Thursday 7 July 2011

व्यक्तीमत्वाचं अंतरंग; संभाषण... !

मानव उत्क्रांतीमध्ये सक्षम प्राणी म्हणून विकसित झाला यापुढेही सर्वोत्तम ते टिकेल असा निष्कर्ष उत्क्रांतीवादाचा सिध्दांत मांडणा-या डार्वीन याने सांगितलं आहे हा नियम मानवाला लागू पडता का ? अर्थात होय असं उत्तर द्यावं लागेल.पुढे सांगायचं म्हणजे सर्वोत्तम ते काय ? आज कालच्या काळात ज्याच्याकडे ज्ञान तो सर्वोत्तम असं गणित झालय.
      ज्ञान म्हणजे माहितीचा अभ्यास करुन त्यावर प्रक्रिया करुन निघालेले निष्कर्ष. आता ज्ञान कशासाठी आणि कुठून प्राप्त करता येईल अशी समस्या असते मानव इतर प्राण्यापेक्षा वेगळा आहे तो त्याच्या संवेदना आणि अभिव्यक्तीमुळे मानवाला शब्दांनी इतरांपेक्षा वेगळं बनवलय तो बोलू शकतो स्वत:ला व्यक्त करु शकतो आणि त्यामुळेच तो व्यक्तीमत्व निर्माण करु शकतो घडवू शकतो असा अर्थ वावगा ठरणार नाही.
      व्यक्त होण्यासाठी आणि करण्यासाठी आपण संभाषणाचा वापर करतो संभाषण म्हणजे लहान मुलांच्या तोडी असणारे बोबडे बोल नव्हे. आपण समाजात वावरतो त्यावेळी इतरांच्या संपर्कात असतो. येथे आपली भाषा त्याची शुध्दता शाषेतील शैली यावरुन बाहेर पडताना त्यात असणारी मृदता, कठोरपणा, किनरेपणा, खर्ज यावरुन आपल व्यक्तीमत्व उघड होत जातं
      आपण दिसतो कसे, उंची, रंग, ठेवण आणि लकबी यावरुन जशी आपली बाह्य ओळख होते तशीच ती आपले कपडे, त्यांचा दर्जा, राहणीमान आणि सवयी यावरुन दखील व्यक्तीमत्व दर्शन घडत असते काही व्यक्ती भेटल्यावर प्रसन्न वाटणं हा त्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव असतो मात्र काही जण तोंड उघडेपर्यंतच चांगले भासतात असं विनोदानं म्हटल जात असलं तरी ते खरं आहे.
      अंगापिंडानं रुबाबदार आणि उमदी व्यक्ती पाहून प्रभाव पडला तरी त्याने संभाषण सुरु केल्यावर त्याबाबतचं मत बदलून जातं असा अनुभव अनेकदा आला असेल तो यामुळेच. नुसतं प्रभावशाली व्यक्तीमत्व पुरेसं नाही तर त्याच्या जोडीला संभाषण कला शिकणं आवयश्क आहे संभाषण कला म्हणजे अगदीच अमिताभ बच्चन सारखा आवाज नाही.
      प्रत्येकाला स्वत:चा विशिष्ट आवाज आहे. निसर्गत: जो आवाज मिळालाय त्यात कृत्रिमपणा आणण्याची गरज नाही भाषा आणि शब्दफेक ज्ञान आपण प्राप्त केलं तर पुरेसं आहे. समोरच्या व्यक्तीला आपलेपणा वाटेल अशा प्रकारे शब्द आणि वाक्यांची निवड करावी लागेल अनेकदा आपणास नकार देण्याचा प्रसंग येतो त्यावेळी आक्रमकपणा ठेवला तर त्यातून मनं दुखावतात त्या उलट दुस-या पध्दतीने नकार देणं शक्य असतं त्याचा आपण अभ्यास करायला हवा.
      सकारात्मक शब्दांचा अधिक वापरणारे बोलणे सर्वांना आधिक आवडते. आपल्याकडे बहुतेक जण संवादाची सुरुवात "नाही, त्याचं काय आहे किंवा नाही नाही नाही" अशी करतात त्याचा अर्थ आपण आपलं मत नोंदवतोय असा तरी असला तरी समोरची व्यक्ती आपलं बोलणं नाकारल जातय किंवा खोडून काढलं जातय असा घेतो मैत्रीत आपण ज्या पध्दतीने संवाद करतो ते अनौपचारिक असतात मात्र समाजात वावरताना ते तसे नसतील याचीही काळजी आपल्याला घ्यावी लागेल.
      बोलताना साधारण होणा-या चुका म्हणजे ज्या भाषेचं ज्ञान नाही त्या भाषेत बोलण्याचा प्रयत्न करणे होय. दोन मराठी भाषिक घराबाहेर पडल्यावर हिंदीत बोलतात आणि भांडताना इंग्रजीत भांडतात हे खरं आहे. समोरची व्यक्ती इंग्रजीत बोलतेय म्हणून चुकीचं इंग्रजी बोलणारे अनेकजण माझ्या पाहण्यात आहेत अशाने आपल्या व्यक्तीमत्वाची छाप पडत नाही याची जाणीव आपण ठेवावी.
      आपल्याला सहजतेने जी भाषा बोलता येईल त्या भाषेत आपण बोलेले पाहीजे. या पध्दतीने प्रभाव अधिक पडतो कायम गंभीर किंवा कायम विनोदी शब्दांचा वापर करणे टाळावे याचा व्यक्तीमत्वावर नकारात्मक प्रभाव पडतो. जास्त तिरकस शब्दांचा वापर करणारे आणि प्रत्येक वाक्य विनोदावारी नेणारी व्यक्ती खोटं बोलते असं मानल जातं त्यामुळे आपण बोलताना ते टाळावं बोलताना रुक्ष आणि बोजड शब्दांचा वापरही नकारात्मक मानला जातो.
      संवाद-संभाषण ही आपली वैचारिक ठेवण, अनुभव आणि प्रगल्भता दाखवते मी, पणा टाळाव असे संतवचन आहे. स्वत:बाबत जास्त बोलणे आणि आत्मस्तुती करणे हे आत्मकेंद्रीतपणाचे लक्षण आहे. अशा व्यक्तीसोबत लोक संपर्क ठेवत नाहीत हे माहिती असलं पाहिजे.
      शब्दांमधून भावना व्यक्त होत असतात त्यामुळे कशीही परिस्थती असली तरी आपलं चांगलं चाललय असं म्हणारी व्यक्ती आपल्या स्वत:सोबतच इंतरांच्या आसपास सकारात्मक उर्जा वाढवित असते. समोरच्या व्यक्तीची आस्थेवाईकपणे विचारणा करुन मगच औपचारिक संवाद सुरु व्हावेत यातून जिव्हाळा वृध्दींगत होतो.
      संभाषण ही एक कला आहे. त्यात प्राविण्य मिळवायचं शस्त्र आपण जाणून घेतलं तर आपण आपलं व्यक्तीमत्व आधिक ठळपणानं जगासमोर आणू आणि सर्वोत्तम होण्यात हा पहिला महत्वाचा धागा आहे.    
    -प्रशांत दैठणकर 

No comments: