Wednesday 8 August 2018

"पिकनिक" ब्रेक तो बनता है !


पिकनीक हा शब्द आपण ऐकतो, पिकनीक स्पॉटला भेटी देखील दिल्या आहेत आणि पिकनीकवर जाण्याचा आग्रह धरला जातो. परंतु पिकनीक चा इतिहास आणि त्याची आवश्यकता यावर आपण कधी गांभीर्याने बघितलेले नसणार. पिकनीक आणि मानसिक आरोग्य यांचा अतिशय जवळचा संबंध आहे आणि शारिरीक आरोग्यासाठीही पिकनीक आवश्यक ठरत असते.

एखाद्या निसर्गरम्य ठिकाणावर घराबाहेर फिरताना घेतले निसर्गभोजन अशी पिकनीकची व्याख्या करता येईल. अशाठिकाणी मोकळे मैदान, आरामासाठी खोल्या असाव्यात अशा ठिकाणी घरुन पिकनीक बास्केट मध्ये जेवणाचे पदार्थ घेऊन यायचे आणि तेथे मोकळया वातावरणात बार्बेक्यू करणे तसेच सॅन्डविच व इतर खाण्याचे पदार्थ बनवणे.
खेळ खेळणे, निसर्ग भटकंती करणे मग भोजन करणे आणि आराम करणे अशा स्वरुपाच्या पिकनीकची सुरुवात 15 व्या शकतकाच्या सुमारास झाली अशा नोंदी आपणास इतिहासात सापडतात.

मनुष्य प्राणी उत्क्रांत झाल्यावर आरंभी टोळयांमधून जगभर फिरला त्यानंतर समाज घडण्याची सुरुवात झाली. समाज म्हणून स्थिरावल्यावर शेती आणि इतर आवश्यक व्यवस्था अस्तित्वात आल्या मात्र त्या काळात आयुष्याला फारशी गती प्राप्त झाली नव्हती. आयुष्याला गती प्राप्त झाली यातून पुढील काळात राजेशाहीत समाज घटकांची वाटणी झाली यामध्ये मध्यमवर्ग किंवा कामगार वर्ग असा प्रवास सुरु झाला.

सलग काम करण्यातून येणारा थकवा आणि एककल्लीपणा दूर करण्याच्या भूमिकेतून अधून-मधून निसर्ग भटकंतीतून पुन्हा ताजेतवाने होणे या भूमिकेतून कुठेतरी पिकनिक शब्दातील भ्रमंती सुरु झाली. याला निश्चित असा लेखी पुरावा उपलब्ध नाही मात्र 15 व्या शतकानंतर या स्वरुपाची पेंटींग्ज त्या काळात रंगवली गेली. त्यांचा पुरावा मानून पिकनीक आपणास सांगणे शक्य आहे.

18 व्या शतकात आलेल्या औद्योगिक क्रांतीनंतर आयुष्याला अधिक गती वाढली त्यासोबतच श्रमिकांची संख्या वाढली. या श्रमिकांकडून सतत काम करुन घेताना त्यांची काम करण्याची क्षमता हळुहळू कमी होताना दिसत होती. यातूनच धार्मिक आधारावर युरोपमधून प्रथम रविवारी सुटी घेण्याची प्रथा सुरु झाली. हा श्रमिक वर्ग या साप्ताहीक सुटीचा वापर पिकनीक साठी करायला लागला.

आरंभी आसपासच्या जागांवर होणारे हे ठराविक काळानंतरचे पिकनीक नंतर कोटयवधींचा व्यवसाय बनलेल्या आणि जगाला गवसणी घालण्याची इच्छा बाळगणाऱ्या आपल्या प्रत्येकासाठी पर्यटन उद्योगात विस्तारीत होताना आपण बघितलाय.

पिकनीक का आवश्यक आहे...
यांच उत्तर रुटीनमधून चेंज हवा म्हणून, असे देता येईल. ती जितकी आपली शारिरीक गरज आहे त्याहीपेक्षा ती आपली मानसिक गरज अधिक आहे असे सांगता येईल. मानसशास्त्रीय अभ्यासातून असा हा पिकनीकचा ब्रेक आपणास आयुष्यात आवश्यक आहे हे सांगता येते.

