Thursday, 31 March 2016

गेल्यावरच कळते......ती आई होती.

आई गेली माझी ...

तीन शब्दाचा तो मेसेज मला माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर दिसला आणि तो पूर्णपणे मेंदूत पोहोचायच्या आधी डोळयात टचकन पाणी आलं.


ती कोण, कशी ती कधीही पाहीली नाही.चेहरा नजरेसमोर येण्याचा प्रश्नच नव्हता कारण कधी तो चेहरा कधी बघितलेला नव्हता, पण 'आई' ओळखीची होती कारण ती आई होती ना....।

कवी ग्रेसचे शब्द.....
.-हदयनाथाच्या स्वरातलं कारूण्य कानात झिरपायला लागलं आणि तिची ओळख पुन्हा स्मृती पटलावर आली.

ती आई होती म्हणूनी घनव्याकुळ मी ही रडलो..। 

घन व्याकुळता मनातून कघी डोळयात पाझरली ते माझं मलाच कळलं नाही.
ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता...।

 खरं आहे पाऊस नजरेतून अखंडपणे वाहणारा, इतका की डोळयासमोरचं दिसेना...पण सावरावं, स्वत:ला आवरावं तिचं ते जाणं अकाली होतं पण निसर्ग नियम सांगतो आलेल्या प्रत्येकाला जायचं हे नक्की आहे कुणीही इथं चिरंजीवी नाही... अगदी आपण देखील मग तिच्या जाण्याची ती वेदना... खरच संवेदना इतक्या ऊफाळतात की शब्द खुजे पडतात तिच्या आठवणीत.

प्रेम प्रत्येकाच्या नशिबात असतं का? याला नकारार्थी उत्तर देणारे अनेकजण भेटतील पण त्यांना सांगावं वाटतं की
तुझी या जगात येण्याची चाहूल लागली त्या क्षणापासून तुझ्यावर कुणी प्रेम केलं असेल व ती आईच रे....।

आई तिची,तुझी, माझी...काही वेगळी नसतं...... ते एक आगळं अंतरंग असतं........ नऊ महिने आपल्या रक्तामांसावर वागवणारं आणि आयुष्यभर आपल्या प्रत्येक कृतीला आणि वृत्तीला जपणारं, प्रसंगी तीळ तीळ तुटणारं.

तिच्यातून तू बाहेर आल्यावर जग बघितलं पण जग कसं आहे हे तुला कळेपर्यंत मायेची ऊब देणारं आईपण खूपच वेगळं असतं. तिच्या त्या सांभाळ करण्याच्या कृतीला तोडच नसते.

साध्या टिव्हीच्या आवाजाने झोपमोड होणारी तिची वृत्ती आपल्या पोटच्या गोळयासाठी मनापासून दूर सारते. त्या खोडया तुझ्या-माझ्या त्याचं कोण कौतूक रे तिला...... खूप खोडया केल्या म्हणून वरकरणी रागावणारी ती आतून मात्र आनंदून गेलेली असते.

तिने भले चार ठिगळाच्या लुगडयात आयुष्य काढले असेल मात्र आपल्या लेकरांना अंगभर कपडा महत्वाचा आहे तो आधी आणला पाहिजे..दोन घास कमी जेऊ आपण पण लेकरू उपाशी झोपलं नाही पाहिजे असा विचार जपणारी ती आई असते.

तुझी असो अथवा माझी आई
ती असते सा-यांची अंगाई.....

खरच ते एक अजब रसायन आहे..... आई समजायला आई व्हावं लागतं असं म्हणतात ते खरच आहे ना..... आई माझी असं म्हणत,  लेकरं समोर हट्ट करायला लागली तरी त्या लेकुरवाळीलादेखील आई हे माहेर असतं..आई हाच आधार असतो....आई..... व्यक्त करायला शब्द नाहीत. ज्यानं त्यानं आपल्या मनानं आई शब्दात व्यक्त करण्याचा प्रयत्न केला पण आई शब्दांच्या पलिकडला भावनिक प्रवास असतो.

आई शब्द लिहिता येईल पण
आई शब्दात सांगता येत नाही

चित्र तिचं रेखाटता येईल
पण ती चित्रापेक्षाही मोठी आहे.

असेपर्यंत जाणवलेली ती आई
ख-या अर्थानं कळते तिच्या जाण्यानं...

म्हणूनच
मोबाईलचा तो स्क्रीन ओला होई पर्यंत कळलंच नाही की आपण काय मेसेज वाचतोय....ती गेल्यावरच ती कळली.कारण ..... ती आई होती.

-प्रशांत अनंतराव दैठणकर
9823199466

Wednesday, 16 March 2016

फेअरचं अफेअर....

यशोमती मैंयासे बोले नंदलाला

राधा क्यों गोरी...मै क्यों काला....

गाण्यात ऐकायला चांगलं वाटतं ना. पण हाच सवाल विचारुन कोटयवधींचा व्यवसाय उभा राहिला आणि अनेक कंपन्यांनी गोरेपणाचा वादा करून 'फेअर' जाहिराती करून लाखो भारतीयांचे खिसे रिकामे होत आहेत.

लग्न झाल्यावर बायको नव-याचा खिसा रिकामा करते असं म्हणतात काळी बायको असेल तर ती गोरं होण्यासाठी क्रीम खरेदी करून खिसा रिकामा करते तर गोरी बायको रंग काळा पडू नये म्हणून सनक्रीमवर खर्च करण्यासाठी नव-याचा खिसा रिकामा करते.

आपल्या शरिराला कोणता रंग असावा हे आपल्या हाती नसतं तो जन्मासोबत आपल्याला प्राप्त होतो या रंगावरून वर्णन करणं आणि त्याची वर्गवारी करणं यातून चांगलेच विनोद घडतात.

खूप गोरी असेल तर

सपीठाचा (मैदा) उंडा (गोळा) असं मराठवाडी मराठीत म्हटलं जातं.

दूसरं वाक्य अर्थात.... पांढरीपाल आहे ती ...असं असतं. इथं वर्गवारीकडे वळता येईल.

गोरा - निमगोरा - गहूवर्ण - सावळा - काळसर अशा शेवटचा एक रंग काळेपणापर्यंत पोहोचतात पण ते इथं थांबत नाहीत तर शेवटचा एक रंग असतो.'कलर गया तो पैसा वापिस'...

काळा रंगाच्या व्यक्तीचं आडनाव गोरे असणं आणि मुलीचं नाव जुई किंवा चमेली, चांदनी आणि अगदी शुभ्रा देखील असू शकतं.

रंगांच्या गमती-जमती मोबाईलच्या युगात असाच नवा विनोद हा मोबाईल माझ्यापर्यंत घेऊन आला. आमचा एक मित्र काळा
म्हणजे शेवटच्या पटटीत 'कलर गया तो....' कॅटेगरीतला त्याचा फोन लावला आणि मला धक्का बसला कारण टयून कानावर आली ती होती.

.....माझा रंग तुला घे तुझा रंग मला दे....
शॉक.....शॉक...शॉक...


मराठीवर त्याचं असणारं प्रेम कबूल मराठी गाण्याची आवड कबूल पण हे काही तरी खतरनाकच म्हणावं लागेल ...आपण कोणती टयून ठेवावी याचं गांभीर्य का असत नाही लोकांना. हा काळेपणा जसा गंमतीचा तस तो मार्केटींगचाही विषय आहे. हमखास गोरे व्हा असे म्हणून जाहिरात करणा-या कंपन्यांचे उखळ 'पांढरे' झाले मात्र कुणालाही गोरेपणा आला नाही. आधीच गो-या असणा-या मॉडेलचा रंग काळा करून तिचा रंग १५ दिवसात बदलल्याचा दावा करणा-या कंपन्या लाखो व्यक्तींना करोडोचा 'चुना' नियमित लावत आहेत हे वास्तव आहे.

मधूर भांडारकरने आपल्या 'ट्रॅफिक सिग्नल' या चित्रपटात ही बात नेमकेपणाने मांडली आहे. त्सुनामीत कुटुंबापासून दुरावलेला १२-१३ वर्षाचा मुलगा या ट्रॉफिक सिग्नल जवळ असतो. रोजच्या कमाईतून त्याचा एकच उद्योग चेन्नईला सरकारी कार्यालयात फोन लावून आई-वडिलांचा पत्ता लागला का हे विचारणे आणि आपला काळा रंग जावा आणि आपण गोरे व्हावे यासाठी क्रीम खरेदी करणे.... अखेर एका प्रसंगात तो त्या क्रिमच्या जाहिरातीच्या पोस्टरवर आपला राग काढतो.

Opposite attracts हा निसर्ग नियम आहे.
हा या रंगांच्या बाबतीत लागू पडतो. काळयांना जसं गोरं व्हायला आवडतं तसं गो-यांना तो गोरेपणा उन्हात 'टॅन' ( मराठीत ज्याला करपणे असा शब्द आहे ) करावा असं वाटतं गोवा हे सर्व विदेशी पर्यटकांचं आवडतं टॅनिंग सेंटर' हे इथं सांगावंच लागेल. इंग्रजांनी आपल्यावरा साधारण 'ये गोरे लोग' असेच म्हणत होतो.

गोरे आणि काळे याबाबत आपल्याकडे अनेक पध्दतीने सांगितले जाते. युरोपातून भारतात आलेले आर्यन्स (आर्य) हे गोरे होते आणि भारतातले मुळ निवासी दक्षिण भारतात असणारे द्रविड होते. त्यांचा रंग काळा होता. असा दाखला काहीजण देताना आपल्याला दिसतील.

पृथ्वीवर विषववृत्तापासून किती अंतरावर आपण राहता त्यावर तेथील तापमान ठरते आणि हे तापमान मुलत: आपल्या रंगासाठी अवलंबून असते. असा एक तर्क दिला जातो. पण त्यातही फारसा अर्थ नाही कारण मानव हे आफ्रिकेतून उत्क्रांत झाले असे मानले जाते. असे असेल तर सर्वांचा रंग ठरविणारे 'जींन्स' सारखेच असते आणि सर्वांचा रंग सारखाच असता.

काळेपणा काही जणांच्या बाबतीत अतिशय गंभीर समस्या बनते त्यामुळे समाजात आपल्याला टिकेला सामोरे जावे लागेल या भितीमुळे अनेकांमध्ये न्यूनगंड तयार होतो.

वर्ण आणि वर्णभेद याचा लढा अगदी २१ व्या शतकातही थोडयाफार प्रमाणात शिल्लक आहेच. न्युयॉर्क सारख्या शहरात देखील श्वेतवर्णी आणि कुष्णवर्णी असे ध्रुवीकरण निवासाच्या बाबतीत आपणास दिसून येईल.

ते काळं पण त्याला गोरी पोरगी पाहिजे अशी कमेंट आपण आजूबाजूला ऐकतो. खरच आहे प्रत्येकाला गोरीच का हवी असा सवाल विचारायला पाहिजे.

गोरी गोरी पान, फुलासारखी छान..

दादा मला एक वहिनी आण.. (आता एकच का )

आपणच या पध्दतीच्या गाण्यातून आपणच असे संस्कार केले म्हणून तर असं होत नाही.

धून मै निकला ना करो रूप की रानी
गोरा रंग काला ना पड जाये

हे बिग बी च्या सिनेमातलं गाणं असो की,

गोरे गोरे मुखडेपे काला काला चष्मा

हे गाणं. आपण आपल्या माध्यमांमधून गो-या रंगाचा प्रचार करतो. हे चुकीचे आहे असुही आपणास कबूल करावे लागेल.

काळयांनाही सारख्याच भावना आहेत ना. मी कॉलेजमध्ये असताना कॉलेज घराजवळ असल्याने आम्ही मित्र पायीच जात असू त्या रस्त्यावर एक डिपार्टमेंटल स्टोअर होते. साधारण आमच्याच वयाची मुलगी होती. खूप जास्त काळा रंग असल्याने ती हसली तरच रस्त्यावरून तिचे दात आणि फक्त दात दिसत अशी ती मुलगी त्या दुकानासमोरुन जाताना मी तिला दरवेळी झकास आणि दिलखुलास स्माईल द्यायचो. त्यावेळी सोबतचे मित्र 'पश्या काहीही चॉईस बरं तुझी' अशी कमेंट करायचे त्यावेळी माझं उत्तर असायचं की, तिलाही भावना आहेत कुणीतरी आपल्याकडे प्रेमानं बघतयं याचं समाधान काही क्षण का होईना तिला मिळत असेल ना...

