Saturday, 12 September 2015

विकासाची मानसिकता ...


बदल ही संसार का नियम है अस भगवदगीतेतलं एक वचन आहे. ही संज्ञा सर्वत्र लागू होते. या बदलाची दुसरी बाजू म्हणजे विरोधाची असते. जितका मोठा बदल अधिक मोठा विरोध ही मानवी भूमिका अनुभवास येत असते.

लोककल्याणकारी संकल्पनेतील लोकांनी लोकांसाठी चालविलेलं राज्य म्हणजे लोकशाही होय. या संकल्पनेनुसार राज्य चालवताना एकत्रित झालेल्या या समाजघटकांच्या उन्नतीसाठी लोकांकडून प्राप्त करातून उपाययोजना करणे अपेक्षीत असते. ही उन्नतीसाठी करावी लागणारी प्रक्रिया म्हणजे विकास होय. आता या विकासाच्या नाण्याची दुसरी बाजू अविकसितपणा असायला हवी मात्रआजकाल त्याची दुसरी बाजू विरोधाची बनली आहे. कारण अर्थात विकास ही बदलाचीच प्रक्रिया असते.

माझ्या घराचा, वस्तीचा आणि गावाचा विकास मला नक्कीच हवा आहे असं आग्रहाने प्रत्येक व्यक्ती सांगते मात्र त्या विकासासाठी येणाऱ्या बदलांना विरोध करणाऱ्यांची संख्या मोठया प्रमाणावर वाढल्याने विकास होत नाही अशी स्थिती थोडयाफार फरकाने सगळीकडे दिसते.

विकासाच्या या प्रक्रियेत जे अडथळे आहेत त्यात भूमिकेचे आकलन न होणे ही बाब महत्वाची आहे. आजची स्थिती याच "डेडलॉक" वर आली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी असणारी त्यागाची भूमिका आता विस्मरणात गेली आहे. दूरदृष्टी असेल तर विकास शक्य होतो मात्र त्याच्या अभावाने short sight फायद्यासाठी होणाऱ्या विकासकामांना विरोध झाल्यामुळे विकासाची गती खुंटते आणि अल्पकालीन व दिर्घकालीन दोन्ही लाभ दूर राहतात व तेहही गेले, तुपही गेले म्हणत धुपाटणे हाती राहते व विकास झाला नाही, अन्याय होत आहे अशी ओरड करीत धोपटण्याचा कार्यक्रम सुरु होतेा.

विकास हवा पण कोणते मोल देवून ही आता परवलीची भूमिका मांडणारे समोर आले आणि त्यामधून प्रवाह अडला हे सर्वांनी ध्यानी घेतले पाहिजे. विकास घडवून आणण्यासाठी प्रत्येकाला काही ना काही योगदान द्यावे लागत असते. काही जणांना त्याग देखील करावा लागतो मात्र प्रत्येक जण केवळ फायद्याचा विचार करीत असेल तर विकास होणारच नाही.

आपण ज्यावेळी हक्काची लढाई म्हणतो त्यावेळी आपण आपल्या कर्तव्यांचे किती पालन करतो असा सवाल आपण अंतर्मनाला करावा लागणार असल्याने आपण comfort zone न सोडण्याची भूमिका घेतोय असही जाणवेल.

आपण आपली मानसिकता काय हे तपासले पाहिजे. गरज असल्यास त्यात बदल केला पाहिजे म्हणजे बदल होईल. प्रत्येक व्यक्तीने या दृष्टीकोनातून विचार केला तरच समाजाची मानसिकता बदलेल आणि असे झाल्यानंतर आपण विकासाची पहिली पायरी गाठू. शिखर गाठायला फारसा वेळ लागणार नाही हे देखील तितकंच खरं.

प्रशांत अनंतराव दैठणकर
9823199466

Thursday, 10 September 2015

Status अपडेट करताना

काळ बदलतो आणि संदर्भ देखील बदलत्या काळात जग बदलत असतांना जे बदल येतात त्यातील अनेकांनी जाणीवही आपणास होत नसते. आपण ते दररोज जगत असतो मात्र केवळ आलं तसं जगणं ही वृत्ती असल्यानं साध्या -साध्या अशा बदलांकडे आपलं लक्ष जात नाही असाच एक बदल आणि खूप मोठा असूनही अंगळणी पडलेला बदल म्हणजे आपलं स्वत:च Status होय

आज नेटसॅन्ही म्हणण्यापेक्षा नेटक्रेझी पिढी काहीही झाल्यावर प्रथम फेसबूक सारख्या सोशल नेटवर्कीग साईटवर Status update करतांना आपणास दिसतात. काळाच्या ओघात या शब्दाचे अवमुल्यन झाले म्हणायचे की याचा अर्थ बदलला असं म्हणायचा असा सवाल पडतो.

आपलं समाजात असणारं स्थान नेमकं काय आहे याची स्थिती म्हणजे Staus अशी मुळ धारणा मात्र आता दहा मिनिटांचा पाऊस देखील स्टेट्स अपडेटचा विषय असतो. आपल्या आसपासची नवी पिढी लोकल ते ग्लोबल असा प्रवास करित नसून ती पिढी पूर्णपणे ग्लोबल झाली आहे. मात्र या तंत्रज्ञानाचा नेमका वापर करायचा कसा हे कुणालाच माहिती नाही त्यामुळे असं घडत असावं

चार आंधळया व्यक्तींनी हत्तीचं वर्णन करतांना हा हत्ती खांबासारखा आहे. असं म्हणणं किंवा तो दोरीसारखा भासणं हे जसं नैसार्गिक आहे. तस. हे सोशल मिडियातील स्टेट्स बाबतही घडताना दिसत आहे. मुळ इंग्रजी भाषेत Statusman किंवा Status

स्टेटस् या शब्दाला छेद देणारे अपडेटस् आपणास या साईटस् वर बघायला मिळतात. कुणाचा वाढदिवस असेल तर त्याला शुभेच्छा देण्यापासून त्या वाढदिवसाला केकचा फोटो पाठवून या (virtual) आभासी दुनियेत जन्मापासून मृत्यूपर्यंतचे सर्व सोहळे स्टेटस् बनलेले आपणास दिसतात. या सर्व जंत्रीत " स्टेटस " चा अर्थ आम्ही पूर्णपणे बदलून टाकला आहे.

असाच काहीसा प्रकार इतरही सोशल नेटवर्कींग माध्यमांबाबत आपणास बघायला मिळतो आहे. या एकाच गोष्टी सोबत विनाकारण पडणारा कवितांचा पाऊस हा तर एक मोठा चर्चेचा विषय आहे. अगदी र ला ट आणि ट ला प अशा स्वरुपात लिखाण करुन कविता टाकल्या जातात त्यावेळी खूप मनोरंजन होते.

