Friday 11 December 2015

संघर्षयात्री

वक्तृत्व अणि संघटन यांच्या जोडीला मनमिळाऊपणा आणि रुबाबदार व्यक्तीमत्व असे सारे शब्द ही अल्पशी ओळख आहे एका संघर्षयात्रीची. संघर्ष आणि संघटनातून शालेय राजकारणापासून राज्याचे उपमुख्यमंत्रीपद आणि नंतर केंद्रीय मंत्रीपद असा आलेख असणारं मराठवाड्यातील व्यक्तीमत्व अर्थात दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे.

गोपीनाथराव आज हयात नाहीत हे मराठी माणसाचं दुर्दैव म्हणावं लागेल. काळाच्या ओघात हवी हवी वाटणारी माणसं नेमकी निघून जातात हा अनुभव त्यांच्या जाण्याने आला. राजकारणात असतांना पक्क्या मित्राला देखील कडवा विरोध करुनही मैत्री जपणारा हा खरा मैत्र अशीही त्यांची ओळख.

बुलंद मुलख मैदानी तोफ असं हे नेतृत्व सर्वमान्य असं नेतृत्व होतं. महत्वाकांक्षा सारेच बाळगतात मात्र ती पूर्ण करण्यासाठी ज्या अग्नीपथावरुन चालावं लागतं आणि जो संघर्ष करावा लागतो त्यासाठी कुणाचीच तयारी नसते. मात्र या नेत्याचा आयुष्याचा प्रवास वेगळा आणि सर्वांनी आदर्श घ्यावा असाच राहिलेला आहे.

मराठवाडा ही संतांची भूमी म्हणून ओळखला जातो. दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख म्हणायचे मराठवाडा ही संथांची भूमी आहे. त्या संथ झालेल्या समाजप्रवाहाला जागृत करुन प्रगतीच्या दिशेला नेण्याचं काम गोपीनाथरावांनी केलं. आपल्या उपमुख्यमंत्रीपदाच्या काळात धाडसी निर्णय काय असतात ते कसे घ्यावे हे दाखवून दिलं. विलासराव आणि गोपीनाथराव राजकीय पटलावर दोन वेगवेगळ्या पक्षाचे नेते होते. मात्र त्यांच्या मैत्रीमध्ये हे राजकारण कधीच आलेले आपणास दिसणार नाही. दिवंगत केद्रीय मंत्री प्रमोद महाजन हे नात्यातीलच झाले मात्र त्याआधी त्यांची असणारी मैत्री अखेरच्या क्षणापर्यंत जपण्याचं काम गोपीनाथरावांनी केलं. या तीन राजकारणी व्यक्तीमत्वांनी मराठवाड्याला मराठवाडा ही नेत्यांची भूमी आहे असं सिध्द करण्याचं काम केलं.
वक्तृत्व हा गोपीनांथरावांचा खास गुण होता. नेते अनेक होतात अनेकांनी अनेक पध्दतीने राजकारणात यश प्राप्त केलं पण त्यातील सारेच जण वक्ते नव्हते. सभेला गर्दी होणं ही खरी लोकनेत्याची ओळख होती. या बाबतीत कुणाचंच दुमत असणार नाही की गोपीनाथराव खरे लोकनेते होते.

सत्तेत असताना त्यांना जितका आदर मिळाला तितकाच आदर विरोधी पक्षात बसतांनाही सर्वांनी दिला. अभ्यासपूर्ण भाषनांनी विधासभेत आवाज बुलंद करतांना देखील अधून-मधून मार्मीक भाषा वापरण्याची त्याची शैली सगळयांनाच भावणारी होती.

सत्तेचा सोपान चढल्यानंतरही जमिनीवरच पाय ठेवणे आणि माणुसकी जपणे ही गोपीनाथरावांची खास ओळख. राजकारणी व्यक्तीमत्वामागे एक हळवं मन जपलेला असा हा आगळा संघर्षयात्री ... अशा या लोकनेत्याला विनम्र अभिवादन.

प्रशांत अनंतराव दैठणकर
9823199466

साहेब ... !

