Thursday, 24 May 2018

कुच्चर ओटा

चण्यापासून फुटाणे बनवताना चणे भाजण्यात येतात. या प्रक्रियेत एखादा चणा तसाच राहतो (Hard Nut) आणि फुटाणे खाताना हा दातावर आदळतो. अशा फुटाण्याच्या दाण्याला मराठवाडी भाषेत कुच्चर म्हणतात. माणसांमध्येही अशी काही माणसे असतात जी इतरांची उणी -दुणी काढणे त्यांना आवडते अशी माणसे म्हणजे कुच्चर.

गावात एखाद्या मंदिराच्या पारावर बसून रिकाम्या वेळेत गप्पा मारल्या जातात. मात्र अशा ओटयावर गावगप्पा ऐवजी केवळ कुच्चर माणसं जमली तर.. तो
कुच्चर ओटा असा एक भाग जालना शहरात आहे.

आता गाव मागे राहिला नवा जमाना नव्या पध्दती आणि गप्पांची नवी ठिकाणी. तसं भारतात रिकामटेकडयांची कमतरता नाही, त्यामुळे नव्या पिढीचं तंत्र अर्थात फेसबूक आणि व्हॉटसअप सर्वांनी स्विकारलय. या वर येणारे काही नव्हे तर बहुतांश संदेश हे ' खिल्ली ' उडविणारे अर्थात TROLL करणारे असतातं. हे ट्रॉल करणे यामुळे एका अर्थाने फेसबूक आणि व्हॉटअप चा कुच्चर ओटाच करुन ठेवल आहे. सर्वात प्रसिध्द व्यक्तीची सर्वांधिक खिल्ली उडविणे या न्यायाने हा प्रकार अहोरात्र सुरुच आहे. खिल्ली उडविणे हे पक्षनिहाय चालू असल्याचे चित्र सध्या फेसबूकवर दिसते.


#MarkZukerberg ने ज्या उद्देशाने फेसबूक सुरु होते त्यात स्पर्धेचा भाग अधिक होता आणि आता स्पर्धा वेगळया स्वरुपाची अर्थात Troll ची सुरु आहे. त्यातही काही क्षण बुध्दीमत्तेचा चांगला वापर करतात.

Troll & Petrol असा एक संदेश कुणीतरी टाकलेला बघितला.

नुकतीच झालेली कर्नाटकातील निवडणूक आणि त्यानंतरचं सत्तानाटय यावर अनेक पध्दतीचे संदेश व्हॉटसअप वर अजूनही फिरतात.

एखाद्याने पंतप्रधान मोदींबाबत चांगलं लिहिल तर त्याच्या विरोधात भक्त आहे म्हणून त्याला ट्रोल केल जातं हे सारं खूपच गंमतशीर आहे. यावरुन मला एक जुनी जाहिरात आठवली.

क्या करें कंट्रोल ही नही होंदा..!

मारुती कारची ती जाहिरात होती त्यातील छोटया सरदार प्रमाणे हे ट्रोल करणारे नवं काही लक्षात आलं की त्यावर तुटून पडतात.
या नव्या समाजमाध्यमांचा वापर चांगल्या आणि सकारात्मक पध्दतीने करणे शक्य आहे. अनेक जण तो करतात. एका लहान मुलाला हृदय शस्त्रक्रिये दरम्यान B - ve ( बि निगेटिव्ह) रक्त हवे होते. अनेकांनी या बाबतचं आवाहन फेसबूकवर बघून स्वत:ची उपलब्धता त्वरित कळवली. रक्तगट B-ve असला तरी विचारांनी B+ve आहोत हे त्यांनी दाखवलं ही औरंगाबादेतील घटना आहे.

अनेकदा चांगले विचार मांडले जातात आणि चांगल्या विचारांचं पिक या माध्यमात येत आहे असं वाटत असताना कुठूनतरी 'ट्रोल धाड' येते. आहे तो चांगुलपणा नष्ट करते.

इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि अभिव्यक्तीला वाव देणाऱ्या फेसबुक सारख्या माध्यमाचाही वापर वाढत आहे. मात्र याचा 'कुच्चर ओटा' झालेला पाहून कधी कधी वाईट वाटतं.


व्हॉटसअपवर सकाळी सकाळी येणारे संदेश ही त्या कंपनीसाठीच नव्हे तर सर्वांसाठी डोकेदुखी ठरली आहे. नववर्षाच्या क्षणी अख्खं व्हॉटसअप हँग करायचा पराक्रम भारतीयांनी करुन दाखवला होता.

भारतात सर्वाधिक पीक कोणतं येतं ? या प्रश्नाचं उत्तर 'अफवांचं पीक ' असं द्यावं लागतं. तशा अफवा हा व्हॉटसअप मधील भल्या-बुऱ्यांच्या जत्रेत सतत येत असतात.

मात्र एक गोष्ट या माध्यमांनी चांगली केलीय डॉक्टर लोकांना शांततेने काम करता यायला लागलय. ओपीडी काढताना पेशंट म्हणून येणारे अधिक 'इम्पेशटपणे' माझा नंबर कधी येणार म्हणून त्रास द्यायचे. आता हे सारे पेशन्ट या नेटवर्कची मजा घेत शांततेने बसलेले दिसतात.

नाण्याच्या दोन बाजू तसं या माध्यमांच्याही. विनंती इतकीच की याला 'कुच्चर ओटा' करु नका.



- प्रशांत दैठणकर


9823199466

Wednesday, 23 May 2018

तू तेंव्हा तशी....! तू तेंव्हा कशी....!

मोटार सायकलची गती वाढली तशी तू मला अधिकच बिलगतेस हे मला जाणवलं. त्यानंतर माझ्यातलं असणारं वेगाचं वेड अधिकच वाढलं...... तुझी माझी भेट झाली त्यानंतर पहिल्या वेळी तुला घेऊन राईडला निघालो तो दिवस मला चांगला आठवतो....!

महिना ऑगस्टचा.... अर्थात श्रावण.... ती श्रावणी धुंद करणारी हवा..... हवेत अधून मधून जाणवणारा तो गारवा, उन्हं पडलीत वाटतानाच येणारी हलकीशी ती पावसाची सर अन् सर्वत्र नजरेला सुखावणारी हिरव्या रंगाची पखरण.....सारं कसं स्वप्नवत अशा त्या श्रावणातल्या दुपारी साधारण चार साडेचारची वेळ...... तू होकार दिलास आणि बाईकवर बसलीस.

बाईक शहरी रस्त्यावरुन हायवेला लागली. सहाजिकच मी बाईकचा कान पिळत गती वाढवली. त्यावेळी बोललीस "सांभाळून रे..." मला तो सुर काळजीचा वाटला मग चटकन मी गती कमी केली. घाटातल्या वळणांवर वरुन डोंगरावरुन अधुनमधून पडणारे ते श्रावणी धारांचे तुषार झेलत घाटमाथ्यावर तू आणि मी........ कसलं एकाकीपण..... सगळी गर्दी जोडप्यांची झालेला हिरमोड आणि मग भाजलेली कणसं हातात घेऊन ड्राईव्ह करतच परतलो.

फिरायला मोकळीक असली तरी सगळीकडे गर्दी असल्यानं हवा-हवासा एकांत जरा दुर्मिळ.... मग ठरवलं नुसतीच राईड घेत जाऊ.... नको कुठं थांबायला ...... अशाच निवांत शनिवारी कॉलेज बंक करुन निघालो..... सवयीप्रमाणे माझी गती वाढली तू म्हणालीस "सांभाळून रे...." पण दुसऱ्या क्षणी तुझ्या त्या बिलगण्याची आणि निकट स्पर्शाची जाणीव झाली. पाठीवर गुदगुल्या होतात असं कुणी म्हटलं असतं तर मी त्याला मुर्खात काढलं असतं......पाठीवरल्या गुदगुदल्या अन् अंगभर रोमांच..... लाईफ बन गई.....

अनेकदा मुलीच्या नकारात होकार असतो म्हणतात..... या निमित्तानं मला चांगलं पटलं की खरच नकारात काहीसा होकार होता....... का वागत असतील बरं मुली अशा ...... मला कोडयात टाकणारा प्रश्न.....

मुलींचा स्वभाव आणि त्यांचं वागणं हे एक गुढ असतं ते जाणता आलं तर प्रेमात अधिक मजा येते.....प्रेमाचं ठीक आहे. हा गुढपणा जाणता आला तरच नेटका प्रपंच करता येतो नाही तर प्रपंचाचा पंचनामा ठरलेला.

ज्याला कळून घेणं केवळ अशक्य आहे अशा गोष्टी अनेक असतात आणि अशा गोष्टी आयुष्यात रंगत आणत असतात. तुझ्या एकाच प्रकारच्या प्रतिक्रियेचा दोन प्रसंगातला अर्थ वेगवेगळा आहे असं जाणवलं..... आता खऱ्या अर्थानं अक्कलदाढ आल्याचा अनुभव आला... हो म्हणतात ना प्यार सबकुछ सिखा देता है.

तु- आणि मी प्रवास चालू आहे अव्याहत.... अखंड तू मला आणि मी तुला चांगलं जाणलं असं वाटताना काही नवं घडतं आणि दोघांना एकमेकांची ओळख होते...... हो ओळख होते नव्याने.....

माझे सगळे मित्र म्हणतात की, मी कोणत्या क्षणी कसा वागेल याचा अंदाज करणं अशक्य आहे ते मला Unpredictable म्हणतात. काळाच्या पटलावर चालताना भूतकाळ आलेल्या अनुभवातून आलेली प्रगल्भता आणि त्या-त्या घटनेच्यावेळी असणारी मानसिक स्थिती यातून मी प्रत्येक परिस्थितीला React करतो. ते प्रत्येकजण याच पध्दतीने करतं असं मानसशास्त्र सांगतं मग मी इतरांपेक्षा वेगळा म्हणजे असा Unpredictable कसा ठरु शकतो.

हां..... नाही म्हणायला मी जरा तिरकस विचार करतो. आयुष्यात आपण नेहमी सरळ वळणाची वृत्ती असावी असे म्हणतो..... आजवर मी कोणतेही सरळ वळण बघितलेले नाही म्हणून कदाचित जरा विनोदबुध्दीचा वापर करुन आयुष्यातील रुक्षपणा टाळता यावा आणि रंजकता वाढावी यासाठी वेगळा विचार करुन मी रिॲक्ट होतो..... याला कदाचित सारे Predict करीत नसतील म्हणून मी Unpredictable असेल....!


माझ्या दृष्टीकोणातून बघशील तर या बाबतीत 'आयटम है हम दोनो' असं म्हणावं वाटतं......माझा हा स्वभाव तुझ्या स्वभावामुळे आलाय. घटना एक आणि प्रतिक्रीया प्रत्येक वेळी वेगळी देतेस तू.....

आठवतं तूला तुझ्या याच स्वभावासाठी मी म्हणायचो

तू तेंव्हा तशी....!

तू तेंव्हा कशी.....!

आयुष्य स्वच्छंद जगावं.....बंधन असतात अनेक पण यमकातला मुक्तछंद शोधणं काही अवघड नसतं. चाकोरीबध्द जगणं म्हणजे रुक्षपणा.....रुटीन.....! अगदी मनमानेल तसं न वागता देखील मनसोक्त जगता येतं की, ....तू शिकवलस एका वाक्यातून......सांभाळून रे.....! मी पुन्हा बाईकला गती देतो आणि पुन्हा तू बिलगते......! वयाचं वाढणं शरीराची स्थिती हेच खरं..... दिल तो रखो वैसा है कहो तो जवान....! समझो तो जवान..... तुला त्या बिलगलेल्या अवस्थेत श्रावण सरींच्या साक्षीने मी पुन्हा स्पीड घेतो यावेळी तारुण्यातल्या श्रावणात......!

