Friday, 30 September 2011

प्रतिमेला प्रतिभेचीच प्रेरणा



हातात पेन्सील आणि समोर कागद आल्यावर त्याच्या डोळ्यात एक आगळी चमक दिसते. त्या पांढऱ्या शुभ्र कागदावर मग पेन्सीलची आंदोलने सुरु होतात. रेषांवरून रेषांचे आक्रमण तर कधी मिलाफ असा प्रवास रंगत असताना त्याच्या चेहऱ्यावरील रेषांपैकी एकही रेष हलत नाही. एकाग्रता... यातून अल्पावधीत हुबेहुब पेक्षाही अधिक अशी ही प्रतिमा साकारते. अशा या कलाकाराचं नाव आहे चंद्रकांत पाठक आणि गाव आहे चंद्रपूर.
बैठकीच्या निमित्तानं चंद्रपूरला गेल्‍यावर तेथील विश्रामगृहात मुख्य सभागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माईसाहेब आंबेडकर यांचं भव्य असं तैलचित्र आहे. ते छायाचित्रच असल्याचा भास होतो. १९५६ साली नागपूर इंथ दीक्षा भूमीवर धम्मचक्र प्रवर्तनाचा सोहळा झाला. त्यानंतर दोन दिवसांनी म्हणजे १६ ऑक्टोबर १९५६ ला चंद्रपूर इथं असाच सोहळा झाला. यावेळी काढलेल्या एका छायाचित्रावरून हे तैलचित्र रेखाटलं आहे.
कुतूहल जागं झाल्यानं सहकारी अनिल ठाकरेला विचारलं त्यावेळी त्यानं क्षणाचा विलंब न लावता थेट चंदूला फोन लावला. चंदू पाठक नावानं इथं प्रसिद्ध असणारी ही वल्ली अर्ध्या तासात आमच्या भेटीला हजर झाली.
चंदूची भेट झाल्यावर त्याच्या कलेचा प्रचंड असा खजिनाच उघडला गेला स्वामी पद्मनाभ मंदिराच्या तळघरातील खजिन्याप्रमाणे चंदूचा खजिना खूप मोठा आहे. याची सुरुवात कधी बालपणीच्या एका उपक्रमात झालेली चंद्रपूर जवळच्या वरोरा इथलं पाठक कुटुंबिय, वडील शाळेत मुख्याध्यापक.
मुलांना सर्जनशीलता शिकता यावी यासाठी त्यांनी गावात अनेक जणांकडे असणाऱ्या वस्तू जमा करून त्यांचे प्रदर्शन भरविण्याचा उपक्रम विद्यार्थ्यांना दिला होता. त्यात सर्जनशिलतेचा परिचय झाल्यावर चंदूने आजवर त्याचं बोट सोडलं नाही.
मनाच्या कोपऱ्यातला छंद आणि त्यानुसार उदरनिर्वाहराचं साधन असा योग चंदूच्या नशिबी असल्यानं सार्वजनिक बांधकाम विभागात आरेखकाची नोकरी करीत त्यानं छंद जपलाय.
गेली सलग ११ वर्षे अभिताभ बच्च्नच्या वाढदिवसाला भेटून त्याचं सुंदरसं पेंटींग देण्याचा उपक्रम चंदू करतो. वैदर्भिय नेते शांताराम पोटदुखे यांच्या पाठींब्यावर त्याला अनेक महत्वाच्या व्यक्तींची भेट घेता आली. याचं सोनं करीत त्यानं सर्वांच्या प्रतिमा रेखाटल्यात.
छायाप्रतिमा अर्थात फोटोग्राफर याला १५० वर्षांचा इतिहास आहे. मात्र त्यापूर्वीच्या काळापासून पेंटींगच्या माध्यमातून अनेकांना आपण बघितलय. चंदूची मास्टरी खूप वेगळी आहे. तो तैलचित्र रेखाटतो पण ते छायाचित्र भासतं. प्रतिमा आणि प्रतिबिंबांच्या या जगात या प्रतिभावंतानं घेतलेली भरारी खूपच मोठी आहे.
लता मंगेशकर, डॉ. कलाम, सोनिया गांधी, राजीव गांधी, पंतप्रधान मनमोहनसिंह आणि अनेक नावे या कलाकाराच्या कुंचल्यातून साकारली आहेत. त्याचं हे योगदान खूप मोठं आहे. सायंकाळी कार्यालय झाल्यावर ३ ते ४ तास रोज वेळ देत चंदूने आपलं कलाप्रेम जपलयं... असा हा कलाकार भेटणं हा देखील सुंदर योग म्हणावा... नंतर बैठक सुरु झाली मात्र मन त्या चित्रात गुंतलं होतं हे खरं.


प्रशांत दैठणकर

Thursday, 29 September 2011

माझं नवरात्र १९८० सालचं

पहाटे चार वाजता थंडगार पाण्यानं आई अंघोळ घालायची अर्धवट झोपेतल्या स्थितीत बिटकोच्या काळया दंतमंजनने दात घासलेले, पाण्याचा पहिला तांब्या अंगावर पडताच खडकन सारी झोप उडून जायची आसपासच्या घरांमध्येही पहाटे पहाटे हीच लगबग हेच ते ऑक्टोंबरचे दिवस साधारण 1980-81 चा तो काळ.

औरंगाबाद शहर आज वेगात धावतय. त्यावेळी केवळ रेंगायला लागलं होतं दोन वेळा पाणी येणार गावात गर्दी नाही रस्ते मोकळे असं ते छोटेखानी शहर. सकाळची ही लगबग असायची कर्णपूरा येथील मंदिरात जाण्यासाठी.

संस्थान गणपती हे जसं ग्रामदैवत तसंच स्थान नवरात्रात कर्णपूरा येथील भवानी मातेच्या मंदिराला गल्लीतल्या सर्वच घरातून बायका-मुलांचे जथ्ये कर्णपु-याकडे जायचे त्यावेळी रहायचं ठिकाण होतं दलालवाडी येथून टिळकपथ ओलांडून एस.बी.कॉलनीतून समर्थनगर माधून या देवीभक्तांच्या टोळया मार्गस्थ व्हायच्या. समर्थनगर ओलांडताना एक अनामिक भिती बालमनात असे प्रचंड वाढलेला बाभळी आणि संपूर्ण कब्रस्थान असणारं हे समर्थनगर इतकं बदलेल असं त्यावेळी वाटलं नव्हतं.

