Friday 28 September 2018

#497.....

मानवाधिकार बळकट करणारा आणि स्त्री ला खऱ्या अर्थाने समानतेचा अधिकार प्रदान करणारा सर्वोच्च निर्णय आला आणि देशात विविध प्रकारच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

कोणे एके काळी मातृसत्ताक पध्दतीचा अवलंब करणाऱ्या आपल्या देशात नंतरच्या काळात पुरुषसत्ताक पध्दती रुजली.... ती इतकी रुजली की स्त्री ही केवळ दासी असावी अशा पध्दतींन घरात कोंडली गेली हे चित्र निर्माण झालं.

नवरा म्हणेल त्याला संमती देणे अर्थात 'मम' म्हणणे जणू आवश्यकच करुन टाकलं... विवाह संस्था मजबूत आहे. असं आपण म्हणत असलो तरी त्यामागचं सत्य्‍ा आपण सांगत नाही हे देखील खरं आहे.... स्त्री चं अस्तित्व संपवून तिला केवळ आपली दासी मानणाऱ्या घरांमधून केवळ पर्याय नाहीत म्हणून ही विवाहसंस्था टिकून राहिली.

स्त्री ला शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे काम शतकानुशतके सुरु होते....
शिक्षणाअभावी मग असहाय्य झालेली ' ती ' जगात स्वतंत्र जगण्याचा विचारच करु शकत नव्हती . म. जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा मार्ग खूला केला त्यानंतर काही प्रमाणात जागरुकता निर्माण व्हायला लागली.

मात्र अगदी सत्तरच्या दशकापर्यंत 'ती' चित्रपटातून आहे तशीच मांडली गेली . . . तिने केवळ त्याच्याशी समरस व्हांव स्वत:ला संपवावं याच प्रकारचा आरसा समाजातून चित्रपटात दिसला.

'ती' स्वत:ला संपवून जगत राहिली .. 'स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता' ठरवली गेली या वाक्यातली नाण्याची दुसरी बाजू जगासमोर आलीच नाही. ती विवाहापर्यंत वडीलांच्या आणि भावांच्या सांगण्यानुसार वागत होती आणि लग्नानंतर पती हेच सर्वस्व ठरवण्यात आलं... तो बेवडा, जुगारी आणि गुंड असला तरी त्यालाच परमेश्वराचं स्थान देण्याचं काम समाजात झालं.

' ती ' जोवर आपला ' स्व ' संपवत नाही तोवरच नंतर मात्र या 'स्व' ला डोकं वर काढायची संधीच नव्हती...

भला है , बुरा है जैसा भी है
मेरा पती मेरा देवता है . . . !

चित्रपटातून वारंवार ' ती ' ला दासीच राहण्याची शिक्षा दिली गेली . . . !
बदलत्या काळानुसार शिक्षणाने घराचा उंबरठा ओलांडण्याची हिंमत तिच्या ठायी आली मात्र त्या स्थितीत कौटुंबिक हिंसाचार थांबला नाही.

व्यक्तीला एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून जगण्याचा अधिकार आहे. स्वत:ची आपली मतं आहेत . . व्यक्तीला अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य हवं मग व्यक्ती ' तो ' असो किंवा ' ती ' ... !

प्रत्येक नातं विश्वासावर अवलंबून असतं आणि त्यात पारदर्शकता आवश्यक असते . .. ' ती ' आपल्याला व्यक्त करायला लागली तर तिला बंडखोर ठरवंल आणि हे खुळ आहेस असं हिणवलं गेलं विवाह हा शब्द हल्ली प्रचलनात आला आहे. सत्तरीच्या दशकापूर्वी त्याला शरीर संबंध योजणे असं संबोधलं जात होतं... खुल्या मानसिकतेतून दमनाची मानसिकता वेगळा मार्ग दाखवत होती.

शरीर संबंधाना नैतिकतेचे निकष लावायला सुरुवात झाली आणि तिथं 'अनैतिक संबंध' आणि त्यातून पुढे हत्या, आत्महत्या आदींचा शिरकाव झाला 'स्त्री' 'पुरुष' हे स्वतंत्र आहेत. त्यांची शारिरीक जडण घडण वेगळी आहे.
त्यांच्या भावनिक गरजा वेगळया आहेत आणि शारिरीक संबंध ही आयुष्यातील भावनिक व शारिरीक आवश्यकता आहे. ती अपरिहार्यता नाही हे मान्य करणाऱ्या वात्स्यायनाला विवाह संस्थेच्या रक्षणासाठी त्याच्याच देशातून देशाबाहेर काढलं गेलं.

'ती' ला जगण्याचा सन्मान हवा हे आपण लक्षात घेतलं नाही... त्यानं कसही जगलं तरी चालतं पण तिनं त्याच्याच दासी प्रमाणे जगायचं ... आलं ते स्विकारायच, कितीही भावनिक आणि शारिरीक वेदना झाल्या, कोंडमारा झाला तरीही  'ब्र' काढायचा नाही यात 'ती' संपत गेली.

सहमतीने एकमेकांच्या संमतीने शरीर संबंध याबाबतचा सर्वोच्च निवाडा त्याच्यापेक्षा 'ती' च्या आयुष्यात महत्वाचा आहे. विवाह संस्था टिकवून धरण्यासाठी स्वत:ला संपवणारी 'ती' केवळ मरण येत नाही म्हणून जगते असं चित्र अनेक घरांमध्ये दिसतं... त्याला काहीसं खुलं करण्याचं काम या निवाडयानं झालय...!

कोण होतास तू....काय झालास तू
कोण होतीस तू... काय झालीस तू...!

यातील मतितार्थ केवळ बदलाचे संकेत देणारा आहे. भगवद गीतेत सांगितलय 'परिवर्तन ही संसार का नियम है' काळ बदलला.. बदलल्या काळासोबत शिक्षण आणि सहजीवन याची पध्दत बदलली याचा परिणाम आयुष्याची वीण बदलण्यावर निश्चितपणे होवू शकतो... बदल स्विकारायचा की नाही...
'ती' ला किमान जगता आलं पाहिजे इतकी तरी प्रगल्भता 21 व्या शतकात यावी हीच अपेक्षा आहे.

शारिरीक संबंध आणि विवाह संस्था यांची सांगड जर जगण्यावर अडचण होत असेल तर याबाबत खुलेपणाने चर्चा व्हायलाच हवी.... वात्स्यायनाच्या देशात आजही आपण खुलेपणा स्विकारु शकलेा नाहीत म्हणजे काळ पुढे सरकला पण आपण मागे मागे जात तर नाही ना असं वाटायला लागतं.

विवाह संस्था ही आपल्या देशाची वेगळी अशी ओळख आहे. पण कोटयवधी 'ती' यात गाडल्या जात असतील तर त्याचा विचार होणे आवश्यक आहे.   
'ती' जगली पाहिजे 'ती' ला मोकळा श्वास घेता आला पाहिजे.... 'ती' आहे म्हणून 'तो' आहे म्हणून 'तो' असणं संयुक्तीक आहे. त्याच्या जीवनाला अर्थ 'ती' च्या मुळेच आहे.  "जिना इसी का नाम है"  ..  असं म्हणत सारं काही सहन करणा-या 'ती' ला आता काही तरी मोकळेपणा मिळेल आणि तिला तिचा शोध घेऊन तसं जगण्यात मदतीचा हात अाणि साथ देणा-या त्याच्यावरील गुन्हेगारीच्या भावनेतून दोघांचीही सुटका होईल.

प्रशांत दैठणकर
-9823199466

Wednesday 8 August 2018

"पिकनिक" ब्रेक तो बनता है !


पिकनीक हा शब्द आपण ऐकतो, पिकनीक स्पॉटला भेटी देखील दिल्या आहेत आणि पिकनीकवर जाण्याचा आग्रह धरला जातो. परंतु पिकनीक चा इतिहास आणि त्याची आवश्यकता यावर आपण कधी गांभीर्याने बघितलेले नसणार. पिकनीक आणि मानसिक आरोग्य यांचा अतिशय जवळचा संबंध आहे आणि शारिरीक आरोग्यासाठीही पिकनीक आवश्यक ठरत असते.

एखाद्या निसर्गरम्य ठिकाणावर घराबाहेर फिरताना घेतले निसर्गभोजन अशी पिकनीकची व्याख्या करता येईल. अशाठिकाणी मोकळे मैदान, आरामासाठी खोल्या असाव्यात अशा ठिकाणी घरुन पिकनीक बास्केट मध्ये जेवणाचे पदार्थ घेऊन यायचे आणि तेथे मोकळया वातावरणात बार्बेक्यू करणे तसेच सॅन्डविच व इतर खाण्याचे पदार्थ बनवणे.
खेळ खेळणे, निसर्ग भटकंती करणे मग भोजन करणे आणि आराम करणे अशा स्वरुपाच्या पिकनीकची सुरुवात 15 व्या शकतकाच्या सुमारास झाली अशा नोंदी आपणास इतिहासात सापडतात.