यातच वेगवेगळया साईटसवर चोरी केलेली छायाचित्रे आणि कोटेशन्स आपल्या पध्दतीने अर्थ बदलून तर कधी अर्थाचा अनर्थ करीत टाकली जातात त्यावेळी आणखी हसू येतं.

तसं नाही म्हणायला काहीजण गांभीर्याने याकडे बघतात पण ते खूप कमी आहे. ठिक आहे अस असो की feeling low……. ते देखील आता एक status झालय...... चला ते पण अपडेट करु कारण अपडेट राहणं ही काळाची गरज आहे.

status चा आपल्याला अभिप्रेत अर्थ या नव्या माध्यमाने बदलून टाकलेला आपणास दिसतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपण मान्य केले असले तरी त्याला वाट करुन देणे आपणास जमलं नव्हतं. अशी वाट करुन देण्याचं काम या सोशल मिडियाने केलेलं आहे. त्यामुळे अभिव्यक्तीचा प्रवाह किंवा पूर सोडा तर चक्क त्सुनामी आलेली आपणास दिसते.
 प्रशांत अनंतराव दैठणकर
9823199466

Friday, 4 September 2015

श्रवण संस्कृती




आजकाल एक शब्द नव्याने प्रचलनात आला आहे. श्रवणसंस्कृती हा नवा नाही तर जुनाच शब्द आहे. मात्र गेल्या काही दशकात हा मागे पडला होता. श्रवण म्हणजे ऐकणे. आता हे ऐकण्याची काय संस्कृती असू शकते. मुळात केवळ ऐकणं हे मानवी स्वभावास पटणारं नाही.

एखादी व्यक्ती जर बोलत असेल तर दुसरी व्यक्ती केवळ एकत नाही. ती यक्ती त्यावर प्रतिक्रिया देते. हा झाला संवाद मात्र आपल्याकडे विद्वान व्यक्तींची संख्या कमी नाही त्यामुळे संवादावरुन वादाकडे नंतर वादविवाद आणि अखेरीस विसंवाद असा प्रवास सुरु होतो. "मी का म्हणून ऐकून घ्यायचं" असा अविर्भाव असेल तर संवाद होणार नाही आणि श्रवणसंस्कृती या शब्दाचा संबंध येणार नाही.

आजचा जमाना माहिती तंत्रज्ञान विस्फोटाचा जमाना आहे. प्रत्येकाच्या हातात तंत्रज्ञान स्मार्टफोनच्या रुपाने खेळतय. उचलला फोन लावला कानाला या उक्तीप्रमाणे सहजरित्या फोन उचलून लावणारी ही आजची पिढी आहे. सत्तरच्या आणि ऐंशीच्या दशकात ही स्थिती नव्हती भारतात दूरदर्शनचं जाळं विस्तारण्यापूर्वी केवळ रेडिओ हे एकच मनोरंजन आणि माहितीचं साधन होतं. त्यावेळी जी संस्कृती अस्तित्वात होती ती म्हणजे श्रवण संस्कृती.

कुतूहल हा मानवाचा स्थायीभाव आहे. रेडिओच्या त्या छोटयाश्या डब्ब्यामध्ये माणसं नेमकं कुठं बसून बोलतात या कुतूहलापायी रेडिओचं पोस्टमार्टेम मी लहानपणी केलं. आपणापैकी अनेकांना हा प्रश्न पडला असेल आणि काही जणांनी ही कृती देखील केलेली असेल. त्यावेळी एक आणि एकमेव पर्याय म्हणून याला स्वीकारणं भागच होतं

त्या काळात चित्रपट गृहांची संख्या देखील मर्यादीत अशीच होती. यामुळे नाक्यांवरील हॉटेल्सवर रेडिओवर गाणी ऐकणे आणि चित्रपटातील डायलॉगच्या ग्रामोफोन तबकडया ऐकणे हा "टाइमपास" होता आता ते चित्र डोळयासमोर आल्यावर हसू येईल मात्र हे सत्य आहे.


रेडिओने निर्माण केलेल्या या संस्कृतीने रेडिओ श्रीलंका अर्थात रेडिओ सिलोन वरील अमीन सायनीच्या बिनाका गीतमालाला सर्वाधिक श्रवणीय कार्यक्रमाचे स्थान दिले होते. आजच्या भाषेत त्याला टिआरपी म्हणता येईल. गावांमध्ये सणासुदीला भरणा-या यात्रांमध्ये वाजणारे भोंगे हे यात्रांची ओळख होते.

श्रवण संस्कृतीचा एक निराळा अर्थही त्याकाळात लागू होता. कमी शिक्षित समाजात एखादया जाणकार व्यक्तीने आणि तज्ञाने दिलेली माहिती लोक ऐकायचे त्यासाठी गर्दी व्हायची. साहित्यिक क्षेत्रात याच श्रवण संस्कृतीने व्याख्यानमालांची मुहूर्तमेढ रोवली व अशा व्याख्यानमाला रुजल्या त्यातून प्र.के.अत्रे यांच्यासारख्या अष्टपैलू व्यक्तीमत्वाने श्रोत्यांना भूरळ घातली त्यामुळेच त्यांना वक्ता दशसहस्प्रेशु नामाविधान देण्यात आलं.

या व्याख्यानमालांच्या नंतरच्या काळात या श्रवणसंस्कृतीचा ताबा राजकारणाने घेतला अठरापगड जातीच्या या समाजात आसेतूहिमाचल अशा आपल्या भारत देशात राजकीय सभांच्या माध्यमातून श्रवणसंस्कृती फोफावली याचा विनियोग मात्र केवळ सत्तेसाठी झालेला दिसून येतो. नंतरच्या काळात तंत्रज्ञानात झालेल्या क्रांतीमुळे टि.व्ही. नावाचा इडियट बॉक्स घराघरात आला आणि सायंकाळी मोकळया हवेत खेळणारं तरुणपण आणि निसर्गाला साद घालत रपेट करणारं प्रौढपण घरात या इडियट बॉक्ससमोर विसावलं त्यामुळे ज्यांना खेळण्याची नितांत आवश्यकता आहे अशी खेळण्याच्या वयातही मुलं देखील खेळण विसरली. ऐकण्यासोबतच दिसण्याची ताकद असणारं हे टिव्हीचं माध्यम घराघराचा ताबा घेतं झालं.

