Thursday 31 March 2016

गेल्यावरच कळते......ती आई होती.

आई गेली माझी ...

तीन शब्दाचा तो मेसेज मला माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर दिसला आणि तो पूर्णपणे मेंदूत पोहोचायच्या आधी डोळयात टचकन पाणी आलं.


ती कोण, कशी ती कधीही पाहीली नाही.चेहरा नजरेसमोर येण्याचा प्रश्नच नव्हता कारण कधी तो चेहरा कधी बघितलेला नव्हता, पण 'आई' ओळखीची होती कारण ती आई होती ना....।

कवी ग्रेसचे शब्द.....
.-हदयनाथाच्या स्वरातलं कारूण्य कानात झिरपायला लागलं आणि तिची ओळख पुन्हा स्मृती पटलावर आली.

ती आई होती म्हणूनी घनव्याकुळ मी ही रडलो..। 

घन व्याकुळता मनातून कघी डोळयात पाझरली ते माझं मलाच कळलं नाही.
ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता...।

 खरं आहे पाऊस नजरेतून अखंडपणे वाहणारा, इतका की डोळयासमोरचं दिसेना...पण सावरावं, स्वत:ला आवरावं तिचं ते जाणं अकाली होतं पण निसर्ग नियम सांगतो आलेल्या प्रत्येकाला जायचं हे नक्की आहे कुणीही इथं चिरंजीवी नाही... अगदी आपण देखील मग तिच्या जाण्याची ती वेदना... खरच संवेदना इतक्या ऊफाळतात की शब्द खुजे पडतात तिच्या आठवणीत.

प्रेम प्रत्येकाच्या नशिबात असतं का? याला नकारार्थी उत्तर देणारे अनेकजण भेटतील पण त्यांना सांगावं वाटतं की
तुझी या जगात येण्याची चाहूल लागली त्या क्षणापासून तुझ्यावर कुणी प्रेम केलं असेल व ती आईच रे....।

आई तिची,तुझी, माझी...काही वेगळी नसतं...... ते एक आगळं अंतरंग असतं........ नऊ महिने आपल्या रक्तामांसावर वागवणारं आणि आयुष्यभर आपल्या प्रत्येक कृतीला आणि वृत्तीला जपणारं, प्रसंगी तीळ तीळ तुटणारं.

तिच्यातून तू बाहेर आल्यावर जग बघितलं पण जग कसं आहे हे तुला कळेपर्यंत मायेची ऊब देणारं आईपण खूपच वेगळं असतं. तिच्या त्या सांभाळ करण्याच्या कृतीला तोडच नसते.

साध्या टिव्हीच्या आवाजाने झोपमोड होणारी तिची वृत्ती आपल्या पोटच्या गोळयासाठी मनापासून दूर सारते. त्या खोडया तुझ्या-माझ्या त्याचं कोण कौतूक रे तिला...... खूप खोडया केल्या म्हणून वरकरणी रागावणारी ती आतून मात्र आनंदून गेलेली असते.

तिने भले चार ठिगळाच्या लुगडयात आयुष्य काढले असेल मात्र आपल्या लेकरांना अंगभर कपडा महत्वाचा आहे तो आधी आणला पाहिजे..दोन घास कमी जेऊ आपण पण लेकरू उपाशी झोपलं नाही पाहिजे असा विचार जपणारी ती आई असते.

तुझी असो अथवा माझी आई
ती असते सा-यांची अंगाई.....

खरच ते एक अजब रसायन आहे..... आई समजायला आई व्हावं लागतं असं म्हणतात ते खरच आहे ना..... आई माझी असं म्हणत,  लेकरं समोर हट्ट करायला लागली तरी त्या लेकुरवाळीलादेखील आई हे माहेर असतं..आई हाच आधार असतो....आई..... व्यक्त करायला शब्द नाहीत. ज्यानं त्यानं आपल्या मनानं आई शब्दात व्यक्त करण्याचा प्रयत्न केला पण आई शब्दांच्या पलिकडला भावनिक प्रवास असतो.

आई शब्द लिहिता येईल पण
आई शब्दात सांगता येत नाही

चित्र तिचं रेखाटता येईल
पण ती चित्रापेक्षाही मोठी आहे.

असेपर्यंत जाणवलेली ती आई
ख-या अर्थानं कळते तिच्या जाण्यानं...

म्हणूनच
मोबाईलचा तो स्क्रीन ओला होई पर्यंत कळलंच नाही की आपण काय मेसेज वाचतोय....ती गेल्यावरच ती कळली.कारण ..... ती आई होती.

-प्रशांत अनंतराव दैठणकर
9823199466

Wednesday 16 March 2016

फेअरचं अफेअर....

यशोमती मैंयासे बोले नंदलाला

राधा क्यों गोरी...मै क्यों काला....

गाण्यात ऐकायला चांगलं वाटतं ना. पण हाच सवाल विचारुन कोटयवधींचा व्यवसाय उभा राहिला आणि अनेक कंपन्यांनी गोरेपणाचा वादा करून 'फेअर' जाहिराती करून लाखो भारतीयांचे खिसे रिकामे होत आहेत.