मनुष्य प्राणी उत्क्रांत झाल्यावर आरंभी टोळयांमधून जगभर फिरला त्यानंतर समाज घडण्याची सुरुवात झाली. समाज म्हणून स्थिरावल्यावर शेती आणि इतर आवश्यक व्यवस्था अस्तित्वात आल्या मात्र त्या काळात आयुष्याला फारशी गती प्राप्त झाली नव्हती. आयुष्याला गती प्राप्त झाली यातून पुढील काळात राजेशाहीत समाज घटकांची वाटणी झाली यामध्ये मध्यमवर्ग किंवा कामगार वर्ग असा प्रवास सुरु झाला.

सलग काम करण्यातून येणारा थकवा आणि एककल्लीपणा दूर करण्याच्या भूमिकेतून अधून-मधून निसर्ग भटकंतीतून पुन्हा ताजेतवाने होणे या भूमिकेतून कुठेतरी पिकनिक शब्दातील भ्रमंती सुरु झाली. याला निश्चित असा लेखी पुरावा उपलब्ध नाही मात्र 15 व्या शतकानंतर या स्वरुपाची पेंटींग्ज त्या काळात रंगवली गेली. त्यांचा पुरावा मानून पिकनीक आपणास सांगणे शक्य आहे.

18 व्या शतकात आलेल्या औद्योगिक क्रांतीनंतर आयुष्याला अधिक गती वाढली त्यासोबतच श्रमिकांची संख्या वाढली. या श्रमिकांकडून सतत काम करुन घेताना त्यांची काम करण्याची क्षमता हळुहळू कमी होताना दिसत होती. यातूनच धार्मिक आधारावर युरोपमधून प्रथम रविवारी सुटी घेण्याची प्रथा सुरु झाली. हा श्रमिक वर्ग या साप्ताहीक सुटीचा वापर पिकनीक साठी करायला लागला.

आरंभी आसपासच्या जागांवर होणारे हे ठराविक काळानंतरचे पिकनीक नंतर कोटयवधींचा व्यवसाय बनलेल्या आणि जगाला गवसणी घालण्याची इच्छा बाळगणाऱ्या आपल्या प्रत्येकासाठी पर्यटन उद्योगात विस्तारीत होताना आपण बघितलाय.

पिकनीक का आवश्यक आहे...
यांच उत्तर रुटीनमधून चेंज हवा म्हणून, असे देता येईल. ती जितकी आपली शारिरीक गरज आहे त्याहीपेक्षा ती आपली मानसिक गरज अधिक आहे असे सांगता येईल. मानसशास्त्रीय अभ्यासातून असा हा पिकनीकचा ब्रेक आपणास आयुष्यात आवश्यक आहे हे सांगता येते.

सतत आजारी राहणाऱ्या व्यक्तीला डॉक्टर सल्ला देतात की जरा हवापालट होईल असे बघा. याचं कारण विविध ठिकाणी शहरी भागात आज प्रदुषणाने हवेतील घातक घटकांचे प्रमाण वाढलेले आहे. दमा किंवा तत्सम श्वसन विकार असणाराच नव्हे तर प्रत्येकाला याचा त्रास होत असतो. निसर्ग भ्रमंती करतांना चांगल्या दर्जाची प्राणवायू ने भरपूर असणारी हवा आजारातून सुटका करण्यास लाभदायी ठरते. त्यामुळे शारिरीक सुधारणा आणि तंदुरुस्तीसाठी पिकनीक आवश्यक ठरते.

आज घराघरात आई-वडील आणि मुलं हे आपआपल्या मोबाईलवर स्वत:च्या आभासी विश्वात गुंतत चालले आहेत. त्यामुळे कुटुंबातील नैसर्गिक बंध धोक्यात आले आहेत. घरात कुटुंबातील व्यक्तींचा संवाद कुंठला आहे. आणि जवळपास संपत आला आहे. अशा या आजच्या काळात चार दिवस वेगळया ठिकाणी आणि वेगळया विषयावर कुटुंबात चर्चा झाली तरच हे बंध पूर्ववत होवू शकतील यासाठीही पिकनीक आवश्यक आहे.

आपआपसातील संवाद वाढण्यासोबतच
पिकनीकच्या माध्यमातून आपणास नात्यांमध्ये मोकळेपणा निर्माण करणे व काळासोबत धावतांना ताणलेले संबंध सुधारणे आणि एकमेकांबाबत असणारे गैरसमज दूर करणे व नात्यांमधील दुरावा संपविणे अशा पिकनीकच्या माध्यमातून शक्य होत असते. यासाठी ही पिकनीक आजकाल आवश्यक झाले आहे.

अशा प्रकारच्या पिकनिक मध्ये दैनंदिन जीवनात असणाऱ्या बंधनातून मन सहाजिकच मोकळे होते. त्यामुळे त्याचे लक्ष इतर बाबींकडे जाते. यातून करायच्या राहीलेल्या गोष्टी करण्याकडे सर्वांचे लक्ष जाते. ज्यातुन बॅडमिंटन पासून बुध्दीबळासारखे खेळ खेळले जातात. यातुन शारिरीक व मानसिक पातळीवर झाल्या गोष्टी विसरुन नव्याने सुरुवात करण्याची मनोवृत्ती जागी होते. आणि वेळोवेळी आयुष्यात असे घडले तर मानसिक पातळीवर तरतरी कायम राहते असे आपणास दिसते.

पिकनीक' दरम्यान आपण जे खेळ खेळतो त्यातून आपले स्नायू मोकळे करण्यासोबत..... तणावाखाली आलेले मन मोकळे करण्याची संधी आपणास मिळते. त्याच सोबत येणाऱ्या काळात येणाऱ्या तणावाखाली मन तयार करण्याचा मार्ग देखील सापडत असतो.......  लहान मुलांसाठी उन्हात खेळणे आवश्यक आहे परंतु आजकाल नेटवरील खेळातून त्यांना ती फुरसतच मिळत नाही. आपली हाडे कॅल्शियमपासून तयार होतात. हे कॅल्शियम साधारण वयाच्या 30 वर्षापर्यंत शरीरात जमा होते.
आणि त्यानंतर त्याचा साठा होत नाही तर ते केवळ खर्च होत असते. उन्हात खेळताना सुर्यप्रकाशातून मिळणारे व्हिटामिन डी-3 हे हाडे मजबूत करीत असते. त्यामुळे जितका वेळ लहानपणी उन्हात खेळण्यात जातो तितका काळ हाडे मजबूत राहतात त्या दृष्टीकोणातूनही पिकनीक लाभदायक ठरते.

त्याचा मूड ठिक नाही असे आपण म्हणतो......., हा मूड म्हणजे तत्कालिक मानसिक अवस्था असते. थोडासा मोकळेपणा आणि वेगळे वातावरण मिळाल्यावर हाच मूड बदलायला वेळ लागत नाही....मूड बदलण्यासाठी देखील या प्रकारच्या पिकनीकची मदत होते. ... म्हणतात ना मूड होता नहीं है... मू़ड बनाना पडता है..

माझ्या दृष्टीने पिकनिकचा सर्वात मोठा फायदा कोणता असेल तर तो या काळात घडणारा आत्मसंवाद होय. टिपिकल अशा ऑफिस किंवा कामाच्या रुटीनमधून बाहेर पडताना घरी आल्यावर घरच्या कामांची जंत्री वाट बघत असते. त्या पूर्ण करुन होतान न होतात तोच पुन्हा नव्याने स्पर्धेत धावावे तसे कामाला जुंपून घ्यावे लागते. हे एक प्रकारचे न टाळता येण्यासारखे दुष्टचक्र असते. यातून बाहेर पडणे म्हणजे पिकनीक होय.

पिकनीकच्या काळात शब्द बदलतात,..... माणसांची संगत बदलते..... आपणाला जाणणारी आणि मनापासून जपणारी माणंसं आपलं कुटुंब आपल्यासोबत असतं जे आपल्या पडत्या काळात खंबीरपणे आपल्या पाठीशी उभं राहत असतं. जगातल्या साऱ्या संकटांचा मुकाबला करण्याचं बळ आपणास देत असतं.
रोजच्या धावपळीत आणि धकाधकित आपण तेच तर Miss करीत असतो. पिकनीकच्या निमित्ताने ते पाठबळ पुन्हा आपणास मिळतं.