- प्रशांत दैठणकर

9823199466

Saturday, 19 May 2018

बोंबाबोंब....!

मराठी भाषा राहणार की संपणार असा लेख दर रविवारी कोणत्या ना कोणत्या वृत्तपत्राच्या पुरवणीत दिसतोय. माझी मातृभाषा म्हणून मला वाटणारी काळजी योग्य आहे, पण त्यामध्ये भितीचा सूर दिसायला लागतो. त्यावेळी मात्र मलाच चिंता वाटायला लागते.

इतक्या वर्षांच्या प्रवासात भाषेसमोर अनेक संकटे आली. मात्र मराठी भाषा संपलेली नाही उलट मराठी भाषा संक्रमित झाली, प्रगत झाली आणि अधिक संपन्न झाली . जगाची संपर्क भाषा असणाऱ्या इंग्रजीसाठी ऑक्सफर्डचा शब्दकोष हा आधार आहे. या शब्दकोषात जगातील विविध भाषांमधील शब्द स्विकारुन इंग्रजी भाषा संपन्न होत आहे. त्याच पध्दतीने मराठी देखील इतर भाषांमधील शब्दांनी अधिक खुलत आहे.

मातृभाषा म्हणून मराठीचा अभिमान बाळगताना मराठीत असणाऱ्या काही शब्दांचे स्वभाव आणि त्यांची रंजकता मला अधिक भावते. काही शब्द दुसऱ्या भारतीय भाषात जसेच्या तसे असले तरी त्याचा अर्थ त्या भाषेत वेगळा असल्याने नानाविध गंमतीचे प्रकार देखील घडतात. या शब्दांशी खेळण्याची ताकद अनेक लेखकांमध्ये आहे व होती, त्यामुळे त्यांनी यातून मोठया प्रमाणावर विनोद निर्मीती केलेली आपणास दिसते.

शब्द हे दुधारी शस्त्र आहे. या अर्थाने की शब्दाचा अर्थ लागण्यावर आणि लावून घेण्यावर देखील अवलंबून असतो. यातून व्दैअर्थी संवाद आणि त्यातून विनोद तयार होतात. मराठी भाषा खेळवाल तशी खेळते याच्या वानगीदाखल अनेक उदाहरणे देता येतील.

सचिन पिळगावकरच्या चित्रपटांमध्ये याचा अधिक वापर आपणास दिसतो.


अशोक सराफ बंदूक घेऊन निशाणेबाजी करीत असतानाच्या एका दृष्यात ' काय हो कसा नेम आहे यांचा ? असा सवाल विचारल्यावर मार्मिकपणे पूढील वाक्यात उत्तर येतं ' त्याचा काहीच नेम नाही ! ' हा मराठी भाषेतला शब्दच्छल विनोदाची पेरणी करतो, म्हणून मराठी भाषा अधिक गोडवा राखून आहे.

ज्यांनी मराठी भाषेचा एक नागरी भाषा म्हणून वापर सुरु केला त्यांनी चिंता व्यक्त करावी याला कारण त्यांना ग्रामीण लहेजा रुचत नाही. ते 'गावंढळ' ठरवतात पण शुध्द मराठीचा आग्रह हा का केला जातो ते अनाकलनीय तुम्हाला आवडत नाही म्हणून ती भाषा मराठी राहत नाही का ?

दादा कोंडके यांनी सलग 9 चित्रपट मराठीत रौप्यमहोत्सवी दिले, त्यातली भाषा तर शुध्द नव्हती. आमचा मक्या ऊर्फ मकरंद अनासपुरे मराठवाडी शैलीचा वापर करतो म्हणून तो अधिक लोकप्रिय झालाय हे विसरता येणार नाही. अगदी नंतरही भारत गणेशपुरेने वऱ्हाडी टोन मध्ये संवादफेक जारी ठेवत यश प्राप्त केले. नागरीपणा, शुध्दता याच्या फंदात न पडता ज्या शब्दातून भावना हमखास पोहोचतात आणि जी भाषा थेट ऱ्हृदयाला भिडते ती खरी भाषा.

दहा कोसावर बदलण्याचा गुणधर्म कायम राखत मराठीत देखील प्रांतनिहाय स्वतंत्र शब्दावली. आणि शब्दफेक यांचा वापर होतो, पण ती देखील मराठीच आहे ना.

मोबाईल आणि इंटरनेटच्या वापराने भाषा आता चित्रमय वळणावर आली असा एक लेख आजच वाचण्यात आला. यात आक्षेप ईमोजी वापरावर आहे. यातून आपण मागील काळात परत जातोय की काय असा काहीसा सूर यात जाणवला.

भाषा हे संवादाचे माध्यम आहे. एकमेकांशी संवाद साधण्यात जी भाषा वापरली जाते ती सोपी असावी. आणि दैनंदिन संवाद साधणारे शब्दप्रभू असतील आणि प्रत्येकाचा शब्द संग्रह दांडगा असेल असे अपेक्षित नाही. मुळात आपण हे लक्षात घेतलं पाहिजे ज्याला लिहिता वाचता येत नाही असे लोकदेखील बोलतात एकमेकांशी अगदी सहजतेने ती त्यांनी बोललेली भाषा खरी मराठी असं माझं मत आहे.

अनपढ अर्थात शिक्षणाचा गंध नाही किंवा कमी शिक्षण झालय अशांना चित्रलिपी समजायला अवघड जात नाही. म्हणून नव्या पिढीने अशा चित्रलिपीचा अर्थात ईमोजीचा वापर केल्याने कितीसा फरक पडणार आहे. अगदी प्रकांड पंडित होवून साहित्यात डॉक्टरेट मिळवली तरी आपण सुरक्षितता म्हणून नव्या तंत्रज्ञानाच्या काळात पुन्हा एकदा अंगठेबहाद्दरच झालो ना !

तुमचा वैयक्तिकपणा, आयुष्यातील खाजगीपणा जपण्यासाठी तुम्ही आज हाताचे ठसे आणि चेहरा किंवा डोळयातील बुभुळे यांचा वापर करीत आहात. त्यामुळे नव्या पिढीला मागासलेपणाकडे जाताय असं म्हणणं चुकींचं ठरेल.

भा. पो. ...... असा संदेश मोबाईलवर दिला तर अडचण आमची आहे..नव्या पिढीला याचा अर्थ कळतो आणि चटकन भावना पोहोचतात ती भा. पो. हे भाषेचं बदलतं रुप होय.

मानवी उत्क्रांतीत चित्रलिपी ते लिपी असा प्रवास घडला त्याला पुन्हा चित्रलीपीची गरज वाटतेय ही देखील एक प्रकारची उत्क्रांतीच म्हणावी लागेल. मराठी भाषेचं स्वत:चं असं वेगळेपण आहे खास गंमत आहे, त्याचा आनंद आणि रसग्रहण याकडे वळण्याची खरी गरज आहे.

एकच अक्षर वापरुन शब्द तयार होणारे दोन खास शब्द फक्त याच भाषेत आहेत...  मराठी मला त्यामुळेच श्रेष्ठ वाटते. ' तंतोतंत' हा शब्द फक्त मराठीतच आहे आणि त्यामुळेच असाच वैशिष्टपूर्ण दुसरा शब्द आपण वापरावा जरुर पण वास्तवात टाळावा. तो शब्द ..... Any guess ? .... तो शब्द आहे ' बोंबाबोंब '.

- प्रशांत दैठणकर
9823199466

Friday, 18 May 2018

सौंदर्य


सौंदर्य, असलं पाहिजे पण त्या सौंदर्याचं दर्शन झाल्यावर जे अनुभव येतात ते अतिशय वेगळे असतात.

सांग दर्पणा मी कशी दिसते ?. असं म्हणत आरशासमोर स्वत:ला न्याहाळत तास न तास बसायचं हे तरुण मुलींचं नेहमीचं आवडतं काम.

सौंदर्याच्या बाबतीत पुराणकालापासून वेगवेगळे दाखले दिलेले आहेत. आजकालचा जमाना हा चित्रपट आणि टि.व्ही. चा जमाना यामुळे सौंदर्याला अधिक महत्व आले आहे. मात्र माझं एक मत त्या दिसणाऱ्या सौंदर्याबाबत नाही.

सौंदर्य हे बघणाऱ्याच्या नजरेत असतं.

असं देखील म्हटलं जातं एका अर्थानं ते बरं आहे. बघणाऱ्याची नजर ज्याला पारखी नजर म्हणता येईल ती बरोबर सौंदर्य शोधून घेते. इथं सांगायचा मुद्दा हा की सौंदर्य आणि रंग यांचा संबंध नाही.

गोरी असेल तरच सुंदर असते असे नाही तर रंगानं काळया असणाऱ्या देखील सुंदर असतात. ते सौंदर्य बघण्याची तुमची दृष्टी आहे की नाही हे महत्वाचं.

सौंदर्य हे सौंदर्यच असतं पण त्याला अनेक सवयी असतात हा अनुभव आहे. पहिला साधारणसा अनुभव म्हणजे सौंदर्य हे गर्वासह येतं.

माझं म्हणणं अनेकांना पटणार नाही पण मी अनुभवानं सांगतो स्वत:च्या रुपाचं कौतूक इतरांनी करावं असं वाटणाऱ्या सौंदर्यवती अनेकदा रुपगर्विता असतात. तुम्ही सुंदर म्हटलं तर पाहिजे परंतु याची वाच्चता इतरांसमोर झाली तर त्यांना राग देखील येतो याला मी Beauty Private Limited म्हणतो. भारतीय समाज व्यवस्थेत सौंदर्य दाखविण्यापेक्षा लपवण्यावर अधिक भर दिला म्हणून असेल किंवा मानसिकता असेल पण सौंदर्याचा साधारणत: हाच प्रकार भारतात अधिक दिसतो.


सौंदर्याला आणखी एक शाप म्हणजे केवळ सौंदर्य हे आयुष्य घडवू शकत नाही. शापीत सौंदर्याची कारणं अर्थात त्या सौंदर्याचा असणारा गर्व हेच आहे.

सौंदर्याचं प्रतिक म्हणून जगाला ज्याची ओळख आहे ती इमारत म्हणजे ताजमहाल. आग्रा येथील ही इमारत सौंदर्यासोबत प्रेमाचं प्रतिक म्हणून बघितली जाते. साधारणपणे प्रेमिकेला भेट देताना व्हॅलेन्टाईनला ताजची प्रतिकृती गिफ्ट करणारे अनेक आहेत. प्रत्यक्षात हा ताजमहाल ही एक कबर आहे, याचं भान किती जणांना असतं हा खरा सवाल आहे. काही नावं डोळयापुढे आणल्यावर सौंदर्य हे शापित असतं याचा उलगडा होईल.

सौंदर्यामुळे जगणं अशक्य होईल इतकी वेळ कुणावरही येवू नये. मर्लिन मनरो, मधुबाला, दिव्या भारती, श्रीदेवी....आयुष्यभर दु:ख यातून त्रास आत्महत्या, गुढ मृत्यू...... हे नेमकं काय दर्शवतं.....