काही व्यक्तीमत्वे आयुष्याहून अधिक उंच होत असतात आणि अशी उंची गाठणारी माणसं असणारा प्रांत म्हणून आपल्या महाराष्ट्राचे नाव घेता येईल. एक कुशल राजकारणी संवेदना असणारा नेता, उत्तम प्रशासक, उत्कृष्ट वक्ता आणि संघटक .. शब्द कमी पडतील इतक्या गुणांसह वाढणारं हे व्यक्तीमत्व राजकारणासोबत कला, क्रीडा आणि संस्कृती यातही आपली छाप टाकतं असं एक आणि एकमेवाव्दितीय व्यक्तीमत्व अर्थात साहेब..!

पश्चिम महाराष्ट्रात साहेब म्हटलं की बाकी काही ओळख देण्याची गरज नसते ती ओळख हळूहळू संपूर्ण राज्याने आणि आता देशानेच नव्हे तर जगाने मान्य केलीय. होय साहेब 75 वर्षाचे होत आहेत. आरंभी अमृतमहोत्सवाच्या शुभेच्छा द्यायलाच पाहिजे. "शरदचंद्र पवार" हे त्या उत्तुंग अशा व्यक्तीमत्वाच नाव.

शरद पवार यांच्या व्यक्तीमत्वाला अष्टपैलू नाहीतर सहस्त्रपैलू आहेत असं म्हणावं लागेल. राजकारण सारेच करतात परंतु राजकारणातील गट-तट बाजुला ठेऊन या नेत्याच्या अमृतमहोत्सवाला राष्ट्राच्या प्रथम नागरिकापासून साऱ्या पक्षांचे सारे बडे दिग्गज उपस्थित राहतात. हा आदर उगाच प्राप्त होत नाही त्यामुळे साहेब म्हणतांना आनंद वाटतो आणि मराठी मातीतला माणूस हिमालयाची उंची गाठतो. या अभिमानाने प्रत्येक मराठी माणसाची छाती रुंदावते.

मराठी माणसाने या आधीही खूप उंची गाठली त्यात शरद पवारांच स्थान माझ्या मते खूप वेगळं आहे. ते वेगळेपण आपण जाणूनच घेतल पाहिजे. काँग्रेसची सत्तासुत्रे हायकमांड चालवते हे काही नवं नाही. ज्या काळात अर्जूनसिंग आणि इतर नेत्यांच्या रांगेत राज्याचा क्रमांक खूप खाली यायचा आणि नवं नेतृत्व मान्य करणाऱ्या काँग्रेसने सोनिया गांधींना नेता म्हणून स्वीकारलं त्यावेळी त्या रांगेत न उभ राहता स्वतंत्र पक्षाची निर्मिती करुन या नेतृत्वाच्या बरोबरीने बसण्याची ताकत कमावली. इतकंच नव्हे तर नंतरच्या काळात सत्ता चालवतांना त्या नेतृत्वापेक्षा मोठं होवून आपण राजाकारणातील "चाणक्य" आहेत हे साहेबांनी दाखवून दिलं.

अठरा पगड जाती, धर्म, प्रांत, भाषा आणि तितकेच राजकीय पक्ष अशा स्थितीत बहुपक्षीय सरकार चालविण्यासाठी सर्वमान्य नेतृत्व लागतं अशी मोट बांधण्याची ताकद गेल्या काळात दोनच महाराष्ट्रीयन माणसांकडे आहे हे देशानं बघितलं. यात भाजपासाठी चाणक्य असणारे दिवंगत प्रमोद महाजन आणि दुसरे अर्थातच शरद पवार.

सर्वात कमी वयात मुख्यमंत्रीपद प्राप्त करतांना देखील काँग्रेसच्या विरोधात जावून स्वत: पक्ष बांधण्याची आणि तो यशस्वी करण्याची किमया करणारा किमयागार ही साहेबांची ओळख.