आपण काय स्वप्न बाळगलय, आणि आज वास्तव काय आहे. यात अंतर पडत असेल तर आपलं नेमकेपणानं काय चुकतय या साऱ्यांचा परामर्ष घडवून आणणाऱ्या आत्मसंवादाची संधी पिकनिक आपणास देते.

पिकनिकला मराठीत सहल असा शब्द आहे. " फूलपाखरं आली सहलीवर...... रविवारची सुटी घालवू.......चला घडीभर गंमत करु " असं एक छानसं गाणं आहे. गाण्यात जी घडीभरची गंमत सांगितली आहे त्याचा अर्थ खूप गहन असाच आहे.

" पिकनीक " शब्द तसा छोटा पण यातून आयुष्याला नव्याने उभारी देण्याची ताकद आहे....
. त्यामुळे आपणही वेळ काढून पिकनीकसाठी भ्रमंती करायला पाहिजे....... ही काळाची नव्हे तर प्रत्येकाची मानसिक आणि शारिरीक गरज आहे.

मग करतायना प्लान पिकनिकचा ...... !

-प्रशांत दैठणकर
9890422826

Tuesday 7 August 2018

लाईफ . . असही . . !


पिंपळपानांची संथ.. लयबद्धशी सळसळ

 अंगणभर नुसता सडा गुलमोहराचा

अन् पसरलेला लिंबाचा पाचोळा

त्यावर घुमणारा तो  झाडूचा नाद

वैशाख वणव्यातही येणारी अल्हादक झुळूक 

धीर - गंभीर आवाजात साद देणारी

मंदिरातली भव्य पितळी घंटा

अन् त्या सादाचा गावभर येणारा पडसाद . .

सांज समय . . . मंद मंद  तेवती समई 

दारोदारी तुळशीत तेवणाऱ्या ज्योती

कुठे तरी दूरवरच्या अंगणात

न थांबलेला चिवचिवाट

शुभंकरोती . . म्हणणारे चिमुकले सूर

शांत चित्तानं जोडलेले दोन हात

शांत . . शांत . . संथ असं आयुष्य





भॉ s s s करत भेकत निघालेली 6.41 ची फास्ट

स्टेशन सरताना कमी होत जाणारा

सारा गलक्याचा आवाज

एकमेकांना चिकटून घट्ट उभी गर्दी . . .

घामानं निथळणारे कोमेजले चेहरे

उगाच . . वारा घालतोय अंसं दाखवणारा

असमर्थ असा लटकता पंखा

त्याही गर्दीत वाट काढणारे फेरीवाले

घर दूर अन् आठवण मनात

घरी . . वाट बघणार एक दार आहे . .

रेटयानं उतरणं, गर्दीतून सावरत

वाट शोधत पुन्हा फेरीत लागणं

केवळ रंगांचा गोंधळ . . मात्र

वासाचा पत्ता नसलेला तो गजरा

आवडीनं . . की सवयीनं . . ? घ्यायचा

रांगत जाणाऱ्या रांगेत आपणही

मुंगी होवुन रिक्षा पकडायची

मनासह थकल्या देहानं घर गाठायचं


घराघरातील किचनमध्ये

धडाडत्या कुकरच्या शिटटयांचा ऑर्केस्ट्रॉ

अन् कॉरिडॉरमध्ये घुमणारा

सास - बहू सिरियलचा आवाज

दिवसभर अंग - पलंग मोडून थकले

छातीत हवा भरुन पार्कातनं परतणारे

सक्रीय आयुष्यातून बाद झालेले

पेन्शनधारी मुंग्यांचे घोळके



घर - दार प्रसन्न करुन

दोन घडी हसण्याचा प्रयत्न करतानाच

दुसऱ्या दिवसाच्या रणांगणाची

तयारी करत... शस्त्र फळीवर ठेवणारे

बिच्चारे चाकरमानी योध्दे


आयुष्य असंच . . कुठं सक्रीय

कुठं गंभीर तर कुठं निक्रीय

आपण . . फक्त बघायचं

पर्याय नाही असं म्हणत प्रत्येकानं

शेवटच्या श्वासापर्यंत धीरानं

मरण येत नाही म्हणत जगायचं

------------------------------ मुंबई ते डोंबिवली . . 10-4 2001 

प्रशांत दैठणकर
9823199666


Saturday 4 August 2018

फ्रेन्डशिप. दोस्ताना .. याराना...मैत्री....!

 भारतीय हे मुळातच उत्सवप्रीय आणि तो उत्सव मग कोणताही असो, कोणत्याही धर्माचा असो त्याचे भारतियीकरण करुन आपण साजरे करायला सुरुवात करतो..... असाच गेल्या 3 दशकात लोकप्रिय झालेला उत्सव अर्थातच ' फ्रेन्डशिप डे ' होय.

चित्रपटवेडया भारतीयांनी शोले चित्रपटाला खूप प्रतिसाद दिला. त्यातली ती जय-विरुची जोडी हे दोस्तीचं प्रतिक जितकं सर्वांच्या लक्षात आहे तितकाच अमिताभ-अमजद खानचा याराना लक्षात आहे. रुपेरी पडद्यावर देास्ती फार जुना विषय आहे.....!

एकमेकांचे सुख दु:ख वाटून एकरुप होत जगणं,... म्हणजे मैत्री अशी साधी सोपी व्याख्या सांगता येईल पण मैत्रीचं नातं त्याच्याही पलिकडे जगलं जातं.... भावनिक ओलावा.... भावनिक पोकळी.... आणि मानसशासत्रीय दृष्ट्या बरेच असे पैलू आहेत ज्यावर मैत्रीचं हे नातं निर्माण होत असतं.

या मैत्रीच्या नात्यात आणि विवाहात खूप फरक आहे हे देखील सोबत सांगावं लागतं..... लग्नानंतर जोडीदाराशी मैत्री होणं वेगळं आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात व पुढे विवाहात होणं वेगळं मैत्रीला नात्याच्या बंधनाची गरज नसते....मैत्री म्हणजे give and take नसते....
कोणतीही अपेक्षा न ठेवता अर्थात निरपेक्ष वृत्तीने एखाद्याशी ' वेवलेंग्थ ' जुळली तरच पक्की मैत्री होत असते.

शाळेत वर्गात 40-50 मूलं मुली असतात ते वर्गमित्र असतात... आसपास आपण अनेक जणांसोबत काळ व्यतीत करतो.... खेळतो... ते सवंगडी असतात.... त्यात काहीच जणांना आपण मित्र म्हणून जवळ करतो....! आपल्या जमेच्या बाजू जगासमोर आरडून सांगण्याची आपली वृत्ती ही नैसर्गिक आहे.... पण आपल्यातला कमीपणा आपण जगाला सांगत नाही.... तो शेअर करायला आपल्याला 'मित्र' लागतात....! ते एक वेगळं मोकळं असं नातं... चूकल्यास चूक दाखवून देणारं.. त्याचा वाईटपणा वाटत नाही आपल्याला... एकमेकांसाठी झोकून देणं... काळ वेळ याचे भान हरपणं.. म्हणूनच मी म्हणतो की मैत्री ही शंकराच्या मंदिरासारखी असते.... शंकराच्या मंदिराला दार असतं नाही.. ते कायम खुलं असतं....

आयुष्यात काही गोष्टी अशा असतात की, त्या आपण सख्ख्या नात्यात शेअर करत नाही अगदी पत्नीसारख्या नात्यातही शेअरिंगच्या मर्यादा असतात.
असा आडपडदा मैत्रीच्या नात्यात राहत नाही....!

लम्हे चित्रपटात एक सुंदर दृश्य आहे. नायक अनिल कपूर एका संतापाच्या क्षणी त्याची सावली बनून राहणाऱ्या मित्राला, अनूपम खेरला माझ्या आयुष्यातून निघून जा असं सुनावतो त्यावेळी अनुपम खेर म्हणतो.... मै नही जा सकता, मुझे पता है तुम्हे रोनेके लिये एक कंधेकी जरुरत पडती है..... हनी इराणीने मैत्रीच्या नात्यातील हा पदर मोठया नजाकतीने समोर आणला आणि अनुपम खेरने आपल्या अभिनयातून तो अजरामर केला..... त्याचं सोनं केलं.

हिंदी चित्रपट सृष्टी गाणी, नातेसंबंध आणि भावना यांचं सुरेख मिश्रण आहे. त्यात असंख्य चित्रपट याच फ्रेंडशिपवर आधारलेले आपणास दिसतील......!

सात अजुबें इस दुनियां में आठवी अपनी जोडी....

तोडे से भई टुटे ना ये धरम-वीर की जोडी .....!

धमेंद्र आणि जितेंद्रची ही जोडी एक काळी खूप गाजली होती..... त्या मैत्रीच्या नात्याला अधोरेखीत करणारा असा हा चित्रपट होता.

