Friday, 9 August 2019

मेरे नयना सावन भादो ..... !

श्रावण... विविध रंगी श्रावण...कधी बावरा तर कधी तो गहिरा मस्त धुंद पावसाचा काळ, धुक्याची दाट दुलई घेतली आणि हिरवाईचा शालू ल्यायलेली वसुंधरा...
श्रावण असा महिना असा काळ प्रेमिकांना साद न देता शांत कसा राहिल...? अ्शा या काळात तर याला अधिक भर येत असतो...

प्रेमकुजन तसं पावसाच्या येण्यासोबतच सुरु होतं आषाढात धरती आपलं रुप पालटते आणि श्रावणात ती भरास येते... उधाणास आलेला समुद्र किनाऱ्यावर येऊन वसुंधरेला किती आपल्यात सामावून घेईल असं वाटतं त्याचा तो उताविळपणा श्रावणात सर्वाधिक. लाटामागून लाटा येत राहतात आणि पावसासोबत धरतीला तो सागरही सतत भिजवण्यात धन्यता मानतो... त्याच्या उदरातून मेघांमार्फत पाडलेलं पावसाचं दान लवकर मला परत कर .. असं काहीसं तो जणू तिला सांगत असावा.

ग्रीष्मानं पोळलेली धरती सुखावते... मग आपलं खरं रुप दाखवायला सुरुवात करते...
सुर्याच्या दाहकतेने पोळले-वाळलेले डोंगर कोरडे झालेले... पावसाचा प्रत्येक थेंब आशा होवून धरतीत सामावतो आणि निष्पर्ण होवून सूर्याला शरण गेलेले तृण जमिनीतून नव्याने कोंब होवून बाहेर येतात... जीवनाचं एक वर्तुळ पूर्ण होवून नवनिर्मितीचा क्षण सुखदायी भासतो... आनंददायी असतो.

त्याच्या वरसण्यात विविध प्रकारचे नात असतात... त्याची गती आणि लय वेगळी असते, पावसाचे थेंब हातावर झेलताना त्याला तिची आणि तिला त्याची आठवण... सारं भारुन टाकणारं असतं मंतरलेलं असतं... वळचणीला हातावर थेंब झोलताना त्याची आठवण आली की लगेच अंगणात जाऊन उभं रहायचं... चिंब भिजण्यासाठी ....त्याच्याही अंगणात पडत असेल हाच पाऊस म्हणत... तितकीच जवळीक साधण्याची संधी..

पावसाचं येणं सुरु करतं त्या आठवणींच्या पावसाला...जगलेला
क्षणांचा तो आठव झरा होवू पाझरायला लागतो आणि अचानक त्याचं रुपांतर धबधब्यात होतं... कस...?  काय..? याला उत्तर नसतं... काही प्रश्न असे असतात की त्याचं उत्तर आपण शोधायचं नसतं तर काही उत्तरं शब्दांच्या पलिकडली असतात. काहींची उकल स्पर्शातून तर काहींंची रंग आणि गंधातूनही होत असते.... काही प्र्श्नांची उत्तर आपण नकळत आपल्या नजरेतून देतो.. ‍Rather आपल्यालाही फसवून ती नजरेतून चोरली जातात ..

ते क्षण.... कमीच पडतात आठवणीत तो भिजण्यातला आनंद शरिराला ओलं करत असला तरी विरहात हा पाऊस आतल्या मनात असणारा कोरडेपणा संपवू शकत नाही... मन कोरडंच रहातं... कोरडंच रहातं... ही भावना तशी थोड्याफार फरकाने आपण कधी ना कधी अनुभवलेली असते. अर्थात त्यासाठी प्रेमात पडणं जरुरी असतं हे काही वेगळं सांगायला नको....!

मेरे नयना... सावनभादो...

फिर भी मेरा मन प्यासा...!

श्रावण असा काहिसा... न कळलेला...
पण मनापासून भावलेला... मनामनात जपलेला..

प्रशांत दैठणकर

9823199466

Friday, 2 August 2019

धकधक करने लगा

दहावी असो की बारावी अगदी साधी घटक चाचणी.. त्यात आज निकाल आहे असे ज्यावेळी सांगण्यात येते त्यावेळी पोटात गोळा येतो हे नक्की. कितीही हुशार मुलगा किंवा मुलगी असो पोटातला गोळा ठरलेला. उलट जितका हुशार तितका मोठा गोळा येणार हे सांगायलाच नको. आणि हा गोळा त्या मेरी गो राऊंड मधून खाली येताना जितका येतो त्यापेक्षाही मोठा असतो. हा सार्वत्रिक असा अनुभव आहे हे वेगळं सांगायला नको. शाळा झाली आता मुलं देखील मोठी झाली या वयाच्या चाळीशीनंतरच्या काळात असा अनुभव परत येणार आहे का..? याचं उत्तर हो असं आहे... आता विचाराल की ते कसं काय हो...?

चाळीशी नंतर आरोग्याच्या समस्या डोकं वर काढायला लागतात. वयाची धुंदी कमी होवू आपण स्थिरावतो त्यावेळी साधा होणारा पाणीबदल देखील त्रास द्य़ायला पुरेसा असतो. तारूण्यात असणारी ती धडाडी कमी होते. त्या काळात पाऊस बरसतोय याचा आनंद घ्यायला मुद्दाम बाइक घेऊन पावसात बाहेर पडणारे आता साध्या पावसाच्या आनंदाकडे वेगळ्या नजरेने पाहतात. या पावसात भिजलं तर होणारी सर्दी आणि पुढच्या आजारांचं चित्र नजरेसमोर येत असतं..

शरिराची गाडी उताराला लागण्याचा हा काळ.
यात जरा आजारपण आलं तर दवाखान्यात जावं लागतं डॉक्टर मग रक्त तपासा असं सांगतात आणि आपल्या चकरा तपासणीकडे सुरू होतात. Fasting आणि Post Meal तपासणी करायची असते. सोबतच किडनी आणि लिव्हर यांची ही फंक्शन टेस्ट सोबत सांगितलेली असते... साधारण दोन तासांनी नाश्ता करुन पुन्हा एकदा लॅब गाठणे आणि तीच प्रक्रिया .. रिपोर्ट कधी येणार तर ते सायंकाळी येणार असतात तो कागद काय लिहून हातात पडेल याची चिंता सुरु होते.

धकधक करने लगा मोरा जियरा डरने लगा... अशी काहीशी ती अवस्था आपली होऊन जाते.. आणि तो कागद हातात घेताना पोटात चांगलाच गोळा येतो.. This Very Normal बरं...
हा मुळात मानवी स्वभावच आहे.

वर्तमानात जगताना त्या भविष्यात काय़ आहे याची उत्सुकता सा-यांनाच असते तो निसर्ग नियम आहे. त्याला सोप्या भाषेत भविष्यात काय मांडून ठेवलय माहिती नाही असंही म्हणता येईल.. अनामिकाची ओढ असंही याला सांगता येईल त्यात आपल्या अपेक्षांप्रमाणे निकाल येण्याची खात्री नसल्याने हा पोटात गोळा येण्याचा प्रकार होत असतो. आणि नेमकी मनाची हीच कमजोरी हा अनेकांचा पोटापाण्याचा व्यवसाय झाला आहे Rather आजचं युग याचाच फायदा घेताना सगळीकडे आपणास दिसेल.

आपली सकाळ कशी सुरू होते.. ? जरा आठवा साधारणपणे सर्व चॅनेल आपला दिवस राशी भविष्याने सुरू करुन देतात.. हो की नाही. चांगलं घडण्याची आशा सा-यांनाच आहे त्यात आपला वाटा उचलून या चॅनल्सनी किमान दिवसाची सुरूवात तर चांगली करून दिलेली असते ही जमेची बाजू.. जे घडायचं ते घडणारच असतं ते घडतं मात्र आपण आशेचा किरण शोधत असतो प्रत्येक क्षणी हे खरं... माझी आई एक मराठीत असणारी म्हण नेहमी सांगत असे... आशाय.केशनाशाय...

आशा आहे म्हणूनच जगण्यात आनंद आहे असे सांगणारे काही कमी नाहीत बरं.
उम्मीद पर दुनिया कायम है असं म्हणतात ते यासाठीच. मात्र याबाबत माझं मत नेमकं उलट आहे. आलं ते स्वीकारणारा माणूस जगात अधिक सुखात जगतो त्यामुळे मला ते आवडतं.. कदाचित आईच्या विचारांचा प्रभाव माझ्यावर आजही असेल पण माझ्या दृष्टीने तीच वास्तविकता आहे. आपण डोळे उघडे ठेऊन जगतो असं असलं तरी आपण सजग असत नाही . वास्तव आपण सतत नाकारायचा प्रयत्न करतो... रात्री रंगवलेली स्वप्ने वास्तवात येतील या आशेवर आपण जगतो.