माझा विचार वेगळा पण त्या गोरेपणाचं मनामनामधील हे वेड मन सुरू ठेवतं...बाय द वे नितळ कांतीचं गोरं पान प्रेम मला मिळालं माझ्यावर मनापासून असणारं तिचं ते प्रेम तिच्या समोर मी सावळा नाही तर काळाच म्हणावं लागेल. असलं नशिब असं पण प्रेमात पडलो अन् थेट प्रेमाचा रंग पाहिला. ती भाषा नजरेची होती त्यावेळी तिचा रंग दिसलाच नाही आणि नंतर इतरांनी सांगितल्यावर कळालं अरे हो तिचा रंग गोरा आहे.

मी सावळा आहे ही वास्तविकता आहे मात्र आजवर माझा रंग गोरा व्हावा यासाठी कधी एखादी क्रिम आणावी असं मला कधीच वाटलं नाही कारण मला इतकं कळतं की माझ्या सारखं या जगात दुसरं कुणी नाही.. काळा रंग आणि त्याचं हे पुराण काळासोबत असच सुरू राहणार हो आपण काय विचार करता यावर आपलं नियंत्रण असतं इतरांचं नाही...
पुन्हा गाणं आठवतं ते काका अर्थात राजेश खन्ना आणि मुमताज यांचं...

गोरे रंगपे ना इतना गुमान कर
गोरा रंग दो दिन में ढल जायेगा...

प्रशांत अनंतराव दैठणकर
९८२३१९९४६६




Monday, 14 March 2016

ये पल भी जाएगा

जागुनी ज्याची वाट पाहिली ते सूख आले.... गाण्याची धून अचानक कानात रुंजी घालू लागली. कामाच्या व्यस्ततेत गडचिरोली जवळील पुलखल या गावात एका शेतात असताना फोन आला मोबाईलवर कन्या जान्हवी आनंदाने सांगत होती. बाबा परिक्षा संपली....हो बारावीची परिक्षा संपली..

वयाच्या तिच्या या टप्प्यावर बारावी हा आयुष्याच्या प्रवासातील एक मैलाचा दगड म्हणता येईल. तिने बारावी एन्जॉय केलं. हो ख-या अर्थाने एन्जॉय केलं.. आजू-बाजूला मुलं-मुली बारावीच्या ताणाखाली दबून गेलेले दिसत होते. मुलगी किंवा मुलगा बारावीच्या वर्गात गेल्यावर अख्खं घर बारावीत प्रवेश करतं असा माझा अनुभव आहे. थोड्याफार फरकाने आपणासही हा अनुभव आलाच असेल की..

या मुलांना अभियांत्रिकी आणि मेडिकलचं गाजर लावून गाढवाला  गाडीला जुंपाव तसं जुंपलं जातं. आपल्या स्वप्नांची पूर्तता मुलांनी करावी ही
अपेक्षा समजणं शक्य आहें. मात्र मूल हे आपल्या आकांशापूर्तीचं साधन (Extenuation) मानणं कितपत योग्य आहे.. मात्र इथं सारं चित्र वेगळं असल्याचं आपणास दिसतं.

महाविद्यालयीन जीवनाचा निखळ आनंद घेता यायला हवा कारण हे दिवस पुन्हा येत नाहीत. आयुष्यात मग अशावेळी करिअरची टांगती तलवार डोक्यावर घेऊन ही मुलं क्लासेस आणि कॉलेजच्या धावपळीत गुंतून पडतात आणि तणावात राहतात. इथं भौतिकशास्त्राचा साधा नियम आपण विसरतो की, इतराला ताण देण्याची एक विशिष्ट मर्यादा असते त्यापेक्षा अधिक ताणलं तर ते तुटतं आणि असा ताण असह्य झालेल्यांनी भौतिकशास्त्राचा पेपर अवघड गेला म्हणून आत्महत्या केल्याची बातमी वाचायला मिळते.

पनवेलमधील मैत्रीण माधूरी हेगडे हिच्याशी बोलताना तिने जो किस्सा सांगितला तो तर खूपच धक्कादायक होता. पेपर अवघड गेला असं घरी कळल्यावर पालकांनी त्या मुलाला तासला. सकाळी ते पोर घरातून निघून गेलं. पोलिस तपासात त्याच्या एटीएम वरील व्यवहार तपासला त्यावेळी तो सूरत मध्ये असल्याचं कळलं.

सूरत सारख्या मोठया शहरात शोधायचं कसं आणि कुठे कुठे याची चिंता. पुन्हा एक संधी म्हणून त्यांनी त्याच्य खात्यात पैसे जमा केले. तर पुढील व्यवहार सिमला येथे झाला मग अजूनच चिंता अखेर त्या मुलानेच फोन करून सांगितलं की सुखरूप आहे आणि सिमला येथे मला घ्यायला या.

एकूणच काय तर बारावी किंवा दहाचीचा हा काळ मुला-मुलींसाठी अभ्यासासाठी आव्हानात्मक असते असे नाही. तर या काळात शारिरीक बदल मोठया प्रमाणावर होत असतात. इतके सारे बदल एका वेळी ॲडजस्ट करणं खूप अवघड असतं.

मुलांवर जरूर संस्कार करा पण सक्ती करू नका. त्या व्यक्तीमत्वाचा तो घडण्याचा आणि खुलण्याचा तो महत्वाचा काळ असतो. आईच्या उदरातून जन्म झाल्यावर, वयात येणं हा दुसरा जन्मच असतो.

जान्हवी या वर्षाच्या कालावधीत कॉलेज स्तरावर ज्युदो खेळली अगदी राज्य स्तरापर्यंत तिनं वाटचाल केली. सोबत जर्मन भाषेची तिसरी याच वर्षात केली आणि आता चौथी लेव्हल ती महिनाभरात पार करेल. त्यातही परिक्षा संपल्याचा उत्साह आनंद ऐकल्यावर मला दहावीचे माझे परिक्षांचे दिवस आठवले. संपेपर्यंत त्याची उत्सुकता शेवटचा पेपर झाल्यावर थेट जितेंद्र- श्रीदेवीचा हिंमतवाला बघायला आम्ही सादिया टॉकिजला गेल्याचे आजही आठवते.

सध्या एक सुंदर जाहिरात टिव्ही व इतर माध्यमात फिरतेय ती जाहिरात बघितल्यावर जान्हवी मला म्हणाली बाबा तुम्ही तर आम्हाला अगदी लहानपणापासून हेच शिकवत आलात..बारावीला ५८ टक्के असले तरी मी शासनात वर्ग एक पद मिळवलेच ना...
अगदी आज ते त्या जाहिरातीत पडद्यावर ती म्हणते ना की मुझे बारवी में 59 परसेंट थे और आज मै इस कॉलेजकी प्रिंसिपल हूं.. तसं

काही घटना, किस्से आपल्याला प्रतिबिंबित करतात तसा हा किस्सा... सुख आणि दु:ख ही मनाची तर वेदना ही शरीराची भावना असते..कितीही कठिण क्षण असला तरी 'ये पल भी जाएगा' हेच खरं... हर पल यहां जी भर जियो....

-प्रशांत अनंतराव दैठणकर



९८२३१९९४६६

Thursday, 10 March 2016

पर हम वफा कर ना सके...

स्वयंवरात अर्जुनाला द्रौपदी प्राप्त झाली त्यावेळी पांडवांचा वनवास सुरु होता. ते द्रौपदीला घेऊन आपल्या कुटीत पोहचले त्यावेळी त्यांची माता कुंतीने काय आणलय हे न बघताच जे आणलय ते पाच भावात वाटून घ्या. असं सांगितलं त्या क्षणी द्रौपदी पाच जणांची पत्नी अर्थात पांचाली झाली.

स्त्री-पुरूष संबंधांमधील हे आगळं प्रकरण आहे. महाभारतामधलं. मानव वंश इतिहासात भिन्न रुढी परंपरा पालन करणारे आपणास दिसतील. भारतात हिंदू संस्कृतीत रामायण आणि महाभारत या महाकाव्यांना धार्मिक आस्थेची बाब म्हणून बघितले जाते. रामायणात प्रभू रामचंद्र हे एकवचनी आणि एकपत्नी असणारे होते. राम हा विष्णुचा अवतार मानला जातो.

रामायणानंतरचा काळ अर्थात श्रीकृष्णाचा काळ इथं श्रीकृष्णाची प्रतिमा वेगळीच रंगविली जाते. त्याची पत्नी रूक्मिणी होती. रूक्मिणीलाही स्वयंवरातून आणले. मात्र श्रीकृष्णाचे चरित्र वेगळया पध्दतीने सांगितले जाते. १६ सहस्त्र नारींचा पती अशीही उपमा दिली जाते. आणि कृष्णाचे नाव सिता आणि राम असे न घेता राधा आणि कृष्ण असे घेतले जाते. राधा-कृष्ण हे आजही प्रेमाचं प्रतीक मानलं जातं. त्या नात्यात सात्विकता आणि पावित्र्य आहे.

लहानपणी आजीकडून ऐकलेल्या गोष्टीत एक राजा असायचा आटपाट नगरचा आणि त्या राजाला हमखास दोन राण्या असायच्या. त्यापैकी एक नावडती आणि एक आवडती असायची. मला प्रश्न पडतो आवडती होती मग त्याने नावडतीशी लग्न का बरे केले असेल.

मानव वंशाच्या इतिहासात एकपत्नी राहणं
ही बाब हिंदू धर्मात मान्य करण्यात आली असल्याने सर्वाधिक टिकून राहणारे विवाह भारतात आढळतात. ख्रिश्चन धर्मामध्ये एकपत्नी मान्यता आहे पण तिथं त्यांनी एका वेळी एक पत्नी, असा प्रकार मान्य केला आहे.

विवाह म्हणजे
गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली. या न्यायाने टिकेल तोवर संसार करून घटस्फोट घेण्याची वृत्ती अधिक आहे. त्यामुळे अनेक विवाहाची प्रथा तेथे आपणास दिसते. एलिझाबेथ टेलरचे ८ विवाह झाले ही सहज मान्य बाब म्हणून आपण वर्तमानपत्रात वाचतो. त्याचवेळी हिंदी चित्रपटसृष्टीची उमराव जान रेखाने चार विवाह केले ही इकडे मोठी बातमी असते.

ख्रिश्चन धर्मात एका पत्नीसोबत रहाणारे (अर्थात मोनोगॅमी) आहेत तसेच एका वेळी तीन किंवा चार विवाह करणारे बहुपत्नी पद्धतीचे ( अर्थात पॉलिगॅमी) आचरण करणारेही आहेत. मार्च याला चर्चची आणि समाजाची मान्यता नाही. अशी जी काही मोजकी माणसे आहेत त्यांना शहराबाहेर किंवा गावाबाहेरच रहावे लागते हे चित्र आज २१ व्या शतकातही आपणास दिसेल. इस्लाम मात्र असा एक धर्म आहे ज्या धर्मात चार विवाहांची पुरूषाला मुभा देण्यात आली आहे आणि त्याचा मोठया प्रमाणावर आज २१ व्या शतकातही प्रचार व प्रसार होताना दिसत आहे.

आपल्या देशात समान नागरी कायदा असण्याची मागणी असली तरी तो कायदा प्रत्यक्षात आलेला नाही. याला कारणही मुस्लीम पर्सनल लॉ हेच आहे. मात्र त्या दिशेने पावलं टाकली जात आहेत. न्यायपालिका विविध माध्यमातून या प्रकारचे आदेश देत आहे. तोंडी तलाक तलाक तलाक असे तीन वेळा उच्चारण करून पत्नीला घटस्फोट देण्याच्या मुस्लीम पर्सनल लॉ मधील तरतुदीला नाकारून कायदेशीर घटस्फोट व्हावा असा आग्रह धरला जात आहे.

हे सारं आठवण्याचं कारण म्हणजे केरळ उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी. कमाल पाशा यांनी नुकतच थिरूवअनंतपुरम येथील एका परिसंवादात केलेले वक्तव्य. गेल्या काही वर्षात इस्लाम मानणा-या अनेक देशांनी एकपत्नी कायदा
आणला मात्र भारतात आजही चार पत्नी ठेवण्याची मुभा देणारा मुस्लीम पर्सनल लॉ अस्तित्वात आहे. यामुळे पुरुषी वर्चस्व निर्माण होत आहे आणि महिलांना हक्कांपासून वंचित रहावे लागत आहे. अशा स्थितीत महिलांनी चार पती का ठेवू नयेत असा सवाल न्यायमूर्ती पाशा यांनी केला.

विषय वेगळया वळणावर नेणारे हे वक्तव्य आहे मात्र मानववंशाच्या उत्क्रांतीपासून आजवरच्या वाटचालीकडे बघावे असे हे वक्तव्य आहे. पूर्वी टोळयांचे अस्तित्व होते त्यावेळी पशू आणि मानव यात लैंगिकतेबाबतीत कोणताही फरक नव्हता. सिंहाने कळप बनवावा व आपलं क्षेत्र निश्चित करावं मग त्या क्षेत्रातील प्रत्येक मादी त्याची असा निसर्ग नियम मानवही टोळीचा प्रमुख आणि इतर स्त्रिया या पध्दतीने वापरत होते.

