Thursday, 30 April 2020

ऋषी कपूर ... Timelass पोस्टर बॉय...!



समय रहतें ही समय का पता नही चलता...
गुजरता हैं वक्त तो हर लमहा याद आता हैं..
prashant
काही असंच झालंय किंवा त्याची सुरूवात झाली कालपासून. कालची सकाळ उजाडली ती मुळी इरफान खानच्या निधनाच्या वार्तेने आणि आज सकाळी ऋषी कपूरच्या निधनाची बातमी... आला तो जाणारच आणि त्याला पर्याय असत नाही मात्र कोण कधी जाईल याची खात्री नाही आणि सारं काही चांगलं आहे असं वाटत असताना एखाद्यानं जाणं नक्कीच धक्का देणारं असतं... तो अनुभव आपण वारंवार घेतो आणि तो येतच राहणार असं वाटतं. आता या जाणा-यांना विदा करायला गर्दी मात्र दिसणार नाही कारण ते कोरोनाचं संकट आहे.

आपणाकडे
आयुष्यात काय कमावलं याचं गणित आपल्या अंतिम संस्काराला किती जण येतात यावर मांडलं जातं असाही एक रिवाज आहे. आता येणं आणि जाणं यातलं अंतर अगदीच कमी कालावधीचं असलं तरी यात मरणानंतर जगणारे अनेक जण आहेत आणि त्यात कलाकार ही व्यकती येते. जगण्याचं खरं मर्म हे म़ृत्यूनंतर आपलं नाव कायम ठेवण्यात अधिक आहे हे सांगायला नको वेगळं.

ऋषी कपूर मनात बसला तो त्याच्या अमर अकबर  अॅन्थनी मधल्या अकबरच्या भुमिकेतून .. कारण अर्थात तोच लहानपणी पाहिलेला त्याचा पहिला चित्रपट होता. त्याच बॉबी आला त्यावेळी वय काही कळण्याचं नव्हतं आणि त्यावेळी पाहून कोणी आवडावी अशी परिस्थीतीही नव्हती.. मी आजवर जे ऋषी कपूरचे चित्रपट पाहिले त्यातून जी भुमिका समोर आली ती म्हणजे नव्या नायिकांना चित्रपटात लॉन्च करायचं आणि त्यांना पहिल्या चित्रपटात यशस्वी करायचं तर ऋषी कपूरसोबत भुमिका द्यावी हेच उत्तम ... तो तितका ग्लॅमरस प्रतिमा जपणारा नायक होता.

कपूर घराण्याचा वारसा असला तरी त्याला पहिल्या संधी पलिकडे काहीच उपलब्ध नव्हते. शोमन राज कपूरने आपला ड्रीम प्रोजक्ट असणा-या मेरा नाम जोकर चित्रपटात ऋषी कपूरला ती संधी दिली होती. राजकपूरच्या लहानपणीचा रोल जराशा तरूण दिसणा-या या आपल्या मुलाला देऊन राजकपूर यांनी खरं तर त्यावेळी कॉस्ट कटींग केली होती.. मेरा नाम जोकर तिकिटबारीवर कमाल करू शकला नाही. प्रदीर्घ लांबी आणि दोन मध्यांतरे असणा-या या चित्रपटाने राजकपूरच्या कारकीर्दीला पूर्णविराम लागतो की काय अशी स्थिती निर्माण झाली होती.

अपयशाने खचून न जाता राजकपूर यांनी नवा मार्ग शोधला आणि तो होता प्रेमकथेचा...
समाजिक आशय बाजूला ठेवून आता केवळ तिकिटबारीवर नजर होती. चित्रपट होता बॉबी... नवी सोळा वर्षाची नायिका डिम्पल कपाडियाची निवड झाली आणि नायक होता त्यावेळचा हार्टथ्रॉब राजेश खन्ना... चित्रपट काढताना राजेश खन्नाला देण्याइतकी मानधनाची रक्कम राजकपूर यांच्याकडे नव्हती आणि पुन्हा एकदा कॉस्ट कटींग करत ऋषी कपूरला कास्ट करण्यात आलं आणि चित्रपटसृष्टीत नवा इतिहास घडला... अशा प्रकारे ऋषी कपूर अपघाताने सिनेमात आला असला तरी 1973 पासून 2019 पर्यंत या नायकाने आपली आगळी ओळख निर्माण केली... जपली आणि ठसाही उमटवला.

नायिकांचा नायक या अर्थाने ऋषी कपूरची अधिक ओळख आहे असं माझं मत आहे. पहिल्या चित्रपटात डिम्पल कापडिया नंतर त्याचा प्रवास सुरुच राहिला. आधी चित्रपटात आणि नंतर आयुष्यात नायिका बनलेली नीतू सिंग .. ऋषी कपूर आणि नीतू सिंगची जोडी त्या काळात खूप गाजली होती.

नायिकांचा नायक या भूमिकेतून सरगम चित्रपटात जयाप्रदासोबतची त्याची जोडी देखील खूप गाजली हा चित्रपट नवे विक्रम नोंदवणारा चित्रपट होता. मुकी नायिका आणि त्याचा डफलीवाला.. गाजला.

दरम्यान मल्टीस्टार चित्रपटात त्याने अमिताभ बच्चन सोबत केलेली अकबरची भूमिका आणि त्याचं ते .. तय्यब अली प्यार का दुश्मन.. हाय हाय हाय गाणं
आणि परदा हैं परदा ही कव्वाली लोकप्रिय ठरली.. अमिताभ बच्चन सोबत त्याचे जे चित्रपट आले आणि गाजले त्यात कभी कभी तसेच अमर अकबर अॅन्थनी नंतर नसीब तसेच अमिताभ बच्चनसाठी दुसरं जीवन देणा-या अपघातकाळातील कुली आणि भारत आणि रशियाच्या कलाकारांनी बनविलेला अजुबा यांचा उल्लेख करता येईल. 27 वर्षांच्या कालावधीनंतर त्या दोघांनी एकत्र भूमिका केलेला नॉट आउट 102 हा चित्रपट ( 2018 ) शेवटचा होता. या चित्रपटाला व्यावसायिक यश मिळालं नसलं तरी याची चर्चा खूप झाली.

त्याच्या कारकिर्दीवर नजर टाकताना आपणास जाणवेल की नव्या नायिकांचा नायक का म्हणता येईल. सरगम- जयाप्रदा,
कर्ज- टिना मुनीम, प्रेमरोग- पद्मिनी कोल्हापूरे, हिना - झेबा बख्तियार आणि सर्वात अधिक गाजलेला दिवाना- दिव्या भारती.  दिवाना हा चित्रपट जसा शाहरूख खानचा पहिला चित्रपट होता तसाच तो दिव्या भारतीचा देखील पहिलाच चित्रपट होता. त्याआधी तिने तमिळ चित्रपटात भुमिका केल्या होत्या मात्र हिंदीत तिला ओळख याच दिवाना चित्रपटामुळे मिळाली.  ऋषी कपूरची भुमिका या दोघांपेक्षा अधिक गाजली.

याखेरीज नायिकांच्या उतरत्या काळात ज्या नायिकांनी ऋषी कपूरसोबत चित्रपट केले त्यांनाही त्याच्या इमेजचा फायदाच झाला. नगिना- श्रीदेवी, बोल राधा बोल- जुही चावला..

चित्रपटात आपली आगळी ओळख बनविणा-या या नायकाने शेवटच्या काळात आपली इमेज तोडून भुमिका केल्या यातली ऋत्विक रोशन नायक असणा-या अग्नीपथ चित्रपटातील त्याची भूमिका सर्वांचं लक्ष वेधणारी ठरली.

त्याच्या चित्रपटाच प्रवास कसा होता असं सांगायचं तर तो झुठा कहींका पासून झुठा कहींका असा होता असं म्हणता येईल. नीतू सिंग सोबतचा त्याचा हा चित्रपट 1979 साली आला होता. यातील गाणी खूप गाजली आणि चित्रपट देखील चर्चेत होता त्यानंतर तब्बल 30 वर्षांनी याच नावाने चित्रपट आला ज्यात देखील त्याची भुमिका होती.
आपल्या चित्रपट प्रवासात ऋषी कपूरने एक चित्रपट दिग्दर्शित केला तो होता आ अब लौट चले.. आणि यात राजेश खन्नाची भुमिका होती. ज्या चित्रपटात राजकपूरने राजेश खन्नाला नायक घेऊन बॉबी काढायचा ठरवला त्यात ऋषी कपूरला संधी मिळाली आणि त्याच ऋषी कपूरने दिग्दर्शीत केलेल्या चित्रपटात राजेश खन्ना.. अर्थात राजेश खन्ना या चित्रपटात चरित्र नायक होता आणि यात नायकाची भुमिका विनोद खन्नाचा मुलगा अक्षयला
मिळाली होती आणि नायिका होती ऐश्वर्या राय.