लग्न झाल्यावर बायको नव-याचा खिसा रिकामा करते असं म्हणतात काळी बायको असेल तर ती गोरं होण्यासाठी क्रीम खरेदी करून खिसा रिकामा करते तर गोरी बायको रंग काळा पडू नये म्हणून सनक्रीमवर खर्च करण्यासाठी नव-याचा खिसा रिकामा करते.

आपल्या शरिराला कोणता रंग असावा हे आपल्या हाती नसतं तो जन्मासोबत आपल्याला प्राप्त होतो या रंगावरून वर्णन करणं आणि त्याची वर्गवारी करणं यातून चांगलेच विनोद घडतात.

खूप गोरी असेल तर

सपीठाचा (मैदा) उंडा (गोळा) असं मराठवाडी मराठीत म्हटलं जातं.

दूसरं वाक्य अर्थात.... पांढरीपाल आहे ती ...असं असतं. इथं वर्गवारीकडे वळता येईल.

गोरा - निमगोरा - गहूवर्ण - सावळा - काळसर अशा शेवटचा एक रंग काळेपणापर्यंत पोहोचतात पण ते इथं थांबत नाहीत तर शेवटचा एक रंग असतो.'कलर गया तो पैसा वापिस'...

काळा रंगाच्या व्यक्तीचं आडनाव गोरे असणं आणि मुलीचं नाव जुई किंवा चमेली, चांदनी आणि अगदी शुभ्रा देखील असू शकतं.

रंगांच्या गमती-जमती मोबाईलच्या युगात असाच नवा विनोद हा मोबाईल माझ्यापर्यंत घेऊन आला. आमचा एक मित्र काळा
म्हणजे शेवटच्या पटटीत 'कलर गया तो....' कॅटेगरीतला त्याचा फोन लावला आणि मला धक्का बसला कारण टयून कानावर आली ती होती.

.....माझा रंग तुला घे तुझा रंग मला दे....
शॉक.....शॉक...शॉक...


मराठीवर त्याचं असणारं प्रेम कबूल मराठी गाण्याची आवड कबूल पण हे काही तरी खतरनाकच म्हणावं लागेल ...आपण कोणती टयून ठेवावी याचं गांभीर्य का असत नाही लोकांना. हा काळेपणा जसा गंमतीचा तस तो मार्केटींगचाही विषय आहे. हमखास गोरे व्हा असे म्हणून जाहिरात करणा-या कंपन्यांचे उखळ 'पांढरे' झाले मात्र कुणालाही गोरेपणा आला नाही. आधीच गो-या असणा-या मॉडेलचा रंग काळा करून तिचा रंग १५ दिवसात बदलल्याचा दावा करणा-या कंपन्या लाखो व्यक्तींना करोडोचा 'चुना' नियमित लावत आहेत हे वास्तव आहे.

मधूर भांडारकरने आपल्या 'ट्रॅफिक सिग्नल' या चित्रपटात ही बात नेमकेपणाने मांडली आहे. त्सुनामीत कुटुंबापासून दुरावलेला १२-१३ वर्षाचा मुलगा या ट्रॉफिक सिग्नल जवळ असतो. रोजच्या कमाईतून त्याचा एकच उद्योग चेन्नईला सरकारी कार्यालयात फोन लावून आई-वडिलांचा पत्ता लागला का हे विचारणे आणि आपला काळा रंग जावा आणि आपण गोरे व्हावे यासाठी क्रीम खरेदी करणे.... अखेर एका प्रसंगात तो त्या क्रिमच्या जाहिरातीच्या पोस्टरवर आपला राग काढतो.

Opposite attracts हा निसर्ग नियम आहे.
हा या रंगांच्या बाबतीत लागू पडतो. काळयांना जसं गोरं व्हायला आवडतं तसं गो-यांना तो गोरेपणा उन्हात 'टॅन' ( मराठीत ज्याला करपणे असा शब्द आहे ) करावा असं वाटतं गोवा हे सर्व विदेशी पर्यटकांचं आवडतं टॅनिंग सेंटर' हे इथं सांगावंच लागेल. इंग्रजांनी आपल्यावरा साधारण 'ये गोरे लोग' असेच म्हणत होतो.

गोरे आणि काळे याबाबत आपल्याकडे अनेक पध्दतीने सांगितले जाते. युरोपातून भारतात आलेले आर्यन्स (आर्य) हे गोरे होते आणि भारतातले मुळ निवासी दक्षिण भारतात असणारे द्रविड होते. त्यांचा रंग काळा होता. असा दाखला काहीजण देताना आपल्याला दिसतील.

पृथ्वीवर विषववृत्तापासून किती अंतरावर आपण राहता त्यावर तेथील तापमान ठरते आणि हे तापमान मुलत: आपल्या रंगासाठी अवलंबून असते. असा एक तर्क दिला जातो. पण त्यातही फारसा अर्थ नाही कारण मानव हे आफ्रिकेतून उत्क्रांत झाले असे मानले जाते. असे असेल तर सर्वांचा रंग ठरविणारे 'जींन्स' सारखेच असते आणि सर्वांचा रंग सारखाच असता.

काळेपणा काही जणांच्या बाबतीत अतिशय गंभीर समस्या बनते त्यामुळे समाजात आपल्याला टिकेला सामोरे जावे लागेल या भितीमुळे अनेकांमध्ये न्यूनगंड तयार होतो.

