Wednesday, 19 August 2015

या जन्मावर......या जगण्यावर



                सौंदर्य..... याची परिभाषा कुणाला करता आली आहे आजवर. चित्रपट सृष्टीतलं शापित सौंदर्य अर्थात मधुबाला असो की हॉलीवूडची मर्लिन मन्रो......प्रत्येक सौंदर्याला शाप असू शकत नाही......तसं पाहिलं तर सौंदर्य हे आपल्या बघण्याच्या नजरेवर अवलंबून असतं.
               छत्रपती शिवरायांनी सुरतेवर चढाई केली त्यावेळी राजांसमोर हजर करण्यात आलेल्या सूरतच्या सुभेदाराच्या पत्नीच्या सौंदर्याची वाखाणणी राजांनी अतिशय आदरानेच केली होती. सौंदर्य आणि त्याकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन आपलं व्यक्तीमत्व कसं आहे ते सांगत असतो.
              सौंदर्य प्रत्येकाच्या ठायी आहे पण म्हणतात ना हि-याची पारख फक्त जोहरी करु शकतो. पारखी नजर म्हणजे सौंदर्य शोधणं. आज बखरकारांनी केलेलं मस्तानीचं वर्णन आपल्या नजरेसमोर तेच सौंदर्य नव्यानं साकार करतं.
              तसं म्हटलं तर कबरस्थान काही फिरायला जाण्याची जागा होवू शकत नाही मात्र त्यातही सौंदर्य असेल तर जगातल्या सात आश्चर्यापैकी एक असणारा ताजमहल हे त्याचचं प्रतिक आहे. आपल्या लाडक्या मुमताज च्या प्रेमाखातर हा सुंदर ताजमहल उभा करून तिच्या स्मृतीला अजरामर करुन ठेवलय असचं म्हणता येईल.
            सौंदर्य आणि प्रिती हे हातात हात घालून चालतात असं म्हटल्यास वावगं ठरु नये मर्लिन मन्रोचे आणि जे.एफ.के.यांच्यातील बंध याच सौंदर्याच्या धाग्यात गुंफले होते. इकडे हॉलीवूडच्या चर्चा हल्ली जास्त होत आहे कारण माध्यमांचा विस्तार झाला आहे.मर्लिन पेक्षाही अधिक सौंदर्य असणारी अभिनेत्री म्हणजे एन्ग्रीड बर्गमन होय. तिचं सौंदर्य ख-या अर्थाने आरसपानी असं होतं.
         
   सौंदर्याचं बखाण करताना त्याच सुंदर शब्दांचा वापर करावा लागतो पंकज उधास यांच्या आवाजातील एक गाणं इन्ग्रीडचं सौंदर्य आपल्यासमोर उभं करतं
चांदी जैसा रंग है तेरा सोने जैसे बाल.........
 एक तू ही धनवान है गोरी बाकी सब कंगाल
              काय ती कविकल्पना.....खरचं जो न देखे रवि ते देखे कवी असचं म्हणावे लागेल.
               उगवत्या सूर्याची प्रभा आणि मावळतीचा सूर्य यांच्या जोडीला पौर्णिमेच्या एक दिवस आधीचा चौदहवी का चांद म्हणजे सौंदर्य......त्याचं वर्णन देखील शब्दातीत
               बॉलीवूड मध्ये निरनिराळया शायर लोकांनी या सौंदर्याच्या वर्णनात शब्दांचा जो वापर केला आहे त्याला काही तोडच नाही असं म्हणता येतं ते यासाठीच
              जुल्फे......हा शब्द म्हणजे सौंदर्य.......बलखाती लट, गेंसू असे निरनिराळे उर्दू शब्द सौंदर्याचं रुप आपल्या डोळयापुढे उभं करीत असतात.
              सौंदर्य म्हणजे एक आंतरिक भावना......मनाला जे भावतं ते सौंदर्य असतं......पावसानंतर हिरवाईने नटलेल्या डोंगर रांगा......पहाटेच्या उन्हात चमकणारे गवतांवरील दवबिंदू म्हणले सौंदर्य......दूरपर्यंत पसरलेल्या पिकांमधून वाहणारा वारा आणि त्याच्या तालावर डोलणारी ती कणसांची रांग म्हणजे सौंदर्य.....हसताना गालावर पडणारी खळी अर्थात डिंपल म्हणले सौंदर्य.....अनेक रुपात आपणास ही अनुभूती येते.
             लता मंगेशकरांचा आवाज आणि आशाबाईंचा सूर देखील सौंदर्यच.....सौंदर्य नजरेतूनच कळतं असं नव्हे तर ते श्रवणातून, गंधातून आणि स्पर्शातून देखील कळत असतं. एखादा मनाला भावणारा आणि सतत ऐकत रहावं असा वाटणारा आवाज म्हणजे देखील सौंदर्य.
            माझे एक मुस्लीम सहकारी सांगायचे की, फल, सब्जी, अनाज यह जिस्म का खाना है| तो सुगंध रुह का......तप्त अशा धरतीवर पावसाचे थेंब पडायला लागतात आणि तापलेल्या मातीशी थेंबांचे मिलन झाल्यावर जो दरवळ येतो तो मृदगंध म्हणजे देखील सौंदर्यचं.......