सुंदरता आणि साधेपणा याचा संगम असेल तर जगणं सोयीचं असतं असं मला वाटतं..... जस विद्या विनयेन शोभते..... तसं सौंदर्य साधेपणानं अधिक खुलत असतं.....
कुणाच्या सुंदरपणाचं कौतूक करताना भारतीय समाजात काळजी घ्यावी असं मी आवर्जून सांगेल कारण असं करणं या समाजात आजही स्विकारलं जात नाही.

ज्या देशाने जगाला कामसूत्र सारखा ग्रंथ दिला त्या देशात लैंगीकतेवर खुलपणाने चर्चा म्हणजे संकट मानलं जातं त्या देशात सौंदर्यावर बंधने अधिक प्रमाणात आहेत. त्यामुळेच घुंघट, बुरखा आदी आजही इथं सामान्य मानले जातात.

मुळ मुद्दा सौंदर्य आणि त्यातून येणाऱ्या गर्वाचा आहे. अशा अनेक रुपगर्विता आपल्या आसपास वावरताना दिसतील.

हिंदी चित्रपटात अशा अर्थाने एक गाणं आहे. अर्थात ते गोरेपणात असणाऱ्या सौंदर्याबद्दल आहे.

किशोरदाच्या आवाजात असलेलं ते गाणं

गोरे रंग पे ना इतना गुमान कर
गोरा रंग दो दिन मे ढल जायेगा !


एक सत्य त्या गाण्यात मांडलय ते बरोबरच आहे. वाटतं वय आणि सौंदर्य याचं एक नातं आहे. वय अधिक झाल्यावर सौंदर्य बिघडतं आणि त्याच्या चिंतेत अनेक जणी जगत असतात.

माझं मत असं की, त्या-त्या वयानुसार निसर्ग जे बदल घडवतो ते स्विकारले पाहिजे, निसर्गनियम पाळला पाहिजे म्हणजे आपण अधिक सुंदर दिसतो.

स्त्री सौंदर्यासोबत चर्चा असते ती पुरुषांमधील सौंदर्याची ...... हो पुरुष देखील सुंदर असतात. आता याला इंग्रजीत दोन स्वतंत्र शब्द आहेत हा भाग वेगळा. मुलींसाठी Beautiful आणि मुलांसाठी Handsome. मराठीत मी सोंदर्य किंवा सुंदरताच शब्द वापरेन. त्याला रांगडेपणा म्हणणार नाही. प्रत्येक व्यक्ती काही पहेलवान टाईप असत नाही म्हणून काय सौंदर्याची परिभाषा बदलायची.

वाढत्या
वयात स्वत:ला आहे तसं स्विकारणारा अजीतकुमार हा दाक्षिणात्य नट म्हणजे पुरुष सौंदर्याचं प्रतिक म्हणता येईल. केस काळे करुन तरुण दिसण्याचा अट्टाहास न करता तो ज्याभूमिका करतोय त्याला मिळणारा प्रतिसाद बघता माझं म्हणणं सिध्द झालय असं मला वाटतं.....
- प्रशांत दैठणकर

9823199466

Thursday, 17 May 2018

' भंगार ' ......

मुळात शब्द स्वत: परिचय देतात एखाद्या वृत्तीचा आणि स्वभावाचा या जगात सजीव आणि निर्जीव असा भेद आपण करतो मात्र यापैकी कोणालाही शब्दात व्यक्त करायचे असेल तर शब्द त्यावर असणारा प्रभाव टाकल्याशिवाय राहत नाही. आणि मानवी मेंदूची ताकद इतकी मोठी आहे की, मिटल्या डोळयांनी जरी शब्द ऐकले तरी बंद डोळयाआड एक विशिष्ट प्रतिमा उभी राहते. असाच एक शब्द म्हणजे ' भंगार ' .

आता ' भंगार ' हा शब्द ऐकताना कोणाच्या डोळयासमोर कोणती प्रतिमा आली हे स्पष्ट करणं अवघड असलं तरी एक व्याख्या नक्कीच मांडता येते. 'उपयोग संपलेल्या आणि काळाच्या ओघात मागे पडलेल्या अडगळीचा ढीग ' म्हणजे भंगार असं म्हणता येईल का.

आपण बोलताना नेहमीच म्हणतो .. काय भंगार काम आहे त्याचे.. किंवा भंगार जमा करायची सवयच आहे त्याला..वेगवेगळ्या अर्थाने याचा वापर आपण करीत असतोच ना.

भाषा दर दहा कोसांवर बदलते असं म्हणतात त्यामुळे आपल्या कोकण ते विदर्भ अशा विस्तीर्ण महाराष्ट्रातील तमाम मराठी जन आणि जगाच्या पाठीवर विविध देशांमध्ये वसलेल्या मराठी व्यक्ती त्यांना याचा अर्थ वेगवेगळया पध्दतीने लागेल.

हल्ली आपल्याकडे इंग्रजी भाषेचा प्रभाव वाढला आहे त्यामुळे आपण चटकन पर्यायी मराठीतून इंग्रजी शब्द शोधतो. SCRAP या शब्दाच्या अनुषंगाने येणाऱ्या प्रतिमा वेगळया आहेत.

आता हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे एक फोटो.
मला सवय आहे काही फोटो मी माझ्या FB वॉलवर शेअर करतो जे फक्त मी पाहू शकतो असा दोन वर्षांपुर्वीचा फोटो आज समोर आला. घराच्या खिडकीतून खाली रस्त्यावर भंगार सामान खरेदीसाठी उभ्या असलेल्या एक हातगाडीवाला आणि त्याच्या गाडीवरील भंगार सामान याचा तो फोटो आणि तो काढण्याचं कारण म्हणजे कधी काळी घराघरात श्रीमंतीचं प्रतिक असलेल्या टोल देणाऱ्या घडयाळाला कुणीतरी भंगारात विकलं होतं.

....घडयाळ.... की काळ नेमकं काय भंगारात विकलय ?

त्या गाडीवरच्या भंगारात इतरही अनेक गोष्टी होत्या मात्र माझी नजर त्या घडयाळावर खिळली. 70 च्या दशकाचं प्रतिनिधीत्व करणारं ते घडयाळ.

काळ बदलला की फॅशन बदलते आणि आम्ही आजकाल Whats Treanding ! म्हणत नव्या मागे धावतोय. कधी कधी धावण्याची गती इतकी होते की, कालची वस्तू आपल्याला आज अडगळ अर्थात भंगार वाटायला लागते.

' लोहा लोखंड के भारोभार फल्ली ' !

अशी हाळी देत गल्लोगल्ली फिरणारे भंगारवाले लहानपणी पाहिले होते. यातून जीवनाचे दोन आयाम समोर यायला लागतात. एक आयाम झटपट बदल स्वीकृत करणाऱ्यांचा. याला बदलांचा स्विकार केला असं म्हणायचं जरा जास्त होईल. माझ्या मते नव्याची क्रेझ असणारे असं म्हणायला पाहिजे. आपल्याकडे जगात सर्वोत्तम जे आहे ते उपलब्ध आहे आणि ते मी वापरतो अशी वृत्ती याला अधिक कारणीभूत आहे.

दुसरा आयाम आहे तो या भंगारातून आयुष्य शोधणाऱ्या आणि उपजिविका भंगारवर आधारित आहे अशा लोकांचा. इतरांनी भंगार म्हणून टाकून द्यायचं आणि या लोकांनी त्याचं सोन म्हणून जगण्याची संधी म्हणून वापर करायचा ही त्यांची जीवनशैली आहे.

फोटो काढताना मला घडयाळ दिसलं पण फोटो नीट न्याहाळताना त्यात एक कॅलेंडर देखील आहे असं लक्षात आलं. कालगणना करुन काल आज आणि उद्या या परिभाषेत तारखा अथवा तिथी दाखवण्याचं काम करणारे कॅलेंडर.

काळ ही एकमेव बाब आहे की, ती सतत चालत असते आणि त्या काळासोबत आपल्या आयुष्यात स्थित्यंतरे येतात. यांचा संग्रह आठवणींच्या रुपात जमा होत राहतो. आपण थांबवायचं ठरवलं तरीही काळ थांबणार नाही मग आपणच थांबून विचार करावा की आपल्याला नेमकं काय हवं आहे.

आज खरेदी केलेली वस्तू खरेदी करताना नवी असते उद्या ती जुनी होणारच आहे. आणि मग अशाच पध्दतीने आपण सहली करताना हौसेने त्या-त्या ठिकाणच्या वस्तू खरेदी करुन घरी आणायला लागतो..... कालांतराने घर छोटं पडायला लागतं मग नव्यासाठी जुन्याला अडगळीत व काही दिवसांनी भंगारात विकण्याची वेळ आहे.

वृत्तपत्राची रद्दी होणार, जुने कपडे आऊट ऑफ फॅशन होणार आणि हळूहळू नवं ते जूनं होत राहणार.
एका बाजूला टाकावूतून टिकावू करणारे दिसत आहे. जूनं ते सोनं ही मानसिकता जपणारे आहेत परंतू नव्याचा ध्यास आणि प्रसंगी हव्यास, अट्टाहास या मानवी स्वभावामुळे हे "भंगार" तयार होत राहणारं..... अन् भंगार विकून कुणीतरी श्रीमंत होणार आपण मात्र चाकरमानी राहून आम्ही बदलत्या काळासोबत स्वत:ला बदलतोय याचा फुकटचा अभिमान जपत राहणार.....
- प्रशांत दैठणकर 
9823199466



Monday, 14 May 2018

ना जाने इस शहर को हुवा क्या है.....!

औरंगाबाद का दिल यानेकी.....गुलमंडी..
शाळेचे ते दिवस मंतरलेले म्हणतात तसेच होते. नुसता शाळेचा फोटो दिसला तरी आपण लहान होवून पाठिवर दप्तर टाकत शाळेच्या दिशेने धावायला लागतो. त्यावेळी वर्गात सारा कल्ला करणारे, सतत काय बोलत होते असा सवाल आता या वयात पडतो.

काही प्रमाणात सिनेमा तर कधी क्रिकेट तर कधी ..... नाही आठवत आता पण त्यावेळी तोंडाची टकळी चालूच असे.

काल औरंगाबाद शहरात जातीय दंगल उसळली त्यावेळी कोणकोणत्या भागात गडबड झाली याची नावे वृत्तपत्रात वाचली. त्यात मोतीकारंजा हे नाव समोर आलं, माझी शाळा आठवली मला.

माझं पहिली ते तिसरी हे शिक्षण त्यावेळच्या नगरपालिकेच्या शाळेत झालं. रहायला दलालवाडी भागात बाजूने अखंड वाहणारा एक नाला आणि नाल्याच्या पलिकडे ज्याला आता न्यू गुलमंडी रोड म्हणतो त्याच्या दुसऱ्या बाजूला दोन मजली चाळवजा असणारी शाळा.

शाळेत जाताना त्या छोटयाशा गल्लीत डाव्या बाजूला बेकरी होती. बेकरीच्या जाळीवर नाक दाबून आत काय चालू आहे हे बघण्यात चांगला टाईमपास व्हायचा. माझा वर्ग पहिल्या मजल्यावर पायऱ्या चढल्या की तिथून नाल्यापलीकडे असणारं घर दिसायचं. पावसाळयात भरुन वाहणारा नाला अर्थात त्याचा पूर आम्हाला " महापूर " वाटे.