सतत आजारी राहणाऱ्या व्यक्तीला डॉक्टर सल्ला देतात की जरा हवापालट होईल असे बघा. याचं कारण विविध ठिकाणी शहरी भागात आज प्रदुषणाने हवेतील घातक घटकांचे प्रमाण वाढलेले आहे. दमा किंवा तत्सम श्वसन विकार असणाराच नव्हे तर प्रत्येकाला याचा त्रास होत असतो. निसर्ग भ्रमंती करतांना चांगल्या दर्जाची प्राणवायू ने भरपूर असणारी हवा आजारातून सुटका करण्यास लाभदायी ठरते. त्यामुळे शारिरीक सुधारणा आणि तंदुरुस्तीसाठी पिकनीक आवश्यक ठरते.

आज घराघरात आई-वडील आणि मुलं हे आपआपल्या मोबाईलवर स्वत:च्या आभासी विश्वात गुंतत चालले आहेत. त्यामुळे कुटुंबातील नैसर्गिक बंध धोक्यात आले आहेत. घरात कुटुंबातील व्यक्तींचा संवाद कुंठला आहे. आणि जवळपास संपत आला आहे. अशा या आजच्या काळात चार दिवस वेगळया ठिकाणी आणि वेगळया विषयावर कुटुंबात चर्चा झाली तरच हे बंध पूर्ववत होवू शकतील यासाठीही पिकनीक आवश्यक आहे.

आपआपसातील संवाद वाढण्यासोबतच
पिकनीकच्या माध्यमातून आपणास नात्यांमध्ये मोकळेपणा निर्माण करणे व काळासोबत धावतांना ताणलेले संबंध सुधारणे आणि एकमेकांबाबत असणारे गैरसमज दूर करणे व नात्यांमधील दुरावा संपविणे अशा पिकनीकच्या माध्यमातून शक्य होत असते. यासाठी ही पिकनीक आजकाल आवश्यक झाले आहे.

अशा प्रकारच्या पिकनिक मध्ये दैनंदिन जीवनात असणाऱ्या बंधनातून मन सहाजिकच मोकळे होते. त्यामुळे त्याचे लक्ष इतर बाबींकडे जाते. यातून करायच्या राहीलेल्या गोष्टी करण्याकडे सर्वांचे लक्ष जाते. ज्यातुन बॅडमिंटन पासून बुध्दीबळासारखे खेळ खेळले जातात. यातुन शारिरीक व मानसिक पातळीवर झाल्या गोष्टी विसरुन नव्याने सुरुवात करण्याची मनोवृत्ती जागी होते. आणि वेळोवेळी आयुष्यात असे घडले तर मानसिक पातळीवर तरतरी कायम राहते असे आपणास दिसते.

पिकनीक' दरम्यान आपण जे खेळ खेळतो त्यातून आपले स्नायू मोकळे करण्यासोबत..... तणावाखाली आलेले मन मोकळे करण्याची संधी आपणास मिळते. त्याच सोबत येणाऱ्या काळात येणाऱ्या तणावाखाली मन तयार करण्याचा मार्ग देखील सापडत असतो.......  लहान मुलांसाठी उन्हात खेळणे आवश्यक आहे परंतु आजकाल नेटवरील खेळातून त्यांना ती फुरसतच मिळत नाही. आपली हाडे कॅल्शियमपासून तयार होतात. हे कॅल्शियम साधारण वयाच्या 30 वर्षापर्यंत शरीरात जमा होते.
आणि त्यानंतर त्याचा साठा होत नाही तर ते केवळ खर्च होत असते. उन्हात खेळताना सुर्यप्रकाशातून मिळणारे व्हिटामिन डी-3 हे हाडे मजबूत करीत असते. त्यामुळे जितका वेळ लहानपणी उन्हात खेळण्यात जातो तितका काळ हाडे मजबूत राहतात त्या दृष्टीकोणातूनही पिकनीक लाभदायक ठरते.