उत्क्रांतीत माणूस इतर प्राण्यांपेक्षा वेगळा ठरला याचं सार समाजरचनेत आहे. आजही आदिवासींच्या अनेक प्रजातींमध्ये मुलींना वयात आल्यानंतर अनेक मुलांसोबत शरीरसंबंध ठेवण्याची मुभा आहे त्यानंतर त्या अंतिमत: कुणाशी विवाह करायचा याचा निर्णय घेतात. इथं गडचिरोलीतही मुलांच्या जन्मानंतर विवाह करणारे अनेक आहेत. ही मातृसत्ताक पध्दतीची रचना.

आता जी रचना आहे ती पुरूष प्रधान आणि पुरूषी वृत्तीचा पुरस्कार करणारी आहे पण धार्मिक स्तरावर जिथं देवाची पूजा करताना त्याच्या दोन पत्नींचीही प्रतिमा आपल्याकडे पूजली जाते. अशा स्थितीत घराबाहेर विवाहापलीकडे संबंध पुरूष ठेवतात (हा गुन्हा आहे हे माहिती असून देखील) हे वास्तव देखील आहे मग अशा स्थितीत त्याची ही 'हम बेवफा ना थे...पर हम वफा कर ना सके' स्वीकारणा-या तिलाही थोडीसी बेवफाई करण्याचा अधिकार का नको.. विचार करा.. सोचो.. सोचो

-प्रशांत अनंतराव दैठणकर

९८२३१९९४६६

Wednesday, 9 March 2016

देवदास.....

कभी कभी मेरे दिल मे... खयाल आता है..
के जैसे तुझको बनाया गया है मेरे लिये...

महानायक अमिताभ बच्चनच्या घनगंभीर आवाजातलं भावनात्मक निवेदन अनेकांच्या काळजाला भिडतं मग तिथून स्वप्न आणि सत्य यातील प्रवास सुरू होतो

कधी कॉलेजमध्ये कटटयावर गप्पा मारताना अचानक दिसलेली 'ती' तिचे ते वेध घेणारे डोळे आणि अल्लडपणे त्यावर येणा-या केसांच्या बटा .. गालावरचा तो गुलाबीपणा आणि किंचित थरथरलेले ओठ... चालीच्या हिंदोळ्यावर नृत्य करणा-या यौवनखुणा .... काळीज खल्लास. कोणत्या वर्गात आहे. नाव काय आहे,.. कुठे रहाते असा तपास.... तिच्या नकळत जडलेलं ते प्रेम... जपलं मनात. आणि दुस-याच वर्षी तिच्याशी संवाद साधण्यापूर्वी तिच्या लग्नाच्या बातमीसह तिची ती आयुष्यातून झालेली एक्झिट...

विवाह वेदीवर सप्तपदी चालताना नव्या नवरीचा लाजरेपणा आणि तिचं ते बावरणं ..नव्या विश्वात सारं जुनं वाहून गेलं विसरून गेलं. लग्नानंतरचा मधुचंद्राचा गोडवा आणि नंतर अवतरलेलें बोबडया बोलांनी घर भरून टाकणारं बालपण यातून मग करिअरची धावपळ आणि धावत धावत क्षणाची उसंत म्हणून थांबल्यावर आरशातलं आपलं रुप बघताना दिसलेलं पांढरे केस.. ( काही जणांचे तर रागावून सभात्याग करून गेलेले..) ... मग पुन्हा कॉलेजचे दिवस आठवायला आणि खुणवायला लागतात.

त्याच कट्टयावर मन पुन्हा जाऊन बसतं आणि 'ती' पुन्हा नजरेसमोर तरळून जाते. ती दिसताच अगदी चित्रपटासारखं आजूबाजूला संगीत ऐकू यायला लागतं..
.जरा, हो जरा हिंमत केली असती तर ती आज आपल्यासोबत असती. अशी भावना मनात डोकावून जावे आणि मग मन एकाच वेळी दोन दिशांच्या प्रवासाला निघतं...

जर-तर... च्या या जगण्याला आणि विचारांना कधीच अंत नसतो. हे सारं घरात दिसलेल्या सापासारखं असतं. साप दिसला की त्याला मारून टाकणारे आपणाकडे आहेत. मात्र याबाबत जनजागृती मोठया प्रमाणात झाल्याने साप पकडून जंगलात सोडायला आता सुरूवात झाली, पण साप दिसला आणि पकडला गेला नाही तर तो साप मनात भिती होवून फिरत राहतो. साप एका जागी थांबत नाहीत हे सत्य असलं तरी मनातला साप आणि सापाची भिती मात्र कधीच जात नाही त्याप्रमाणेच संशय आणि मिस झालेल्या प्रेमाचंही होतं....

घरात सारं काही सुरळीत असताना अचानक गाफिल क्षण आलेली तिची आठवण वयाच्या चाळीशीत पुन्हा आपल्याला देवदास बनवते.... शहराच्या एखाद्या बार मध्ये बसून दोन पेग रिचवून संगीताच्या सुरावटीवर तिचं ते रुप आठवायला हा देवदास बाहेर पडतो...हे एका रात्री घडतं आणि मग रात्रीचीही संख्या वाढते आणि भरलेल्या प्याल्यांचीही..

पारुच ती,....
देवदास अखेरीस तिच्या दारात प्राण त्यागण्यासाठी गेला पण तिला गुतंलेल्या आपल्या त्या नव्या आयुष्यातून बाहेर येता आलं नाही... सारं कळतं पण वळत नाही..सलमा आगाच्या 'दिलके अरमा आंसुओंमे बह गये' ने मैफल सूरु होते...मन पुन्हा धावतं त्या कटटयावर पुन्हा मित्र येतात बसतात. ... गप्पाष्टकं सुरू होतात...मग तिची एन्ट्री..आसमंतात संगीत....मन उल्हासित होतं, नजरेत आगळी चमक दिसायला लागते.... हळूच तिच्या दिशेने बाहू पसरून तिच्याकडे जाताना दिसतं की 'ती' हो ती देखील आपल्या बाहुपाशात येण्यासाठी आसूसली आहे...

आणि मोबाईलची रिंग वाजते..घरचा फोन.. कधी येणार,किती उशीर होणार अशी काळजी करणारा....स्वप्नातून सत्यात एक क्षणात पोहचल्यावर वास्तवाचं भान येतं.

आवरून निघताना यो यो हनी चा कंठशोष कानावर पडतो..

चार बोतल व्होडका.....काम मेरा रोजका
चार बोतल व्होडका.....काम मेरा रोजका

-प्रशांत अनंतराव दैठणकर.

9823199466

Monday, 7 March 2016

कॅमेरा..क्रांती.. करप्शन अन् कॅरेक्टर करेक्शन..!

Add caption
आजपासून २०० वर्षांपूर्वी सन १८१६ साली या कॅमेरा क्रांतीची सुरुवात झाली. निसफोर निसे नामक एकाने सिल्व्हर आयोडाईडचा थर दिलेल्या तांब्याच्या एका तुकड्याला आयोडिनची वाफ देऊन जगातली पहिली प्रतिमा कैद केली. ही प्रतिमा छायाप्रतिमा होती. प्रकाशाशी अत्यंत संवेदनशील अशा या रसायनाचा तो चमत्कार होता. २ वर्षे अभ्यास करुन त्याने प्रकाश नियंत्रित करण्यासाठी एका लाकडी खोक्याचा वापर केला हा जगातला पहिला कॅमेरा होता.

त्या आधीच्या काळातही वेगवेगळ्या साधनांचा वापर करुन प्रतिमा एका ठिकाणावरून दुस-या ठिकाणी बघण्याची पद्धत सुरू झालेली होती मात्र प्रतिमा जतन करण्यासाठी कैद करण्याचा हा पहिलाच यशस्वी प्रयोग होता. याची झलक आपण नुकतीच बाजीराव मस्तानी चित्रपटात बघितलेली आहे.

कॅमेरा तयार करताना आपण खूप मोठा इतिहास घडवत आहोत याची त्याला कल्पना असणार यात वादच नाही मात्र २०० वर्षांच्या कालखंडानंतर सारं जग दिवसभर याचा वापर करेल आणि खूप मोठी क्रांती घडणार याची त्याला कल्पना नसावी.. आज मात्र ती क्रांती घडलेली आहे. आणि जगात सर्वात मोठा उद्योग होण्याच्या मार्गावर आहे हे येथे नमूद करावे लागेल.

सांग दर्पणा मी कशी दिसते.. हा प्रत्येक तरूणीचाच सवाल असतो असे नाही तर प्रत्येकाचं व्यक्तीगत विश्व असतं आणि जगापेक्षा प्रत्येकाला त्या विश्वात डोकावायला आणि रममाण व्हायला अधिक आवडत असतं. आजचं युग हे सोशल नेटवर्कींगचं युग आहे. यात सर्वाधिक धारक संख्या Instagram आहे यावरून काय ते आपणास लक्षात येऊ शकेल कारण ते फक्त फोटो शेअरिंगचं माध्यम आहे. फोटो अर्थात छायाचित्र हा सा-यांचाच विकपॅाईंट आहे ना.

आता ही कॅमेरा क्रांती नेमकी काय आहे याची आपण माहिती घेतलीच पाहिजे. या कॅमे-याने करप्शन अर्थात भ्रष्टाचाराला लगाम बसायला सुरूवात झाली आहे.
. कॅरेक्टर करेक्शनसाठी ( चारित्र्य सुधारणा ) याचा हातभार लागत आहे. आपण म्हणाल हे कसं काय.. कोणत्याही मॅालमध्ये किंवा दुकानात आपण जातो त्यावेळी आपणास फलक दिसतो आपण कॅमे-याच्या निगराणीत आहात.. तिथच आपल्या चारित्र्याच्या सुधारणेला आरंभ होतो. कुणी चोरीच्या इराद्याने आत आलेले असेल तर कॅमे-याच्या भितीने चोरी करीत नाही.

हिंदी चित्रपटात एक डायलॉग आपण ऐकतो नेहमी.. "कोई देखे ना देखे उपरवाला देख रहा है.". कुणीतरी पहात आहे म्हटल्यावर आपणही नकळत चेहरा आणि केसावरून हात फिरवतोच ना.
या कॅमे-याने जशी चित्रपट उद्योगाची निर्मिती केली तशीच माध्यमांची ताकद वाढवली. ऐकणे .. वाचणे आणि बघणे या तीन वेगळ्या प्रक्रिया आहेत. यासाठी आपण आपली तीन वेगळी ज्ञानेद्रिये वापरतो. यात आपला विश्वास कशावर आणि किती ठेवायचा यावर अनेकदा आपल्या मेंदूला कसरत करावी लागते.
ऐकलेले सारे खरेच कशावरून..?
वाचलं ते विश्वास ठेवण्यासारखं असतंच असं नाही..!
दिसतं तसं नसतं..!
मेदू किती किचकट काम करीत असेल याची कल्पना आपणास यावरून येईल. आपल्या निर्णयप्रक्रियेत या तीनही प्रक्रियांचा वापर करून विश्लेषण होत असते आणि अखेरीस आपल्या बुद्ध्यांकानुरूप आपण निर्णय घेतो. यात सर्वाधिक महत्व आपण आँखो देखी अर्थात नजरेने बघितलेल्या बाबीला झुकते माप देतो. आपण सर्व ठिकाणी एकाचवेळी जाऊ शकत नाही अशा स्थितीत कॅमेरा आणि त्याच्या मदतीने काढलेले छायाचित्र आपल्या मदतीला येत असते. ही उपलब्धी गेल्या २५ वर्षात झपाट्याने झालेले तंत्रज्ञानातील विकासामुळे प्रत्येकाच्या हातात आली आहे ती स्मार्ट फोनच्या रूपात.

छायाचित्र काढणे आणि क्षणार्धात ते जगभर पाठविणे आता शक्य आहे. दृष्टीआड सृष्टी या पद्धतीने देशात राजसत्ता सांभाळणा-या कॉंग्रेसच्या नेत्यांना या क्रांतीची जाणीवच झाली नाही आणि सारं काही नजरेसमोर आता दिसायला लागलेल्या नवी नजर आलेल्या पिढीने देशाची सत्ता नरेंद्र मोदींना सोपवली.. ही कॅमे-याने घडवलेली क्रांती इथे थांबलेली नाही तर ती प्रशासनात गतिमानता आणि पारदर्शकता आणण्यापर्यंत गेली आहे.