आज शिक्षकांची नावं आणि चेहरे आठवत नाहीत. मात्र तीनही वर्ष शाळेत पहिला नंबर पटकाविला त्यामुळे मिळणारा इतर विद्यार्थ्यांचा " जेलस " प्रतिसाद आणि शिक्षकांनी केलेलं कौतूक आठवतं. तिसरीत असताना वर्ग सुरु झाले आणि पावसाळा देखील या पावसाने आधीच जीर्ण झालेल्या शाळेच्या इमारतीचा एक भाग खचला त्यावेळी 'रिस्क' नको म्हणून नगरपालिकेने आमच्या अख्या शाळेची रवानगी मोती कारंजा मधल्या ऊर्दु शाळेत केली.

याच इमारतीच्या जागेवर ती ऊर्दू शाळा होती मोती कारंजात
माझ्या मुळ शाळेची दुरुस्ती होईपर्यंत जवळपास चार महिने मी मोती कारंजा भागातल्या शाळेत जात होतो. घरुन निघाल्यावर गुलमंडीला वळसा घालून अरुंद अशा दिवाण देवडीतून चालत- चालत, अगदी रमत गमत कोपऱ्यावरील मशीद ओलांडून मोती कारंजाची शाळा गाठायची. मध्येच त्या मशीदमधून होणाऱ्या अजानचा आवाज. औरंगाबादेत अजान हा प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनातील एक अविभाज्य घटक म्हणून समावेश करावा लागेल.

मोती कारंजा भागात जायला आणखी मार्ग होता अर्थात त्यासाठी नाला ओलांडून फकीरवाडी मार्गे जावे लागे. नाल्याला पाणी कमी असताना दगडावरुन उडया मारत नाला ओलांडायचा. त्याच्या समोरील बाजूस एक चुनाभट्टी होती, त्याचा गोल दगड चुना घोटत असतांना पाहणे तसेच चुन्याचा भला मोठा हौद हे आमचे कुतूहलाचे विषय होते.

त्याकाळी साधारण 40 वर्षांपूर्वी औरंगाबाद शहर खूप छोटे होते. मोठे खेडे म्हणता येईल इतके छोटे. हैदराबाद मुक्ती संग्रामानंतर भारतात सामिल झालेल्या औरंगाबादवर पूर्ण निजामी शैलीचे वर्चस्व कायम होते. घराला रंग देण्याची पध्दत नव्हती केवळ चुन्याची सफेदी केली जायची. आता सर्वांना आश्चर्य वाटेल पण त्यावेळी औरंगाबाद शहरात सकाळ-संध्याकाळ दोन वेळा धो-धो पाणी किमान दीड तास नळ सुरु असायचे. पाण्यावरुन भांडणं त्याकाळी नव्हती.

त्या वयात पडणारे प्रश्न साधारण वयाला साजेसेच होते. गुलमंडी हे शहराचे हृदयस्थान. या ठिकाणी फुलांची दुकाने होती त्यामुळे रुईतून त्यासाठीचा गुलमंडी शब्द प्रचलित झालेला. मोती कारंजा हा भाग कधी काळी येथे कारंजे (फाऊन्टन) असतील असे आम्हाला वाटायचे पण फकिरवाडीचा अर्थ लागत नव्हता. नाही म्हणायला गावात अनेक फकिरांचा वावर होता मात्र फकिरवाडीत एकही फकीर राहत नसे.

लहानपण ज्या गावाच्या कुशीत गेले त्या गावच्या साऱ्या गल्या आणि रस्ते खडा न खडा पाठ झाले आहेत. त्यामुळेच अशा भागात काही घटना घडली तर सहाजिकच आठवणी ताज्या होतात.

या शहरात 1986 साली झालेली दंगल बघितली. 1992 साली झालेल्या दंगलीचे प्रत्यक्ष वार्तांकन केलेले पण कालच्या या घटनेने मन ढवळून गेले. पुन्हा पुन्हा एक वाक्य कानावर यायला लागले.

ना जाने इस शहर को हुवा क्या है !

ना जाने ...... हुवा क्या है !

- प्रशांत दैठणकर
9823199466



          गणेशोत्सव हा आमच्यासाठी ख-या अर्थानं स्वर्णीम काळ असायचा वर्षातला. सातव्या-आठव्या वर्गात असताना कळायचं तसं किती, मात्र खरा आनंद ज्याला निर्भेळ आनंद म्हणता येईल असा आनंद त्याच वयात आणि गणेशोत्सवातच मिळायचा.
     सराफा बाजारचा गणपती शहरातला सर्वात श्रीमंत गणपती मात्र त्यावेळी त्या श्रीमंतीचं फारसं कौतुक नसायचं त्यावेळी शहर इतकं पसरलं नवहतं. सकाही आवर्जून मराठवाडा लोकविजय, अजिंठा आणि लोकमत बघायचा कारण आकर्षण होतं सिनेमाचं. समर्थनगर असो की स्नेहनगर कुठं आज सिनेमा आहे याची माहिती काढून ठेवायची.
     विश्‍वास नगर, नवीन वाटतं का नाव ?  हो विश्‍वास नगर , विश्‍वास पानीपतावर गेला तसा या भागाचं नावही गेलं. विश्‍वास नगर म्हणजे लेबर कॉलनी होय. त्याच प्रमाणे कोटला कॉलनी या शासकीय कर्मचा-यांच्या वसाहती, इथं आवर्जून सिनेमा दाखवला जायचा.
     मोठ्या पटांगणात बांधलेला पडदा. त्यावर सिनेमा सुरु व्हायचा आणि त्यासोबत गाणं सुरु व्हायचं `  गाडी बुला रही है , सिटी बजा रही है ` धर्मेंद्रचा चित्रपट ` दोस्त `  आणखी एक आवडता आणि वारंवार बघितलेला चित्रपट म्हणजे मनोज कुमारचा ` रोटी कपडा और मकान `  त्यातही गंमत डावखुरा अमिताभ पडद्याच्या दुस-या बाजूने उजवा असायचा आणि गर्दी पडद्याच्या दोन्ही बाजूनी रहायची.
     पडद्यावरच्या चित्रपट चालू आपण रस्त्यावर एखादं पोतं घेऊन त्यावर मांडी घालून बसायचं ... आपण असं रस्त्यावर बसलोय यात काही वाटायचं नाही त्या वयामध्ये. ब-याचदा पावसानं ओल्या मातीवर बसायचं ती ओल अंगभर पसरायची पण सिनेमाचं ते आकर्षण उठू देत नसे.
     अगदी भरपूर वेळा पाहिलेला आणखी एक चित्रपट म्हणजे ` आम्ही जातो आमच्या गावा ` त्यातला प्रत्येक प्रसंग स्मरणात राहिलेला आहे. त्याच काळात ` हाच मार्ग एकला `  तसेच `वहिनींच्या बांगड्या `   असे चित्रपटही औरंगाबादच्या रस्त्यांवर बसून पाहिलेत.
     आज कुंभारवाडा परिसर पूर्ण गजबजलाय. तिथून मुलांसोबत जाताना जूना गणेशोत्सव आठवतो त्यावेळी मुलांना मी सांगतो बेटा इथं रस्त्यावर बसून आम्ही सिनेमा बघायचो त्यावेळी त्यांची प्रतिक्रिया `  काय बाबा काही सांगता काय ?  अशी असते फेम, आणि पीव्हीआर मध्ये सिनेमा बघणा-यांनी अशी प्रतिक्रिया देणं सहाजिकच आहे.
     रस्त्यावरचा तो सिनेमा दाखवायचं काम माहिती कार्यालयाचे कर्मचारी करायचे. 2000 साली मी ज्यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मी औरंगाबाद येथे रुजू झालो त्यावेळी त्या माहिती कार्यालयाचा बॉस म्हणून मला प्रथम आठवण त्या रस्त्यावरच्या सिनेमाची झाली ..... काळाच्या ओघात बरच चित्र बदललं आहे पण स्मृतिचित्रातला रस्त्यावरचा सिनेमा आजही बघावा वाटतो.
औरंगाबादची ओळख.. दख्खन ताजमहल अर्थात बीबी का मकबरा

Friday, 11 May 2018

आयुष्यात चालताना--(१); क्षण जगलेले

फुरसतीचा काळ अर्थात सुटी किंवा शाळेच्या भाषेतील सुट्टी शाळेत असताना सुट्टीचं कोण ते कौतूक असायचं. तसा मी शाळेत आवडीने जाणारा विद्यार्थी रहायला औरंगाबादेतील टिळकपथ लगतच्या बढई गल्लीमध्ये आणि शाळा सरस्वती भूवन अर्थात आमची सर्वांची प्रेमाची एस. बी.

घर ते शाळा हे अंतर फारसं नव्हतं फार तर 300 मीटर. खर सांगतो याच्यासारखं सूख नसतं. शाळेत एक शिपाई तो नेपाळी होता, नाव नंदलाल. शाळेच्या घंटेचा आवाज आरामात घरापर्यंत यायचा . शाळेचा टोल म्हणजे काय तर इलेक्ट्रीक पोलचा साधारण दीड फूट लांबीचा तुकडा. त्यावर हातोडीने बडवायचं टण....टण....टण.... तालात सलग चढत समेवर जाऊन पुन्हा भैरवीपर्यंत मैफल असावी असे 52 टोल अथकपणे बडवणं ही खासियत.

यातील पहिला टण.... वाजताच घरुन धावत सुटायचं शेवटच्या टण... पुर्वी वर्गात दप्तर ऐकून एस.बी.च्या सुंदर अर्धचंद्रांकीत इमारती समोरच्या भव्य अशा प्रांगणात प्रार्थनेला हजर....

मधली सुटी याच्या उलट पहिल्या टोलाला, रेड्डी, स्टेडी-गो.... शेवटच्या ठोक्यापूर्वी घरात आई कुकरमधून गरमा गरम वाफाळता भात आणि त्यावर साधं तुरीचं वरण एका थाळीत द्यायची वरुन तुपाची हलकी धार..... खाणं कुठे तो पातळसा भात झटपट गिळायचा हात धुवून पुन्हा शाळेकडे धुम ठोकायची या ताज्या जेवणाच्या सवयीमुळे मी डबा किंवा टिफीन कधी कॅरी केला नाही.... सवयच लागली नाही. आजही या वयापर्यंत ही टिफीन संस्कृती माझ्या आयुष्यात शिरु शकली नाही याचं कारण कदाचित शाळेच्या रुटीन मध्ये असावं.

आमची शाळा अतिशय सुंदर परिसर विस्तीर्ण अशी मैदाने खेळायला भरपूर जागा आणि खेळण्यावर अटकाव नाही. मधली सुटी संपवून शाळेत आल्यावर बऱ्याचदा आम्ही थेट मैदानावर वर्गात 60-64 विद्यार्थी .... सारा गोंगाट त्यात एक दोन विद्यार्थी दिसले नाही. तर शिक्षकांनाही काळजी नाही त्यामुळे शाळेत मुक्त छंदात बालपण आणि शिक्षण याची आनंदयात्रा घडली.

नाही म्हणायला चौथ्या वर्गात शिष्यवृत्ती मिळालेली अन् शाळेतही सर्वप्रथम क्रमांक मिळवल्याने पाचव्या वर्गाच्या प्रारंभातच शाळेत सत्कार झाला . त्यात 3 गोष्टीची पुस्तक बक्षीस मिळाली होती. 'मेरीट' वाला म्हणून शिक्षकांची नजर असायची पण एखाद्या तासाभराची ' बुट्टी ' मारली तर ते Ignore देखील करायचे.

