बघता बघता त्या मेमसाब कुण्या वकिलबाबूचा हात धरुन पाखराप्रमाणं उडून गेल्या याची चिंता करणारे लढवय्ये सिकंदर मित्र आसपास वावरत होते...नुसतं गंमत म्हणून बघायचं दुसरं काय.

खरच वय वेडं असतं...त्या वयात प्रेमात पडलो आणि काय...पडतच गेलो. आज त्याबाबत टोचणी देण्याचा प्रयत्न करणारे कमी नाहीत शेवटी 'कुछ तो लोग कहेंगे...' म्हणत बेधूंदपणाने आपण आपलं चालत रहायचं इतकंच त्या वयात कळत होतं. सुखावलेले कमी आणि दुखावलेले प्रेमभंग झालेले जीव अधिक...तुला कसं Character नाही असं हिणवतात तेव्हा हसू येतं...चारित्र संपन्न व्यक्तीमत्वाचा धांडोळा घेतांना मग अधिकच हसू यायला लागतं...संपन्न असं चारित्र वगैरे सारं अंधश्रध्दा असतात…….. जगणाऱ्याला ते जाणवतं Character by Choice आणि Character by Force यात फरक असतो... " हमसे आया ना गया तुमसे बुलाया ना गया" असं म्हणत या सैन्याच्या अनेक फळया धारातिर्थी होवून अपरिहार्यपणे चारित्र्यसंपन्न झाल्या...... त्यांचाही सार्थ ( ? ) अभिमान वाटतो.
ती माझ्या राशीची नाही...अपने को नही पसंद,..... म्हणत तिची ओळख न होताच तिला बिनलग्नाचा घटस्फोट देणारे अनेक जण आता चारित्र्यसंपन्नतेची झुल पांघरलेले बघतो त्यावेळी अधिकच हसू येतं...त्यातही जहाल - मवाळ अशी गटवारी होती. जहाल गटवारीतील युवक छाती पुढे काढून ' वो मेरे दिलमे प्यार की तरह और मै उसके दिल मे नासूर की तरह रहूंगा' असं म्हणत शैार्यपूर्वक शहादत स्विकारुन शौर्यपदकाच्या सन्मानासह चारित्र्याच्या महामार्गावर मार्गस्थ झालेले बघितले त्या बिचाऱ्यांना आज बाजारात बायकोसोबत हातात पिशव्यांच्या ढाली घेऊन लढणाऱ्या ' भाजीप्रभू ' च्या रुपात लढताना बघून वाईट वाटतं...आधीच पावन झालेल्या या नश्वरांनी खिंड लढवायचा विचार करायच्या पूर्वीच स्वत:ला खिंडीत सापडलेलं बघून सभ्यपणाचं पांढर निशाण काढलेलं बघितलय...


खरच वय वेडं असतं... "नशीब प्रत्येकाचं असतं असं नाही आणि नशीब प्रत्येकावर रुसतं असही नाही " ...कोणाचं कसं हा ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग म्हणावा लागेल.

अर्धांगिनीला अर्धसत्य सांगा असं म्हणणाऱ्यांना माझं पूर्ण सत्य पटणार नाही...प्रेमात पडून आता वीस वर्षांच्या खंडानंतर अगदी खरोखर 'वीस साल बाद' सारं पूर्णसत्यात अर्धांगिनीला सांगितल्यामुळे काय काय घडू शकतं याची अनुभूती घेताना अचानक चाळीशीच्या उंबरठयावर ती दिसते...आणि हो दगडं कशी पाझरणार...वितळायलाही मेणासारखं मऊ असावं लागतं कदाचित खंबीर असणारं मन अधिक हळवं होतं की हळवेपणात कणखरपणा अधिक असतो ...पण पुन्हा प्रेमाचं विश्व तरुण मनातलं तारुण्य शरीरालाही तरुण ठेवतं असंच काहीसं...

धुंद वाऱ्याच्या लहरींसोबत अलवारपणे खांद्यावर दोलायमान खांद्यावर रुळणारे गेसू ... बाईकवर वय विसरुन एक्सलेटरचा कान पिळून वाऱ्याशी युध्द खेळणारं शरीर आणि त्यातलं मन आजही त्याच वयाचा 20 व्या वर्षात जगायला भाग पाडतं आणि वय वेडं असतं...आणि मावळतीला जाणाऱ्या सूर्यासोबतच्या प्रवासात ती हळूवार गाणं गुणगुणते कानावर शब्द तालासह नाचायला लागतात.