      मक्याने आपल्या चित्रपटात न बांधलेल्या विहिरीचे अस्तित्व सिद्ध केले असले तरी आता उपग्रहाच्या माध्यमातून खरेच काम झाले की नाही याचा पुरावा प्राप्त होत आहे. आपली कामे करून घेण्यासाठी लाच मागणारे आणि देणारेही आहेत यांनाही या कॅमे-यात कैद करून आता ख-या कैदैत पाठवणे सोपे झाले आहे त्याचमुळे करप्शनला अटकाव आता
होवू लागला आहे.

दादागिरी करणा-यांना त्यांच्या कृत्याची आता हिंमत होईनाशी झाली आहे कारण कोणीतरी आपल्या मोबाईलमध्ये छायाचित्र घेईल किंवा शूट करेल याची भिती बसली आहे. अशी कृत्ये कॅमे-यात कैद झाल्याने गुन्हे दाखल होत आहेत. गुन्हेगारांना पकडण्यासही कॅमे-याची सर्वाधिक मदत आज होत आहे.

याच कॅमे-याने २४ तास मनोरंजनाचा रतीब घालणा-या वाहिन्यांच्या उद्योगाला जन्म दिला लाखोंना काम दिलय आणि करोडोंना मनोरंजन. साता समुद्रापार असलेल्या मित्राशी, मुलांशी आणि नातेवाईकांशी आता समोरासमोर व्हिडिओ कॉलच्या आधारे बोलता येतं सा-या जगाला जवळ करण्याचं काम या कॅमे-याने केलं आहे..

कॅमे-याने आणलेली सेल्फीची क्रेझ आणि आपण ही बाब काही नवी राहीलेली नाही हे वेगळं सांगायला नको..

                                                                                                                                                    छायाचित्र
आणि त्याचं वेड ... त्यात मी इंटरनेवरून सर्वप्रथम वापरलेलं लोकमतच्या प्रवासातील पहिलं छायाचित्र प्रिन्सेस डायनाच्या अंत्ययात्रेचं होतं.. याची आज आठवण झाली. नेटवरील छायाचित्र छापण्याचा महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रयोग होता हे देखील सोबतच आठवतय
. प्रिन्स चार्ल्सची पत्नी ही ओळख घेऊन जगासमोर आलेल्या या प्रिन्सेसने जागतिक पातळीवर आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. अतिशय बुद्धीमान असणा-या या सुंदरीचा मृत्यू तिचा पाठलाग करणा-या पापारात्झी            ( छायाचित्रकार ) मुळे झाला होता.. अर्थात या मृत्यूला जबाबदार कॅमेरा होता.

प्रशांत अनंतराव दैठणकर

९८२३१९९४६६



Tuesday, 19 January 2016

तू आणि पाऊस माझ्यासवे...!

पाऊस उगाच पडतो... निवांत शांत जानेवारीतली पहाटेची निरव वेळ आणि जरास दाटून आलं भावनांप्रमाणेच... याला काय पर्याय ही तर आपली भावनांची दिंडी. असं म्हणून गुड मॉर्निग करायला आरशाकडे वळलो. एकल अन् एकटेपणा अपरिहार्य असल्याने आताशा पहाटे स्वत:लाच बघायची सवयच झाली... दर्पणात माझ्या नजरेला नजर भिडली आणि त्यातून साद प्रतिसादाचा खेळ सुरु झाला.

एकाकी होण्यापेक्षा एकटं राहणं चांगल असं म्हणायचं सुरु झालेला आत्मसंवाद केव्हा पुन्हा त्या मंतरलेल्या दिवसांकडे घेऊन गेला तेच कळलं नाही. एखाद्या चित्रपटातला प्रसंग समोर दिसावा तसा तो यौवनपट स्पष्टपणे नजरेसमोर फिरायला लागला. काळाच्या ओघात आज या वळणावरुन मागे वळून बघतांना मग प्रश्नांची वर्तूळं पायाशी गुंता करताहेत असं जाणवतं.

आज शब्द संपावर गेलेत की विस्मरणात असा सवाल पडतो त्याकाळी चहाच्या एका कपासाठी पैसे गोळा करुन तुझ्या भेटीची वाट बघणं... रस्त्यात वावरणाऱ्या तुला नि मला एकत्र पाहून साऱ्यांच्याच नजरा वळत होत्या त्या नजरबंदीतून चालत त्या छान अशा हॉटेलचा तो कोपरा गाठणं. कागदी फुलांच्या अर्थात बोगनवेलीच्या तटबंदीत पायाखालची वाळू खेळवत त्या एका चहावर तास न् तास गप्पा मारणं... काय असायचे त्या संवादाचे विषय असा आज मनातला आणखी एक सवाल.

सारं जग बघत असलं तरी आपण कसं चोरुन भेटतोय याचं असणारं "थ्रिल" आजही रोमांच उभे राहतात मग आज काय झालं... संवाद कुठे विरला, हरवला की विसरला..... प्रेमात सर्व क्षम्य असतांना घडणारा संवाद आणि आज हा शब्दांचा दुष्काळ.

लग्न म्हणजे सप्तपदी पण असं काय वेगळं घडतं डोक्यावर अक्षता पडल्यावर की साऱ्या भूमिकाच बदलतात मग उगाच वाटतं तू माझी पत्नी व्हायला नको होतं... तू अशी अबोल होशील असं माहिती असतं तर लग्नाचा विचारच सोडला असता....लग्न हा विधी, आनंद सोहळा की लग्न म्हणजे बंधन अशी प्रश्नांची रेल्वे धावत राहते.

एक सच्चा मैत्र अस असणारं मैत्रीच नातं वेगळ्या नात्यांची गुंफण होताच कसं काय संपू शकतं. टिपिकल शब्द देखील चपखलपणे लागू पडावा असा बदल प्रत्येकीत का होतो ? मग विचार गती घेतात "जागून ज्याची वाट पाहिली ते सुख .." असं म्हणतांना कमावण्याचं स्वप्न आणि त्यासाठीची धडपड समोर येते, कमावलेलं राखायचं देखील असतं ते राखतांना साऱ्या मनोभुमिका एका रात्रीतून कशा काय बदलू शकतात.

त्या दोघांच ते जगणं पुन्हा डोळ्यावर तरळतं मग चार्ली आठवतो.. धंद होवून पावसात भिजणारे अनेक आहेत. ती धुंदी तो कैफ निराळा असतो..... इथं त्याला तर स्वत:चे अश्रु लपवण्यासाठी पावसात जावं असं वाटतं.

भावना अनावर झाल्यावर इथं अस तिथं काय असाही सवाल येतो. अनाहुतपणे त्याची आठवण तीव्र होत जाते. चार्लीचं सोडा हे तर तुझं आयुष्य आहे. दर्पणातून माझ्याशीच मी बोलत असतो... मन एव्हाना शांत झालेलं म्हणून खिडकीबाहेर दोन्ही हात पसरल्यावर जाणवतं त्याच दान खूप मोठ आहे.... कारण हातावर याही दिवसात आठवणीला प्रतिसाद देत पावसाचे थेंब नाचत असतात. पावसाच्या त्या थेंबानी मधला काळ धूवून टाकलाय जणू असं म्हणत मन पुन्हा बाईकवर रस्त्यावरुन पाऊस अंगावर झेलत वेगानं पुढे जातेय असं जाणवतं .. अण त्याचवेळी अरे हळू..... असं म्हणत तू भिजल्या अंगानं पाठीला बिलगलीय असं जाणवतं...!

प्रशांत अनंतराव दैठणकर
9823199466

Saturday, 16 January 2016

दो बूंद जिंदगी के...!


देशात असणारी जनजागृती वाढत गेल्याने भारतातून आपणास पोलिओ हद्दपार करण्यात यश आले आहे. या आपल्या भव्य अशा आसेतुहिमाचल पसरलेल्या देशाचा भौगोलिक विचार आणि मोठी लोकसंख्या असताना हे काम अतिशय अवघड आणि अशक्यप्राय काम करण्यात आले आहे. आपली आरोग्य यंत्रणा तसेच शिक्षण यंत्रणा यांचा यात मोलाचा वाटा आहे. तितकाच मोलाचा वाटा माध्यमांनी यात उचललेला आहे. हे आपणास जाणून घ्यावे लागेल.

आपल्या देशात जितके प्रांत तितक्या भाषा असं आहे. त्यातही प्रत्येक राज्यात 10 कोसावर भाषा आणि भाषेचा लहेजा बदलत असतो. संपूर्ण देशाची एक भाषा नसणे, यामुळे पोलिओ हद्दपार करण्याचे काम अतिशय मोठे आव्हान होते.

प्रसिद्धी मोहिम अनेक पद्धतीने राबविण्यात येतात. त्यामध्ये पोलिओसाठी राबविण्यात आलेले प्रसिद्धी अभियान हे सर्वांना मार्गदर्शक असे ठरले आहे. ब्रॅन्ड तयार केला जातो त्या पद्धतीने या मोहिमेसाठी प्रथमच ब्रॅन्डसेटींग झाले. कोणत्याही अभियानाला काही टॅगलाईन आवश्यक असते ती सर्वोत्तम आणि अगदी साध्या सोप्या भाषेत असणारी टॅगलाईन या मोहिमेला देण्यात आली ."दो बूंद जिंदगी के" अशी सर्वांना लक्षात राहील, अशी टॅगलाईन सर्वांच्याच लक्षात राहणारी होती.

ब्रॅन्डसेटींगमधील अन्य संकल्पना या मोहिमेत "पोलिओ रविवार" च्या रुपाने वापरण्यात आली. रविवार हा तसा सर्वांचा सुटीचा दिवस पण "पोलिओ रविवार" च्या माध्यमातून लोकांचे लक्ष वेधून लोकांना मुलांच्या आरोग्य आणि चांगल्या भविष्यासाठी घराबाहेर पडण्याची सवय यानिमित्ताने लावली गेली. आज व्हॉटसॲप आणि ट्वीटरच्या काळातल्या पिढीला संदेश वहन हे खूप सोपे प्रकरण वाटते. 10 सेकंदात हजारो लोकांपर्यंत संदेश पोहोचविण्याची क्षमता आज तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे प्रत्येकाच्या हातात आली. 1998 साली या पोलिओ मोहिमेला आरंभ झाला. त्यावेळी मोबाईलचे नव्याने आगमन झाले होते. फोन करुन बोलायला जसे पैसे लागतात तसे इनकमिंगसाठीही मिनिटाला 16 रुपये लागत. असा तो काळ त्यामुळे ही प्रसिद्धी मोहीम जुन्याच प्रसिद्धी तंत्राचा वापर करुन सुरु झाली होती.

या मोहिमेसाठी अमिताभ बच्चन, सचिन तेंडूलकर, ए.आर. रहेमान तसेच जॅकी श्रॉफ यांनी ब्रँन्ड अम्बॅसिडर म्हणून काम केलं. मात्र प्रसिद्धीचे सर्वाधिक वलय असणारा महानायक अमिताभ बच्चन हा शतकातील महानायक या पोलिओ प्रसिद्धी मोहिमेचा खरा चेहरा बनला. लोकांच्या मनात वेगवेगळ्या वयात गेल्या 45 वर्षात या महानायकाने अनेक पिढ्यांसमोर कामे केली आणि त्यांच्या आठवणीचा भाग बनला. त्यामुळे सर्वाधिक लोकप्रियतेचा फायदा या महानायकाने या प्रसिद्धी मोहिमेस करुन दिली.

17 जानेवारी 2016 पुन्हा एकदा पोलिओ रविवार आला आहे. आपल्यातील प्रत्येकाने घराघरातील 0 ते 5 वयोगटातील बालकांना पोलिओ डोस मिळेल याची खात्री करुन घेतली पाहिजे. पोलिओमुक्त भारताचे स्वप्न प्रत्यक्षात आले. आता जिंकलयं ते राखण्यासाठी अधिक काटेकोरपणे प्रयत्न करायचे आहेत. केवळ हाच उद्देश नसून येणाऱ्या भारतात एकही पोलिओचा रुग्ण राहणार नाही व आरोग्य संपन्न अशी नवी पिढी हे आपले ध्येय असले पाहिजे. देता ना मुलांना दो बूंद जिंदगी के...

-प्रशांत अनंतराव दैठणकर,

Friday, 11 December 2015

संघर्षयात्री

वक्तृत्व अणि संघटन यांच्या जोडीला मनमिळाऊपणा आणि रुबाबदार व्यक्तीमत्व असे सारे शब्द ही अल्पशी ओळख आहे एका संघर्षयात्रीची. संघर्ष आणि संघटनातून शालेय राजकारणापासून राज्याचे उपमुख्यमंत्रीपद आणि नंतर केंद्रीय मंत्रीपद असा आलेख असणारं मराठवाड्यातील व्यक्तीमत्व अर्थात दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे.