इतकी सुंदर शाळा , सुंदर वातावरण असल्यानं शाळा बुडवावी आणि घरी बसावं असं कधी वाटलं नाही. पाचवी ते दहावी एकही दिवस शाळा बुडवली नाही, याचा आज मनापासून अभिमान आहे. दोन प्रसंग त्यातल्या त्यात लक्षात आहेत. आठव्या वर्गात असताना शाळा दुरुस्तीमुळे प्राथमिक शाळेच्या बाजूला चाळवजा खोल्यांमध्ये आमचे वर्ग चालायचे त्यावेळचा प्रसंग. 

शहरात रात्रीपासून पावसाची झड लागलेली..... मुसळधार पाऊस पडतोय त्याही स्थितीत भिजत भिजत आस्मादीक शाळेत. तेथे एक दोन शिक्षक वगळता कुणीही नाही. आमचे एन.सी.सी.चे शिक्षक कलाल यांनी मला तसं येताना पाहून ओरडून थांबायला सांगितलं...... माझ्या वेडेपणाचा परिचय देत हातावर दोन छडया देवून 'भाग घरको' म्हणत घरी पिटाळलं होतं...

असाच एक प्रसंग पाचव्या वर्गात घडला होता. मधल्या सुटीत आलेल्या पावसाची मजा म्हणून आम्ही वर्गासमोरच्या वाळूत साचलेल्या पाण्याच्या तळयात पडणाऱ्या पावसाला साथ देत मस्त पैकी 'रेनडान्स' केला. भिजल्या आणि निथळणाऱ्या अंगांनी वर्गात जाताच आमचे पी.टी. शिक्षक काळे यांनी बाहेर जा असे फर्मावले. मी आणि माझा मित्र अविनाश दंडे वर्गाबाहेर. त्यानंतर काळे सरांनी ओणवं उभ करुन पाठीवर गुद्दे मारले.... ती त्यांची स्टाईल होती. त्या गुद्दयांचा आवाज खूप मोठा येत असे, आणि मार लागत नसे. त्यांचं ते कसबच....! मग आमची खाजगी दप्तरासह घरी....

एकूण काय शाळा एन्जॉय करायला शिकल्यामुळे सुटीची धमालही लूटता आली.

आज मागे वळून बघताना हे सारं काल- परवा जगलो की काय असं वाटतं.... याचाच अर्थ ते क्षण खऱ्या अर्थाने मनापासून जगलेले होते.

- प्रशांत दैठणकर

9823199466

Wednesday, 2 May 2018

जी ने को तो जी ते है सभीं .... !

आपण त्या सोबत रहा अथवा न रहा त्याची गती थांबत नाही, अर्थात काळ.. वर्तमान क्षणाक्षणाला एका विशिष्ट
गतीने भूतकाळात बदलत जात असतो.. या अर्थाने दर क्षणाला आपण आठवणींनीं समृध्द होत असतो.

बघता बघता पाचवा महिना लागला !

सकाळी सहज भिंतीवरल्या कॅलेन्डरवर नजर पडली आणि मनात हा विचार आला.

दिवस कसे जातात हे कळतच नाही.. !

यातला विनोद बाजूला सोडला तर त्यातलं सत्य आपणास मान्यच केलं पाहिजे अगदी काल रात्रीच आपण ' थर्टी फर्स्ट ' साजरा करुन नववर्षाच स्वागत केलं असं सकाळी वाटतं पण कॅलेन्डर काहीतरी वेगळं चित्र आणि वस्तुस्थिती दाखवत असतं.

मनाला सवाल पडतो की जगण्याच्या धावपळीत हा मधला काळ कुठे हरवला. आपण तो कसा जगलो. या मधल्या काळात काही उभारीचे तर काही नैराश्याचे ही क्षण आले. नैराश्याच्या क्षणात आपण स्वत:ला कसं गोळा केलं. धावताना काळाच्या वेगासवे रोज भावनांचा पसारा मांडलेला. हा पसारा कसा आवरला ... दाटून कंठ कधी कसा मी स्वत:चा सावरला . . . !

इंग्रजीत एक म्हण आहे.


Calander shows how the time passing.

your face shows how you pass the time.


काळ कसा जातोय हे कॅलेंडर दाखवते आणि तो काळ कसा घालवला हे तुमचा चेहरा दाखवतो.

जगण्याची धावपळ थांबत नसते. सामान्यजन यात व्यवस्थित जगता यावं म्हणून कदाचित श्रध्देचा आसरा घेत असतात. श्रध्देसाठी माणसानं देव बनवला की काय असं वाटायला लागतं.

अदम्य अशा आशेवर कालक्रमण करत जायचं असा काहीसा भाव भक्तीमागे तर नाही ना.

तंत्रज्ञान असो की गती जगात उगवणारी प्रत्येक नवी पहाट नवं आव्हान घेऊन येत असते. आव्हान असतं ते बदलत्या ऋतूचं, भावनांचं, तंत्राचं, अगदी महागाईचं देखील अशा या बदलत्या जगात जगण्याची उर्मी कायम रहावी यासाठी का उपयोग करीत असतील सामान्यजन आस्था आणि श्रध्देचा . . . आज नाही तर उद्या आयुष्यात काही ना काही चांगलं घडवेल तो परमेश्वर म्हणत त्याच्या पायावर नतमस्तक व्हायचं आणि आला दिवस ढकलायच.

मला मात्र श्रध्दा- आस्था फारसा नाहीत मी जगतो प्रेरणेवर . . तुझा चेहरा आणि तुझी आस हीच प्रेरणा . . . असा एक चेहरा प्रत्येकाच्या मनातही असतो का ? . . . तुला पाहिलं . . तू अबोल, अव्यक्त . . अनामिक पण प्रेरणा . .!

आवश्यक नाही की माझ्या मनात तुझ्याविषयी ज्या भावना आहेत त्या तुझ्याही मनात माझ्याविषयी असतील . . पण माझ्या भावना प्रामाणिक असतील तर माझ्या जगण्याची प्रेरणा तुला मानून मी नैराश्याकडे वळणार नाही याची खात्री असते मनात . . Platonic की काय म्हणतात ते प्रेम असच असावं.. मी काही जगात असा एकटा नाही
कुणीतरी अशा भावना व्यक्त करताना म्हटलय ना.

इक बूत बनांऊगा .. और पुजा करुंगा !

अर्थात प्रेमाचं विश्वच वेगळं असतं. आयुष्याचा संबंध प्रेमाशी आहे. भावनांचा संबंध प्रेमाशी आहे. त्याचा विवाह संस्थेशी संबध जोडण्याची चूक आपण करुन खूप मोठी गल्लत करतो ... एकपत्नित्वाचं काव्य रचून आपण आपल्या समाजात किती जणांचा भावनिक कोंडमारा करुन त्यांचं जीवन रुक्ष करतो याचा जमाखर्च कुणी कधी मांडलाय का !

देव माणसानं निर्माण केला स्वत:च्या मानसिक स्थैर्यासाठी आणि त्यासोबत समाजानं आपली गणितं मांडत जाळं विणलय.....राम आणि सीता यांचा आदर्श समाजानं जपला पाहिजे हेच खरं.....!

देव आणि आस्थेच्या पलिकडे जगताना आपण जगात सर्वात बुध्दीमान प्राणी म्हणून उत्क्रांत झालोय याची जाणीव ठेवत जगावं असं मला वाटतं.....!

अरे तुझा तर प्रेम विवाह ...... मग तू या वयात पुन्हा प्रेमात पडलास.....! एक आणखी सवाल प्रेमविवाह केला याचा अर्थ प्रेमाचा कॉपीराईट एकाला दिला असा आहे का ? ...... जग सूंदर आहे आणि मन जर निर्मळ आहे तर भावना जपणारं मन खऱ्या सौंदर्याला दाद देणं आणि प्रेमात पडणं थांबवूच शकत नाही.....! फक्त हिंमत लागते ती प्रेम व्यक्त करायला..... भावना मनमोकळेपणांन सांगायला......! प्रेम व्यक्तच करायचं नाही....अव्यक्तच रहायचं या समाजाच्या भिंतीच्या भितीने.....! नाही कारणं असं करणं भावनिक कोंडमारा..... त्यातुन नैराश्य आणि पुढे वैफल्य...... सारा नकारात्मक प्रवास घडवतं...... मला आनंद आहे माझ्या व्यक्त होण्याचा.....

कुछ तो लोग कहेंगे
लोगोंका काम है कहना....
!


कारण माझ्या बाबत काही मत देणारा हा समाज कुठे असतो माझ्या भावनांचा गुंता सोडवायला..... जग तुम्हाला दोन्ही बाजूंनी बोलायला मोकळं असतं.... सल्ले देणे हा स्वभाव आहे. समाजाचा अडचणीच्या प्रसंगी मोठयासोबत माझ्या भावना, आठवणी आणि फक्त माझी सावली असते.

माझ्या प्रामाणिक भावनांमधून प्रेरणा मिळाली पाहिजे. माझ्या आठवणी कदाचित बऱ्या अन् काही वाईट देखील. त्यांनाही मी प्रेरणा म्हणालं पाहिजे.... व्यक्त झालं पाहिजे....

आज जगलेला क्षण उद्याची आठवण म्हणून राहणार आहे. त्यामुळे प्रेम आणि त्याची प्रेरणा घेऊन मला जगायला आवडतं..... माझी प्रेरणा माझ्या डोळयासमोर येते....मनाचा थांग शोधायचा तर त्यासाठी मार्ग डोळयातून जातो. त्या तुझ्या गहिऱ्या डोळयात मनाचा थांग शोधायला मला आवडतं......कारण मला जगायला आवडतं..... प्रेम करायला आवडतं..... कारण तू आणि हे जग सुंदर आहे आणि जगात माझ्या सारखा मी एकच आहे.
  I am unique....!
मग मीच माझी प्रेरणा होतो पुढचा क्षण जगण्यासाठी........

- प्रशांत दैठणकर
9823199466


Wednesday, 25 April 2018

तो एक फोन....

 काल तिच्याशी फोनवर गप्पा झाल्या... गप्पा म्हणा की निव्वळ बोलणं होतं, काहीही म्हणता येईल. ती एक सांत्वना संदेश होता म्हणायला हरकत नाही.....  एकटं जगताना आपण एकाकी असू नये याची काळजी घेत जगणारा मी..... हो मी.   रोज नवा अंगरखा आणि चेहऱ्यावर बुरखा पांघरावा तसा चैतन्याचा मुखवटा घालून वावरत असताना कधी रुक्षपणा आला आयुष्यात कळलंच नाही.

भावनांच्या तुंबलेल्या डोहात तिचे ते शब्द म्हणजे पाण्यात दगड ठरले. अंतरंगात भावनांचे तरंग आणि त्यांची आंदोलने, त्या वर्तुळांनी एकमेकांवर आदळून निर्माण केलेली वर्तुळांची साखळी..... भावनांचा गुंता अधिकच गहिरा होत गेला.

एकटं जगणं तसं काही नवी गोष्ट नाही पण हे जगताना आपण खऱ्या अर्थाने जगतोय की काळ ढकलतोय असा सवाल आता माझ्या मनात यायला लागला होता. रोज हसरेपणाचा मुखवटा पांघरुन वावरताना आतला मुळ चेहरा किती बदलला हे कळायला मार्ग नव्हता तो चेहरा कधी तरी सकाळी आरशात स्वत:ला बघताना आणि काळजीपुर्वकरित्या न्याहाळताना जाणवे.

