Thursday 29 November 2012

बडे धोके है इस राह में !



     आमची पिंकी इतकी हुशार आहे की ती लहान असूनही इंटरनेट वापरते असं मुलांबाबत कौतुकानं बोलतात त्या सोबतच माध्यमाचा वापर करणं किती धोकादायक आहे याचीही जाणीव प्रत्येक पालकानं ठेवली पाहिजे. गेल्या काही दिवसात वापराऐवजी गैरवापरातून फेसबुक सारख्या माध्यमातून दंगल होण्याचे व सामाजिक वैमनस्य वाढीला लागण्याचे प्रकार समोर येत आहेत.
     मुळात इंटरनेटचा वापर धोकादायक आहे हे शंभरपैकी पंच्यान्नव जणांना माहिती नाही हे वास्तव आहे. मुलं झटपट नवी गाणी इंटरनेटवरुन डाऊनलोड करतात यासाठी वापरलं जाणारं पोर्टल हे पाकिस्तानी आहे. गाणे डाऊनलोड करताना आपण अटी-शर्ती कबूल करीत असतो. याचा आधार घेत अशा कंपन्या त्यांच्या संगणकातून तुमच्या पर्सनल कॉम्यूटरचावापर करतात. त्यांचा डेटा ते आपल्या संगणकात ठेवत आहेत याची कल्पना देखील आपणास येत नाही.
     अशा प्रकारे संवेदमक्षम माहिती आपल्या संगणकात ठेवायची आणि त्याचा वापर आपल्या विरुध्दच करायचा असं छुप सायबर युध्द आताच सुर झालं आहे. कोणत्याही प्रकारे सैन्य न पाठवता लोकभावनेला हात घालून आपल्यात सामाजिक वितुष्ट निर्माण करणारं हे युध्द आहे.
     काही दिवसांपूर्वी पूर्वांचलातील राज्याच्या मुलांमध्ये भिती उत्पन्न करणारी छायाचित्रे आणि चित्रफिती इंटरनेटवर आल्याने खूप गोंधळ उडाला होता हा सर्व प्रकार पाकिस्तानात असणाऱ्या चार वेबसाईटस्नी केला हे उघड झालं आहे.
     आपली मुलं, या माध्यमाचा वापर करतात त्यावेळी आपणास याची जाणीव असायला हवी. सायबर कायद्यांबाबत आज विधीज्ञांमध्येही ज्ञान पोहोचलेले नाही. भारतीय माहिती व तंत्रज्ञान कायद्याच्या सोबत आंतरराष्ट्रीय स्तरावर सायबर क्राईम लॉ 2003 मध्ये सर्व देशात लागू झालेला आहे. त्यात 2008 साली मोठ्या प्रमाणावर दुरुस्ती करण्यात आली यानुसार फेसबूक सारख्या सोशल नेटवर्कींग साईटवर आपले मतप्रदर्शन आक्षेपार्ह आढळल्यास 7 कोटी डॉलर पर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. यासाठी प्रथम पालकांना याचं ज्ञान मिळवावं लागणार आहे.
     आपण इ-मेल वापरतो त्यावेळी वैयक्तिक स्वरुपाची माहिती, छायाचित्रे यांचा कमीत कमी वापर करावा. आज फेसबुकवर पोस्ट करायला पैसा लागत नसला तरी उद्या तो लागू शकतो. फेसबुकनं झपाटलेली पिढी आपण बघतोय अगदी खट्ट वाजलं तरी ते फेसबुकवर अपडेट करण्याचा आटापीटा करणारे याबाबत किती जागरुक आहेत हे विचारण्याची वेळ आता आली आहे.
     सायबर गुन्ह्यांची व्याप्ती जगभर आहे. आपणास लॉटरी लागली आहे. कृपया माहिती पाठवा सोबत अमूक बँक खात्यावर शंभर रुपये जमा करा असा संदेश पाठविला जातो. गेले तर शंभरच जातील अशा हिशेबानं आपण जरी शंभर रुपये भरत असलो तरी असे कोटेवधी लोक जाळ्यात अडकल्याने अशा मेलद्वारे कोटेवधी कमावणारे इथं कमी नाहीत आणि याची संख्या वाढतच आहे.
     सायबर क्राईमचं जाळं हे या इंटरनेटच्या जाळ्यातून गुंफून त्याद्वारे अनेक प्रकारचे गुन्हे होत आहे. त्यामुळे जरा सावध !

                                                                                                            - प्रशांत दैठणकर 

Monday 22 October 2012

कभी कभी मेरे दिलमे...!

साऱ्या सिनेजगताला आणि सिनेरसिकांना स्वप्न दाखवणारे यश चोप्रा गेले... चॅनेलवाले न्यूज ब्रेक करीत होते आणि त्याचवेळी एक लंबा प्रवास भूतकाळाकडे मनाने सुरु केला होता. नावातच यश असणारे यश चोप्रा यांनी अतिशय सुंदर पध्दतीने प्रेमाला पडद्यावर आणलं. अनेक पिढ्यांच्या प्रेमाचे ते सारे चित्रपट साक्षीदार आहेत.