समर्थनगरातून बाबा पेट्रोलपंपाच्या चौकातून वळलं की कर्णपु-याचा मार्ग सुरु साधारण एखाद किलोमीटर आत गेल्यावर ते कर्णपुरा देवीचं मंदिर. भक्तीभावाने माथा टेकून त्यालगत असलेला बालाजी मंदिराचं दर्शन आणि बाहेर पडताना कपाळावर चंदनाचा टिका सुंदर डिझाईन असणारे टिळे लावणारी मुलं तिथं उभी असायची आणि पाच पैशांमध्ये टिका लावायचे.

हा टिका वाळेपर्यंत वाटबघणे आणि तो तसाच मिरवत सकाळी शाळेत जाणे हा आवडता उपक्रम. पहाटे उठून कर्णपु-यात जाऊन आल्याची ती खूण असायची ना.

सुट्टीच्या दिवशी हा कार्यक्रम जरा मोठा व्हायचा कर्णपु-याच्या देवीचं दर्शन घेतल्यनंतर जिल्हा न्यायालयाच्या मागे मनीषा कॉलनीत असणा-या रेणुकामातेचं देर्शन घ्यायचं कार्टाच्या मागे असणारं हे मंदिर त्यामुळे लोक याला कार्टाची देवीच संबोधायला लागले ते आजवर कायम आहे.

दोन्ही मंदिरात देर्शन झाल्यावर तिथं वडाच्या झाडाखाली जेवण्याचा उपक्रम आटोपयचा यात्रा भरत आल्यावर तेथून टीप-टीप असा आवाज करणारं अंगठयानं दाबायचं खेळणं घ्यायचं आरंभी बरं वाटल तरी नंतर त्यामुळे अंगठा दुखायला लागायचा खरेदी करुन दिलेलं हे खेळणं तसं चांगलच इरिटेट करणारं असल्यानं आई साठी ती एक विकतची डोकेदुखीच ठरायची.

काही उत्साही तरुण त्याकाळी एक वेगळा प्रकार करित असत सायकलच्या कॅरिअरला लोखंडी डबा बांधायचा. ओली नारळाची दोर त्या डब्यापासून चाकाच्या एक्सलला लावला की फिरणा-या चाकाबरोबर एक वेगळा नाद येत असे तो. आवाज आणि ती कर्णपु-यापर्यंत नवरात्राच्या नऊ दिवसांची प्रभातफेरी आजही अगदी ताजी आहे मनात.
                                                             -प्रशांत दैठणकर

Thursday, 22 September 2011

Life begins @ 40


                       काही क्षण आयुष्याचे कधीच स्मृतीतून जात नाहीत. स्मृती हा प्रकार वेदनांशी अधिक जवळचा असतो हे देखील सत्य आहे. काळाच्या ओघात खूपकाही घडत असतं मात्र आपल्याला सुखाचे क्षण कमीच आठवतात. आठवण रहाते ती दुख-या क्षणांची.
     या प्रवासानं खूप काही दिलय. सर्वात महत्वाची ती अनुभवाची शिदोरी. अपेक्षा भंग होतो याचं मुळ कारण असतं अपेक्षा. या अपेक्षा जितक्या कमी तितकं अपेक्षा भंगाचं दु:ख कमी हा इथला न्याय. अपेक्षा दोन प्रकारच्या आपण इतरांकडून ठेवलेल्या अपेक्षा आणि इतरांना आपणाकडून असणा-या अपेक्षा.
     अपेक्षा ठेवताना त्या वास्तवाला धरुन असाव्यात जेणेकरुन निराशा होत नाही हे आपण इतरांबाबत सहज करु शकतो. मात्र इतरांनी आपणाकडून काय अपेक्षा ठेवावी याबाबत आपली भूमिका काहीच नसते. इतरांनी आपणाबाबत बाळगलेल्या अपेक्षा वास्तव की अवास्तव हे त्यांच्या मनातील आपल्या स्थानावर अवलंबून असते आणि यात आपल्याला त्रास असत नाही. अर्थात आपल्याकडून त्यांचा अपेक्षाभंग होणं ही त्यांच्यासाठी त्रासाची, चिंतेची बाब असते. एक मात्र खरं की आपण सर्वांच्या सर्व अपेक्षा कधीच पूर्ण करु शकत नाही.
     आपल्या अपेक्षांचं काय ?  याला उत्‍तर तेच जे आधी आलं आपल्या सा-या अपेक्षा देखील कधीच पूर्ण होत नसतात.
     अपेक्षा आणि अपेक्षाभंगाचा हा भावनिक खेळ वाढत्या आणि घटत्या मानसिक अंतरावर अवलंबून असतो.एखादी व्यक्ती खूप जवळ आली की खूप अपेक्षा वाटायला आणि वाढायला लागतात.
     जिव्हाळा, प्रेम आणि मैत्र यांचे बंध कधी इतके जवळ येतात की त्यात मुळ नातं आणि समोरची व्यक्ती यातलं अंतर प्रेमाची धुसर रेषा ओलांडतं आणि तिथं प्रभुत्ववाद शिरतो. प्रत्येकाचं व्यक्ती म्हणून असणारं व्यक्तीगत स्थान या प्रभुत्ववादानं संपल्यानं इथं पदोपदी अपेक्षा अन् अपेक्षाभंग असा उन-पावसाचा खेळ सुरु होतो अन् इथूनच `तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना `  असा नवा प्रवास नात्यांमध्ये दिसतो.
  भावनिक ओलावा, वात्सल्य आणि खंबीरपणाचं एक छत्र म्हणून उभं राहणा-यांना  भावनिक आंदोलनात उभं राहता येतं. यात हळवेपणा आला तरी मनाचा खंबीरपणा झालेल्या घटनांना समजून घेऊन अपेक्षाभंग पचवायचा आणि समोरच्याच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा मनाच्या तळापासून प्रयत्न करायचा असा प्रवास सुरु होतो. इथं त्याच नात्याचा नव्याने जन्म होत असतो.