गोपीनाथराव आज हयात नाहीत हे मराठी माणसाचं दुर्दैव म्हणावं लागेल. काळाच्या ओघात हवी हवी वाटणारी माणसं नेमकी निघून जातात हा अनुभव त्यांच्या जाण्याने आला. राजकारणात असतांना पक्क्या मित्राला देखील कडवा विरोध करुनही मैत्री जपणारा हा खरा मैत्र अशीही त्यांची ओळख.

बुलंद मुलख मैदानी तोफ असं हे नेतृत्व सर्वमान्य असं नेतृत्व होतं. महत्वाकांक्षा सारेच बाळगतात मात्र ती पूर्ण करण्यासाठी ज्या अग्नीपथावरुन चालावं लागतं आणि जो संघर्ष करावा लागतो त्यासाठी कुणाचीच तयारी नसते. मात्र या नेत्याचा आयुष्याचा प्रवास वेगळा आणि सर्वांनी आदर्श घ्यावा असाच राहिलेला आहे.

मराठवाडा ही संतांची भूमी म्हणून ओळखला जातो. दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख म्हणायचे मराठवाडा ही संथांची भूमी आहे. त्या संथ झालेल्या समाजप्रवाहाला जागृत करुन प्रगतीच्या दिशेला नेण्याचं काम गोपीनाथरावांनी केलं. आपल्या उपमुख्यमंत्रीपदाच्या काळात धाडसी निर्णय काय असतात ते कसे घ्यावे हे दाखवून दिलं. विलासराव आणि गोपीनाथराव राजकीय पटलावर दोन वेगवेगळ्या पक्षाचे नेते होते. मात्र त्यांच्या मैत्रीमध्ये हे राजकारण कधीच आलेले आपणास दिसणार नाही. दिवंगत केद्रीय मंत्री प्रमोद महाजन हे नात्यातीलच झाले मात्र त्याआधी त्यांची असणारी मैत्री अखेरच्या क्षणापर्यंत जपण्याचं काम गोपीनाथरावांनी केलं. या तीन राजकारणी व्यक्तीमत्वांनी मराठवाड्याला मराठवाडा ही नेत्यांची भूमी आहे असं सिध्द करण्याचं काम केलं.
वक्तृत्व हा गोपीनांथरावांचा खास गुण होता. नेते अनेक होतात अनेकांनी अनेक पध्दतीने राजकारणात यश प्राप्त केलं पण त्यातील सारेच जण वक्ते नव्हते. सभेला गर्दी होणं ही खरी लोकनेत्याची ओळख होती. या बाबतीत कुणाचंच दुमत असणार नाही की गोपीनाथराव खरे लोकनेते होते.

सत्तेत असताना त्यांना जितका आदर मिळाला तितकाच आदर विरोधी पक्षात बसतांनाही सर्वांनी दिला. अभ्यासपूर्ण भाषनांनी विधासभेत आवाज बुलंद करतांना देखील अधून-मधून मार्मीक भाषा वापरण्याची त्याची शैली सगळयांनाच भावणारी होती.

सत्तेचा सोपान चढल्यानंतरही जमिनीवरच पाय ठेवणे आणि माणुसकी जपणे ही गोपीनाथरावांची खास ओळख. राजकारणी व्यक्तीमत्वामागे एक हळवं मन जपलेला असा हा आगळा संघर्षयात्री ... अशा या लोकनेत्याला विनम्र अभिवादन.

प्रशांत अनंतराव दैठणकर
9823199466

साहेब ... !

काही व्यक्तीमत्वे आयुष्याहून अधिक उंच होत असतात आणि अशी उंची गाठणारी माणसं असणारा प्रांत म्हणून आपल्या महाराष्ट्राचे नाव घेता येईल. एक कुशल राजकारणी संवेदना असणारा नेता, उत्तम प्रशासक, उत्कृष्ट वक्ता आणि संघटक .. शब्द कमी पडतील इतक्या गुणांसह वाढणारं हे व्यक्तीमत्व राजकारणासोबत कला, क्रीडा आणि संस्कृती यातही आपली छाप टाकतं असं एक आणि एकमेवाव्दितीय व्यक्तीमत्व अर्थात साहेब..!

पश्चिम महाराष्ट्रात साहेब म्हटलं की बाकी काही ओळख देण्याची गरज नसते ती ओळख हळूहळू संपूर्ण राज्याने आणि आता देशानेच नव्हे तर जगाने मान्य केलीय. होय साहेब 75 वर्षाचे होत आहेत. आरंभी अमृतमहोत्सवाच्या शुभेच्छा द्यायलाच पाहिजे. "शरदचंद्र पवार" हे त्या उत्तुंग अशा व्यक्तीमत्वाच नाव.

शरद पवार यांच्या व्यक्तीमत्वाला अष्टपैलू नाहीतर सहस्त्रपैलू आहेत असं म्हणावं लागेल. राजकारण सारेच करतात परंतु राजकारणातील गट-तट बाजुला ठेऊन या नेत्याच्या अमृतमहोत्सवाला राष्ट्राच्या प्रथम नागरिकापासून साऱ्या पक्षांचे सारे बडे दिग्गज उपस्थित राहतात. हा आदर उगाच प्राप्त होत नाही त्यामुळे साहेब म्हणतांना आनंद वाटतो आणि मराठी मातीतला माणूस हिमालयाची उंची गाठतो. या अभिमानाने प्रत्येक मराठी माणसाची छाती रुंदावते.

मराठी माणसाने या आधीही खूप उंची गाठली त्यात शरद पवारांच स्थान माझ्या मते खूप वेगळं आहे. ते वेगळेपण आपण जाणूनच घेतल पाहिजे. काँग्रेसची सत्तासुत्रे हायकमांड चालवते हे काही नवं नाही. ज्या काळात अर्जूनसिंग आणि इतर नेत्यांच्या रांगेत राज्याचा क्रमांक खूप खाली यायचा आणि नवं नेतृत्व मान्य करणाऱ्या काँग्रेसने सोनिया गांधींना नेता म्हणून स्वीकारलं त्यावेळी त्या रांगेत न उभ राहता स्वतंत्र पक्षाची निर्मिती करुन या नेतृत्वाच्या बरोबरीने बसण्याची ताकत कमावली. इतकंच नव्हे तर नंतरच्या काळात सत्ता चालवतांना त्या नेतृत्वापेक्षा मोठं होवून आपण राजाकारणातील "चाणक्य" आहेत हे साहेबांनी दाखवून दिलं.

अठरा पगड जाती, धर्म, प्रांत, भाषा आणि तितकेच राजकीय पक्ष अशा स्थितीत बहुपक्षीय सरकार चालविण्यासाठी सर्वमान्य नेतृत्व लागतं अशी मोट बांधण्याची ताकद गेल्या काळात दोनच महाराष्ट्रीयन माणसांकडे आहे हे देशानं बघितलं. यात भाजपासाठी चाणक्य असणारे दिवंगत प्रमोद महाजन आणि दुसरे अर्थातच शरद पवार.

सर्वात कमी वयात मुख्यमंत्रीपद प्राप्त करतांना देखील काँग्रेसच्या विरोधात जावून स्वत: पक्ष बांधण्याची आणि तो यशस्वी करण्याची किमया करणारा किमयागार ही साहेबांची ओळख.

1993 च्या लातूर भूकंपात तातडीने धावणारा त्यांच्यातील माणूस अतिशय जवळून बघितला. संवेदनशिलता हे खरं यशाचं गमक हे त्याच क्षणी जाणवलं. अजातशत्रू अशा साहेबांनी ज्या क्षेत्रात पाऊल टाकलं त्याचं सोनं केलं अगदी क्रिकेटचं देखील. आयुष्यात याच अजातशत्रुपणामुळे त्यांना कधी पराभवाचं तोंड पहावं लागलं नाही. बीसीसीआय च्या अध्यक्ष पदापासुन आयसीसी च्या अध्यक्षपदापर्यंत पोहोचतांना त्यांनी बीसीसीआय ला जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट नियामक मंडळ बनवून दाखवलं.

सत्तेत असतांना देशाच कृषीमंत्री पद आणि नसतांनाही आपत्ती व्यवस्थापन व देशाचं नेतृत्व साहेबांनी केलं. इतकी उंची गाठल्यावरही दौऱ्यावर फिरतांना कार्यकर्त्यांस नावानिशी ओळखणारा आणि आत्मीयतेने संवाद साधणारा नेता साऱ्यांनाच भावतो हेच साहेबांच्या यशाचं गमक आहे. अशा या मोठया मनाच्या साहेबांना मनापासुन अमृत महोत्सवी सदिच्छा .. !
प्रशांत अनंतराव दैठणकर
9823199466

Monday, 7 December 2015

कॉफी पेस्ट आणि फॉरवर्ड ....!

आपण आपल्याशी संवाद कधी केला अखेरचा? हा प्रश्न खुप महत्वाचा आहे. धावपळ आणि नाही त्या गोष्टी मागे पळणे आधीच सुरु आहे. अशा स्थितीत आज इन्टरनेटच्या जाळयात सारेच अडकले आहेत. आपलं स्वत:चं काय बघण्यापेक्षा संगणक आणि मोबाईलच्या त्या खिडकीतुन जगाच काय चाललय हे बघण्याची उत्सुकता अधिक आहे. काही जणांच आयुष्यच या जाळयात फसलेलं दिसतयं.

सकाळ व्हावी ती निसर्गाच्या साथीनं. पुर्वेला निसर्गाची ती रोजची रंगपंचमी बघत सूर्याच्या साक्षीनं. तो रोजच येतो पण त्याच्या येण्याच्या छटा रोज वेगळ्या असतात. तो पहाट वारा आणि त्याला साथ देणाऱ्या पक्षांचा किलबीलाट हे सारं काही भुरळ पाडणारं असच आहे. मात्र इथं पहाट होते ती गुड मॉर्निंग च्या संदेशाने अणि दिवसाचा शेवटही गुडनाईट स्वीट ड्रीम म्हणत. थकवा इतका येतो की हल्ली स्वप्न देखील पडत नाहीत.

आपण इतर प्राण्यांप्रमाणे असलो तरी काळाच्या प्रवाहात आपण आपल वेगळं स्थान निर्माण केलय. हे शक्य झालं ते आपल्या सामाजिक जाणीवा विकसित झाल्यामुळे. आता या जाणिवा आपण अधिक प्रमाणात दाखवतो. पण त्यात कोरडेपणा वाढला याला कारण अर्थातच आजकालचं हे सोशल नेटवर्कीगचं असणार फॅड होय.

आपण आपल्या जाणिवा आणि भावना व्यक्त कराव्यात यासाठी धडपड करीत असतो. सोशल नेटवर्कींग माध्यमांनी हीच बाब नेमकेपनान हेरली आणि त्यांनी अभिव्यक्तीसाठी नवं व्यासपीठ उपलब्ध करुण दिलं. आता आपण आपल्या सोईनुसार हा अर्थ सहज लावत असतो मात्र या नाण्याला व्यावसायिकरणानी दुसरी बाजू देखील आहे याचा आपल्या मनात विचार देखील येत नाही.


या व्यवसायिकरणाचा उलगडा 13 वर्षेपुर्वीच आपणास झाला शताब्दीचा महानायक अमिताभ बच्चन यांच्या "कौन बनेगा करोडपती" या रियलीटी शो मध्ये आपण एस एम एस केला की आपल्याला किमान लाख रुपये तरी मिळतील या अशेपायी कोटयवधी जणांनी एस एम एस केले. साधारण एसएमएस आणि हे एसएमएस यांच्या दरात तफावत होती. त्या एका कार्यक्रमात कोटयवधी रुपये कमावून केवळ दिवसाला एक लाखाच प्रसंगी तीन लाखाच बक्षिस दिलं गेलं हे या माध्यमानी लोकांच्या भावनांशी खेळून पैसे कमावणं होत.

रुपयाचं मुल्य घसरलय म्हणत काय होतय दहा रुपयात असं तुम्ही - आम्ही म्हणायचं आणि शक्कल लढवण्याची अक्कल असणाऱ्यांनी करोडपती व्हायचं असाच हा खेळ. यातूनच आता हातात आलेल्या स्मार्टफोननं क्रांती घडवली. भावना खरेपणानं किती जण व्यक्त करतात? यातील नव्वद टक्के हे "कॉपी पेस्ट आणि फॅारवर्ड" अशा गटातील आहे.हे फॉरवर्ड म्हणजे पुरोगामी नाहीत. त्यातूनच नाही नाही ते विषय चर्चेला येतात आणि मेसेजची राळ उठते. सलग दोन वर्षे तोटयांत राहणारी बीएसएनएल सारखी शासकीय कंपनी यामुळे यंदा चक्क नफ्यात आली आहे. जय हो नेटवर्कींग असच म्हणावं लागेल.

