Monday 30 July 2018

गारूड.... गॉसिप.....अन् ..... रेखा....!




काही लपवायचं ज्यावेळी आपण ठरवतो त्यावेळी ती गोष्ट असंख्य प्रयत्न करुन लपत नाही..... प्यार और खुशबू लाख छुपाओ छुप नही सकती असं म्हणतात ते अगदी खरं आहे.

अर्थात सुचण्यास कारण की, आयफा अवार्डस् मधलं अभिनेत्री रेखाचं वय 20 मिनिटांचं नृत्य. या नृत्यानं इन्डस्ट्रीला खूप मोठी सफर घडवली. जुन्या काळाची आणि जुन्या स्मृतींना उजाळा दिला.

फार काही कळण्याचे ते दिवस नव्हते. मात्र त्या काळात जमा झालेल्या आठवणीच्या खात्यात सर्वात अधिक प्रमाण सिनेमा आणि सिनेमातली गाणी यांचेच होते . .
यासाठी मी आजकाल कधीच संगीत ऐकत बसत नाही पण कानावर एखाद्या गाण्याची लकेर आली तर ते तबकडीवर सुई अडकावं तसं ते गाणं दिवसभर कानामध्ये नाद करीत राहतं.

आपली चित्रपटसृष्टी ग्लॅमर आणि गॉसिपचा प्रचंड मोठा महासागर आहे. 1975 ते 1985 च्या काळात टिव्हीचा शिरकाव झालेला नव्हता त्यावेळी मनोरंजन हे केवळ मासिक , साप्ताहिके आणि रेडिओच्या आधारे व्हायचं . . त्याकाळी चित्रपट बघणे हा साप्ताहीक उपक्रम होता . . . हमखास ठरलेला उपक्रम . . ! चित्रपट सृष्टीवर अँग्री यंग मॅन अमिताभ बच्चनचं राज्य सुरु झालं आणि विस्तारत गेलं तो खरा सूपरस्टार होता आणि त्यामुळेच त्या काळात ज्यांचं बालपण गेलं त्यांना आठवणींचा हा खजिना गोळा करता आला. ' मायापुरी ' नावाचं साप्ताहीक त्या काळी लोकप्रिय होतं त्यात ' मगर हम चूप रहेंगे ' असं सदर हे गॉसिपला अर्पण केलेलं होतं . . .
त्यानं मोठया प्रमाणावर चर्चेची राळ उठवून देण्याचा जणू चंग बांधला होता आणि लोकांनाही ते आवडत होतं . . आम्हीतर लहान होतो . . . पण अाजही छापून आलेल्या शब्दावर विश्वास ठेवणाऱ्या ( अगदी डोळेझाकून . . ! ) या देशात त्याकाळी विश्वास ठेवण्याखेरीज पर्यायच नव्हता.

अठरा बरस की तू . . होने को आयी रे
कौन पुछेगा . . . जतन कुछ करले . . !

रेखा आणि अमिताभचं अफलातून गाजलेलं गाणं . . ते नंतरही लक्षात राहिलं त्याला वेगळं कारण आहे . . कॉलेजच्या गॅदरिंग मध्ये म्यूझीकल फिशपाँन्ड अर्थात शेलापागोटयांचा कार्यक्रम असे . . . यातील गाण्यांच्या रेकॉर्डिगची जबाबदारी अर्थातच गाण्यांचं अधिक ज्ञान असल्यामुळे माझ्यावर होती महाविद्यालयातली ती सर्वात सुंदर मुलगी ( नाव सांगत नाही ) तिला बघण्यासाठी सेकंड इयरची मुलं फर्स्टइअर च्या वर्गात बसत असत इतकी सुंदर

                                                                   हे अठरा बरस की . . . !    गाण तिला फिशपॉन्ड म्हणून टाकलं . . . कौतूक वाटलं पाहिजे होतं पण ती रडायला लागली . . . सारा रुदनकल्लोळ झाला . . प्रिन्सिपलकडे तक्रार झाली आणि त्या वर्षापासून आजपर्यंत फिशपॉन्ड चा कार्यक्रम कॉलेजमध्ये झालेली नाही . . . . याला आता तब्बल 30 वर्षे झालीत .

त्या काळी चर्चा केवळ अमिताभ आणि रेखा यांचीच होती . . . नेमकेपणानं वास्तवाच्या बाबती माहितीची गॅप जिथं निर्माण होते तिथं गॉसिप सुरु होतं अशी माझी गॉसिपची मी स्वत: केलेली सोपी व्याख्या आहे . . . हे गॉसिप आजचं नाही हे महाभारताच्या काळापासून चालत आलय . . धर्मराज्य सत्याखेरीज काही बोलत नाही हे माहिती असल्यानं युध्दात अश्वस्थामा मरण पावला का असं गुरुवर्य होणाचार्यांनी विचारलं त्यावेळी धर्मराजाचं उत्तर होतं . . . हो परंतु पुढे पुस्ती जोडली होती . . . . नरो वा कुंजरोवा . . . ! अश्वस्थामा मेला पण नर की हत्ती माहिती नाही . . . हे नरो व कुंजरोवा म्हणजे ज्ञात इतिहासातलं पहिलं गॉसिप होतं.

अमिताभ असो की रेखा दोघांनीही आपल्यात प्रेमसंबंध आहेत की नाही याचा
आजवर खुलासा केला नाही..... त्यांच्या प्रमाच्या गॉसिपला सत्य असल्याचा दर्जा देणारा ' सिलसिला ' चित्रपट आला आणि पब्लीकने त्यावर पुर्णपणे ' आहेच ' असं शिक्कामोर्तब केलं.....!

रुपेरी पडद्यावरील रेखा-अमिताभ यांची केमिस्ट्री मात्र अफलातूनच होती... तो मग ' मुकंदर का सिकंदर ' असो की सुहाग वा सिलसिला.... नात्यातला मोकळेपणा गॉसिपला वाव देणारा होता आणि तेच आजवर कायम आहे. दोन व्यक्तींमधील वेवलेंग्थ जुळणं आणि त्यातून पुढे कलाकृती सादर होणं यात अमिताभ आणि रेखा यांची तोड कुणालाच नाही..... अमिताभचा विवाह जया भादुरी सोबत झाला आणि तो आजवर कायम आहे. तर रेखाचे 4 विवाह झाले पण आजही तिचं स्टेटस सिंगल आहे.....!

प्रत्येक व्यक्तीला स्वत:मधील नायक खुलवण्यासाठी अशी जवळीक आवश्यक असते. बहुतप्रसंगी ती जवळीक पत्नीच्या नात्यात मिळत नाही म्हणून अशा नात्याला नावं ठेवण्याची गरज नाही... असं नातं कधी कधी वरदान असतं..

रेखाचं नृत्य ते देखील सलग 20 मिनिटे.... आजचं तिचं वय 63 वर्षांचं आहे...
. तिचं सौंदर्य वादादीत आहे. आणि तिचा स्टॅमिना थक्क करुन सोडणारा आहे. आज चाळीशी ओलांडलेल्या केवळ स्त्रियाच नव्हे तर पुरुषांनीही स्वत:ला ' मेन्टेन ' करण्यासाठी रेखाची प्रेरणा घ्यावी असं सांगावं वाटतं....!

वय आणि सौंदर्य .... काय संबंध ? वयानुसार सौंदर्य वाढत जाणं ही खरी कमाल आहे. ती रेखाच्या रुपानं बघायला मिळते.... या सलग नृत्यात असलेल्या अखेरच्या गाण्यात तिने अमिताभ बच्चनच्या नाचातील स्टेप्स साकारल्याने आता पुन्हा गॉसिपला नवा मार्ग खुला झालाय असं म्हणायला हरकत नाही. रेखा गणेशन.... खरं नाव भानुरेखा गणेशन. जन्म 10 ऑक्टोबर 1954 .... बाल कलाकार म्हणून वयाच्या 12 व्या वर्षी तामीळ चित्रपट ' रंगुला रतनम ' व्दारे चित्रपट सृष्टीत पदार्पण .... चित्रपट सृष्टीत सुवर्ण महोत्सव पुर्ण करुन त्यापुढील वाटचाल सुरु केलेली.... तिचं आयफातलं नृत्य सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का देणारं होतं....!