                ग्रीष्मात पोळलेल्या झाडाचं
                पालवी फुटणं हे वेगळं .... !
                                    आशा-अपेक्षांचं बीज गळालं..
                मातीला मिळालं म्हणताना
                भावनेच्या धुंद वर्षावात
                ते प्रेम पुन्हा अंकुरणं वेगळं
                असतं प्रत्येक मनात हे
               कोंडलेलं असं एक स्वप्न
              वासनेतून वात्सल्याकडे जाताना
                 त्या भावनेचा तो ओलावा
              ते स्वप्नं त्या ओलाव्यानं अंकुरतं
            म्हणून कदाचित पुन्हा जीवन बहरतं !

            आणि यामुळेच कदाचित सारे जण म्हणत असतात मित्रांनो
                                                                  Life begins at forty.


                                                       प्रशांत दैठणकर
                                   

Thursday, 15 September 2011

आँख पर है पर्दा, पर नही वो अंधा.


काही क्षण न कळणारे
आणि काही न वळणारे

आयुष्याचंही असंच असतं. काही बाबतीत आपणास काहीच कळत नाही आणि काही बाबतीत कळत असतं पण मनाला पटत नाही म्हणून वळत नाही असं काहीसं आयुष्य आपण जगत असतो. काही बाबी आपणास आवडल्या तरी त्या मिळत नाहीत. कुबेराचा खजिना समोर असला तरी दारावरचा सेवक मात्र सेवकच असतो. आणि असच काही मला वाटतं ते औरंगाबादेत गुलमंडीवर अगदी सुपारी हनुमान मंदिराच्या दारासमोर बसणा-या त्या बिपीन दलाल बाबत.
हा बिपीन दलाल कोण.. सहाजिक असा सवाल. या मार्गावरून जाणा-या प्रत्येकानं त्याला बघितलं आहे. नजरेसमोर असूनही नजरेआड राहणारा हा बिपीन इथं अनेक वर्षांपासून लौटरी विकतो. मला जसं आठवतं तसं हा बिपीन न चुकता या ठिकाणी दिसतो. आणि अनेकांनी त्याच्याक़डून तिकिट घेतलेलं आहे.
लॉटरी हे दहा रूपयात मिळणारं दहा लाखांचं स्वप्न असतं आणि हे विकणारा बिपीन त्यामुळेच मला सपनोंका सौदागर भासतो..त्यातही मला आश्चर्य वाटतं ते अनेकांना स्वप्न दाखवणारा हा बिपीन स्वतः मात्र काहीच बघू शकत नाही. अंध असून आयुष्याचं आव्हान त्यानं सकारात्मक मनानं स्वीकारलय हे नक्कीच कौतुकास पात्र आहे. बिकट परिस्थितीत आयुष्य काढणा-या हा बिपीनकडे बघितल्यावर छोट्या कारणांसाठी आयुष्याचा राजीनामा देत आत्महत्त्या करणा-यांची किव आल्याशिवाय राहत नाही.
आयुष्य साधं सोपं आणि सरळसोट येतच नाही. संघर्ष.. दुःख...वेदना.. आनंद. हा भावनांचा पसारा हा सोबत येत असतो. हा सारा पसारा न नाकारता आला क्षण जगणं आणि त्यात आयुष्य शोधणं ज्याला सहज जमतं त्याला आयुष्यात कमी त्रास होत असतो. आपण आयुष्यात किती सकारात्मक विचार करतो आणि किती जणांना सकारात्मक ऊर्जा देतो हा विचार आपण करायला हवा.
काय चालू आहे असं विचारल्यावर ... काय वैताग आहे किंवा काय त्रास आहे अशी प्रतिक्रिया देणारे आसपास किती आहेत हा विचार आपण कधी केला आहे का... मी मजेत आहे असं बोलत स्मितहास्यानं बोलण्याची सुरूवात करणारे किती आहेत हे देखील आठवून पहा..सकारात्मक बोलणारी व्यक्ती त्याच पद्धतीची ऊर्जा इतरांना देत असते. बिपीनकडे बघितल्यावर अशीच ऊर्जा मलाही मिळते.
अंध असल्याने त्याला स्वप्न दिसतात की नाही हे माहिती नाही मात्र दहा रूपयात दहा लाखांचं स्वप्न तो विकतो... आपण काय घेतो... शेवटी माझ्यासाठी त्याचा तो सकारात्मक ऊर्जेचा स्रोत महत्वाचा आहे. म्हणूनच गुलमंडीवर गेल्यावर बिपीन कडून एक तरी तिकीट घेणे हा माझा अनेक वर्षापासूनचा उपक्रम राहिलेला आहे...
क्या बेचा उसने ये ना सोचों यारों..
क्या आपने पाया यह जरूरी है...
जिंदगी सिखाता है ये बंदा हमें..
भूल कर अपनी सारी मजबुरी है..
आँख पर है पर्दा, पर नही वो अंधा..
यारो.. अपनी आँख खोलना जरुरी है

प्रशांत दैठणकर      १५ सप्टें.-११

Saturday, 10 September 2011

व्यक्त किती..?... अव्यक्त


आज आयुष्यात काय हवे आपणाला असा सवाल आपण रोज मनाला विचारावा असे वाटते. कारण याचं तंत्र रोज बदलताना दिसते. काही काळापूर्वी आपण काय होतो आणि आज काय आहोत याचाही आपण आढावा घेतला पाहिजे. काळ झपाट्याने बदलत आहे आणि त्याची ही गती कायमच राहणार आहे यात शंका नाही. श्रीकृष्णाने संदेश दिला.. परीवर्तन ही संसार का नियम है.. आपण वाचतो... कळतं.. पण वळत नाही..
     
सारी आशा सारी स्वप्ने..
      एका छोट्याशा मनातली
      कुणी मला का गावे..
      का मी कुणा सांगावे..