    असं आयुष्य जगणा-यांचे काही अनुभव आपणास वेगळ्या जगात नक्कीच नेणारे असतात. पण त्यातून एकच जाणवत की जगताना धुंद होवून जगायचं असतं.. जगात असणारी सुंदरता आपण टिपायची असते. जग जाणायचं असतं.. कारण इथलं इथंच संपणार आहे.
   सौंदर्य एक अनुभूती असते आपल्या जगण्याची......जगत राहण्याची आशा तर कधी प्रेरणा असते म्हणूनच म्हणावं.

इथल्या पिंपळपानांवरती.................................

....... या जन्मावर या जगण्यावर..शतदा प्रेम करावे.

                                                                                    - प्रशांत दैठणकर

Tuesday, 22 July 2014

पाऊस झेलतांना.......!

गर्द काळया ढगांची गर्दी येणा-या पावसाची वर्दी देत होती घरापासून चार पावलं चाललो नाही की त्यानं बरसायला सुरुवात केली होती. सारे आसपासच्या झाडांचा आणि आडोशांचा आधार घेऊन पावसापासून अंतर ठेवून होते मी माञ तसाच पाऊस अंगावर झेलत पायी चालत राहिलो. नाक्याच्या त्या ठेल्यावरल्या भज्यांच्या वासाने मन एकदम कॉलेजात पोहोचलं.
 अशीच ती एक भिजलेली दुपार ती आणि मी माझ्या TVS वर पाऊस झेलत असं धुंदपणे रस्त्यावरुन जात होतो. नाही म्हणायला दोघांनाही भिजायला आवडतं. भिजण्यात देखील तिचं लॉजिक असायचं. सर्व आटोपून घराबाहेर पडताना पाऊस आला म्हणजे तो नकोसा असतो माञ सर्व कामे आटोपून परत येताना तो आला म्हण्जे चिक्कार मज्जा……… मग धुंद भिजायचं. 
ती श्रावणातली दुपार होती. एल.आय.सी. च्या पदभरतीची परीक्षा देवून ती परतली आणि तिला घेवून मी शहराच्या मध्यवस्तीत चिंब भिजत चाललोय. आडोशाला लपून पावसाला टाळणा-या प्रत्येकाला कदाचित आमचा हेवा वाटत होता. किमान त्यांची नजर तरी तसं बोलत होती. चिंब चिंब भिजल्यावर औरंगपु-याच्या एका हॉटेलमध्ये गरम कॉफीचे घोट थंडी कमी करत होते. अगदी रोमँटीक असा क्षण
पावसाचं आणि माझं काही आगळं नातं आहे. प्रेमात पडल्यावर प्रश्न् पडला की याला पडणं का म्हणतात. किती सुंदर भावना आहे ही………या पडण्यावर आम
च्या वेदांतने मागच्या महिन्यात विचारलेला सवाल आठवतो बाबा घराचा स्लॅब बांधतात मग सगळे स्लॅब पडला का असं का विचारतात. जाऊ दे पडणं………तेही पावसाच्या साक्षीनं
ती नंतर पत्नीच्या आणि आईच्या भूमिकेत शिरली असली तरी तिचा मिश्कील स्वभाव गेलेला नाही माञ हल्ली पावसात तिच्यातली आई जागृत होते त्यावेळी मुलं फोन करतात बाबा छान पाऊस पडतोय……..आई ओरडणार हे ठाऊक असल्यानं मला फोन करायचा मग उत्तर………फोन काय करताय जा पळा भिजायला……..!येरे येरे पावसा........म्हणत बालपण चिंब भिजलं पाहिजे आणि “रिमझिम गिरे सावन” म्हणत तारुण्य् धुंद झालं पाहिजे. 
म्हणतात ना, 
ऐ बारिश इतना ना बरसके वो आ ना सके………!और उनके आनेके बादइतना तू बरस…….के वो जा ना सके.
पुन्हा वळून बघताना 26 वर्षांपूर्वीची माझी वाक्ये मला पुन्हा आठवली.
उदयाच्या वर्तमानात रम्य् आठवणी हव्या असतील तर आजच्या वर्तमानात तसं आपण जगायला हवं………मनसोक्त्……मनमोकळं होवून…….!
पावसाच्या पाण्यात पापण्यांच्या कडा ओलावल्या तरी कुणाला कळणार आहे की हा पाऊस नभीचा आहे की अंतरीचा……..आपण आपलं चालत रहायचं…….न थकता……पाऊस झेलत…….!