यावेळी जी सर्वांची प्रतिक्रिया होती ती अनिल कपूरच्या मिस्टर इंडिया चित्रपटात चांगलीच उमटली आहे. असं आपणास जाणवतं

मिलना क्या जो दिखाई ना दे

सारा का सारा सिर्फ सुनाई दे,

क्या करना है मिलके

ऐसे मिस्टर इंडियासे. 





खरच आहे. आजकालच्या स्वाईप आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग च्या जमान्यात नुसतं ऐकण्याचं कोणतं ते कौतूक असं म्हणावं लागतं.

टिव्हीच्या अतिक्रमणानंतर श्रवणसंस्कृतीला उतरती कला लागली. राज्याला नेतृत्व देणारे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख, दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे आदींचे नेतृत्व याच संस्कृतीने वादविवाद स्पर्धांच्या रुपाने समोर आले होते. टिव्हीचे आगमन झाल्यानंतरच्या काळातही डॉ. शिवाजीराव भोसले यांच्या ओघवत्या शब्दांची व्याख्याने ऐकायला गर्दी जमतच होती. मात्र समाजातले बदल झपाटयाने होत होते. "जुने जाऊ द्या मरणालागुनी" अशा आशयाची एक म्हण मराठीत आहे. त्याप्रमाणे सभांना आणि व्याख्यानांना होणाऱ्या गर्दीचे प्रमाण घटले. यातच दररोज मालिका अर्थात डेली सोपच्या रतीब इडियट बॉक्सवर सुरु झाला आणि त्यातून निर्माण झाली केवळ दर्शन संस्कृती.

दर्शन संस्कृतीत दूरदर्शनवरील आरंभीच्या काळात प्रक्षेपित हमलोग सारख्या मालिकेपासून ये जो है जिदंगी, खानदान, बुनियाद नंतरच्या काळात रामायण - महाभारत असा काळ गाजला या क्षणी जर कुणी म्हटलं असतं की श्रवण संस्कृती पुन्हा येणार आहे. तर त्याला उपचाराची गरज आहे. अशी प्रतिक्रिया इतरांनी दिली असती.

या स्थितीत "जुनं ते सोनं" या मराठी म्हणीचा प्रत्यय आला आणि पुन्हा एकदा श्रवण संस्कृतीला उभारी मिळाली ती एफएम रेडिओमुळे. "नव्याचे नऊ दिवस" अशी म्हण देखील यामुळेच सिध्द झाली.आपणास एका ठिकाणी अडकवून ठेवण टि.व्ही. ने साध्य केलं मात्र आपण एका जागी स्थिरावत नाही. दैनंदिन कामं करताना मनोरंजन व माहिती यासाठी रेडिओ हेच माध्यम उत्तम आहे हे नव्याने सिध्द झालं.

ऑल इंडिया रेडिओ ज्याला आपण आकाशवाणी म्हणून ओळखतो हा 86 वर्षापासून सेवा देत आहे. मात्र गेल्या दशकात आलेल्या खाजगी मनोरंजन एफएम वाहिन्यांनी सादरीकरणाच्या आधारे खूप मोठी आघाडी घेतली. यातील अर्थकारणाचा भाग बाजुला सोडला तरी एक बाब महत्वाची ती म्हणजे श्रवणसंस्कृती शाबूत आहे.

दोन व्यक्तींमधील संवादात एकानेच बोलणे म्हणजे संवाद होतच नाही. त्यात क्रिया-प्रतिक्रिया असा आलेख अपेक्षित असतो. मार्मिक पध्दतीने पती-पत्नी यांचे संवाद संबध आपल्याकडे सांगतात त्यावेळी हा संवाद


एक सवाल मै करु

एक सवाल तुम करो

हर सवाल का जवाब

सवाल ही हो.

अस असलं तरी ऐकण्याची ही नैसर्गिक सवय एक प्रकारची संस्कृती बनली आहे.

इंग्रजीत म्हणतात you should be a good listener to be become a good editor. यात इंतरांच ऐकुन घेणं अपेक्षित आहे. आपण व्यक्तीमत्व आणि त्याचा विकास यांच्या प्रवासात या श्रवण संस्कृतीच महत्व देखील जाणून घेतलं पाहिजे.

समर्थ म्हणतात दिसामाजी काही तरी लिहावे आणि पुढे प्रसंगी अखंडीत वाचित जावे असंही म्हटलयं.

वाचन म्हणजे इतरांच कथन आपण आपल्या नजरेतुन ग्रहण करणं हा देखील श्रवण संस्कृतीचाच एक पैलु आहे. त्यामुळे वेळ काढून वाचन करावं त्याहीपेक्षा महत्वाच आपण आपल्या अंतरंगाचं म्हणणं ऐकून घ्यावं.

आपल्या बाह्यरंगात आपण वेगळे आणि अंतरंगात वेगळे असतो. आपल्या मनातही संवाद होत असतो. आपल्यापैकी कितीजण तो ऐकतात? आसपासची परिस्थिती आणि आपली भूमिका याला न्याय देण्याच्या प्रयत्नात आपण आपला स्वत:चाच अंतर्मनातील आवाज ऐकत नाही हे देखील वास्तव आहे. आपण आपला आवाज ऐकणं हा या श्रवण संस्कृतीचा कळस असतो.

बॉस म्हणाला म्हणून करावं लागतं, कौटुंबिक गरजा म्हणून ऐकाव लागतं याच्या पुढे जाऊन आपला आतला आवाज ऐकणारी माणसं जग बदलतात असा अनुभव आहे.

"ऐकावे जनाचे, करावे मनाचे"

अस वचन तेच सांगत. त्याच महत्व वेगळं आहे. पण ऐकतो कोण?

ही स्थिती न आणता तांत्रिक श्रवणाच्या या संस्कृती प्रमाणेच या श्रवण संस्कृतीकडे वळण्याची हीच वेळ आहे.

--- प्रशांत अनंतराव दैठणकर

मो. 9823199466

जिल्हा माहिती अधिकारी,

गडचिरोली 



Wednesday, 2 September 2015

त्रिमितीतून चौथ्या मितीकडे

आयुष्य ही अनुभवांची एक अखेरच्या क्षणापर्यंत चालणारी मालिका आहे. यात कोणता प्रसंग कसा येणार याचं नियोजन प्रत्येक व्यक्ती करते मात्र तो प्रसंग जसाच्या तसा उभा राहणं अत्यंत अवघड असतं कारण काळ हा चौथ्या मितीत चालतो तुम्ही - आम्ही त्रिमितीच्या जगात जगतो. अगदी चित्रपट देखील त्रिमितीमध्ये बघायचा असेल तर आपणास वेगळी मेहनत घ्यावी लागते आणि वेगळया चष्म्यांचा आधार देखील घ्यावा लागत असतो.