      का घडते हे सारे समजे ना
      भाव मनाची काही उमजेना
      आज धावताना या जगात
      मन मात्र धावे आकाशात

      आशेचा हा लांबलेला दोर
      त्याला कारूण्याची किनार
      का मी आहे या जगात..
      प्रश्न रोज नव्याने मनात
     
      तिचा तो रोजचा त्रागा
      वैतागाची नशिबी जागा
      राग हा सरता सरेना..
      मन उदास.. भरता भरेना
     
      शब्दांचे शर कधी हो झाले
      नजरेतही काटे मग आले
      तीर फेकायाला नाही धीर
      अन् झेलाया हा माझा ऊर
     
      का म्हणूनी उशिर हा झाला
      नवा प्रश्न अधिर या मनाला
      आता कुठले जीव   न..गाणे ?
            उठता मैफल.. रूसले तराणे..
     
      आणि आयुष्याच्या हा न कळलेला प्रवास असाच चालू ठेवावा म्हणत किती जण चालत असतात आणि किती जण नेमकपणाने जगत असतात.. आकडा दाखवता येईल.. प्रगतीचं भौतिक मापही मांडता येईल..आतल्या जखमा किती जणांना मांडता येतात.. शब्दात घेऊन भावना मोकळेपणानं किती जणांना सांडता येतात.. असे हे जीव मग पुस्तकात आपली प्रतिमा शोधत त्या प्रतिमेच्या आड आपल्या अश्रुंना वाट मोकळी करून देतात..
     


      व्यक्त किती..?... अव्यक्त..
      मनाची सारी ही आसक्ती
      मनच या सा-या चिंतेचे कारण..
      कारण किती..? ..  विनाकारण

      चालत राहतात ध्येय्य मानून नसण-या बाबींना आणि आयुष्याच्या एखाद्या वळणावर जाणवत अरे जगायचच राहून गेलं.. जरी त्या जगाला वाटत असतं की काय मस्त जगलाय हा... हा मात्र आतून कोराच असतो.. पेन्सीलने लिहून कुणी पाटीवरली अक्षरे मिटवावीत तसं याची पाटी कोरीच असते..
                        याची पाटी कोरीच असते..!
याची पाटी कोरीच असते..!
           
PRASHANT    10.09.11    SATURDAY

Tuesday, 6 September 2011

हजरजबाबी किरण

काही मित्र आठवत राहतात आणि काही मात्र आठवत नाहीत असं कधी होतं का .. हो कधी कधी असही होत असतं. काळ असं याला उत्तर आहे. काही जण मात्र आयुष्यभरासाठी सोबत चालत राहतात. जरी आज ते ग्रुप सोबत नाहीत. त्यांच्या व्यावसायिक आवश्यकतेनुसार ते अलग झाले तरी ते आजही सोबत असतात अगदी काल सोबत होते तसेच. अचानक फोनची घंटी वाजते आणि त्याचा फोन असतो अरे मी आलोय.. असाच एक मित्र किरण...
     किरण . आज हो आज त्याला सारं जग वेगळ्या नावानं आदबीनं ओळखतं .. मात्र शाळेपासून अगदी काही काळ आधीपर्यंत तो आमच्या ग्रुपचा जीव होता. आज त्याला या सा-यासाठी वेळ नाही, हे त्याला जितकं मिस होतं त्यापेक्षाही आम्हाला अधिक मिस होतं हे मात्र कबूल करावं लागेल.
     निरपेक्ष प्रेम करणारे जे थोडे आसपास आहेत त्यापैकी किरण हा माझा एक मित्र. मैत्री नेमकी कशी सुरू झाली याचे संदर्भ आज आठवत नाहीत इतका काळ आम्ही सोबत आहोत. पाचव्या वर्गात सरस्वती भूवनला प्रवेश घेतला आणि अनेक नव्या मित्रांशी एकदम ओळख झाली.. यातील ओळख ते मैत्री हा प्रवास पूर्ण करणा-या मोजक्या काही जणांपैकी किरण हा एक. किरण म्हणजे काय असं कुणी विचारलं तर त्याचं उत्तर आमच्या ग्रुपमध्ये एकच येईल... किरण म्हणजे हजरजबाबीपणा...
     दुपारी शाळेतून आल्यावर आमचा मित्र नितीनच्या घरी सारे जमायचे. त्याचे आई आणि वडील ( नाना ) हे दोघेही नोकरीला होते. त्यामुळे दुपारी घरी कोणी नसे. आमचा कंपु इथं धिंगाणा घालायला हजर असायचा. नितीन ज्या ठिकाणी रहायचा त्या गौरक्षण वाड्यात क्रिकेट खेळायला जागा देखील मोठी होती. दुपारी खेळायला जाण्यापूर्वी नितीनने लोकसत्ता वाचायला घेतला होता. वाचताना त्याने राशीभविष्य वाचू म्हणत मोठ्याने राशीसह दिवसाचे भविष्य सांगायला प्रारंभ केला. आता राशी भविष्य हा सा-यांचा आवडता कार्यक्रम. किरणची रास आल्यावर त्यात लिहीले होते... हौसेवर नियंत्रण ठेवा... हे वाक्य नितीनने वाचले न वाचले.. त्याच्या वाक्याला जोडून किरणची कॉमेंट होती... आता ही हौसा कोण..?.. हा या आमच्या मित्राचा हजरजबाबीपणा..
     असा हा किरण आणि आमचे शाळा महाविद्यालयाचे दिवस यात खुप आठवणींचे नाते आहे. गणित आणि इंग्रजी या विषयांनी बांधावरून भांडण असावे आणि संधी मिळताच त्याचा वचपा काढावा तसा काहीसा दुष्मनी काढण्याचा प्रकार कायम किरणसोबत केला..आणि त्याला आमच्या सोबत दहावी परीक्षा देउनही प्रथम वर्षात प्रवेश घ्यायला दोन वर्षे विलंब झाला.. मात्र हा गडी खंबीर.. आजकाल नापासाच्या भितीनं आत्महत्त्या करणारे बघितले की किरणचं खरच कौतुक वाटतं... पराभव झाला तर तो पचवता आला पाहिजे हे त्याच्याकडे बघून सा-यांनीच शिकावं.
प्रथम वर्षाला प्रवेश घेताना झेरॉक्सचा गठ्ठा खूप मोठा झाला. त्याला पीन लावूनही कागदं एकत्र राहत नव्हते.. त्याला छेडायचं म्हणून सहज म्हणालो... अरे याला चांभाराकडून शिवून आणावं लागेल... अन् कोणताही किंतु न बाळगता स्वारी निघाली.. चपलेला देतात तसे टाके लावून कागदं चक्क शिवून आणली होती... असा हा निर्मळ मनाचा किरण.. पुढली तीन वर्षे कोणतीही एटीकेटी न घेता क्लिअर झाला हे विशेष..
१९८६ साली कयामत से कयामत तक नावाचा हिट सिनेमा आला त्यात एका पात्राचे नाव दुरा होते... झालं आमच्या या मित्राचं नामकरण.. आजही कंपुतलं नाव दुरा हेच आहे..
     एखाद्याचा स्वभाव किती मिश्कील असू शकतो याला आमच्या कंपुत उत्तर किरणपेक्षा जादा नाही असं आहे. हा पठ्ठ्या एकदा जालना रोडवरून गुलमंडीकडे येत होता. पावसाळ्याचे दिवस. हा स्कुटरवर, समोर एक सायकलवाला.. सायकलला मडफ्लॅप नव्हते.. झालं सारा चिखलाचा फवारा किरणच्या अंगावर... आपण या जागी असता तर  काय केलं असतं... भांडणच केलं असतं ना.... किरणने त्या सायकलवाल्याला जोरात आवाज देउन थांबविला.. सहाजिक तो सायकलवाला घाबरलेला... किरणने खाली उतरून त्याच्याकडे जायला सुरूवात केली तसा तो अधिकच घाबरला... किरणनं काय करावं.... खिशात हात टाकून दहा रूपयांची नोट काढली ती नोट त्या सायकलवाल्याच्या खिशात कोंबून त्याला शांतपणे सांगितले... मडफ्लॅप लावून घे... रस्त्यावर हा सिन बघणारे सारे हा प्रकार पाहून सर्द झाले.. असा हा किरण..
      आपल्या आसपासच्या कंपुतही एखादा असा किरण नक्की असणार.. आमच्या कंपूला हा किरण ऊर्फ दुरा त्यासाठीच प्यारा आहे...
-प्रशांत दैठणकर