मैत्रीचे अनेक पैलू विविध चित्रपटात आपण बघितले आहेत. याच मालेत अमिताभ बच्चन आणि शत्रुघ्न सिन्हा यांचा ' दोस्ताना ' प्रचंड यशस्वी ठरला होता....

पता कोई पुछे तो कहते है हम
के इक दुजे के दिलमें रहतें है हम....!


मैत्री अशीच असते ते नातं खूप खूप वेगळं नातं आहे.... यात दोस्त.... हो पक्का आणि सच्चा दोस्त़ इच्छा, आकांक्षा पुर्ण जाणून असतो. त्यामुळेच सच्चा दोस्त पक्का वैरी होण्याचाही मोठा धोका असतो.... भावनिक खुलेपणा कधी कधी वेगळे आणि कठीण असे प्रसंग आयुष्यात निर्माण करु शकतो याचीही जाणीव असावी असा पाठ देणारा हा ' दोस्ताना '.

विषय मैत्रीचा आहे म्हटल्यावर शोमन राज कपूरला कसं विसरता येईल.

दोस्त दोस्त ना रहा.....!
प्यार प्यार ना रहा....


अर्थातच चित्रपट ' संगम ' मैत्रीच्या नात्यात फूट पडणं काही नवं नाही पण हे अंतर केवळ गैरसमजातून पडतं.... कधी कधी ' अहं ' आडवा येतो..... पर चलता है दोस्ती मैत्री थांबत नाही.

पठाणाच्या भूमिकेतला प्राण ज्यावेळी मित्र बनतो त्यावेळी.

यारी है इमान मेरा ....यार मेरी जिंदगी....!

सारखं मैत्रीचं उदाहरण समोर येतं...
मैत्रीच्या या नात्याचा चित्रपट कथानकात सर्वात चांगला वापर फिरोज खानने केला... त्याला विनोद खन्ना सारखा उमदा नायक मैत्री साठी सापडला होता.... 80 च्या दशकातला ' कुर्बानी ' असो की 90 च्या दशकातला ' दयावान ' या दोघांची ऑनस्क्रीम आणि ऑफस्क्रीन मैत्री सर्वांसाठी आगळं उदाहरण ठरली.

चित्रपटांपलिकडे या मैत्रीचा विचार करु त्यावेळी अमेरिकेत पहिला फ्रेंडशिप डे साजरा झाला. त्याला उद्या बरोबर शंभर वर्ष पुर्ण होतील..... 1919 मध्ये सर्वप्रथम अधिकृत ' फ्रेंडशिप डे ' साजरा झाल्याची नोंद आहे. आपल्या भारतात हल्ली याचं महत्व वाढलय. जगभरात अनेक देशात संयुक्त राष्ट्रांनी घोषित केलेला फ्रेंडशिप डे हा 30 जुलैला साजरा होतो.

आम्हाला उत्सव साजरा करायला दिला की, आम्ही त्याला भारतीय रंग देऊन मोकळे होतो. त्यामुळे मैत्र या नात्याची ओळख म्हणून ' कृष्ण-सुदाम्याचे ' नाते आम्ही समोर करतो.... चारच दिवसांपुर्वी टिळक पुण्यतिथीला सोशल मिडियावर लोकमान्यांनी न खाल्लेल्या आणि न उचलायच्या शेंगाची टरफलं पसरली तसं या मैत्री दिनी आता येणारे 48 तास सुदाम्याचे पोहे सर्वांना सापडतील.

...... चाळीशी ओलांडल्यानंतर मैत्री होणं अवघड अशा स्थितीत मैत्री टिकवण्यासाठी ' फ्रेडशिप डे ' साजरा करायचा पण त्यातील किती जणांना ' फ्रेंडझोन ' माहिती आहे ?.... फ्रेंडशिप डे च्या पलिकडली वाटचाल करणाऱ्या नव्या पिढीलाच ते माहिती आहे....!

चाळीशीतल्यांनी फक्त प्रार्थना करायची. ...
. सलामत रहें दोस्ताना हमारा.....!

Happy Friendship Day.

 प्रशांत दैठणकर

9823199466

Wednesday 1 August 2018

हाथ से छूकर इसे रिश्तोंका इल्जाम ना दो ....


ती आठवणीतली . . लहानपणीची . . कोणास ठाऊक आज कुठे आहे ती ? त्या वेळी ती माझी सावली असल्याप्रमाणे वावरायची आज मला वेळ नाही अन् कदाचित तिला फुरसत नसावी . .. संसाराच्या राम रगाडयात गुंतली असणार हे नक्की . . .!

माझी उंची जेमतेम 5 फूट होती त्यावेळी वर्ग आठवा . . . आजही आठवतो आणि तिची उंची साधारणपणे 6 फूट . . . सशक्त . . . शाळेच्या बास्केटबॉल टिममध्ये होती . . . रंग गोरा पान आणि लोभसवाण्या मुखडयावर पडणारी ती खळी . . . त्यात अधिक जमेची बाजू म्हणजे निचे घारे आणि टपोरे डोळे . .
. मला सहसा घाऱ्या डोळयाची माणसं आवडत नाहीत पण ती आवडायची . . . !

साऱ्या गल्लीभर होणारी ती चर्चा कानावर कधी आली तरी आम्ही दोघांनी त्याकडे कधी लक्ष दिलं नाही आठवी ते दहावीच्या त्या प्रवासात ती माझी सखी होती ती माझी राधा होती . . . मैत्र आणि मैत्रीच्या पलिकडे मनात कुठलाही विचार कधी आला नाही . . निखळ मैत्री, मुलगा आणि मुलगी हो मुलगा आणि मुलगी यांच्यातही निखळ मैत्री होवू शकते याचं ते उदाहरण होतं प्रत्यक्षातलं . . आज मागे वळून बघितल्यावर जाणवतं . . . मन निष्कलंक, निष्पाप असेल तरच अशी मैत्री होते . . तशी ती मैत्री होती . . . !

ती मुलगी असूनही मित्र मात्र ' गर्लफ्रेंड' म्हणता येणार नाही. असं नातं जपंल होतं. त्यात ती राजस्थानी असल्याने माझ्या घरी तिला अन् तिच्या घरी मला घरच्यासारखं अगदी कुटूंबातील एक व्यक्ती आहे असं म्हणून वागणूक मिळायची.

तिच्या अंगणात भलं मोठं पिंपळाचं झाड आणि त्याचा पार होता. त्या पाराजवळ बैदूल अर्थात गोटया खेळणाऱ्या गल्लीतल्या साऱ्या मुलांचा सकाळ संध्याकाळ कल्ला सुरु रहायचा साधारण एकाच वयोगटातील गल्लीत असणाऱ्या मुलांची संख्या 35 पेक्षा अधिक होती.
त्या मुलांनी गोटया खेळायला सुरुवात केली डावावर डाव जिंकत गोटयांची संख्या इतकी वाढायची की चक्क परात घेऊन गोटयां फेकाव्या लागत होत्या तो रंगलेला डाव तासनतास बघण्यातील गंमत वेगळीच होती.

टि. व्ही विरहीत असलेल्या दिवसांमध्ये शाळेचा वेळ सोडला तर बाकी सारा वेळ हा फक्त खेळण्यासाठी होता आणि विशेष म्हणजे ते सर्व खेळ मैदानी होते. नाही म्हणायला उन्हाळी सुट्टयात दुपारच्या उन्हात जायची बंदी असलेल्या काळात एखाद्याच्या घरात बसून ' व्यापार ' खेळणे किंवा पत्त्यामधील लाल पान सात , पाच तीन दोन तर कधी झब्बू असे खेळ रंगायचे. गल्लीत कॅरम दोन- तीन जणांकडेच होता. अगदी हक्काने माझा पार्टनर म्हणून ती हट्ट करायची .

माझ्या सोबत दुपारी घरात बसून आईच्या हातचं जेवण हा दोघांचा दुपारचा नित्यक्रम ठरलेला . घरं तसं खूप मोठं नव्हतं साधारण 12 बाय 12 ची एक खोली त्यामध्ये आई - नाना मी आणि दोन लहान बहिणी असा परिवार जागा रहायच्या दृष्टीने छोटी असली तरी मनात भरपूर जागा असल्यानं ती माझ्या घरातली एक सदस्य बनली होती.

प्रशांत मुझे History -Geography पढाओना असा तिचा हट्ट पुरवण्याचं काम मी देखील आनंदानं पार पाडत होतो. इतिहास आणि भूगोल या विषयात मला पैकीच्या पैकी मार्क मिळायचे त्यामुळे शाळेतही तसा आग्रह असायचा तिची मातृभाषा मराठी नव्हती. त्यामुळे तिला हे विषय अवघड वाटत होते . .
आमच्या दोघामध्ये एक साम्य होतं ते गणिताच्या बाबतीत . . . दोघांचं मैत्रीचं गणित पक्क होतं पण अभ्यासातील गणिताच्या विशेषत: अंकगणिताचा विषय नावडीचा होता.