या जगात आपण आपली प्रतिमा म्हणून जो फोटो बघतो तो देखील त्रिमितीत असत नाही त्यामुळे काळाची गती आणि चौथी मिती आपल्या आकलनापलीकडील असते हे मान्य केलेलं चांगलं. त्यामुळे आपलं आयुष्य आणि त्याचा प्रवास कदाचित अनाकलनीय होत असतो.

आपल्या हिंदू संस्कृतीत कर्माचं महत्व सांगितलं आहे. कर्म काय आहे याचही आकलन प्रत्येक व्यक्तीला होईलच असं नाही मात्र त्यापायी कर्म करण्यात कमी होत नाही. आपण जे काम करतो त्याला कर्म म्हणणार का ? नाही अर्थातच नित्य कामाला कर्म म्हणता येणार नाही. मग कर्म आहे तरी काय ? आणखी एक सवाल आणि मग सुरु होतो तो कर्माचा शोध.

कर्म ज्याला कळलं अशी व्यक्ती कोणाला म्हणायचं या प्रश्नांच उत्तर अर्थात ज्याला आपल्या जन्माचा बोध झाला आहे अशी व्यक्ती असं म्हणता येईल आपला जन्म इथं काही तरी वेगळ करण्यासाठी झाला याची जाणीव झाल्यावर काळाच्या चौथ्या मितीची ओळख होते. ते केवळ एक परिमाण नसून ती एक सिमारेषा आहे. याची जाण होते मग या त्रिमितीच्या सिमा ओलांडून चौथ्या मितीत प्रवेशाचा प्रयत्न सुरु होते. अर्थातच कालसापेक्ष जगणं विसरुन काळाच्याही पलिकडे विचार पोहोचतात हीच सृजनशीलतेची सुरुवात असते.

ज्याला काल आणि उद्या याचा प्रवास साधताना सुखदुख: जाणवत नाही अशीच माणसं सृजनातून जगाला वेगळा आयाम देण्याचा प्रयत्न करतात. यात प्रत्येक व्यक्ती यशस्वी होईलच असे नाही मात्र तसा प्रयत्न करण्यात अनेकांनी आयुष्य घालवल आहे. अशा प्रत्येक व्यक्तीसाठी हा प्रवास दैनंदिन अनुभवाची मालिका ठरते आणि यातूनच वैराग्याची भावना येत असते.

सामान्य आणि असामान्य यातील फरक कोणता असं विचारल्यावर सांगता येईल की आयुष्यामधील या प्रवासात चढ उतार सारख्याच मानसिक पातळीवर जगण्याची क्षमता ज्या व्यक्तीत येते ती वैराग्याचा अनुभव घेते व दरक्षणी नव्या संकटांचा मुकाबला करायला तयार असते. अशी व्यक्ती असामान्य होय. आयुष्यात आनंदाने काळ व्यतीत केल्यावर काही कडू प्रसंग येतात त्यावेळी मानसिक पातळीवर तितकी सक्षम प्रतिक्रिया देणं जमत नाही म्हणून ज्याला वैफल्य येतं ती व्यक्ती सामान्य व्यक्ती होय. जन्माला येणं ही मृत्यूकडील प्रवासाची सुरुवात आहे. आलेली प्रत्येक व्यक्ती जाणार हे नक्की मात्र वैराग्यातून येणारा मृत्यू आणि वैफल्यातून येणार मृत्यू यात खूप मोठं अंतर असतं वैराग्याचा पुढील प्रवास निरपेक्ष कर्माच्या दिशेने जातो ज्यालाच कदाचित मोक्षमार्ग म्हणणे अपेक्षित असेल.

वैफल्याचा प्रवासमात्र बहुतेक प्रसंगी स्वनाश अर्थात आत्महेत्त्येकडे जाणारा असतो. जन्माला येताना प्रत्येक व्यक्तीला निसर्ग काही अपवाद वगळता सारं दान देवून टाकतो मात्र ते दान सत्पात्री पडलं की नाही हे कर्माच्या मार्गावर कळतं कर्मकांड करणं म्हणजे कर्म नाही हे सुध्दा वेगळं सांगावं लागेल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात तसं

मनी नाही भाव

म्हणे देवा मला पाव......

देव अशानं पावायचा नाही रे

देव बाजारचा भाजीपाला नाही रे

केवळ देव - देव करणं म्हणजे कर्मकांड होय. आपण आपल्याप्रती आणि आपल्या जीवनात असणा-या प्रत्येक व्यक्तीप्रती जपलेली भावना म्हणजे कर्म होय आपली अंगी असणारी भूतदया अर्थात प्राणीप्रेम म्हणजे कर्म होय...त्याही पलिकडला विचार करुन जगणं म्हणजे कर्म होय आणि असे कर्म करणारे कालातीत असतात... काळ बदलला तरी आपण न बदलणं हा स्थायीभाव म्हणजे कर्म होय.

प्रशांत दैठणकर

Wednesday, 19 August 2015

या जन्मावर......या जगण्यावर



                सौंदर्य..... याची परिभाषा कुणाला करता आली आहे आजवर. चित्रपट सृष्टीतलं शापित सौंदर्य अर्थात मधुबाला असो की हॉलीवूडची मर्लिन मन्रो......प्रत्येक सौंदर्याला शाप असू शकत नाही......तसं पाहिलं तर सौंदर्य हे आपल्या बघण्याच्या नजरेवर अवलंबून असतं.
               छत्रपती शिवरायांनी सुरतेवर चढाई केली त्यावेळी राजांसमोर हजर करण्यात आलेल्या सूरतच्या सुभेदाराच्या पत्नीच्या सौंदर्याची वाखाणणी राजांनी अतिशय आदरानेच केली होती. सौंदर्य आणि त्याकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन आपलं व्यक्तीमत्व कसं आहे ते सांगत असतो.
              सौंदर्य प्रत्येकाच्या ठायी आहे पण म्हणतात ना हि-याची पारख फक्त जोहरी करु शकतो. पारखी नजर म्हणजे सौंदर्य शोधणं. आज बखरकारांनी केलेलं मस्तानीचं वर्णन आपल्या नजरेसमोर तेच सौंदर्य नव्यानं साकार करतं.
              तसं म्हटलं तर कबरस्थान काही फिरायला जाण्याची जागा होवू शकत नाही मात्र त्यातही सौंदर्य असेल तर जगातल्या सात आश्चर्यापैकी एक असणारा ताजमहल हे त्याचचं प्रतिक आहे. आपल्या लाडक्या मुमताज च्या प्रेमाखातर हा सुंदर ताजमहल उभा करून तिच्या स्मृतीला अजरामर करुन ठेवलय असचं म्हणता येईल.
            सौंदर्य आणि प्रिती हे हातात हात घालून चालतात असं म्हटल्यास वावगं ठरु नये मर्लिन मन्रोचे आणि जे.एफ.के.यांच्यातील बंध याच सौंदर्याच्या धाग्यात गुंफले होते. इकडे हॉलीवूडच्या चर्चा हल्ली जास्त होत आहे कारण माध्यमांचा विस्तार झाला आहे.मर्लिन पेक्षाही अधिक सौंदर्य असणारी अभिनेत्री म्हणजे एन्ग्रीड बर्गमन होय. तिचं सौंदर्य ख-या अर्थाने आरसपानी असं होतं.
         