हुई और भी मुलायस मेरी शाम ढलते ढलते......

प्रशांत अनंतराव दैठणकर

9823199466

Friday 9 October 2015

प्रवास आपला टपालासोबतचा...!

नव्या पिढीला फारसा परिचित नसला तरी जाणत्या पिढीमधील तुमच्या-आमच्या पिढीत साऱ्यांनी खेळलेला खेळ म्हणजे मामाचं पत्र हरवलं आता त्या वयात निरागस असल्याने खेळताना कधी प्रश्न पडला नाही की मामाचंच पत्र का हरवायचं आणि ते नेमकेपणने मलाच का सापडायच ? यातला विनोदाचा भाग बाजूला ठेवला तर मामाचं पत्र म्हणजे आईच्या माहेरचा दुवा होता. त्यात माहेर म्हटलं की सगळ्याच स्त्रिया हळव्या होत असतात माहेरुन ख्याली खुशाली सांगणारं त्याकळचं ते 15 पैशांचं पोस्टकार्ड जगण्याचा घटक होता आणि तो पत्र आणणारा पोस्टमन आपल्या घराकडे कधी येतो याची सर्वांना वाट असायची.
स्वातंत्र्य प्राप्तीनंतर नागरिकरणाला वेग आला आणि गावातली तरुण पिढी शहराकडे वळली. ज्यांनी मातीशी नातं जपलं अशी मोठी पिढी गावातच राहिली. त्याकाळी टेलिफोन फक्त श्रीमंताघरची वस्तू होती म्हणून पत्रव्‍यवहार हा जगण्याचा घटक होता.
मुंबईत नोकरीसाठी कोकणातून आलेल्या चाकरमानी लोकांसाठी संदेशवहनाचा तो खात्रीलायक आणि स्वस्त मार्ग होता.
संदेशवहनाच्या पध्दती काळानुसार आणि तंत्रज्ञानानुसार बदलत गेल्या आता व्होडाफोनचा जमाना असला तरी पूर्वी घोडाफोनचा जमाना होता. घोड्यावरुन संदेशवाहक पाठवून राजे एकमेकांशी पत्रव्यवहार करीत तर प्रशिक्षित कबुतरांकडूनही संदेश पाठविले जात होते.
युरोप आणि अमेकरकेत टपाल व्यवस्था सुरु झाली. ब्रिटीश भारतात आले त्यावेळी त्यांनी हे साधन भारतात आणले टपालाची शिस्तबध्द वितरण व्यवस्था असणारी टपाल कार्यालये दिडशे वर्षांपूर्वी थाटायला लागली त्याकाळी तार अर्थात टेलिग्राफ ही गतीशील संदेशवहनाची यंत्रणा टपाल कार्यालयाचाच भाग होती.
अशाच 15 पैशांच्या पोस्टकार्डमुळे विलंबाने का होईना शुभवर्तमान, ख्याली खुशाली, लग्न जुळल्याच्या बातम्या कधी निधनाच्या बातम्या कळायच्या पत्र जमवून ठेवायला घराघरात तारकेट असत. याच टपाल विभागाच्या तिकिटांमुळे हजारो जणंनी तिकिट संग्रह गोळा केलेले दिसतात निरनिराळया देशांची टपालाची तिकिटे गोळा करणे हा एक चांगला छंद आहे.
पोस्टमनला बऱ्याच वेळा इतरांची पत्रे लिहून देणे तसेच आलेल्या पत्राचं वाचन करुन देणे करावे लागे. न शिकलेल्या पिढीला त्यामुळे पोस्टमन अर्थात डाकिया घरातलाच सदस्य मानत होते. त्याला दिवाळीला आवर्जून पोस्त दिली जायची.
काळ बदलला तसं संदेश वहनाचं स्वरुप बदललं मात्र आजही व्यापारी वर्ग आणि ग्रामीण भागात राहणाऱ्यांना पोस्टकार्ड जवळचं वाटतं. नव्या पिढीत आता मोबाईलवर मेसेज पाठविणं, चॅटींग करणं, फेसबुक वर केलेलं स्टेटस् अपडेट आणि व्टिटरवर केलेलं व्टिट आदी मार्ग उपलब्ध आहेत त्यातच ही मंडळी रमते. पत्र लिहिणे आता भाषा विषयात काही मार्कांपूरतं उरलं आहे.
पत्र लिहिताना मोठ्यांना केलेला नमस्कार मग पत्राचा मायना. पत्र पूर्ण झल्यावर लिहायचं राहून गेलं म्हणून लिहिलेलं ता.क. अर्थात ताजा कलम. निधनाची वार्ता कळवणं आलं की त्यात टाकलेली टीप हे पत्र वाचताच फाडून टाकणे आणि आपणही ते फाडायचं ही पध्दत या पत्रालाच तार समजून लवकर निघावे या आशयाची खास टिप आदी अनेक बाबी टपाल आणि पोस्टकार्डशी जुळलेला आहे.
याच टपाल खात्यमुळे आवर्ती ठेव अर्थात आर.डी. रिकरिंग डिपॉझिट च्या रुपाने अनेकांना व्यवसायची संधी लाभली आजही टपाल खात्याशी ही माणसं निगडीत आहेत. भविष्य निर्वाहासाठी पीपीपी. अर्थात टपाल भविष्य निर्वाह निधीच्या रुपाने अनेकांनी सुरक्षित गुंतवणुकीसाठी टपाल खात्यावर विश्वास टाकला.
9 ऑक्टोंबर हा या टपाल खात्याची आठवण देणारा टपाल दिन. आज तंत्र बदलल्यावर टपाल विभागाने  ई-ट्रान्सफर आणि ई-मनी ऑर्डर सुरु केली पण शहरात व वसतीगृहात राहून हॉस्टेल लाईफ ज्यांनी जगलय यंना या मनी ऑर्डर म्हणजे लाईफ लाईन असायची. या मनी ऑर्डरच्या भरवशावर होणरी उधारी आणि पार्ट्या यांचं सान त्यांच्या आयुष्यात एखाद्या आठवणीच्या कुपीसारखं आहे.
लष्करी सेवेत असणाऱ्यांना सिमेवरुन घरी पैसे पाठवणं आणि आपली खुशाली कळवणं या साठी टपालाचाच आधार आहे. संदेसे आते है हमे तडपाते हे हे बॉर्डर चित्रपटातलं गाणं याचा भावनेला व्यक्त करणारं आहे.नाम चित्रपटात पंकज उधासने गायलेल व त्याच्यावरच चित्रित झालेल चिठ्ठी आई है या गाण्यावर हॉस्टेल मधले मित्र रडताना मी बघितले आहेत. डाकिया डाक लाया हे काका अर्थात सूपरस्टार राजेश खन्नावर चित्रित झालेलं गाणं असो की स्मिती पाटीलचं हमने सनम को खत लिया ही गाणी डाकिया, डाकबाबू अर्थात पोस्टमन आणि टपालाचं महत्व अधोरेखीत करतात.
आजही टपाल खातं महत्वाची कामगिरी बजावत आहे. अंगडिया सेवा आल्यवर खाजगी सेवेचा दर्जा पाहून अनेक जण कुरिअरकडे वळले असले तरी महत्वाचे दस्तऐवज पाठविण्यासाठी आजही टपाल खात्याची स्पीडपोस्टसेवा पसंद केली जाते. 
टपाल खात्यात असणारा आरएमस अर्थात रेल मेल सर्व्हीस आजही गतीमान प्रवास तुमच्या-आमच्या आयुष्यात अगदी महत्वाचा आहे. घरोघरी जाऊन टपाल वाटप करणारा पोस्टमन आणि त्याच्याशी निगडीत यंत्रणेला टपालदिनी सलाम आणि चौकातल्या लाल रंगाच्या टपाल पेटीलाही सलाम.