1993 च्या लातूर भूकंपात तातडीने धावणारा त्यांच्यातील माणूस अतिशय जवळून बघितला. संवेदनशिलता हे खरं यशाचं गमक हे त्याच क्षणी जाणवलं. अजातशत्रू अशा साहेबांनी ज्या क्षेत्रात पाऊल टाकलं त्याचं सोनं केलं अगदी क्रिकेटचं देखील. आयुष्यात याच अजातशत्रुपणामुळे त्यांना कधी पराभवाचं तोंड पहावं लागलं नाही. बीसीसीआय च्या अध्यक्ष पदापासुन आयसीसी च्या अध्यक्षपदापर्यंत पोहोचतांना त्यांनी बीसीसीआय ला जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट नियामक मंडळ बनवून दाखवलं.

सत्तेत असतांना देशाच कृषीमंत्री पद आणि नसतांनाही आपत्ती व्यवस्थापन व देशाचं नेतृत्व साहेबांनी केलं. इतकी उंची गाठल्यावरही दौऱ्यावर फिरतांना कार्यकर्त्यांस नावानिशी ओळखणारा आणि आत्मीयतेने संवाद साधणारा नेता साऱ्यांनाच भावतो हेच साहेबांच्या यशाचं गमक आहे. अशा या मोठया मनाच्या साहेबांना मनापासुन अमृत महोत्सवी सदिच्छा .. !
प्रशांत अनंतराव दैठणकर
9823199466

Monday 7 December 2015

कॉफी पेस्ट आणि फॉरवर्ड ....!

आपण आपल्याशी संवाद कधी केला अखेरचा? हा प्रश्न खुप महत्वाचा आहे. धावपळ आणि नाही त्या गोष्टी मागे पळणे आधीच सुरु आहे. अशा स्थितीत आज इन्टरनेटच्या जाळयात सारेच अडकले आहेत. आपलं स्वत:चं काय बघण्यापेक्षा संगणक आणि मोबाईलच्या त्या खिडकीतुन जगाच काय चाललय हे बघण्याची उत्सुकता अधिक आहे. काही जणांच आयुष्यच या जाळयात फसलेलं दिसतयं.

सकाळ व्हावी ती निसर्गाच्या साथीनं. पुर्वेला निसर्गाची ती रोजची रंगपंचमी बघत सूर्याच्या साक्षीनं. तो रोजच येतो पण त्याच्या येण्याच्या छटा रोज वेगळ्या असतात. तो पहाट वारा आणि त्याला साथ देणाऱ्या पक्षांचा किलबीलाट हे सारं काही भुरळ पाडणारं असच आहे. मात्र इथं पहाट होते ती गुड मॉर्निंग च्या संदेशाने अणि दिवसाचा शेवटही गुडनाईट स्वीट ड्रीम म्हणत. थकवा इतका येतो की हल्ली स्वप्न देखील पडत नाहीत.

आपण इतर प्राण्यांप्रमाणे असलो तरी काळाच्या प्रवाहात आपण आपल वेगळं स्थान निर्माण केलय. हे शक्य झालं ते आपल्या सामाजिक जाणीवा विकसित झाल्यामुळे. आता या जाणिवा आपण अधिक प्रमाणात दाखवतो. पण त्यात कोरडेपणा वाढला याला कारण अर्थातच आजकालचं हे सोशल नेटवर्कीगचं असणार फॅड होय.

आपण आपल्या जाणिवा आणि भावना व्यक्त कराव्यात यासाठी धडपड करीत असतो. सोशल नेटवर्कींग माध्यमांनी हीच बाब नेमकेपनान हेरली आणि त्यांनी अभिव्यक्तीसाठी नवं व्यासपीठ उपलब्ध करुण दिलं. आता आपण आपल्या सोईनुसार हा अर्थ सहज लावत असतो मात्र या नाण्याला व्यावसायिकरणानी दुसरी बाजू देखील आहे याचा आपल्या मनात विचार देखील येत नाही.