गेल्या काही दिवसात झालेले वाद बघतांना वाटतं की भारतात असणाऱ्या सर्व समस्या संपल्या सारं काही "ऑल इज वेल" आहे. म्हणून आपण समाजाच्या प्रश्नावर चर्चेची गुऱ्हाळं लावत आहोत. आजचा चर्चेचा विषय राष्ट्राचा विकास, संपन्नता आणि सधनता नसून आमीर खान ची बायको काय म्हणाली आणि इम्रान खानची बायको विमानाच्या कॉकपीटमध्ये कशी बसली असे आहे. राष्ट्रभक्तीवर मला आक्षेप नाही तो कुणालही असनार नाही. पण चेन्नईत भुतो न भविष्य ती राष्ट्रीय आपत्ती असता आपण आपला वेळ कुठे व कसा घालवतो यावर आहे.

सध्या चर्चेचा विषय अर्थातच असहिष्णूता आणि सहिष्णू भारत . नाक्यावर ठेला लाऊन फळ विकणारा संध्याकाळी घरात खायला मिळेल का या चिंतेत आहे. पाण्याअभावी महाराष्ट्रात अनेक भागात शेतकरी संकटात आहे. चेन्नई पुराने त्रस्त आहे. यात अडकलेल्या कुणालाही विचारा त्यांना या आपत्तीत सावरणं महत्वाच आहे. दिलेले पुरस्कार परत करणाऱ्यांनी सोशल नेटवर्कींगच्या माध्यमातुन चर्चा घडवून आणली ती नेमक्या कोणत्या हेतुने याचा आपण वेध घेतच नाही "फक्त कॉपी पेस्ट आणि फॉरवर्ड" चा उद्योग सुरु राहतो.

माहिती तंत्रज्ञानाच्या युगात‍ सैनिक कमी लढतील सारी युध्दे याच तंत्रज्ञानाने लढली जाणार आहेत याच भान आपल्याला आल पाहिजे. "पीके" वरुन गाणि डाऊनलोड करुन ऐकणाऱ्या आपल्या मुलांना त्या वेबसाईडवरचा धोका कधी समजाऊन सांगितला का, मुळात तो आम्हालाच माहित नाही. शत्रु राष्ट्रे आपणास गाफील करुन आपली महत्वाची माहिती नेत आहेत हे वास्तव आहे. याला कारण आम्हीच. आम्ही इतके बिझी आहोत कार चालवण्यात की आम्हाल थांबून पेट्रोल भरायलाही वेळ नाही.

कुठेतरी थांबून आपण यावर विचार केला पाहिजे आल भान जागवलं पाहिजे यासाठी हा लेखनप्रपंच

प्रशांत अनंतराव दैठणकर
9823199466





Saturday, 7 November 2015

तमसो मा ज्योतिर्गमय

आज दिवाळी... दिवाळी म्हटलं की खूप काही ... मुळात आयुष्याचा उत्सव करणारे तुम्ही - आम्ही शेतीप्रधान संस्कृती जपणा-या  देशात शेती झाल्यानंतर चा काळ फुरसतीचा काळ म्हणून त्यात सण - उत्सवांची रचना सृजनात्मक कामांसाठी केली. उत्सवांची परंपरा जोपासतांना त्यातील सर्वात मोठा सण अर्थात उत्सवांचा उत्सव म्हणजे महाउत्सव  असणारा हा दिवाळीचा सण


दिवाळी प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात निरनिराळया अनुभव आणि अनुभूतीचा काळ पहाटवा-यात कुडकुडत अंधारात घरात आई अंगाला तेल लावून द्यायची मग त्या सुंगधी उटण्याचा दरवळ. त्या थंडीत अंगावर पडणारं ऊन-ऊन पाणी मग त्यामुळे अंगभर दाटणारी थंडी अशी दिवाळीची पहाट जागवली जायची .

दिवाळीचे फटाके आणि आपटबार हल्ली अधिक आवाज करायला लागले.... त्याकाळी केवळ साध्या आवाजी टिकल्यांचा निनाद असायचा काळाच्या ओघात त्या देखील टिकल्या नाहीत. आलेल्या पैशांच्या सधनतेतून त्याच्या जागी कानाच्या पाळयादेखील हादरवरणारे बॉम्ब आले आणि दिवाळीत सर्व ठिकाणी बॉम्बाबोंब सुरु झाली.

दिवाळी सण म्हणजे आठवणींची एक वाठवण आहे. स्वच्छ अंगण करुन टाकलेला सडा, दारासमोर रांगोळी काढणा-या सुवासिनींच्या रांगा .. कष्टानं कितीही थकल्या तरी त्या आपल्या पध्दतीनं " आली माझ्या घरी ही दिवाळी म्हणत आपली कला दाखवायच्या दिवाळी म्हटलं की दिवाळीच्या सुट्टया आणि मग बाजारातून बांबुच्या काडया आणायच्या रंगीत ताव आणि काडयांचा केलेला तो आकाश कंदील... होय आकाश कंदीलच दिवे म्हणजे चैन आणि चायनामेड दिव्यांचा माळा हल्ली आलेल्या. त्या अष्टकोनी आकाश कंदीलाची जुळवणी आणि मांडणी दिवाळी आधीचा मुख्य उद्योग होता.


दिवाळीत बागडणारं बालपण वेगळयाच धुंदीत असायचं माती कालवून तो गारा लिंपत चार पाच चिमुकल्यांची डोकी अंगणामध्ये किल्ला बनवण्यासाठी भिडायची. त्या चिमुकल्या हातांनी अल्पशा कल्पनाशक्तीवर बनवलेला तो किल्ला बघतांना सा-यांच्याच आनंदाला भरतं यायचं. दिवाळीच्या चार - पाच दिवसात तो किल्ला पणतीच्या उजेडात उजळून निघायचा आणि बिटींग द रिट्रीट करावं तसं दिवाळीला अलविदा करतांना मोठा फटाक्याचा बार करुन तो किल्ला उडवून देताना झालेला आनंद आयुष्यभराची आठवण असायचा.

काळाच्या ओघात आणि गतीत आम्ही शब्दाचे अर्थ बदलले सोबतच जगण्याचे संदर्भ देखील नकळत बदलत गेले. अठरा विश्वे दारिद्रय असं आपण म्हणतो मुळात ते अठरा -विसावे म्हणजे 18X20 अर्थात 360 दिवस या अर्थाने आहे. आणि मुळ वाक्प्रचार अठरा विसावे दारिद्रय अन् पाच दिसाची दिवाळी असा आहे. अर्थात कितीही गरिबी असली तरी ती व्यक्ती देखील पाच दिवसांची ही दिवाळी साजरी करतांना आपणास दिसतो.
शेतीप्रधान आणि खेडयात राहणारा देश स्वातंत्र्या नंतर झपाटयानं बदलला.. बापू म्हणत खेडयाकडे चला पण सगळे शहराकडे धावायला लागले. शहरात वाढलेल्या गर्दीमुळे मला सगळयांचीच धावाधाव सुरु झाली ही इतकी की आपण कशासाठी धावतोय हे कळत नाही अशा स्थितीपर्यंत सारे धावायला लागले... मी गाडी चालवण्यात इतका बीझी आहे की मला पेट्रोल भरायला थांबायची देखील फुरसत नाही. ...
असं वेडेपणानं धावणारेही यात आहेत. 
दिवाळी आपल्या जीवनशैलीचा भाग आहे. शेतात पिकलेलं धान्य आणि त्यातून आलेलं धन याचा आनंद साजरा करण्याचा हा काळ शेतकरी ज्याच्या आधाराने स्वत:चेच नव्हे तर इतरांचे उदरभरण करण्यासाठी मातीतून मोती पिकवतो त्या शेतक-यानं बघितलेल्या हिरव्या स्वप्नाच्या पूर्ततेचा हा क्षण.

वसु- बारस. दिवाळीची सुरुवात शेतीप्रधान संस्कृतीत गाय आणि तिचं वासरु यांच्या पूजनाने होणारी सुरुवात याचंच द्योतक आहे. प्रात:काळीच्या त्या गर्द तिमिरावर मात करण्या-या इवल्याशा पणतीच्या टिमटीमत्या ज्योतीची ताकद कळते आपल्यातील आळस झटकून चतुर्दशीला या क्षणाची सुरुवात करायची. दिवाळीची आमावस्या अर्थात लक्ष्मीचं पूजन. आयुष्यात आवश्यक असणा-या बाबींचं पूजन मग यामध्ये झाडूची देखील पूजा होते. स्वच्छता ही आपण आरंभापासून पूज्य मानली. आज दुर्दैव की धावताना आपण ते विसरतो आपल्या अंगणातला कचरा शेजारी टाकण्याची सवय लागली म्हणूनच आपणाला स्वच्छता अभियान राबवावे लागते. आयुष्याच्या अविभाज्य घटक म्हणून आपण याकडे बघायला
पाहिजे.
 अमावस्येनंतरचा दिवस म्हणजे नवर्षाचा अर्थात प्रतिपदेचा दिवस हा दिवस बलीप्रतिपदेचा दिवसआपण बळीराजाच्या नावे बलीप्रतिपदा म्हणून देखील साजरा करायचा. शेतक-याला आपण बळीराजा म्हणतो तेयासाठीच प्रत्येक खाणा-या तोंडाला अन्न देणारा हा अन्नदाता आज बदलेल्या निसर्गचक्राने हतबल होवून नैराश्याच्या मार्गावर आहे. यात नैराश्याच्या सिमेवरुन कडेलोट झालेले मृत्युला कवटाळताना दिसत आहेत. त्याची वेदना जाणून त्यांना साथ द्यायला पाहिजे धीर आणि मदतीला हात द्यायलाच हवा. तरच बलीप्रतीपदा आपण मनापासून साजरी करु शकतो.

जीवन -मृत्यू हे दोन बिंदू यातील प्रवास म्हणजे जीवन आहे. जन्माला आलेला प्रत्येक जीव मरणार आहे. चिरंजीव कुणीच नाही. ना कुणी अविनाशी आहे. काळाच्या या न्यायाची आठवण करुन देणारी यमव्दितीया अर्थात भाऊबीज. आपल्या भावाचं औक्षण करुन त्याच्या जगण्याचं दान मागणारी बहीण असं हे भावाबहिणीचं नातं जपणारी दिवाळी. शहरीकरणाच्या आघाताने विभक्त झालेली कुटुंब संस्कृती आज चौरस कुटुंब पधदतीत जगतेच अशा कुटुंबात प्रत्येक घरात भाऊ -बहिण नातं आहे अशी परिस्थिती नाही त्यामुळे औपचारिकतेमुळे संकुचित होणा-या स्वभावाप्रमाणे दिवाळीहा सणही अनेक कुटुंबसांठी संकुचित होताना दिसत आहे.

सा-यांची ही दिवाळी आठवणींना साद घालते.

दिवाळी म्हणजे ... अभ्यंगस्नान आणि उटण्याचा दरवळ

दिवाळी म्हणजे ... तो मोठा गोलाकार मोती साबण

दिवाळी म्हणजे... लाडू -चिवडा नी चकली, करज्यांचा फराळ

दिवाळी म्हणजे.... आकाश दिवा नी पणत्यांची आरास

दिवाळी म्हणजे.... नव नवीन कपडयांचा पेहराव

दिवाळी म्हणजे.... पंच पक्वान्नांची मेजवानी

दिवाळी म्हणजे .... साहित्य नी दिवाळी अंकांची पर्वणी

दिवाळी हा सण सा-यांचा आवडता सण या दिवाळीत सा-या जागवत जुन्याचं कौतूक करत नव्याचं स्वागत करुन दिवाळी साजरी करुया ......

सा-यांना दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा

प्रशांत अनंतराव दैठणकर

9823199466




Tuesday, 13 October 2015

हुई और भी मुलायम...!

सहजपणे बोलतांना टपली मारावी त्या पध्दतीनं काल तिनं माझ्या कानावर फोनव्दारेच टपली मारली. संवाद प्रेमाचा चालू असताना हो ना ते प्रेम 20 व्या वर्षी कळत-नकळत होतं असं म्हणताना...उरलेलं 40 व्या वर्षी होतं आणि 80 व्या वर्षी बॅलन्स NIL होतो अशी पुस्ती जोडली. फोनवरलं संभाषण सरलं मात्र आता सुरुवात झाली ती आत्मसंवादाची.

महाविद्यालयातले ते दिवस...शाळेत असतांना कुतूहल असणारा तो विषय प्रत्यक्षात शाळेतून लाजत - बावरत किंचितसं घाबरतच ती महाविद्यालयाची पायरी गाठली त्या क्षणी जाणवलं की शाळेचे ते दिवस कसे चिमण्यांचा थवा उडून जावा आणि फांदी रिकामी व्हावी असे नजरेसमोर उडाले...झाड रिकामं आणि पारंब्या...त्या वडाला बांधलेला सुवासिनींचे धागे तितके उरावे अशी स्थिती.