                             -प्रशांत अनंत दैठणकर- 

Thursday 8 October 2015

सिनेसृष्टीचा हा मिडास राजा



त्याची आणि माझी ओळख अर्थातच मला कळायला लागलं त्या वेळेपासूनची वयानं बापापेक्षाही मोठा असणारा तो आजही मला तो म्हणावा इतका जवळचा आहे याला कारण त्याच्यातलं आणि माझ्यातलं नातं. हे नातं माझंच नाही तर या भारतवर्षात अनेक पिढयांनी ते जगलय आणि अनुभवलं आहे. तो शतकाचा महानायक. आपल्याला जगायला निरनिराळया पध्दतीनं प्रेरणा देणारा...नाही म्हणायला महत्व कमी असणाऱ्या जगातला तो अनेक पिढयांचं विचार विश्व कधी व्यापून बसला तेच कळलं नाही तो म्हणजे अमिताभ हरिवंशराय श्रीवास्तव उर्फ अमिताभ बच्चन.

'हम जहां खडे होते है वहीं से लाईन शुरु होती है' अशा करारी बाण्याची सवय त्याच्याच व्यक्तिमत्वाने लावली. रुपेरी पडद्याचं ते विश्व जगणारे अनेकजण आहेत पण त्याची तोड नाही आणि तुलना देखील नाही. कालातील व्यक्तीमत्वांपैकी एक व्यक्तीमत्व अमिताभचं. 11 ऑक्टोंबर 2015 ला वयाची 73 वर्षे पूर्ण करणाऱ्या या महानायकाला आणि त्याच्या प्रवासाला बघताना जाणवतं की त्याचा प्रवास तसा साधारण अशा चित्रपट आणि कथानकातून सुरु झाला असला तरी त्याचं स्वत:चं व्यक्तीमत्व त्या भूमिकांना मोठं करणारं होतं. त्याच्या असण्यानं अनेक भूमिका अजरामर झाल्या. त्याला विशिष्ट पठडीत बांधायचा प्रयत्न झाला मात्र त्याची उंची त्याहीपेक्षा अधिक निघाली. काही प्रतिमा अशा असतात ज्या चिरतरुण असतात त्यापैकी एक प्रतिमा अमिताभची आहे. राखी सारखी अभिनेत्री त्याची नायिका म्हणून आली आणि त्यानंतरच्या काळात त्याचं नायकपण बदललं नाही परंतु राखीला त्याच्या आईच्या भूमिकेपर्यंत वृध्दत्व आलं...यासाठीच त्याला चिरतरुण म्हणायचं.

त्यानं चित्रपटात स्ट्रगल केला तो साऱ्यांनाच करावा लागला आणि आजही अनेकजण करीत आहेत मात्र त्याची तुलना करणं अशक्य आहे इतकी मोठी झेप त्याने घेतली.

आजच्या पिढीला अमिताभचं ते वलय आणि त्याच्यातल्या त्या 'ॲग्री यंग मॅन ची क्रेझ' फक्त पुस्तकात आणि लेखांमध्ये वाचायला मिळेल प्रत्यक्षात तो काळ ज्यांनी बघितला त्यांनाच त्याची अनुभूती आली.

सलिम खान आणि जावेद अख्तर या जोडीने अर्थात सलिम-जावेद यांनी हा अँग्री यंग मॅन घडवला असला तरी त्याचं सातत्यपूर्ण नायक रहाणं 'Entertainment' च्या माध्यमातून जारी राखलं ते कादरखान या लेखक अभिनेत्याने अमिताभला स्वत:च्या व्यक्तीमत्वाला अधिक खुलवण्याचं काम शब्दांनी केलं. नुसते शब्द असून चालत नाहीत तर त्या शब्दांना व्यक्त करण्याचं म्हणजे शब्दफेकीचं कौशल्य असावं लागतं ते अमिताभमध्ये ठासून भरलेलं आहे.

बोलतांना शब्द जितके महत्वाचे त्यापेक्षा त्या शब्दांच्या उच्चारात असणारं योग्य अंतर (पॉझ) अधिक परिणाम साधत असतं ते अमिताभने दाखवून दिलं त्यामुळे त्याच्या समकालीन नायकांमध्ये त्याला आपलं स्वत:चं वेगळं स्थान निर्माण करता आलं.

प्रत्येक व्यक्ती स्वत:वर प्रेम करते आणि आपलं व्यक्तिमत्व श्रेष्ठ असं मानते अशा या जगात प्रत्येकाच्या मनातल्या 'मी' ला साद घालून आपली प्रतिमा त्याच्या मनात बसवण्यात अमिताभ यशस्वी ठरला.