वर्ण आणि वर्णभेद याचा लढा अगदी २१ व्या शतकातही थोडयाफार प्रमाणात शिल्लक आहेच. न्युयॉर्क सारख्या शहरात देखील श्वेतवर्णी आणि कुष्णवर्णी असे ध्रुवीकरण निवासाच्या बाबतीत आपणास दिसून येईल.

ते काळं पण त्याला गोरी पोरगी पाहिजे अशी कमेंट आपण आजूबाजूला ऐकतो. खरच आहे प्रत्येकाला गोरीच का हवी असा सवाल विचारायला पाहिजे.

गोरी गोरी पान, फुलासारखी छान..

दादा मला एक वहिनी आण.. (आता एकच का )

आपणच या पध्दतीच्या गाण्यातून आपणच असे संस्कार केले म्हणून तर असं होत नाही.

धून मै निकला ना करो रूप की रानी
गोरा रंग काला ना पड जाये

हे बिग बी च्या सिनेमातलं गाणं असो की,

गोरे गोरे मुखडेपे काला काला चष्मा

हे गाणं. आपण आपल्या माध्यमांमधून गो-या रंगाचा प्रचार करतो. हे चुकीचे आहे असुही आपणास कबूल करावे लागेल.

काळयांनाही सारख्याच भावना आहेत ना. मी कॉलेजमध्ये असताना कॉलेज घराजवळ असल्याने आम्ही मित्र पायीच जात असू त्या रस्त्यावर एक डिपार्टमेंटल स्टोअर होते. साधारण आमच्याच वयाची मुलगी होती. खूप जास्त काळा रंग असल्याने ती हसली तरच रस्त्यावरून तिचे दात आणि फक्त दात दिसत अशी ती मुलगी त्या दुकानासमोरुन जाताना मी तिला दरवेळी झकास आणि दिलखुलास स्माईल द्यायचो. त्यावेळी सोबतचे मित्र 'पश्या काहीही चॉईस बरं तुझी' अशी कमेंट करायचे त्यावेळी माझं उत्तर असायचं की, तिलाही भावना आहेत कुणीतरी आपल्याकडे प्रेमानं बघतयं याचं समाधान काही क्षण का होईना तिला मिळत असेल ना...

माझा विचार वेगळा पण त्या गोरेपणाचं मनामनामधील हे वेड मन सुरू ठेवतं...बाय द वे नितळ कांतीचं गोरं पान प्रेम मला मिळालं माझ्यावर मनापासून असणारं तिचं ते प्रेम तिच्या समोर मी सावळा नाही तर काळाच म्हणावं लागेल. असलं नशिब असं पण प्रेमात पडलो अन् थेट प्रेमाचा रंग पाहिला. ती भाषा नजरेची होती त्यावेळी तिचा रंग दिसलाच नाही आणि नंतर इतरांनी सांगितल्यावर कळालं अरे हो तिचा रंग गोरा आहे.

मी सावळा आहे ही वास्तविकता आहे मात्र आजवर माझा रंग गोरा व्हावा यासाठी कधी एखादी क्रिम आणावी असं मला कधीच वाटलं नाही कारण मला इतकं कळतं की माझ्या सारखं या जगात दुसरं कुणी नाही.. काळा रंग आणि त्याचं हे पुराण काळासोबत असच सुरू राहणार हो आपण काय विचार करता यावर आपलं नियंत्रण असतं इतरांचं नाही...
पुन्हा गाणं आठवतं ते काका अर्थात राजेश खन्ना आणि मुमताज यांचं...

गोरे रंगपे ना इतना गुमान कर
गोरा रंग दो दिन में ढल जायेगा...

प्रशांत अनंतराव दैठणकर
९८२३१९९४६६




Monday 14 March 2016

ये पल भी जाएगा

जागुनी ज्याची वाट पाहिली ते सूख आले.... गाण्याची धून अचानक कानात रुंजी घालू लागली. कामाच्या व्यस्ततेत गडचिरोली जवळील पुलखल या गावात एका शेतात असताना फोन आला मोबाईलवर कन्या जान्हवी आनंदाने सांगत होती. बाबा परिक्षा संपली....हो बारावीची परिक्षा संपली..

वयाच्या तिच्या या टप्प्यावर बारावी हा आयुष्याच्या प्रवासातील एक मैलाचा दगड म्हणता येईल. तिने बारावी एन्जॉय केलं. हो ख-या अर्थाने एन्जॉय केलं.. आजू-बाजूला मुलं-मुली बारावीच्या ताणाखाली दबून गेलेले दिसत होते. मुलगी किंवा मुलगा बारावीच्या वर्गात गेल्यावर अख्खं घर बारावीत प्रवेश करतं असा माझा अनुभव आहे. थोड्याफार फरकाने आपणासही हा अनुभव आलाच असेल की..

या मुलांना अभियांत्रिकी आणि मेडिकलचं गाजर लावून गाढवाला  गाडीला जुंपाव तसं जुंपलं जातं. आपल्या स्वप्नांची पूर्तता मुलांनी करावी ही
अपेक्षा समजणं शक्य आहें. मात्र मूल हे आपल्या आकांशापूर्तीचं साधन (Extenuation) मानणं कितपत योग्य आहे.. मात्र इथं सारं चित्र वेगळं असल्याचं आपणास दिसतं.