Monday, 21 October 2013

रस्ते सुरक्षा साक्षरतेची निकड


रस्त्यावर होणा-या अपघातांचे प्रमाण वाढतच आहे. गेल्या वर्षाभरामध्ये भारतात रस्ते अपघातात मृत्यूंची संख्या साधारण दीड लाख इतकी होती.मात्र अपघात जखमी झालेल्यांची संख्या त्याहीपेक्षा जास्त आहे. त्याखेरीज चिंतेचा विषय म्हणजे राष्ट्राची अब्जावधींची संपती यात नष्ट झाली. या सर्व पार्श्वभूमीवर विचार करताना एकच बाब जाणवते ती म्हणजे रस्ता सुरक्षा विषयक जागृती आपल्याकडे जवळपास नाही. 
चित्रपट आणि वास्तव यात फरक असतो पण चित्रपटात भन्नाट वेगाने गाडी चालवताना बघून त्या धूम चे अनुकरण रस्त्यावर केल्‍यास अपघात होतो. यामुळेच रस्त्‍यावरील अपघातात दुचाकीस्वारांच्या मृत्यूचे प्रमाण  अधिक आहे. त्याहीपेक्षा अधिक चिंताजनक बाब म्हणजे यात 18 ते 30 वर्षे वयोगटातील तरुण मुलांचे प्रमाण सर्वाधिक आहे.
रस्त्यांवर वाहन चालवताना ज्या प्रकारची काळजी घ्यायला हवी त्‍याप्रकारची काळजी घेतली जात नाही. याला कारण अर्थातच प्रशिक्षणाचा आभाव हेच आहे. चारचाकी वाहन परवाना मिळवायचा असेल तर काही प्रमाणात त्याला प्रशिक्षणाची जोड आपणाकडे देण्यात आलेली आहे. मात्र दुचाकीच्या बाबतीत असं औपचारिक प्रशिक्षण दिलं जात नाही.
चारचाकी वाहनात चालवताना किमान संतुलन करण्याची आवश्यकता नसते. संतुलन दुचाकीवर आवश्यक ठरते. यामुळेच गतीचे वाहन चालविताना अचानक खड्डा आल्‍यास किंवा गतीरोधकावर संतुलन बिघडून अपघात होण्याची शक्यता असते. खड्डे चुकविताना होणारे अपघात आणि रस्त्यावर कुत्रा आडवा आल्याने होणारे अपघात टाळण्यासाठी वाहणाचे नियंत्रण व वाहन चालविण्याचे कौशल्य महत्वाचे असते. प्रशिक्षण नसल्याने कौशल्य येत नाही आणि गती असल्याने नियंत्रण जमत नाही त्यामुळे अधिक अपघात घडतात.
धाडस हे देखील अशा अपघांताच्या कारणांपैकी एक कारण आहे. अतिघाई इतकाच अपघाताचा धोका विनाकारण धाडस दाखविल्याने होतो. तरुण वयात ही धाडसाची प्रवृत्ती प्रबळ असते. आपण एकदम कुशल चालक आहोत या फाजिल आत्माविश्वासापोटी असे धाडस आणि त्यातून अपघात हा प्रवास असतो.
अपघाताच्या कारणांमध्ये आणखी एक कारण ते मद्य आणि वाहन. मद्य पिल्यानंतर वाहनाचा अपघात होण्याची शक्यता 8 पट अधिक वाढते हे लक्षात न घेता मद्यप्राशन करुन वाहन चालविण्या-यांची संख्या खूप मोठी आहे. अपघाताच्या कारणांमध्ये मद्यासोबत आता भर पडली ती मोबाईलची. आपण जगात सर्वात महत्वाचे आहोत असा भाव आणून मोबाईलवर बोलत वाहन चालविल्याने हल्ली अपघात अधिक प्रमाणात आहेत.  
मध्येंतरी कोल्हापूरवरुन गोव्याला जाताना निवास व्यवस्थेसाठी ट्रॅव्हल एजन्टला मोबाईल केला. त्याने माहिती दिली व फोन बंद करताना सांगितले मला सव्वातास फोन करु नका मी बाहेर जातोय आणि कार चालवताना फोन बंद असतो. चला एक तर सुरक्षा साक्षर भेटला. पण अशी साक्षरता सर्वांपर्यत पोहचली तरच रस्त्यांवर  कुत्ते की मौत मरणं बंद होईल.