त्याचा मूड ठिक नाही असे आपण म्हणतो......., हा मूड म्हणजे तत्कालिक मानसिक अवस्था असते. थोडासा मोकळेपणा आणि वेगळे वातावरण मिळाल्यावर हाच मूड बदलायला वेळ लागत नाही....मूड बदलण्यासाठी देखील या प्रकारच्या पिकनीकची मदत होते. ... म्हणतात ना मूड होता नहीं है... मू़ड बनाना पडता है..

माझ्या दृष्टीने पिकनिकचा सर्वात मोठा फायदा कोणता असेल तर तो या काळात घडणारा आत्मसंवाद होय. टिपिकल अशा ऑफिस किंवा कामाच्या रुटीनमधून बाहेर पडताना घरी आल्यावर घरच्या कामांची जंत्री वाट बघत असते. त्या पूर्ण करुन होतान न होतात तोच पुन्हा नव्याने स्पर्धेत धावावे तसे कामाला जुंपून घ्यावे लागते. हे एक प्रकारचे न टाळता येण्यासारखे दुष्टचक्र असते. यातून बाहेर पडणे म्हणजे पिकनीक होय.

पिकनीकच्या काळात शब्द बदलतात,..... माणसांची संगत बदलते..... आपणाला जाणणारी आणि मनापासून जपणारी माणंसं आपलं कुटुंब आपल्यासोबत असतं जे आपल्या पडत्या काळात खंबीरपणे आपल्या पाठीशी उभं राहत असतं. जगातल्या साऱ्या संकटांचा मुकाबला करण्याचं बळ आपणास देत असतं.
रोजच्या धावपळीत आणि धकाधकित आपण तेच तर Miss करीत असतो. पिकनीकच्या निमित्ताने ते पाठबळ पुन्हा आपणास मिळतं.

आपण काय स्वप्न बाळगलय, आणि आज वास्तव काय आहे. यात अंतर पडत असेल तर आपलं नेमकेपणानं काय चुकतय या साऱ्यांचा परामर्ष घडवून आणणाऱ्या आत्मसंवादाची संधी पिकनिक आपणास देते.

पिकनिकला मराठीत सहल असा शब्द आहे. " फूलपाखरं आली सहलीवर...... रविवारची सुटी घालवू.......चला घडीभर गंमत करु " असं एक छानसं गाणं आहे. गाण्यात जी घडीभरची गंमत सांगितली आहे त्याचा अर्थ खूप गहन असाच आहे.

" पिकनीक " शब्द तसा छोटा पण यातून आयुष्याला नव्याने उभारी देण्याची ताकद आहे....
. त्यामुळे आपणही वेळ काढून पिकनीकसाठी भ्रमंती करायला पाहिजे....... ही काळाची नव्हे तर प्रत्येकाची मानसिक आणि शारिरीक गरज आहे.

मग करतायना प्लान पिकनिकचा ...... !

-प्रशांत दैठणकर
9890422826

Tuesday 7 August 2018

लाईफ . . असही . . !


पिंपळपानांची संथ.. लयबद्धशी सळसळ

 अंगणभर नुसता सडा गुलमोहराचा

अन् पसरलेला लिंबाचा पाचोळा

त्यावर घुमणारा तो  झाडूचा नाद

वैशाख वणव्यातही येणारी अल्हादक झुळूक 

धीर - गंभीर आवाजात साद देणारी

मंदिरातली भव्य पितळी घंटा

अन् त्या सादाचा गावभर येणारा पडसाद . .

सांज समय . . . मंद मंद  तेवती समई 

दारोदारी तुळशीत तेवणाऱ्या ज्योती

कुठे तरी दूरवरच्या अंगणात

न थांबलेला चिवचिवाट

शुभंकरोती . . म्हणणारे चिमुकले सूर

शांत चित्तानं जोडलेले दोन हात

शांत . . शांत . . संथ असं आयुष्य





भॉ s s s करत भेकत निघालेली 6.41 ची फास्ट

स्टेशन सरताना कमी होत जाणारा

सारा गलक्याचा आवाज

एकमेकांना चिकटून घट्ट उभी गर्दी . . .