महाविद्यालयीन जीवनाचा निखळ आनंद घेता यायला हवा कारण हे दिवस पुन्हा येत नाहीत. आयुष्यात मग अशावेळी करिअरची टांगती तलवार डोक्यावर घेऊन ही मुलं क्लासेस आणि कॉलेजच्या धावपळीत गुंतून पडतात आणि तणावात राहतात. इथं भौतिकशास्त्राचा साधा नियम आपण विसरतो की, इतराला ताण देण्याची एक विशिष्ट मर्यादा असते त्यापेक्षा अधिक ताणलं तर ते तुटतं आणि असा ताण असह्य झालेल्यांनी भौतिकशास्त्राचा पेपर अवघड गेला म्हणून आत्महत्या केल्याची बातमी वाचायला मिळते.

पनवेलमधील मैत्रीण माधूरी हेगडे हिच्याशी बोलताना तिने जो किस्सा सांगितला तो तर खूपच धक्कादायक होता. पेपर अवघड गेला असं घरी कळल्यावर पालकांनी त्या मुलाला तासला. सकाळी ते पोर घरातून निघून गेलं. पोलिस तपासात त्याच्या एटीएम वरील व्यवहार तपासला त्यावेळी तो सूरत मध्ये असल्याचं कळलं.

सूरत सारख्या मोठया शहरात शोधायचं कसं आणि कुठे कुठे याची चिंता. पुन्हा एक संधी म्हणून त्यांनी त्याच्य खात्यात पैसे जमा केले. तर पुढील व्यवहार सिमला येथे झाला मग अजूनच चिंता अखेर त्या मुलानेच फोन करून सांगितलं की सुखरूप आहे आणि सिमला येथे मला घ्यायला या.

एकूणच काय तर बारावी किंवा दहाचीचा हा काळ मुला-मुलींसाठी अभ्यासासाठी आव्हानात्मक असते असे नाही. तर या काळात शारिरीक बदल मोठया प्रमाणावर होत असतात. इतके सारे बदल एका वेळी ॲडजस्ट करणं खूप अवघड असतं.

मुलांवर जरूर संस्कार करा पण सक्ती करू नका. त्या व्यक्तीमत्वाचा तो घडण्याचा आणि खुलण्याचा तो महत्वाचा काळ असतो. आईच्या उदरातून जन्म झाल्यावर, वयात येणं हा दुसरा जन्मच असतो.

जान्हवी या वर्षाच्या कालावधीत कॉलेज स्तरावर ज्युदो खेळली अगदी राज्य स्तरापर्यंत तिनं वाटचाल केली. सोबत जर्मन भाषेची तिसरी याच वर्षात केली आणि आता चौथी लेव्हल ती महिनाभरात पार करेल. त्यातही परिक्षा संपल्याचा उत्साह आनंद ऐकल्यावर मला दहावीचे माझे परिक्षांचे दिवस आठवले. संपेपर्यंत त्याची उत्सुकता शेवटचा पेपर झाल्यावर थेट जितेंद्र- श्रीदेवीचा हिंमतवाला बघायला आम्ही सादिया टॉकिजला गेल्याचे आजही आठवते.

सध्या एक सुंदर जाहिरात टिव्ही व इतर माध्यमात फिरतेय ती जाहिरात बघितल्यावर जान्हवी मला म्हणाली बाबा तुम्ही तर आम्हाला अगदी लहानपणापासून हेच शिकवत आलात..बारावीला ५८ टक्के असले तरी मी शासनात वर्ग एक पद मिळवलेच ना...
अगदी आज ते त्या जाहिरातीत पडद्यावर ती म्हणते ना की मुझे बारवी में 59 परसेंट थे और आज मै इस कॉलेजकी प्रिंसिपल हूं.. तसं

काही घटना, किस्से आपल्याला प्रतिबिंबित करतात तसा हा किस्सा... सुख आणि दु:ख ही मनाची तर वेदना ही शरीराची भावना असते..कितीही कठिण क्षण असला तरी 'ये पल भी जाएगा' हेच खरं... हर पल यहां जी भर जियो....

-प्रशांत अनंतराव दैठणकर



९८२३१९९४६६

Thursday 10 March 2016

पर हम वफा कर ना सके...

स्वयंवरात अर्जुनाला द्रौपदी प्राप्त झाली त्यावेळी पांडवांचा वनवास सुरु होता. ते द्रौपदीला घेऊन आपल्या कुटीत पोहचले त्यावेळी त्यांची माता कुंतीने काय आणलय हे न बघताच जे आणलय ते पाच भावात वाटून घ्या. असं सांगितलं त्या क्षणी द्रौपदी पाच जणांची पत्नी अर्थात पांचाली झाली.