आपल्या आयुष्याला जोडणारे प्रसंग आपणास पडद्यावर दिसले आणि आपलं प्रतिबिंब त्यात जाणवलं तरच आपण तो चित्रपट जवळ करतो आणि यशजींचे सर्वच चित्रपट या कॅटेगरीत मोडत होते त्यामुळेच ते ब्लॉकबस्टर ठरले त्यांच्या चित्रपटातील जमेची बाजू म्हणजे कथानकात विभिन्न प्रकारचे केलेले  प्रयोग आणि चित्रपटाचं संगीत.

भारतीय सिनेमा संगीतप्रधान आणि रसिकांची त्याला मान्यता आहे. संगीत ऐकणं हा आमच्या जीवनशैलीचा एक भाग आहे. कानसेनांना तृप्त करणारी गाणी चित्रपटात पेरता आली पाहिजे इतकंच. कभी कभी मेरे दिलमे... धीर गंभीर आवाजात अमिताभने व्यक्त केलेला रोमांस आणि त्यानंतर खुलणारं गाणं.

सिलसिला हा अमिताभ जया आणि रेखाचा वैयक्तिक आयुष्याचा पट आहे असं गॉसिप झालं असलं तरी असा सिलसिला घरोघरी कुठे व्यक्त कुठे अव्यक्त स्वरुपात कुटुंबांमध्ये आहे त्या समाजाचं प्रतिबिंब या निमित्ताने रुपेरी पडद्यावर उमटलं त्यामुळेच सिलसिला हिट झाला अमिताभ मधला रोमॅन्टीक हिरो यशदांनी समोर आणला त्यापूर्वी त्याला अँग्री यंग मॅन च्या प्रतिमेत सारे बघत होते. अनिल कपूरच्या टपोरी, उडाणटप्पू अशा लखन इमेजला धीर गंभीर नायक म्हणून दाखवण्याचं काम लमहे ने केलं हनी इराणी ने आपल्या पतीला अर्थात जावेद अख्तरला मागे टाकत सुंदरसं कथानक या चित्रपटाला दिलं या कथानक खरोखर काही डिफरंट असं पडद्यावर आलं होतं.

शाहरुख आणि यशजी यांची जोडी तर कुणीही विसरु शकणार नाही हा यशराजच्या करिअर मधला एक स्वप्नवत काळ होता. माधुरी, करिना, ऐश्वर्या नायिका बदलत गेल्या पण शाहरुख एका बाजूने कायम राहिला. आणि त्यांचा अखेरचा अद्याप प्रदर्शित व्हायचा जबतक है जान देखील शाहरुख सोबतच होता पुन्हा नायिका बदलली आता अनुष्का आली.

स्वप्नं तयार करणं आणि आठवणींची जपणूक करणाऱ्या मनाला कायम ताजेपणांन जगायला लावणं हे यशजींच्या यशाचं गमक... किती जगलात यापेक्षा काय जगलात हे महत्वाचं असा संदेश देणाऱ्या या महान दिग्दर्शकाला अखेरचा सलाम.

अलविदा यशजी, अलविदा....!

Prashant Daithankar
9823199466
dpacifics@gmail.com

Thursday 11 October 2012

बाबू मोशाय







बाबू मोशाय..... जहाँपनाह.. बादशाह... शहेनशाह... बादशहा खाँ.... विजय दिनानाथ चव्हान..... And on and on…. And on… सत्तरीच्या दशकात जगासमोर आलेला हा अँग्री यंग मॅन... अमिताभ हरिवंशराय बच्चन... आज सत्तरीचा झाला त्याला भावी आयुष्यात उदंड यश मिळो हीच कामना.. आज मी चाळीशी पार केल्यावर घर म्हणून विचार करतो त्यावेळी मला अमिताभ बच्चन. लता मंगेशकर सचिन तेंडूलकर हे आपल्याच घरातील सदस्य वाटतात. इतके आपण यांच्यात गुंतलो आहोत. त्यातल्या त्यात अमिताभ तर .. बोलायलाच नको.
                  त्याची पहिली भेट अर्थातच औरंगाबादच्या स्टेट सिनेमाच्या पडद्य़ावर झाली.. चित्रपट होता शोले... नंतर काळाच्या प्रवाहात वेगवेगळ्या संदर्भातून तो आपला होत गेला... संदर्भ तो यारानातील मैत्रीचा कधी होता तर कधी लक्षात रहाणा-या शराबीचा होता... महाविद्यालयीन काळात म्युझीकल फिशपाँड मध्ये एकदा एका सुंदर कन्येला.. १८ बरसकी तू होने को आयी रे... जतन कुछ करले.. चा देखील होता. आता चाळीशीत सारे आठवताना एक जाणवतं की आपण त्याला तंतोतंत फॅन म्हणून नाही तर आपल्या आयुष्याशी जोडत गेलो.. त्यात मग रेखा आणि अमिताभ यांचा .. जगताना हे सारं जाणवतं.