                                     -प्रशांत अनंत दैठणकर-

Monday, 7 October 2013

प्रवास आपला टपालासोबतचा...!

नव्या पिढीला फारसा परिचित नसला तरी जाणत्या पिढीमधील तुमच्या-आमच्या पिढीत साऱ्यांनी खेळलेला खेळ म्हणजे मामाचं पत्र हरवलं आता त्या वयात निरागस असल्याने खेळताना कधी प्रश्न पडला नाही की मामाचंच पत्र का हरवायचं आणि ते नेमकेपणने मलाच का सापडायच ? यातला विनोदाचा भाग बाजूला ठेवला तर मामाचं पत्र म्हणजे आईच्या माहेरचा दुवा होता. त्यात माहेर म्हटलं की सगळ्याच स्त्रिया हळव्या होत असतात माहेरुन ख्याली खुशाली सांगणारं त्याकळचं ते 15 पैशांचं पोस्टकार्ड जगण्याचा घटक होता आणि तो पत्र आणणारा पोस्टमन आपल्या घराकडे कधी येतो याची सर्वांना वाट असायची.
स्वातंत्र्य प्राप्तीनंतर नागरिकरणाला वेग आला आणि गावातली तरुण पिढी शहराकडे वळली. ज्यांनी मातीशी नातं जपलं अशी मोठी पिढी गावातच राहिली. त्याकाळी टेलिफोन फक्त श्रीमंताघरची वस्तू होती म्हणून पत्रव्‍यवहार हा जगण्याचा घटक होता.
मुंबईत नोकरीसाठी कोकणातून आलेल्या चाकरमानी लोकांसाठी संदेशवहनाचा तो खात्रीलायक आणि स्वस्त मार्ग होता.
संदेशवहनाच्या पध्दती काळानुसार आणि तंत्रज्ञानानुसार बदलत गेल्या आता व्होडाफोनचा जमाना असला तरी पूर्वी घोडाफोनचा जमाना होता. घोड्यावरुन संदेशवाहक पाठवून राजे एकमेकांशी पत्रव्यवहार करीत तर प्रशिक्षित कबुतरांकडूनही संदेश पाठविले जात होते.
युरोप आणि अमेकरकेत टपाल व्यवस्था सुरु झाली. ब्रिटीश भारतात आले त्यावेळी त्यांनी हे साधन भारतात आणले टपालाची शिस्तबध्द वितरण व्यवस्था असणारी टपाल कार्यालये दिडशे वर्षांपूर्वी थाटायला लागली त्याकाळी तार अर्थात टेलिग्राफ ही गतीशील संदेशवहनाची यंत्रणा टपाल कार्यालयाचाच भाग होती.
अशाच 15 पैशांच्या पोस्टकार्डमुळे विलंबाने का होईना शुभवर्तमान, ख्याली खुशाली, लग्न जुळल्याच्या बातम्या कधी निधनाच्या बातम्या कळायच्या पत्र जमवून ठेवायला घराघरात तारकेट असत. याच टपाल विभागाच्या तिकिटांमुळे हजारो जणंनी तिकिट संग्रह गोळा केलेले दिसतात निरनिराळया देशांची टपालाची तिकिटे गोळा करणे हा एक चांगला छंद आहे.
पोस्टमनला बऱ्याच वेळा इतरांची पत्रे लिहून देणे तसेच आलेल्या पत्राचं वाचन करुन देणे करावे लागे. न शिकलेल्या पिढीला त्यामुळे पोस्टमन अर्थात डाकिया घरातलाच सदस्य मानत होते. त्याला दिवाळीला आवर्जून पोस्त दिली जायची.