घामानं निथळणारे कोमेजले चेहरे

उगाच . . वारा घालतोय अंसं दाखवणारा

असमर्थ असा लटकता पंखा

त्याही गर्दीत वाट काढणारे फेरीवाले

घर दूर अन् आठवण मनात

घरी . . वाट बघणार एक दार आहे . .

रेटयानं उतरणं, गर्दीतून सावरत

वाट शोधत पुन्हा फेरीत लागणं

केवळ रंगांचा गोंधळ . . मात्र

वासाचा पत्ता नसलेला तो गजरा

आवडीनं . . की सवयीनं . . ? घ्यायचा

रांगत जाणाऱ्या रांगेत आपणही

मुंगी होवुन रिक्षा पकडायची

मनासह थकल्या देहानं घर गाठायचं


घराघरातील किचनमध्ये

धडाडत्या कुकरच्या शिटटयांचा ऑर्केस्ट्रॉ

अन् कॉरिडॉरमध्ये घुमणारा

सास - बहू सिरियलचा आवाज

दिवसभर अंग - पलंग मोडून थकले

छातीत हवा भरुन पार्कातनं परतणारे

सक्रीय आयुष्यातून बाद झालेले

पेन्शनधारी मुंग्यांचे घोळके



घर - दार प्रसन्न करुन

दोन घडी हसण्याचा प्रयत्न करतानाच

दुसऱ्या दिवसाच्या रणांगणाची

तयारी करत... शस्त्र फळीवर ठेवणारे

बिच्चारे चाकरमानी योध्दे


आयुष्य असंच . . कुठं सक्रीय

कुठं गंभीर तर कुठं निक्रीय

आपण . . फक्त बघायचं

पर्याय नाही असं म्हणत प्रत्येकानं

शेवटच्या श्वासापर्यंत धीरानं

मरण येत नाही म्हणत जगायचं

------------------------------ मुंबई ते डोंबिवली . . 10-4 2001 

प्रशांत दैठणकर
9823199666


Saturday 4 August 2018

फ्रेन्डशिप. दोस्ताना .. याराना...मैत्री....!

 भारतीय हे मुळातच उत्सवप्रीय आणि तो उत्सव मग कोणताही असो, कोणत्याही धर्माचा असो त्याचे भारतियीकरण करुन आपण साजरे करायला सुरुवात करतो..... असाच गेल्या 3 दशकात लोकप्रिय झालेला उत्सव अर्थातच ' फ्रेन्डशिप डे ' होय.

चित्रपटवेडया भारतीयांनी शोले चित्रपटाला खूप प्रतिसाद दिला. त्यातली ती जय-विरुची जोडी हे दोस्तीचं प्रतिक जितकं सर्वांच्या लक्षात आहे तितकाच अमिताभ-अमजद खानचा याराना लक्षात आहे. रुपेरी पडद्यावर देास्ती फार जुना विषय आहे.....!

एकमेकांचे सुख दु:ख वाटून एकरुप होत जगणं,... म्हणजे मैत्री अशी साधी सोपी व्याख्या सांगता येईल पण मैत्रीचं नातं त्याच्याही पलिकडे जगलं जातं.... भावनिक ओलावा.... भावनिक पोकळी.... आणि मानसशासत्रीय दृष्ट्या बरेच असे पैलू आहेत ज्यावर मैत्रीचं हे नातं निर्माण होत असतं.

या मैत्रीच्या नात्यात आणि विवाहात खूप फरक आहे हे देखील सोबत सांगावं लागतं..... लग्नानंतर जोडीदाराशी मैत्री होणं वेगळं आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात व पुढे विवाहात होणं वेगळं मैत्रीला नात्याच्या बंधनाची गरज नसते....मैत्री म्हणजे give and take नसते....
कोणतीही अपेक्षा न ठेवता अर्थात निरपेक्ष वृत्तीने एखाद्याशी ' वेवलेंग्थ ' जुळली तरच पक्की मैत्री होत असते.