Sunday, 4 September 2011

मागे कधी वळून शेवटचं बघितलं आपण.

चालता चालता  ठेच लागता येई आठवण..
मागे कधी वळून शेवटचं बघितलं आपण..
प्रवाह होवून प्रवाहीत रहायचं म्हणूनच हे..
सततचं ठेचकाळत चालत राहणं...
चालायचच असं..प्रवास. होतच असतात या
जखमा म्हणत खाली देखील न बघणं..
कधी आलाच थकवा तर बघायचं तिच्याकडे..
मी थकलो तरी न थकणारी माझी ती सावली..

आयुष्य असच शिकलोय मी प्रत्येकापासून..
त्याचा तो बरसायचं कधी विसरत नाही पाऊस..
आपणच का मग बहाणे शोधायचे.. एक विचार..
खरच का तिला...असते सरितेला ओढ सागराची.
प्रवाह थांबला तर डोह.. जीवन.. ब्रेक के बाद..
ती नव्याने मार्ग शोधते... नवी वाट सागराची..
ती देखील शिकवतेय मला जगायला..
असेल तिला.. मला कुठे वेळ एक ब्रेक घ्यायला..

चालत चालत दूरचा आला तो अनोळखी देश..
इथं ना आसरा.. ना कुणी ओळखीचा चेहरा..
क्षणभर.. आज मागे वळुनी बघता..
अल्बममध्ये होत्या त्याच तसबीरी. रंग तेच...
आयुष्यातून मात्र माणसं अलगद उडून गेली..
त्यांच्यासवे त्यांची सारी.. स्वप्ने विरुन गेली..
आठव काढत नाही थांबत काळ कुणासाठी..
तो ही एक गुरू मानला.. पुन्हा चालण्यासाठी..

मनापासूनी जो मी जाणला अन् पाहीला..
त्या प्रत्यकाशी आजवरी गुरुच मानला..
का कुणी प्राणी पट्टी बाधंतो जखमांवरी..
मग माणसा इतके कौतुक का स्वतःचे करी..
त्या निसर्गालाही मान गुरुचा.. मनापासूनी..
आपणही चालावे..क्षितीजापर्यंत क्षितीजापासूनी
दर दिवशी येणा-या रवीला गुरु समजुनी...

स्वप्ने बघावी.. स्वप्ने जगावी.. प्रीत मानूनी..
प्रित ही आखिर एक स्वप्नच असते...
त्या प्रितीचा एकच धागा...शिकवी जीवन..
प्रित ही न्यारी... भरती जखमा आठवणींनी..
सारेच सारे पुन्हा सांगती.. चल रे मित्रा...
चालत रहा.. थकली सावली तरच पहा...

पुन्हा वळुनी बघतो माझीच मी सावली..
तिलाच घाई.. धावत्या दिवसासंगे ती..
अधिकच धावत जाई.. मीच थांवलो..
उगा क्षणभरी... आयुष्य थांबत नाही.....
चालता चालता  ठेच लागता येई आठवण..
मागे कधी वळून शेवटचं बघितलं आपण..

प्रशांत दैठणकर

व्हर्च्यूअल रियालिटीचा जमाना



आजकालच्या मुलांना फेसबूक हे नवं करमणुकीचं साधन मिळालं आहे. आणि या नव्या छंदानं मुलं काही प्रमाणात वास्तवापासून दूर जात आहेत हे देखील तितकच खरं आहे हे आपण कबूल करायलाच हवं.. इथं सारं कसं गुडी गुडी असल्यानं आपला इगो सुखावला जात असल्याने सारे याच्या मागे आहेत हे वास्तव देखील आपल्याला विसरता येणार नाही.
कोण कुठला ओळखीत नसणारा आपल्या संपर्कात येतो आणि आपल्या भाव विश्वाचा एक भाग होतो. भावना व्यक्त होतात आणि त्याचे कौतूक होतं इथवर ठिक आहे मात्र यात किती प्रामाणिकपणा आहे याला तपासण्याचं ज्ञान मुलांना मिळत नाही हे पालक या नात्यानं मला सातत्यानं वाटत रहातं
व्हर्च्यूअल रियालिटीचा हा जमाना आहे. हा जमाना असा असला तरी भावना मात्र ख-या आहेत हे आपण ध्यानी ठेवायला हवं. आपण एखादा गेम संगणकावर खेळतो त्यावेळी आपणास मिळणारा जिंकण्याचा आनंद हा निश्चितपणे खरा असतो. हा आनंद वारंवार मिळावावा असं वाटतं. आपण ज्यात अधिक आनंद मिळवतो तो गेमच आपल्याला आवडतो. आपणास व्हर्च्यूअल रियालिटीच्या जगात आपल्या मतानं आणि आपल्या मनानं जगण्याचं स्वातंत्र्य असतं... वास्तवात पडेल ते दान स्वीकारावं लागतं... कायम महाभारतातल्या शकुनीमामा सारखं हक्कानं पौ-बारा दान देणारे फासे आपणाकडे असत नाहीत... हा फिल ही व्हर्च्यूअल रियालिटी आणत आहे... हा खूप मोठा धोका आहे हे आपण जाणलं पाहिजे..
व्हर्च्यूअल रियालिटीचा अतिरेक होतो त्यावेळी इगो देखील वेगळ्या पद्धतीनं काम करायला लागतो..... त्याचे फेसबूकवर हजारांहून अधिक मित्र आहेत आणि आपले फक्त तिनशे.... ही भावना आजच्या पिढीला कोणत्या वळणावर सोडणार आहे ते कळत नाही.. आहेत ते मित्र आपल्या या नव्या व्हर्च्यूअल रियालिटीच्या जगात तरी किती साथ देत आहेत हा विचार आपण करायला हवा असं मला वाटतं..
नाही म्हणायला हा व्हर्च्यूअल रियालिटीचा जमाना जुन्या आठवणींना उजाळा देत असतो आणि काळाच्या ओघात दूर देशी गेलेल्यांना जवळ आणतो हे देखील विसरता येणार नाही.. जमा कमी आणि बाकी जादा... नेमकं काय साधतो आपण इथं यावर क्षणभर विचार करायलाच हवा ना मित्रांनो..
व्हर्च्यूअल रियालिटीचा जमाना नाकारता येणारच नाही हे खरं असलं तरी आपण व्हर्च्यूअल रियालिटी मध्ये किती आणि रियालिटीत किती जगायचं याची जाणीवच नसणा-या आपल्या नव्या पिढीला यातलं अंतर शिकवायला पाहिजे... हे अंतर त्यांच्या अंतरंगावर कायमस्वरूपी परिणाम करणारं आहे..हा व्हर्च्यूअल रियालिटीचा बुडबुडा उमलती आयुष्य पार संपवू शकतो याचीही जाण आपण ठेवावी लागेल... हा काळ बदलत आहे.. परिवर्तन ही संसार का नियम है ... भगवद् गीता सांगते... पण परिवर्तन at what cost… याचा विचार आपणच करा... जिंदगी है आपकी... चाहे वो रियालिटी हो या व्हर्च्यूअल रियालिटी....
प्रशांत दैठणकर






Tuesday, 30 August 2011

रस्त्यावरचा सिनेमा ...!



          गणेशोत्सव हा आमच्यासाठी ख-या अर्थानं स्वर्णीम काळ असायचा वर्षातला. सातव्या-आठव्या वर्गात असताना कळायचं तसं किती, मात्र खरा आनंद ज्याला निर्भेळ आनंद म्हणता येईल असा आनंद त्याच वयात आणि गणेशोत्सवातच मिळायचा.
     सराफा बाजारचा गणपती शहरातला सर्वात श्रीमंत गणपती मात्र त्यावेळी त्या श्रीमंतीचं फारसं कौतुक नसायचं त्यावेळी शहर इतकं पसरलं नवहतं. सकाही आवर्जून मराठवाडा लोकविजय, अजिंठा आणि लोकमत बघायचा कारण आकर्षण होतं सिनेमाचं. समर्थनगर असो की स्नेहनगर कुठं आज सिनेमा आहे याची माहिती काढून ठेवायची.
     विश्‍वास नगर, नवीन वाटतं का नाव ?  हो विश्‍वास नगर , विश्‍वास पानीपतावर गेला तसा या भागाचं नावही गेलं. विश्‍वास नगर म्हणजे लेबर कॉलनी होय. त्याच प्रमाणे कोटला कॉलनी या शासकीय कर्मचा-यांच्या वसाहती, इथं आवर्जून सिनेमा दाखवला जायचा.
     मोठ्या पटांगणात बांधलेला पडदा. त्यावर सिनेमा सुरु व्हायचा आणि त्यासोबत गाणं सुरु व्हायचं `  गाडी बुला रही है , सिटी बजा रही है ` धर्मेंद्रचा चित्रपट ` दोस्त `  आणखी एक आवडता आणि वारंवार बघितलेला चित्रपट म्हणजे मनोज कुमारचा ` रोटी कपडा और मकान `  त्यातही गंमत डावखुरा अमिताभ पडद्याच्या दुस-या बाजूने उजवा असायचा आणि गर्दी पडद्याच्या दोन्ही बाजूनी रहायची.
     पडद्यावरच्या चित्रपट चालू आपण रस्त्यावर एखादं पोतं घेऊन त्यावर मांडी घालून बसायचं ... आपण असं रस्त्यावर बसलोय यात काही वाटायचं नाही त्या वयामध्ये. ब-याचदा पावसानं ओल्या मातीवर बसायचं ती ओल अंगभर पसरायची पण सिनेमाचं ते आकर्षण उठू देत नसे.
     अगदी भरपूर वेळा पाहिलेला आणखी एक चित्रपट म्हणजे ` आम्ही जातो आमच्या गावा ` त्यातला प्रत्येक प्रसंग स्मरणात राहिलेला आहे. त्याच काळात ` हाच मार्ग एकला `  तसेच `वहिनींच्या बांगड्या `   असे चित्रपटही औरंगाबादच्या रस्त्यांवर बसून पाहिलेत.
     आज कुंभारवाडा परिसर पूर्ण गजबजलाय. तिथून मुलांसोबत जाताना जूना गणेशोत्सव आठवतो त्यावेळी मुलांना मी सांगतो बेटा इथं रस्त्यावर बसून आम्ही सिनेमा बघायचो त्यावेळी त्यांची प्रतिक्रिया `  काय बाबा काही सांगता काय ?  अशी असते फेम, आणि पीव्हीआर मध्ये सिनेमा बघणा-यांनी अशी प्रतिक्रिया देणं सहाजिकच आहे.
     रस्त्यावरचा तो सिनेमा दाखवायचं काम माहिती कार्यालयाचे कर्मचारी करायचे. 2000 साली मी ज्यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मी औरंगाबाद येथे रुजू झालो त्यावेळी त्या माहिती कार्यालयाचा बॉस म्हणून मला प्रथम आठवण त्या रस्त्यावरच्या सिनेमाची झाली ..... काळाच्या ओघात बरच चित्र बदललं आहे पण स्मृतिचित्रातला रस्त्यावरचा सिनेमा आजही बघावा वाटतो.