या जगात यश मिळवायचे असेल तर आपण उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघावीत आणि त्याला सत्यात आणण्याचे अहोरात्र प्रयत्न करावेत असे अपेक्षित आहे.. आपण उलटा प्रवास करतोय.. जगताना कठीण प्रसंग येणारच.. त्याचा आपण किती संधी म्हणून वापर करतो यावर यशाचा मार्ग असतो... सतत चांगलं घडण्याची अपेक्षाच मुळात चुकीची आहे. 24 तासांच्या आपल्या दिवसात अर्धी रात्र असते आणि अर्धा दिवस असतो.. आणि आपण काही अंटार्टीकवर राहत नाही हे समजून घेतले
पाहिजे.

वयानुसार होणारे बदल हा निसर्ग नियम आणि तो आपणाला दर क्षणाला म्हातारं करणारा न ठरता तो प्रगल्भ करणारा ठरला तर अधिक उत्तम.



प्रशांत दैठणकर

9823199466

Tuesday, 30 July 2019

#Happywala BirthDay...

आला आला म्हणताना तो आता दाराशी आलाय.. हो श्रावण येवू घातला आहे. कालीदासाने आपल्या मेघदूतम् मध्ये आषाढस्य प्रथम दिवसे असं लिहीलं होतं ..
आता चर्चा आहे ती आषाढस्य अंतिम दिवसे ची.  मला आठवणींची साठवणं खुली झालीय असे वाटते.. कारण देखील तसंच आहे.. आषाढ संपताना श्रावणाच्या पहिल्या प्रहरात वेदांतचा जन्म झाला... त्या क्षणाची आठवण अगदीच ताजी आहे आणि आज वेदांतचा 16 वा वाढदिवस आहे.. तारीख 30 जुलै ...

आठवणी अशाच पाठलाग करीत राहतात. ते कॉलेजचे दिवस माझे आणि आता वेदांतने कॉलेजला प्रवेश घेतला आहे.. काळ किती झपाट्याने जातो हे आपणास कळतच नाही... या सर्व प्रवासात एक खंत कायम मनात असते की मी कुटुंबासाठी वेळ देऊ शकलेलो नाही.. This is Life हे याच सबळ कारण असू शकत नाही. आपण नेमकं कशामागे धावत आलो असे कधी कधी वाटतं..

बालपण आणि त्यातला निरागसपणा आणि त्यातून पालकांना मिळणारा निखळ असा आनंद.. कादंबरीच्या पानावर वाचलेल्या त्या शब्दांप्रमाणे भासायला लागतात. .. हे निराशेची भावना नाही हे आवर्जून लिहायला पाहिजे या ठिकाणी.

आयुष्यात असतं काही आणखी.. फक्त पैसा कमावणं हे आयुष्य आहे का.. ?

विचार सुरू राहतात आणि त्यासोबत मुड बदलत जातो. घर आणि ते वाट बघणारं घराचं दार खुणावतं आणि रिकाम्या वेळात त्याचा विचार अधिक गहिरा होत असतो. त्या एकटेपणानं बरंच काही शिकवलय आणि आजही मी शिकतच आहे. एकटा असलो तरी
एकाकी पडायचं नाही हे मनाला बजावत जगणं सुरू राहतं.. सकाळी झोपेतून उठल्यावर मागील पानावरून आयुष्य पुढे चालू करताना अनेकदा खूप वेदना जाणवतात मनाला.

एकटेपणानं गाणे आणि संगीत यांची साथ सुटली .. गाण्याची कोणती लकेर एखादा नाजूक आठवणीचा दोर खेचेल आणि आपणाला वर्तमानातून कुठेतरी भूतकाळात घेऊन जाईल याची खात्री नसल्याने गाणं सुटलं तरी कानावर येणारे सूर रोखता येत नाहीत. किमान डोळे बंद करता येतात मात्र कान बंद करता येत नाहीत ना...

संगीत.. शब्द .. सूर.. ताल आणि खूप काही असणारं संगीत. कधी काळी टोळ्यांमधून स्थिरावलेला मानव नंतरच्या काळात व्यक्त व्हायला शिकण्याचा प्रयत्न करु लागला. त्याचा या व्यक्त होण्याच्या प्रक्रियेत अनेक पाडाव आले आणि प्रत्येक वळणावर एका कलेचा शोध लागत गेला. त्याची वाटचाल आता कला प्रांतात होत होती यात सुमारे 64 कलांचा शोध मानवाला लागला त्यात सर्वात महत्वाची कला म्हणजे संगीत होय.

संगीत आयुष्यात सर्वस्व आहे असं मानणारे अनेक आहेत.
त्याखेरीज दिवस सुरू होत नाही आणि संपत देखील नाही असं जीवन जगणारे आपल्या आसपास दिसतात. खरच संगीत इतकं मह्त्वाचं आहे का असाही वाद घालत येईल.. माझं विचाराल तर मी संगीत न आवडणा-या गटात आहे. त्याला काही कारणं आहेत मात्र संगीत आयुष्यात आवश्यक आहे असे म्हणणा-यांना मी विरोध करीत नाही कारण ती त्यांची आवड आहे.

मला संगीत कधी काळी आवडत होतं मात्र आता एकटं रहायची सवय लागली असल्याने मी संगीत ऐकणे टाळतो. कारण संथ शांत तलावात दगड भिरकावल्यानंतर जसे तरंग उठतात आणि नंतर त्या तरंगांची आंदोलनं सुरु होतात आणि सारं पाणी ढवळल्या जातं तसं काहीसं या संगीत ऐकण्यामुळे होत असल्याने मी तो टाळतो ही वस्तुस्थिती आहे..
किमान माझ्या बाबतीत तर असं होतं.. माझ्या या मताला अनेक जण दुजोरा देतील याची मला खात्री आहे.

आपण चालत रहायचं न थकता

आपणच आपली समजूत काढत

आणि मनोरंजनही करायचं

आहे ते आपलं चांगल म्हणत

आला दिवस जगण्यासाठी

घडतय ते चांगल्यासाठीच म्हणायचं

स्वप्नांना मुरड घालायची त्या

आपल्याला पडलीच नाही समजून

बाकी आहे जगायचं अजून खूप..

बघायचं आहे जग अजून खूप...

प्रशांत दैठणकर

982319466

Tuesday, 25 June 2019

निस्ताच टैम्पास......


आजकाल आपण काय करतो असं विचारलं तर एकच सांगता येईल आजकाल आपणाकडे अधिकाधिक जण Time pass करतो.. यह मै नही कहता तर सारी आकडेवारी तेच दाखवत आहे. Candy Crush नावाचा एक मोबाईल गेम माझ्याकडे आहे. आज फारा दिवसांनी काही रिकामा वेळ होता म्हणून गेम खेळायला लागलो आणि मोठ्या मुष्किलीने त्याची एक लेव्हल पार केली आणि पुढची स्क्रीन पाहून धक्काच बसला.. यात रविवार ते रविवार लेव्हलचे आकडे येतात.. एक महिला आठच दिवसात 457
लेव्हल पार करून आघाडीवर असल्याचं तिथं दिसलं... इतका रिकामा वेळ असतो का लोकांकडे असा सवाल मनात आला. तसं रिकामा वेळ असणा-यांची आपल्याकडे कमतरताच नाही हे जाणवलं...

ये देश है वीर जवानोंका....

असं गाणं लहानपणी ऐकलं होतं आता ये देश है मोबाईलवालोंका अन् टैमपास करने वालोंका असं क्षणभर वाटलं... त्यातच आज एका वृत्तपत्रात उसंडू अर्थात उपसंपादकाची एक डुलकी वाचण्या आली आजचे भविष्य लिहिताना टायपिंगच्या चुकीने वेळेचा दुरूपयोग करा असं छापून आलय... लो कल्लो बात..