सर्व दृष्टीने श्रेष्ठ असं अमिताभला म्हणता येणार नाही. नृत्य हा त्याचा 'विक पॉईंन्ट' त्यात तो कच्चा लिंबू मात्र आवाज हा त्याचा सर्वात स्ट्राँग पॉईन्ट म्हणून त्यानं स्वत:च्या मर्यादा ओळखून वाटचाल आजवर केली.

कथानक लिहून त्यात अभिनेते घ्यायच. गाणं लिहून त्याला संगीत द्यायचं हे सारे प्रघात अमिताभने आपल्या करकिर्दीत कालबाहय केले. लेखक लिहितांना अमिताभ नायक आहे याची जाणीव ठेवून कथानक लिहायचे, गाणीदेखील त्याच्यासाठी लिहिली जात होती. नृत्यामध्ये ता कमजोर आहे हे जाणून त्याच्यासाठी नृत्यदिग्दर्शक त्याच स्वरुपाची रचना करायचे नायक म्हणून वाटचाल करताना वेगवेगळे टप्पे या महानायकाच्या प्रवासात आले त्यात सर्वात महत्वाचा टप्पा अभिनेत्री रेखा सोबत आला अमिताभच्या कर्तृत्वाला वलय होतंच पण त्याला स्वप्नवत यश मिळवून देणारा अभिनेता बनवण्याइतपत खुलवण्याचं काम रेखा गणेशनने केलं.


अमिताभने आपल्याच क्षेत्रातील दिग्गज अभिनेत्री जया भादुरी सोबत विवाह केला मात्र त्याची चर्चा अधिक झाली नाही. अधिक चर्चा अमिताभ रेखा यांचीच झाली. अमिताभने अभिनेत्री रेखापेक्षा अणिक चित्रपट जयाप्रदाच्या सोबत केले असले तरी आजही चर्चा अमिताभ आणि रेखाचीच होते.

अमिताभ म्हटल्यावर त्याचे संवाद आठवतात आणि त्याची गाणी आठवतात अमिताभ्‍ म्हणजे जय-विरु ची जोडी आठवते. त्याचा प्रत्येक चित्रपट आगळा ठरलेला आहे. शोले असो कि दिवार त्याला सलिम जावेदची संवाद साथ होती मात्र नंतरच्या काळात व ही जोडी नसली तरी केवळ स्वत:च्या बळावर अमिताभने चित्रपट हिट केलेले दिसतात.

मनमोहन देसाई, आणि प्रकाश मेहरा यांचा तो फेवरेटच राहिला. त्याच्या चित्रपटात सर्वोत्तम बघायला आणि ऐकायला मिळायचं 'ओ साथी रे' ची धून देणारे. कल्याणजी-आनंदजी यांचा उल्लेख केल्याशिवाय हा प्रवास अपुरा ठरेल नंतरच्या काळात बप्पी लाहिरी व आदेश श्रीवास्तवपर्यंतचा संगीतप्रवास झाला असला तरी कल्याणजी-आनंदजीच्या म्युझीकला चॅलेंजच नाही. याच काळात या संगीतकार जोडीने असंच अवीट संगीत फिरोजखानच्या ही चित्रपटांना दिलं हे इथं आवर्जून सांगावं लागेल.

मिडास राजाच्या कथेप्रमाणे सिनेसृष्टीचा हा मिडास राजा, ज्याला स्पर्श करेल त्याचं सोनं करीत गेला मात्र त्यालाही अडचणींचा सामना करावाच लागला गांधी घराण्याशी असलेले घरोटयाचे संबंध आणि राजीव गांधींशी असणारी मैत्री यातून त्याने राजकारणात येण्याचा प्रयत्न केला आणि रसिकांनी त्याला अव्हरेलं त्यावेळी त्याचा उतरणीचा काळ सुरु झाला नंतरच्या काळात 250 रुपयांत अभिनेता होणारी अमिताभ बच्चन कार्पोरेशन लिमिटेड अर्थात एबीसीएल चा घाट देखील त्याला धक्का देणाराच होता.

