Tuesday 19 January 2016

तू आणि पाऊस माझ्यासवे...!

पाऊस उगाच पडतो... निवांत शांत जानेवारीतली पहाटेची निरव वेळ आणि जरास दाटून आलं भावनांप्रमाणेच... याला काय पर्याय ही तर आपली भावनांची दिंडी. असं म्हणून गुड मॉर्निग करायला आरशाकडे वळलो. एकल अन् एकटेपणा अपरिहार्य असल्याने आताशा पहाटे स्वत:लाच बघायची सवयच झाली... दर्पणात माझ्या नजरेला नजर भिडली आणि त्यातून साद प्रतिसादाचा खेळ सुरु झाला.

एकाकी होण्यापेक्षा एकटं राहणं चांगल असं म्हणायचं सुरु झालेला आत्मसंवाद केव्हा पुन्हा त्या मंतरलेल्या दिवसांकडे घेऊन गेला तेच कळलं नाही. एखाद्या चित्रपटातला प्रसंग समोर दिसावा तसा तो यौवनपट स्पष्टपणे नजरेसमोर फिरायला लागला. काळाच्या ओघात आज या वळणावरुन मागे वळून बघतांना मग प्रश्नांची वर्तूळं पायाशी गुंता करताहेत असं जाणवतं.

आज शब्द संपावर गेलेत की विस्मरणात असा सवाल पडतो त्याकाळी चहाच्या एका कपासाठी पैसे गोळा करुन तुझ्या भेटीची वाट बघणं... रस्त्यात वावरणाऱ्या तुला नि मला एकत्र पाहून साऱ्यांच्याच नजरा वळत होत्या त्या नजरबंदीतून चालत त्या छान अशा हॉटेलचा तो कोपरा गाठणं. कागदी फुलांच्या अर्थात बोगनवेलीच्या तटबंदीत पायाखालची वाळू खेळवत त्या एका चहावर तास न् तास गप्पा मारणं... काय असायचे त्या संवादाचे विषय असा आज मनातला आणखी एक सवाल.

सारं जग बघत असलं तरी आपण कसं चोरुन भेटतोय याचं असणारं "थ्रिल" आजही रोमांच उभे राहतात मग आज काय झालं... संवाद कुठे विरला, हरवला की विसरला..... प्रेमात सर्व क्षम्य असतांना घडणारा संवाद आणि आज हा शब्दांचा दुष्काळ.

लग्न म्हणजे सप्तपदी पण असं काय वेगळं घडतं डोक्यावर अक्षता पडल्यावर की साऱ्या भूमिकाच बदलतात मग उगाच वाटतं तू माझी पत्नी व्हायला नको होतं... तू अशी अबोल होशील असं माहिती असतं तर लग्नाचा विचारच सोडला असता....लग्न हा विधी, आनंद सोहळा की लग्न म्हणजे बंधन अशी प्रश्नांची रेल्वे धावत राहते.

एक सच्चा मैत्र अस असणारं मैत्रीच नातं वेगळ्या नात्यांची गुंफण होताच कसं काय संपू शकतं. टिपिकल शब्द देखील चपखलपणे लागू पडावा असा बदल प्रत्येकीत का होतो ? मग विचार गती घेतात "जागून ज्याची वाट पाहिली ते सुख .." असं म्हणतांना कमावण्याचं स्वप्न आणि त्यासाठीची धडपड समोर येते, कमावलेलं राखायचं देखील असतं ते राखतांना साऱ्या मनोभुमिका एका रात्रीतून कशा काय बदलू शकतात.

त्या दोघांच ते जगणं पुन्हा डोळ्यावर तरळतं मग चार्ली आठवतो.. धंद होवून पावसात भिजणारे अनेक आहेत. ती धुंदी तो कैफ निराळा असतो..... इथं त्याला तर स्वत:चे अश्रु लपवण्यासाठी पावसात जावं असं वाटतं.

भावना अनावर झाल्यावर इथं अस तिथं काय असाही सवाल येतो. अनाहुतपणे त्याची आठवण तीव्र होत जाते. चार्लीचं सोडा हे तर तुझं आयुष्य आहे. दर्पणातून माझ्याशीच मी बोलत असतो... मन एव्हाना शांत झालेलं म्हणून खिडकीबाहेर दोन्ही हात पसरल्यावर जाणवतं त्याच दान खूप मोठ आहे.... कारण हातावर याही दिवसात आठवणीला प्रतिसाद देत पावसाचे थेंब नाचत असतात. पावसाच्या त्या थेंबानी मधला काळ धूवून टाकलाय जणू असं म्हणत मन पुन्हा बाईकवर रस्त्यावरुन पाऊस अंगावर झेलत वेगानं पुढे जातेय असं जाणवतं .. अण त्याचवेळी अरे हळू..... असं म्हणत तू भिजल्या अंगानं पाठीला बिलगलीय असं जाणवतं...!