सातत्य ...आणि सराव याच्या बळावर आपण किती मोठं यश मिळवू शकतो हे रेखाच्या आजवरच्या वाटचालीतून दिसलय..... ये जो पब्लीक है.... ये गॉसिप करनेसे खुद को रोक नहीं सकती.... आपणच आपली वाटचाल जारी ठेवायची....
आयुष्याला कोणतीही ' लक्ष्मणरेखा ' न आखू देता चालत रहायचं... रेखाचं गाॅसिप जितकं आहे त्याहीपेक्षा अधिक तिच्या सौंदर्याचं गारुडही विलक्षण आहे हे मान्य करावंच लागेल...

- प्रशांत दैठणकर

9823199466

Saturday 28 July 2018

...तुझा अबोला..!

बोलता बोलता शब्दांनी दुखावलं गेलेलं मन मग अबोला धरतं..

हा रुसवा सोड सखे

पुरे हा बहाणा.. सोडना अबोला..! 

 हा एक प्रकारचा असहकार असतो त्या नात्यामधला... सतत बोलणारी व्यक्ती अबोल झाली तर करमत नाही मनाला.. कुठतरी मनात वेदना जाणवायला लागते... नांत कोणतही असलं तरी त्यात निषेधाचा हा मार्ग साऱ्यांना खुला असतो. आता हाच अबोला धरण्याची सवय आपणास अगदी बालपणासून जडते...आम्ही नाही जा.. म्हणत लहान मुलं 'कट्टी' करतात पण ती खूप निष्पाप असतात त्यांची ही कट्टी अल्पावधीत संपून जाते.. बोलत राहणं ... संवाद साधणं हा मानवाचा मुळ स्वभाव आहे.

वय जसं वाढतं तसं भावना बदलाला सुरुवात होते...

मोरा पिया मोसे बोलत नाही...


असं एक छानस गाणं मधल्या काळात आलं होतं.

जितेंद्र रेखा यांचा एक चित्रपट माझ्या लहानपणी पाहिला होता.
'एक ही भूल' हा तो सिनेमा .. पती-पत्नीतील ही अनबन सतत सुरु राहिली तर प्रकरण भलत्या स्तराला जाऊ शकतं याची जाणीव दोघांना असली पाहिजे. पती-पत्नीच्या नात्याला संशयाचं जाळं लागलं तर बाब खूप बिघडते यात 'सुलह' कराने वाला अर्थात मध्यस्त असेल तर तोडगा सहजपणे निघू शकतो मात्र ते दोघेही इरेस पेटले तर मात्र काडीमोड हा अंतिम उपाय असतो.  अशाप्रकारे अनेक संसार तुटल्याची उदाहरणे आपल्या आसपास आपणास दिसतात.
याला काडीमोड हाच शब्द योग्य आहे कारण घटस्फोट हा शब्द केवळ आणि केवळ अंतिम संस्कारच्या वेळच्या कृतीसाठी वापरतात पण आजकाल मराठीचं तंत्र बिघडलं आहे आणि कोणीही कोणताही शब्द कोठेही वापरताना दिसत आहे. मन खंबीर होतं त्यासोबतच ते अधिक हट्टी होत असतं.. ते हट्टी झाल्यावर हा कट्टीचा काळ वाढतो आणि लवकर लवकर गट्टी जमणं बंद होवून जातं ......नातं कोणतं आहे त्यावर मग हा अबोला धरण्याचा कालावधी ठरत जातो ... पती-पत्नी यांच्या नात्यात असणारा आपलेपणा
आणि जवळीक खुपच वेगळी असते मात्र या नात्यात देखील या अबोल्याचा वापर शस्त्राप्रमाणे होताना दिसतो.. यात दोघांपैकी कुणी माघार घ्यायची असा अहं आडवा आलं तर प्रकरण थेट संबंध संपण्यापर्यंत बाब वाढते.

मौनम सर्वार्थ साधनम् ! 

असं एक वचन आहे.. आपण मौन पाळलं तर आत्मपरिक्षणास सुरुवात होते..  न बोलणे आपल्या आयुष्यात सकारात्मक देखील असू शकते.. याचा उत्तम वापर झाला तर त्यातून आपली क्रियाशिलता वाढते... सर्वच धर्मात 'मौन' किती महत्वाचे आहे.. अर्थात मौन म्हणजे अबोला नव्हे   मौनाचं आध्यात्मिक महत्व खूप आहे.. आपण ज्याला ध्यान लावणे म्हणतो.. आता याचीही गंमत आहे.. आपण 'ध्यान' स्विकारलं नाही पण हेच ध्यान बौध्द धर्माच्या प्रसारात जपानपर्यंत पोहोचलं तिथं त्याचं रुपांतर 'झेन' मध्ये झालं आणि हेच झेन भारतात आलं तेव्हा त्याचं आम्ही त्याचं कोणकौतूक केलं...!

विषय अबोल्यावर सुरु झाला पण त्याची दुसरी बाजू देखील तितकीच महत्वाची आहे. अबोला धरल्यावर दोघांनाही करमत नाही अशा वेळी दोघांनाही आत्मचिंतन करायला वेळ मिळतेा... दोघांपैकी चूक कोणाची आहे.याबाबत चितंन होतं.... मला विचाराल तर हा अबोला देखील खूप महत्वाचा
आहे...
 शब्दाला शब्द लावून भांडण करण्यापेक्षा अबोल राहणं खूप चागलं... भांडणाच्या भरात भावना दुखावल्या की ते नात संपतं त्यामुळे अबोल्याचा हा 'पाॅझ ' नातं मजबूत करण्यासाठी अधिक महत्वाचा आहे.




कभी कभी दूरी भी जरुरी है

प्रेमीयों मे प्यार बढाने के वास्ते..!


जीवनात सर्व प्रकारे नवरसांचा अंतर्भाव नसेल तर जगणं निरस होवून जाईल ...

मराठीत म्हणींची कमतरता नाही प्रत्येक स्थितीला साजेशी म्हण आपल्याकडे आहे.

शहाण्याला शब्दांचा मार.

अशी एक म्हण आहे पण शब्दानं मारणं हा उपाय नाही. कधी कधी शब्दांचे बाण जिव्हारी लागतात आणि नांत कायमचं तुटतं.. त्यापेक्षा अबोला केंव्हाही परवडला . पती-पत्नी हे नातं लग्नगाठीनं बांधलेल असतं आणि याला रेशीमगाठी म्हणतात त्यामागेही कारण आहे असं मला वाटतं.. रेशमाची गाठ कितीही घट्ट बसली तरी ती अगदीच वेळ आल्यास सोडवता येते....सुताच्या गाठीला तोडण्याशिवाय पर्याय राहत नाही...!   कोणतही नांत जुळतं त्यावेळी त्यावर 'एक्सपायरी डेट' नसते...! आपणही ती टाकायचा प्रयत्न करू नये असं माझं मत आहे.

नातं कधी ओझं वाटायला लागलं तर ते काही काळ उतरवून ठेवायचं... नात्याचं सिंहावलोकन करायचं ... थेाडयाशा पॉझनंतर ते पुन्हा हवंहवसं वाटायला लागतं ...


नात्यांमध्ये हा लटका राग, खरा गुस्सा , अबोलारुपी असहकार त्यामुळेच आवश्यक ठरतात..या ऋणानुबंधांच्या गाठीत असला रुसवा आणि अबोला त्यासाठीच आवश्यक वाटतो.



प्रशांत अनंत दैठणकर
9823199466

Lighter Side: - या अबोल्याचा स्वीकार इतका झाला आहे की आपल्याकडे अबोलीचं फूल (कसं बुवा..?)आहे आणि अबोल रंग (...हे अनाकलनीय आहे) देखील आहे...

Thursday 26 July 2018

अल्बम . . आठवणींचा . . !