संपला-संपला अशी चर्चा असताना या महानायकाने नवी इनिंग सुरु केली ती आजवर दिमाखात सुरु आहे. छोटा पडदा अर्थात टिव्ही या छोटया पडद्यावर पदार्पण करणाऱ्या शाहरुख खानने रुपेरी पडद्यावर आल्यावर पुन्हा वळून छोटया पडद्याकडे पाहिले नव्हते अशा काळात अमिताभने 'कौन बनेगा करोडपती ' अर्थात केबीसीच्या माध्यमातून छोटया पडद्यावर पदार्पण केले आणि छोटा पडदा आपल्या अस्तित्वाने मोठा करुन दाखवला.

अमिताभ हे सिनेदृष्टीला मिळालेलं वरदान आहे कारण त्याने ज्या-ज्या क्षेत्रात यायचा निर्णय घेतल ते गाजवलं त्यात गायनाचाही समावेश आहे. आरंभीच्या काळात चित्रपटात गायकांनाच नायक म्हणून घेत मात्र नंतर पार्श्वगायन पध्दती सुरु झाली आणि नायकांना गायकाचा उसना आवाज मिळायला लागला. अमिताभने गाणं म्हणायला सुरुवात केली आणि इतिहास घडवला. ज्या आवाजाला ऑल इंन्डिया रेडिओने नाकारलं तो आवाज साऱ्यांचा आवडता आवाज बनला.

अमिताभला राजकीय अडथळयांमुळे वाटचाल करताना अडचण कायमच आली आहे. शतकाच्या या महानायकाला भारतरत्न मिळाल नसले तरी तो बऱ्या अर्थाने भारतरत्न आहे. सचिन तेंडूलकर च्या कर्तृत्वाला ज्याप्रमाणे तोड नाही त्याचप्रमाणे भारताचं नाव जगभरात नेण्यात अमिताभचा मोठा वाटा आहे.

अशा या महानायकाला त्याच्या नव्या वाटचालीकडे वाट बघतोय इतकच प्रत्येक चाहता म्हणेल.

प्रशांत अनंतराव दैठणकर

9823199466

Saturday 3 October 2015

"कट्टा"... आणखी काय हवं आयुष्यात ?

गावातला कारभार चालणारा गावचा "कट्टा" हा कधीकाळी लहानपणी बघितला होता. हाच कट्टा चित्रपटांमधून बघायला मिळतो. गावातल्या भल्या-बुऱ्यांची खबरबात, गावतल्यांचं दुखणी - खूपणी इथं चर्चिल्या जायची. या गप्पांचं, मजांचं रोजचं असणं गावाच्या कारभा-यांच्या दृष्टीकोणातून राजकारणाचा अड्डा होतं.

अशाच अड्डयांवर कधी-कधी केवळ कुटाळक्या होतांना दिसत मग त्याचा अर्थ आणि स्वरुप बदलायचं. चणे कितीही भिजवून खूप शिजवले तरी एखादा चणा निसर्गाचे नियम मानत नाही आणि तो दगडासारखा कडकच राहतो. चणे खातांना दातांनी मऊ-मुलायम रवंथ करणाऱ्याला अचानक असा चणा दाताखाली आदळून दणका देतो. या दणक्याने थेट डोक्यापर्यंत सणक भरते अशा दाण्याला कुच्चर असं म्हणायचे. गप्पांच्या कट्टयांवर असे समाजाचा परिणाम न होणारे काही महाभाग आणि त्यांचे त्याच पध्दतीने कुच्चर विचार या ओटयाला "कुच्चर ओटयात" बदलून टाकायचे असा एक भाग जालना शहरात आहे. पण त्याचं नावं याच रुढार्थाने पडल्याची साक्ष किंवा पुरावा नाही.

औरंगाबाद सारख्या शहरात शिक्षण घेतांना अधून-मधून ग्रामजीवनाचं दर्शन घडलं तरी ते जगायची संधी मिळाली नाही नंतर एसबी ला (माझं महाविद्यालय आणि त्याचा हाच खरा परिचय) सायन्सला ॲडमिशन घेतली आणि एक नवा कट्टा जीवनात आला. अजिंठा आणि वेरुळात कातळावर कोरुन शिल्प घडवावं तसं त्या काळातल्या प्रत्येकाच्या मनावर तो कट्टा कायमचा कोरला गेलाय. आज 25 वर्षे झाली कट्टा सुटला पण आठवणींमध्ये तो कट्टा रोज भरतो, मुलं-मुली जमतात आणि कट्टयावरल्या गप्पा आठवणींमध्ये रंगतात.