पृथ्वीराज आणि राजकपूर यांचा वारसा समर्थपणे चालवणा-या या नायकाने आपली जागा रसिकांच्या मनात निर्माण केली ती कायमची कारण त्याने जे चित्रपट दिले ते आजही सा-यांच्या स्मरणात राहणारे आहेत .. त्यापैकी सर्वोत्तम होता तो त्याचा चांदनी हा चित्रपट.. सफेद साडीत वावरणारं ते श्रीदेवीचं तारुण्य आणि एव्हरग्रीन ऋषी कपूर.. त्यातली गाणी आणि कथानक गेल्या 30 वर्षात जे आयकॉनिक चित्रपट आले त्यातला हा प्रेमाचा आयकॉन ठरलेला चित्रपट.. यात विनोद खन्नाचीही भुमिका होती... आज त्या दोघांच्या पाठोपाठ ऋषी कपूरचाही जीवनपट संपला ही रसिकांसाठी वाईट बातमी आहे... मात्र इहलोकाची यात्रा संपली असली तरी चांदनी आणि त्यासारख्या इतर चित्रपटांचं गारूड निर्माण करणा-या ऋषी कपूरने रूपेरी पडद्यावर मात्र आपल्या मृत्यूनंतरही आपलं नाव राहणार अशी कामगिरी केलीय.. लाखोंच्या या हरदील अजीज अदाकारास अलविदा....



प्रशांत दैठणकर

9823199466

Tuesday, 21 April 2020

मरणाचे भय अन् जगण्याचे भान...!

....पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा... सुधीर फडके यांनी गायलेलं एक अजरामर असं गीत आणि चिंतन करायला लावणारे त्याचे बोल आज आवर्जून आठवतात कारण अर्थात कोव्हीड- 19 यानेकी कोरोना

कुणीतरी एक छान वाक्य लिहिलय समाज माध्यमांवर ज्या दिवशी आपण या ग्रहावर काही काळाचे पाहुणे आहोत त्याची जाणीव मानवाला होईल त्यादिवशी त्याच्या जगण्याला प्रारंभ होईल अन् त्याच्या जगण्यात निसर्गा बाबत असणारा आदर वाढेल.

सूर्य तर नित्यनेमाने उगवतो त्याचं कुणाला कौतुक नसतं . तो जगण्याचा एक भाग होऊन जातो .मात्र ज्या दिवशी त्याला ग्रहण लागतं त्यादिवशी
साऱ्यांना त्याच्या अस्तित्वाची जाणीव होते... प्रकर्षाने जाणवणं काय म्हणतात ते या दिवशी असतं.

चंद्राच्या काय ते वेगळेच Citylight च्या धुरळ्यात त्याकडे लक्ष असतं कुणाचं. पण लहान लहानपणी गावी सुट्टीत जायचो त्यावेळी सांजची जेवण झाल्यानंतर अंगणभर बसलेल्या सतरंजीवर पडून टिपूर चांदणं बघायचो, सोबत आजीच्या गोष्टी असायच्या असं चांदणं नंतर अभावानं बघायला मिळालं... चंद्र... त्याची आठवण तारुण्यातील प्रेमातल्या त्या मंतरलेल्या दिवसांची बाकी वेळा आयुष्याच्या धावपळीत किती जणांना वेळ आहे चंद्र बघायला. फोटोग्राफीची आवड म्हणून किमान पौर्णिमेच्या चंद्राचा फोटो घेतला जातो बाकी मात्र सगळाच अर्धचंद्र निसर्गाला...

आपण
आपल्याच विश्वास गुंतून पडल्यावर वास्तवातील विश्वाकडे लक्षच जात नाही. त्यात भरीस भर म्हणून आता आभासी विश्व त्यात शिरलय. या आभासी विश्वाने अर्थात Virtual Reality ने माणसाला जवळ आणलंय की दूर केलय यावर संशोधनच करावं लागणार आहे.

तंत्रज्ञानानं जग जवळ आणलं, दूर अंतरावरील व्यक्तीला आपण हातातल्या मोबाईलवर बघून गप्पा मारू शकतो, इतकी प्रगती झाली असली. तरी त्यातला कोरडेपणा, रुक्षपणा वाढत आहे हे देखील खरं, नाही म्हणायला औषधाला शिल्लक असणारे दोन-चार मित्र आपण आयुष्यात बाळगतो... याला बाळगतो असंच म्हणावं लागेल. निरागस मैत्र असण्याचा काळ संपल्यानंतर ती मैत्री फक्त Give and Take पुरतीच उरते. नेते मंडळी जसे कार्यकर्ते बाळगून असतात तसं आपण मित्र बाळगतो हेच खरं.
मित्रांसोबत महिन्याकाठी एखादी गप्पांची मैफल हमखास ठरलेली, आता त्यालाही कोरोनाने अटकाव केला आहे.

कोरोनाचं भय साऱ्यांनाच आहे पण वाईटातही काही चांगलं बघायला हवं ना.. कारोनामुळे साऱ्यांना घरातच राहावं लागतय, यामुळे माणसं किमान स्वतःविषयी आणि कुटुंबाविषयी विचार करायला लागले आहेत.

आत्मकेंद्रित राहणारी व्यक्ती आत्मसंवाद करायला लागल्यावर त्याला जगाची जाणीव नव्याने होणारच ना.माझ्यातल्या मी पणात मग्न असणारी माणसं आता या लॉकडाऊनमुळे अति मी पणात अडकली आणि अति तिथं माती या न्यायानं स्वतःचं स्वतःवर असणार प्रेम किती चूक याची जाणीव होणं आणि कुटुंबातील व्यक्ती व जगातील इतर समाज व निसर्गाचे भान येणं याला या कोरोनाने सुरुवात करून दिली असे म्हणायला हरकत नसावी.

नद्यांचं पाणी नितळ झालय, हवा शुद्ध झालीय, दूरपर्यंत असणारे डोंगर दिसायला लागलेत, प्रदूषण आणि कचरा कमी झाला आहे. इतर प्राण्यांचे अस्तित्व मोकळेपणानं दिसतय असे एक ना अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. एका अर्थाने आपल्यातील प्रत्येकाला मृत्युच्या भीतीने जगण्याचं भान आलयं... यातूनच इतरांचा सन्मान येणार आहे. इथं तुझंही काही नाही आणि माझही... सब है भूमी गोपाल की... असा वैश्विक दृष्टिकोन या संकटाने दिलाय.



प्रशांत दैठणकर
9823199466


Monday, 20 April 2020

माका म्युझीक नाको रे...

मन सैरभैर... का अचानक व्हावे. काय ठाऊक असा सवाल आणि मन मनाच्या डोहातलं सारं ढवळून निघतं... अलगद एखादा भावनेचा खडा हे सारं ढवळून काढतो.. मग मन शांत व्हायला बराच काळ जातो... म्हणूनच कधी कधी नकोशी वाटतात काही गाणी..

संगीत मनाला उभारी देतं असं कुणीही आणि कितीही ओरडून सांगितलं तरी ते मला तरी किमान मान्य नाही. शुष्क झालेल्या त्वचेवर नखाने ओरखडा उमटावा तसं ही गाणी मनावर ओरखडे काढत असतात.

रणरणत्या उन्हात तापलेल्या डांबरी रस्त्यावर सारं शांत असताना एखादा टुकार वाहनचालक विना सायलेन्सर ची गाडी दामटवताना जो कानाला त्रास होतो होईल त्याच तिव्रतेचा त्रास मनाला अशा एखाद्या गाण्यामुळे होतो.

ते क्षण दुःखाचे होते का ?
तर तसं नाही ते क्षण आनंदाची होते पण त्याची आज अचानक आलेली आठवण दुःखात का टाकत असेल असाही विचार मनात येतो.