आपल्या देशात सर्वाधिक वेळ हा निवडणुकांच्या चर्चेत जातो असा एक अनूभव आहे आणि ग्रामीण भागात तर तो सा-यांचा आवडता छंद आहे असंही म्हणायला काही हरकत नाही. ग्रामीण भागात आधी चावडीवर गप्पा चालत असत... आता गाव तिथं एसटी आल्यानं गप्पांची जागा बदलून ती आता एसटीच्या स्टॅंडवर सरकली आहे. त्यात मोबाईल तंत्रज्ञानाच्या विकासाने आता सा-यांना ई-चावडी आता खुली केली आहे. मोबाईलच्या मदतीने सकाळी
रांगोळी काढणारे हात आता मोबाईलच्या पॅटर्न लॉक आधी उघडतात आणि दिवस नंतर सुरू होतो असा अनुभव येत आहे.

Whatsapp वर सकाळी संदेशांचा रतीब सुरू होतो तो रात्री झोपेपर्यंत चालू राहतो. यातील अधिक संदेश न वाचताच पुढे ढकललेले आपणास दिसतील. ज्याचा जसा Net pack तसा त्याचा वापर कमी अधिक होताना दिसत होता मात्र आता 4G Technology आल्यानंतर ते बंधनही राहिलेले आपणास दिसत नाही त्यात भरीस भर म्हणून आता TikTok धुमाकूळ घालताना दिसत आहे. यात चित्रविचित्र क्लीप बनवायच्या आणि त्या Forward करायची याची स्पर्धा आपण बघत आहोत. याचं Fad इतकं वाढलं की यावर बंदी आणण्याबाबत विचार व्हावा असं मत न्यायालयानं व्यक्त केलं आहे.

या सर्व माध्यमांचा वापर आपण सर्जनशीलतेसाठी केला तर ते समजण्यासारखं आहे मात्र यातून सामाजिक तेढ निर्माण झाल्याचे देखील काही प्रकार घडले आहेत फेसबूक सारख्या माध्यमाच्या गैरवापराने काही ठिकाणी दंगलीच्या घटनादेखील घडल्या हा प्रकार अतिशय गंभीरच म्हणावा असा आहे. व्यक्त होण्यासाठीचे कोणतेही साधन हे दुधारी तलवारीसारखे असते त्याचा वापर करण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत हे नक्की. आपण इतके रिकामटेकडे आहोत का याचा देखील आपण विचार या निमित्तानं करणं गरजेचं आहे.

आपली युवाशक्ती सकारात्मक कामात वापरली गेली तर खुप काही बदल आपण घडवू शकतो यावर आपला विश्वास असायलाच हवा.

रिकामपण लाभत नाही अशांच्या रांगेत
आपण बसावं तर तिथं देखील हे मेसेजवीर बसू देत नाहीत. त्यांच्या पोश्टी आणि त्यातल्या गोष्टी कधीच संपत नाहीत ही स्थिती आहे. त्यातही नको त्या व्हिडीओ टाकणा-यांनी आणलेला तो वैताग वेगळाच. कधी कधी तर वाटतं की मोबाईल आपल्यासाठी आहे की आपण मोबाईलसाठी.

हातात जग आलय हे खरं परंतु त्याचा चांगला फेरफटका घेण्यापेक्षा YOUTUBE वर वेळ घालवणारे सर्वाधिक दिसतात. तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा हा अखेर ज्याचा त्याचा सवाल आहे मात्र त्याचा वापर विधायक होतो की नाही यावर किमान पालकांचे लक्ष असले पाहिजे.
आता PUBG त वेळ घालवायला सा-यांनाच आवडेल मात्र आपण स्क्रीन टाइमची मर्यादा देखील जपली पाहिजे ना...

फेसबूकचे पडीक अशा पिढी नव्याने पुढे येत आहे. काही मिनिटांनी आपसूक नजर आणि हात मोबाईलकडे जाणारी पिढी पाहून हा उत्क्रांतीचा नवा टप्पा तर नाही ना असाही सवाल पडतो.
डार्वीनच्या सिद्धांतानुसार आपलं शेपूट नावाचा अवयव काळाच्या ओघात संपला असं म्हणावं तर आता मोबाईलच्या रूपानं नवा अवयव आला आहे असे म्हणायला हरकत नसावी. आणि या युगाचा हा नवा अवयव असं म्हणत याला मान्यता देण्याची वेळही लवकरच येईल असे दिसते.

प्रशांत दैठणकर

982319466

Thursday, 20 June 2019

जब्रा फॅन.. आणि मर्लिन...!


नशिब कुणाचं कसं आणि कधी बदलेल हे सांगता येत नाही आणि सोबतच काही जण प्रसिध्दी आणि वादाचं वलय घेऊन जन्माला येतात. अशांच व्यक्तीमत्व आणि वाद यांच नातं कर्णच्या त्या कवचकुंडलासारखं असतं... त्याची कवच कुंडलं काढली गेली पण काही जणांची ती निघत नाहीत आणि जन्मानंतर मृत्यूपर्यंत वाद आणि ब-याचदा मृत्यूनंतरही त्याचा प्रवास पुढे सुरु राहतो अगदी मृत्यूनंतरही.

जगताना सौंदर्याचं परिमाण ठरलेही आणि जिला शापीत सौंदर्याची साम्राज्ञी असं म्हटलं जातं ते मेरेलीन (की मर्लिन ) मन्‍रो.. तिच्या मृत्यूचं गुढही तिच्या इतकं टिकलय आता तर तिचा पुतळा चोरुन नेण्याची घटना घडली... वाद - विवाद आणि सतत चर्चेत राहणं, अगदी मृत्यूनंतरही.

कालच तिच्याबाबतची एक पोस्ट कुणीतरी सोशल मिडियावर शेअर केली, ती बघण्यात आली... आम्ही तारे आहोतर आमचं टिमटीमणं हे दिसलंच पाहिजे अशा आशयाची ती पोस्ट होती... चाहत्यांना तेच आवडतं आणि त्यांची आवड जपण्याचं काम जे करतात त्यांना डोक्यावर घेऊन नाचणारे "जब्रा फॅन"  अर्थात जबरदस्त फॅन हाे... कमी नाहीत. त्यातच हा शर्विलक
चाहता वेगळा म्हणावा लागेल कारण त्यानं लेडिज ऑफ हॉलीवूड गझेबो येथून चक्क करवतीने कापून हा पूतळा जागेवरुन वेगळा केला आणि चोरुन नेला.

1955 सालच्या मर्लिनच्या " द सेव्हन इयर इच " चित्रपटातील भूमिकेवरुन हा पुतळा तयार करण्यात आला होता. आयुष्यात ग्रहांची साथ किती मिळाली हे ठाऊक नाही परंतु आयुष्य संपल्यानंतरही ग्रह बदलत असतात. याचंच हे एक उदाहरण म्हणता येईल.

हॉलीवूडचं हे आरसपानी सौंदर्य असणारी व्यक्ती म्हणून मर्लिनला जिवंतपणी खूप चर्चेत राहण्याची सवय होती. आता इतक्या वर्षांच्या कालावधीनंतर देखील त्यात काही कमतरता राहिलेली नाही हेच स्पष्ट होतय या चोरीच्या घटनेवरुन...!

सौंदर्याला असणारी शापीतपणाची किनार हा विषय सर्वच क्षेत्र थोडयाफार फरकाने लागू पडणारा आहे. रुपेरी पडदयावर जे दिसतं आणि घडतं त्याबाबत चर्चा होते आणि इतर बाबतीत चर्चा होताना दिसत नाही इतकच सांगता येईल परंतु सर्वच क्षेत्रात हा प्रकार आहे.

लहानपणी शिकवलेलं वाक्य आठवतं या संदर्भाने " जो आवडे सर्वांना तो ची आवडे देवाला " संदर्भ मर्लिन मन्‍रोचा आणि तिच्या पुतळयाबाबत घडलेल्या ताज्या घटनेचा असला तरी या संदर्भाने होणारे अंधानुकरण आणि त्यातून बळावणा-या अंधश्रध्दा हा देखील आहे.

आचार्य प्र. के. अत्रे यांच याकडे लक्ष वेधणारं " बुवा तेथे बाया " हे नाटक गाजलं होत. पण अनुकरणाचा हाच एक प्रकार नाही. जगाच्या इतिहासासोबत भुगोलही बदलणारा "ॲडॉल्फ हिटलर" याचे फॅन देखील मोठया प्रमाणात होते. राजकारण हे क्षेत्र देखील चाहत्यांचं आणि "जब्रा फॅन" असणा-यांच क्षेत्र आहे. याचा प्रभाव दक्षिण भारतात अधिक असल्याचं आपणास जाणवतं.

चाहतेपणाची मर्यादा आपण ठरवणारे कोण असा सवाल या निमित्तानं विचारता येतो. चित्रपटसृष्टीत वेगवेगळे अभिनेते, नायक आणि नायिका
आहेत त्या प्रत्येकाचे चाहते वेगळे आहेत आणि ज्याचे चाहते सर्वाधिक तो सूपरस्टार अर्थात चलनी नाणं असा इथला हिशेब

राजेश खन्ना असो की, अमिताभ बच्चन हे दोघेही सुपरस्टार राहिले असले तरी त्यांचे सर्वच चित्रपट तिकिटबारीवर स्विकारले गेले अशाही स्थिती नाही. या अभिनेत्यांनी राजकारणात जाण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांना सपशेल नाकारण्याचा प्रकार देखील आपण अनुभवला याच्या नेमका उलट प्रवास दशिण भारतात आपणास दिसेल एम. जी. आर, जयललिता, एन.टी.रामाराव आणि अलिकडच्या काळात कमल हसन आणि रजनीकांत यांचा प्रवास रुपेरी पडदयावरुन राजकारण असा झालेला आपणास दिसेल.

एकुणच काय तर सर्वच क्षेत्रात सर्वांचा काळ बदलतजातो, आणि ग्रह बदलतात त्याप्रमाणे मृत्यूपूर्वीच नव्हे तर त्यानंतरही चर्चेत राहण्याचं किंवा ठेवण्याचं काम जगात सर्व क्षेत्रात सुरु असलेलं आपणास दिसेल
"मार्लिन" तर त्यातील शिरोमणी राहिलेली आहे... अगदी आजपर्यंत तिची लोकप्रियता कायम आहे हेच ताज्या पुतळा चोरीच्या घटनेवरुन स्पष्ट होते.

आकर्षण ही बाब नैसर्गिक आहे त्यात भिन्नलींगीआकर्षणाचा निसर्गनियम कुणालाच टाळता आला नाही. इतर प्राणी आणि मानव यात एक महत्त्वाचा फरक अर्थातच इतर प्राण्यात नर अधिक सुंदर आहे. आणि मानवात नेमका उलटा प्रकार आपणास दिसतो. याच विषयावर Men from mars, women from venus अशी सुंदर कांदबरी आहे. सां

सौंदर्य आहे तेथै आकर्षण असणारच अगदी ग्रामीण भागात सांगतात तसं धोका आहे तिथ खतरा असं काहीसं हे आकर्षणाचं गणित... याच आकर्षणाचा परमोच्च बिंदू म्हणजे असे शर्विलक असणारे "जब्रा फॅन" असतात... चाहते कोणती मर्यादा कधी ओलांडतील याचा अंदाज येण कठीण.. आणि त्याचा  अंदाज बांधून ते कसे वागतील याबाबत सांगणं देखील अवघडच आहे.
.पण चाहते असावेत आणि अधिकाधिक असावेत असा साऱ्यांचा आग्रह न दिसला तरच नवल.  आजच्या युगात सा-यांना प्रसिद्दीचं वेड आहे आणि त्याचं वलय हवं असं सा-यांनाच वाटतं.... आता ज्यांना ते मिळालं आहे त्याचं तर यानिमित्तानं कौतूक करायलाच पाहिजे ना... असे जब्रा चाहते कोणास नकोत बरं...

प्रशांत दैठणकर

9823199466

Wednesday, 19 June 2019

पाऊस ... विलंबित ख्यालातला ..... !



पावसाची वाट बघणारा चातक ऐकण्यात आहे पण यंदा पावसानं इतका विलंबित ख्याल लावला की माणूस देखील चातकाइताकाच या पावसाची वाट बघायला लागला... वाट त्याच्या येण्याची असते मग त्याला उशिर होताच खूप काही विचार केला जातो.... संकल्प केले जातात आणि यंदा तरी आला थेंब साठवायचं असं ठरवलं जातं... उशिरा का होईना तो येतो आणिसारं काही धूवून टाकतो... त्याच्या वाट बघण्यातले संकल्प देखील मग त्याच्याच वर्षावात वाहून जातात.

पावसाची मजा कही आगळीच म्हणावी लागेल नाही म्हणायला त्याचे उदाहरण तर हक्काने दिले जाते... ssमी पावसाळे पाहिलेत असं सांगून आपला मोठेपणा दाखवला जातो. तिथं पावसाचं परिमाण अनुभवाशी जोडलं जातं पण अनुभव हाच आहे की इतके पावसाळे बघून देखील कुणाचीही वृत्ती बदलत नाही.

पाऊस आपल्याकडे चार महिन्यांचा पाहुणा आहे. आमच्या लहानपणी कशी झड लागायची म्हणून सांगू असं सांगणारी आज चाळीशीतून पन्नाशीकडे जाणारी पिढी त्या पावसाचं ते कोणकौतुक करताना थकत नाही पण आढयावरचं पाणी इतके वर्षे ओढयाकडे जातं राहिलं आणि आताशा त्याचं येणं कमी झालं पण त्याची ओढयाकडे धावण्याची ओढ आम्ही रोखली नाही... पावसानं जरा ओढ दिली की शेतकऱ्याचे डोळे बरसायला लागतात पंरतु काँक्रीटच्या जंगलातील तुन्हा-आम्हाला काही दिवस कौतुक आणि नंतर तो खोळंब्याचा पाऊस ठरतो.

हल्ली सोशल मिडियाचं प्रस्थ खूप वाढलय त्यामुळे त्या पावसाच्या दोन सरी बरसताच त्यावरच्या पोष्टी आणि त्यावरील कवितेच्या गोष्टींचा पाऊस या मिडीयावर दिसतो. स्मार्टफोन आणि प्रत्येक हाती आलेला इंटरनेट यामुळं पाऊस माझ्या नजरेतून म्हणत कॅमेऱ्यातून टिपलेला पाऊस मिडीयावर जास्त बरसतो. इलेक्ट्रॉनिक मिडीयाला दरवेळी यात ब्रेकींग वाली खबर गवसते त्यात आम्हीच प्रथम म्हणत मान्सूनच्या आगमनापूर्वीच त्याचा होणारा पाठलाग आणि त्यातून रंगलेली ब्रेकींग ची स्पर्धा असा प्रवास होताना दिसतो.

त्याच्या आणि तिच्यासाठी पाऊस हा केवळ भिजण्यासाठी असतो उगाच भिजून त्यानं मेसेज पाठवायचा बघ तुला माझी आठवण ... वगैरे वगैरे.. ! 
पाऊस हा सर्वात मनोहारी आणि स्मृतीत जपण्याचा काळ... पावसाच्या  थेंबांचं कोंदण घालून चमकणारे तिचे गेसू हे हिऱ्यापेक्षाही अधिक मोलाचे असतात... माणसापासून सर्व प्राणीमात्रात या वर्षाउत्सवाचा आगळाच आनंद आपणास दिसेल.

इंटरनेटच्या पसाऱ्यात आभासी जगात जगताना पावसात अवचित भिजंण खऱ्या अर्थानं वास्तवात आणणांर असत... मात्र त्या पिढीला बिरबलानं पावसावर दिलेल्या प्रश्नांच उत्त्तर ठाऊक आहे असं मला वाटत नाही 27 मधून 9 वजा केले तर शिल्लक किती याचं उत्तर झटकन मोबाईलच्या कॅलक्युलेटरवर शोधण्याचा प्रयत्न ही नीव पिढी नक्कीच करेल पंरतु ते हमखास चुकणारं आहे... 27 मधून 9 गेले तर शिल्लक शून्य राहते हे फक्त मेहनतीनं मातीतून सोनं पिकवणाऱ्या शेतकऱ्यालाच सांगता येईल.

पाऊस म्हणजे आंनद... पाऊस म्हणजे जीवन... ग्रीष्मात पोळलेल्या धरतीला तृषार्थ करणार कृतार्थ असा काळ पावसाच्या येण्यासोबत जागे होणाऱ्या त्याच्या यापूर्वच्या आठवणी आणि त्या आठवणींचा पाऊस... आपल्या जीवनाशी निगडीत एक सत्य आणि दूरावणांर सत्य... काळ बदलला असं का म्हणतात तर काळ स्थिर नाही तो बदलत असतो पण माणसाच्या स्वार्थी जगण्यातून त्याच्या बदलण्यात असणारा धोका आता दिसायला लागलाय.. !

मनोज कुमारच्या पानी रे पानी तेरा रंग कैसा  गाण्यात पाण्याचा बदलणारा रंग त्यांच वैश्विक रुप सांगणार आहे पण असं गाणं म्हणायचं तर तो पावसाच्या धारांमधून बरसला तर पाहिजे ना !