कधी काळी कॉलेजमधला पट्टीचा असा Music Lover. कोणत्याही गाण्यातील लकेर सुरु होताच गाणं ओळखणं, त्याचा गायक , संगीतकार आणि सिनेमा यांची माहिती गुगलपेक्षा अधिक वेगाने माझ्याकडून सर्व जण मिळवायचे नाही म्हणायला आजही ते कसब कमी झालेलं नाही. फक्त फरक इतकाच पडलाय की संगीत ऐकणं मी पूर्णपणे बंद केलय. मन प्रसन्न ठेवायला संगीत हे खूप मोठं साधन आहे असं मानलं जातं. त्यावर आधारित उपचारपध्दती देखील अस्तित्वात आहे. नैराश्यात अडकलेल्यांना जगण्याचं भान आणि जगण्याचं उमेद देण्याचं काम हे संगीत करतं असं म्हणतात.....आहे खरं आहे पण माझ्या बाबतीत मात्र वेगळाच अनुभव आताशा यायला लागला म्हणून मी संगीत ऐकणं थांबवलं.

संगीत हे भिंतीवर टांगलेल्या खुंटयांवर लटकलेल्या पिशवी सारखं असतं. प्रत्येक पिशवीत त्या त्या वयात जगलेल्या आठवणींची साठवण आहे. आठवणी हा अनमोल असा ठेवा असतो. इथंच तर खरी अडचण आहे.


आज वर्तमानात आपण कधी सहज हसत-खेळत विनोद करीत हलके-फुलके क्षण Enjoy करीत असतो आणि कानावर गाण्याची एखादी धून येते. ती त्याच क्षणी आपल्याला वर्तमानातून खुंटीवरल्या त्या पिशवीत कोंडलेल्या भूतकाळात घेऊन जाते.... आपली अवस्था मग त्रिशंकू सारखी..... शरीर वर्तमानात आणि मन भूतकाळात .... सारं त्रांगडं होवून बसतं..... म्हणून संगीत नको.

आजू बाजूला कुणी संगीत ऐकत असेल तरीही त्याचा त्रास होतो पण निसर्ग ... डोळे बंद करता येतात त्याप्रमाणे कान बंद करता येत नाहीत.

भुतकाळ आणि वर्तमानकाळ यांच्या या जीवघेण्या आंदोलनात उद्याची वाट विसरली असे वाटताना तिच्या अनपेक्षितपणे आलेला फोन खरोखर दिशादर्शी होता.

बऱ्याचदा आपण वर्तमानाचा खुलेपणाने स्विकार करीत नाही... मनाला काय त्याला स्वच्छंद विहरणं आवडतं. मनोविज्ञान सांगत एका मिनिटात या मनात 21 प्रकारचे विचार येत आणि जात असतात त्याला मनाची चंचलता म्हणतात. त्यावर नियंत्रण अर्थात ते देखील मनालाच ठेवायला लागतं....!


फोनवरचं बोलणं संपलं तोवर मनाचा डोह शांत झाला होता..... भावना वाहून जाणं, त्याचा वेळोवळी निचरा होणं आवश्यक असतं. प्रवाही पाण्यावर तरंग उठत नाहीत. ते खळखळाट करीत येईल त्या अडथळयाला पार करीत प्रसंगी कडया कपारींवरुन झेप घेत, पडण्याची पर्वा न करता तुषार उडवत धबधब्याच्या रुपानं पडतं आणि पुढच्या मार्गाला लागतं.

तिनं फोन कधी ठेवला आठवत नाही.....मला समोर काहीच दिसत नव्हतं, कानाचा मोबाईल घामानं आणि डोळे पाण्यानं चिंब.....! हा निचरा होत गेला. बराच वेळ एकटं बसून डोळयातून पाण्याच्या धारा वाहत गेल्या.......आता मात्र एकाकी वाटत नव्हतं....!


- प्रशांत दैठणकर

9823199466

Tuesday, 24 April 2018

दिवस पुस्तकांचा

 कामात गुंतत गेलं की जग विसरायला होते. बहुतप्रसंगी आपण विनाकारण व्यस्त होवून जातो. व्यस्त झाल्यावर व्यक्त होणं बंद होतं. काल सोशल नेटवर्कवर काल जागतिक पुस्तक दिनाची Post टाकताना मला जाणवलं की कामाच्या व्यापात आपलं लिखाण पुर्णच बंद झालाय.

व्यक्त व्हावं … मनातलं मांडावं यासाठी मी हा ब्लॉग सुरु केला होता पण हळू हळू लिखाण कमी होत गेलं आणि बंदच झालं. सरकारी लिखाणाशिवाय काही सूचत नाही, असं तर होत नाही. पण कामामुळे येणारा थकवा आणि मनातंल पानावर मांडायला लागणारा मूड यांचा मेळ बसत नाहीय. आपण लिहायचं ठरवतो आणि कुणीतरी व्यत्यय आणतं.. मात्र आज पुस्तक दिनी संकल्प की वाचनासोबत आपण लिहायचं देखील.

' र ' ला ' ट ' आणि ' ट ' ला ' प ' म्हणजे लिखाण असू नये त्याला काही निश्चित दिशा, शैली आणि शब्दसंग्रह व त्याचा वापर याची जोड दिली, म्हणजे लिखाण खुलायला लागतं. आपण मनापासून आणि प्रामाणिकपणाने भावना शब्दात मांडल्या तरच त्या इतरांना रुचतात असं असलं तरी लोकांना रुचेल यासाठी न लिहिता आत्मसंवाद म्हणून केलेले लिखाण उत्तम .

समाज माध्यमांमध्ये कट - पेस्ट चे प्राबल्य आहे. शर्विलकी वाढलीय आणि सर्वात खेदजनक म्हणजे प्रतिक्रियात्मक लिखाणाचं प्रमाण खूपच वाढलय असं जाणवंत . फेसबुक सारख्या माध्यमाने व्यक्त होणारे व्यासपीठ दिले आणि अभिव्यक्तीची त्सुनामी आली आता प्रश्न निर्माण झालाय ' दर्जा ' काय ? याचा आणि दर्जाहिनवृत्तीचे लिखाण त्यावर अधिक दिसते असं लिखाण वाचायला नको वाटतं. मूळ लिखाण कसं याच्या वादात मी जाणार नाही पण आताही शैलीत लिहून स्वत:ची ओळख निर्माण करणारे कमी झाले आहे.

कधी काळी फेसबुक वर मराठी लिखाण करा असा आग्रह मी धरला आणि त्या माध्यमात जवळपास सर्वच मराठी मुलुख आपल्या मायबोलीत लिहितोय हे बघून निश्चितपणे आनंद होतो.

 पुस्तक दिनी पुस्तकांची आठवण करताना अनेकांनी भावी पिढी वाचन करीत नाही असा सूर धरला आहे. याबाबत माझं स्वत:चं मत मात्र वेगळं आहे. नवी पिढी आपल्यापेक्षा अधिक जागृत आहे, जागरुक आहे फरक फक्त बदललेला तंत्रज्ञानाचा आहे. वाचन ती पिढी करते पण आता माध्यमं बदलली आहेत.

नव्या पिढीतील अनेकांचे ब्लॉगवरील लिखाण वाचताना जाणवंत की त्यांच्या लिखाणातही प्रगल्भता आहे. त्यांचे विचार देखील चांगले आहेत. मुळात व्यक्त होणं त्यांना कळतय आणि जमतय देखील.

चला अल्पसं चिंतन आवश्यकच होतं या ब्लॉगवर पुन्हा लवकर लवकर भेट होईल ही अपेक्षा.






- प्रशांत दैठणकर

9823199466

Monday, 21 August 2017

प्रेमाचं नाव... एक त्या प्रेमाचं गाव

मन किती वेडं म्हणावं...... त्या बहिणाबाईनी सांगितलय तेच खरं..... उभ्या पिकातल्या ढोराप्रमाणे पुन्हा पुन्हा एकाच दिशेला धावायला लागतं. ही ओढ नेमकी कशाची आणि ती आली कुठून..... कदाचित ते क्षण पूर्ण जगले किंवा कदाचित काही अपूरे पडले.....! कळत नाही, पण पण... हो पण मन त्या ठिकाणाहून कधी मागे वळत नाही.
बाहेर नभांच्या दाटीनं काळोख दाटून एव्हाना गडगडाट सुरु झाला अन् एक क्षणात मुसळधारांनी तो बरसायला लागला...... त्या पावसांच्या धारा धरणीकडे धाव घेत होत्या अन् त्या बरसत्या धारांना खिडकीत बसून बघताना मनातल्या भावनाचा प्रवास नेमका उलटा सुरु झालेला....., भावनांचं मळभ दाटून येतं....... भावना भरतीला येवून मनाच्या किनाऱ्यावर धडका मारत असतात. त्याचे तुषार अंगावर येत नाही अन् धारांमधून बरसणारा तो पाऊस देखील ओंजळीत थांबत नाही.....!

आयुष्य..... असच धो-धो बरसून गेलेले आणि ओंजळीतून निसटून गेलेले...... अशा निवांत क्षणी मग अचानक विचार ...... एक आगळाच कोलाहल होतो मनात.......कानात शब्द ते लहानपणीचे पिंगा घालू लागतात...... सहज मिटल्या पापण्यात मग ते बालपण स्पष्टपणे एखाद्या चित्रपटासारखं दिसायला लागतं........शांत ..... आणि निरागस......
अगदी नितळ पाणी कातळावरुन पसरत जाणारा एक झरा....... सारं स्पष्ट होत जातं. त्या निरागस क्षणात आपण होतो पण आसपास स्वार्थाचे चष्मे घालून आपल्याला हव्या त्या रंगांचे जग बघणाऱ्यांची गर्दी होती.......त्यावेळी जाणवलं नाही पण आज त्यानं कधी काळी संपलेल्या बालपणाला पुन्हा एक मोठा भूकंपासारखा हादरा बसतो.

प्रश्न....प्रश्न आणि प्रश्न..... मनात प्रश्नांचं एक अखंड असं रिंगण..... निरागस का होतो ? एवढा भावनाशील का होतो ? त्याही पलीकडे जाऊन पुढचा सवाल त्याच्या हातात हात घालून विचारतो. आजही तितकाच भावनाशील आणि संवेदनाक्षम . असा मी का आहे.....! कारण कदाचित हा मी असा आहे.... . चूकत असेल तर चुकू दे पण असं असणं काही गैर नाही...... मलाच धीर देणारं माझं मन.....! रिंगण वाढत असतं.

पावसाचा भर ओसरतो तसच काहीसं भावनांचं का होत नाही...... आसपास सारं स्वार्थी...... रुक्ष आणि कृत्रिम विश्व बघून का नाही वाटत की आपणही बदलावं स्वत:ला म्हणजे कदाचित वेदना कमी होतील....त्या वेदना उरात घेऊन जगताना क्षणभरही असा विचार मनाला शिवला नाही....... महत्वाचं काय बदल पण कशाचा...... स्वत:च्या प्रामाणिक भावनांमधला नाही शक्य म्हणत वेदनांना कुरवाळायचं.......! असं घडतं अधून मधून......पुन्हा त्याच इमारती दिसतात. कदाचित मनात चित्र कोरलं गेलय पुन्हा बालपणातले ते दिवस दिसतात..... कदाचित यातून मन बाहेरच पडलं नाही......अन् मग तो गंध....... हो तोच गंध तुझ्या
श्वासातून आसमंतात कस्तुरीची बरसात करणारा...... तो कसा येतो....... खेळ रे........ सारे मनाचे खेळ......!