शाळेत वर्गात 40-50 मूलं मुली असतात ते वर्गमित्र असतात... आसपास आपण अनेक जणांसोबत काळ व्यतीत करतो.... खेळतो... ते सवंगडी असतात.... त्यात काहीच जणांना आपण मित्र म्हणून जवळ करतो....! आपल्या जमेच्या बाजू जगासमोर आरडून सांगण्याची आपली वृत्ती ही नैसर्गिक आहे.... पण आपल्यातला कमीपणा आपण जगाला सांगत नाही.... तो शेअर करायला आपल्याला 'मित्र' लागतात....! ते एक वेगळं मोकळं असं नातं... चूकल्यास चूक दाखवून देणारं.. त्याचा वाईटपणा वाटत नाही आपल्याला... एकमेकांसाठी झोकून देणं... काळ वेळ याचे भान हरपणं.. म्हणूनच मी म्हणतो की मैत्री ही शंकराच्या मंदिरासारखी असते.... शंकराच्या मंदिराला दार असतं नाही.. ते कायम खुलं असतं....

आयुष्यात काही गोष्टी अशा असतात की, त्या आपण सख्ख्या नात्यात शेअर करत नाही अगदी पत्नीसारख्या नात्यातही शेअरिंगच्या मर्यादा असतात.
असा आडपडदा मैत्रीच्या नात्यात राहत नाही....!

लम्हे चित्रपटात एक सुंदर दृश्य आहे. नायक अनिल कपूर एका संतापाच्या क्षणी त्याची सावली बनून राहणाऱ्या मित्राला, अनूपम खेरला माझ्या आयुष्यातून निघून जा असं सुनावतो त्यावेळी अनुपम खेर म्हणतो.... मै नही जा सकता, मुझे पता है तुम्हे रोनेके लिये एक कंधेकी जरुरत पडती है..... हनी इराणीने मैत्रीच्या नात्यातील हा पदर मोठया नजाकतीने समोर आणला आणि अनुपम खेरने आपल्या अभिनयातून तो अजरामर केला..... त्याचं सोनं केलं.

हिंदी चित्रपट सृष्टी गाणी, नातेसंबंध आणि भावना यांचं सुरेख मिश्रण आहे. त्यात असंख्य चित्रपट याच फ्रेंडशिपवर आधारलेले आपणास दिसतील......!

सात अजुबें इस दुनियां में आठवी अपनी जोडी....

तोडे से भई टुटे ना ये धरम-वीर की जोडी .....!

धमेंद्र आणि जितेंद्रची ही जोडी एक काळी खूप गाजली होती..... त्या मैत्रीच्या नात्याला अधोरेखीत करणारा असा हा चित्रपट होता.

मैत्रीचे अनेक पैलू विविध चित्रपटात आपण बघितले आहेत. याच मालेत अमिताभ बच्चन आणि शत्रुघ्न सिन्हा यांचा ' दोस्ताना ' प्रचंड यशस्वी ठरला होता....

पता कोई पुछे तो कहते है हम
के इक दुजे के दिलमें रहतें है हम....!


मैत्री अशीच असते ते नातं खूप खूप वेगळं नातं आहे.... यात दोस्त.... हो पक्का आणि सच्चा दोस्त़ इच्छा, आकांक्षा पुर्ण जाणून असतो. त्यामुळेच सच्चा दोस्त पक्का वैरी होण्याचाही मोठा धोका असतो.... भावनिक खुलेपणा कधी कधी वेगळे आणि कठीण असे प्रसंग आयुष्यात निर्माण करु शकतो याचीही जाणीव असावी असा पाठ देणारा हा ' दोस्ताना '.

विषय मैत्रीचा आहे म्हटल्यावर शोमन राज कपूरला कसं विसरता येईल.

दोस्त दोस्त ना रहा.....!
प्यार प्यार ना रहा....