उसके खेल निराले... अर्थात मनाचे खेळ आणि भावनांचा घोळ हा खूप अनाकलनीय प्रकार आहे. मुळात मन हे शरीराचा भौतिकार्थाने भाग नसणारं परंतु साऱ्या शरीरावर नियंत्रण ठेवणारा अजब असं अंग आहे.

सारा का सारा सिर्फ सुनाई दे .... 
 या प्रकरणातला शरीरातला मिस्टर इंडिया म्हणजे हे मन... बरं त्या मिस्टर इंडिया ला किमान लाल रंगात बघायची सोय तरी होती. इथं मनाचा गुंताच वेगळा... त्याचा ठाव घेण्याचा प्रयत्न करताना तेच आतून ओरडतं..

ये लाल रंग कब मुझे छोडेगा

मेरा गम कब तलक......


मनाचा शोध आणि त्याचा बोध हा अज्ञाताचाच प्रवास आहे.
वेगळ्या भाषेत सांगायचं तर त्याचा शोध संगीतातल्या ८ व्या सुरात शोध किंवा इंग्रजीतील 27 व्या अल्फाबेट चा शोध घेण्यासारखं आहे.

मन शोधताना त्याचा लहरीपणा प्रथम समोर येतो... लहरीपणा ज्याला सोप्या मराठीत मूड म्हणता येईल. तसंही आपण मौसमी पावसाच्या क्षेत्रात म्हणजे लहरी निसर्गाच्या क्षेत्रात राहतो... निसर्गाची कोणती लहर, काय लहर करेल याचा भरवसा नाही. त्यामुळे त्याच्याही येण्याचा आनंद कमी आणि धास्ती अधिक असते.... आता त्याचं काय कमी तर बहुतेकांच्या Better half चाही एक स्वभाव मुडी असतो आणि उरलेली कसर इतरांच्या लहरीपणामुळे लक्ष देण्यात भरून काढली जाते.

मन स्थिर ठेवायचं तर मनोनिग्रह महत्त्वाचा असतो... मन शांत करणं हे डायटिंग सारखं असतं नेमकं डायटिंग ठरवावं त्यावेळी चमचमीत पदार्थ खुणवायला लागतात.... पाणीपुरीचा गाडा नजरेसमोर तरळतो आणि आपसूक तोंडाला पाणी सुटतं...

मनाच्या खोड्या मन शांत करताना सुरू होतात. पिपाणी वाजवणाऱ्या समोर लहान मुलांनी खिजवत चिंचेचे बोटूक चोखावे तसं शांत होताना मन अधिक अशांत होतं... 
क्या करे क्या ना करे... कैसे मुश्किल म्हणून 
हाय !.......................................  करण्याखेरीज आपल्या हाती काहीच नसतं..

संगीत हा जगण्यात काळाच्या समांतर चालणारा प्रवास आहे आणि आदमी मुसाफिर है.... तो आते जाते रस्ते में यादे सोडून जातो.... या आठवणींच्या खुंटीवर या गाण्याची गाठोडी टांगली जातात आणि म्हणूनच ते गाणं लागलं की ती खुंटी स्पर्शली जाऊन त्या आठवणींची साठवण उधळली जाते आणि मन क्षणार्धात वास्तवातून भूतकाळात जातं.... याची गती प्रकाशाच्या गतीपेक्षाही अधिक असल्याने मन सावरण्यापूर्वी पसरलेलं असतं.

संगीत साधना....
Music थेरपी.... आणि खूप काही ज्याला ज्यात आनंद वाटतो तो त्याने आपला आपला मिळवावा.... पण Maximum Time संगीत आठवण कमी आणि अडचण अधिक असल्याचा माझा वैयक्तिक अनुभव आहे...

आपलं मन आपण मांडाल तर स्वागतच पण माझं मन मत स्वीकाराच असा आग्रह आणि अट्टहास मुळीच नाही. प्रत्येकजण वेगळ्या विश्वात प्रवास करीत असलं तरी अनुभवांचा प्रवास आणि अनुभूती सारखीच                                 
   अर्थात...हमसे आया ना गया 

उनसे बुलाया ना ... गया 

 बघा  काही आठवतय काही आपल्या आयुष्यातलं... ?


प्रशांत दैठणकर

9823199466

Friday, 3 April 2020

स्मृतींची ग्रहणे

तीच सळसळ पिंपळपानांची... अंगणभर पसरत जाणारा त्याचा आवाज आणि सोबतीला तो रातराणीचा दरवळ.. दिवस ते अभ्यासाचे आणि परिक्षांचे तसेच आज ते आठवणीत राहिलेल्या तुझ्या त्या प्रेमाचे .. निमित्त होतं ते अभ्यासाचं आणि तो बहाणा होत हे तुलाही कळत होतं.. तू अबोला धरलास तरी तुझे बोलके डोळे सारं सांगत होते.. ते ताजे झाले पुन्हा आज रात्री जाग अचानक आल्यावर.. कसे आणि किती झरझर सरले ते आज आठवतंय.. अनेक क्षण येतात आयुष्यात ज्यावेळी आपण गाफिल राहतो आणि ते निघून गेल्यावर हातात सोनं पाहून निराश झालेल्या ते परिस शोधणा-यासारखी आपली अवस्था होत असते.. हातात लोखंडाचं सोनं झालेलं पण चालण्याच्या नादात परिसाचं भान राहिलं नाही..
ते आयुष्याला सोनं करणारे क्षण हाती कधी येवून गेले ते कळलं नाही मात्र आयुष्याचं सोनं झालं हे खरं आहे.....

काही दिवस असेच असतात की जे आठवणीत पुन्हा पुन्हा जगले जातात आणि ते आयुष्याचा प्रेरणास्रोत म्हणून कायम मनाच्या एका कोप-यात आपली जागा ठेवून असतात. याच दिवसांना पायाभरणीचे दिवस म्हणावे लागेल.. कारण ते दिवस मंतरलेले नक्कीच नव्हते.. बालपणातून तारूण्यात आल्यानंतरचा सारा काळ मात्र मंतरलेला होता. ते वेड.. ती धुंदी सारं काही वेगळं होतं त्याच्याही आठवणी वेगळ्या आहेत आणि त्यानेही मनाचा एक कप्पा आपल्या ताब्यात घेतला आहे...

अगदी काहीच काम नाही अशावेळी आपणाकडे घर आवरायला घेतात आणि कालानुरूप उपयोग संपलेल्या वस्तूंचा कचरा काढण्याचं काम सुरू होतं.... मनही जरा शांत झालं की ते देखील असं आवरावं आणि अडगळ झालेल्या भावनांचा निचरा करावा .. कधी तो कुणाला सांगून तर कधी त्या कोंडलेल्या भावनांना आपणच आपल्याशी संवाद साधत एकटेपणात डोळ्यातून आसवांच्या वाटे त्याचा निचरा करीत रहावं.. विस्मरण ही मानवाला मिळालेली मोठी देणगी आहे.. विस्मरण नसतं तर डोक्यात भावनांनी गर्दी करून जगणं मुश्कील केलं असतं..
असं असलं तरी काही भावना मनाला चिकटून राहण्याचा प्रयत्न करतात त्यांनाही वेळीच आपण वेगळी वाट करून मनातून काढलं पाहिजे म्हणजे नव्या सृजनाला त्यात जागा मिळेल...

दैनंदिन आयुष्यात आपण फारसा गंभीर विचार करीत नाही ते रोजचं अंगवळणी पडलेलं जगणं असतं तरी देखील आपण गंभीरपणे जगतो असं अनेकजण म्हणतात त्याचा नेमका अर्थ आणि त्याचा बोध अनेकदा होत नाही हे खरं.. आपण मात्र आयुष्यातील ते काही मनापासून जगलेले दिवस आणि त्यांच्या आठवणींची साठवण यावर आयुष्याची वाटचाल करायची असते असं माझं मत आहे.

आज ग्रीष्माची चाहूल लागल्यावर मन पुन्हा त्या दिवसांकडे धाव घेतं आणि तो क्षण जसाच्या तसा नजरेसमोर उभा राहतो जणू मधल्या काळात आपण काहीच जगलो नाही असा किंवा त्या क्षणांची ताकद इतकी विलक्षण असते की मधला काळ त्यामुळे झाकोळला जावा... अशी स्मृतींची ग्रहणे अधून मधून आयुष्यात येतात तो आयुष्याचा एक भागच म्हणावा... ते आनंददायी वाटलं ती ते तितकसं नसतं याची मनाला जाणीव आतून असते.. ही मळभ दाटण्याची स्थिती संपल्यावर पुन्हा पुढच्या क्षणी आयुष्यात रूजू होताना जरा जडच जातं म्हणा...
ती गाणी खुणावतात आणि त्या लकेरी कानात रूंजी घालत राहतात .. मन वेडं .. ON CROSSROADS .. जरा थबकतं आणि ती आठवण विसरून ( ? ) जगण्याचा प्रयत्न सुरू करतं...