स्त्री-पुरूष संबंधांमधील हे आगळं प्रकरण आहे. महाभारतामधलं. मानव वंश इतिहासात भिन्न रुढी परंपरा पालन करणारे आपणास दिसतील. भारतात हिंदू संस्कृतीत रामायण आणि महाभारत या महाकाव्यांना धार्मिक आस्थेची बाब म्हणून बघितले जाते. रामायणात प्रभू रामचंद्र हे एकवचनी आणि एकपत्नी असणारे होते. राम हा विष्णुचा अवतार मानला जातो.

रामायणानंतरचा काळ अर्थात श्रीकृष्णाचा काळ इथं श्रीकृष्णाची प्रतिमा वेगळीच रंगविली जाते. त्याची पत्नी रूक्मिणी होती. रूक्मिणीलाही स्वयंवरातून आणले. मात्र श्रीकृष्णाचे चरित्र वेगळया पध्दतीने सांगितले जाते. १६ सहस्त्र नारींचा पती अशीही उपमा दिली जाते. आणि कृष्णाचे नाव सिता आणि राम असे न घेता राधा आणि कृष्ण असे घेतले जाते. राधा-कृष्ण हे आजही प्रेमाचं प्रतीक मानलं जातं. त्या नात्यात सात्विकता आणि पावित्र्य आहे.

लहानपणी आजीकडून ऐकलेल्या गोष्टीत एक राजा असायचा आटपाट नगरचा आणि त्या राजाला हमखास दोन राण्या असायच्या. त्यापैकी एक नावडती आणि एक आवडती असायची. मला प्रश्न पडतो आवडती होती मग त्याने नावडतीशी लग्न का बरे केले असेल.

मानव वंशाच्या इतिहासात एकपत्नी राहणं
ही बाब हिंदू धर्मात मान्य करण्यात आली असल्याने सर्वाधिक टिकून राहणारे विवाह भारतात आढळतात. ख्रिश्चन धर्मामध्ये एकपत्नी मान्यता आहे पण तिथं त्यांनी एका वेळी एक पत्नी, असा प्रकार मान्य केला आहे.

विवाह म्हणजे
गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली. या न्यायाने टिकेल तोवर संसार करून घटस्फोट घेण्याची वृत्ती अधिक आहे. त्यामुळे अनेक विवाहाची प्रथा तेथे आपणास दिसते. एलिझाबेथ टेलरचे ८ विवाह झाले ही सहज मान्य बाब म्हणून आपण वर्तमानपत्रात वाचतो. त्याचवेळी हिंदी चित्रपटसृष्टीची उमराव जान रेखाने चार विवाह केले ही इकडे मोठी बातमी असते.

ख्रिश्चन धर्मात एका पत्नीसोबत रहाणारे (अर्थात मोनोगॅमी) आहेत तसेच एका वेळी तीन किंवा चार विवाह करणारे बहुपत्नी पद्धतीचे ( अर्थात पॉलिगॅमी) आचरण करणारेही आहेत. मार्च याला चर्चची आणि समाजाची मान्यता नाही. अशी जी काही मोजकी माणसे आहेत त्यांना शहराबाहेर किंवा गावाबाहेरच रहावे लागते हे चित्र आज २१ व्या शतकातही आपणास दिसेल. इस्लाम मात्र असा एक धर्म आहे ज्या धर्मात चार विवाहांची पुरूषाला मुभा देण्यात आली आहे आणि त्याचा मोठया प्रमाणावर आज २१ व्या शतकातही प्रचार व प्रसार होताना दिसत आहे.

आपल्या देशात समान नागरी कायदा असण्याची मागणी असली तरी तो कायदा प्रत्यक्षात आलेला नाही. याला कारणही मुस्लीम पर्सनल लॉ हेच आहे. मात्र त्या दिशेने पावलं टाकली जात आहेत. न्यायपालिका विविध माध्यमातून या प्रकारचे आदेश देत आहे. तोंडी तलाक तलाक तलाक असे तीन वेळा उच्चारण करून पत्नीला घटस्फोट देण्याच्या मुस्लीम पर्सनल लॉ मधील तरतुदीला नाकारून कायदेशीर घटस्फोट व्हावा असा आग्रह धरला जात आहे.

हे सारं आठवण्याचं कारण म्हणजे केरळ उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी. कमाल पाशा यांनी नुकतच थिरूवअनंतपुरम येथील एका परिसंवादात केलेले वक्तव्य. गेल्या काही वर्षात इस्लाम मानणा-या अनेक देशांनी एकपत्नी कायदा
आणला मात्र भारतात आजही चार पत्नी ठेवण्याची मुभा देणारा मुस्लीम पर्सनल लॉ अस्तित्वात आहे. यामुळे पुरुषी वर्चस्व निर्माण होत आहे आणि महिलांना हक्कांपासून वंचित रहावे लागत आहे. अशा स्थितीत महिलांनी चार पती का ठेवू नयेत असा सवाल न्यायमूर्ती पाशा यांनी केला.

विषय वेगळया वळणावर नेणारे हे वक्तव्य आहे मात्र मानववंशाच्या उत्क्रांतीपासून आजवरच्या वाटचालीकडे बघावे असे हे वक्तव्य आहे. पूर्वी टोळयांचे अस्तित्व होते त्यावेळी पशू आणि मानव यात लैंगिकतेबाबतीत कोणताही फरक नव्हता. सिंहाने कळप बनवावा व आपलं क्षेत्र निश्चित करावं मग त्या क्षेत्रातील प्रत्येक मादी त्याची असा निसर्ग नियम मानवही टोळीचा प्रमुख आणि इतर स्त्रिया या पध्दतीने वापरत होते.