पावसाला येण्याची आळवणी करणारं बालपणीचं गीत या निमित्त आठवतं... ये रे ये रे पावसा म्हणताना त्याची विनवणी करताना तुला देतो पैसा  असं बाळकडू अनेक पिढयांनी पाठ केलं त्यावेळी पैसा लागणार भविष्यकाळात आपणास कुठे माहिती होत...!
आज ती वेळ कुणी आणली आहे याचं उत्तर शोधताना स्वत:ला पाण्यात न पहाता आपण स्वत:ला आरशासमोर उभं रहायची वेळ आलीय हे निश्चित.

प्रश्न इतकाच आहे की धोक्याची घंटा सातत्याने वाजतेय .आपणच कान बंद करुन बसलो आहोत नाहीतर आपल्या कानात हेडफोनचे स्पीकर लावून बसलो आहोत असं वाटतं... !

तो पावसाळा आणि त्यासाठीची पूर्वतयारी... ती छत्री घेण... आता दरवर्षी नव्याने घेण कारण छत्री दुरुस्ती करणारी मंडळी काळाच्या ओघात संपून गेली असं म्हणावं लागेल...! पाऊस हवाहवासा म्हणताना तो सुरुवातीला हवा वाटतो मग तो सतत बरसायला लागल्यावर त्याच्या रिमझिम पडण्याची मजा विसरुन आपणच त्याला आधी रिपरिप आणि नंतर पीरपीर म्हणायला लागतो.

आपण आपल्या भूमिका बदलत असलो तरी तो त्याची भूमिका बदलत नाही बरसताना या अंगणात बरसायचं आणि त्या अंगणात नाही असा भेद तो करीत नाही... आता त्यानं त्याचा धर्म सोडला नाही हेच आपल्या जगण्यासाठी महत्वाचं आहे... त्यानं कुठे बरसावं हे त्याचं काम मात्र आम्ही बंधारे बांधत जिल्हया-जिल्हयात त्याच्या या दानाचं राजकारण करतो आणि आतातर युध्दाची तयारी पण... !

                                                                                                                           सारं सोड राजा तू बरस ....
त्या बळीराजासाठी बरस... ! जो आर्जवं करतोय..
पडं रे पाण्या.... शेत माजं लई तान्हेल चातकावानी...

प्रशांत दैठणकर
९८२३१९९४६६

Tuesday, 18 June 2019

राधा.... किशनकी

कृष्ण.. अनेक कंगोरे असणारं एक पात्र. पुराणात बघताना आपणास त्या पुराणात अनेक पात्र दिसतात मात्र त्या इतरांपेक्षा कृष्ण किती वेगळा होता हेच आपणाला जाणवतं. त्यानंतर कृष्णाच्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्‌यात असणारं वेगळं रुप आणि त्याला असणारं वलय खुपच भिन्न आहे. समरसता काय असते त्याची ती आगळी कहाणी होती असं काहीसं आपणास या बाबत सांगता येतं..

बाळकृष्णाच्या त्या खोड्या ते दूध-दही-लोणी खाण्यासाठी संवगड्यांना जमवून दहीहंडी फोडणं.. . सुदाम्याशी असणारं त्याच सखा म्हणून नातं, त्याची कहाणी वेगळी. बंधू प्रेमाचा अध्याय देखील वेगळा एका जीवनात अनेक नाती जपणं आणि ती जगणं आणि त्यातून आलेलं महाकाव्य.

अर्जुनाच्या मैत्रीत त्याचा खऱ्या अर्थानं सारथी होणे आणि एक ज्ञानी तत्वज्ञाच्या रुपामध्ये जगाला दिलेलं गीतेतून आयुष्य जगण्याचे भान आणि आयुष्याचा उलगडून दाखविलेला मार्ग सारं काही अदभूत असंच आहे असे म्हणता येईल.


या संपूर्ण प्रवासात त्याचं जोडलं गेलेलं राधेशी असणारं नातं मात्र अधिक प्रचलनात आलं.. तो राधेचा कृष्णाशी असणारा आत्मसंवाद आणि तादात्म्यभाव या नात्याला अनोखं नातं बनवणारा ठरला. त्याचं अनोखेपण हेच की कृष्णाचं नाव घेण्याआधी राधेच नाव घेतल जातं.

राधाकृष्णाचं नातं शब्दातीत आहे इतकच म्हणता येईल. राधेची समर्पणाची भावना सर्वांनी इतकी पुढे नेली की या नात्यात राधेचं नाव अग्रस्थानी आलं.

राधा ही काही कृष्णाची पत्नी नव्हती. कृष्णाची पत्नी रुक्मिणी होती मात्र रुक्मीणीसारखी सुंदर पत्नी असताना देखील राधेचं नाव कृष्णाशी नुसतंच जोडलं गेलं अस नाहीतर या नावाची उंची रुक्मीणीपेक्षा अधिक झाल्याचे आपणास जाणवते. राधा आणि कृष्ण यांच्या कथेतील कृष्णाची आणि राधेची प्रिती जी सांगण्यात येते त्याचं वर्गीकरण कसं करावं हे नेमकेपणानं सांगणं अवघड आहे इतकच म्हणता येईल.

प्लॅटॉनिक लव्ह असं म्हणावं का... ते विकारशुन्य पण भावनांनी ओतप्रोत असणारं देहातील असं स्वर्गीय प्रेम होतं अस म्हणावं.. म्हणूनच आरंभीच म्हटलं की ते सारं काही शब्दातीत आहे.

तुमच्या आमच्या आयुष्यात असं नातं येत का?
अन आलं तर आपण त्या राधा कृष्णाच्या प्रितीतील पवित्र्य आपल्या नात्यात जगतो का.. पहिल्याचं उत्तर होय असं शक्य आहे असं आहे. असं प्रेम अनेकांच्या आयुष्यात नक्कीच येते स्वभाव आवडला, नजरभेट झाली आणि प्रित जडली असं घडतं पण ते विकार विरहीत असतं नाही हे मात्र खरं...! आणि ते प्रेम प्लॅटॉनिक वगैरे तर नक्कीच नसतं इतकं खात्रीनं सांगता येतं ...

मानवी मन आणि भावना या किती गतिमान आहेत याचं उत्तर विज्ञान शोधत आहे. आजवर झालेल्या याबाबतच्या संशोधनानुसार एका मिनीटात मनात साधारणपणे 21 भिन्न्‍ विचार येवून जातात. इतकं चंचल मन असताना एकाच भावनेवर मन स्थिर करणं केवळ प्रेमात शक्य होतं का... एक सहज विचार.

राधाकृष्णाच्या कहाणीकडे अनेकदा बघताना वाटतं की खरं प्रेम कशाला म्हणायचं.. कृष्णकथेत नंतरच्या काळात कृष्णाच्या प्रेमात विष पिऊन प्राण त्यागणाऱ्या मीरा .. तिचं ते काय काय ते वेगळं होतं.. राधा तर प्रत्यक्षात कृष्णासोबत गोकुळात त्याच्या आसपास होती मीरा.. तिचं तसं नव्हतं तरी ती कृष्ण प्रेमात पडली.. आता याला साऱ्यांनी कृष्णाची भक्ती म्हणणं खचितच पटत नाही. कृष्णावरील प्रेमाने (की भक्तीने?) तिचही नाव कृष्णासोबत जोडलं गेल..


इक राधा, इक मिरा,दोनोंने श्याम को चाहा |
इक प्रेम दिवानी, इक दरस (दर्शन) दिवानी |


रुक्मीणी आणि कृष्णाच नातं आणि राधा आणि कृष्णाची प्रेम कहाणी आज वेगळ्या अर्थाने प्रचलनात आली ती प्रेमाचा त्रिकोण म्हणून वापरत आहे चित्रपट आणि टिव्ही वाहिन्यांनी वापरुन आपली कलात्मकता म्हणत व्यवसायात एका अर्थाने पोटार्थी वापरली असल्याचं दिसतं.

माझ्याही आयुष्यात अशी एक राधा आहे असं सांगावं असं प्रत्येक पुरुषाला वाटतं पण ते शक्य होतं नाही कारण प्रत्येकजण कृष्ण नाही ना.. आता हे सारं आठवायचं आणि शब्दात मांडायच कारण म्हणजे माझ्या आयुष्यातील राधा होय...! आता प्रत्यक्षात जगताना राधा आसपास असते हे मनमोकळेपणे सांगायला हिंमत करताना घरातल्या रुक्मीणीची किंचितशी भिती सा-यांनाच असते आणि त्यामुळेच मनातलं मनात राहतं.. त्या भावनेतून ज्या मुलीकडे आपण बघतोय त्या मुलीला देखील न सांगण्याचा इथला रिवाज आहे..त्याला वेगळ्या भाषेत सांगायचं झालं तर इतकच म्हणता येईल की भावना प्रबल असूनही आम्ही कधी कधी

हमसे आया ना गया.... और तुमसे बुलाया ना गया .....!