येणारा दिवस सारखा नसतो हे देखील आपल्याला एक वरदान आहे त्यात कामकाजाचा नेहमीचा तोच- तो पणा ( ROUTINE ) कंटाळा आणणारा असला तरी आपण त्यातून नाविन्याचा शोध घ्यायला पाहिजे.. आपण तो घेत नाही यालाच कंटाळाही अंगवळणी पडणं म्हणता येईल. रोजची सकाळ नवी आणि वेगळी असते तसाच दिवस आणि ऋतूप्रमाणे सृष्टी बदलत असते.. आपण किती बदलतो तो महत्वाचं आहे.. आठवणींचा आधार कि भार याचाही सारासार विचार आपल्याला करावा लागेल. मी माझं आयुष्य सुंदर बनवणार हे रोज मी सकाळी आरशासमोर उभं राहून मलाच सांगतो.. कारण माझा आनंद हा माझा आहे.. इतरांना काय कळतं की मी कसा आहे... ते फक्त अंदाज बांधत असतात..

स्मृतींची ग्रहणे ही याच साठी महत्वाची 
आहेत असं मला वाटतं...
काही काळासाठीचा झाकोळ उरलेलं आयुष्य उजळणारा असेल तो हवाच आहे... हा देखील मनाच्या या अगम्य प्रवासाचा एक आवश्यक असा थांबा आहे.. म्हणूनच ते दिवस तसेच्या तसे आठवल्यावर शरीराचं वय वाढलं असलं तरी मन अद्यापही त्याच वयात आहे .. ते चौथ्या मितीत आहे.. एकाच वेळी वास्तवातलं वय जगताना ते तरूणही आहे आणि त्याचं बालपणही संपलेलं नाही याची जाणीव होतं.... स्मृतीपटल कोरा होत जाताना एक नवा आशेचा उजेड दिसू लागतो.
. नव्याने जगण्याचा आणि आनंदी जगण्याचा संदेश देणारा आणि मग....... नवं सृजन करणारा काळ सुरू होतो पुन्हा नव्याने

प्रशांत दैठणकर
98231 99466 



Friday, 27 March 2020

LOCKDOWN...! #Stay_Home_Stay_Safe

आयुष्य एक प्रकारे Pause वर आलय अशी काहीशी स्थिती या Lockdown ने आज आणली आहे. मी खूप Busy म्हणणा-या ( की दाखवणा-या ) सा-यांसाठी हा काळ नक्कीच विचार करायला लावणारा आहे. हीच संधी आहे माझ्यातला मी पणा बाजूला ठेवून मी नेमका काय हे शोधण्याची.. आत्मचिंतनाची.. Urgent काय आणि काय नाही याचा परिचय देणारा हा काळ आहे..खूप Urgent आहे असे म्हणणारे आज त्याचेच विडंबन करताना आपणास दिसतील.. एक प्रकारे हे आव्हान आपणास जाणून आपले स्थान या जगात नेमकेपणाने काय आहे याचाही बोध होईल. जान है तो जहान है हे मात्र खरं.

काळाच्या ओघात धावत राहणा-यांना आता जाणवत असेल की आपण जगायला विसरलो होतो.. असं म्हणतात की मरणाची भिती असेल तर जगण्याचं महत्व कळतं... समाज माध्यमांवर होत असणारे अनेकांचे खुलासे तर हेच दाखला देत आहेत की... ते जगणं किती नाटकी होतं.. योगायोगाने आज जागतिक रंगभूमी दिन आहे.. जिंदगी जिंदादिली का नाम है .. मुर्दादिल क्या खाक जिया करते है हे कोणाशा चित्रपटातलं वाक्य या निमित्तानं आठवलं.. जगण्यावर मंथन करण्याची एक संधीच जणू आज म़ृत्यूच्या भितीने सर्वांना दिली आहे.

बाबू मोशाय...
हम तो रंगमंच की कठपुतलीया है.. जिसकी डोर उपरवालेके हाथोंमें है ... कब कौन कहां उठ जाय ये किसी को नही पता... राजेश खन्नाचा तो गाजलेला संवाद... आणि त्याच चित्रपटाचा रिफाईन रिमेक असणारा कल हो ना हो... त्यातही तेच .. हर पल यहां जी भर जियो.. . आपल्या विचारांना यातून चित्रपट बघताना जे जाणवलं होतं ते आज प्रत्यक्षात अनुभवण्याचा हा काळ आहे असं मला वाटतं.. आयुष्याची क्षणभंगुरता एकप्रकारे यातून दिसते आणि घराघरात बसलेली प्रत्येक व्यक्ती ते अनुभवते आहे याची मला या क्षणी खात्री आहे.. यावर टिंगल टवाळी करणारे व्हिडीओ त्याची साक्ष देतात .. अति हतबलता आणि असहाय्यता विनोदाला जवळ करते.. यासाठीच आपण विनोदाचा आसरा घेतला की नाही हे प्रत्येकाने आपल्याच मनात डोकावून आपल्यालाच विचारावं...

अनेक जण छंद म्हणून प्राणी पाळतात ..
त्यांना मिरवतात देखील पण सतत एकाच ठिकाणी अडकून राहणं म्हणजे काय याचा देखील अनुभव याच काळात अनेकांना येणार आहे. आपल्याकडे भूतदया हा शब्द मराठीत आहे त्याचा अर्थ दया असाच आहे .. कैद असा नाही याचा अनेकांना बोध करून देणारा हा काळ ठरणार आहे याची प्रचिती एक दोन मित्रांच्या संवादातून मिळाली आहे आतापर्य़ंत...

आयुष्य म्हणजे खळाळतात प्रवाह असतो.... नदी वाहत राहते आणि सागरास मिळते ते आयुष्य असतं... ती संथावते पण प्रवाहीत असते. आणि हा प्रवाह एकाच जागी स्थिरावला तर त्याचा डोह होतो... आणि सारंच खुटत जातं.. आज या Lockdown च्या निमित्ताने त्या स्थिरावण्याचाही अनुभव याच काळात येणार आहे.. पण सुदैव हेच की हा ब्रेक खूप छोटा आहे आणि आयुष्य खूप मोठं.. आपण जगलो तरच पुढचं जग दिसेल या जाणिवेतून काही काळ ब्रेक भेटला आहे तर त्याचा आत्ममंथनासाठी वापर करून आपण नव्याने जगण्यासाठी तयारी करायला पाहिजे.. उगाच घराबाहेर पडण्याचं धा़डस आपणासाठी आणि समाजासाठी ही धोक्याचं आहे.. जपा ..

दगदग होते असं आपण नेहमी सागंतो .. धकाधकीचं आयुष्य आहे असंही सांगतो.. क्षणाची उसंत न घेता धावत राहतो.. यात प्रवासात आपण किमान तास दोन तास रिकामे असतो मात्र त्यावेळी आपलं मन जगाचा मागोवा घेत असतं त्यामुळे त्या वेळेचा सकारात्मक उपयोग न होता आपण ताण वाढवत असतो .. आता ना धावपळ ना दगदग सारं काही निवांत .. यात निसर्गाचं रूप बघा त्याची साद ऐकून त्याला प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करा.. आपल्या कुटुंबासाठी काही ‍Quality Time मिळालाय या जाणीवेतून त्यांना वेळ द्या.. खूप चांगलं वाटेल.. नाही त्याचं स्वप्न बघणं  विसरून आहे ते #Njoy करा...

जिंदगी ..इक पहेली भी है...


प्रशांत दैठणकर

9823199466

Friday, 27 December 2019

आनेवाला पल जानेवाला है..

नववर्ष दारात उभे आणि संकल्पांचा दिवस देखील नजीक आलाय. ...वर्ष कसं सरलं हे कळलं नाही हे दरवर्षी थर्टीफर्स्ट ला आपण बोलतो.. आणि नवे संकल्प करुन ते मोडण्याची तयारी देखील करतो.. या थर्टी फर्स्ट ला वर्ष संपतय असं नाही तर ही एका दशकाचीही निरोपाची वेळ आहे.