आज माझी मुलगी महाविद्यालयात शिकते परंतु इथला सारा रिवाज बदलता असल्याचं दिसतं महाविद्यालये आणि क्लासेसवाले यांच्या युतीतून शिक्षण क्षेत्रात गुणवत्तेची नाही तर फक्त गुणांची सत्ता रंगताना दिसते. मुलांना आवश्यक असल्याने महाविद्यालयात नाव नोंदवावं लागतं बाकी सारं क्लासेसमध्ये हे क्लासेस देखील आर्थिक कुवतीमुळे नवी वर्णव्यवस्था तयार करुन बसले आहेत. अमाप फी भरण्याची ताकद असेल तरच अमक्याची शिकवणी त्यामुळे आर्थिक स्तरावर आधारित मैत्रीचा अध्याय सुरु झाला आहे.

कोणाच्या घरची आर्थिक क्षमता काय याचं आम्हाला काही देणं-घेणं नसायचं असायची ती मैत्री, निखळ मैत्री, आणि एकमेकांच्या व्यक्तीमत्वाची अंतर्बाहय अशी ओळख तिथे कट्टयांवर पैसा हा विषय कधी आलाच नाही. चर्चा व्हायची ती कला-गुणांवर, अवगुणांवरही होत होती हे विशेष. यात एकमेकांची टर उडविणे हा जणू राष्ट्रीय कार्यक्रमच होता त्यावेळचा. ‘कट्टा बोले तो थट्टाʼ हे स्लोगन. याचं कुणाला वाईट वाटलं म्हणून मैत्रीत अंतर आलं असा प्रकार कधीच घडला नाही सगळं कसं निरागस, निर्व्याज आणि निरागस होतं.

त्या कट्टयावर आम्हाला बघून त्यावेळची तथाकथित गुणवंत मंडळी अभ्यास आम्ही बीझी असतांना तुम्हाला कसं बुवा इथं टुकारक्या करायला वेळ मिळतो असा कट्टा टाकून आमच्यात पसरलेला ‘टाईमपासʼ रोगाचा संसर्ग होवू नये याची काळजी घेत लांबूनच जाणं पसंद करीत असत. त्यांच्या दृष्टीने बिघडलेला ( तंत्र की मन:स्वास्थ ?) लोकांचं ठिकाण म्हणजे हा कट्टा होता.

काळाच्या ओघात जाणवतं की त्यांचं ते विचार करणं काय साध्य करुन गेलं ? ते आम्हाला बिघडलेले म्हणत असले तरी आनंद मिळवायला शिकवलं आणि ओळख देखील दिली. त्यांनी काय घडवलं असं म्हणून वाद करणं म्हणजे वेडेपणा असतो हे देखील त्याच कट्टयाने शिकवलं.

गाडी है, गलेलठ्ठ पगार, बँक-बॅलन्स, बिल्डींगे और कारोबर सबकुछ है मेरेपास...तुम्हारे पास क्या है या दिवारचा सीन आठवतो... माझ्या कट्टयावरचा प्रत्येक जण सांगेल हमारेपास शांती है, सुकून है...अजून काय पाहिजे असतं माणसाला ?

वयाची चाळीशी संपन्नता-समृध्दी आणते हे ठिक पण शुगर, बी. पी आणि दुखणी आणणार असतील तर अशा जगण्यापेक्षा आमचं कट्टयावरलं बिघडणं चांगलं होतं. पाण्याला पाणी, आणि मातीला माती मानून पाय जमिनीवर राहिले, निसर्गाचं प्रेम मिळालं आज खळखळून हसायची लाज वाटत नाही आणि ताण घालवण्यासाठी कपिल शर्माचा कॉमेडीचा शो बघण्याची वेळ आपल्यावर येत नाही. आणखी काय पाहिजे माणसाला आयुष्यात ?