या व्यवसायिकरणाचा उलगडा 13 वर्षेपुर्वीच आपणास झाला शताब्दीचा महानायक अमिताभ बच्चन यांच्या "कौन बनेगा करोडपती" या रियलीटी शो मध्ये आपण एस एम एस केला की आपल्याला किमान लाख रुपये तरी मिळतील या अशेपायी कोटयवधी जणांनी एस एम एस केले. साधारण एसएमएस आणि हे एसएमएस यांच्या दरात तफावत होती. त्या एका कार्यक्रमात कोटयवधी रुपये कमावून केवळ दिवसाला एक लाखाच प्रसंगी तीन लाखाच बक्षिस दिलं गेलं हे या माध्यमानी लोकांच्या भावनांशी खेळून पैसे कमावणं होत.

रुपयाचं मुल्य घसरलय म्हणत काय होतय दहा रुपयात असं तुम्ही - आम्ही म्हणायचं आणि शक्कल लढवण्याची अक्कल असणाऱ्यांनी करोडपती व्हायचं असाच हा खेळ. यातूनच आता हातात आलेल्या स्मार्टफोननं क्रांती घडवली. भावना खरेपणानं किती जण व्यक्त करतात? यातील नव्वद टक्के हे "कॉपी पेस्ट आणि फॅारवर्ड" अशा गटातील आहे.हे फॉरवर्ड म्हणजे पुरोगामी नाहीत. त्यातूनच नाही नाही ते विषय चर्चेला येतात आणि मेसेजची राळ उठते. सलग दोन वर्षे तोटयांत राहणारी बीएसएनएल सारखी शासकीय कंपनी यामुळे यंदा चक्क नफ्यात आली आहे. जय हो नेटवर्कींग असच म्हणावं लागेल.

गेल्या काही दिवसात झालेले वाद बघतांना वाटतं की भारतात असणाऱ्या सर्व समस्या संपल्या सारं काही "ऑल इज वेल" आहे. म्हणून आपण समाजाच्या प्रश्नावर चर्चेची गुऱ्हाळं लावत आहोत. आजचा चर्चेचा विषय राष्ट्राचा विकास, संपन्नता आणि सधनता नसून आमीर खान ची बायको काय म्हणाली आणि इम्रान खानची बायको विमानाच्या कॉकपीटमध्ये कशी बसली असे आहे. राष्ट्रभक्तीवर मला आक्षेप नाही तो कुणालही असनार नाही. पण चेन्नईत भुतो न भविष्य ती राष्ट्रीय आपत्ती असता आपण आपला वेळ कुठे व कसा घालवतो यावर आहे.

सध्या चर्चेचा विषय अर्थातच असहिष्णूता आणि सहिष्णू भारत . नाक्यावर ठेला लाऊन फळ विकणारा संध्याकाळी घरात खायला मिळेल का या चिंतेत आहे. पाण्याअभावी महाराष्ट्रात अनेक भागात शेतकरी संकटात आहे. चेन्नई पुराने त्रस्त आहे. यात अडकलेल्या कुणालाही विचारा त्यांना या आपत्तीत सावरणं महत्वाच आहे. दिलेले पुरस्कार परत करणाऱ्यांनी सोशल नेटवर्कींगच्या माध्यमातुन चर्चा घडवून आणली ती नेमक्या कोणत्या हेतुने याचा आपण वेध घेतच नाही "फक्त कॉपी पेस्ट आणि फॉरवर्ड" चा उद्योग सुरु राहतो.

माहिती तंत्रज्ञानाच्या युगात‍ सैनिक कमी लढतील सारी युध्दे याच तंत्रज्ञानाने लढली जाणार आहेत याच भान आपल्याला आल पाहिजे. "पीके" वरुन गाणि डाऊनलोड करुन ऐकणाऱ्या आपल्या मुलांना त्या वेबसाईडवरचा धोका कधी समजाऊन सांगितला का, मुळात तो आम्हालाच माहित नाही. शत्रु राष्ट्रे आपणास गाफील करुन आपली महत्वाची माहिती नेत आहेत हे वास्तव आहे. याला कारण आम्हीच. आम्ही इतके बिझी आहोत कार चालवण्यात की आम्हाल थांबून पेट्रोल भरायलाही वेळ नाही.

कुठेतरी थांबून आपण यावर विचार केला पाहिजे आल भान जागवलं पाहिजे यासाठी हा लेखनप्रपंच

प्रशांत अनंतराव दैठणकर
9823199466