जाणाऱ्या दशकानं काय दिलं आणि काय उरलं याचा विचार करण्याचा हा काळ आहे. आयुष्याचा जमा खर्च मांडताना आपण मुळातच आर्थिक अंगाने या सर्वांकडे बघतो असं वाटतं.. भावनिक पसारा किती वाढला.. आपण तो किती मांडला आणि सावरला याचाही विचार या निमित्त्तानं व्हायला हवा.

.. बंध आणि बंधन हा एक आगळा पैलू या मावळत्या दशकाचा

अपने जब रुठते है तो कोई कारण होता है

रुठने वालोंको मनाना जरुरी है

हा जरुर मनाना चाहिये

पर कुछ रिश्ते फिर भी रुठे रहते है


दशकाची आणि जन्माची कहाणी याचप्रकारे पुढे सरकत असते.
रुसणे आणि त्यातून प्रेम व्यक्त करणे हा आपणा सर्वांचा स्वभाव गुण आहे. पण त्यात काही कळ होते हे कळलं पाहिजे.. प्रत्येक वेदनेवर काळच औषध...!

झटपट सरणारा काळ आपणाला सारं काही सहन करायला शिकवतो... विसर पडत नाही म्हणून आठवण येत नाही पण आतली वेदना थांबत नाही. काळानं हे शिकवलं जे संत आधीच सांगून गेलेले आहेत पण संत वचन कळतं पण वळत नाही कारण त्याला अनुभवाची जोड नसते.. अनुभवातून शहाणपण येतं आणि त्यातूनच श्रध्दा और सबुरी कळते हे देखील तितकच खरं.

या दशकानं काय दिलय असा विचार करताना लक्षात येते की, औरंगाबादला केंद्रस्थानी ठेवून मी गडचिरोलीच्या घनदाट जंगलापासून मुंबईच्या दाटीने वाढलेल्या सिमेंटच्या जंगलांपर्यंत प्रवास केला. दशकाची सुरुवात क्रांतीभूमी वर्धेतून झाली..अख्खा विदर्भ पाठ झाल्यानंतर दशकाच्या शेवटच्या वर्षात कोकणकडा सह्याद्री अशा सफरीवरुन आता रत्नागिरीत फेसाळल्या समुद्राच्या लाटांवर विसावलोय.

सागर.. मनाच दुसरं रुप.. भावनेच्या लाटा किनाऱ्यावर येत राहतात आदळतात आणि परत जातात म्हणतात सागर आपलं किनाऱ्यावरच प्रेम इथं व्यक्त करतो.. प्रत्येक वाट वेगळी आणि भावनांचंही तसंच काहीसं असतं त्या भावना सांभाळत रहायचं आणि काय..
या दशकाचा विचार करताना जाणवलं की काळ अतिशय गतीने बदलत आहे.. तंत्र बदलायला वेळ लागत नाही पण ते शिकायला आणि आत्मसात करीत त्यावर राज्य करायला मेहनत घ्यावी लागते. फार काही सोपं नाही हे.. एका बाजूस काळ सरकतो तर दुस-या बाजूस आपलं वय वाढत असतं आणि त्यानुसार शरिराच्या हालचालीत फरक व्हायला लागतो..
अशा काळात आपण आपल्यात एक लहानपण जपायचं असतं.. 
घरात तारूण्यात जाणा-या पिढीसोबत आपणही नव्याने तरुण व्हायचं.. मनाने आपण अभी तो मै जवान हूँ असं नुसतं गाणं म्हणून फरक पडत नाही तर आपणास त्यासाठी त्याच पद्धतीने जगायलाही लागतं
जिंदी हर कदम इक नई जंग... चला आता लढा ...

खळाळत्या समुद्रासारखं चैतन्य बाळगायचं ते जगण्याचं साधन आणि तेच आराधन ... भावानांचा कल्लोळ कधीही सरणारा नसतो.. तो सरणावरच सरतो म्हणून काय जगण्याचा आनंद नाही घ्यायचा...?..
 Life you get once .. Live it Fullest.. Live Happily.. Live For FAMILY.. Live for The World.. Live For Yourself.. Life you get only Once.... Remind Each Morning. Lot of  Happiness is here.. 
भावनांचं काय कधी भरती तर.... कधी ओहोटी हेच ....आयुष्य. आपण फक्त नितळ रहायचं पाण्यासारखं आणि गुणगुणत रहायचं.

पानी रे पानी तेरा रंग कैसा...!

जिसमें मिल दाे... हो जाये उस जैसा..!
 

Hat's off to the life and bye to the leaving Decade

प्रशांत दैठणकर
9823199466


Wednesday, 11 December 2019

आई..




   ते नातं काही आगळं.. आई... एक शब्द नाही तर ते आयुष्य असतं आणि त्याही पलिकडचा तो साठा म्हणता येईल. ती आली त्यावेळी तिचं महत्व नाही कळालं मात्र ते तिच्या जाण्यानं अधिक कळालं आणि आजही ते जाणवतं.. काळ येतो आणि जातो मात्र तिच्या जाण्याने तिची आठवण अधिक गहिरी होत जाते.. तिच्या बोलण्याप्रमाणे ती वागली आणि तिचं जाणं हा तिचाच निर्णय होता तो तिने पुर्ण केला.

आजही तिचं ते वाक्य कानात कायम आहे.. ती ICU मध्ये होती आणि मी तिच्याशी बोलत होतो.. कुठे चाललास पशा..? ‌ मला या नावाने बोलावणारे मोजकेच.. ती तर आई होती तिचा तो हक्क होता जन्मदाती या नात्याने.. आई मी जरा घरी जाऊन येतो.. जानूला शाळेत सोडायचं आहे... त्यावर ती म्हणाली अरे नको जाऊस.. आता मी घरी येणार ना..! दहा दिवसात दोनवेळा मेंदू शस्त्रक्रिया झालेली.. आता आयुष्यभर पांगळं होऊन रहावं लागणार हे तिने जाणलं होतं.. असं जगणं हे रोज मरणं ठरणार याची तिला जाणिव एव्हाना झाली होती...

आता जगतोय आणि पुढच्या क्षणी मरण आलं पाहिजे हे तिने अनेकदा बोलून दाखवलं होतं ..
त्या क्षणी तिच्या भावना काय होत्या हे मला कळत होतं पण ती हवी होती कायम मला.. ती व्हेंटीलेटरवर होती... तिला जगवण्याचे सारे प्रयत्न सुरू होते..त्याचीही तिला जाण होती.. मी काळजावर दगड ठेवून सारं निर्विकारपणे बघत होतो.. माझ्या चेह-यावर आतली कळ दिसू नये याचा मी प्रयत्न करीत होतो मात्र ती आई होती ना.. डोळ्यातून तिला सारं कळत होतं. आणि त्याच नात्याने मला तिच्या डोळ्यातील भाव कळत होते.

दुस-या दिवशी सकाळी मी निर्णय घेतला.. डॉक्टरना मी भेटलो आणि सांगितलं की आपण तिला व्हेंटीलेटरवर कितीही दिवस जगवू शकतो हे मान्य आहे मात्र त्यानं तिच्या वेदना काही कमी होणार नाहीत .. तिला व्हेंटीलेटरवरून काढा आणि नैसर्गिकरित्या तिचा मार्ग मोकळा करा... घरातील सा-यांचा याला विरोध होता कारण आशा होती.. आईनं दिेलेलं बाळकडू मला चांगलं आठवत होतं.. आशाय.. केशनाशाय..

माझा निर्णय पक्का होता .. तिला रोज बेडवर पडून असहा्य होऊन मरणयातना देणं मला समोर दिसत होतं.. त्याही स्थितीत डॉक्टरांनी तासभर वाट वघू असा निर्णय घेतला... अवघ्या दहा मिनिटांनी मला डॉक्टरांनी बोलावलं आणि त्या यंत्रांकडे बघा..त्यांना कार्डीयाक अरेस्ट येतोय असं सांगितलं.. माझ्या डोळ्यासमोर तिचा आत्मा शरीर सोडून जात होता... बाहेर बहिण आणि इतर नातेवाईकांचा गोतावळा आणि पाणावलेले डोळे... माझे डोळे मात्र कोरडे... तिची नेत्रदानाची इच्छा पुर्ण करण्याची माझी धावपळ एव्हाना सुरू झाली... नेत्रदान झाल्यावर घरी नेण्याची वेळ आली...