बी. पी नही, शुगर नही, सुबह श्याम टेन्शन नाही या नसण्याचं कौतूक अधिक आहे असण्याच्या दु:खापेक्षा आयुष्याचं चित्र काढताना आहे त्यावर रेघोटया मारायच्या की मनाजोगतं चित्र रंगवता येईल इतका कॅनव्हासचा आकार वाढवत न्यायचा...चित्र कोणतं आणि किती चांगलं काढलं याचं समाधान महत्वाचं...वेळेत जमेल तसं पूर्ण करुन इथं मार्क मिळवायचेत कुणाला आयुष्याला हा विचार त्या कट्टयानं दिला आणखी काय पाहिजे माणसाला आयुष्यात ?

आजच्या पिढीकडे कट्टा नाही असं नाही. त्यांनी तो व्हॉटस्ॲप सारख्या नव्या तंत्राने बनवलाय परंतु तो शेवटी आभासीच आहे. तिथं फक्त फिल येतो अनुभव नाही. कट्टयांवरुन TTMM करुन घेतलेला
एक कटींग चहा आणि कांदयांच्या गरमागरम भज्यांसोबत पावसाळी वातावरणात रंगलेली पावसाळी कवितांची मैफल आजही अंगावर रोमांच उभा करते...आभासी जगातही TTMM आहेच ना...तू तूझ्या खोलीत मी माझ्या खोलीत तिथं पाठीवर धप्पा मारता येत नाही की खळखळून हसणं आणि इतरांना हसतांना बघणं जमत नाही...तिथं फक्त इमोजीचे गुद्दे आणि काविळी रंगाच्या त्या स्माईली त्यातून अनुभव सुध्दा आभासीच.

ऑनलाईन जमाना आणि सारं काही ऑनलाईन झाल्यावर तिथं पर्सनल टच राहत नाही...एखाद्याच्या मर्जीशिवाय त्याच्या पर्सनल स्पेसवर अतिक्रमण करुन आपण तिथं स्पेस बनवणं ही खरी मैत्री...आभासी जगात "स्पेस" च्या गप्पा ते देखील एकमेकांशी "स्पेस" सांभाळत...

पैशाने सारं काही मिळालं असतं तर इतरांना जगायला साधनच राहिलं नसतं. जेब खाली हूवा तो क्या दिल से तो अमीर है म्हणत समोरच्याला झटकून ‘चल हवा आने देʼआता सिनेमातच बघावं लागणार बहुतेक. कधी हवा असताना बहुतप्रसंगी जबरदस्तीने लादलेला सहवास सहन करणं म्हणजे मैत्री. नको असताना स्वीकारण्याचाही उत्सव व्हायला लागतो ते ठिकाण म्हणजे ‘कट्टाʼ असा कट्टा आयुष्याला लाभला आणखी काम हवं माणसाला आयुष्यात?

खूप कडक उन्हानं अंगाची काहिली होतेय आणि घामाच्या धारा वाहत आहे अशात वाऱ्याची येणारी एखादी झुळूक सुखावून जाते आणि यानंतर ‘अच्छे दिनʼ येणार हे आश्वासित करते तसा हा ‘कट्टाʼ मनात उलथापालथ झाल्यावर जरा कुठं एकाकी वाटायला लागल्यावर पुन्हा संजिवनी द्यायला येतो.

काळाच्या ओघात जुन्याचं नवं रुप दिसतं तसा हा कट्टा नव्या पिढीनं आभासी जगात जमवलेला आहे तसाच तो आमच्याही आयुष्यात येता झाला कधी काळी लाजरे-बुजरे असणारे मित्र मैत्रिणी...चेहरा नाहीच आठवत अशी फक्त नावाची ओळख असणारी व्यक्तीमत्वं आज प्रगल्भपणे आयुष्याच्या अनुभवानं संपन्न होवून भिडभाड न बाळगता खुलेपणानं पुन्हा आपली मतं मांडायला लागतात, मनातली गुपितं सांगायला लागतात आणि मनापासून प्रेमाची साक्ष देत मनापासून भांडायला लागतात.पुन्हा कट्टा ताजा होतो. ‘अनसिकेबल टायटॅनिकʼ शिप सारखं काळाच्या सागरात हरवलेलं फ्रेंडशिप पुन्हा पाण्यावर येतं. एक लंकेर छेडत मन गायला लागतं.

My heart will go on n on….!
 
Prashant anantrao daithankar
9823199466
let me know you reactions on my blog please.