असं गाणा-या त्या नायकाच्या भुमिकेत आपले वीर दिसतात ....
मला याबाबत इतकंच सांगता येईल की दान निसर्गाचं आहे ते त्याला का नाकारायचं.. आहे प्रेम तर सांगून मोकळं व्हायचं..आली होती माझ्या आयुष्यात ती राधा अशीच ते मी कधी नाकारलेलं नाही आणि नाकारणार देखील नाही.. .......मनात आहे ते मी आहे तसं मांडलय ... !

राधा माझी ... आयुष्याला वेगळा अर्थ देणारी . अर्थात रुक्मीणीवरही तितकीच प्रिती आहे म्हणून तर प्रेमविवाह केलाय..! आयुष्याच्या या वळणावर हे सारं सांगताना आयुष्यात खुप जगलो .. प्रेम भरपूर केलं याचं समाधान आहे. जिदंगी से चार पल मांगकर लाये हैं.. सारे ही इंतजारमें ना चलें जायें यार .. दो तो समझनेसे पहलेही गुजर गये.. बाकी युंही ना गुजर जायें जिंदगीसे मायुस होकर.. प्यार किया है तो जताना भी जरूरी है.. वरना ये भी इक ख्वाब समझ लेना दोस्तों.. आंख खुली और बिखर जाये.. जी लो जिंदगी जी भर के..

आता लिहिलंय .. हे उमटेल त्यानंतर एकच काम

रखुमाई रुसली, कोपऱ्यात बसली,
चला जाऊ पुसायला .
..




प्रशांत अनंतराव दैठणकर

9823199466

Thursday, 13 June 2019

बोन्साय...

ती आणि मी.... एक प्रवास आयुष्याचा....! 
आपण आपलं चालत रहायंच इतकच आपल्याला कळतं पण, हो इथ एक अल्पविराम असायलाच हवा कारण आपण चालत असताना आरंभ कुठे केलाय याचा विसर पडायला नको आणि कुठवर चालायचं चाची आठवण आपणास सातत्याने असायला हवीच ना ... ! आपल्यापैकी बहुसंख्य या चक्रात आहेत कारण क्षणभर थांबून आपण स्वत:ला विचारायला विसरुन जातो. रोजच्या रहाटगाडग्यात आपण स्वत:ला उत्तमरित्या गुंतवून घेतो आणि येत्या काळात समाधानी होवून याची अपेक्षा बाळगत जगत राहतो.. धावतो... ठेचकाळतो.... पडतो आणि पुन्हा उठून चालायला लागतो... त्या सावरण्यात आपण हळूहळू सराईत होतो आणि त्यातच आपलं मोठेपण आहे असंहीह मानायला लागतो इतकच नव्हे तर आपण किती योग्य असे आहोत, याचं वकिलपत्र घेतल्याप्रमाणे आपली भूमिका साऱ्या जगाला पटवून देण्याचा प्रयत्न करीत असतो. 

आपली भूमिकाच योग्य आहे हे पटवून देताना आपण नेमकपणानं जगायचं म्हणजे काय करायचं हे विसरतो असं मला हल्ली जाणवायला जागलय...!

आपण जन्माला आलो त्याक्षणी सारं जग मोकळं असतं.. खुलं आकाश, हा धुंद करणारा गंधीत वारा आणि निसर्गानं दिलेलं दान.. ते दान निसर्ग इथं जन्माला आलेला प्रत्येकाला मिळालेलं असतं मात्र नंतरच्या काळात आर्थिक बंधनात बांधायला आरंभ होतो.

...पालकांची कुवत इथं पाल्याला घडवते. त्याच्या ठायी असणांर
नैसर्गिक कसब आणि कौशल्य इंथ महत्वाचं ठरत नाही... पाल्याच्या शाळा प्रवेशापासून त्याच्या वस्त्र प्रावरणांवर एक Price Tag लावला जातो.. कधी या Tag च्या आसपास तर कधी त्या समाजातील रुढी आणि परंपरा व ज्यांच्या समवेत राहतो त्यांच्यात असणारी स्पर्धा यातून आपणच कसं वागायचं...कसं बोलायचं याचं "सलायन" त्या बालकाला चढवतो.... याला घडवणं म्हणालचं की अडवणं असाही सवाल मनात येतो ...! यात त्या जिवाची होणारी घालमेल आणि त्याचं गुदमरणं आपणास कळतं.. .. पण केवळ परिस्थिती ....आणि आर्थिक स्थिती म्हणत त्या वाढत्या जिवाच्या आशा- आकांक्षांना आम्ही मुरड घालत राहतो. त्यांची वेदना आपणापर्यंत पोहोचली तरी दोन क्षण अश्रु ढाळून आपण आहे त्याला रुजू करुन घेतो आणि त्यालाही ते स्विकारायला भाग पाडतो... हो त्याला आपण अपरिहार्यतेचं रुप देतो... !

अपरिहार्यता मानत वागणारा समाज अशी खुरटी पिढी घडवताना पाहून खेद वाटतो... ! ही वेळ आपणा सर्वांवर का आली आहे याचा विचार करण्यासाठी क्षणभर विश्रांती घ्यावीच लागेल... !

पालक म्हणून नवी पिढी घडवताना बाप आपलं सर्वस्व पणाला लावतो आणि आई आजन्म सेवारत राहते... हे देखील एक वास्तव... हेवास्तव नाकारता येणार नाही मात्र त्यांनाही विचाराव वाटतं की तुम्ही किमान एक क्षण स्वत:ला मुलांच्या भूमिकेतून वळून बघितल आहे का... ? त्यांना मोठं करणं...
त्याचं आयुष्य घडवण इथवर ठिक आहे.. पण त्यांना तुमच्याकडून नेमकी काय अपेक्षा आहे याचा कधी विचार केलात का आपण ?

प्रत्येक क्षणी आयुष्य म्हणजे तडतोड हे म्हणण चुकीचं आहे...कधी त्यांच्याही भावनांना जाणलं पाहिजे , त्या भावनांचा आदर केला पाहिजे. त्यांच्या त्या भावनांना हात घातला पाहिजे.. त्यांची साद ऐकली पाहिजे आणि त्याला प्रतिसाद दिला पाहिजे.

मुळात आई-बाप आयुष्य घडवतात ते आपले गुरु आहेत या आदरापोटी मुलं संवाद साधत नाहीत... तिथं त्यांना मैत्रीची साद घातली गेली नाही तर असे family ही भावना संपून मुलांसाठी we are being ruled झाली की त्यांच्या आशा-अपेक्षांची पंख वाढत नाहीत...जन्माला आला त्या क्षणी गरुडभरारी घेण्याची ताकद असणाऱ्या त्या चिमणपाखरांना आपण चिमणी पाखरं ठेवणार की
त्यांच्या पंखात बळ देणार याचाही विचार आपण करा असं आवर्जून सांगावं वाटतं..

आजकालच्या स्पर्धेच्या युगात असं जगावंच लागतं असं म्हणणं कितपत योग्य आहे याचादेखील आपण विचार करावा... आयुष्याला सर्व प्रकारची शिस्त आवश्यक आहे, व्यवहार कौशल्य आणि जगाचं भान आणि जगण्याचं जाण देखील त्यांना आवश्यक आहे पण त्याही पेक्षा अधिक महत्वाचं आहे ते प्रेम. एक कुटुंब म्हणून असणारी आत्मीयता आणि जिव्हाळा.. त्यासाठी आर्थिक मर्यादा असू शकत नाहीत...

आपली पुढची पिढी आपल्यापेक्षा सरस आहे हे आपण प्रथम स्वत:शी कबूल केलं पाहिजे आपली पुढची पिढी म्हणजे आपलं दुसरं रुप हे मान्य करा मग सारं सुरळीत होईल हे नक्की... 

प्रशांत दैठणकर
९८२३१९९४६६

Wednesday, 17 April 2019

....हा खेळ आकड्यांचा


माझी नेमकी ओळख काय ?