आठवणींची वीण क्षणागणिक पडत जाते . . त्या जगलेल्या क्षणांचा मधल्या काळात काहिसा विसर पडून जातो पण ' झुक्या ' त्याची आठवण करुन देतो . ..
असाच काहीसा विचार सकाळी मनात आला . . . कारण देखील तसं होतं . . . सकाळी फेसबूक वाचायला घेतलं त्यावेळी ' मेमरीज ' चं पान सर्वात प्रथम खुलं झालं . . समोर फोटो होता चिरंजीव मास्टर वेदांतचा . . . सन 2012 मधला तो फोटो वेदांत शाळेला जायला निघाला त्यावेळचा . . . !

तो क्षण जगलेला असा अवचित आठवण्याचं काही कारण नाही पण आठवण करुन देणारं कुणी असेल तर त्यासारख्या आनंद जगात दुसरा नाही . . आपण रोज धावत असतो . . . धावत राहतो पण या धावण्यात जगायचं विसरलो की काय असा प्रश्न पडतो .

माणसाला निसर्गानं जी मोठी देणगी दिलीय ती म्हणजे विस्मरणाची . . .
आपण आजचा क्षण विसरु शकतो म्हणून उद्या पुन्हा ' फ्रेश ' होवून जगू शकतो विसरण्याची ही देणगी मिळाली नसती तर स्मृतींचा नुसता कोलाहल झाला असता . . . आजच्या जमान्याच्या भाषेत सांगायचं तर ' दिमाग का दही ' झाला असता .

आपल्या प्रत्येकाच्या भावविश्वात आपण जगलेले चांगले -वाईट क्षण गोळा होत असतात, किमान आता ते जपायचं तंत्र सापडलय . . छायचित्रांच्या रुपानं त्या क्षणाची साक्ष देणारा छायाचित्रांचा अल्बम प्रत्येकाकडे असतो पण त्यातही केवळ आनंदी क्षण जपले जातात . . आयुष्यातील दु :खाचा काळ आणि भोगलेल्या वेदना यांचा अल्बम केवळ मनात तयार होतो . . . हा अल्बम कधी अचानक छेडल्या गेलेल्या गाण्याच्या सुरावटीसह समोर येतो त्यावेळी नकळत डोळे पाणावतात समोरच्या व्यक्तीला बोध होत नाही . . . आपली आतली वेदनेची कळ आपणच उरात जपायची असते . . . माझ्यातला ' मी ' इतरांना कळू नये याची ती केविलवाणी धडपड असते . . . पण डोळे दगा देऊन जातात . . समोरच्या प्रश्नांकित चेहऱ्याला मी पुन्हा प्रश्नांकित ठेवून कमळाप्रमाणे भावनांना चापण्यांच्या पाकळ्यांमध्ये बंदीस्त करुन ठेवतो . . . हे प्रत्येकासोबत वारंवार होत असतं . . . !

आयुष्याच्या या सुख दु:खाच्या हिंदोळयावर मन सतत झुलत राहतं . . .
आसपासची परिस्थिती कशीही असली तरी हिंदोळयाची ही आंदोलने सुरु राहतात अविरत . . . मी जितका स्वत:ला जगासमोर मांडायचा प्रयत्न करतो त्याही पेक्षा अधिक प्रमाणात आणि अधिक तिव्रतेने स्वत:ला जगापासून लपवायचा प्रयत्न करतो.

माझ्यातला नायक जगासमोर मी मांडत जातो . . ते मांडण सरत जातं आणि उरात उरतो तो केवळ माझ्यातला खलनायक . . . तो मला जगासमोर न्यायचाच नसतो . . .तो लपवण्याची सारी धडपड सुरु असते पण स्मृतींचा हा अल्बम मी एकाकी असताना वारंवार खुला होत जातो . . . ज्याचं विस्मरण व्हावं त्याच गोष्टी आयुष्यात मुद्दाम होवून स्मरणात राहतात.  सुखाचे जगलेले क्षण आयुष्यातून कापरासारखे उडून जातात . . . ते जगताना त्याचा आनंद जरुर होतो पण ते हवेत विरुन जात असतात म्हणूनच मला त्या क्षणांचा ' अल्बम ' कदाचित आवडत असेल.

तंत्राने आज सोय करुन ठेवलीय की मी माझ्या आनंदाचा क्षण जपू शकतो आणि मी तो जपतो देखील. काळाच्या प्रवाहात मागे वळून बघताना तो सुखाचा अल्बम मला पुढे वाटचाल करण्याची उभारी देतो . . . काळाशी लढताना आलेल्या मनाच्या नैराश्याच्या जळमटांना सारुन सकारात्मकतेने पुन्हा जगाकडे बघायचं बळ देतो .


नाण्याच्या दोन बाजू प्रमाणे मनाच्याही दोन बाजू असतात हे खरं आणि ती दुसरी बाजू अधिक लवकर विस्मरणात जात असल्याने सुखाच्या त्या क्षणांचा अल्बम बनवता आणि जपता आलं म्हणजे इहलोकाची ही वाट अधिक सोपी होते. आयुष्यात चालणं जसं थांबत नाही , जगण जसं थांबत नाही तसं विस्मरण देखील थांबत नाही. काल सकाळी काय जेवलो याचं आज विस्मरण लवकर होतं मात्र चहाच्या चटक्यानं जीभ भाजली तर ती चार दिवस त्रास देते . . . असा अनुभव आहे की चुकून पायाला ठेच लागली म्हणून आपण खूप जपायला सुरुवात करतो पण नेमकं निथेच वारंवार जखम होते . . . दुसऱ्या भागावर नेम धरुन अधिक वेदना देण्याचा चंग दैवानं बांधलाय अशी काहीशी शंका यायला लागते . . . मनाचं फार काही वेगळं नाही .

दिल टुटनेपर बार बार वोही याद आता है . . . . वहीं फिर चोट लगती हैं जहां के घाव अभी ताजा है . . !

सुख हे आलं आणि गेलं आणि दु:ख मात्र मुक्कामी राहिलं या मनात माझ्या....
मग त्या दुखऱ्या क्षणांचा डोंगर एव्हरेस्टपार गेला असं वाटायला लागतं. अशा त्या क्षणी नकारात्मकतेचा कडेलोट होण्याच्या नेमक्या क्षणाला.... हा अल्बम एखादा विस्मरणात गेलेला आयुष्यातला चांगला क्षण समोर आणतो... कडेलोट होण्याच्या नेमक्या क्षणाला... हा अल्बम एखादा विस्मरणात गेलेला आयुष्यातला चांगला क्षण समोर आणतो.... कडेलोट झाला तरी.... हे सुखाचे क्षण माझे पंख बनतात आणि त्या पंखामध्ये बळही देतात उडण्याचं. पुन्हा जगण्यासाठी मग मी त्या उंचावरुन भरारी घेतो आयुष्याच्या आसमंतात.... ती त्याक्षणी घेतलेली गरुडभरारी असते.....!

- प्रशांत दैठणकर
9823199466



Wednesday 25 July 2018

पाठलाग स्वप्नांचा...!

स्वप्नं. . . कधी ना कळणारी . . कधी गुंतवणारी , अधिकतर पहाटे -पहाटे प्राजक्त फुलांवर पडलेल्या दवबिंदुंसारखी . . . स्वप्नांच्या ओझ्यानं फूलं टपाटप खाली पडायला लागतात अन् सूर्याच्या आगमनानंतर पहिल्याच त्या कोवळ्या किरणांच्या धगीने ( ? ) हवेत विरुन जातात . .!

स्वप्नात पाहिले कधी काही आठवावं म्हटल तर ते आठवत नाही . . . वास्तवात पोळणाऱ्या मनाला ती स्वप्न . . ती गुलाबी स्वप्ने जगण्याची उभारी देत असतात. . . दिवस रुक्ष वास्तवाचा असला तरी रात्र मात्र त्या रंगीन स्वप्नांची असते . . ! प्रत्येकाची स्वत:ची खास अशी स्वप्नांची सृष्टी अर्थात सपनोंकी दुनिया असते.