काळ बदलला तसं संदेश वहनाचं स्वरुप बदललं मात्र आजही व्यापारी वर्ग आणि ग्रामीण भागात राहणाऱ्यांना पोस्टकार्ड जवळचं वाटतं. नव्या पिढीत आता मोबाईलवर मेसेज पाठविणं, चॅटींग करणं, फेसबुक वर केलेलं स्टेटस् अपडेट आणि व्टिटरवर केलेलं व्टिट आदी मार्ग उपलब्ध आहेत त्यातच ही मंडळी रमते. पत्र लिहिणे आता भाषा विषयात काही मार्कांपूरतं उरलं आहे.
पत्र लिहिताना मोठ्यांना केलेला नमस्कार मग पत्राचा मायना. पत्र पूर्ण झल्यावर लिहायचं राहून गेलं म्हणून लिहिलेलं ता.क. अर्थात ताजा कलम. निधनाची वार्ता कळवणं आलं की त्यात टाकलेली टीप हे पत्र वाचताच फाडून टाकणे आणि आपणही ते फाडायचं ही पध्दत या पत्रालाच तार समजून लवकर निघावे या आशयाची खास टिप आदी अनेक बाबी टपाल आणि पोस्टकार्डशी जुळलेला आहे.
याच टपाल खात्यमुळे आवर्ती ठेव अर्थात आर.डी. रिकरिंग डिपॉझिट च्या रुपाने अनेकांना व्यवसायची संधी लाभली आजही टपाल खात्याशी ही माणसं निगडीत आहेत. भविष्य निर्वाहासाठी पीपीपी. अर्थात टपाल भविष्य निर्वाह निधीच्या रुपाने अनेकांनी सुरक्षित गुंतवणुकीसाठी टपाल खात्यावर विश्वास टाकला.
9 ऑक्टोंबर हा या टपाल खात्याची आठवण देणारा टपाल दिन. आज तंत्र बदलल्यावर टपाल विभागाने  ई-ट्रान्सफर आणि ई-मनी ऑर्डर सुरु केली पण शहरात व वसतीगृहात राहून हॉस्टेल लाईफ ज्यांनी जगलय यंना या मनी ऑर्डर म्हणजे लाईफ लाईन असायची. या मनी ऑर्डरच्या भरवशावर होणरी उधारी आणि पार्ट्या यांचं सान त्यांच्या आयुष्यात एखाद्या आठवणीच्या कुपीसारखं आहे.
लष्करी सेवेत असणाऱ्यांना सिमेवरुन घरी पैसे पाठवणं आणि आपली खुशाली कळवणं या साठी टपालाचाच आधार आहे. संदेसे आते है हमे तडपाते हे हे बॉर्डर चित्रपटातलं गाणं याचा भावनेला व्यक्त करणारं आहे.नाम चित्रपटात पंकज उधासने गायलेल व त्याच्यावरच चित्रित झालेल चिठ्ठी आई है या गाण्यावर हॉस्टेल मधले मित्र रडताना मी बघितले आहेत. डाकिया डाक लाया हे काका अर्थात सूपरस्टार राजेश खन्नावर चित्रित झालेलं गाणं असो की स्मिती पाटीलचं हमने सनम को खत लिया ही गाणी डाकिया, डाकबाबू अर्थात पोस्टमन आणि टपालाचं महत्व अधोरेखीत करतात.
आजही टपाल खातं महत्वाची कामगिरी बजावत आहे. अंगडिया सेवा आल्यवर खाजगी सेवेचा दर्जा पाहून अनेक जण कुरिअरकडे वळले असले तरी महत्वाचे दस्तऐवज पाठविण्यासाठी आजही टपाल खात्याची स्पीडपोस्टसेवा पसंद केली जाते. 
टपाल खात्यात असणारा आरएमस अर्थात रेल मेल सर्व्हीस आजही गतीमान प्रवास तुमच्या-आमच्या आयुष्यात अगदी महत्वाचा आहे. घरोघरी जाऊन टपाल वाटप करणारा पोस्टमन आणि त्याच्याशी निगडीत यंत्रणेला टपालदिनी सलाम आणि चौकातल्या लाल रंगाच्या टपाल पेटीलाही सलाम.