अर्थातच चित्रपट ' संगम ' मैत्रीच्या नात्यात फूट पडणं काही नवं नाही पण हे अंतर केवळ गैरसमजातून पडतं.... कधी कधी ' अहं ' आडवा येतो..... पर चलता है दोस्ती मैत्री थांबत नाही.

पठाणाच्या भूमिकेतला प्राण ज्यावेळी मित्र बनतो त्यावेळी.

यारी है इमान मेरा ....यार मेरी जिंदगी....!

सारखं मैत्रीचं उदाहरण समोर येतं...
मैत्रीच्या या नात्याचा चित्रपट कथानकात सर्वात चांगला वापर फिरोज खानने केला... त्याला विनोद खन्ना सारखा उमदा नायक मैत्री साठी सापडला होता.... 80 च्या दशकातला ' कुर्बानी ' असो की 90 च्या दशकातला ' दयावान ' या दोघांची ऑनस्क्रीम आणि ऑफस्क्रीन मैत्री सर्वांसाठी आगळं उदाहरण ठरली.

चित्रपटांपलिकडे या मैत्रीचा विचार करु त्यावेळी अमेरिकेत पहिला फ्रेंडशिप डे साजरा झाला. त्याला उद्या बरोबर शंभर वर्ष पुर्ण होतील..... 1919 मध्ये सर्वप्रथम अधिकृत ' फ्रेंडशिप डे ' साजरा झाल्याची नोंद आहे. आपल्या भारतात हल्ली याचं महत्व वाढलय. जगभरात अनेक देशात संयुक्त राष्ट्रांनी घोषित केलेला फ्रेंडशिप डे हा 30 जुलैला साजरा होतो.

आम्हाला उत्सव साजरा करायला दिला की, आम्ही त्याला भारतीय रंग देऊन मोकळे होतो. त्यामुळे मैत्र या नात्याची ओळख म्हणून ' कृष्ण-सुदाम्याचे ' नाते आम्ही समोर करतो.... चारच दिवसांपुर्वी टिळक पुण्यतिथीला सोशल मिडियावर लोकमान्यांनी न खाल्लेल्या आणि न उचलायच्या शेंगाची टरफलं पसरली तसं या मैत्री दिनी आता येणारे 48 तास सुदाम्याचे पोहे सर्वांना सापडतील.

...... चाळीशी ओलांडल्यानंतर मैत्री होणं अवघड अशा स्थितीत मैत्री टिकवण्यासाठी ' फ्रेडशिप डे ' साजरा करायचा पण त्यातील किती जणांना ' फ्रेंडझोन ' माहिती आहे ?.... फ्रेंडशिप डे च्या पलिकडली वाटचाल करणाऱ्या नव्या पिढीलाच ते माहिती आहे....!

चाळीशीतल्यांनी फक्त प्रार्थना करायची. ...
. सलामत रहें दोस्ताना हमारा.....!

Happy Friendship Day.

 प्रशांत दैठणकर

9823199466

Wednesday 1 August 2018

हाथ से छूकर इसे रिश्तोंका इल्जाम ना दो ....


ती आठवणीतली . . लहानपणीची . . कोणास ठाऊक आज कुठे आहे ती ? त्या वेळी ती माझी सावली असल्याप्रमाणे वावरायची आज मला वेळ नाही अन् कदाचित तिला फुरसत नसावी . .. संसाराच्या राम रगाडयात गुंतली असणार हे नक्की . . .!

माझी उंची जेमतेम 5 फूट होती त्यावेळी वर्ग आठवा . . . आजही आठवतो आणि तिची उंची साधारणपणे 6 फूट . . . सशक्त . . . शाळेच्या बास्केटबॉल टिममध्ये होती . . . रंग गोरा पान आणि लोभसवाण्या मुखडयावर पडणारी ती खळी . . . त्यात अधिक जमेची बाजू म्हणजे निचे घारे आणि टपोरे डोळे . .
. मला सहसा घाऱ्या डोळयाची माणसं आवडत नाहीत पण ती आवडायची . . . !