   सौंदर्याचं बखाण करताना त्याच सुंदर शब्दांचा वापर करावा लागतो पंकज उधास यांच्या आवाजातील एक गाणं इन्ग्रीडचं सौंदर्य आपल्यासमोर उभं करतं
चांदी जैसा रंग है तेरा सोने जैसे बाल.........
 एक तू ही धनवान है गोरी बाकी सब कंगाल
              काय ती कविकल्पना.....खरचं जो न देखे रवि ते देखे कवी असचं म्हणावे लागेल.
               उगवत्या सूर्याची प्रभा आणि मावळतीचा सूर्य यांच्या जोडीला पौर्णिमेच्या एक दिवस आधीचा चौदहवी का चांद म्हणजे सौंदर्य......त्याचं वर्णन देखील शब्दातीत
               बॉलीवूड मध्ये निरनिराळया शायर लोकांनी या सौंदर्याच्या वर्णनात शब्दांचा जो वापर केला आहे त्याला काही तोडच नाही असं म्हणता येतं ते यासाठीच
              जुल्फे......हा शब्द म्हणजे सौंदर्य.......बलखाती लट, गेंसू असे निरनिराळे उर्दू शब्द सौंदर्याचं रुप आपल्या डोळयापुढे उभं करीत असतात.
              सौंदर्य म्हणजे एक आंतरिक भावना......मनाला जे भावतं ते सौंदर्य असतं......पावसानंतर हिरवाईने नटलेल्या डोंगर रांगा......पहाटेच्या उन्हात चमकणारे गवतांवरील दवबिंदू म्हणले सौंदर्य......दूरपर्यंत पसरलेल्या पिकांमधून वाहणारा वारा आणि त्याच्या तालावर डोलणारी ती कणसांची रांग म्हणजे सौंदर्य.....हसताना गालावर पडणारी खळी अर्थात डिंपल म्हणले सौंदर्य.....अनेक रुपात आपणास ही अनुभूती येते.
             लता मंगेशकरांचा आवाज आणि आशाबाईंचा सूर देखील सौंदर्यच.....सौंदर्य नजरेतूनच कळतं असं नव्हे तर ते श्रवणातून, गंधातून आणि स्पर्शातून देखील कळत असतं. एखादा मनाला भावणारा आणि सतत ऐकत रहावं असा वाटणारा आवाज म्हणजे देखील सौंदर्य.
            माझे एक मुस्लीम सहकारी सांगायचे की, फल, सब्जी, अनाज यह जिस्म का खाना है| तो सुगंध रुह का......तप्त अशा धरतीवर पावसाचे थेंब पडायला लागतात आणि तापलेल्या मातीशी थेंबांचे मिलन झाल्यावर जो दरवळ येतो तो मृदगंध म्हणजे देखील सौंदर्यचं.......

    असं आयुष्य जगणा-यांचे काही अनुभव आपणास वेगळ्या जगात नक्कीच नेणारे असतात. पण त्यातून एकच जाणवत की जगताना धुंद होवून जगायचं असतं.. जगात असणारी सुंदरता आपण टिपायची असते. जग जाणायचं असतं.. कारण इथलं इथंच संपणार आहे.
   सौंदर्य एक अनुभूती असते आपल्या जगण्याची......जगत राहण्याची आशा तर कधी प्रेरणा असते म्हणूनच म्हणावं.

इथल्या पिंपळपानांवरती.................................

....... या जन्मावर या जगण्यावर..शतदा प्रेम करावे.

                                                                                    - प्रशांत दैठणकर

Tuesday, 22 July 2014

पाऊस झेलतांना.......!

गर्द काळया ढगांची गर्दी येणा-या पावसाची वर्दी देत होती घरापासून चार पावलं चाललो नाही की त्यानं बरसायला सुरुवात केली होती. सारे आसपासच्या झाडांचा आणि आडोशांचा आधार घेऊन पावसापासून अंतर ठेवून होते मी माञ तसाच पाऊस अंगावर झेलत पायी चालत राहिलो. नाक्याच्या त्या ठेल्यावरल्या भज्यांच्या वासाने मन एकदम कॉलेजात पोहोचलं.
 अशीच ती एक भिजलेली दुपार ती आणि मी माझ्या TVS वर पाऊस झेलत असं धुंदपणे रस्त्यावरुन जात होतो. नाही म्हणायला दोघांनाही भिजायला आवडतं. भिजण्यात देखील तिचं लॉजिक असायचं. सर्व आटोपून घराबाहेर पडताना पाऊस आला म्हणजे तो नकोसा असतो माञ सर्व कामे आटोपून परत येताना तो आला म्हण्जे चिक्कार मज्जा……… मग धुंद भिजायचं. 
ती श्रावणातली दुपार होती. एल.आय.सी. च्या पदभरतीची परीक्षा देवून ती परतली आणि तिला घेवून मी शहराच्या मध्यवस्तीत चिंब भिजत चाललोय. आडोशाला लपून पावसाला टाळणा-या प्रत्येकाला कदाचित आमचा हेवा वाटत होता. किमान त्यांची नजर तरी तसं बोलत होती. चिंब चिंब भिजल्यावर औरंगपु-याच्या एका हॉटेलमध्ये गरम कॉफीचे घोट थंडी कमी करत होते. अगदी रोमँटीक असा क्षण
पावसाचं आणि माझं काही आगळं नातं आहे. प्रेमात पडल्यावर प्रश्न् पडला की याला पडणं का म्हणतात. किती सुंदर भावना आहे ही………या पडण्यावर आम
च्या वेदांतने मागच्या महिन्यात विचारलेला सवाल आठवतो बाबा घराचा स्लॅब बांधतात मग सगळे स्लॅब पडला का असं का विचारतात. जाऊ दे पडणं………तेही पावसाच्या साक्षीनं
ती नंतर पत्नीच्या आणि आईच्या भूमिकेत शिरली असली तरी तिचा मिश्कील स्वभाव गेलेला नाही माञ हल्ली पावसात तिच्यातली आई जागृत होते त्यावेळी मुलं फोन करतात बाबा छान पाऊस पडतोय……..आई ओरडणार हे ठाऊक असल्यानं मला फोन करायचा मग उत्तर………फोन काय करताय जा पळा भिजायला……..!येरे येरे पावसा........म्हणत बालपण चिंब भिजलं पाहिजे आणि “रिमझिम गिरे सावन” म्हणत तारुण्य् धुंद झालं पाहिजे. 
म्हणतात ना, 
ऐ बारिश इतना ना बरसके वो आ ना सके………!और उनके आनेके बादइतना तू बरस…….के वो जा ना सके.
पुन्हा वळून बघताना 26 वर्षांपूर्वीची माझी वाक्ये मला पुन्हा आठवली.
उदयाच्या वर्तमानात रम्य् आठवणी हव्या असतील तर आजच्या वर्तमानात तसं आपण जगायला हवं………मनसोक्त्……मनमोकळं होवून…….!
पावसाच्या पाण्यात पापण्यांच्या कडा ओलावल्या तरी कुणाला कळणार आहे की हा पाऊस नभीचा आहे की अंतरीचा……..आपण आपलं चालत रहायचं…….न थकता……पाऊस झेलत…….!