                             -प्रशांत अनंत दैठणकर- 

Tuesday, 26 March 2013

रंगांचा हा उत्सव


आठवते ती प्रत्येक होळी त्या वयातली ज्या वयात रंगात रंगण्याचं वेड होतं मनात. ते रंग उडवण्याचे आणि रंग उधळत त्या रंगात रंगण्याचे दिवसही अगदीच ताजे आहेत मनात. ते रंग अंगावरून उतरले असले तरी मनातून कधीच उतरणार नाहीत हे देखील तितकंच खरं हे सांगावच लागेल. बेंबीच्या देठापासून बोंबाबोंब करताना आनंद वाटायचा. दुस-या वर्गात असताना धुळवडीला मोठ्यांच्या होळीत नाचून घरी परतल्यावर काय बे असं अनाहुतपणे तोंडातून बाहेर पडल्यावर बापाने रागात पाठीवर बे एके बे .. बे दाही वीसपर्यंत रंगवलेला पाढा अनेक दिवस मिरवला.. त्याच दिवशी शिवी नावाच्या शब्दाशी आयुष्यभरासाठी काडीमोडही झाला..
      शिमगा संपला तरी रंगांचं नातं मात्र आजही कायम आहे.. अगदीच रंगिला नसलो तरी हळव्या मनाने आयुष्याचे नाना रंग आजवर बघितले आणि ते जपले.. आजवर धुळव़डीला धुंद होवून रंगात रंगणं कायमच आहे.
गोरे रंग पे ना इतना गुमान कर.. असं म्हणत आपल्या प्रितीला चिडवण्यातली मजा काही औरच आहे इतकं रंगीत मन आजही आहे. सकाळ संध्याकाळ निसर्ग खेळत असलेल्या रंगाचा खेळ असो वा दारात रोज रंगणारी रंगावली.. रंगांची साथ कायमच आहे त्याही पेक्षा रंग आपला पाठलाग करतात असं म्हणावं लागेल असं हे आयुष्य.... प्रेमात पडल्यावर हे रंगीत आयुष्य सप्तरंगी झालं आणि मनही त्या रंगांनी वेडावलं.. ते आजही कायम आहे.. तरीही इतर रंगांचं प्रेम आहे हे का याला काही उत्तर नाही. काही प्रसंग कधी कधी रंगाचा बेरंग करीत असले तरी ते मुळचे रंग पुन्हा मनाला उभारी देत असतात. आधार देत राहतात.. स्वप्नांनाही रंगीत करीत असतात.
एरव्ही नाना रंगाचा अंहंकार मिरवणारे चेहरे याच एका दिवशी समान दिसायला लागतात. आपण सर्व एकच आहोत याची जाणीव करून देणारा रंगांचा हा उत्सव.. मनाला रंगवून आत्मभान आणि आत्मपरिक्षण करायला लावणारा हा  रंगोत्सव...
रंगा या जगाच्या रंगात रंगा...
प्रशांत दैठणकर 26 मार्च 2013

Tuesday, 19 March 2013

फसवं बूक !


संपर्काचं नवं लोकप्रिय साधन बनलेल्या फेसबूकच्या माध्यमातून जसे जिवाभावाचे मित्र सापडतात तसेच हे मायेचं महाजाल अनेक तरुणींसाठी सापळा देखील ठरत असल्याने या विषयाकडे गांभिर्याने बघण्याची गरज आज निर्माण झाली आहे.
     सायबर गुन्हेगारी हा पोलिसांकरिताही नवा प्रकार आहे. साधारणपणे एखादा चोरीसारखा गुन्हा घडतो. त्यावेळी गुन्हेगार त्याच परिसरात सापडू शकतो त्वरीत हालचाली झाल्यास त्याला लगेच जेरबंद करणे शक्य आहे. मात्र इंटरनेटचं हे महाजाल वैश्विक स्वरुपाचं आहे. समोरुन आपणाशी गप्पा मारणारी व्यक्ती जगाच्या कोणत्या कोपऱ्यात आहे हे आपणास सांगणं शक्य नसतं.
     नेटवरुन संपर्क प्रस्थापित करुन मुलींना नको त्या ठिकाणी बोलावून प्रेमाच्या नाटकाआड त्यांच्यावर अत्याचार करण्याचे प्रकार आता घडत आहेत. त्यामुळे पालकांनी सजग होण्याची आज गरज निर्माण झाली आहे.
     काही वर्षांपूर्वी भाकित होतं की यापुढील काळात वाद आणि भांडणं प्रसंगी युध्द झाले तर ते पाण्यासाठी होईल. हे भाकित आता खरं होताना जाणवतय 70 टक्के पृष्ठभागावर पाणी असणाऱ्या आपल्या या वसुंधरेवर आज अनेक भागात पाण्यावरुन भांडणे होत आहेत. देशांमधील याबाबतचे वाद युध्दही आमंत्रित करु शकतात अशा स्थितीत आहेत.
     सायबर क्राईम मध्ये गुन्हेगार जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असू शकतो हे लक्षात घेऊन यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील कायदा करण्यात आला आहे. हा कायदा पहिला असा कायदा आहे जो जम्मू आणि काश्मीरसाठीही लागू करण्यात आला आहे. याचा उद्देश या प्रकारचा गुन्हा कोठेही होईल हे गृहीत धरुन तपासाच्या मर्यादांचा विस्तार करणे असाच आहे.
     या गुन्हेगारीच्या सापळ्यात आपली मुलं सापडणार नाहीत याची काळजी आपल्यालाच घ्यायला लागेल यासाठी आपली मुलं संगणकावर काय बोलतात याची माहिती आपण ठेवणं अत्यंत आवश्यक झालय. मुलांचे फेसबूक सारख्या सोशल नेटवर्कींग ग्रुप मध्ये कोण दोस्त आहेत हे आपणास सहज कळू शकणे त्या मित्रांचे प्रोफाईल पाहून आपणास त्याबाबत ठरवता येईल.
     एकच सांगणं फेसबूक वापरा त्याचं फसवंबूक होवू नये याची काळजी घ्या.