साऱ्या गल्लीभर होणारी ती चर्चा कानावर कधी आली तरी आम्ही दोघांनी त्याकडे कधी लक्ष दिलं नाही आठवी ते दहावीच्या त्या प्रवासात ती माझी सखी होती ती माझी राधा होती . . . मैत्र आणि मैत्रीच्या पलिकडे मनात कुठलाही विचार कधी आला नाही . . निखळ मैत्री, मुलगा आणि मुलगी हो मुलगा आणि मुलगी यांच्यातही निखळ मैत्री होवू शकते याचं ते उदाहरण होतं प्रत्यक्षातलं . . आज मागे वळून बघितल्यावर जाणवतं . . . मन निष्कलंक, निष्पाप असेल तरच अशी मैत्री होते . . तशी ती मैत्री होती . . . !

ती मुलगी असूनही मित्र मात्र ' गर्लफ्रेंड' म्हणता येणार नाही. असं नातं जपंल होतं. त्यात ती राजस्थानी असल्याने माझ्या घरी तिला अन् तिच्या घरी मला घरच्यासारखं अगदी कुटूंबातील एक व्यक्ती आहे असं म्हणून वागणूक मिळायची.

तिच्या अंगणात भलं मोठं पिंपळाचं झाड आणि त्याचा पार होता. त्या पाराजवळ बैदूल अर्थात गोटया खेळणाऱ्या गल्लीतल्या साऱ्या मुलांचा सकाळ संध्याकाळ कल्ला सुरु रहायचा साधारण एकाच वयोगटातील गल्लीत असणाऱ्या मुलांची संख्या 35 पेक्षा अधिक होती.
त्या मुलांनी गोटया खेळायला सुरुवात केली डावावर डाव जिंकत गोटयांची संख्या इतकी वाढायची की चक्क परात घेऊन गोटयां फेकाव्या लागत होत्या तो रंगलेला डाव तासनतास बघण्यातील गंमत वेगळीच होती.

टि. व्ही विरहीत असलेल्या दिवसांमध्ये शाळेचा वेळ सोडला तर बाकी सारा वेळ हा फक्त खेळण्यासाठी होता आणि विशेष म्हणजे ते सर्व खेळ मैदानी होते. नाही म्हणायला उन्हाळी सुट्टयात दुपारच्या उन्हात जायची बंदी असलेल्या काळात एखाद्याच्या घरात बसून ' व्यापार ' खेळणे किंवा पत्त्यामधील लाल पान सात , पाच तीन दोन तर कधी झब्बू असे खेळ रंगायचे. गल्लीत कॅरम दोन- तीन जणांकडेच होता. अगदी हक्काने माझा पार्टनर म्हणून ती हट्ट करायची .

माझ्या सोबत दुपारी घरात बसून आईच्या हातचं जेवण हा दोघांचा दुपारचा नित्यक्रम ठरलेला . घरं तसं खूप मोठं नव्हतं साधारण 12 बाय 12 ची एक खोली त्यामध्ये आई - नाना मी आणि दोन लहान बहिणी असा परिवार जागा रहायच्या दृष्टीने छोटी असली तरी मनात भरपूर जागा असल्यानं ती माझ्या घरातली एक सदस्य बनली होती.

प्रशांत मुझे History -Geography पढाओना असा तिचा हट्ट पुरवण्याचं काम मी देखील आनंदानं पार पाडत होतो. इतिहास आणि भूगोल या विषयात मला पैकीच्या पैकी मार्क मिळायचे त्यामुळे शाळेतही तसा आग्रह असायचा तिची मातृभाषा मराठी नव्हती. त्यामुळे तिला हे विषय अवघड वाटत होते . .
आमच्या दोघामध्ये एक साम्य होतं ते गणिताच्या बाबतीत . . . दोघांचं मैत्रीचं गणित पक्क होतं पण अभ्यासातील गणिताच्या विशेषत: अंकगणिताचा विषय नावडीचा होता.