Monday, 21 October 2013

रस्ते सुरक्षा साक्षरतेची निकड


रस्त्यावर होणा-या अपघातांचे प्रमाण वाढतच आहे. गेल्या वर्षाभरामध्ये भारतात रस्ते अपघातात मृत्यूंची संख्या साधारण दीड लाख इतकी होती.मात्र अपघात जखमी झालेल्यांची संख्या त्याहीपेक्षा जास्त आहे. त्याखेरीज चिंतेचा विषय म्हणजे राष्ट्राची अब्जावधींची संपती यात नष्ट झाली. या सर्व पार्श्वभूमीवर विचार करताना एकच बाब जाणवते ती म्हणजे रस्ता सुरक्षा विषयक जागृती आपल्याकडे जवळपास नाही. 
चित्रपट आणि वास्तव यात फरक असतो पण चित्रपटात भन्नाट वेगाने गाडी चालवताना बघून त्या धूम चे अनुकरण रस्त्यावर केल्‍यास अपघात होतो. यामुळेच रस्त्‍यावरील अपघातात दुचाकीस्वारांच्या मृत्यूचे प्रमाण  अधिक आहे. त्याहीपेक्षा अधिक चिंताजनक बाब म्हणजे यात 18 ते 30 वर्षे वयोगटातील तरुण मुलांचे प्रमाण सर्वाधिक आहे.
रस्त्यांवर वाहन चालवताना ज्या प्रकारची काळजी घ्यायला हवी त्‍याप्रकारची काळजी घेतली जात नाही. याला कारण अर्थातच प्रशिक्षणाचा आभाव हेच आहे. चारचाकी वाहन परवाना मिळवायचा असेल तर काही प्रमाणात त्याला प्रशिक्षणाची जोड आपणाकडे देण्यात आलेली आहे. मात्र दुचाकीच्या बाबतीत असं औपचारिक प्रशिक्षण दिलं जात नाही.
चारचाकी वाहनात चालवताना किमान संतुलन करण्याची आवश्यकता नसते. संतुलन दुचाकीवर आवश्यक ठरते. यामुळेच गतीचे वाहन चालविताना अचानक खड्डा आल्‍यास किंवा गतीरोधकावर संतुलन बिघडून अपघात होण्याची शक्यता असते. खड्डे चुकविताना होणारे अपघात आणि रस्त्यावर कुत्रा आडवा आल्याने होणारे अपघात टाळण्यासाठी वाहणाचे नियंत्रण व वाहन चालविण्याचे कौशल्य महत्वाचे असते. प्रशिक्षण नसल्याने कौशल्य येत नाही आणि गती असल्याने नियंत्रण जमत नाही त्यामुळे अधिक अपघात घडतात.
धाडस हे देखील अशा अपघांताच्या कारणांपैकी एक कारण आहे. अतिघाई इतकाच अपघाताचा धोका विनाकारण धाडस दाखविल्याने होतो. तरुण वयात ही धाडसाची प्रवृत्ती प्रबळ असते. आपण एकदम कुशल चालक आहोत या फाजिल आत्माविश्वासापोटी असे धाडस आणि त्यातून अपघात हा प्रवास असतो.
अपघाताच्या कारणांमध्ये आणखी एक कारण ते मद्य आणि वाहन. मद्य पिल्यानंतर वाहनाचा अपघात होण्याची शक्यता 8 पट अधिक वाढते हे लक्षात न घेता मद्यप्राशन करुन वाहन चालविण्या-यांची संख्या खूप मोठी आहे. अपघाताच्या कारणांमध्ये मद्यासोबत आता भर पडली ती मोबाईलची. आपण जगात सर्वात महत्वाचे आहोत असा भाव आणून मोबाईलवर बोलत वाहन चालविल्याने हल्ली अपघात अधिक प्रमाणात आहेत.  
मध्येंतरी कोल्हापूरवरुन गोव्याला जाताना निवास व्यवस्थेसाठी ट्रॅव्हल एजन्टला मोबाईल केला. त्याने माहिती दिली व फोन बंद करताना सांगितले मला सव्वातास फोन करु नका मी बाहेर जातोय आणि कार चालवताना फोन बंद असतो. चला एक तर सुरक्षा साक्षर भेटला. पण अशी साक्षरता सर्वांपर्यत पोहचली तरच रस्त्यांवर  कुत्ते की मौत मरणं बंद होईल.


                                     -प्रशांत अनंत दैठणकर-

Monday, 7 October 2013

प्रवास आपला टपालासोबतचा...!