तो गंधा-सुगंधाने भारलेला आठवणींचा डोलारा पाठलाग करत राहतो...... स्थान बदललं......वेळ अन् काळही बदलला......एव्हाना सारं सारं आठवणींच्या पडद्याआड जायला हरकत नव्हती..... पण असं होत नाही....!
तू पुन्हा वळतेस तुझ्या त्या सुंदर केसांच्या जाडजूड वेण्या पाठीवरुन गिरकी घेतात अन् खटयाळपणे उजव्या डोळयावर आकडा करणारी ती एक केसांची बट आणि तुझे शुभ्र डोळे चकाकतात......ओठ विलग होताना आतून मोत्यांची रास डोकावते..... तू हसत पुन्हा स्वागत करतेस अन् मी पुन्हा सारं...... सारं विसरुन तुझ्या प्रेमात तुझ्याच दिशेने नकळत चालायला लागतो...... नकळत.......

खिडकी बाहेर कडाडलेल्या विजेच्या आवाजासोबत झालेल्या शुभ्र लखलखाटाने आसमंत उजळून निघतो अन् जरासं मला माझ्या त्या धावण्यातून पुन्हा वर्तमानात हात खिडकी बाहेर सोडलेल्या स्थितीत मी बघत असतो..... हातावर पावसाचे थेंब नाचत....... नाचत निघून जातात.....
हात पावसात भिजला तरी मनाइतका चिंब झालेला नसतो..... पण..... याही वेळी तुझ्या आठवणीत माझा आजचाही पाऊस निघून गेलेला असतो..... निघून गेलेला असतो....... अगदी तुझ्या सोबतच काळाप्रमाणे.....!

- प्रशांत दैठणकर
9823199466

Friday, 18 August 2017

" स्माईल प्लीज .......! "

प्रत्येक व्यक्तीला विचारा कुणावर प्रेम आहे तुझं ? याचं उत्तर निरनिराळया पध्दतीचं असू शकतं आणि ते रंजक देखील असतं मात्र त्या पलिकडेही जाऊन एक वैश्विक सत्य आपण मानलं पाहिजे प्रत्येक व्यक्तीला स्वत:वर सर्वाधिक प्रेम असतं आणि ते अगदीच सहाजिक व नैसगिंक आहे.

सांग दर्पणा मी कशी दिसते......?

वयात आलेला तरुणीनेच नाही तर कोणत्याही वयातल्या स्त्री ने विचारलेला सवाल असतो. आपल्याला आवड असते ती आपण स्वत: कसे दिसतो याची. यातूनच दर्पणाची संकल्पना आली.

बाळ श्रीरामाने ज्यावेळी चंद्रजवळ जाण्याचा हट्ट धरला त्यावेळी मातेने हा बालहट्ट पुरविण्यासाठी पाण्यातलं प्रतिबिब दाखवलं असा दाखला आहे. यातूनच पुढे दर्पण अर्थात आरसा आला.


दर्पणात बघून समाधान हे क्षणीक मात्र त्याला दीर्घकाळ चालवायचं तर कसं मग यातून तसबीर रेखाटनं सुरु झालं.. जुन्या राजांच्या अशा भव्य तसबीरी आजही आपणास बघायला मिळतात.

आपल्या दृष्टीस जे दिसतं ते पकडून ठेवण्याचा हा छंद तसा जुना. पण याला नवा आयाम मिळाला तो छाया प्रकाश संयोगाला प्रतिबिंबीत करुन जतन करुन ठेवण्याच्या तंत्रामुळे अर्थात छायाचित्र यानेकी फोटोग्राफ शोधामुळे. छायाचित्र करण्यामागे रसायनांचा वापर झाला आणि पहिल छाया-प्रकाश चित्र सर्वांसमोर आलं तो दिवस मोठा क्रांतीकारी आणि कोटयवधींच्या व्यवसायाला जन्म देणारा ठरला. यातून त्याच प्रमाणात व्यवसायासोबत रोजगाराच्या संधीनिर्माण झाल्या. आणि स्वत:वर सर्वाधिक प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने याला आपल्या आयुष्यात मानाचं स्थान दिलं.

आयुष्यात जगलेल्या क्षणांच्या आठवणींची साठवण या चित्रात आपणास जमा करता यायला लागली. पहिल्या छाया-प्रकाश चित्राचा हा प्रवास छायाचित्रांपासून, चलतचित्र अर्थात चित्रपट व्यवसायाच्या रुपाने मनोरंजन उद्योगात आणि 21 व्या शतकात आता
डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात स्मार्टफोन च्या रुपानं प्रत्येकाच्या हातात आला.

यातून पुढे आलेल्या " सेल्फी " च्या संकल्पनेने या छायाचित्रणास खूप मोठया उंचीवर नेलं त्यासोबत स्वत:वर प्रेम करणारे काही दुदैवी जीव याच "सेल्फी "च्या नादापायी प्राण गमावत आहेत. असा संमिश्र प्रवास या काळात झाला.

या साऱ्यांची सुरुवात आजपासून 200 वर्षांपूर्वी झाली निलोफर निसे नावाच्या खटपटया संशोधकाने सिल्व्हर आयोडाईडच्या थर असणाऱ्या एका तांब्याच्या तुकडयावर आयोडीनची वाफ देऊन पहिली छाया प्रतिमा कैद केली. हे जगातलं पहिल छायाचित्र होतं.... आज 200 वर्षात यात प्रचंड क्रांती झाली आहे. निसेने नंतर 2 वर्षे अधिक मेहनत करुन हे तंत्रज्ञान यंत्राच्या रुपात एका लाकडी खोक्यात बंदीस्त करुन कोठेही नेता येईल अशी सोय केली हा जगातला पहिला कॅमेरा होता.

प्रत्येकाचं स्वत:वर असणारं प्रेम या कॅमेऱ्याला संशोधनाच्या रुपानं आजच्या अतीअद्ययावत अशा स्मार्टफोन कॅमेऱ्यापर्यत घेऊन आलं आणि या काळात 200 वर्षात छायाचित्रण, छायाचित्रकार अशी स्वतंत्र व्यवसाय श्रेणी त्यात वेगवेगळया प्रकारच्या संधी निर्माण करणारं ठरलं. औद्योगिक असो की निसर्ग छायाचित्रण किंवा वन्यजीव छायाचित्रण, मॉडेलिंग असो की खाद्यपदार्थ छायाचित्रण प्रत्येक क्षेत्रात यात एक "करिअर" म्हणून देखील उत्तम संधी निर्माण करणारं ठरलेल्या या छायाचित्रणाची सुरुवात झाली तो दिवस 19 ऑगस्ट अर्थात जागतिक दिन होय.

या छायाचित्राची क्रेझ किती असू शकते याचा अंदाज आपणास सोशल नेटवर्कींग मधून येवू शकतो. प्रत्येकजण ना-ना प्रकारचे छायाचित्र फेसबूक सारख्या साईटस्‍ टाकताना आपणास दिसेल. फेसबूक ही सर्वात लोकप्रिय नेटवर्कींग साईट असेल असं आपणास वाटत असेल तर ते चुक आहे. जगात सोशल नेटवर्कींगच्या ज्या साईटस् आहेत त्यात ' इन्स्टाग्राम ' सर्वात लोकप्रिय आहे. एप्रिल 2017 अखेर या साईटस् च्या एकूण फॉलोअर्स ची संख्या 700 दशलक्ष इतकी होती. फॉलोअर्सच्या बाबतीत ही साईट सर्वात अव्वल आहे.

' इन्स्टाग्राम ' हे तसं म्हटलं तर फेसबूकचं अपत्य आहे. मार्क झुकरबर्गने 2004 साली फेसबूकची सुरुवात केली त्यानंतर 2010 साली 6 ऑक्टोंबरला ' इन्स्टाग्राम ' अवतरलं पण आज ' इन्स्टा' आघाडीवर आहे. कारण लिहीण्यापेक्षा फोटो हे अधिक सशक्त्‍ माध्य्म आहे.

हजार शब्दाचा निबंध लिहिणे शक्य्‍ आहे पण त्याहीपेक्षा अधिक बोलण्याची ताकद एखाद्या छायाचित्रात असते. साधारणपणे छायाचित्राचं असणारं वेड आता कुठल्या थराला जाईल याबाबत भारतात बोलणं अवघडच आहे. अनेकदा अंत्ययात्रेला उपस्थिती असाही फोटो दिसतो. त्यावेळी जरा खरं वाटते पण याला पर्याय नाही. व्य्‍क्ती तितक्या प्रकृती आणि प्रवृत्ती बाकी काय .

समोरुन कुणी फोटो काढावा यासाठी दुसऱ्या कुणाचं असणं आवश्य्क नाही असा प्रकार अर्थातच ' सेल्फी ' आताचा हा काळ सेल्फीचा काळ तोंडाचा चंबू करुन सेल्फी काढल्या आणि माध्यमात ' व्हायरल ' केल्या जातात. आजची पिढी त्यामुळे 'फोटो क्रेझी' आहे असं म्हणायला हरकत नाही.

छाया-प्रकाशाचं रुप कैद करुन कायमस्वरुपी त्याला जतन करणे आणि हव्या त्या वेळी त्या क्षणाला पुन्हा जिवंत करणे ही छायाचित्राची ताकद त्या छायाचित्रण कलेला आणि समस्त छायाचित्रकारांना .......शुभेच्छा देताना...... स्माईल प्लीज...... अन् क्लीक.......!

-प्रशांत दैठणकर
9823199466

Tuesday, 15 August 2017

उदय नव्या महासत्तेचा......!


ज्याचा उल्लेख भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी आमावस्येच्या रात्री नियतीसोबत करार असा केला त्या आपल्या खंडप्राय देशाचा भाग्योदयाचा दिवस म्हणजे आपला स्वातंत्र्यदिन अर्थात 15 ऑगस्ट होय. त्यापासून चालत आपण आज याच स्वातंत्र्याचा 70 वा वर्धापनदिन साजरा करित आहोत. इतक्या वर्षात भारताने जो पल्ला गाठला तो खूपच कमी देशांना इतक्या छोटया कालावधीत गाठत आला आहे हे अभिमानाने सांगावं तितकं कमीच आहे.
या सत्तर वर्षांच्या कालावधीत पिढया बदलल्या आहेत मात्र आपण आजही काही बाबतीत आपल्या समाजाची मनोभुमिका बदलू शकलो नाहीत हे देखील आपणास यावेळी मान्य करावं लागेल.

भिन्न भाषिक प्रांतांमध्ये पसरलेला आणि अडीचशेहून अधिक संस्थांनांमध्ये विखूरलेला देश एकसंधपणे उभा करण्याचं आव्हान स्वातंत्र्याच्या क्षणी आपल्या देशासमोर होतं ते कणखरपणा दाखवत सरदार वल्लभभाई पटेल यांनी वास्तवात आणून दाखवलं. नंतरच्या काळात प्रगतीच्या टप्प्यात जी वाटचाल झाली त्यामागे फाळणीच्या जखमा घेऊनच आपण केली. मात्र आजही आपण त्या घटना विसरलो नाहीत हे देखील खरे आहे.

संघराज्य म्हणून देशाची ओळख प्रस्थापित करणारे संविधान अमंलात आणल्यानंतर खऱ्या अर्थाने आपल्या विकासाला दिशा मिळाली. पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून एकत्रित प्रयत्न झाले. या नंतरच्या काळात भाषावार प्रांतरचना आपण स्विकारली त्यानंतर आजपर्यंत अनेक ठिकाणी राज्या-राज्यात असणारे सिमा वाद आणि नद्यांचे पाणीवाटप याबाबत मोठी मतभिन्नता आपण बाळगत आलोय.