. . दिवसा देखील स्वप्न बघितली
जातात उघडया डोळयांनी पण तिथं हिमंत कधी-कधी होत नाही . . बोलायला जीभ कचरते . . खूप सारं ओझं त्या जिभेवर असावं अशी ती जड होते . . पण सुरु झालेलं ते स्वप्न रात्रीच्या अंधारात पापण्यांच्या पडद्याआड सारे औपचारिकतेचे आडपडदे ओलांडून बोलकं होतं . . दिवसा न रेटणारी जीभ गाणी गायला लागते . . . दिवसा तिच्यासमोर हिमंत नसली तरी ती सपनोंकी रानी त्याच्यासोबत नृत्य करते . . गाणी म्हणते . . . स्वप्नात . . दिवसा मात्र.... याचं फक्त स्वप्न . . . सारं कसं स्वप्नवत स्वप्नांची कहाणी तिच्याविणा अधुरी राहत नाही . . पण ती पूरीही होत नाही . . . कम्बख्त बिचमें यह सुबह हो जाती है . .

स्वप्नातला तिचा तो राजकुमार . . त्या प्रत्येकीच्या मनात असतो . . तो नुसता राजकुमार नसतो तो खऱ्या अर्थांन सपनों का सौदागर असतो . . त्या राजबिंडया रुपाचं स्वप्न उशाशी घेऊन रोज रात्री झोपते त्यावेळी मनापासून प्रार्थना करीत असते की आयुष्यातही तोच राजकुमार आपला जोडीदार असावा . .
. स्वप्न पहाट वाऱ्यात विरुन जातं . . वास्तव्यानं जाग आल्यावर आपल्या आयुष्यात काय ' खेळ मांडियेला ' याचा बोध होतो . . . . तो कसाही असला तरी आयुर्विम्याप्रमाणे त्यालाही पर्याय नाही म्हणत स्विकारावं लागतं . . . समाधान इतकंच की दिवसभराच्या थकल्या धावपळीनंतर . . . आवांछित स्पर्शानं किळस येवूनही अगदी टाळता येत नाही असा देहात्कार संपवून डोळे मिटतात त्यावेळी पापण्यांच्या त्या पडद्यावर तोच राजबिंडा राजपूत्र कवेत घेण्यासाठी दोन हात पसरुन उभा असतो .

. . . उशाशी असणारं तारुण्यातलं ते स्वप्न आता कारुण्यात उराशी आलेलं असतं . . . त्याला कवटाळून या कंटाळवाण्या इहलोकाची यात्रा सुरु राहते . . आधार फक्त त्या स्वप्नांचा .

त्याचं फारसं वेगळं नाही . . . फुलोंके शहर में है घर अपना . .
.
असा सपना . तो बघतो पण आयुष्य कंठावं लागतं ते वनरुम किचन च्या त्या किचकिचाटात... अर्थांत त्यातही समाधान असं की आपण 'हायर मिडल' वाले.. धारावीत रहायला लागलं नाही म्हणजे आपण सुखी..!

सुख शोधताना आपण आपल्यापेक्षा खालच्या दर्जाच्या व्यक्तीकडे बघावं ... त्याचं जगणं किती कष्टप्रद आहे ते बघावे म्हणजे आपण किती सुखी आहेात याचा बोध होतो... आपल्यापेक्षा अधिक पत व संपत्ती असणाऱ्याकडे बघणं क्लेशदायक पण जगणं ज्याला कळलय त्याच्या दृष्टीने त्या आयुष्याची आसुया न बाळगता त्याच्या सारखं जगता यावं ..! हे स्वप्न हा झाला सकारात्मक पणा.

साधी एक चार फुटांवरुन उडी मारता येत नाही
दिवसा पण स्वप्नात आपण त्या सूपरमॅन ला मात देतो विश्वामित्राने स्वतंत्र सृष्टी निर्माण करायचा प्रयत्न केला त्यातील त्रिशंकू आठवावा …पण ही स्वप्नं आपल्या मनातली प्रतिसृष्टी असते... त्या सृष्टीतील ब्रहमा आपण.. विष्णू आपण.. विश्वकर्मा आपण आणि शिव देखील आपण ... आपल्या सृष्टीतील आपणच सर्वेसर्वा ..केवळ जाग येईपर्यंत.

स्वप्नं ...म्हणजे आपल्या अंतर्मनाचा आवाज असतो... जे आपण जगावं असावं असं आपल्याला वाटतं पण वास्तवात शक्य होत नाही ... ते स्वप्नात होतं...!
माझ्या मनाची कोलाहलातली स्थिती मला जगू देत नाही पण माझी स्वप्न मला मरु देत नाही ... मी कितीही निराश झालो तरी मला कळतं की आपलं निम्म आयुष्य झोपण्यात अर्थांत .... स्वप्नात जाणार आहे आणि त्या स्वप्नांच्या सृष्टीचा राजा होता येतं.. मग जगणं का सोडायचं.. .

हातातलं पुस्तक जड व्हायला लागतं ... पापण्यांची दार बंद व्हायला लागतात ... अखेर तिसऱ्या घंटेला पापण्या मिटून ... एक रंगमंच खुला होतो. रंगीत चित्र दिसायला लागतात तिथं मी अबोल नसतो .. तिथं कार्यालयाच्या कोपऱ्यात बसून कॉम्प्यूटर च्या किबोर्डवर बोटं बडवणारा क्लर्क नसतो... तिथं त्या जगात मी सेंटर स्टेजला... 

पण हाय, तिथं ही ...

घर देता का घर
कुणी या तुफानाला
घर देता का घर ..?

अरे यार या महानगरीत स्वप्नं देखील अशी पडावीत..! 
आयुष्य म्हणजे दोन श्वासातलं अंतर असं म्हणतात पण माझं विचाराल तर ते दोन स्वप्नातलं अंतर असतं... पुन्हा स्वप्न पहाण्यासाठी दिवसभर कष्टांची तमा न बाळगता मी धावत राहतो... माझा हा दोन स्वप्नातला प्रवास स्वप्नवत वाटला तरी मला कळतं...
ज्या दिवशी डोळे मिटल्यावर स्वप्न दिसणार नाहीत तो स्वप्नांचा नव्हे तर माझा अंत असेल........ माझा अंत असेल... ..
.मी खडबडून जागा होतो...!


प्रशांत अनंत दैठणकर

9823199466 


Monday 23 July 2018

तुम तो ठहरें परदेसी . .

तुम तो ठहरें परदेसी . . . साथ क्या निभाओगे..
अल्ताफ राजाचं


 गाणं रिक्षावाल्याने लावलं होत . . त्यानं झटकन मीटर टाकून त्या रिक्षाला वेग दिला . . . रिक्षा वेगानं समोर धावत होती पण मनाचा प्रवास नेमका उलटया दिशेने सुरु झाला होता. शासकीय सेवेत येण्यापूर्वीचा तो काळ . . मी चित्रपट समिक्षा लिहायचो.

शुक्रवारचा फर्स्ट डे फर्स्ट शो . . . जागा बूक असायची आज इतक्या वर्षांनी तब्बल वीस वर्षांनी हो . .. चित्रपटाच्या भाषेत सांगायचं तर 20 साल बाद . . तो काळ आठवताना आजची त्या काळाशी तुलना आपसूकच सुरु झाली मनातल्या मनात. . !

मला आठवलं माझं औरगाबाद आठवलं. . .
काय वेगाने सरत असतो. . . आपलं शहर हे आपल्या घराइतकंच प्रिय असतं, आता हा बऱ्यापैकी भावनिक विचार झाला ज्या शहरात लहानाचे मोठे झालो त्या शहराची आठवण प्रत्येकाच्या मनात घर करुन असते. . बदलत्या काळात माझं औरगाबाद सोडून बाहेर रहावं लागलं. . फरक असता प्रत्येक गावात . . . !

इथं गडचिरोलीत बरोबर आज 22 जूलैला येवून 3 वर्षे   पूर्ण झाली . . . एक प्रकारे मी गडचिरोलीचाच झालोय इथली भाषा . . बोलायला लागलो . . नव्या व्यक्तीला वाटतं की मी गडचिरोलीचाच आहे. . पण संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाची प्रतिक्रिया मात्र अगदी अल्ताफ राजाच्या गाण्यासारखीच असते..