उत्क्रांतीत माणूस इतर प्राण्यांपेक्षा वेगळा ठरला याचं सार समाजरचनेत आहे. आजही आदिवासींच्या अनेक प्रजातींमध्ये मुलींना वयात आल्यानंतर अनेक मुलांसोबत शरीरसंबंध ठेवण्याची मुभा आहे त्यानंतर त्या अंतिमत: कुणाशी विवाह करायचा याचा निर्णय घेतात. इथं गडचिरोलीतही मुलांच्या जन्मानंतर विवाह करणारे अनेक आहेत. ही मातृसत्ताक पध्दतीची रचना.

आता जी रचना आहे ती पुरूष प्रधान आणि पुरूषी वृत्तीचा पुरस्कार करणारी आहे पण धार्मिक स्तरावर जिथं देवाची पूजा करताना त्याच्या दोन पत्नींचीही प्रतिमा आपल्याकडे पूजली जाते. अशा स्थितीत घराबाहेर विवाहापलीकडे संबंध पुरूष ठेवतात (हा गुन्हा आहे हे माहिती असून देखील) हे वास्तव देखील आहे मग अशा स्थितीत त्याची ही 'हम बेवफा ना थे...पर हम वफा कर ना सके' स्वीकारणा-या तिलाही थोडीसी बेवफाई करण्याचा अधिकार का नको.. विचार करा.. सोचो.. सोचो

-प्रशांत अनंतराव दैठणकर

९८२३१९९४६६

Wednesday 9 March 2016

देवदास.....

कभी कभी मेरे दिल मे... खयाल आता है..
के जैसे तुझको बनाया गया है मेरे लिये...

महानायक अमिताभ बच्चनच्या घनगंभीर आवाजातलं भावनात्मक निवेदन अनेकांच्या काळजाला भिडतं मग तिथून स्वप्न आणि सत्य यातील प्रवास सुरू होतो

कधी कॉलेजमध्ये कटटयावर गप्पा मारताना अचानक दिसलेली 'ती' तिचे ते वेध घेणारे डोळे आणि अल्लडपणे त्यावर येणा-या केसांच्या बटा .. गालावरचा तो गुलाबीपणा आणि किंचित थरथरलेले ओठ... चालीच्या हिंदोळ्यावर नृत्य करणा-या यौवनखुणा .... काळीज खल्लास. कोणत्या वर्गात आहे. नाव काय आहे,.. कुठे रहाते असा तपास.... तिच्या नकळत जडलेलं ते प्रेम... जपलं मनात. आणि दुस-याच वर्षी तिच्याशी संवाद साधण्यापूर्वी तिच्या लग्नाच्या बातमीसह तिची ती आयुष्यातून झालेली एक्झिट...

विवाह वेदीवर सप्तपदी चालताना नव्या नवरीचा लाजरेपणा आणि तिचं ते बावरणं ..नव्या विश्वात सारं जुनं वाहून गेलं विसरून गेलं. लग्नानंतरचा मधुचंद्राचा गोडवा आणि नंतर अवतरलेलें बोबडया बोलांनी घर भरून टाकणारं बालपण यातून मग करिअरची धावपळ आणि धावत धावत क्षणाची उसंत म्हणून थांबल्यावर आरशातलं आपलं रुप बघताना दिसलेलं पांढरे केस.. ( काही जणांचे तर रागावून सभात्याग करून गेलेले..) ... मग पुन्हा कॉलेजचे दिवस आठवायला आणि खुणवायला लागतात.

त्याच कट्टयावर मन पुन्हा जाऊन बसतं आणि 'ती' पुन्हा नजरेसमोर तरळून जाते. ती दिसताच अगदी चित्रपटासारखं आजूबाजूला संगीत ऐकू यायला लागतं..
.जरा, हो जरा हिंमत केली असती तर ती आज आपल्यासोबत असती. अशी भावना मनात डोकावून जावे आणि मग मन एकाच वेळी दोन दिशांच्या प्रवासाला निघतं...

जर-तर... च्या या जगण्याला आणि विचारांना कधीच अंत नसतो. हे सारं घरात दिसलेल्या सापासारखं असतं. साप दिसला की त्याला मारून टाकणारे आपणाकडे आहेत. मात्र याबाबत जनजागृती मोठया प्रमाणात झाल्याने साप पकडून जंगलात सोडायला आता सुरूवात झाली, पण साप दिसला आणि पकडला गेला नाही तर तो साप मनात भिती होवून फिरत राहतो. साप एका जागी थांबत नाहीत हे सत्य असलं तरी मनातला साप आणि सापाची भिती मात्र कधीच जात नाही त्याप्रमाणेच संशय आणि मिस झालेल्या प्रेमाचंही होतं....