दिवसामागून दिवस जात राहिले आणि मैत्रीचा धागा अधिक घट्ट झाला . . . त्याच सुमारास गल्लीतलं घर सोडून दुसऱ्या ठिकाणी घर घेतलं दरम्यानच्या काळात नववी व दहावी दरम्यान आमच्या दोघांच्या मैत्रीत आणखी एक मैत्रीण Add झाली होती त्यामुळे मैत्रीची रंगत अधिकच वाढली होती.


घर बदललं त्याच सुमारास दहावी पूर्ण होवून सायन्सला प्रवेश घेतलेला तिने मात्र दुसऱ्या कॉलेजला प्रवेश घेतला होता. घर आणि महाविद्यालय दोन्ही दुरावल्यावर नव्या विश्वात सामावून घेताना नवे मित्र होत गेले बदलाचं आणि अधिकाधीक बदलण्याच हा काळ होता. त्याच सुमारास माझी आणि विजयाची भेट झाली . . . पहिल्याचं भेटीत तिने खणखणीत सवाल केला लग्न करणार असेल तरच . .पहिली भेट आणि स्विकार . . . आयुष्याला पूर्ण कलाटणी होती ती . मी बाराव्या वर्गात तर विजया अकरावीला त्या भेटीनंतर जग बदललं. . . या नात्यात आता ब-यापैकी अंतर  पडलं होतं . . .हे अंतर नंतरच्या काळात वाढतच गेलं.... हळू हळू संपर्क कमीच झाला आणि भेटी होईनाशा झाल्या एव्हाना तिच्या कुटूंबियांच्या दृष्टीनं ती लग्नाच्या वयात आलेली अन् झटपट लग्नही झालं होतीच ती तितकी सुंदर अगदी आरसपानी सौदंर्य म्हणतात तसं ते सौदंर्य . . माझी गल्ली सुटली आणि मैत्री देखील . . .सुटले नाहीत ते आठवणींचे धागे... काळ आपल्या गतीने चालतच आहे मात्र आठवणींचे धागे देखील काळासोबत अधिक घट्ट होताना मला जाणवतात हा प्रवास असाच चालणारा असतो हे काही वेगळं सांगायला नको...
त्या वयात असणा-या तिच्या सौंदर्याची भूरळ इतरांना निश्चितपणे पडली होती. . आजही कटरिना कैफ पडद्यावर दिसली की तिची आठवण येते . . . अगदी तशीच सुंदर होती ती . . . इतक्या वर्षांनी आठवण . . . येते अधून - मधून . . मन कधी एखाद्या क्षणी त्या काळात गेलं तर तिची आठवण येते . . . ते मैत्रीचं नातं आठवून आनंद होतो . . !

ती कुठे असते . . . किंवा ती सध्या काय करते याची उत्सुकता असली तरी आजवर मी त्याबाबत कधी विचारणा केली नाही . . . माहिती घेण्याचाही प्रयत्न केला नाही . . . काही नाती फक्त नशिबानं मिळतात . . . ते भाग्य दोघांचं होतं . . . ती तिच्या विश्वात असेल अन् मी माझ्या विश्वात . . . !

त्या वयात पडलेलं ते स्वप्न समजून आजवर ते नातं उरात जपलय . . .
वहीत ठेवलेल्या पिंपळपानांसारखं, तिची ती निखळ मैत्री . . . ते सौंदर्य अन् ते घारे डोळे . . . आता इतका काळ गेलाय की तिचा चेहराही धुसर झालाय स्मृतीत गेला... आज ती एखा्द्या वेळी समोरून गेली तरी मी तिला ओळखेनच याचीही खात्री नाही माझ्या मनाला..... आठवणीत असणारी  अजूनही 12- 13 वर्षांचीच आहे  आता तीच आठवण जगायची ... तिच्या आठवणी सोबत गाणं अंतर्मनात वाजायला लागतं.

हमनें देखी है इन आखोंमे महकती खुशबू

हातसे छुके इसे रिश्तोंका इल्जाम ना दो . .


निखळ मैत्रीतली ते निष्पाप प्रेम आजही नात्यात बांधायचा विचार देखील मनात येत नाही . . कदाचित आयुष्य अशाच नात्यांची गुंफण असतं .

प्रशांत दैठणकर

9823199466 



Monday 30 July 2018

गारूड.... गॉसिप.....अन् ..... रेखा....!




काही लपवायचं ज्यावेळी आपण ठरवतो त्यावेळी ती गोष्ट असंख्य प्रयत्न करुन लपत नाही..... प्यार और खुशबू लाख छुपाओ छुप नही सकती असं म्हणतात ते अगदी खरं आहे.

अर्थात सुचण्यास कारण की, आयफा अवार्डस् मधलं अभिनेत्री रेखाचं वय 20 मिनिटांचं नृत्य. या नृत्यानं इन्डस्ट्रीला खूप मोठी सफर घडवली. जुन्या काळाची आणि जुन्या स्मृतींना उजाळा दिला.

फार काही कळण्याचे ते दिवस नव्हते. मात्र त्या काळात जमा झालेल्या आठवणीच्या खात्यात सर्वात अधिक प्रमाण सिनेमा आणि सिनेमातली गाणी यांचेच होते . .
यासाठी मी आजकाल कधीच संगीत ऐकत बसत नाही पण कानावर एखाद्या गाण्याची लकेर आली तर ते तबकडीवर सुई अडकावं तसं ते गाणं दिवसभर कानामध्ये नाद करीत राहतं.

आपली चित्रपटसृष्टी ग्लॅमर आणि गॉसिपचा प्रचंड मोठा महासागर आहे. 1975 ते 1985 च्या काळात टिव्हीचा शिरकाव झालेला नव्हता त्यावेळी मनोरंजन हे केवळ मासिक , साप्ताहिके आणि रेडिओच्या आधारे व्हायचं . . त्याकाळी चित्रपट बघणे हा साप्ताहीक उपक्रम होता . . . हमखास ठरलेला उपक्रम . . ! चित्रपट सृष्टीवर अँग्री यंग मॅन अमिताभ बच्चनचं राज्य सुरु झालं आणि विस्तारत गेलं तो खरा सूपरस्टार होता आणि त्यामुळेच त्या काळात ज्यांचं बालपण गेलं त्यांना आठवणींचा हा खजिना गोळा करता आला. ' मायापुरी ' नावाचं साप्ताहीक त्या काळी लोकप्रिय होतं त्यात ' मगर हम चूप रहेंगे ' असं सदर हे गॉसिपला अर्पण केलेलं होतं . . .
त्यानं मोठया प्रमाणावर चर्चेची राळ उठवून देण्याचा जणू चंग बांधला होता आणि लोकांनाही ते आवडत होतं . . आम्हीतर लहान होतो . . . पण अाजही छापून आलेल्या शब्दावर विश्वास ठेवणाऱ्या ( अगदी डोळेझाकून . . ! ) या देशात त्याकाळी विश्वास ठेवण्याखेरीज पर्यायच नव्हता.

अठरा बरस की तू . . होने को आयी रे
कौन पुछेगा . . . जतन कुछ करले . . !

रेखा आणि अमिताभचं अफलातून गाजलेलं गाणं . . ते नंतरही लक्षात राहिलं त्याला वेगळं कारण आहे . . कॉलेजच्या गॅदरिंग मध्ये म्यूझीकल फिशपाँन्ड अर्थात शेलापागोटयांचा कार्यक्रम असे . . . यातील गाण्यांच्या रेकॉर्डिगची जबाबदारी अर्थातच गाण्यांचं अधिक ज्ञान असल्यामुळे माझ्यावर होती महाविद्यालयातली ती सर्वात सुंदर मुलगी ( नाव सांगत नाही ) तिला बघण्यासाठी सेकंड इयरची मुलं फर्स्टइअर च्या वर्गात बसत असत इतकी सुंदर

                                                                   हे अठरा बरस की . . . !    गाण तिला फिशपॉन्ड म्हणून टाकलं . . . कौतूक वाटलं पाहिजे होतं पण ती रडायला लागली . . . सारा रुदनकल्लोळ झाला . . प्रिन्सिपलकडे तक्रार झाली आणि त्या वर्षापासून आजपर्यंत फिशपॉन्ड चा कार्यक्रम कॉलेजमध्ये झालेली नाही . . . . याला आता तब्बल 30 वर्षे झालीत .