. . . तूम तो ठहरे परदेसी . . . !

आपल्या शहरात आपण राहतो त्यावेळी आसपास मित्रमंडळी आणि परिचितांमुळे कधी एकटं . राहण्याचा प्रसंग आला नाही त्यामुळे एकाकीपणा देखील आला नाही असा अनुभव येतो. . . इथं देखील मित्रमंडळी जमली पण राहायला एकटं रहावं लागतं. . . सततच्या एकटेपणानं एकाकीपणा येवू नये यासाठी खूप काळजी घ्यावी लागते मनाला. . . !

घर सोडून राहणारा मी काही जगात एकटा नाही . . . दर्यावर्दी  सिंदबादच्या सफरी लहानपणी वाचलेल्या त्यातली रंतकता आठवायची . .
एखादा नवा छंद जोपासायचा आपण स्वत:लाच गुंतवून ठेवायचं . . शरिरानं इथं.... मनानं तिथं... असं न करता शरीर आणि मन दोन्हीसह जाता आणि जगता आलं तर  तिथं राहणं अवघड असलं तरी ते अशक्य मात्र नाही . . . अगदी तसं जगलं तरच छानपैकी जगता येतं हा अनुभव .

9 वर्षांपूर्वी औरंगाबाद सुटलं त्यावेळी मी पूर्ण पणे औरंगाबादचा होतो नंतर प्रथम वर्धेत जाऊन मी पूर्णपणे वर्धेकर झालो. मराठवाडी भाषा आणि वऱ्हाडातली भाषा यात खूप फरक आहे. तो अवघ्या 15 दिवसात आत्मसात करण्याचं आव्हान घेतलं आणि तिथं जिंकलो . . . त्या 3 वर्षांनंतर पुढची 3 वर्षे बुलडाणा आणि आता गडचिरोली एकटे पणाची मजा वेगळी . . घर आणि गडचिरोली यातील प्रवासाची कथा आगळी . . मला स्वत:ला प्रवास करायला आवडत नाही पण करना पडता है. . . ! या प्रवासाच्या कालावधीत जिथं जाऊ तिथला होवू अशी मनाची   तयारी आपोआप होत असते. .... तशी झाली  देखील.

आपण कितीही इथले म्हणून राहिलो तरी स्थानिकांच्या मनात असलेलं ' आपलं
' परेदसीपण ' विचार करायला लावतं. . . आज ना उद्या तुम्ही जाणार ही भावना त्यांच्या मनात असल्याने म्हणावी तशी ' Attatchmont कुणी ठेवत नाही . .. हा प्रकार काहीसा रेनकोट घालून शॉवर खाली अंघोळ करण्यासारखा असतो म्हणायला पाण्याच्या धारांमध्ये तासभर उभे पण आतून आपण कोरडेच राहतो. . . हे कोरडेपण जाणवत रहातं... !

कधी कधी भावनेच्या भरात होमसीक होतो हे पण मान्य करावं लागेल अखेर आपण अन्नपाण्यापेक्षा भावनांवर अधिक जगतो ना... ! अशा वेळी जर एखांद आठवणीतलं गाण लागलं तर डोळेही पाणावतात .

चिठ्ठी आयी है वतनसे चिठ्ठी . . . !

असो की

संदेसे आते है . . . ! 

गाण्याच्या एका लकेरीत भावनांचा पसारा घरभर सांडतो. मग आपणच तो आवरायला घ्यायचा..... पण त्यातून झटकन निघता येत नाही हे देखील खरं आहे.

मी काय काय Miss केलय आजवर याचं गणित खर्चाच्या बाजूला मांडायचं
आणि मला काय काय जगायला मिळालं याची बेरीज जमेच्या बाजूला मांडायची..... या जमाखर्चात जमा कमी आणि खर्च अधिक असं होवू द्यायचं असेल तर सकारात्मक विचार ठेवून आला क्षण आनंदाने जगायचा.....!

आयुष्य ही वाटचाल आहे......मग सकारात्मक रहाण्यासाठी मन तयार करायचं....! यासाठी मराठीतील थोरांच्या सल्याचा आधार घ्यायचा....

' जे होतं ते चांगल्यासाठी '...... म्हणत वाटचाल करीत रहायचं...... काही जणांना मी गंमतीनं म्हणतो की, ' ठेविले अनंते तैसेची रहावे ' हे वाक्य माझ्यासाठीच आहे..... कारण माझ्या वडिलांचे नाव अनंत आहे.

घरापासून दूर राहणारे माझे अनेक मित्र आहेत. अगदी साता समुद्रापार म्हणतात त्या प्रमाणे ब्रिटन, दुबई, जर्मनी, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया, मेक्कीको, चीन कुठे नाहीत जगाच्या कानाकोपऱ्यात ..... त्यांनाही घर आठवत असणारच... ते तर माझ्यापेक्षा किती दूर आहेत घरापासून......!

आपल्याकडे जन्मभूमी आणि कर्मभूमी असे शब्द आहेत. जन्मभूमीची ओढ असणं स्वाभाविक आहे. कर्मभूमीवर देखील प्रेम असणं आवश्यक आहे..... जुन्या काळात प्रवासाची साधनं मर्यादीत होती आणि प्रवास कठीण......खलाशी ज्या बंदरात जायचे तिथं घर करायचेच ना.....!

कोणतीही व्यक्ती असो एक गोष्ट मात्र नक्की.
...... यह भी वक्त जायेगा......!

जणू काही पॉझिटीव्हीटीची इन्जेक्शन्स घेतोय असं वाटून जातं कधी कधी...... पण गडचिरोलीत मी वेगळं आयुष्य जगतोय....... सुंदर निसर्ग...... स्वच्छ पर्यावरण.... 24 तास शुध्द प्राणवायू आणि ..... 'परदेसी' पण मनाच्या कोपऱ्यात ठाण मांडून बसलेलं असतानाही आपलेपणानं जपणारे मित्र........!

गडचिरोलीची स्वत:ची अशी गती आहे. सुविधा कमी.... मनोरंजन शुन्य.... मुंबई-पुण्यासारखी धावाधाव दगदग नाही..... शांत संथ प्रवाह असणार गाव..... याला शहर देखील म्हणता येणार नाही.... मुंबईच्या भौतिकवादी जगापेक्षा दुर असणारा हा भारतातला वेगळा भारत......
मनाची गती कमी करुन आपणही शांतपणे 3 वर्ष इथ पुर्ण केली.... भरपूर रिकाम वेळ आत्मचिंतन...... आत्मबोध..... मनाचा शोध याच्या जोडीला जोपासलेला फोटोग्राफीचा छंद... खूप काही वेगळेपणानं करायला मिळालं.. जगायला देखील मिळालं साऱ्यामध्ये वेळ कसा गेला.... काळ कसा संपला हे कळलच नाही.....!

पण सत्य ते सत्य ते बदलत नाही.. काळाचे काही देणे हाेते आणि या ठिकाणी येणे होते... काळ झपाट्याने कसा जातो ते कळत नाही कारण आपण त्याचा वेग जाणून जुळवूम घेतलेले आहे याची जाणीव आहे... आता हा काळ वेगाने गेला त्याचंही कारण अगदी नेमकेपणाने तेच आहे.
सवय झाली इथल्या असण्याची... इथल्या रूटीनचा ... पण  आज अचानक या गाण्याने आठवण दिली.

 खरोखरच हम तो ठहरे परदेसी......... या वेगळया जगात......!

प्रशांत दैठणकर
9823199466

Friday 20 July 2018

पत्नी.. पती आणि ... ती


ती मला  पाहिजे . . .ती तुम्हालाही पाहिजे . . .  ती इथं सर्वांनाच पाहिजे . . . काळाच्या वेगात धावण्याचा प्रयत्न सारेच करतात, ही धावपळ जितकी वाढते तितक्य अधिक तिव्रतेने तिची गरज सर्वांना भासते.