Monday, 29 August 2011

गणपती बाप्पा मोरया ...!



          व्यवस्थापनाचे आयुष्यातील पहिले पाठ कधी गिरवले याचा विचार करताना मला टिळकपथवर आमच्या चिमुकल्या गँगने साजरा केलेला गणेशोत्सव आठवतो. 1981-82 च्या त्या डिस्कोच्या जमान्यातला तो गणेशोत्सव.
     कुलकर्ण्यांचा राजू , नाईकांचा सुन्या, दाभाडेंचा गण्या, जोश्यांचा मक्या आणि गल्लीतली सत्या,पावा, संदीप अशी सारी आमची गँग. आपणही गणपती बसवू असं ठरवलं. लोकांकडून वर्गणी गोळा करायची गणपती आणायचा आणि आरास करायची इतकं सोप गणित होत. सुदैवानं टिळकपथावर ,(त्यावेळचा तो शहराचा मुख्य रस्ता होता)  एक रिकामं दुकान अनायासे मिळालं. आज खरच याचा हेवा वाटतो कारण औरंगाबाद सारख्या शहरात गणेश महासंघालाही दरवर्षी जागा बदलावी लागतेच.
     चार डोकी एकत्र आली, बाल बुध्दी प्रमाणं नियोजन झालं. पावती पुस्तक, न्यास नोंदणी याची माहिती आम्हाला असणं शक्य नव्हतं. मग मीच मागिल वर्षीच्या को-या पानांची बाईंडिग केलेली वही घेतली आणि आमचा मोर्चा बढई गल्लीच्या प्रत्येक घराकडे निघाला. सव्वा रुपया ही स्टॅन्डर्ड वर्गणी होती. त्याखाली वर्गणी स्वीकारायची नाही हे निश्चित. पाच रुपये वर्गणी देणारा सज्जन आणि अकरा रुपये देणारा सधन असा सोपा हिशेब. सुदैवानी आसपासच्या दुकान मालकांनी सधन असल्याचे दाखवून दिल्याने वर्गणी भरपूर जमली.
     मी घरुन हिशेबासाठी वही आणलेली, त्यामुळे पुढचे व्यवहार आपसुकच माझ्या गळ्यात टाकून सगळे मोकळे. तू आमचा कोषाध्यक्ष असं सगळ्यांनी सांगितलं. आता जबाबदारी आपणावर टाकली म्हणून मला देखील मुठभर मास चढलं. शाळेच्या दप्तर पेटीला मग गणेशोत्सवात  सुटी देवून त्या पेटीचं रुपांतर तिजोरीत करण्यात आलं. पैशांच्या व्यवहारात गडबड नको म्हणून मी ही व्यवस्था केलेली.
     गल्लीच्या मागच्या मैदानावर मोठ्या लायटींगसह मोठ्या मंडपात गणपती बसवला जायचा मंडळाचं नाव गाजलेलं आणि अनेक पुरस्कार देखील मंडळाला मिळालेले. मंडळ होतं त्रिमूर्ती गणेश मंडळ, आम्ही तास न् तास त्या नाचणा-या दिव्यांची मजा बघायचो.
     ` हरी ओम हरी `  आणि ` रंभा हो हा `  असा डिस्कोचा धिंगाणा चालायचा. आपल्या मंडळाचं नाव काय ठेवायचं यावर चर्चा सुरु असताना मी सुचवलं त्रिमूर्ती बाल गणेश मंडळ आणि ते लगेच मंजूर झालं.
     आर्थिक नियोजन व्यवस्थित असावं यासाठी मग मी स्वत: शेजारच्या चाचूच्या किराणा दुकानातून गुलाल, नारळ, पंचखाद्य आणि जरुरीच्या वस्तूंची खरेदी केली. पालोदकरांच्या रसिकराज मधून दिव्यांची माळ आणि विजेचे बल्ब आणले. मराठवाड्यात या बल्बला गोळा तर ट्यूबलाईटला नळी म्हणतात. आमच्या मराठवाड्यात पेनचं रिफिल नसतं तर पेनची कांडी आणि पेन देखील कांडीचं पेन असतं तर फाऊन्टन पेनला पत्तीचं पेन म्हणतात.
     सलग दहा दिवस सकाळ संध्याकाळच्या आरतीचं नियोजन त्यासाठी ताट तयार करणे त्याचप्रमाणे नवव्या दिवशी गणपतीसमोर सत्यनारायणाची पूजा. रात्री तिथच मुक्काम असे दहा दिवस कसे उडून गेले हे कळलंच नाही .... असा हा बाल गणेश मंडळाचा दहा दिवसाचा व्यवहार माझा पहिला व्यवस्थापनाचा धडा होता. आताही गणेशोत्सव म्हटलं की हा अनुभव नव्याने ताजा होत असतो. आणि मनातून गणेशाला वंदन करीत आपोआप शब्द ओठांवर येतात गणपती बाप्पा मोरया !

Sunday, 28 August 2011

त्यांचं .. तू-तू..मै..मै.. !