नव्या पिढीला फारसा परिचित नसला तरी जाणत्या पिढीमधील तुमच्या-आमच्या पिढीत साऱ्यांनी खेळलेला खेळ म्हणजे मामाचं पत्र हरवलं आता त्या वयात निरागस असल्याने खेळताना कधी प्रश्न पडला नाही की मामाचंच पत्र का हरवायचं आणि ते नेमकेपणने मलाच का सापडायच ? यातला विनोदाचा भाग बाजूला ठेवला तर मामाचं पत्र म्हणजे आईच्या माहेरचा दुवा होता. त्यात माहेर म्हटलं की सगळ्याच स्त्रिया हळव्या होत असतात माहेरुन ख्याली खुशाली सांगणारं त्याकळचं ते 15 पैशांचं पोस्टकार्ड जगण्याचा घटक होता आणि तो पत्र आणणारा पोस्टमन आपल्या घराकडे कधी येतो याची सर्वांना वाट असायची.
स्वातंत्र्य प्राप्तीनंतर नागरिकरणाला वेग आला आणि गावातली तरुण पिढी शहराकडे वळली. ज्यांनी मातीशी नातं जपलं अशी मोठी पिढी गावातच राहिली. त्याकाळी टेलिफोन फक्त श्रीमंताघरची वस्तू होती म्हणून पत्रव्‍यवहार हा जगण्याचा घटक होता.
मुंबईत नोकरीसाठी कोकणातून आलेल्या चाकरमानी लोकांसाठी संदेशवहनाचा तो खात्रीलायक आणि स्वस्त मार्ग होता.
संदेशवहनाच्या पध्दती काळानुसार आणि तंत्रज्ञानानुसार बदलत गेल्या आता व्होडाफोनचा जमाना असला तरी पूर्वी घोडाफोनचा जमाना होता. घोड्यावरुन संदेशवाहक पाठवून राजे एकमेकांशी पत्रव्यवहार करीत तर प्रशिक्षित कबुतरांकडूनही संदेश पाठविले जात होते.
युरोप आणि अमेकरकेत टपाल व्यवस्था सुरु झाली. ब्रिटीश भारतात आले त्यावेळी त्यांनी हे साधन भारतात आणले टपालाची शिस्तबध्द वितरण व्यवस्था असणारी टपाल कार्यालये दिडशे वर्षांपूर्वी थाटायला लागली त्याकाळी तार अर्थात टेलिग्राफ ही गतीशील संदेशवहनाची यंत्रणा टपाल कार्यालयाचाच भाग होती.
अशाच 15 पैशांच्या पोस्टकार्डमुळे विलंबाने का होईना शुभवर्तमान, ख्याली खुशाली, लग्न जुळल्याच्या बातम्या कधी निधनाच्या बातम्या कळायच्या पत्र जमवून ठेवायला घराघरात तारकेट असत. याच टपाल विभागाच्या तिकिटांमुळे हजारो जणंनी तिकिट संग्रह गोळा केलेले दिसतात निरनिराळया देशांची टपालाची तिकिटे गोळा करणे हा एक चांगला छंद आहे.
पोस्टमनला बऱ्याच वेळा इतरांची पत्रे लिहून देणे तसेच आलेल्या पत्राचं वाचन करुन देणे करावे लागे. न शिकलेल्या पिढीला त्यामुळे पोस्टमन अर्थात डाकिया घरातलाच सदस्य मानत होते. त्याला दिवाळीला आवर्जून पोस्त दिली जायची.
काळ बदलला तसं संदेश वहनाचं स्वरुप बदललं मात्र आजही व्यापारी वर्ग आणि ग्रामीण भागात राहणाऱ्यांना पोस्टकार्ड जवळचं वाटतं. नव्या पिढीत आता मोबाईलवर मेसेज पाठविणं, चॅटींग करणं, फेसबुक वर केलेलं स्टेटस् अपडेट आणि व्टिटरवर केलेलं व्टिट आदी मार्ग उपलब्ध आहेत त्यातच ही मंडळी रमते. पत्र लिहिणे आता भाषा विषयात काही मार्कांपूरतं उरलं आहे.
पत्र लिहिताना मोठ्यांना केलेला नमस्कार मग पत्राचा मायना. पत्र पूर्ण झल्यावर लिहायचं राहून गेलं म्हणून लिहिलेलं ता.क. अर्थात ताजा कलम. निधनाची वार्ता कळवणं आलं की त्यात टाकलेली टीप हे पत्र वाचताच फाडून टाकणे आणि आपणही ते फाडायचं ही पध्दत या पत्रालाच तार समजून लवकर निघावे या आशयाची खास टिप आदी अनेक बाबी टपाल आणि पोस्टकार्डशी जुळलेला आहे.
याच टपाल खात्यमुळे आवर्ती ठेव अर्थात आर.डी. रिकरिंग डिपॉझिट च्या रुपाने अनेकांना व्यवसायची संधी लाभली आजही टपाल खात्याशी ही माणसं निगडीत आहेत. भविष्य निर्वाहासाठी पीपीपी. अर्थात टपाल भविष्य निर्वाह निधीच्या रुपाने अनेकांनी सुरक्षित गुंतवणुकीसाठी टपाल खात्यावर विश्वास टाकला.
9 ऑक्टोंबर हा या टपाल खात्याची आठवण देणारा टपाल दिन. आज तंत्र बदलल्यावर टपाल विभागाने  ई-ट्रान्सफर आणि ई-मनी ऑर्डर सुरु केली पण शहरात व वसतीगृहात राहून हॉस्टेल लाईफ ज्यांनी जगलय यंना या मनी ऑर्डर म्हणजे लाईफ लाईन असायची. या मनी ऑर्डरच्या भरवशावर होणरी उधारी आणि पार्ट्या यांचं सान त्यांच्या आयुष्यात एखाद्या आठवणीच्या कुपीसारखं आहे.
लष्करी सेवेत असणाऱ्यांना सिमेवरुन घरी पैसे पाठवणं आणि आपली खुशाली कळवणं या साठी टपालाचाच आधार आहे. संदेसे आते है हमे तडपाते हे हे बॉर्डर चित्रपटातलं गाणं याचा भावनेला व्यक्त करणारं आहे.नाम चित्रपटात पंकज उधासने गायलेल व त्याच्यावरच चित्रित झालेल चिठ्ठी आई है या गाण्यावर हॉस्टेल मधले मित्र रडताना मी बघितले आहेत. डाकिया डाक लाया हे काका अर्थात सूपरस्टार राजेश खन्नावर चित्रित झालेलं गाणं असो की स्मिती पाटीलचं हमने सनम को खत लिया ही गाणी डाकिया, डाकबाबू अर्थात पोस्टमन आणि टपालाचं महत्व अधोरेखीत करतात.
आजही टपाल खातं महत्वाची कामगिरी बजावत आहे. अंगडिया सेवा आल्यवर खाजगी सेवेचा दर्जा पाहून अनेक जण कुरिअरकडे वळले असले तरी महत्वाचे दस्तऐवज पाठविण्यासाठी आजही टपाल खात्याची स्पीडपोस्टसेवा पसंद केली जाते. 
टपाल खात्यात असणारा आरएमस अर्थात रेल मेल सर्व्हीस आजही गतीमान प्रवास तुमच्या-आमच्या आयुष्यात अगदी महत्वाचा आहे. घरोघरी जाऊन टपाल वाटप करणारा पोस्टमन आणि त्याच्याशी निगडीत यंत्रणेला टपालदिनी सलाम आणि चौकातल्या लाल रंगाच्या टपाल पेटीलाही सलाम.