एक देश ....! एक कायदा....!
देशाला खऱ्या अर्थाने एकत्र जोडण्याचे काम गेल्या काही वर्षात झाले. याला मुख्यत्वे इतर देशांचा असणारा सहभाग देखील याला बळ देणारा होता. आंतरराष्ट्रीय पातळीवर इंटरनेटचा प्रसार झपाटयाने झाला. याच पार्श्वभूमीवर आपल्या देशाची वाटचाल अभूतपूर्व अशीच ठरली. या सायबर विश्वाने वास्तविक विश्वाच्या समांतर व्यवस्था निर्माण केली. त्याच चांगल्या बाजूची दुसरी बाजू अर्थात सायबर गुन्हेगारी देखील वाढीस लागली.

सायबर गुन्हेगारीला देशांच्या आंतरराष्ट्रीय सिमांचे बंधन नाही याची जाणीव ठेवत सायबर गुन्हेगारी रोखणारा कायदा आंतरराष्ट्रीय स्तरावर झाला हा पहिला कायदा होता. जो भारताचा भूभाग असून स्वतंत्र अस्तित्व जपणाऱ्या जम्मू आणि काश्मीर राज्यात एकाच वेळी लागू झाला.

काश्मीरमधील आजच्या स्थितीवर सोशल नेटवर्कच्या माध्यमातून भरभरुन अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पूर येतो. परंतु यापैकी किमान 90 टक्के जणांना नेमका प्रश्न काय आहे याची कल्पना आहे की नाही असा प्रश्न पडतो. कलम 370 आणि त्यामागची कारणं याचा अभ्यास किती जणांनी केलाय हा देखील एक संशोधनाचा विषय ठरावा.

यानंतर गेल्या महिन्यात जीएसटी अर्थात ' गुडस् ॲन्ड सर्व्हीसेस ' टॅक्स संपूर्ण देशात लागू झाला. खऱ्या अर्थाने एक देश एक कायदा ही संकल्पना अस्तित्वात आणण्याची कृती या निमित्ताने झाली. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर संपूर्ण देशाला एका सुत्रात बांधणारा कायदा म्हणजे जीएसटी असं माझं वैयक्तिक मत आहे.

विकसित देश आणि भारत यांची तटस्थपणे तुलना करताना जाणवतं की, विशिष्ट प्रसंगी येणारा राष्ट्रभक्तीचा पूर नंतर भाषा, प्रांत आणि धर्म व जातीच्या माध्यमातून आटून जातो. आपल्या राष्ट्रप्रेमात आपण सातत्य राखू शकत नाही. राजकारणात विकासाच्या विषयांना खोडा घालण्याचे काम केले जाते याचे भान आता नव्या पिढीत आले आहे. याचाच परिपाक देशाची सूत्रे अनेक वर्षांनी पूर्ण क्षमतेने एकाच पक्षाकडे देण्यात झाला आहे.

मतदानाचा दिवस सुटीचा दिवस मानणं ज्या दिवशी सर्वजण सोडतील त्या दिवशी प्रगतीचा मार्ग लवकर सापडतो आणि त्यातून विकास हा सर्वांचाच होणार आहे याचीही जाणीव नव्या पिढीत रुजली आहे याचाही आनंद आहे.

काळाची पावलं
काळाची पावलं नेमकी कोणत्या दिशेने जात आहेत याची माहिती घेऊन आपण काळाच्या पुढे वाटचाल करायला शिकलं पाहिजे. नव्या पिढीनं ते जाणलय. आज विमुद्रीकरण असो की, रोखरहीत अर्थव्यवस्था यात नवी पिढी अग्रेसर आहे ही देखील देशासाठी एक जमेची बाजू आहे.

याच वेळी काळाच्या प्रवाहात जुन्या पिढीने आपल्या धारणा बदलून किमान काळासोबत चाललं पाहिजे इतकी माफक अपेक्षा इथं व्यक्त करता येईल. आपण बदल स्विकारलाच पाहिजे अन्यथा आपण प्रवाहातून बाहेर फेकले जाऊ असे कळून घेण्याची आणि काळासोबत जुळवून घेण्याची वेळ आली आहे.

या निमित्तानं देशाला संगणकाची ओळख करुन देणाऱ्या पंतप्रधान राजीव गांधींची आठवण झाल्याशिवाय रहात नाही. त्यावेळी बँकांमधील कर्मचाऱ्यांनी संगणकावर काम करण्यास नकार दिला होता. अमेरिकेने चांद्रयानाव्दारे नील आर्मस्ट्राँगला चंद्रावर उतरवलं त्यावेळी वापरल्या गेलेल्या संगणकाच्या एकूण क्षमतेच्या सहापट अधिक क्षमता असणारे मोबाईल फोन आजची पिढी वापरत आहे हे वास्तव आहे. संगणकावर काम करण्यामुळे कामात आलेली गतीमानता हे प्रगतीचं पहिलं लक्षण आहे.

श्रीमद् भगवदगिता सांगते 'परिवर्तन ही संसार का नियम है '' गेल्या 70 वर्षांमध्ये याची प्रचिती आली . नव्याचा स्वीकार केला गेला त्यामुळे आज आपला हा भारत देश नवी महासत्ता म्हणून उदयाच्या मार्गावर आहे. एक राष्ट्रप्रेमी भारतीय या नात्याने प्रत्येकाने या विकासात आपापला वाटा उचलला तर हे स्वप्न वास्तवात यायला वेळ लागणार नाही.

स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा !

- प्रशांत दैठणकर
9823199466

Thursday, 27 July 2017

...... Happy Wala श्रावण आला !

आला आला श्रावण आला..... श्रावणाची सर्वांनाच आस असते. सण-उत्सवांची परंपरा असणा-या या देशात श्रावणाचं आगमन ही सणांची मालिका सुरु करणारा महिना आहे. श्रावणापासून सुरु झालेली ही सण उत्सवांची मालिका थेट दसरा दिवाळीपर्यंत जाणारी अशी आहे. हा श्रावण जसा सणांचा तसा कवितांचा देखील असतो.



श्रावण मासी हर्ष मानसी ..... हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणात येती सरसर शिरवे....... क्षणात फिरुन ऊन पडे


इतक्या मोजक्या शब्दात श्रावणाचा परिचय सहज होतो. श्रावण महिन्यात धरतींच रुपडं पूर्ण बदललेलं असतं. सर्व ठिकाणी आलेल्या हिरवळीने सृष्टी हिरवा शालू अंगावर घेऊन सजल्याचे चित्र आपणास दिसते.

डोंगरमाथ्यावर जमा झालेला पाऊस उतरणीला निघतो तेव्हा छोटेछोटे ओढे खळखळ करायला लागतात हे ओढे मग खाली धाव घेताना धबधब्याच्या रुपात उडी घेताना आपणास दिसतात त्यांच सूख आणि समाधान वेगळंच असतं.तृषार्थ धरतीला जशी पावसाची ओढ असते तशी ती इथल्या प्रत्येक सजिवाला असते.


स्थिरावलेल्या पाऊस आणि पेरण्यांचा काळ संपलेला अशा स्थितीत अपत्य संगोपन करावं तसं शेतकरी आपल्या शेतात मोती पिकवावे तसे पीक घेतो त्या पिकाची काळजी घेण्यात शेतकरी व्यस्त असतो.रानामधून पिकांच निंदण करताना गाणं गायचं तर काही भागात धानाची लावणी अर्थात रोवणी सुरु असलेली आपणास दिसते मात्र एव्हाना सा-या पेरण्या संपून शेतीच्या संगोपनाला श्रावणात सुरुवात होते.

आपल्या देशात कवितांचा पाऊस हा एक आगळाच प्रकार ..... या कवितांमधून पावसाच्या वर्णना ऐवजी खरोखर पाऊसच पडला तरी कधीच दुष्काळ पडायचा नाही ...... प्रत्येक जण आपापल्या पध्दतींन पावसाला शब्दात झेलायच्या प्रयत्न करताना आपणास दिसेल.काहिशी अपघातांची किनार दुदैवाने असली तरी पावसाळी पर्यटन, युवकांनी पावसाळी ट्रेक यांच्या माध्यमातून
पाऊस अंगावर घेत चिंब भिजत निसर्गाच्या बहरल्या रुपाचा आनंद घेण्याचाहा काळ , आताशा ' सेल्फी ' च्या वेडाने भारलेली तरुणाई याच 'सिझन ' ची वाट बघताना दिसते. आपापल्या नजरेतून दिसणांर निसर्गाचं सौदर्य छायाचित्रबध्द करण्याच्या हा श्रावण

महाराष्ट्रात श्रावणात दिवस निहाय घराघरात सांस्कृतिक जलसा बघायला मिळतो.गृहिणी यात अग्रेसर नवविवाहित तरुणीपासून सर्वच स्त्रियांनी जागवयाची मंगळागौर असो की श्रावणी सोमवार अथवा श्रावणी शनिवार सारं कसं उत्सवाचं वातावरण .

सणांची महती वेगळीच असते. नाग हा शेतक-याचा मित्र मानला जातो. लाखमोलाचं धनधान्य पिकलं तरी ती नष्ट करण्याचं काम उंदीर करतात या उंदरांवर जालिम उपाय अर्थात साप. या प्राण्याप्रति आपलं ऋण नागपंचमीच्या रुपाने व्यक्त केलं जातं.

भावबहिणीचं नातं हा आगळाच-बंध..... या नात्याला उत्सवी रुपात पौर्णिमेला साजरं केलं जातं. भावाच्या हाती रेशम धागाची राखी बांधून बहिणीने आपल्या रक्षणाचं वचन भावाकडून घ्यायचं असा हा सण. हल्लीच्या चौकोनी आणि खास करुन त्रिकोणी कुटुंबाला याचं महत्व असतं तरी अपरिहार्यपणे नातं Miss केलं याची अनुभूती यातून येते.

या पौर्णिमेला कोळी बांधव नारळी पौर्णिमा साजरी करतात. पावसाळयाच्या आरंभी समुद्र खवळलेला असतो त्यामुळे होडया बंदरात आणल्या जातात या खेरीज हा काळ माशांच्या प्रजननाच्या कालावधी असतो त्यामुळे मासेमारी केली जात नाही.
या बंद झालेल्या मासेमारीला पौणिमेच्या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करीत विधिवत पूजेसह पुन्हा एकदा होडया सागरात सोडून मासेमारीला सुरुवात या दिवशी होते.


श्रावणातील उत्सवाची हा परंपरा श्रावणी आमावस्येला पिठोरी पोळा अर्थात बैलपोळा सणाने होते. काही भागात याला बैदूर असेही म्हणतात. आज यंत्राच्या सहाय्याने शेती केली जात असली तरी परंपरागतपणे बैलांचा शेतीसाठी वापर आपल्या देशात होत आलेला आहे.

बैलांना रंगवून सजावट करणे व त्याला वाजत गाजत गावात मिरवणे यांच्या जोडीला शेतीच्या कामात राबणा-या या मुक्या जिवाला एक दिवस सुटी देणे या सणातून साधले जाते. महाराष्ट्रीय परंपरेनुसार घराघरात खास पुरणपोळीचा बेत या निमित्त बघायला मिळतो.

श्रावण्‍ असा हा आला की सण-उत्सवांची मालिका घेऊनी आला.....असं म्हणत नव्या पिढीच्या भाषेत म्हणता येईल Happy श्रावण.....!.

- प्रशांत दैठणकर
9823199466