महिला आज सर्व क्षेत्रात आपल्या गुणवत्तेवर पुढे जाताना दिसत आहे आणि खास भारतीय मनोवृत्तीने त्यांना खूप पुढे जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्नही आपणास दिसतो. यात अनेक घटक जबाबदार आहेत. मात्र कौटुंबिक पातळीवर जे कलह दिसतात त्यामध्ये स्त्री स्वत: स्त्रीच्यामार्गाने अडथळे आणण्याचा प्रयत्न करते असं चित्रण अनेक टि.व्ही. मालिका दाखवत असतात, अर्थात या दाखविण्यात अतिरेकीपणा असला तरी बहुतांशी हे सत्यदेखील आहे.
            घरातली पोर लहानाची मोठी करुन दुस-या  घरी द्यायची हे जसं प्रत्येक पालकाचं कर्तव्य मानलं जातं तसं सून म्हणून येणारी मुलगी तशीच आहे. असं मानलं जात नाही. परिणाम सासू-सून यांची अखंड चालणारी तू-तू मै-मै याला काही पर्याय आहे काय ? होय याला पर्याय आहे. मात्र त्यादृष्टीने प्रत्येक स्त्रीला आपली मानसिकता बदलावी लागेल. सूनेला मुलगी मानून जगणाऱ्या स्त्रिया आहेत. तुलनेत त्यांचं प्रमाण नगण्यच ठरतं म्हणूनच आदर्श सासू-सून हा पुरस्कार आणि बातमीचा विषय असतो.
            विवाहानंतरचं स्त्रीचं जीवन इतका कष्टप्रद असतं का ? याला दोन्ही बाजूंनी पटवून देता येत असलं तरी अंतिम सत्य हेच आहे की मनोभूमिका बदलल्या नसल्याने स्त्रिया याला अधिक कष्टप्रद करतात. सासू नेहमी खाष्ट असते अशी भूमिका अगदी भातुकलीच्या खेळातून संस्कारक्षम वयात मुलींच्या मनावर ठसविण्याचा प्रकार होतो आणि ही प्रतिमा पुसली जात नसते.
मानसशास्त्रीय दृष्टीकोणातून विचार करताना असं सांगता येतं की जन्माला आलेलं बालक पूर्णपणे निर्भय असतं. आपण भिती त्याच्या मनात जन्माला घालत असतो. त्या बालकाच्या संगोपनात आपण त्याच्या मेंदूच्या गतीला आपली गती जुळवू शकत नसल्यानं   झोपला नाहीस तर `भोकाडी` येईल असं सांगून किमान अल्पकाळासाठी स्वत:ची सुटका करुन घेतो. ही भिती त्याच्या मेंदूत एक प्रतिमा निर्माण करुन ठेवते आणि ती प्रदीर्घ काळ त्याच्यावर राज्य करते.         
            आपल मनं अर्थात आपल्या मेंदूच्या कप्प्यात असणा-या अनुभव, जाणीवा, भावना आणि उणिवा यांचा उलगडत जाणारा तरीही अनाकलनीय असा कप्पा असतो. यामध्ये बालवयात म्हणजे बालक जन्माला आल्यापासून माहिती जमा होत राहते. संगणकात होणाऱ्या डाटा एन्ट्री सारखा हा प्रकार असतो. ही माहिती देतानाच चुकीची दिली गेली तर काय होईल ! त्यावर आधारीत सर्वच माहिती चुकीची ठरत जाईल अशा स्थितीत मोठेपणी आपल्याला देण्यात आलेली माहिती चुकीची होती असं पटलं असलं तरी प्रारंभी फीड केलेल्या माहितीची प्रतिमा पुसली जात नाही आणि तिथं मनाची अवस्था दोलायमान होते. खरं काय  याचं संभ्रम निर्माण होाते. यातून कळतयं पण वळत नाही अशी स्थिती येत असते. याला जबाबदार अर्थात आरंभीची चुकीची माहिती असते. त्यामुळे संस्कारक्षम वयात बालकाची जिज्ञासा पूर्ण करण्याचा प्रयत्न अत्यावश्यक असतो.
            आपल्याकडील प्रचलित लोककथा आणि लोकगीतांमध्येही सासरचं वर्णन तसं आक्षेपार्ह आहे. सासू आणि सून यांच्यात असणारं वयाचं आणि त्यामुळे असलेला जनरेशन गॅप हा मुलगा आणि त्याच्या वडिलांमधील जनरेशन गॅप इतकाच असायला हवा. मात्र विविध माध्यमांमधून स्त्रियांची असणारी सासूची भूमिका आणि प्रतिमा समाजानं बिघडून आखलेली असल्यानं ती प्रतिमा सर्व समस्या निर्माण करते.
            माता आणि मुलगी यांचा भावनिक ओलावा ही नैसर्गिक बाब आहे. आपल्या उदरातून आलेला हा हाडा-मासाचा जीव म्हणून माता मुलीचं पोषण करते. हा ओलावा सासू-सून यांच्या नात्यात कधीच येणं शक्य नाही आणि ते अपेक्षितही नाही. कालपर्यंत अपरिचित असणारी व्यक्ती आपल्या घरात आल्यावर त्या व्यक्तीसोबत भावनाची बांधिलकी निर्माण व्हायला एक विशिष्ट कालावधी जावाच लागतो.सासू-सूनच काय पण पती-पत्नीच्या नात्यातही लग्न झालय म्हणून एका रात्रीतून भावनिक बंध तयार होत नसतात. ते एकमेकांच्या विश्वास आणि परस्परातील आदराने तयार करावे लागतात.
            येणारी सून ही नव्या पिढीची प्रतिनिधीत्व करीत असते. तर सासू अनुभवानं संपन्न असतं. माझ्या सासूनं मला त्रास दिला म्हणून मी सूनेला त्रास देणारे ही रॅगिंगची दूष्टचक्रांची भूमिका कोणतीही सासू बाळगत नसते. हे देखील महत्वाचे आहे. त्याच बरोबर सासू म्हणजे कजाग आणि खाष्ट असणार ही भूमिकाही सूनेनेही ठेवू नये. सहवासात येणारे सुख-दु:खाचे प्रसंग पुढील काळात त्या दोघीतील बंध निर्माण करतात आणि याला वेळ लागणार हे सर्वांनी समजून घ्यायला हवं. जुनी पिढी आणि नवी पिढी यातील विचाराचा संघर्ष चालतच राहणार आहे. त्यात सूवर्णमध्ये साधून पूर्वग्रहदुषितपणा सोडण्याची मानसिकता स्त्रियांनी ठेवली तर प्रत्येक सासू आदर्श सासू आणि प्रत्येक सून आदर्श  सून होवू शकते.                                
- प्रशांत दैठणकर