                                           -प्रशांत दैठणकर-

Wednesday, 13 February 2013

रेडिओचं कात टाकणं ...!

       काळ झपाट्याने बदलतोय त्यासोबत बदलणारं तंत्रज्ञानही बदलत आहे. या गतिमान बदलाच्या काळात गेल्या 3 दशकात खुप मोठे बदल झाले याचे स्वागत झाले. कधी विरोध झाला पण बदल होतच राहिले कधी-काळी जिवनाचा अविभाज्य भाग बनलेला रेडिओ, टि.व्ही. आल्यानंतर अडगळीत गेला मात्र आता पुन्हा कात टाकून हे संवाद संपर्क माध्यम आता पुन्हा नव्या रुपात झपाट्याने आपलं महत्व सिध्द करीत आहे.

            कधी काळी हा रेडिओ संपन्नतेचं लक्षण होता गावातल्या तालेवार व्यक्तीकडेच रेडिओ असे. नंतर हा रेडिओ इराण्यांच्या हॉटेलचं आकर्षण बनला. या आकर्षणातून इराणी हॉटेल्स खच्चून भरलेली असायची त्याकाळात रेडिओला स्पर्धा होती ती केवळ ग्रामोफोन अर्थात फिरत्या तबकडीची याला रेकॉर्ड म्हणायचे नंतरच्या काळात टिव्हीच्या आगमनापूर्वी ग्रामोफोनचं युग मॅग्नेटीक कॅसेटनी सरकवलं हा काळ मेड इन जापान च्या लोकप्रियतेचा होता.

            टेपरेकॉर्डर वर कॅसेट टाकून गाणी ऐकायची आणि आपलाही आवाज  आपण ध्वनीमुद्रीत करुन ऐकायचा याही काळात रेडिओची क्रेझ अबाधित असल्याने रेडिओ आणि टेपरेकॉर्डर असा टू-इन वन घराघरात दिसायला लागला ज्यावेळी बुधवारी आवाज की दुनिया के दोस्तों अशी साद ऐकण्यास सारे अतुर असायचे त्याचवेळी टिव्हीचा चंचूप्रवेश झाला परंतु तो उमरावांच्याच दिवाणखाण्याची शान होता.

            या बदलाच्या काळात अनेक गोड स्मृती या रेडिओने अनेक पिढ्यांच्या मनात जागवल्या. रेडिओ सिलोनवर दर महिन्याच्या एक तारखेला आज पहिली तारीख.. खुश है जमाना हे गाणं जितक्या आवर्जून ऐकायचे तेच चाकरमानी के.एल.सहगल या गायकीतल्या भिष्मपितामहाचं 7.55 चं सकाळंचे गाण ऐकल्याशिवाय दिवस सुरुच करीत नसत.

            ऑल इन्डिया रेडिओ की उर्दु सर्व्हीस असो की विविध भारती, रेडिओ सिलोनच्या बरोबरीने सारा दिवसच संगीताच्या सुत्रात बांधला गेलेला तो काळ होता भाटापारा झुमरीतलैया ही गावं अख्ख्या जगाला याच रेडिओमुळे कळाली.

            रेडिओ ऐकणं हा आयुष्याचा अविभाज्य घटक बनलेल्या काळातच टिव्हीनं प्रवेश केला आणि हा इडियट बॉक्स घराघरात शिरायला लागला त्यावेळी रेडिओ अडगळीत पोहचला. आधी कृष्णधवल व नंतर रंगीत झालेल्या या टिव्हीची मोहिनी इतकी होती की अगदी कृषीदर्शनही सारे बघत बसायचे... हा मुंग्या टू मुंग्या टिव्ही ऑन ठेवण्याचा सुरुवातीचा काळ, नंतर यानं तुमची आमची संध्याकाळ कायमची चोरुन घेतली.

            दूरदर्शनच्या मोनोपलीनंतर आकाश खुलं होताच चॅनलचा पूर आला यात आघाडी घेणाऱ्या झी वाहिनीला आता 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. या झी ने खूप मोठं नेटवर्कच उभारलय आता म्हणाल त्या विषयावर आपणाला चॅनल दिसतात फूड ते फॅशन, भक्ती ते संजीवन वृत्त ते मनोरंजन काय म्हणाल ते अगदी खेळाच्या वाहिन्यांमध्येही क्रिकेटला वाहिलेल्या वाहिन्यांचा काळ आला.