घरात सारं काही सुरळीत असताना अचानक गाफिल क्षण आलेली तिची आठवण वयाच्या चाळीशीत पुन्हा आपल्याला देवदास बनवते.... शहराच्या एखाद्या बार मध्ये बसून दोन पेग रिचवून संगीताच्या सुरावटीवर तिचं ते रुप आठवायला हा देवदास बाहेर पडतो...हे एका रात्री घडतं आणि मग रात्रीचीही संख्या वाढते आणि भरलेल्या प्याल्यांचीही..

पारुच ती,....
देवदास अखेरीस तिच्या दारात प्राण त्यागण्यासाठी गेला पण तिला गुतंलेल्या आपल्या त्या नव्या आयुष्यातून बाहेर येता आलं नाही... सारं कळतं पण वळत नाही..सलमा आगाच्या 'दिलके अरमा आंसुओंमे बह गये' ने मैफल सूरु होते...मन पुन्हा धावतं त्या कटटयावर पुन्हा मित्र येतात बसतात. ... गप्पाष्टकं सुरू होतात...मग तिची एन्ट्री..आसमंतात संगीत....मन उल्हासित होतं, नजरेत आगळी चमक दिसायला लागते.... हळूच तिच्या दिशेने बाहू पसरून तिच्याकडे जाताना दिसतं की 'ती' हो ती देखील आपल्या बाहुपाशात येण्यासाठी आसूसली आहे...

आणि मोबाईलची रिंग वाजते..घरचा फोन.. कधी येणार,किती उशीर होणार अशी काळजी करणारा....स्वप्नातून सत्यात एक क्षणात पोहचल्यावर वास्तवाचं भान येतं.

आवरून निघताना यो यो हनी चा कंठशोष कानावर पडतो..

चार बोतल व्होडका.....काम मेरा रोजका
चार बोतल व्होडका.....काम मेरा रोजका

-प्रशांत अनंतराव दैठणकर.

9823199466

Monday 7 March 2016

कॅमेरा..क्रांती.. करप्शन अन् कॅरेक्टर करेक्शन..!

Add caption
आजपासून २०० वर्षांपूर्वी सन १८१६ साली या कॅमेरा क्रांतीची सुरुवात झाली. निसफोर निसे नामक एकाने सिल्व्हर आयोडाईडचा थर दिलेल्या तांब्याच्या एका तुकड्याला आयोडिनची वाफ देऊन जगातली पहिली प्रतिमा कैद केली. ही प्रतिमा छायाप्रतिमा होती. प्रकाशाशी अत्यंत संवेदनशील अशा या रसायनाचा तो चमत्कार होता. २ वर्षे अभ्यास करुन त्याने प्रकाश नियंत्रित करण्यासाठी एका लाकडी खोक्याचा वापर केला हा जगातला पहिला कॅमेरा होता.

त्या आधीच्या काळातही वेगवेगळ्या साधनांचा वापर करुन प्रतिमा एका ठिकाणावरून दुस-या ठिकाणी बघण्याची पद्धत सुरू झालेली होती मात्र प्रतिमा जतन करण्यासाठी कैद करण्याचा हा पहिलाच यशस्वी प्रयोग होता. याची झलक आपण नुकतीच बाजीराव मस्तानी चित्रपटात बघितलेली आहे.

कॅमेरा तयार करताना आपण खूप मोठा इतिहास घडवत आहोत याची त्याला कल्पना असणार यात वादच नाही मात्र २०० वर्षांच्या कालखंडानंतर सारं जग दिवसभर याचा वापर करेल आणि खूप मोठी क्रांती घडणार याची त्याला कल्पना नसावी.. आज मात्र ती क्रांती घडलेली आहे. आणि जगात सर्वात मोठा उद्योग होण्याच्या मार्गावर आहे हे येथे नमूद करावे लागेल.

सांग दर्पणा मी कशी दिसते.. हा प्रत्येक तरूणीचाच सवाल असतो असे नाही तर प्रत्येकाचं व्यक्तीगत विश्व असतं आणि जगापेक्षा प्रत्येकाला त्या विश्वात डोकावायला आणि रममाण व्हायला अधिक आवडत असतं. आजचं युग हे सोशल नेटवर्कींगचं युग आहे. यात सर्वाधिक धारक संख्या Instagram आहे यावरून काय ते आपणास लक्षात येऊ शकेल कारण ते फक्त फोटो शेअरिंगचं माध्यम आहे. फोटो अर्थात छायाचित्र हा सा-यांचाच विकपॅाईंट आहे ना.

आता ही कॅमेरा क्रांती नेमकी काय आहे याची आपण माहिती घेतलीच पाहिजे. या कॅमे-याने करप्शन अर्थात भ्रष्टाचाराला लगाम बसायला सुरूवात झाली आहे.
. कॅरेक्टर करेक्शनसाठी ( चारित्र्य सुधारणा ) याचा हातभार लागत आहे. आपण म्हणाल हे कसं काय.. कोणत्याही मॅालमध्ये किंवा दुकानात आपण जातो त्यावेळी आपणास फलक दिसतो आपण कॅमे-याच्या निगराणीत आहात.. तिथच आपल्या चारित्र्याच्या सुधारणेला आरंभ होतो. कुणी चोरीच्या इराद्याने आत आलेले असेल तर कॅमे-याच्या भितीने चोरी करीत नाही.