प्रशांत अनंतराव दैठणकर
9823199466

Saturday 16 January 2016

दो बूंद जिंदगी के...!


देशात असणारी जनजागृती वाढत गेल्याने भारतातून आपणास पोलिओ हद्दपार करण्यात यश आले आहे. या आपल्या भव्य अशा आसेतुहिमाचल पसरलेल्या देशाचा भौगोलिक विचार आणि मोठी लोकसंख्या असताना हे काम अतिशय अवघड आणि अशक्यप्राय काम करण्यात आले आहे. आपली आरोग्य यंत्रणा तसेच शिक्षण यंत्रणा यांचा यात मोलाचा वाटा आहे. तितकाच मोलाचा वाटा माध्यमांनी यात उचललेला आहे. हे आपणास जाणून घ्यावे लागेल.

आपल्या देशात जितके प्रांत तितक्या भाषा असं आहे. त्यातही प्रत्येक राज्यात 10 कोसावर भाषा आणि भाषेचा लहेजा बदलत असतो. संपूर्ण देशाची एक भाषा नसणे, यामुळे पोलिओ हद्दपार करण्याचे काम अतिशय मोठे आव्हान होते.

प्रसिद्धी मोहिम अनेक पद्धतीने राबविण्यात येतात. त्यामध्ये पोलिओसाठी राबविण्यात आलेले प्रसिद्धी अभियान हे सर्वांना मार्गदर्शक असे ठरले आहे. ब्रॅन्ड तयार केला जातो त्या पद्धतीने या मोहिमेसाठी प्रथमच ब्रॅन्डसेटींग झाले. कोणत्याही अभियानाला काही टॅगलाईन आवश्यक असते ती सर्वोत्तम आणि अगदी साध्या सोप्या भाषेत असणारी टॅगलाईन या मोहिमेला देण्यात आली ."दो बूंद जिंदगी के" अशी सर्वांना लक्षात राहील, अशी टॅगलाईन सर्वांच्याच लक्षात राहणारी होती.

ब्रॅन्डसेटींगमधील अन्य संकल्पना या मोहिमेत "पोलिओ रविवार" च्या रुपाने वापरण्यात आली. रविवार हा तसा सर्वांचा सुटीचा दिवस पण "पोलिओ रविवार" च्या माध्यमातून लोकांचे लक्ष वेधून लोकांना मुलांच्या आरोग्य आणि चांगल्या भविष्यासाठी घराबाहेर पडण्याची सवय यानिमित्ताने लावली गेली. आज व्हॉटसॲप आणि ट्वीटरच्या काळातल्या पिढीला संदेश वहन हे खूप सोपे प्रकरण वाटते. 10 सेकंदात हजारो लोकांपर्यंत संदेश पोहोचविण्याची क्षमता आज तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे प्रत्येकाच्या हातात आली. 1998 साली या पोलिओ मोहिमेला आरंभ झाला. त्यावेळी मोबाईलचे नव्याने आगमन झाले होते. फोन करुन बोलायला जसे पैसे लागतात तसे इनकमिंगसाठीही मिनिटाला 16 रुपये लागत. असा तो काळ त्यामुळे ही प्रसिद्धी मोहीम जुन्याच प्रसिद्धी तंत्राचा वापर करुन सुरु झाली होती.

या मोहिमेसाठी अमिताभ बच्चन, सचिन तेंडूलकर, ए.आर. रहेमान तसेच जॅकी श्रॉफ यांनी ब्रँन्ड अम्बॅसिडर म्हणून काम केलं. मात्र प्रसिद्धीचे सर्वाधिक वलय असणारा महानायक अमिताभ बच्चन हा शतकातील महानायक या पोलिओ प्रसिद्धी मोहिमेचा खरा चेहरा बनला. लोकांच्या मनात वेगवेगळ्या वयात गेल्या 45 वर्षात या महानायकाने अनेक पिढ्यांसमोर कामे केली आणि त्यांच्या आठवणीचा भाग बनला. त्यामुळे सर्वाधिक लोकप्रियतेचा फायदा या महानायकाने या प्रसिद्धी मोहिमेस करुन दिली.

17 जानेवारी 2016 पुन्हा एकदा पोलिओ रविवार आला आहे. आपल्यातील प्रत्येकाने घराघरातील 0 ते 5 वयोगटातील बालकांना पोलिओ डोस मिळेल याची खात्री करुन घेतली पाहिजे. पोलिओमुक्त भारताचे स्वप्न प्रत्यक्षात आले. आता जिंकलयं ते राखण्यासाठी अधिक काटेकोरपणे प्रयत्न करायचे आहेत. केवळ हाच उद्देश नसून येणाऱ्या भारतात एकही पोलिओचा रुग्ण राहणार नाही व आरोग्य संपन्न अशी नवी पिढी हे आपले ध्येय असले पाहिजे. देता ना मुलांना दो बूंद जिंदगी के...

-प्रशांत अनंतराव दैठणकर,