जन्माला आलेल्या प्रत्येकाला मरण येणं हा प्रवास आहे
आणि तो कोणालाही चुकलेला नाही.. इथं कुणी अमरपट्टा घेऊन जन्माला येत नाही.. तिचे अंतिम संस्कार सन्मानात व्हायला पाहिजे याची धावाधाव.. चुकूनही रॉकेलचा वापर नको.. साजुक तुपात आणि चंदनात तिचे अंत्यसंस्कार झाले पाहिजे माझ्या सूचना सुरू होत्या मित्रांनी त्यानुसार व्यवस्था केली.... ती आता तिच्या मार्गावर अग्नीच्या अधीन झाली...

12 डिसेंबर आयुष्यात कायमचं कोरलं गेलं.. आता 16 वर्षे झाली... ती शरिरानं घरात नाही मात्र मनानं घरात आणि माझ्याही मनात आहे.. सा-यांच्या आठवणीत स्थिरावली आहे.... अगदी अखेरच्या क्षणापर्यंत माझे डोळे कोरडेच होते... आज मात्र लिहिताना शब्दागणिक अश्रू ओघळत आहेत..

ती जगली असती.. चमत्कार झाला असता.. अनेक भावना मनात आहेत.. मी तिचा मार्ग मोकळा केला की तिने ...?... आज ती असायला हवी होती .. 52 हे काय मरणाचं वय नाही.. आज ती असती तर काय स्थिती असती... मन विचारत रहातं आणि मी माझ्या मनाला त्यात बुडवून टाकतो...

तिचं जाणं...ओशोच्या संदेशानुसार रात्री मी जवळच्या मित्रांसोबत सेलिब्रेट केलं... घरातील नात्याच्या गोतावळ्याला ते रूचलं नाही.. मी रडलं पाहिजे यावर ते ठाम होते पण माझे डोळे त्याही क्षणी न पाणवता कोरडेच राहिले...

दिवस जात राहिले..
त्या डिसेंबरच्या अखेरीस पाकिस्तान विरूद्ध वन-डे सामना होता... सामना रंगत गेला.. आणि आपण त्या रोमांचक सामन्यात आपण चमत्त्कारीकरित्या जिंकलो.. टेरेसवर जाऊन फटाके फोडताना सा-या शहरभर होणारी आतषबाजी दिसत होती आणि माझ्यातला मी मोकळा झालो.. आज ती असायला हवी होती.. किमान दोन तास मी मोकळा होत आसवांना वाट करून देत होतो... त्या क्षणी तिचं नसणं जाणवलं.. ती नेमकी त्या क्षणी कळली..

ती बाबरीच्या आंदोलनात आयोध्येला गेली होती ..ती श्रीनगर मधील लाल चौकात तिरंगा फडकावताना तिथं होती... आज कलम 370 झालं... आयोध्या प्रकरणी निवाडा आलाय.. आज ती असती तर किती आनंदी झाली असती... आज ती असायला हवी होती..

कदाचित त्यासाठीच म्हणतात


आई... जी उरत नाही आणि पुरतही नाही

आई.. अंगाई आयुष्यात दर रात्री आठवण

आई.. ज्यांना आहे त्यांना मनापासून सांगणं.. अरे सांभाळा आणि सेवा करा कारण ती असताना कधीच कळत नाही जाणवत नाही पण ती जाते त्यानंतर कळायला लागते.. ती ... आई.. गेल्यावर सारं जग जिंकलं तरी ती परत येत नाही  Miss You Mom  असं ‍Mothers Day ला बोलणं वेेगळं आणि खरं Miss करणं वेगळं असतं.. आज ती आठवण ताजीच आहे आणि आयुष्यभर ती राहणार  हे काही वेगळं सांगायला नकोय.
आला दिवस... विसर पडला तर आठवणं वेगऴं आणि सतत आठवण न विसरणं वेगळं असतं.. त्यातील तिची Exit मात्र आता नेमकेपणाने जाणवत राहते.. मलाच नाही तर तिला कुणीही विसरणार नाही याचीही जाणिव सोबत असते...


प्रशांत दैठणकर

9823199466

Friday, 9 August 2019

मेरे नयना सावन भादो ..... !

श्रावण... विविध रंगी श्रावण...कधी बावरा तर कधी तो गहिरा मस्त धुंद पावसाचा काळ, धुक्याची दाट दुलई घेतली आणि हिरवाईचा शालू ल्यायलेली वसुंधरा...
श्रावण असा महिना असा काळ प्रेमिकांना साद न देता शांत कसा राहिल...? अ्शा या काळात तर याला अधिक भर येत असतो...

प्रेमकुजन तसं पावसाच्या येण्यासोबतच सुरु होतं आषाढात धरती आपलं रुप पालटते आणि श्रावणात ती भरास येते... उधाणास आलेला समुद्र किनाऱ्यावर येऊन वसुंधरेला किती आपल्यात सामावून घेईल असं वाटतं त्याचा तो उताविळपणा श्रावणात सर्वाधिक. लाटामागून लाटा येत राहतात आणि पावसासोबत धरतीला तो सागरही सतत भिजवण्यात धन्यता मानतो... त्याच्या उदरातून मेघांमार्फत पाडलेलं पावसाचं दान लवकर मला परत कर .. असं काहीसं तो जणू तिला सांगत असावा.

ग्रीष्मानं पोळलेली धरती सुखावते... मग आपलं खरं रुप दाखवायला सुरुवात करते...
सुर्याच्या दाहकतेने पोळले-वाळलेले डोंगर कोरडे झालेले... पावसाचा प्रत्येक थेंब आशा होवून धरतीत सामावतो आणि निष्पर्ण होवून सूर्याला शरण गेलेले तृण जमिनीतून नव्याने कोंब होवून बाहेर येतात... जीवनाचं एक वर्तुळ पूर्ण होवून नवनिर्मितीचा क्षण सुखदायी भासतो... आनंददायी असतो.

त्याच्या वरसण्यात विविध प्रकारचे नात असतात... त्याची गती आणि लय वेगळी असते, पावसाचे थेंब हातावर झेलताना त्याला तिची आणि तिला त्याची आठवण... सारं भारुन टाकणारं असतं मंतरलेलं असतं... वळचणीला हातावर थेंब झोलताना त्याची आठवण आली की लगेच अंगणात जाऊन उभं रहायचं... चिंब भिजण्यासाठी ....त्याच्याही अंगणात पडत असेल हाच पाऊस म्हणत... तितकीच जवळीक साधण्याची संधी..

पावसाचं येणं सुरु करतं त्या आठवणींच्या पावसाला...जगलेला
क्षणांचा तो आठव झरा होवू पाझरायला लागतो आणि अचानक त्याचं रुपांतर धबधब्यात होतं... कस...?  काय..? याला उत्तर नसतं... काही प्रश्न असे असतात की त्याचं उत्तर आपण शोधायचं नसतं तर काही उत्तरं शब्दांच्या पलिकडली असतात. काहींची उकल स्पर्शातून तर काहींंची रंग आणि गंधातूनही होत असते.... काही प्र्श्नांची उत्तर आपण नकळत आपल्या नजरेतून देतो.. ‍Rather आपल्यालाही फसवून ती नजरेतून चोरली जातात ..

ते क्षण.... कमीच पडतात आठवणीत तो भिजण्यातला आनंद शरिराला ओलं करत असला तरी विरहात हा पाऊस आतल्या मनात असणारा कोरडेपणा संपवू शकत नाही... मन कोरडंच रहातं... कोरडंच रहातं... ही भावना तशी थोड्याफार फरकाने आपण कधी ना कधी अनुभवलेली असते. अर्थात त्यासाठी प्रेमात पडणं जरुरी असतं हे काही वेगळं सांगायला नको....!

मेरे नयना... सावनभादो...

फिर भी मेरा मन प्यासा...!

श्रावण असा काहिसा... न कळलेला...
पण मनापासून भावलेला... मनामनात जपलेला..