त्या धाग्यांप्रमाणे स्मृतीचे धागे आणि त्यांचं रिंगण झाडाभोवती सातत्याने गहिरं होत होतं वर्षागणिक त्या भाविकतेने साता जन्माचा पती का मागतात याचं बालसुलभ कुतूहल संपून तारुण्यात पाऊल ठेवताना स्त्रियांचा तो ' सूता वरुन स्वर्गा ' चा मार्ग जरा खटकला पण जगरहाटी...चालायचं तसं...आणि आपल्यालाही थांबता येत नाही काळाची गती आपण पकडली नाही तरी लोककला लटकलेल्या गर्दीमध्ये आपसूक पुढे ढकलला जातो आणि फलाटावर उतरतो तसा काळ आपल्याला चालवत असतो.

चालत चालत इथवर आल्यावर मागे वळून बघतांना आपण स्वत:लाच धुंदीत जगताना बघायचं धुंदी असते वयाची एक प्रकारचा तो कैफ म्हणतात ना वय वेडं असतं...म्हणून काय इतका वेडेपणा करायचा असं टोकणारे होतंच ना पण त्यांचं ऐकायला वेळ आहे कुणाला...विषय नसताना रंगणाऱ्या त्या गप्पांच्या मैफली नेमक्या कसल्या होत्या आज कुणालाच सांगता येणार नाही...सारं कसं मंतरलेलं जग होतं.

ती पाहताच बाला...असा कलिजा खलास झालेल्या त्या खलाशांचे जहाज आज स्थिरावलेले दिसते कारण त्यावेळी असणारं Love at first Sight खरं असलं तरी तो पहाटवाऱ्यात प्राजक्त फुलांवर पडलेल्या दवबिंदूचा आनंद होता...झाडाच्या पानापानांवर पडणारी ती 'ओस की बुंदे ' कोवळया उन्हात विरुन जायची तशी स्वप्नं ही अनेकांना दवबिंदूच्या रुपातलं मृगजळ ठरली होती…… आसपास हिरवळ आणि सुगंधाचा दरवळ असताना काही वेडे पार या स्वप्नांच्या मृगजळामागे धावताना दिसले.

मुकद्दर का सिकंदर मधला तो सिकंदर मेमसाबच्या मागे अन मेमसाब वकिल बाबूच्या प्रेमात आणि प्रेमवेडया सिकंदरच्या प्रेमात हिरा चाटून (हे कसं काय बुवा आजवर कळलेलं नाही) जीव देणारी जोहराबाई आणि त्या जोहराच्या प्रेमाने वेडा झालेला दिलावर.... असं न पुरं होणारं वर्तूळ आणि त्याचं ते " धकाधकी " चं आयुष्य...बघता बघता त्या मेमसाब कुण्या वकिलबाबूचा हात धरुन पाखराप्रमाणं उडून गेल्या याची चिंता करणारे लढवय्ये सिकंदर मित्र आसपास वावरत होते...नुसतं गंमत म्हणून बघायचं दुसरं काय.

खरच वय वेडं असतं...त्या वयात प्रेमात पडलो आणि काय...पडतच गेलो. आज त्याबाबत टोचणी देण्याचा प्रयत्न करणारे कमी नाहीत शेवटी 'कुछ तो लोग कहेंगे...' म्हणत बेधूंदपणाने आपण आपलं चालत रहायचं इतकंच त्या वयात कळत होतं. सुखावलेले कमी आणि दुखावलेले प्रेमभंग झालेले जीव अधिक...तुला कसं Character नाही असं हिणवतात तेव्हा हसू येतं...चारित्र संपन्न व्यक्तीमत्वाचा धांडोळा घेतांना मग अधिकच हसू यायला लागतं...संपन्न असं चारित्र वगैरे सारं अंधश्रध्दा असतात…….. जगणाऱ्याला ते जाणवतं Character by Choice आणि Character by Force यात फरक असतो... " हमसे आया ना गया तुमसे बुलाया ना गया" असं म्हणत या सैन्याच्या अनेक फळया धारातिर्थी होवून अपरिहार्यपणे चारित्र्यसंपन्न झाल्या...... त्यांचाही सार्थ ( ? ) अभिमान वाटतो.
ती माझ्या राशीची नाही...अपने को नही पसंद,..... म्हणत तिची ओळख न होताच तिला बिनलग्नाचा घटस्फोट देणारे अनेक जण आता चारित्र्यसंपन्नतेची झुल पांघरलेले बघतो त्यावेळी अधिकच हसू येतं...त्यातही जहाल - मवाळ अशी गटवारी होती. जहाल गटवारीतील युवक छाती पुढे काढून ' वो मेरे दिलमे प्यार की तरह और मै उसके दिल मे नासूर की तरह रहूंगा' असं म्हणत शैार्यपूर्वक शहादत स्विकारुन शौर्यपदकाच्या सन्मानासह चारित्र्याच्या महामार्गावर मार्गस्थ झालेले बघितले त्या बिचाऱ्यांना आज बाजारात बायकोसोबत हातात पिशव्यांच्या ढाली घेऊन लढणाऱ्या ' भाजीप्रभू ' च्या रुपात लढताना बघून वाईट वाटतं...आधीच पावन झालेल्या या नश्वरांनी खिंड लढवायचा विचार करायच्या पूर्वीच स्वत:ला खिंडीत सापडलेलं बघून सभ्यपणाचं पांढर निशाण काढलेलं बघितलय...


खरच वय वेडं असतं... "नशीब प्रत्येकाचं असतं असं नाही आणि नशीब प्रत्येकावर रुसतं असही नाही " ...कोणाचं कसं हा ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग म्हणावा लागेल.

अर्धांगिनीला अर्धसत्य सांगा असं म्हणणाऱ्यांना माझं पूर्ण सत्य पटणार नाही...प्रेमात पडून आता वीस वर्षांच्या खंडानंतर अगदी खरोखर 'वीस साल बाद' सारं पूर्णसत्यात अर्धांगिनीला सांगितल्यामुळे काय काय घडू शकतं याची अनुभूती घेताना अचानक चाळीशीच्या उंबरठयावर ती दिसते...आणि हो दगडं कशी पाझरणार...वितळायलाही मेणासारखं मऊ असावं लागतं कदाचित खंबीर असणारं मन अधिक हळवं होतं की हळवेपणात कणखरपणा अधिक असतो ...पण पुन्हा प्रेमाचं विश्व तरुण मनातलं तारुण्य शरीरालाही तरुण ठेवतं असंच काहीसं...

धुंद वाऱ्याच्या लहरींसोबत अलवारपणे खांद्यावर दोलायमान खांद्यावर रुळणारे गेसू ... बाईकवर वय विसरुन एक्सलेटरचा कान पिळून वाऱ्याशी युध्द खेळणारं शरीर आणि त्यातलं मन आजही त्याच वयाचा 20 व्या वर्षात जगायला भाग पाडतं आणि वय वेडं असतं...आणि मावळतीला जाणाऱ्या सूर्यासोबतच्या प्रवासात ती हळूवार गाणं गुणगुणते कानावर शब्द तालासह नाचायला लागतात.

हुई और भी मुलायस मेरी शाम ढलते ढलते......

प्रशांत अनंतराव दैठणकर

9823199466

Friday, 9 October 2015

प्रवास आपला टपालासोबतचा...!

नव्या पिढीला फारसा परिचित नसला तरी जाणत्या पिढीमधील तुमच्या-आमच्या पिढीत साऱ्यांनी खेळलेला खेळ म्हणजे मामाचं पत्र हरवलं आता त्या वयात निरागस असल्याने खेळताना कधी प्रश्न पडला नाही की मामाचंच पत्र का हरवायचं आणि ते नेमकेपणने मलाच का सापडायच ? यातला विनोदाचा भाग बाजूला ठेवला तर मामाचं पत्र म्हणजे आईच्या माहेरचा दुवा होता. त्यात माहेर म्हटलं की सगळ्याच स्त्रिया हळव्या होत असतात माहेरुन ख्याली खुशाली सांगणारं त्याकळचं ते 15 पैशांचं पोस्टकार्ड जगण्याचा घटक होता आणि तो पत्र आणणारा पोस्टमन आपल्या घराकडे कधी येतो याची सर्वांना वाट असायची.
स्वातंत्र्य प्राप्तीनंतर नागरिकरणाला वेग आला आणि गावातली तरुण पिढी शहराकडे वळली. ज्यांनी मातीशी नातं जपलं अशी मोठी पिढी गावातच राहिली. त्याकाळी टेलिफोन फक्त श्रीमंताघरची वस्तू होती म्हणून पत्रव्‍यवहार हा जगण्याचा घटक होता.
मुंबईत नोकरीसाठी कोकणातून आलेल्या चाकरमानी लोकांसाठी संदेशवहनाचा तो खात्रीलायक आणि स्वस्त मार्ग होता.
संदेशवहनाच्या पध्दती काळानुसार आणि तंत्रज्ञानानुसार बदलत गेल्या आता व्होडाफोनचा जमाना असला तरी पूर्वी घोडाफोनचा जमाना होता. घोड्यावरुन संदेशवाहक पाठवून राजे एकमेकांशी पत्रव्यवहार करीत तर प्रशिक्षित कबुतरांकडूनही संदेश पाठविले जात होते.
युरोप आणि अमेकरकेत टपाल व्यवस्था सुरु झाली. ब्रिटीश भारतात आले त्यावेळी त्यांनी हे साधन भारतात आणले टपालाची शिस्तबध्द वितरण व्यवस्था असणारी टपाल कार्यालये दिडशे वर्षांपूर्वी थाटायला लागली त्याकाळी तार अर्थात टेलिग्राफ ही गतीशील संदेशवहनाची यंत्रणा टपाल कार्यालयाचाच भाग होती.
अशाच 15 पैशांच्या पोस्टकार्डमुळे विलंबाने का होईना शुभवर्तमान, ख्याली खुशाली, लग्न जुळल्याच्या बातम्या कधी निधनाच्या बातम्या कळायच्या पत्र जमवून ठेवायला घराघरात तारकेट असत. याच टपाल विभागाच्या तिकिटांमुळे हजारो जणंनी तिकिट संग्रह गोळा केलेले दिसतात निरनिराळया देशांची टपालाची तिकिटे गोळा करणे हा एक चांगला छंद आहे.
पोस्टमनला बऱ्याच वेळा इतरांची पत्रे लिहून देणे तसेच आलेल्या पत्राचं वाचन करुन देणे करावे लागे. न शिकलेल्या पिढीला त्यामुळे पोस्टमन अर्थात डाकिया घरातलाच सदस्य मानत होते. त्याला दिवाळीला आवर्जून पोस्त दिली जायची.
काळ बदलला तसं संदेश वहनाचं स्वरुप बदललं मात्र आजही व्यापारी वर्ग आणि ग्रामीण भागात राहणाऱ्यांना पोस्टकार्ड जवळचं वाटतं. नव्या पिढीत आता मोबाईलवर मेसेज पाठविणं, चॅटींग करणं, फेसबुक वर केलेलं स्टेटस् अपडेट आणि व्टिटरवर केलेलं व्टिट आदी मार्ग उपलब्ध आहेत त्यातच ही मंडळी रमते. पत्र लिहिणे आता भाषा विषयात काही मार्कांपूरतं उरलं आहे.
पत्र लिहिताना मोठ्यांना केलेला नमस्कार मग पत्राचा मायना. पत्र पूर्ण झल्यावर लिहायचं राहून गेलं म्हणून लिहिलेलं ता.क. अर्थात ताजा कलम. निधनाची वार्ता कळवणं आलं की त्यात टाकलेली टीप हे पत्र वाचताच फाडून टाकणे आणि आपणही ते फाडायचं ही पध्दत या पत्रालाच तार समजून लवकर निघावे या आशयाची खास टिप आदी अनेक बाबी टपाल आणि पोस्टकार्डशी जुळलेला आहे.
याच टपाल खात्यमुळे आवर्ती ठेव अर्थात आर.डी. रिकरिंग डिपॉझिट च्या रुपाने अनेकांना व्यवसायची संधी लाभली आजही टपाल खात्याशी ही माणसं निगडीत आहेत. भविष्य निर्वाहासाठी पीपीपी. अर्थात टपाल भविष्य निर्वाह निधीच्या रुपाने अनेकांनी सुरक्षित गुंतवणुकीसाठी टपाल खात्यावर विश्वास टाकला.
9 ऑक्टोंबर हा या टपाल खात्याची आठवण देणारा टपाल दिन. आज तंत्र बदलल्यावर टपाल विभागाने  ई-ट्रान्सफर आणि ई-मनी ऑर्डर सुरु केली पण शहरात व वसतीगृहात राहून हॉस्टेल लाईफ ज्यांनी जगलय यंना या मनी ऑर्डर म्हणजे लाईफ लाईन असायची. या मनी ऑर्डरच्या भरवशावर होणरी उधारी आणि पार्ट्या यांचं सान त्यांच्या आयुष्यात एखाद्या आठवणीच्या कुपीसारखं आहे.
लष्करी सेवेत असणाऱ्यांना सिमेवरुन घरी पैसे पाठवणं आणि आपली खुशाली कळवणं या साठी टपालाचाच आधार आहे. संदेसे आते है हमे तडपाते हे हे बॉर्डर चित्रपटातलं गाणं याचा भावनेला व्यक्त करणारं आहे.नाम चित्रपटात पंकज उधासने गायलेल व त्याच्यावरच चित्रित झालेल चिठ्ठी आई है या गाण्यावर हॉस्टेल मधले मित्र रडताना मी बघितले आहेत. डाकिया डाक लाया हे काका अर्थात सूपरस्टार राजेश खन्नावर चित्रित झालेलं गाणं असो की स्मिती पाटीलचं हमने सनम को खत लिया ही गाणी डाकिया, डाकबाबू अर्थात पोस्टमन आणि टपालाचं महत्व अधोरेखीत करतात.
आजही टपाल खातं महत्वाची कामगिरी बजावत आहे. अंगडिया सेवा आल्यवर खाजगी सेवेचा दर्जा पाहून अनेक जण कुरिअरकडे वळले असले तरी महत्वाचे दस्तऐवज पाठविण्यासाठी आजही टपाल खात्याची स्पीडपोस्टसेवा पसंद केली जाते. 
टपाल खात्यात असणारा आरएमस अर्थात रेल मेल सर्व्हीस आजही गतीमान प्रवास तुमच्या-आमच्या आयुष्यात अगदी महत्वाचा आहे. घरोघरी जाऊन टपाल वाटप करणारा पोस्टमन आणि त्याच्याशी निगडीत यंत्रणेला टपालदिनी सलाम आणि चौकातल्या लाल रंगाच्या टपाल पेटीलाही सलाम.