लग्न मग ते प्रेमविवाह कॅटेगरीतलं असो की जुळवलेल . . . मधुचंद्राचा काळ संपून आयुष्यात रोजच्या गाडयाला जोडून घेतलं आणि नंतर सुरु झालं ते ' रुटीन ' यातून ...कधी कधी जवळ येणं . . . अधून . . मधून रुसवे , फुगवे . .. आयुष्य चालत राहतं अशा स्थितीत होणारी दगदग ज्यावेळी वैतागाकडे वळते त्यावेळी मात्र जाणवतं की आपल्याला
'ती ' आवश्यक आहे.

और दिल में . . ये बात इधर भी है ...और उधर भी..!

बंधन म्हणजे एक प्रकारे यमक जुळवणं असतं प्रत्येकाला यमकात जुळवणं जमतं असं नाही आणि मुक्त छंदातली मजा यमकात कुठे. . . शाळेत होतो त्यावेळी योग्य तो समास सोडून लिहावं असं सांगितलं जायचं . . आणि आपण त्याचे पालन करायचो. मात्र आयुष्यात तो प्रकार कधीच आवडला नाही. बंधन तसंही कुणाला आवडतच नाही ना.

प्रेमात पडलो. . . विवाह झाला पण काही काळानं ' ती ' हवी असं वाटायला लागलं . . . का वाटायला लागलं याचा आरंभी बोध झाला नाही पण नंतर जाणवलं. . . मलाच नव्हे तर तिलाही ' ती ' हवी आहे . . .

पती -पत्नी म्हणून सुरेख नाते जपले . . आजही खंत आहे की या नात्यात इतक्या वर्षांमध्ये दोघांनी भांडायचं राहूनच गेलं. . . परंतु दोघांनाही ' ती ' हवी असं वाटायला लागलं, त्याची स्पष्ट जाणीव झाली .
. . पती-पत्नी और वह अर्थात ती  . . म्हणजे ' पर्सनल स्पेस '  हो प्रत्येकातील स्व जपणारी ती  ' पर्सनल स्पेस '

' इंजाजत ' चित्रपटात एक सुंदर डायलॉग आहे.

शादी मरती है तो रिश्ता सडने लगता है . .!

खरच आहे. लग्न करावं की नाहि यावर प्रत्येक व्यक्तीचं स्वतंत्र मत आहे.मात्र लग्न न करणारे खूप कमी आढळतात

शादी वो लडडू है
जो खाये वो पछताये
 ना खाये वो भी पछताये . .!


लग्न मनाविरुध्द झालं तर समजण्यासारखं आहे पण प्रेम करुन विवाह बंधनात अडकणाऱ्यांचं असं का होतं . .? . . या प्रश्नातच याचं उत्तर आहे. . विवाह हे एक बंधन आहे . .
. विवाह झाल्यावर अनेक बदल दोघांच्याही आयुष्यात येतात.

मला विचाराल तर मला एक विनोद आठवला यावरला . .
लग्नापूर्वी आणि लग्नानंतर काय फरक पडला आयुष्यात . . .?
लग्नापूर्वी पलंगाच्या दोन्ही बाजूंनी उतरता येत होतं . . .!

यातला विनोदाचा भाग वगळला तर हे खरं आहे की , विवाह झाल्यावर दोघांचही आयुष्य बदलतं . .!

विवाहपूर्वीची प्रेमाची गुलाबी वाटचाल तिथं नसते . . . पुरुष प्रधान संस्कृतीत जगणारे आपण आणि आपल्या समाजाने पाळलेल्या परंपरा यामुळे आपणही नकळतपणे पतीच्या भुमिकेत शिरतो त्याच वेळी ती प्रेयसीच्या भुमिकेतून पत्नीच्या भुमिकेत जाते त्यावेळी तिची विचार करण्याची पध्दत बदलते . . !

टेढा है . . . पर मेरा है अशी एक जाहिरात आली होती तसं काहीसं ती आपल्या पतीला मानत असते त्यातच पतीला परमेश्वर मानणारा आपला समाज आसपास असतो.. आपण तारूण्यातला बेफिकरपणा सोडावा असं मत ती व्यक्त करीत असते आपल्यालाही तिथं काही बंधन आलय असं वाटायला लागतं.
... तिच्या अपेक्षा वाढत असतात आणि आक्षेप देखील... या अपेक्षा आणि आक्षेपातील गोंधळामुळे ताणाचे प्रसंगही वाढतात मग तो आणि तिचं प्रेम यात काही काळातं अंतर पडायला लागतं

लग्नाच्या वेळी असणारं प्रेम दोन्ही बाजूंनी एक धुसर रेषा ओलांडून प्रभुत्ववादाकडे कधी जातं ते कळत नाही मग त्यातून प्रेमाचं असलं तरी नातं हे बंधन होवून जातं . . . माझी बायको माझ्या शब्दाबाहेर नाही असा पुरुषी अंहकार जागा झाल्यावर मग Taken For Granted अर्थात गृहित धरण्याचा प्रकार सुरु होतो आणि यातून प्रभुत्ववादाची जाणीव होवून ' घुसमट सुरु होते.

पती आणि पत्नी यांच्यात स्पर्धा नसली तरी व्यक्तीमत्वात असणारा आक्रमकपणा मग वर्चस्वात रुपांतरीत होतो . . . दोघे समसमान असणं शक्य नाही त्यामुळे दोघांपैकी एक Dominate करतं आणि दुसऱ्याची त्यात घुसमट होते . . . अशा वेळी समोरच्या व्यक्तीला ' स्व' आहे त्याचा आदर करणं दूर राहतं मग ' तिची ' गरज जाणवते अगदीच आदर्शवादी न होता समाजात डोळसपणे बघावं मग आपल्याला जाणवेल . . . घरोघरी मातीच्या चुली !
प्रत्येकाला ' पर्सनल स्पेस ' हवी असते ती प्रत्येकाला मिळेलच असं नाही . . . . प्रेमात पडून विवाह झालेल्यांमध्ये वर्चस्वाची लढाई आणि पर्सनल स्पेस ची जाणीव यामुळे आगळा प्रसंग निर्माण होतो . . . यात समंजसपणे एकमेकांना पर्सनल स्पेस देणं.. समोर च्या व्यक्तीचा एक व्यक्ती म्हणून आदर करणं जिथं जमत नाही तिथं . . .

शादी मरने के बाद , रिश्ता सडने लगता है . . . यातून मग मार्ग घटस्फोटाचा ... !

साधारणपणे प्रेमविवाह केल्यानंतर ' ही पर्सनल स्पेस नाही म्हणून सर्वाधिक घटस्फोट होतात तुलनेत पारंपरिक जुळवणी करुन झालेले विवाह टिकतात असं दिसतं . . . इथं पुरुषी वर्चस्वातून ' पर्सनल स्पेस ' वर अतिक्रमण होतं आणि आयुष्य असंच आहे . .. आपलं नशीब म्हणत स्वत:मधील ' स्व ' ला पार गाडून टाकण्यांच काम भारतीय नारी करते.. म्हणून विवाह संस्था मजबूत आहे असं माझं मत आहे....

ला ईलाज को क्या ईलाज या उक्तीप्रमाणे... त्या पूर्ण कुटुंबाच्या लेखी येणाऱ्या विवाहितेने सप्तपदीच्या वेळी होणाऱ्या होमात आपल्या ' स्व ' ची पर्सनल स्पेसची आहुती दिलेली असते . . . !

व्यक्तीला व्यक्ती म्हणून नाकारणं चुकीचं आहे परंतु आपल्यकडे हा प्रकार सर्रास होतो . . .नातं टिकलं पाहिजे हे ठिक आहे पण त्यासाठी पर्सनल स्पेस' ची आहुती देणं म्हणजे गुलामगिरीच आहे . . !
पण लक्ष कोण देतो... या न्यायानं पर्सनल स्पेस सर्रासपणे नाकारली जाते ही अत्यंत वाईट बाब आहे.