त्या काळी चर्चा केवळ अमिताभ आणि रेखा यांचीच होती . . . नेमकेपणानं वास्तवाच्या बाबती माहितीची गॅप जिथं निर्माण होते तिथं गॉसिप सुरु होतं अशी माझी गॉसिपची मी स्वत: केलेली सोपी व्याख्या आहे . . . हे गॉसिप आजचं नाही हे महाभारताच्या काळापासून चालत आलय . . धर्मराज्य सत्याखेरीज काही बोलत नाही हे माहिती असल्यानं युध्दात अश्वस्थामा मरण पावला का असं गुरुवर्य होणाचार्यांनी विचारलं त्यावेळी धर्मराजाचं उत्तर होतं . . . हो परंतु पुढे पुस्ती जोडली होती . . . . नरो वा कुंजरोवा . . . ! अश्वस्थामा मेला पण नर की हत्ती माहिती नाही . . . हे नरो व कुंजरोवा म्हणजे ज्ञात इतिहासातलं पहिलं गॉसिप होतं.

अमिताभ असो की रेखा दोघांनीही आपल्यात प्रेमसंबंध आहेत की नाही याचा
आजवर खुलासा केला नाही..... त्यांच्या प्रमाच्या गॉसिपला सत्य असल्याचा दर्जा देणारा ' सिलसिला ' चित्रपट आला आणि पब्लीकने त्यावर पुर्णपणे ' आहेच ' असं शिक्कामोर्तब केलं.....!

रुपेरी पडद्यावरील रेखा-अमिताभ यांची केमिस्ट्री मात्र अफलातूनच होती... तो मग ' मुकंदर का सिकंदर ' असो की सुहाग वा सिलसिला.... नात्यातला मोकळेपणा गॉसिपला वाव देणारा होता आणि तेच आजवर कायम आहे. दोन व्यक्तींमधील वेवलेंग्थ जुळणं आणि त्यातून पुढे कलाकृती सादर होणं यात अमिताभ आणि रेखा यांची तोड कुणालाच नाही..... अमिताभचा विवाह जया भादुरी सोबत झाला आणि तो आजवर कायम आहे. तर रेखाचे 4 विवाह झाले पण आजही तिचं स्टेटस सिंगल आहे.....!

प्रत्येक व्यक्तीला स्वत:मधील नायक खुलवण्यासाठी अशी जवळीक आवश्यक असते. बहुतप्रसंगी ती जवळीक पत्नीच्या नात्यात मिळत नाही म्हणून अशा नात्याला नावं ठेवण्याची गरज नाही... असं नातं कधी कधी वरदान असतं..

रेखाचं नृत्य ते देखील सलग 20 मिनिटे.... आजचं तिचं वय 63 वर्षांचं आहे...
. तिचं सौंदर्य वादादीत आहे. आणि तिचा स्टॅमिना थक्क करुन सोडणारा आहे. आज चाळीशी ओलांडलेल्या केवळ स्त्रियाच नव्हे तर पुरुषांनीही स्वत:ला ' मेन्टेन ' करण्यासाठी रेखाची प्रेरणा घ्यावी असं सांगावं वाटतं....!

वय आणि सौंदर्य .... काय संबंध ? वयानुसार सौंदर्य वाढत जाणं ही खरी कमाल आहे. ती रेखाच्या रुपानं बघायला मिळते.... या सलग नृत्यात असलेल्या अखेरच्या गाण्यात तिने अमिताभ बच्चनच्या नाचातील स्टेप्स साकारल्याने आता पुन्हा गॉसिपला नवा मार्ग खुला झालाय असं म्हणायला हरकत नाही. रेखा गणेशन.... खरं नाव भानुरेखा गणेशन. जन्म 10 ऑक्टोबर 1954 .... बाल कलाकार म्हणून वयाच्या 12 व्या वर्षी तामीळ चित्रपट ' रंगुला रतनम ' व्दारे चित्रपट सृष्टीत पदार्पण .... चित्रपट सृष्टीत सुवर्ण महोत्सव पुर्ण करुन त्यापुढील वाटचाल सुरु केलेली.... तिचं आयफातलं नृत्य सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का देणारं होतं....!

सातत्य ...आणि सराव याच्या बळावर आपण किती मोठं यश मिळवू शकतो हे रेखाच्या आजवरच्या वाटचालीतून दिसलय..... ये जो पब्लीक है.... ये गॉसिप करनेसे खुद को रोक नहीं सकती.... आपणच आपली वाटचाल जारी ठेवायची....
आयुष्याला कोणतीही ' लक्ष्मणरेखा ' न आखू देता चालत रहायचं... रेखाचं गाॅसिप जितकं आहे त्याहीपेक्षा अधिक तिच्या सौंदर्याचं गारुडही विलक्षण आहे हे मान्य करावंच लागेल...

- प्रशांत दैठणकर

9823199466

Saturday 28 July 2018

...तुझा अबोला..!

बोलता बोलता शब्दांनी दुखावलं गेलेलं मन मग अबोला धरतं..

हा रुसवा सोड सखे

पुरे हा बहाणा.. सोडना अबोला..! 

 हा एक प्रकारचा असहकार असतो त्या नात्यामधला... सतत बोलणारी व्यक्ती अबोल झाली तर करमत नाही मनाला.. कुठतरी मनात वेदना जाणवायला लागते... नांत कोणतही असलं तरी त्यात निषेधाचा हा मार्ग साऱ्यांना खुला असतो. आता हाच अबोला धरण्याची सवय आपणास अगदी बालपणासून जडते...आम्ही नाही जा.. म्हणत लहान मुलं 'कट्टी' करतात पण ती खूप निष्पाप असतात त्यांची ही कट्टी अल्पावधीत संपून जाते.. बोलत राहणं ... संवाद साधणं हा मानवाचा मुळ स्वभाव आहे.

वय जसं वाढतं तसं भावना बदलाला सुरुवात होते...

मोरा पिया मोसे बोलत नाही...


असं एक छानस गाणं मधल्या काळात आलं होतं.

जितेंद्र रेखा यांचा एक चित्रपट माझ्या लहानपणी पाहिला होता.
'एक ही भूल' हा तो सिनेमा .. पती-पत्नीतील ही अनबन सतत सुरु राहिली तर प्रकरण भलत्या स्तराला जाऊ शकतं याची जाणीव दोघांना असली पाहिजे. पती-पत्नीच्या नात्याला संशयाचं जाळं लागलं तर बाब खूप बिघडते यात 'सुलह' कराने वाला अर्थात मध्यस्त असेल तर तोडगा सहजपणे निघू शकतो मात्र ते दोघेही इरेस पेटले तर मात्र काडीमोड हा अंतिम उपाय असतो.  अशाप्रकारे अनेक संसार तुटल्याची उदाहरणे आपल्या आसपास आपणास दिसतात.
याला काडीमोड हाच शब्द योग्य आहे कारण घटस्फोट हा शब्द केवळ आणि केवळ अंतिम संस्कारच्या वेळच्या कृतीसाठी वापरतात पण आजकाल मराठीचं तंत्र बिघडलं आहे आणि कोणीही कोणताही शब्द कोठेही वापरताना दिसत आहे. मन खंबीर होतं त्यासोबतच ते अधिक हट्टी होत असतं.. ते हट्टी झाल्यावर हा कट्टीचा काळ वाढतो आणि लवकर लवकर गट्टी जमणं बंद होवून जातं ......नातं कोणतं आहे त्यावर मग हा अबोला धरण्याचा कालावधी ठरत जातो ... पती-पत्नी यांच्या नात्यात असणारा आपलेपणा
आणि जवळीक खुपच वेगळी असते मात्र या नात्यात देखील या अबोल्याचा वापर शस्त्राप्रमाणे होताना दिसतो.. यात दोघांपैकी कुणी माघार घ्यायची असा अहं आडवा आलं तर प्रकरण थेट संबंध संपण्यापर्यंत बाब वाढते.

मौनम सर्वार्थ साधनम् ! 

असं एक वचन आहे.. आपण मौन पाळलं तर आत्मपरिक्षणास सुरुवात होते..  न बोलणे आपल्या आयुष्यात सकारात्मक देखील असू शकते.. याचा उत्तम वापर झाला तर त्यातून आपली क्रियाशिलता वाढते... सर्वच धर्मात 'मौन' किती महत्वाचे आहे.. अर्थात मौन म्हणजे अबोला नव्हे   मौनाचं आध्यात्मिक महत्व खूप आहे.. आपण ज्याला ध्यान लावणे म्हणतो.. आता याचीही गंमत आहे.. आपण 'ध्यान' स्विकारलं नाही पण हेच ध्यान बौध्द धर्माच्या प्रसारात जपानपर्यंत पोहोचलं तिथं त्याचं रुपांतर 'झेन' मध्ये झालं आणि हेच झेन भारतात आलं तेव्हा त्याचं आम्ही त्याचं कोणकौतूक केलं...!