या प्रश्नाचा धांडोळा घेऊन उत्तर शोधतो. त्यावेळी मी स्वत:ला अभिमन्यूच्या स्थितीत बघतो. मी अभिमन्यू आणि इथं चक्रव्यूव्ह असतं ते आकडयांचं..मी स्वत: आरशात स्वत:ला शोधण्याऐवजी स्वत:ला आकडयांमध्ये आकड्यांमध्ये अडकलेला बघतो. 

हा आकड्यांचा खेळ कधी सुरु झाला.. अगदी त्या अभिमन्यूच्या जन्मापूर्वी कृष्णाने सांगतानाच झाला असेल कदाचित.. आई दवाखान्यात तपासणीला जाते त्यावेळी केस पेपर नंबर अर्थात एक आकडा.. मी बघतो की माझ्या जन्मापूर्वी या आकड्यांचे गर्भसंस्कार अपरिहार्य ठरले. 


जन्म झाला.. किती पाऊंन्ड वजन..पुन्हा आकडा .. बेड क्रमांक... वार्ड क्रमांक...जन्म तारिख आणि जन्माची वेळ..आकड्यांचा प्रवास सुरु होतो. जन्म घेतलेली वेळ, त्यावेळीची ग्रहांची स्थिती अशी आकडेमोड करीत जन्मपत्रिका बनवणे इथनं आकड्यांचा  गुंता सुरु होतो. 

प्रथम वारसं... नाव ठेवणे अर्थात चांगल्या अर्थाने हो पण बारशासाठी मुहूर्त शोधणे म्हणजे पुन्हा आकड्यातून आकड्याकडे .. मग शाळा... इथं प्रथम मनाला जाणवतं पण त्याचा अर्थ कळत नाही त्यावेळी... प्रथम क्रमांक यायलाच हवा असा प्रथम आग्रह आणि नंतर धोषा सुरु होतो. मला वाटतं की ही लादली जाणारी पहिला क्रमांकाची अपेक्षा भविष्यातील ब्लड प्रेशरची पेरणी ठरते.. वर्गात पुढे जाताना एक शैक्षणिक वर्ष आहे तो केवळ आकडा असं न होता तो वाढता ताण होत जातो... वाढदिवस तो देखील एक आकडा पण तिथं आकडा ओलांडताच अपेक्षा, स्वप्नं आणि स्पर्धा असं एक दुष्टचक्र सुरु होतं. 

आयुष्यात पुढे पुढे जाताना आकडे आकडे आणि त्यांचे सारे संदर्भ बदलून जात असतात... उत्साह भरणारे वाटले तरी काहींसाठी हेच आकडे नैराश्याकडे पुढे वैफल्यावस्थेकडे नेणारे असतात. या नैराश्याचा कडेलोट बहुसंख्य प्रसंगात आत्महत्येकडे नेणारा ठरतो. 

नंतर आकडयांचा हा प्रवास थांबतच नाही कधी माझी ओळख माझा मोबाईल क्रमांक असते. प्राण गेला तरी हरकत नाही पण मी माझा मोबाईल क्रमांक बदलणार नाही इतकं प्रेम त्या आकडयावर जडतं आणि आकडा बदलला म्हणजे जणुकाही जगबुडीच झाली असं वाटायला लागतं. 

आकडयांचा गुंता वाढतच जाणार असतो वीज हवी तर वीज वितरण कंपनीचा क्रमांक, बँकेत खातं मग तो वेगळा क्रमांक, आयकर... तो वेगळा आणि आधार क्रमांक देखील वेगळा अशा या आकडयांच्या चक्रव्यूव्हात मग वाहन परवाना, मतदार यादी, घरपट्टी घर क्रमांक... रेल्वेचा  पीएनआर आणि विमानाचा पीएनआर क्रमांक वेगळा... तिकीट वेटींग वर असेल तर बदलत जाणारा आरक्षण क्रमांक वेगळा. 

हा आकडयांचा खेळ एका बाजूला रंगत असताना अधिकच गुंता करणारी 7.10 ची फास्ट, 7.17 ची फास्ट...फलाट क्रमांक ... हा खेळ अधिकच गहिरा होतो. हे झालं मेट्रोचं.. ग्रामीण भागात शेतीचा 7/12 आणि नमुना 8अ वेगळे तर वादाच्या बाबतीत शेतीची मोजणी.... पुन्हा आकडे.. आकडे आणि आकडे. 

मराठवाडयात काही भागात वीज कनेक्शन चोरुन थेट घेण्याचा प्रकार आढळला अर्थात... तो देखील आकडा टाकून घ्यावा लागे.. 

आकड्यांचे अनेक पैलू सोनं मोजणं (गूंजभर) हिऱ्याची शुध्दता कॅरटमध्ये... सारे आकडे वेगळे तर रतन खत्री कल्याण खुलता/बंद होता मटक्याचा आकडा वेगळा... ! 
आता तर जमाना खूप पुढे आला आहे कारण हा जमानाच मुळी डिजिटलचा आहे... 
आकड्यातून ... आकड्यांकडे आणि पुढेही आकड्यांचा जाळी..  आपण  याच आकड्यांशी खेळत कधी लढत अभिमन्यू ..... व्हायचं...लढत रहायचं.. प्राण असेपर्यंत.. 

प्रशांत अनंत दैठणकर
9823199466


Tuesday, 1 January 2019

संकल्पांच्या पलिकडे...


नव्याचा आरंभ करायला नववर्षाची वाट कशाला बघायची ...इथं येणारा प्रत्येक दिवसच नवा असतो... हा क्षण सरल्यानंतरचा येणार क्षण देखील नवा असतेा तरी देखील सर्वांना वाट असते ती नव्याने काही करण्याची ...नव्या संकल्पांची पण त्या संकल्पांच्या संकल्पना आता पार बदलत्या आहेत.

मागे वळून पाहताना आठवतात ते दिवस ज्यावेळी संकल्पना केला होता रोज नव्याने काही लिहिण्याचा त्यासाठी विशेष बचत करुन आणली होती एक डायरी .. हो डायरी लिहिण्याचा संकल्प केला होता कोणे एके काळी ....नव्याचे नऊ दिवस म्हणतात त्या पध्दतीने नऊ दिवस देखील ती डायरी लिहिली नाही....दरवर्षी अशा डायऱ्या येत राहिला त्याचा खच अजूनही टेबलावर आणि माळयावर पडून आहे. ..
..त्या डायरीतली ती शब्द उमटलेली मोजकी पाने अजुनही वाट बघतात कधी तरी आपल्यावर पसरलेली धुळ झटकण्याची.

गेल्या क्षणांवर अशीच धुळ जमा होत राहाते आणि ती चढतच जाते ....क्षण सरत जातात कधी स्मृतीत तर कधी विस्मृतीत आयष्याचा हा जमा-खर्च सुरुच राहतो....कालही होता आणि तो उद्याही राहणार आहे. हे नक्की.

या जगलेल्या क्षंणामंध्ये ते अवघड वाटणारे क्षण होते जे तुझ्या आठवणीत सरता सरत नव्हते आणि

ते क्षण देखील जमा झाले जे तुझ्यासवे जगताना हातातील वाळूप्रमाणे अलगद निसटून गेले....त्या क्षणांना जमेला मांडायचा अटृहास मनात आहेत याची जाणीव आहे.

छंद डायरी लिहिण्याचा असावा म्हणून आणलेल्या डायऱ्यांच्या बाजूला पडलेल्या त्या कॉलेजमधील मोठया 200 पानी वहयांकडे नजर जाते तेव्हा जाणवतं की त्या वहयांनी अधिक आयुष्य बघितलय..... कॉलेजच्या नॉलेजच्या एकही शब्द त्या वहीत नाही पण त्यात तुझ्या आठवणीत जगलेला प्रत्येक क्षण जपला गेलाय...

तुझ्या आठवणीच म्हणायला लागेल कारण तो विरह नव्हता....त्या पानांवर ओतप्रोत सांडलेल्या त्या भावना आणि प्रसंगी आसवांचा पाऊस याची साक्ष प्रत्येक पानांवर आहे...
.ते तुझ्याविना जगलेले क्षण आजही तितकेच उत्कटपणे समोर येतात.

जितना तडपायेगी मुझको
उतनाही तडपेगी तू भी
जो आज है आरुजू मे ही
वो कल तरी आरजू होगी
ये झुठ नहीं सच है सनम....!