... मै तूम में समा जाऊं

तूम मुझमे समा जाओ

ही समर्पणाची भावना प्रेम करताना सांगायला आणि गायला चांगली असते जगताना मात्र याचा त्रास होतो . . . पुरुषी अहं पायी स्वत:च अस्तिव संपवून बसलेल्या अनेक जणींना समाजात बघतो त्यावेळी राहवत नाही . . . स्त्रिया देखील घर सुटलं तर पुढं काय . . ना नोकरी . . त्यातून झालेल्या अपत्यांची चिंता . . .
अपरिहार्य होवून जातं सार..... त्याच वेळी ज्यांना पर्सनल स्पेस मिळतचं नाही अशांना जगणं विसरुन मरेपर्यंत जिवंत राहणं ... ! जगत राहणं . . . वेदना देखील होतात.

किमान माझ्या आयुष्यात ही पर्सनल स्पेस मी माझ्या घरात प्रत्येकाला देवू शकलो याचं खूप मोठं समाधान वाटत राहते . .

प्रशांत दैठणकर

9823199466

Thursday 19 July 2018

मेघा रे मेघा रे . . . .



मेघा रे मेघा रे . . . . 
. आज तू प्रेम का संदेस. . .

जितेंद्रच्या सिनेमातलं लहानपणी ऐकलेलं गांण . त्यावेळी कल्पनाच नव्हती हे काय आहे. गाण्याचे बोल कळले नाहीत पण गांण त्यावेळी वाजायचं. . . तबकडयांचा काळ होता तो. . . तबकडया अर्थात ग्रामोफोन त्यावर पैठणगेटच्या आसपास असणाऱ्या हॉटेल्समधून अनेकदा गाण्याचे सूर कानावर पडायचे आणि या तबकडयांमधील गाण्यांसाठी हॉटेंल्स मध्ये गर्दी रहायची .

गाण्यांसाठी
त्याकाळी आणखी एक पर्याय उपलब्ध्‍ होता तो म्हणजे रेडिओचा. . . . अर्थात त्या काळी तो एकच टाइमपास उपलब्ध होता सर्वांसाठी . . . टिव्ही खूप उशिराने आला आणि बघायला मिळाला. . . . शाळेत असताना कानावर पडलेले ते शब्द आपण जगणार आहोत याची जरा देखील कल्पना नव्हती.

त्यानंतर अनेक पावसाळे आले. . . पाहिले . . . जगलो . . .भिजलो. . . धूंद झालो . . प्रवास आजवर सुरुच आहे. पण गेल्या काही काळापासून यात फरक पडलाय. . . जूलै 2009 मध्ये मी विदर्भात आलो आणि आजपर्यंत इथं आहे. . . उद्याचं माहिती नाही. . . आल्या दिवसापासून त्यावेळचा पाऊस आणि आजचा पाऊस . . . तब्बल 9 वर्षे झालीत . . या काळात निसर्गाची अनेक रुंप बघितली . . इथला पाऊस बघितला इथल्या पावसात भिजलो . . काही काळ इथल्या पावसात रमलो . . . पण आठवत राहिला ती माझा तारुण्यातला पाऊस ...!

या विदर्भाचं एक वैशिष्टय आहे ते म्हणजे इथलं सौंदर्य . . .
जगात सर्वात सुंदर युवती कोठे आहेत असं विचारलं तर माझं उत्तर विदर्भ हेच आहे . . . विदर्भ कन्यांचं सौंदर्य खरोखर शब्दातीत असं आहे . . पुराणात देखील याचे दाखले आपणास सापडतात . . . विदर्भाचा राजा नल याची पत्नी दमयंती असो की प्रभू श्री कृष्णाची पत्नी रुक्मीणी या विदर्भातल्याच होत्या . . . !

रोमांच आणि रोमांस . . . हा पावसाचा खास परिणाम असतो . . . अन् इथं एकटेपणात 9 पावसाळे काढताना आठवतात त्या बालपणी कानावर पडलेल्या गाण्यांच्या
ओळी मेघा रे . . . मेघा रे . .

भविष्य . . . वर्तमान आणि भूतकाळ यात मन फिरायला लागतं ही आंदोलनं अधिक गतिमान होतात ती आकाशात मेघांनी गर्दी केल्यावर . .

अक्सर बारिश लाती है प्यार का मौसम . .

और गम की आज दूर है तुम और हम . .

पडणारा प्रत्येक पावसाचा थेंब हा अंगणात पडत असला तरी तो मनाला चिंब करीत असतो.
सौदर्याची परिमाणं प्रत्येकाची वेगळी आहेत. मात्र या सर्वांपलीकडे जाऊन प्रत्येकाला आवडेल असं सौंदर्य म्हणजे सौंदर्याची परिसिमा, असं म्हणता येईल
या परिसिमेपलिकडे असणारं वादातील सौंदर्य या विदर्भात बघायला मिळालं.

पावसात सौंदर्य अधिकच खूलत आणि ते जितंक खुलत तितकं मनाला त्रास देत असतं . . कदाचित कालीदासात आणि माझ्यात हाच एक धागा असेल भावनेचा त्याला नाकारण्यात आलं होतं आणि मला स्विकारण्यात आलं . . इतकाच काय तो फरक परंतु भावनांचं काय . .?

प्रेमाची भावना जितकी अधिक त्याच्या कैक पटीत विरहाची भावना मनाला असते . . . अगदी अपरिहार्य म्हणून विरह सहन करायचा . . . मग कालीदास . . . ते मेघ आणि . . . मेघदूत विरह की सजा . . प्रश्न आणि पाऊस पडताना प्रत्येक सरी सोबत प्रश्न माझ्या अंगणात उतरतो . . .

मनात घर करतो पडणारी प्रत्येक सर . . त्या क्षणांची आठवण़ जागवणारी असते . . . पावसाचा प्रत्येक थेंब . . . भावनांनी चिंब होत जाणारं मन आणि चिंब चिंब होणारा देह . . . तो बाहेरच्या अंगणात बरसत असतो आणि मनाच्या गाभाऱ्यात भावनांचा पूर दाटलेला असतो . . . एखादया गाफील क्षणी मग हो पूर डोळयांची कवाडं लोटून बाहेर पडतो . . . ताल असतो ओठांमधून कोंडून ठेवलेल्या हुंदक्यांचा .

आषाढस्य . . सृष्टी सजली आतापर्यंतच्या पावसाने . . . ग्रीष्मात तापलेली धरणी वर्षा त्रृतूच्या आगमनाने तृप्त होण्याचा हा काळ . . धरतीनं हिरवाई ल्याली . . . त्यात आसपासच्या डोंगरांवर मेघांचे आवरण आणि त्या धरतीच्या हिरवाईवर पहाटभर पसरलेली धुक्याची दुलई . . . ज्या क्षणांना तू माझ्यासवे अन् मी तुझ्या सवे या पाऊस धारांना मोती समजून वेचलं त्या क्षणांची . .
ते क्षण . . . ते दिवस भारलेले . . मंतरलेले . .

- प्रशांत दैठणकर

9823199466

Thursday 12 July 2018

आत्मभान..... लक्षवेधी....!



' लक्ष्य ' चित्रपटातलं गाणं मला अधून मधून आठवतं आणि विचारात गुंतवून टाकतं.......

मै ऐसा क्यूं हूं ?.... मै ऐसा ही हूं . .!

अंतर्मनात प्रश्न जागा होतो आणि विचारांना गती मिळते . . . कोहम् अर्थात मी नेमका कोण आहे , पासून मी असा का आहे ! . . . अशी प्रश्नांची डबागाडी रेल्वे रुळावरुन बुलेट ट्रेन च्या गतीने धावायला लागते. .. असं प्रत्येकाच्या मनात होत असतं . . . थोडक्यात आपण स्वत:चाच शोध घ्यायला लागतो.

प्रत्येकाला ' स्व ' अधिक आवडतो . . एखादी मुलगी समोरुन येत आहे म्हटल्यावर डोक्यावर हात फिरवून केस बरोबर आहेत ना याची खात्री आपण करतो. . . मुलींच काही वेगळं नाही बरं कुणीतरी आपल्याकडे बघितलच नाही असं घडण्याच्या स्थितीत अनेकजणी विचलीत होतात.