हिंदी चित्रपटात एक डायलॉग आपण ऐकतो नेहमी.. "कोई देखे ना देखे उपरवाला देख रहा है.". कुणीतरी पहात आहे म्हटल्यावर आपणही नकळत चेहरा आणि केसावरून हात फिरवतोच ना.
या कॅमे-याने जशी चित्रपट उद्योगाची निर्मिती केली तशीच माध्यमांची ताकद वाढवली. ऐकणे .. वाचणे आणि बघणे या तीन वेगळ्या प्रक्रिया आहेत. यासाठी आपण आपली तीन वेगळी ज्ञानेद्रिये वापरतो. यात आपला विश्वास कशावर आणि किती ठेवायचा यावर अनेकदा आपल्या मेंदूला कसरत करावी लागते.
ऐकलेले सारे खरेच कशावरून..?
वाचलं ते विश्वास ठेवण्यासारखं असतंच असं नाही..!
दिसतं तसं नसतं..!
मेदू किती किचकट काम करीत असेल याची कल्पना आपणास यावरून येईल. आपल्या निर्णयप्रक्रियेत या तीनही प्रक्रियांचा वापर करून विश्लेषण होत असते आणि अखेरीस आपल्या बुद्ध्यांकानुरूप आपण निर्णय घेतो. यात सर्वाधिक महत्व आपण आँखो देखी अर्थात नजरेने बघितलेल्या बाबीला झुकते माप देतो. आपण सर्व ठिकाणी एकाचवेळी जाऊ शकत नाही अशा स्थितीत कॅमेरा आणि त्याच्या मदतीने काढलेले छायाचित्र आपल्या मदतीला येत असते. ही उपलब्धी गेल्या २५ वर्षात झपाट्याने झालेले तंत्रज्ञानातील विकासामुळे प्रत्येकाच्या हातात आली आहे ती स्मार्ट फोनच्या रूपात.

छायाचित्र काढणे आणि क्षणार्धात ते जगभर पाठविणे आता शक्य आहे. दृष्टीआड सृष्टी या पद्धतीने देशात राजसत्ता सांभाळणा-या कॉंग्रेसच्या नेत्यांना या क्रांतीची जाणीवच झाली नाही आणि सारं काही नजरेसमोर आता दिसायला लागलेल्या नवी नजर आलेल्या पिढीने देशाची सत्ता नरेंद्र मोदींना सोपवली.. ही कॅमे-याने घडवलेली क्रांती इथे थांबलेली नाही तर ती प्रशासनात गतिमानता आणि पारदर्शकता आणण्यापर्यंत गेली आहे.

      मक्याने आपल्या चित्रपटात न बांधलेल्या विहिरीचे अस्तित्व सिद्ध केले असले तरी आता उपग्रहाच्या माध्यमातून खरेच काम झाले की नाही याचा पुरावा प्राप्त होत आहे. आपली कामे करून घेण्यासाठी लाच मागणारे आणि देणारेही आहेत यांनाही या कॅमे-यात कैद करून आता ख-या कैदैत पाठवणे सोपे झाले आहे त्याचमुळे करप्शनला अटकाव आता
होवू लागला आहे.

दादागिरी करणा-यांना त्यांच्या कृत्याची आता हिंमत होईनाशी झाली आहे कारण कोणीतरी आपल्या मोबाईलमध्ये छायाचित्र घेईल किंवा शूट करेल याची भिती बसली आहे. अशी कृत्ये कॅमे-यात कैद झाल्याने गुन्हे दाखल होत आहेत. गुन्हेगारांना पकडण्यासही कॅमे-याची सर्वाधिक मदत आज होत आहे.

याच कॅमे-याने २४ तास मनोरंजनाचा रतीब घालणा-या वाहिन्यांच्या उद्योगाला जन्म दिला लाखोंना काम दिलय आणि करोडोंना मनोरंजन. साता समुद्रापार असलेल्या मित्राशी, मुलांशी आणि नातेवाईकांशी आता समोरासमोर व्हिडिओ कॉलच्या आधारे बोलता येतं सा-या जगाला जवळ करण्याचं काम या कॅमे-याने केलं आहे..

कॅमे-याने आणलेली सेल्फीची क्रेझ आणि आपण ही बाब काही नवी राहीलेली नाही हे वेगळं सांगायला नको..

                                                                                                                                                    छायाचित्र
आणि त्याचं वेड ... त्यात मी इंटरनेवरून सर्वप्रथम वापरलेलं लोकमतच्या प्रवासातील पहिलं छायाचित्र प्रिन्सेस डायनाच्या अंत्ययात्रेचं होतं.. याची आज आठवण झाली. नेटवरील छायाचित्र छापण्याचा महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रयोग होता हे देखील सोबतच आठवतय
. प्रिन्स चार्ल्सची पत्नी ही ओळख घेऊन जगासमोर आलेल्या या प्रिन्सेसने जागतिक पातळीवर आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. अतिशय बुद्धीमान असणा-या या सुंदरीचा मृत्यू तिचा पाठलाग करणा-या पापारात्झी            ( छायाचित्रकार ) मुळे झाला होता.. अर्थात या मृत्यूला जबाबदार कॅमेरा होता.

प्रशांत अनंतराव दैठणकर

९८२३१९९४६६