                             -प्रशांत अनंत दैठणकर- 

Thursday, 8 October 2015

सिनेसृष्टीचा हा मिडास राजा



त्याची आणि माझी ओळख अर्थातच मला कळायला लागलं त्या वेळेपासूनची वयानं बापापेक्षाही मोठा असणारा तो आजही मला तो म्हणावा इतका जवळचा आहे याला कारण त्याच्यातलं आणि माझ्यातलं नातं. हे नातं माझंच नाही तर या भारतवर्षात अनेक पिढयांनी ते जगलय आणि अनुभवलं आहे. तो शतकाचा महानायक. आपल्याला जगायला निरनिराळया पध्दतीनं प्रेरणा देणारा...नाही म्हणायला महत्व कमी असणाऱ्या जगातला तो अनेक पिढयांचं विचार विश्व कधी व्यापून बसला तेच कळलं नाही तो म्हणजे अमिताभ हरिवंशराय श्रीवास्तव उर्फ अमिताभ बच्चन.

'हम जहां खडे होते है वहीं से लाईन शुरु होती है' अशा करारी बाण्याची सवय त्याच्याच व्यक्तिमत्वाने लावली. रुपेरी पडद्याचं ते विश्व जगणारे अनेकजण आहेत पण त्याची तोड नाही आणि तुलना देखील नाही. कालातील व्यक्तीमत्वांपैकी एक व्यक्तीमत्व अमिताभचं. 11 ऑक्टोंबर 2015 ला वयाची 73 वर्षे पूर्ण करणाऱ्या या महानायकाला आणि त्याच्या प्रवासाला बघताना जाणवतं की त्याचा प्रवास तसा साधारण अशा चित्रपट आणि कथानकातून सुरु झाला असला तरी त्याचं स्वत:चं व्यक्तीमत्व त्या भूमिकांना मोठं करणारं होतं. त्याच्या असण्यानं अनेक भूमिका अजरामर झाल्या. त्याला विशिष्ट पठडीत बांधायचा प्रयत्न झाला मात्र त्याची उंची त्याहीपेक्षा अधिक निघाली. काही प्रतिमा अशा असतात ज्या चिरतरुण असतात त्यापैकी एक प्रतिमा अमिताभची आहे. राखी सारखी अभिनेत्री त्याची नायिका म्हणून आली आणि त्यानंतरच्या काळात त्याचं नायकपण बदललं नाही परंतु राखीला त्याच्या आईच्या भूमिकेपर्यंत वृध्दत्व आलं...यासाठीच त्याला चिरतरुण म्हणायचं.

त्यानं चित्रपटात स्ट्रगल केला तो साऱ्यांनाच करावा लागला आणि आजही अनेकजण करीत आहेत मात्र त्याची तुलना करणं अशक्य आहे इतकी मोठी झेप त्याने घेतली.

आजच्या पिढीला अमिताभचं ते वलय आणि त्याच्यातल्या त्या 'ॲग्री यंग मॅन ची क्रेझ' फक्त पुस्तकात आणि लेखांमध्ये वाचायला मिळेल प्रत्यक्षात तो काळ ज्यांनी बघितला त्यांनाच त्याची अनुभूती आली.

सलिम खान आणि जावेद अख्तर या जोडीने अर्थात सलिम-जावेद यांनी हा अँग्री यंग मॅन घडवला असला तरी त्याचं सातत्यपूर्ण नायक रहाणं 'Entertainment' च्या माध्यमातून जारी राखलं ते कादरखान या लेखक अभिनेत्याने अमिताभला स्वत:च्या व्यक्तीमत्वाला अधिक खुलवण्याचं काम शब्दांनी केलं. नुसते शब्द असून चालत नाहीत तर त्या शब्दांना व्यक्त करण्याचं म्हणजे शब्दफेकीचं कौशल्य असावं लागतं ते अमिताभमध्ये ठासून भरलेलं आहे.

बोलतांना शब्द जितके महत्वाचे त्यापेक्षा त्या शब्दांच्या उच्चारात असणारं योग्य अंतर (पॉझ) अधिक परिणाम साधत असतं ते अमिताभने दाखवून दिलं त्यामुळे त्याच्या समकालीन नायकांमध्ये त्याला आपलं स्वत:चं वेगळं स्थान निर्माण करता आलं.

प्रत्येक व्यक्ती स्वत:वर प्रेम करते आणि आपलं व्यक्तिमत्व श्रेष्ठ असं मानते अशा या जगात प्रत्येकाच्या मनातल्या 'मी' ला साद घालून आपली प्रतिमा त्याच्या मनात बसवण्यात अमिताभ यशस्वी ठरला.

सर्व दृष्टीने श्रेष्ठ असं अमिताभला म्हणता येणार नाही. नृत्य हा त्याचा 'विक पॉईंन्ट' त्यात तो कच्चा लिंबू मात्र आवाज हा त्याचा सर्वात स्ट्राँग पॉईन्ट म्हणून त्यानं स्वत:च्या मर्यादा ओळखून वाटचाल आजवर केली.

कथानक लिहून त्यात अभिनेते घ्यायच. गाणं लिहून त्याला संगीत द्यायचं हे सारे प्रघात अमिताभने आपल्या करकिर्दीत कालबाहय केले. लेखक लिहितांना अमिताभ नायक आहे याची जाणीव ठेवून कथानक लिहायचे, गाणीदेखील त्याच्यासाठी लिहिली जात होती. नृत्यामध्ये ता कमजोर आहे हे जाणून त्याच्यासाठी नृत्यदिग्दर्शक त्याच स्वरुपाची रचना करायचे नायक म्हणून वाटचाल करताना वेगवेगळे टप्पे या महानायकाच्या प्रवासात आले त्यात सर्वात महत्वाचा टप्पा अभिनेत्री रेखा सोबत आला अमिताभच्या कर्तृत्वाला वलय होतंच पण त्याला स्वप्नवत यश मिळवून देणारा अभिनेता बनवण्याइतपत खुलवण्याचं काम रेखा गणेशनने केलं.


अमिताभने आपल्याच क्षेत्रातील दिग्गज अभिनेत्री जया भादुरी सोबत विवाह केला मात्र त्याची चर्चा अधिक झाली नाही. अधिक चर्चा अमिताभ रेखा यांचीच झाली. अमिताभने अभिनेत्री रेखापेक्षा अणिक चित्रपट जयाप्रदाच्या सोबत केले असले तरी आजही चर्चा अमिताभ आणि रेखाचीच होते.

अमिताभ म्हटल्यावर त्याचे संवाद आठवतात आणि त्याची गाणी आठवतात अमिताभ्‍ म्हणजे जय-विरु ची जोडी आठवते. त्याचा प्रत्येक चित्रपट आगळा ठरलेला आहे. शोले असो कि दिवार त्याला सलिम जावेदची संवाद साथ होती मात्र नंतरच्या काळात व ही जोडी नसली तरी केवळ स्वत:च्या बळावर अमिताभने चित्रपट हिट केलेले दिसतात.

मनमोहन देसाई, आणि प्रकाश मेहरा यांचा तो फेवरेटच राहिला. त्याच्या चित्रपटात सर्वोत्तम बघायला आणि ऐकायला मिळायचं 'ओ साथी रे' ची धून देणारे. कल्याणजी-आनंदजी यांचा उल्लेख केल्याशिवाय हा प्रवास अपुरा ठरेल नंतरच्या काळात बप्पी लाहिरी व आदेश श्रीवास्तवपर्यंतचा संगीतप्रवास झाला असला तरी कल्याणजी-आनंदजीच्या म्युझीकला चॅलेंजच नाही. याच काळात या संगीतकार जोडीने असंच अवीट संगीत फिरोजखानच्या ही चित्रपटांना दिलं हे इथं आवर्जून सांगावं लागेल.

मिडास राजाच्या कथेप्रमाणे सिनेसृष्टीचा हा मिडास राजा, ज्याला स्पर्श करेल त्याचं सोनं करीत गेला मात्र त्यालाही अडचणींचा सामना करावाच लागला गांधी घराण्याशी असलेले घरोटयाचे संबंध आणि राजीव गांधींशी असणारी मैत्री यातून त्याने राजकारणात येण्याचा प्रयत्न केला आणि रसिकांनी त्याला अव्हरेलं त्यावेळी त्याचा उतरणीचा काळ सुरु झाला नंतरच्या काळात 250 रुपयांत अभिनेता होणारी अमिताभ बच्चन कार्पोरेशन लिमिटेड अर्थात एबीसीएल चा घाट देखील त्याला धक्का देणाराच होता.

संपला-संपला अशी चर्चा असताना या महानायकाने नवी इनिंग सुरु केली ती आजवर दिमाखात सुरु आहे. छोटा पडदा अर्थात टिव्ही या छोटया पडद्यावर पदार्पण करणाऱ्या शाहरुख खानने रुपेरी पडद्यावर आल्यावर पुन्हा वळून छोटया पडद्याकडे पाहिले नव्हते अशा काळात अमिताभने 'कौन बनेगा करोडपती ' अर्थात केबीसीच्या माध्यमातून छोटया पडद्यावर पदार्पण केले आणि छोटा पडदा आपल्या अस्तित्वाने मोठा करुन दाखवला.

अमिताभ हे सिनेदृष्टीला मिळालेलं वरदान आहे कारण त्याने ज्या-ज्या क्षेत्रात यायचा निर्णय घेतल ते गाजवलं त्यात गायनाचाही समावेश आहे. आरंभीच्या काळात चित्रपटात गायकांनाच नायक म्हणून घेत मात्र नंतर पार्श्वगायन पध्दती सुरु झाली आणि नायकांना गायकाचा उसना आवाज मिळायला लागला. अमिताभने गाणं म्हणायला सुरुवात केली आणि इतिहास घडवला. ज्या आवाजाला ऑल इंन्डिया रेडिओने नाकारलं तो आवाज साऱ्यांचा आवडता आवाज बनला.

अमिताभला राजकीय अडथळयांमुळे वाटचाल करताना अडचण कायमच आली आहे. शतकाच्या या महानायकाला भारतरत्न मिळाल नसले तरी तो बऱ्या अर्थाने भारतरत्न आहे. सचिन तेंडूलकर च्या कर्तृत्वाला ज्याप्रमाणे तोड नाही त्याचप्रमाणे भारताचं नाव जगभरात नेण्यात अमिताभचा मोठा वाटा आहे.

अशा या महानायकाला त्याच्या नव्या वाटचालीकडे वाट बघतोय इतकच प्रत्येक चाहता म्हणेल.

प्रशांत अनंतराव दैठणकर

9823199466