विषय अबोल्यावर सुरु झाला पण त्याची दुसरी बाजू देखील तितकीच महत्वाची आहे. अबोला धरल्यावर दोघांनाही करमत नाही अशा वेळी दोघांनाही आत्मचिंतन करायला वेळ मिळतेा... दोघांपैकी चूक कोणाची आहे.याबाबत चितंन होतं.... मला विचाराल तर हा अबोला देखील खूप महत्वाचा
आहे...
 शब्दाला शब्द लावून भांडण करण्यापेक्षा अबोल राहणं खूप चागलं... भांडणाच्या भरात भावना दुखावल्या की ते नात संपतं त्यामुळे अबोल्याचा हा 'पाॅझ ' नातं मजबूत करण्यासाठी अधिक महत्वाचा आहे.




कभी कभी दूरी भी जरुरी है

प्रेमीयों मे प्यार बढाने के वास्ते..!


जीवनात सर्व प्रकारे नवरसांचा अंतर्भाव नसेल तर जगणं निरस होवून जाईल ...

मराठीत म्हणींची कमतरता नाही प्रत्येक स्थितीला साजेशी म्हण आपल्याकडे आहे.

शहाण्याला शब्दांचा मार.

अशी एक म्हण आहे पण शब्दानं मारणं हा उपाय नाही. कधी कधी शब्दांचे बाण जिव्हारी लागतात आणि नांत कायमचं तुटतं.. त्यापेक्षा अबोला केंव्हाही परवडला . पती-पत्नी हे नातं लग्नगाठीनं बांधलेल असतं आणि याला रेशीमगाठी म्हणतात त्यामागेही कारण आहे असं मला वाटतं.. रेशमाची गाठ कितीही घट्ट बसली तरी ती अगदीच वेळ आल्यास सोडवता येते....सुताच्या गाठीला तोडण्याशिवाय पर्याय राहत नाही...!   कोणतही नांत जुळतं त्यावेळी त्यावर 'एक्सपायरी डेट' नसते...! आपणही ती टाकायचा प्रयत्न करू नये असं माझं मत आहे.

नातं कधी ओझं वाटायला लागलं तर ते काही काळ उतरवून ठेवायचं... नात्याचं सिंहावलोकन करायचं ... थेाडयाशा पॉझनंतर ते पुन्हा हवंहवसं वाटायला लागतं ...


नात्यांमध्ये हा लटका राग, खरा गुस्सा , अबोलारुपी असहकार त्यामुळेच आवश्यक ठरतात..या ऋणानुबंधांच्या गाठीत असला रुसवा आणि अबोला त्यासाठीच आवश्यक वाटतो.



प्रशांत अनंत दैठणकर
9823199466

Lighter Side: - या अबोल्याचा स्वीकार इतका झाला आहे की आपल्याकडे अबोलीचं फूल (कसं बुवा..?)आहे आणि अबोल रंग (...हे अनाकलनीय आहे) देखील आहे...

Thursday 26 July 2018

अल्बम . . आठवणींचा . . !

आठवणींची वीण क्षणागणिक पडत जाते . . त्या जगलेल्या क्षणांचा मधल्या काळात काहिसा विसर पडून जातो पण ' झुक्या ' त्याची आठवण करुन देतो . ..
असाच काहीसा विचार सकाळी मनात आला . . . कारण देखील तसं होतं . . . सकाळी फेसबूक वाचायला घेतलं त्यावेळी ' मेमरीज ' चं पान सर्वात प्रथम खुलं झालं . . समोर फोटो होता चिरंजीव मास्टर वेदांतचा . . . सन 2012 मधला तो फोटो वेदांत शाळेला जायला निघाला त्यावेळचा . . . !

तो क्षण जगलेला असा अवचित आठवण्याचं काही कारण नाही पण आठवण करुन देणारं कुणी असेल तर त्यासारख्या आनंद जगात दुसरा नाही . . आपण रोज धावत असतो . . . धावत राहतो पण या धावण्यात जगायचं विसरलो की काय असा प्रश्न पडतो .

माणसाला निसर्गानं जी मोठी देणगी दिलीय ती म्हणजे विस्मरणाची . . .
आपण आजचा क्षण विसरु शकतो म्हणून उद्या पुन्हा ' फ्रेश ' होवून जगू शकतो विसरण्याची ही देणगी मिळाली नसती तर स्मृतींचा नुसता कोलाहल झाला असता . . . आजच्या जमान्याच्या भाषेत सांगायचं तर ' दिमाग का दही ' झाला असता .

आपल्या प्रत्येकाच्या भावविश्वात आपण जगलेले चांगले -वाईट क्षण गोळा होत असतात, किमान आता ते जपायचं तंत्र सापडलय . . छायचित्रांच्या रुपानं त्या क्षणाची साक्ष देणारा छायाचित्रांचा अल्बम प्रत्येकाकडे असतो पण त्यातही केवळ आनंदी क्षण जपले जातात . . आयुष्यातील दु :खाचा काळ आणि भोगलेल्या वेदना यांचा अल्बम केवळ मनात तयार होतो . . . हा अल्बम कधी अचानक छेडल्या गेलेल्या गाण्याच्या सुरावटीसह समोर येतो त्यावेळी नकळत डोळे पाणावतात समोरच्या व्यक्तीला बोध होत नाही . . . आपली आतली वेदनेची कळ आपणच उरात जपायची असते . . . माझ्यातला ' मी ' इतरांना कळू नये याची ती केविलवाणी धडपड असते . . . पण डोळे दगा देऊन जातात . . समोरच्या प्रश्नांकित चेहऱ्याला मी पुन्हा प्रश्नांकित ठेवून कमळाप्रमाणे भावनांना चापण्यांच्या पाकळ्यांमध्ये बंदीस्त करुन ठेवतो . . . हे प्रत्येकासोबत वारंवार होत असतं . . . !

आयुष्याच्या या सुख दु:खाच्या हिंदोळयावर मन सतत झुलत राहतं . . .
आसपासची परिस्थिती कशीही असली तरी हिंदोळयाची ही आंदोलने सुरु राहतात अविरत . . . मी जितका स्वत:ला जगासमोर मांडायचा प्रयत्न करतो त्याही पेक्षा अधिक प्रमाणात आणि अधिक तिव्रतेने स्वत:ला जगापासून लपवायचा प्रयत्न करतो.

माझ्यातला नायक जगासमोर मी मांडत जातो . . ते मांडण सरत जातं आणि उरात उरतो तो केवळ माझ्यातला खलनायक . . . तो मला जगासमोर न्यायचाच नसतो . . .तो लपवण्याची सारी धडपड सुरु असते पण स्मृतींचा हा अल्बम मी एकाकी असताना वारंवार खुला होत जातो . . . ज्याचं विस्मरण व्हावं त्याच गोष्टी आयुष्यात मुद्दाम होवून स्मरणात राहतात.  सुखाचे जगलेले क्षण आयुष्यातून कापरासारखे उडून जातात . . . ते जगताना त्याचा आनंद जरुर होतो पण ते हवेत विरुन जात असतात म्हणूनच मला त्या क्षणांचा ' अल्बम ' कदाचित आवडत असेल.

तंत्राने आज सोय करुन ठेवलीय की मी माझ्या आनंदाचा क्षण जपू शकतो आणि मी तो जपतो देखील. काळाच्या प्रवाहात मागे वळून बघताना तो सुखाचा अल्बम मला पुढे वाटचाल करण्याची उभारी देतो . . . काळाशी लढताना आलेल्या मनाच्या नैराश्याच्या जळमटांना सारुन सकारात्मकतेने पुन्हा जगाकडे बघायचं बळ देतो .


नाण्याच्या दोन बाजू प्रमाणे मनाच्याही दोन बाजू असतात हे खरं आणि ती दुसरी बाजू अधिक लवकर विस्मरणात जात असल्याने सुखाच्या त्या क्षणांचा अल्बम बनवता आणि जपता आलं म्हणजे इहलोकाची ही वाट अधिक सोपी होते. आयुष्यात चालणं जसं थांबत नाही , जगण जसं थांबत नाही तसं विस्मरण देखील थांबत नाही. काल सकाळी काय जेवलो याचं आज विस्मरण लवकर होतं मात्र चहाच्या चटक्यानं जीभ भाजली तर ती चार दिवस त्रास देते . . . असा अनुभव आहे की चुकून पायाला ठेच लागली म्हणून आपण खूप जपायला सुरुवात करतो पण नेमकं निथेच वारंवार जखम होते . . . दुसऱ्या भागावर नेम धरुन अधिक वेदना देण्याचा चंग दैवानं बांधलाय अशी काहीशी शंका यायला लागते . . . मनाचं फार काही वेगळं नाही .