बरोबर आहे. त्यावेळी गंमत म्हणून लिहिलेले शब्द प्रत्यक्षात जगताना जाणवतं की ते जे काही होतं ते चूकच होतं....!
मला वेळ होता पण तू व्यस्त होतीस आणि तूला वेळ आहे आता तर मी अस्ताव्यस्त झालोय.... पार गुंतागुंत झालीय आयुष्याची .....म्हणून काही कोलमडलो नाही......! उम्मीद पर दुनिया कायम है म्हणत त्या मुक्त क्षणांचा शोध घेत रहायचं...! हे अविरत चालत रहाणं म्हणजे एखाद्या समुद्र किनाऱ्यावर चालत प्रत्येक कणाला हाता घेऊन परिस शोधण्यासारखं आहे.....!

आयुष्यात चालताना प्रत्येक कण हाती घेतला....
जगण्याच्या धुंदीत कळतच नाही की त्यात कोणता क्षण परिस होता....हातातील लोखंडाचं सोनं झालेलं.... खूप उशीरा कळलं...! जेव्हा ध्यानी आलं तेव्हा तो परिस कुठेतरी मागे राहून गेलेला होता.... आता फक्त नव्याने सुरुवात आणि नव्याने शोध आयुष्यातल्या त्या परिस क्षणांचा...!

प्रशांत दैठणकर
1 January 2019

Friday, 28 September 2018

#497.....

मानवाधिकार बळकट करणारा आणि स्त्री ला खऱ्या अर्थाने समानतेचा अधिकार प्रदान करणारा सर्वोच्च निर्णय आला आणि देशात विविध प्रकारच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

कोणे एके काळी मातृसत्ताक पध्दतीचा अवलंब करणाऱ्या आपल्या देशात नंतरच्या काळात पुरुषसत्ताक पध्दती रुजली.... ती इतकी रुजली की स्त्री ही केवळ दासी असावी अशा पध्दतींन घरात कोंडली गेली हे चित्र निर्माण झालं.

नवरा म्हणेल त्याला संमती देणे अर्थात 'मम' म्हणणे जणू आवश्यकच करुन टाकलं... विवाह संस्था मजबूत आहे. असं आपण म्हणत असलो तरी त्यामागचं सत्य्‍ा आपण सांगत नाही हे देखील खरं आहे.... स्त्री चं अस्तित्व संपवून तिला केवळ आपली दासी मानणाऱ्या घरांमधून केवळ पर्याय नाहीत म्हणून ही विवाहसंस्था टिकून राहिली.

स्त्री ला शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे काम शतकानुशतके सुरु होते....
शिक्षणाअभावी मग असहाय्य झालेली ' ती ' जगात स्वतंत्र जगण्याचा विचारच करु शकत नव्हती . म. जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा मार्ग खूला केला त्यानंतर काही प्रमाणात जागरुकता निर्माण व्हायला लागली.

मात्र अगदी सत्तरच्या दशकापर्यंत 'ती' चित्रपटातून आहे तशीच मांडली गेली . . . तिने केवळ त्याच्याशी समरस व्हांव स्वत:ला संपवावं याच प्रकारचा आरसा समाजातून चित्रपटात दिसला.

'ती' स्वत:ला संपवून जगत राहिली .. 'स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता' ठरवली गेली या वाक्यातली नाण्याची दुसरी बाजू जगासमोर आलीच नाही. ती विवाहापर्यंत वडीलांच्या आणि भावांच्या सांगण्यानुसार वागत होती आणि लग्नानंतर पती हेच सर्वस्व ठरवण्यात आलं... तो बेवडा, जुगारी आणि गुंड असला तरी त्यालाच परमेश्वराचं स्थान देण्याचं काम समाजात झालं.

' ती ' जोवर आपला ' स्व ' संपवत नाही तोवरच नंतर मात्र या 'स्व' ला डोकं वर काढायची संधीच नव्हती...

भला है , बुरा है जैसा भी है
मेरा पती मेरा देवता है . . . !

चित्रपटातून वारंवार ' ती ' ला दासीच राहण्याची शिक्षा दिली गेली . . . !
बदलत्या काळानुसार शिक्षणाने घराचा उंबरठा ओलांडण्याची हिंमत तिच्या ठायी आली मात्र त्या स्थितीत कौटुंबिक हिंसाचार थांबला नाही.

व्यक्तीला एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून जगण्याचा अधिकार आहे. स्वत:ची आपली मतं आहेत . . व्यक्तीला अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य हवं मग व्यक्ती ' तो ' असो किंवा ' ती ' ... !

प्रत्येक नातं विश्वासावर अवलंबून असतं आणि त्यात पारदर्शकता आवश्यक असते . .. ' ती ' आपल्याला व्यक्त करायला लागली तर तिला बंडखोर ठरवंल आणि हे खुळ आहेस असं हिणवलं गेलं विवाह हा शब्द हल्ली प्रचलनात आला आहे. सत्तरीच्या दशकापूर्वी त्याला शरीर संबंध योजणे असं संबोधलं जात होतं... खुल्या मानसिकतेतून दमनाची मानसिकता वेगळा मार्ग दाखवत होती.

शरीर संबंधाना नैतिकतेचे निकष लावायला सुरुवात झाली आणि तिथं 'अनैतिक संबंध' आणि त्यातून पुढे हत्या, आत्महत्या आदींचा शिरकाव झाला 'स्त्री' 'पुरुष' हे स्वतंत्र आहेत. त्यांची शारिरीक जडण घडण वेगळी आहे.
त्यांच्या भावनिक गरजा वेगळया आहेत आणि शारिरीक संबंध ही आयुष्यातील भावनिक व शारिरीक आवश्यकता आहे. ती अपरिहार्यता नाही हे मान्य करणाऱ्या वात्स्यायनाला विवाह संस्थेच्या रक्षणासाठी त्याच्याच देशातून देशाबाहेर काढलं गेलं.

'ती' ला जगण्याचा सन्मान हवा हे आपण लक्षात घेतलं नाही... त्यानं कसही जगलं तरी चालतं पण तिनं त्याच्याच दासी प्रमाणे जगायचं ... आलं ते स्विकारायच, कितीही भावनिक आणि शारिरीक वेदना झाल्या, कोंडमारा झाला तरीही  'ब्र' काढायचा नाही यात 'ती' संपत गेली.

सहमतीने एकमेकांच्या संमतीने शरीर संबंध याबाबतचा सर्वोच्च निवाडा त्याच्यापेक्षा 'ती' च्या आयुष्यात महत्वाचा आहे. विवाह संस्था टिकवून धरण्यासाठी स्वत:ला संपवणारी 'ती' केवळ मरण येत नाही म्हणून जगते असं चित्र अनेक घरांमध्ये दिसतं... त्याला काहीसं खुलं करण्याचं काम या निवाडयानं झालय...!

कोण होतास तू....काय झालास तू
कोण होतीस तू... काय झालीस तू...!

यातील मतितार्थ केवळ बदलाचे संकेत देणारा आहे. भगवद गीतेत सांगितलय 'परिवर्तन ही संसार का नियम है' काळ बदलला.. बदलल्या काळासोबत शिक्षण आणि सहजीवन याची पध्दत बदलली याचा परिणाम आयुष्याची वीण बदलण्यावर निश्चितपणे होवू शकतो... बदल स्विकारायचा की नाही...
'ती' ला किमान जगता आलं पाहिजे इतकी तरी प्रगल्भता 21 व्या शतकात यावी हीच अपेक्षा आहे.

शारिरीक संबंध आणि विवाह संस्था यांची सांगड जर जगण्यावर अडचण होत असेल तर याबाबत खुलेपणाने चर्चा व्हायलाच हवी.... वात्स्यायनाच्या देशात आजही आपण खुलेपणा स्विकारु शकलेा नाहीत म्हणजे काळ पुढे सरकला पण आपण मागे मागे जात तर नाही ना असं वाटायला लागतं.

विवाह संस्था ही आपल्या देशाची वेगळी अशी ओळख आहे. पण कोटयवधी 'ती' यात गाडल्या जात असतील तर त्याचा विचार होणे आवश्यक आहे.   
'ती' जगली पाहिजे 'ती' ला मोकळा श्वास घेता आला पाहिजे.... 'ती' आहे म्हणून 'तो' आहे म्हणून 'तो' असणं संयुक्तीक आहे. त्याच्या जीवनाला अर्थ 'ती' च्या मुळेच आहे.  "जिना इसी का नाम है"  ..  असं म्हणत सारं काही सहन करणा-या 'ती' ला आता काही तरी मोकळेपणा मिळेल आणि तिला तिचा शोध घेऊन तसं जगण्यात मदतीचा हात अाणि साथ देणा-या त्याच्यावरील गुन्हेगारीच्या भावनेतून दोघांचीही सुटका होईल.

प्रशांत दैठणकर
-9823199466