                             -प्रशांत अनंत दैठणकर- 

Tuesday, 26 March 2013

रंगांचा हा उत्सव


आठवते ती प्रत्येक होळी त्या वयातली ज्या वयात रंगात रंगण्याचं वेड होतं मनात. ते रंग उडवण्याचे आणि रंग उधळत त्या रंगात रंगण्याचे दिवसही अगदीच ताजे आहेत मनात. ते रंग अंगावरून उतरले असले तरी मनातून कधीच उतरणार नाहीत हे देखील तितकंच खरं हे सांगावच लागेल. बेंबीच्या देठापासून बोंबाबोंब करताना आनंद वाटायचा. दुस-या वर्गात असताना धुळवडीला मोठ्यांच्या होळीत नाचून घरी परतल्यावर काय बे असं अनाहुतपणे तोंडातून बाहेर पडल्यावर बापाने रागात पाठीवर बे एके बे .. बे दाही वीसपर्यंत रंगवलेला पाढा अनेक दिवस मिरवला.. त्याच दिवशी शिवी नावाच्या शब्दाशी आयुष्यभरासाठी काडीमोडही झाला..
      शिमगा संपला तरी रंगांचं नातं मात्र आजही कायम आहे.. अगदीच रंगिला नसलो तरी हळव्या मनाने आयुष्याचे नाना रंग आजवर बघितले आणि ते जपले.. आजवर धुळव़डीला धुंद होवून रंगात रंगणं कायमच आहे.
गोरे रंग पे ना इतना गुमान कर.. असं म्हणत आपल्या प्रितीला चिडवण्यातली मजा काही औरच आहे इतकं रंगीत मन आजही आहे. सकाळ संध्याकाळ निसर्ग खेळत असलेल्या रंगाचा खेळ असो वा दारात रोज रंगणारी रंगावली.. रंगांची साथ कायमच आहे त्याही पेक्षा रंग आपला पाठलाग करतात असं म्हणावं लागेल असं हे आयुष्य.... प्रेमात पडल्यावर हे रंगीत आयुष्य सप्तरंगी झालं आणि मनही त्या रंगांनी वेडावलं.. ते आजही कायम आहे.. तरीही इतर रंगांचं प्रेम आहे हे का याला काही उत्तर नाही. काही प्रसंग कधी कधी रंगाचा बेरंग करीत असले तरी ते मुळचे रंग पुन्हा मनाला उभारी देत असतात. आधार देत राहतात.. स्वप्नांनाही रंगीत करीत असतात.
एरव्ही नाना रंगाचा अंहंकार मिरवणारे चेहरे याच एका दिवशी समान दिसायला लागतात. आपण सर्व एकच आहोत याची जाणीव करून देणारा रंगांचा हा उत्सव.. मनाला रंगवून आत्मभान आणि आत्मपरिक्षण करायला लावणारा हा  रंगोत्सव...
रंगा या जगाच्या रंगात रंगा...
प्रशांत दैठणकर 26 मार्च 2013

Tuesday, 19 March 2013

फसवं बूक !


संपर्काचं नवं लोकप्रिय साधन बनलेल्या फेसबूकच्या माध्यमातून जसे जिवाभावाचे मित्र सापडतात तसेच हे मायेचं महाजाल अनेक तरुणींसाठी सापळा देखील ठरत असल्याने या विषयाकडे गांभिर्याने बघण्याची गरज आज निर्माण झाली आहे.
     सायबर गुन्हेगारी हा पोलिसांकरिताही नवा प्रकार आहे. साधारणपणे एखादा चोरीसारखा गुन्हा घडतो. त्यावेळी गुन्हेगार त्याच परिसरात सापडू शकतो त्वरीत हालचाली झाल्यास त्याला लगेच जेरबंद करणे शक्य आहे. मात्र इंटरनेटचं हे महाजाल वैश्विक स्वरुपाचं आहे. समोरुन आपणाशी गप्पा मारणारी व्यक्ती जगाच्या कोणत्या कोपऱ्यात आहे हे आपणास सांगणं शक्य नसतं.
     नेटवरुन संपर्क प्रस्थापित करुन मुलींना नको त्या ठिकाणी बोलावून प्रेमाच्या नाटकाआड त्यांच्यावर अत्याचार करण्याचे प्रकार आता घडत आहेत. त्यामुळे पालकांनी सजग होण्याची आज गरज निर्माण झाली आहे.
     काही वर्षांपूर्वी भाकित होतं की यापुढील काळात वाद आणि भांडणं प्रसंगी युध्द झाले तर ते पाण्यासाठी होईल. हे भाकित आता खरं होताना जाणवतय 70 टक्के पृष्ठभागावर पाणी असणाऱ्या आपल्या या वसुंधरेवर आज अनेक भागात पाण्यावरुन भांडणे होत आहेत. देशांमधील याबाबतचे वाद युध्दही आमंत्रित करु शकतात अशा स्थितीत आहेत.
     सायबर क्राईम मध्ये गुन्हेगार जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असू शकतो हे लक्षात घेऊन यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील कायदा करण्यात आला आहे. हा कायदा पहिला असा कायदा आहे जो जम्मू आणि काश्मीरसाठीही लागू करण्यात आला आहे. याचा उद्देश या प्रकारचा गुन्हा कोठेही होईल हे गृहीत धरुन तपासाच्या मर्यादांचा विस्तार करणे असाच आहे.
     या गुन्हेगारीच्या सापळ्यात आपली मुलं सापडणार नाहीत याची काळजी आपल्यालाच घ्यायला लागेल यासाठी आपली मुलं संगणकावर काय बोलतात याची माहिती आपण ठेवणं अत्यंत आवश्यक झालय. मुलांचे फेसबूक सारख्या सोशल नेटवर्कींग ग्रुप मध्ये कोण दोस्त आहेत हे आपणास सहज कळू शकणे त्या मित्रांचे प्रोफाईल पाहून आपणास त्याबाबत ठरवता येईल.
     एकच सांगणं फेसबूक वापरा त्याचं फसवंबूक होवू नये याची काळजी घ्या.

                                           -प्रशांत दैठणकर-