            या काळात रेडिओची काही काळ पिछेहाट झाली असली तरी एफ.एम. वाहिन्यांच्या रुपात रेडिओने जोरदार कमबॅक केलं आणि चालता-बोलता मनोरंजन अन माहिती देण्यातली आपली उपयुक्तता सिध्द केली. वर्ल्डस्पेस रेडिओ सारखी कंपनी प्रतिसादाअभावी दिवाळखोरीत गेली असली तरी एफ.एम.च्या क्रांतीने पुन्हा नव्या पिढीच्या कानांचा ताबा घेतलाय. हातात आवश्यक झालेल्या स्टाईल स्टेटमेन्ट असणाऱ्या मोबाईलमधला रेडिओ आणि त्यावर चालू काळातली चालू गाणी असा योग या रेडिओने साधला असल्याने रेडिओ पुन्हा एकदा लाईम लाईट मध्ये आलाय. चटर-पटर करीत निवेदन करणाऱ्या आर.जे.नी आकाशवाणीचे धीमे गतीके बुलटीन कधीच मागे टाकले. आता चटपट-झणझणीत पिढीचा हा काळ आहे. येत्या काळात समुदाय अर्थात कम्युनिटी रेडिओ वाढीस लागणार हे स्पष्टच दिसतय शासनही सकारात्मक पध्दतीने स्पेक्ट्रम शुल्क माफ करण्याच्या विचारात आहे असं झाल्यास महाविद्यालय स्तरावरली रेडिओ केंद्र उदयास येतील.. तो दिवस दूर नाही हे स्पटच दिसत

                      --                                                                  -प्रशांत दैठणकर-

Saturday, 19 January 2013

औपचारिकतेकडून औपचारिकतेकडे

       झपाट्याने बदलत जाणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात काय  आणि कसं घडेल याचा अंदाज बांधणं कठीण झालं आहे. संवाद साधनांमधील मोठी क्रांती जग जवळ आलं हे सांगत आहे. प्रत्यक्षात मात्र आपण अधिक औपचारिकहोत आहोत आणि दुसऱ्या बाजूला खुलेपण स्वीकारत आपली स्वत:ची पर्सनल स्पेस घालवत आहोत असं फेसबुकवर बघताना जाणवतं.
            मुंबैकरांचं अधिक आयुष्य लोकलच्या प्रवासात जातं म्हणून त्या प्रवासात जिवाभावाचे मैत्र होणं त्यातून लोकलच्या उब्यात गणेशोत्सव साजरा करणं हे समजण्यासारखं आहे. पण आज फेसबुकवर जी पोस्ट दिसली ती निश्चितपणानं विचार करायला लावणारी होती.. लिहिलं होतं मैत्रिणींनो फेसबूकवर संक्रांत हळदीकुंकू कार्यक्रम ठेवला आहे...! छानच म्हणजे एकमेकांच्या घरी जाण्याचे निमित्त देखील नाकारणं असं याला म्हणावं का. नाण्याची दुसरी बाजू.. जगाच्या कानाकोपऱ्यातल्या सखींसोबत हळदीकुंकू करता येईल.
            या व्हर्च्युअल दुनियेत आपण किती गुंतायचं हा खरा सवाल आहे.. हे म्हणजे एक व्यसनच आहे. कालच गप्पांच्या ओघात सातत्याने फोनचा अडथळा आल्यावर माझे एक पत्रकार मित्र झटकन म्हणाले, साहेब या मोबाईल फोनलाही लोडशेडींग असायला पाहिजे.
            संवाद साधनं जीवनात उपयोगी आहेत हे खरं पण ही साधनं आपल्यातला औपचारिकपणा वाढविण्यासोबतच आपला प्रामाणिकपणाही संपवत आहेत... फोन वर पहिला प्रश्न असतो.. कुठे आहात..? फोन हे संपर्काचं साधन आहे ते पत्ता विचारण्याचं किंवा सांगण्याचं साधन नाही. आपणास नको त्या व्यक्तीचा फोन आल्यावर आपलं स्थान खूप दूर आहे, बाहेरगावी आहे असं खोटं सांगणं आताशा सर्वांना अंगवळणी पडलय.
            मोबाईलचा वापर प्रतिष्ठेचं लक्षण झालय मात्र पैसा नसल्यानं केवळ मिसड् कॉलवर भर देणारे अनेकजण इथं आहेत. तीच बाब फेसबूकची इथं खरा कोण हे ओळखणं खरच अवघड आहे. फेक प्रोफाईल असणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे आणि त्यातूनच सारे एकमेकांशी अंतर राखून असतात. सारे औपचारिक असतात.
            आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा नवा वैश्विक टप्पा म्हणून फेसबूककडे बघतो मात्र औषधाच्या परिणामांसोबतच दुष्परिणामांकडेही तितक्याच सजगपणे आपण बघायला हवं असं मला वाटतं.
 
                                                                                              -प्रशांत दैठणकर