. . आपण बोलत जरी नसलो तरी आपल्या देहबोलीतून संवाद घडत असतो.

डोळे हे जुल्मी गडे

रोखून पाहू नका मजकडे


अर्थात नजर का मिलाना. . हिंदीत याला छान शब्द आहे . .नैन मटक्का . . आता याच नजरेने होणाऱ्या संवादातून . . . मैत्री , प्रेम , खुन्नस , कमी लेखणे आदी बाबी अगदी न बोलता घडतात.

सैराट सिेनमातला फेमस झालेला संवाद याच नजर रोखण्यावर बेतला आहे.

मी बघू की कायबी करु . . . !

आता बोलायचं तर नजरेची भाषा सर्वात चांगली भाषा . . यातून आपल्याला नकळत साद देता येते. अर्थात प्रतिसादही मिळत असतो असाच . . !

कुणी आपल्याकडे लक्ष देत नाही असं जाणवंल तर मनात विचारांचे आंदोलन सुरु होते . . . . एक प्रकारे इथं प्रत्येक जण स्वत:चं मार्केटींग करीत असतो . . .

कोणत्याही क्षेत्रात एखादी व्यक्ती प्रसिध्दी मिळवते त्यामागे खूप कारणं असतात . . . त्यात सर्वात महत्वाचं म्हणजे आपण त्याला संमती देतो . . . वानगीदाखल चित्रपटांचं उदाहरण अगदी जवळचं उदाहरण आहे. प्रत्येक जण मनोरंजनासोबतच त्यातील नायक - नायिकांमध्ये आपलं प्रतिबिबं शोधत असतात . . . ज्याला जितकं जवळ पोहचता येतं रसिकांच्या तो खरा नायक होतो, तो सूपरस्टार होतो.

माझ्यातल्या ' मी ' चं प्रतिबिब जिथं दिसतं त्याला मी आयुष्यभर जवळ करण्याच्या , मनात जपण्याचा प्रयत्न करतो.


आपल्याला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आपण स्वत:चा शोध घेणं अधिक महत्वाचं असतं . . . मी नेमका कसा आहे . . . मी असा का आहे या प्रश्नापासून याची सुरुवात होते . . . त्या गाण्यात त्याचं स्विकारणं देखील मांडलय . . . मी हा असा आहे हे मी कबूल करणं आणि त्या ' स्व ' शी प्रामाणिक राहणं यशाच्या मार्गावरील पहिली पायरी समजतो . . . ' मी '

लहान मूल बोलू शकत नाही त्यावेळी त्याला रडता येते . . . लक्ष वेधले जावे यासाठी लहान मूल रडत असते. मी माझा मित्र अश्वीन याच्या घरी माझी कन्या जान्हवीसह गेलो होतो ज्यावेळी ती तीन वर्षांची होती.आम्ही उभयता गप्पा मारत असताना गप्पांमध्ये गुंग झालो होतो . . त्यावेळी ती रडायला लागली . . आमचं लक्ष गेलच नाही गप्पांच्या नादात . . . मग तीच मध्ये येवून जोरात म्हणाली.

माझ्याकडे लक्ष द्या ना . . . मी रडतेय ना . . . !

तिच्या या वाक्यानं सर्व जण हसले नसते तरच नवल . . . तिची ही ' लक्षवेधी ' सर्वांच्याच स्मरणात आयुष्यभर राहील.

इथं प्रत्येक व्यक्ती आपल्या देहबोली तून स्वत:चं जणू मार्केटींग करीत असते . . . आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला काय हवं असतं याबाबत अनेक जण वेगवेगळी उत्तरं देतील . . . संपत्ती , सुख , समाधान . . . माझं मत आहे. प्रत्येकाला प्रसिध्दी हवी असते . . .
कोट्टयवधींची कमाई आहे. पण समाजात आपणास कुणीच ओळखत नाही अशा व्यक्ती विविध प्रकारे स्वत:ला प्रसिध्दी मिळेल याची खबरदारी घेतात.

पोरानं नाव काढलं . तुमच्या . . . असं वाक्य कोणाच्याही माय-बापाला सुखावणांर असवं . . ती एक प्रकारे पावती असते त्यांच्या मेहनतीची . . त्यांच्या संगोपनाची ही पावती त्यांनी आयुष्यभर झेललेल्या कष्टांचा विसर पाडणारी असते . . नवी उभारी देणारी असते . .

- To get Recognized ! हे मिशन प्रत्येकामधील ' स्व ' समोर असतं . . स्वत:शी सतत संवाद साधण्याची प्रक्रिया यासाठीच महत्वाची आहे.

अजय देवगण च्या ' प्यार तो होना ही था ' या चित्रपटात त्याच्या तोंडी एक वाक्य सातत्याने दिलय . .. ' ऐसा ही हूं मै '

मी आत्मसंवादातून माझा शोध घेतो त्यावेळी मला माझी हळू हळू ओळख होते . .
मी कुठे कमी पडतो हे देखील कळायला लागतं तसेच जमेच्या बाजू देखील कळतात . . . याचा पूर्ण उलगडा होणं म्हणजे आत्मभान होय.माझ्या जमेच्या बाजू आणि मर्यादा याचा ताळेबंद मांडून मी आयुष्याची वाटचाल केली तर मला यश लवकर मिळू शकते इतकं सोपं हे गणित आहे.

खूप अभ्यास करणारेच यशस्वी होतात असं काही नाही.... यश मिळवणं हे आपल्या 'स्व' वर अवलंबून आहे. माझ्या यशाचा विचार करताना माझी तुलना मी इतरांशी का करावी.... बहुतेक जण हीच चूक करतात....

माझी तुलना फक्त माझ्याशी आणि माझी स्पर्धा माझ्याशीच आहे. कारण माझ्या सारखं दुसरं कुणी या जगात नाही..... जगातली प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे. प्रत्येक व्यक्ती अव्दितीय आहे....प्रत्येकाच्या ठायी हा 'स्व' जागा झाला पाहिजे....म्हणजे माझ्या या जगात येण्याचा अर्थ मला कळेल व त्यानंतर जगण्यातली मजा वाढेल. जगात येण्याचा अर्थ मला कळेल व त्यानंतर जगण्यातली मजा वाढेल.

एक सुरेख व्यंगचित्र बघण्यात आलं,... एक माणूस देवाकडे प्रार्थना करतोय.

God Please Give me Everything to Enjoy My Life.

देवाचं उत्तर खूप मार्मिक आहे.

Idiot I have given you life to Enjoy Everything.

....... आयुष्याचं असंच असते.....

तुझे आहे तूजपाशी .....! हेच आपल्याला उमगलं तर आनंद शोधावा लागत नाही.

संपन्नता ही केवळ पैशांमध्ये असत नाही ती व्यक्ती परत्वे वेगवेगळी असते. छंद, जगण्याची मुल्ये, दृष्टीकोण, शिस्त तसेच अनुभव याबाबतीत संपन्नता असू शकते.
आपण आयुष्याचा या Angle ने कधी विचारच केलेला नाही.

आपली शिक्षण पध्दती केवळ विशिष्ट अशी बुध्दीमत्ता तपासते. हा शिक्षण पध्दतीचा सर्वात मोठा दोष आहे. यात गुणवंत असल्यानं जगणं सोपं होतं असा भ्रम आपण निर्माण करतोय असं माझं मत आहे. व्यक्तीपरत्वे त्याची बुध्दीमत्ता वेगळी असते.

आपल्याला गौतम बुध्दासारखी ज्ञानप्राप्ती होण्याची अपेक्षा नाही. ती उंची आपणास गाठता येणे अशक्य आहे. परंतु आपण 'स्व' जाणला आणि मानला तर यशाचा मार्ग सुकर व्हायला वेळ लागत नाही... किमान माणूस म्हणून चांगलं जगायला आपण शिकतो.

मै ऐसा ही हूं असं म्हणत आपण त्याला जोडून म्हटलं पाहिजे I am Unique…… अगदी आपण ज्या पध्दतीने सांगतो....... हम नही सुधरेंगे.....!
---प्रशांत दैठणकर

9823199466