दिल टुटनेपर बार बार वोही याद आता है . . . . वहीं फिर चोट लगती हैं जहां के घाव अभी ताजा है . . !

सुख हे आलं आणि गेलं आणि दु:ख मात्र मुक्कामी राहिलं या मनात माझ्या....
मग त्या दुखऱ्या क्षणांचा डोंगर एव्हरेस्टपार गेला असं वाटायला लागतं. अशा त्या क्षणी नकारात्मकतेचा कडेलोट होण्याच्या नेमक्या क्षणाला.... हा अल्बम एखादा विस्मरणात गेलेला आयुष्यातला चांगला क्षण समोर आणतो... कडेलोट होण्याच्या नेमक्या क्षणाला... हा अल्बम एखादा विस्मरणात गेलेला आयुष्यातला चांगला क्षण समोर आणतो.... कडेलोट झाला तरी.... हे सुखाचे क्षण माझे पंख बनतात आणि त्या पंखामध्ये बळही देतात उडण्याचं. पुन्हा जगण्यासाठी मग मी त्या उंचावरुन भरारी घेतो आयुष्याच्या आसमंतात.... ती त्याक्षणी घेतलेली गरुडभरारी असते.....!

- प्रशांत दैठणकर
9823199466



Wednesday 25 July 2018

पाठलाग स्वप्नांचा...!

स्वप्नं. . . कधी ना कळणारी . . कधी गुंतवणारी , अधिकतर पहाटे -पहाटे प्राजक्त फुलांवर पडलेल्या दवबिंदुंसारखी . . . स्वप्नांच्या ओझ्यानं फूलं टपाटप खाली पडायला लागतात अन् सूर्याच्या आगमनानंतर पहिल्याच त्या कोवळ्या किरणांच्या धगीने ( ? ) हवेत विरुन जातात . .!

स्वप्नात पाहिले कधी काही आठवावं म्हटल तर ते आठवत नाही . . . वास्तवात पोळणाऱ्या मनाला ती स्वप्न . . ती गुलाबी स्वप्ने जगण्याची उभारी देत असतात. . . दिवस रुक्ष वास्तवाचा असला तरी रात्र मात्र त्या रंगीन स्वप्नांची असते . . ! प्रत्येकाची स्वत:ची खास अशी स्वप्नांची सृष्टी अर्थात सपनोंकी दुनिया असते.

. . दिवसा देखील स्वप्न बघितली
जातात उघडया डोळयांनी पण तिथं हिमंत कधी-कधी होत नाही . . बोलायला जीभ कचरते . . खूप सारं ओझं त्या जिभेवर असावं अशी ती जड होते . . पण सुरु झालेलं ते स्वप्न रात्रीच्या अंधारात पापण्यांच्या पडद्याआड सारे औपचारिकतेचे आडपडदे ओलांडून बोलकं होतं . . दिवसा न रेटणारी जीभ गाणी गायला लागते . . . दिवसा तिच्यासमोर हिमंत नसली तरी ती सपनोंकी रानी त्याच्यासोबत नृत्य करते . . गाणी म्हणते . . . स्वप्नात . . दिवसा मात्र.... याचं फक्त स्वप्न . . . सारं कसं स्वप्नवत स्वप्नांची कहाणी तिच्याविणा अधुरी राहत नाही . . पण ती पूरीही होत नाही . . . कम्बख्त बिचमें यह सुबह हो जाती है . .

स्वप्नातला तिचा तो राजकुमार . . त्या प्रत्येकीच्या मनात असतो . . तो नुसता राजकुमार नसतो तो खऱ्या अर्थांन सपनों का सौदागर असतो . . त्या राजबिंडया रुपाचं स्वप्न उशाशी घेऊन रोज रात्री झोपते त्यावेळी मनापासून प्रार्थना करीत असते की आयुष्यातही तोच राजकुमार आपला जोडीदार असावा . .
. स्वप्न पहाट वाऱ्यात विरुन जातं . . वास्तव्यानं जाग आल्यावर आपल्या आयुष्यात काय ' खेळ मांडियेला ' याचा बोध होतो . . . . तो कसाही असला तरी आयुर्विम्याप्रमाणे त्यालाही पर्याय नाही म्हणत स्विकारावं लागतं . . . समाधान इतकंच की दिवसभराच्या थकल्या धावपळीनंतर . . . आवांछित स्पर्शानं किळस येवूनही अगदी टाळता येत नाही असा देहात्कार संपवून डोळे मिटतात त्यावेळी पापण्यांच्या त्या पडद्यावर तोच राजबिंडा राजपूत्र कवेत घेण्यासाठी दोन हात पसरुन उभा असतो .

. . . उशाशी असणारं तारुण्यातलं ते स्वप्न आता कारुण्यात उराशी आलेलं असतं . . . त्याला कवटाळून या कंटाळवाण्या इहलोकाची यात्रा सुरु राहते . . आधार फक्त त्या स्वप्नांचा .

त्याचं फारसं वेगळं नाही . . . फुलोंके शहर में है घर अपना . .
.
असा सपना . तो बघतो पण आयुष्य कंठावं लागतं ते वनरुम किचन च्या त्या किचकिचाटात... अर्थांत त्यातही समाधान असं की आपण 'हायर मिडल' वाले.. धारावीत रहायला लागलं नाही म्हणजे आपण सुखी..!

सुख शोधताना आपण आपल्यापेक्षा खालच्या दर्जाच्या व्यक्तीकडे बघावं ... त्याचं जगणं किती कष्टप्रद आहे ते बघावे म्हणजे आपण किती सुखी आहेात याचा बोध होतो... आपल्यापेक्षा अधिक पत व संपत्ती असणाऱ्याकडे बघणं क्लेशदायक पण जगणं ज्याला कळलय त्याच्या दृष्टीने त्या आयुष्याची आसुया न बाळगता त्याच्या सारखं जगता यावं ..! हे स्वप्न हा झाला सकारात्मक पणा.

साधी एक चार फुटांवरुन उडी मारता येत नाही
दिवसा पण स्वप्नात आपण त्या सूपरमॅन ला मात देतो विश्वामित्राने स्वतंत्र सृष्टी निर्माण करायचा प्रयत्न केला त्यातील त्रिशंकू आठवावा …पण ही स्वप्नं आपल्या मनातली प्रतिसृष्टी असते... त्या सृष्टीतील ब्रहमा आपण.. विष्णू आपण.. विश्वकर्मा आपण आणि शिव देखील आपण ... आपल्या सृष्टीतील आपणच सर्वेसर्वा ..केवळ जाग येईपर्यंत.

स्वप्नं ...म्हणजे आपल्या अंतर्मनाचा आवाज असतो... जे आपण जगावं असावं असं आपल्याला वाटतं पण वास्तवात शक्य होत नाही ... ते स्वप्नात होतं...!
माझ्या मनाची कोलाहलातली स्थिती मला जगू देत नाही पण माझी स्वप्न मला मरु देत नाही ... मी कितीही निराश झालो तरी मला कळतं की आपलं निम्म आयुष्य झोपण्यात अर्थांत .... स्वप्नात जाणार आहे आणि त्या स्वप्नांच्या सृष्टीचा राजा होता येतं.. मग जगणं का सोडायचं.. .

हातातलं पुस्तक जड व्हायला लागतं ... पापण्यांची दार बंद व्हायला लागतात ... अखेर तिसऱ्या घंटेला पापण्या मिटून ... एक रंगमंच खुला होतो. रंगीत चित्र दिसायला लागतात तिथं मी अबोल नसतो .. तिथं कार्यालयाच्या कोपऱ्यात बसून कॉम्प्यूटर च्या किबोर्डवर बोटं बडवणारा क्लर्क नसतो... तिथं त्या जगात मी सेंटर स्टेजला... 

पण हाय, तिथं ही ...

घर देता का घर
कुणी या तुफानाला
घर देता का घर ..?

अरे यार या महानगरीत स्वप्नं देखील अशी पडावीत..! 
आयुष्य म्हणजे दोन श्वासातलं अंतर असं म्हणतात पण माझं विचाराल तर ते दोन स्वप्नातलं अंतर असतं... पुन्हा स्वप्न पहाण्यासाठी दिवसभर कष्टांची तमा न बाळगता मी धावत राहतो... माझा हा दोन स्वप्नातला प्रवास स्वप्नवत वाटला तरी मला कळतं...
ज्या दिवशी डोळे मिटल्यावर स्वप्न दिसणार नाहीत तो स्वप्नांचा नव्हे तर माझा अंत असेल........ माझा अंत असेल... ..
.मी खडबडून जागा होतो...!


प्रशांत अनंत दैठणकर

9823199466