प्रशांत दैठणकर

9823199466

Friday, 2 August 2019

धकधक करने लगा

दहावी असो की बारावी अगदी साधी घटक चाचणी.. त्यात आज निकाल आहे असे ज्यावेळी सांगण्यात येते त्यावेळी पोटात गोळा येतो हे नक्की. कितीही हुशार मुलगा किंवा मुलगी असो पोटातला गोळा ठरलेला. उलट जितका हुशार तितका मोठा गोळा येणार हे सांगायलाच नको. आणि हा गोळा त्या मेरी गो राऊंड मधून खाली येताना जितका येतो त्यापेक्षाही मोठा असतो. हा सार्वत्रिक असा अनुभव आहे हे वेगळं सांगायला नको. शाळा झाली आता मुलं देखील मोठी झाली या वयाच्या चाळीशीनंतरच्या काळात असा अनुभव परत येणार आहे का..? याचं उत्तर हो असं आहे... आता विचाराल की ते कसं काय हो...?

चाळीशी नंतर आरोग्याच्या समस्या डोकं वर काढायला लागतात. वयाची धुंदी कमी होवू आपण स्थिरावतो त्यावेळी साधा होणारा पाणीबदल देखील त्रास द्य़ायला पुरेसा असतो. तारूण्यात असणारी ती धडाडी कमी होते. त्या काळात पाऊस बरसतोय याचा आनंद घ्यायला मुद्दाम बाइक घेऊन पावसात बाहेर पडणारे आता साध्या पावसाच्या आनंदाकडे वेगळ्या नजरेने पाहतात. या पावसात भिजलं तर होणारी सर्दी आणि पुढच्या आजारांचं चित्र नजरेसमोर येत असतं..

शरिराची गाडी उताराला लागण्याचा हा काळ.
यात जरा आजारपण आलं तर दवाखान्यात जावं लागतं डॉक्टर मग रक्त तपासा असं सांगतात आणि आपल्या चकरा तपासणीकडे सुरू होतात. Fasting आणि Post Meal तपासणी करायची असते. सोबतच किडनी आणि लिव्हर यांची ही फंक्शन टेस्ट सोबत सांगितलेली असते... साधारण दोन तासांनी नाश्ता करुन पुन्हा एकदा लॅब गाठणे आणि तीच प्रक्रिया .. रिपोर्ट कधी येणार तर ते सायंकाळी येणार असतात तो कागद काय लिहून हातात पडेल याची चिंता सुरु होते.

धकधक करने लगा मोरा जियरा डरने लगा... अशी काहीशी ती अवस्था आपली होऊन जाते.. आणि तो कागद हातात घेताना पोटात चांगलाच गोळा येतो.. This Very Normal बरं...
हा मुळात मानवी स्वभावच आहे.

वर्तमानात जगताना त्या भविष्यात काय़ आहे याची उत्सुकता सा-यांनाच असते तो निसर्ग नियम आहे. त्याला सोप्या भाषेत भविष्यात काय मांडून ठेवलय माहिती नाही असंही म्हणता येईल.. अनामिकाची ओढ असंही याला सांगता येईल त्यात आपल्या अपेक्षांप्रमाणे निकाल येण्याची खात्री नसल्याने हा पोटात गोळा येण्याचा प्रकार होत असतो. आणि नेमकी मनाची हीच कमजोरी हा अनेकांचा पोटापाण्याचा व्यवसाय झाला आहे Rather आजचं युग याचाच फायदा घेताना सगळीकडे आपणास दिसेल.

आपली सकाळ कशी सुरू होते.. ? जरा आठवा साधारणपणे सर्व चॅनेल आपला दिवस राशी भविष्याने सुरू करुन देतात.. हो की नाही. चांगलं घडण्याची आशा सा-यांनाच आहे त्यात आपला वाटा उचलून या चॅनल्सनी किमान दिवसाची सुरूवात तर चांगली करून दिलेली असते ही जमेची बाजू.. जे घडायचं ते घडणारच असतं ते घडतं मात्र आपण आशेचा किरण शोधत असतो प्रत्येक क्षणी हे खरं... माझी आई एक मराठीत असणारी म्हण नेहमी सांगत असे... आशाय.केशनाशाय...

आशा आहे म्हणूनच जगण्यात आनंद आहे असे सांगणारे काही कमी नाहीत बरं.
उम्मीद पर दुनिया कायम है असं म्हणतात ते यासाठीच. मात्र याबाबत माझं मत नेमकं उलट आहे. आलं ते स्वीकारणारा माणूस जगात अधिक सुखात जगतो त्यामुळे मला ते आवडतं.. कदाचित आईच्या विचारांचा प्रभाव माझ्यावर आजही असेल पण माझ्या दृष्टीने तीच वास्तविकता आहे. आपण डोळे उघडे ठेऊन जगतो असं असलं तरी आपण सजग असत नाही . वास्तव आपण सतत नाकारायचा प्रयत्न करतो... रात्री रंगवलेली स्वप्ने वास्तवात येतील या आशेवर आपण जगतो.

या जगात यश मिळवायचे असेल तर आपण उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघावीत आणि त्याला सत्यात आणण्याचे अहोरात्र प्रयत्न करावेत असे अपेक्षित आहे.. आपण उलटा प्रवास करतोय.. जगताना कठीण प्रसंग येणारच.. त्याचा आपण किती संधी म्हणून वापर करतो यावर यशाचा मार्ग असतो... सतत चांगलं घडण्याची अपेक्षाच मुळात चुकीची आहे. 24 तासांच्या आपल्या दिवसात अर्धी रात्र असते आणि अर्धा दिवस असतो.. आणि आपण काही अंटार्टीकवर राहत नाही हे समजून घेतले
पाहिजे.

वयानुसार होणारे बदल हा निसर्ग नियम आणि तो आपणाला दर क्षणाला म्हातारं करणारा न ठरता तो प्रगल्भ करणारा ठरला तर अधिक उत्तम.



प्रशांत दैठणकर

9823199466

Tuesday, 30 July 2019

#Happywala BirthDay...

आला आला म्हणताना तो आता दाराशी आलाय.. हो श्रावण येवू घातला आहे. कालीदासाने आपल्या मेघदूतम् मध्ये आषाढस्य प्रथम दिवसे असं लिहीलं होतं ..
आता चर्चा आहे ती आषाढस्य अंतिम दिवसे ची.  मला आठवणींची साठवणं खुली झालीय असे वाटते.. कारण देखील तसंच आहे.. आषाढ संपताना श्रावणाच्या पहिल्या प्रहरात वेदांतचा जन्म झाला... त्या क्षणाची आठवण अगदीच ताजी आहे आणि आज वेदांतचा 16 वा वाढदिवस आहे.. तारीख 30 जुलै ...

आठवणी अशाच पाठलाग करीत राहतात. ते कॉलेजचे दिवस माझे आणि आता वेदांतने कॉलेजला प्रवेश घेतला आहे.. काळ किती झपाट्याने जातो हे आपणास कळतच नाही... या सर्व प्रवासात एक खंत कायम मनात असते की मी कुटुंबासाठी वेळ देऊ शकलेलो नाही.. This is Life हे याच सबळ कारण असू शकत नाही. आपण नेमकं कशामागे धावत आलो असे कधी कधी वाटतं..

बालपण आणि त्यातला निरागसपणा आणि त्यातून पालकांना मिळणारा निखळ असा आनंद.. कादंबरीच्या पानावर वाचलेल्या त्या शब्दांप्रमाणे भासायला लागतात. .. हे निराशेची भावना नाही हे आवर्जून लिहायला पाहिजे या ठिकाणी.

आयुष्यात असतं काही आणखी.. फक्त पैसा कमावणं हे आयुष्य आहे का.. ?

विचार सुरू राहतात आणि त्यासोबत मुड बदलत जातो. घर आणि ते वाट बघणारं घराचं दार खुणावतं आणि रिकाम्या वेळात त्याचा विचार अधिक गहिरा होत असतो. त्या एकटेपणानं बरंच काही शिकवलय आणि आजही मी शिकतच आहे. एकटा असलो तरी
एकाकी पडायचं नाही हे मनाला बजावत जगणं सुरू राहतं.. सकाळी झोपेतून उठल्यावर मागील पानावरून आयुष्य पुढे चालू करताना अनेकदा खूप वेदना जाणवतात मनाला.

एकटेपणानं गाणे आणि संगीत यांची साथ सुटली .. गाण्याची कोणती लकेर एखादा नाजूक आठवणीचा दोर खेचेल आणि आपणाला वर्तमानातून कुठेतरी भूतकाळात घेऊन जाईल याची खात्री नसल्याने गाणं सुटलं तरी कानावर येणारे सूर रोखता येत नाहीत. किमान डोळे बंद करता येतात मात्र कान बंद करता येत नाहीत ना...