दिवसामागून दिवस जात राहिले आणि मैत्रीचा धागा अधिक घट्ट झाला . . . त्याच सुमारास गल्लीतलं घर सोडून दुसऱ्या ठिकाणी घर घेतलं दरम्यानच्या काळात नववी व दहावी दरम्यान आमच्या दोघांच्या मैत्रीत आणखी एक मैत्रीण Add झाली होती त्यामुळे मैत्रीची रंगत अधिकच वाढली होती.


घर बदललं त्याच सुमारास दहावी पूर्ण होवून सायन्सला प्रवेश घेतलेला तिने मात्र दुसऱ्या कॉलेजला प्रवेश घेतला होता. घर आणि महाविद्यालय दोन्ही दुरावल्यावर नव्या विश्वात सामावून घेताना नवे मित्र होत गेले बदलाचं आणि अधिकाधीक बदलण्याच हा काळ होता. त्याच सुमारास माझी आणि विजयाची भेट झाली . . . पहिल्याचं भेटीत तिने खणखणीत सवाल केला लग्न करणार असेल तरच . .पहिली भेट आणि स्विकार . . . आयुष्याला पूर्ण कलाटणी होती ती . मी बाराव्या वर्गात तर विजया अकरावीला त्या भेटीनंतर जग बदललं. . . या नात्यात आता ब-यापैकी अंतर  पडलं होतं . . .हे अंतर नंतरच्या काळात वाढतच गेलं.... हळू हळू संपर्क कमीच झाला आणि भेटी होईनाशा झाल्या एव्हाना तिच्या कुटूंबियांच्या दृष्टीनं ती लग्नाच्या वयात आलेली अन् झटपट लग्नही झालं होतीच ती तितकी सुंदर अगदी आरसपानी सौदंर्य म्हणतात तसं ते सौदंर्य . . माझी गल्ली सुटली आणि मैत्री देखील . . .सुटले नाहीत ते आठवणींचे धागे... काळ आपल्या गतीने चालतच आहे मात्र आठवणींचे धागे देखील काळासोबत अधिक घट्ट होताना मला जाणवतात हा प्रवास असाच चालणारा असतो हे काही वेगळं सांगायला नको...
त्या वयात असणा-या तिच्या सौंदर्याची भूरळ इतरांना निश्चितपणे पडली होती. . आजही कटरिना कैफ पडद्यावर दिसली की तिची आठवण येते . . . अगदी तशीच सुंदर होती ती . . . इतक्या वर्षांनी आठवण . . . येते अधून - मधून . . मन कधी एखाद्या क्षणी त्या काळात गेलं तर तिची आठवण येते . . . ते मैत्रीचं नातं आठवून आनंद होतो . . !

ती कुठे असते . . . किंवा ती सध्या काय करते याची उत्सुकता असली तरी आजवर मी त्याबाबत कधी विचारणा केली नाही . . . माहिती घेण्याचाही प्रयत्न केला नाही . . . काही नाती फक्त नशिबानं मिळतात . . . ते भाग्य दोघांचं होतं . . . ती तिच्या विश्वात असेल अन् मी माझ्या विश्वात . . . !

त्या वयात पडलेलं ते स्वप्न समजून आजवर ते नातं उरात जपलय . . .
वहीत ठेवलेल्या पिंपळपानांसारखं, तिची ती निखळ मैत्री . . . ते सौंदर्य अन् ते घारे डोळे . . . आता इतका काळ गेलाय की तिचा चेहराही धुसर झालाय स्मृतीत गेला... आज ती एखा्द्या वेळी समोरून गेली तरी मी तिला ओळखेनच याचीही खात्री नाही माझ्या मनाला..... आठवणीत असणारी  अजूनही 12- 13 वर्षांचीच आहे  आता तीच आठवण जगायची ... तिच्या आठवणी सोबत गाणं अंतर्मनात वाजायला लागतं.

हमनें देखी है इन आखोंमे महकती खुशबू

हातसे छुके इसे रिश्तोंका इल्जाम ना दो . .


निखळ मैत्रीतली ते निष्पाप प्रेम आजही नात्यात बांधायचा विचार देखील मनात येत नाही . . कदाचित आयुष्य अशाच नात्यांची गुंफण असतं .

प्रशांत दैठणकर

9823199466