प्रेमकुजन तसं पावसाच्या येण्यासोबतच सुरु होतं आषाढात धरती आपलं रुप पालटते आणि श्रावणात ती भरास येते... उधाणास आलेला समुद्र किनाऱ्यावर येऊन वसुंधरेला किती आपल्यात सामावून घेईल असं वाटतं त्याचा तो उताविळपणा श्रावणात सर्वाधिक. लाटामागून लाटा येत राहतात आणि पावसासोबत धरतीला तो सागरही सतत भिजवण्यात धन्यता मानतो... त्याच्या उदरातून मेघांमार्फत पाडलेलं पावसाचं दान लवकर मला परत कर .. असं काहीसं तो जणू तिला सांगत असावा.
ग्रीष्मानं पोळलेली धरती सुखावते... मग आपलं खरं रुप दाखवायला सुरुवात करते...
सुर्याच्या दाहकतेने पोळले-वाळलेले डोंगर कोरडे झालेले... पावसाचा प्रत्येक थेंब आशा होवून धरतीत सामावतो आणि निष्पर्ण होवून सूर्याला शरण गेलेले तृण जमिनीतून नव्याने कोंब होवून बाहेर येतात... जीवनाचं एक वर्तुळ पूर्ण होवून नवनिर्मितीचा क्षण सुखदायी भासतो... आनंददायी असतो.
त्याच्या वरसण्यात विविध प्रकारचे नात असतात... त्याची गती आणि लय वेगळी असते, पावसाचे थेंब हातावर झेलताना त्याला तिची आणि तिला त्याची आठवण... सारं भारुन टाकणारं असतं मंतरलेलं असतं... वळचणीला हातावर थेंब झोलताना त्याची आठवण आली की लगेच अंगणात जाऊन उभं रहायचं... चिंब भिजण्यासाठी ....त्याच्याही अंगणात पडत असेल हाच पाऊस म्हणत... तितकीच जवळीक साधण्याची संधी..
पावसाचं येणं सुरु करतं त्या आठवणींच्या पावसाला...जगलेला
क्षणांचा तो आठव झरा होवू पाझरायला लागतो आणि अचानक त्याचं रुपांतर धबधब्यात होतं... कस...? काय..? याला उत्तर नसतं... काही प्रश्न असे असतात की त्याचं उत्तर आपण शोधायचं नसतं तर काही उत्तरं शब्दांच्या पलिकडली असतात. काहींची उकल स्पर्शातून तर काहींंची रंग आणि गंधातूनही होत असते.... काही प्र्श्नांची उत्तर आपण नकळत आपल्या नजरेतून देतो.. Rather आपल्यालाही फसवून ती नजरेतून चोरली जातात ..
ते क्षण.... कमीच पडतात आठवणीत तो भिजण्यातला आनंद शरिराला ओलं करत असला तरी विरहात हा पाऊस आतल्या मनात असणारा कोरडेपणा संपवू शकत नाही... मन कोरडंच रहातं... कोरडंच रहातं... ही भावना तशी थोड्याफार फरकाने आपण कधी ना कधी अनुभवलेली असते. अर्थात त्यासाठी प्रेमात पडणं जरुरी असतं हे काही वेगळं सांगायला नको....!
मेरे नयना... सावनभादो...
फिर भी मेरा मन प्यासा...!
श्रावण असा काहिसा... न कळलेला...
पण मनापासून भावलेला... मनामनात जपलेला..
प्रशांत दैठणकर
9823199466