संगीत.. शब्द .. सूर.. ताल आणि खूप काही असणारं संगीत. कधी काळी टोळ्यांमधून स्थिरावलेला मानव नंतरच्या काळात व्यक्त व्हायला शिकण्याचा प्रयत्न करु लागला. त्याचा या व्यक्त होण्याच्या प्रक्रियेत अनेक पाडाव आले आणि प्रत्येक वळणावर एका कलेचा शोध लागत गेला. त्याची वाटचाल आता कला प्रांतात होत होती यात सुमारे 64 कलांचा शोध मानवाला लागला त्यात सर्वात महत्वाची कला म्हणजे संगीत होय.

संगीत आयुष्यात सर्वस्व आहे असं मानणारे अनेक आहेत.
त्याखेरीज दिवस सुरू होत नाही आणि संपत देखील नाही असं जीवन जगणारे आपल्या आसपास दिसतात. खरच संगीत इतकं मह्त्वाचं आहे का असाही वाद घालत येईल.. माझं विचाराल तर मी संगीत न आवडणा-या गटात आहे. त्याला काही कारणं आहेत मात्र संगीत आयुष्यात आवश्यक आहे असे म्हणणा-यांना मी विरोध करीत नाही कारण ती त्यांची आवड आहे.

मला संगीत कधी काळी आवडत होतं मात्र आता एकटं रहायची सवय लागली असल्याने मी संगीत ऐकणे टाळतो. कारण संथ शांत तलावात दगड भिरकावल्यानंतर जसे तरंग उठतात आणि नंतर त्या तरंगांची आंदोलनं सुरु होतात आणि सारं पाणी ढवळल्या जातं तसं काहीसं या संगीत ऐकण्यामुळे होत असल्याने मी तो टाळतो ही वस्तुस्थिती आहे..
किमान माझ्या बाबतीत तर असं होतं.. माझ्या या मताला अनेक जण दुजोरा देतील याची मला खात्री आहे.

आपण चालत रहायचं न थकता

आपणच आपली समजूत काढत

आणि मनोरंजनही करायचं

आहे ते आपलं चांगल म्हणत

आला दिवस जगण्यासाठी

घडतय ते चांगल्यासाठीच म्हणायचं

स्वप्नांना मुरड घालायची त्या

आपल्याला पडलीच नाही समजून

बाकी आहे जगायचं अजून खूप..

बघायचं आहे जग अजून खूप...

प्रशांत दैठणकर

982319466

Tuesday, 25 June 2019

निस्ताच टैम्पास......


आजकाल आपण काय करतो असं विचारलं तर एकच सांगता येईल आजकाल आपणाकडे अधिकाधिक जण Time pass करतो.. यह मै नही कहता तर सारी आकडेवारी तेच दाखवत आहे. Candy Crush नावाचा एक मोबाईल गेम माझ्याकडे आहे. आज फारा दिवसांनी काही रिकामा वेळ होता म्हणून गेम खेळायला लागलो आणि मोठ्या मुष्किलीने त्याची एक लेव्हल पार केली आणि पुढची स्क्रीन पाहून धक्काच बसला.. यात रविवार ते रविवार लेव्हलचे आकडे येतात.. एक महिला आठच दिवसात 457
लेव्हल पार करून आघाडीवर असल्याचं तिथं दिसलं... इतका रिकामा वेळ असतो का लोकांकडे असा सवाल मनात आला. तसं रिकामा वेळ असणा-यांची आपल्याकडे कमतरताच नाही हे जाणवलं...

ये देश है वीर जवानोंका....

असं गाणं लहानपणी ऐकलं होतं आता ये देश है मोबाईलवालोंका अन् टैमपास करने वालोंका असं क्षणभर वाटलं... त्यातच आज एका वृत्तपत्रात उसंडू अर्थात उपसंपादकाची एक डुलकी वाचण्या आली आजचे भविष्य लिहिताना टायपिंगच्या चुकीने वेळेचा दुरूपयोग करा असं छापून आलय... लो कल्लो बात..

आपल्या देशात सर्वाधिक वेळ हा निवडणुकांच्या चर्चेत जातो असा एक अनूभव आहे आणि ग्रामीण भागात तर तो सा-यांचा आवडता छंद आहे असंही म्हणायला काही हरकत नाही. ग्रामीण भागात आधी चावडीवर गप्पा चालत असत... आता गाव तिथं एसटी आल्यानं गप्पांची जागा बदलून ती आता एसटीच्या स्टॅंडवर सरकली आहे. त्यात मोबाईल तंत्रज्ञानाच्या विकासाने आता सा-यांना ई-चावडी आता खुली केली आहे. मोबाईलच्या मदतीने सकाळी
रांगोळी काढणारे हात आता मोबाईलच्या पॅटर्न लॉक आधी उघडतात आणि दिवस नंतर सुरू होतो असा अनुभव येत आहे.

Whatsapp वर सकाळी संदेशांचा रतीब सुरू होतो तो रात्री झोपेपर्यंत चालू राहतो. यातील अधिक संदेश न वाचताच पुढे ढकललेले आपणास दिसतील. ज्याचा जसा Net pack तसा त्याचा वापर कमी अधिक होताना दिसत होता मात्र आता 4G Technology आल्यानंतर ते बंधनही राहिलेले आपणास दिसत नाही त्यात भरीस भर म्हणून आता TikTok धुमाकूळ घालताना दिसत आहे. यात चित्रविचित्र क्लीप बनवायच्या आणि त्या Forward करायची याची स्पर्धा आपण बघत आहोत. याचं Fad इतकं वाढलं की यावर बंदी आणण्याबाबत विचार व्हावा असं मत न्यायालयानं व्यक्त केलं आहे.

या सर्व माध्यमांचा वापर आपण सर्जनशीलतेसाठी केला तर ते समजण्यासारखं आहे मात्र यातून सामाजिक तेढ निर्माण झाल्याचे देखील काही प्रकार घडले आहेत फेसबूक सारख्या माध्यमाच्या गैरवापराने काही ठिकाणी दंगलीच्या घटनादेखील घडल्या हा प्रकार अतिशय गंभीरच म्हणावा असा आहे. व्यक्त होण्यासाठीचे कोणतेही साधन हे दुधारी तलवारीसारखे असते त्याचा वापर करण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत हे नक्की. आपण इतके रिकामटेकडे आहोत का याचा देखील आपण विचार या निमित्तानं करणं गरजेचं आहे.

आपली युवाशक्ती सकारात्मक कामात वापरली गेली तर खुप काही बदल आपण घडवू शकतो यावर आपला विश्वास असायलाच हवा.

रिकामपण लाभत नाही अशांच्या रांगेत
आपण बसावं तर तिथं देखील हे मेसेजवीर बसू देत नाहीत. त्यांच्या पोश्टी आणि त्यातल्या गोष्टी कधीच संपत नाहीत ही स्थिती आहे. त्यातही नको त्या व्हिडीओ टाकणा-यांनी आणलेला तो वैताग वेगळाच. कधी कधी तर वाटतं की मोबाईल आपल्यासाठी आहे की आपण मोबाईलसाठी.

हातात जग आलय हे खरं परंतु त्याचा चांगला फेरफटका घेण्यापेक्षा YOUTUBE वर वेळ घालवणारे सर्वाधिक दिसतात. तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा हा अखेर ज्याचा त्याचा सवाल आहे मात्र त्याचा वापर विधायक होतो की नाही यावर किमान पालकांचे लक्ष असले पाहिजे.
आता PUBG त वेळ घालवायला सा-यांनाच आवडेल मात्र आपण स्क्रीन टाइमची मर्यादा देखील जपली पाहिजे ना...

फेसबूकचे पडीक अशा पिढी नव्याने पुढे येत आहे. काही मिनिटांनी आपसूक नजर आणि हात मोबाईलकडे जाणारी पिढी पाहून हा उत्क्रांतीचा नवा टप्पा तर नाही ना असाही सवाल पडतो.
डार्वीनच्या सिद्धांतानुसार आपलं शेपूट नावाचा अवयव काळाच्या ओघात संपला असं म्हणावं तर आता मोबाईलच्या रूपानं नवा अवयव आला आहे असे म्हणायला हरकत नसावी. आणि या युगाचा हा नवा अवयव असं म्हणत याला मान्यता देण्याची वेळही लवकरच येईल असे दिसते.

प्रशांत दैठणकर

982319466