                     मला जे वाटतं ते असं की हा सिलसिला आवश्यक आहे. त्याच्या करिअरला ते वळण अतिशय गरजेचं होतं. त्याला अमिताभ बनविण्यासाठी ती होती. आयुष्यात प्रत्येकाला आपल्यातला हिरो बाहेर काढण्यासाठी प्रेरणा गरजेची असते आणि ती त्याची प्रेरणा होती. कान्हा कुणाचा तर तो राधेचा.. असं काही तरी हे गणित आहे. सार हाच की त्याच्या कारकिर्दीला अनोखं वळण देणारी ती होती. नाही म्हणायला अमिताभने जयासोबतही सिनेमात काम केलं पण ती केमिस्ट्री नाही जुळली.. नायकाला नायिका हवी.. ती रेखा गणेशनच होती ही बाब नाकारता येणा नाही. ही प्रेरणा कोण कुणाला, कधी, कशा माध्यमातून देईल हे सांगता येत नाही.

हा महानायक काळानुसार बदलत गेला.. कधी काळी कभी कभी चित्रपटात त्याची नायिका असणारी राखी १९८२ च्या मुशीर रियाजच्या शक्ती मध्ये त्याच्या आईच्या भुमिकेत आली.. नायकाचं मोठेपण हेच असतं.. तो आजही चित्रपटात सम्राटच आहे आणि त्याची लोकप्रियता वाढतच आहे.. आणि ती वाढतच राहणार... हीच त्याच्या वाढदिवशी शुभेच्छा..


प्रशांत दैठणकर

Tuesday 14 August 2012

विलासराव....

माणूस कसा असावा याचं उदाहरण म्हणजे विलासराव देशमख असं म्हणता येईल.विलासराव देशमुख यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात मी औरंगाबादला बदलीवर गेलो. माझी बदली तातडीच्या कारणाने झाली आणि लगोलग मला तिथं उपसंचालकपदाचा पदभार दिला गेला.
     मी औरगाबादमध्ये सततच्या दौ-यांमधून आणि कॅबिनेट बैठकांमधून विलासरावांच्या आसपास वावरलो.पत्रकार परिषदांच्या निमित्तानं अधिक जवळून परिचय झाला. एक राजस आणि लाघवी व्यक्तीमत्वाचे धनी मुख्यमंत्री म्हणून वावरायचे अतिशय रुबाबात पंरतु कधी आवाज चढला नाही पण जरब होती. आदरपूर्वक वचक कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे विलासराव असं म्हणता येईल.
     एकदा खरिपाच्या बैठकीनंतर वाल्मीत पत्रकार परिषद घ्यायची होती. त्यावेळी पत्रकार संघाच्या काही सदास्यांनी विनापरवानगी प्रमुख पाहुणे म्हणून विलासरावांचे नाव टाकले.आणि आग्रह केला. मात्र कार्यक्रम पत्रिकेत कार्यक्रमच नसल्याने विलासरावांना तिथं जाणं शक्य नव्हतं त्यामुळे त्यांनी स्पष्ट नकार दिला.
     तिथल्या एका कक्षात विलासराव आराम करत असताना बाहेर पत्रकारांनी घोषणाबाजी सुरु केली. मी आत- बाहेर अशा स्थितीत होतो. मी विलासरावांना विनंती केली की कार्यक्रमाला जाता आलं तर चांगल होईल त्यांनी पुन्हा नकार दिला. माझ्या चेह-यावरचे भाव बघून त्यांनी मला जवळ बोलावले आणि आश्वासकपणानं म्हणाले चिंता नको करु.काय ते तुझी तक्रारच करतील ना खातं माझ्याकडेचे आहे. तक्रार माझ्याकडेच येणार तू काळजी नको करु. मी निर्धास्त झालो.त्यांच्या शब्दातला धीर मनाला सुखावून गेलो.
     सायंकाळी राजस्थानी विद्यार्थी वसतीगृहाचं उद्घाटन होतं तिथं राजेद्र दर्डा आधी पोहाचले ते देखील राज्यमंत्री होते. त्यांच्या माझ्या मोबाईलवर फोन आला की कार्यक्रम ज्या ठिकाणी आहे तिथं डी. पी.खराब झाल्याने लाईट गेले आहेत.मी लगेचच विलासरावांना सांगितलं की किमान अर्धातास कार्यक्रम उशीरा होणार आहे. तेंव्हा पत्रकारांच्या कार्यक्रमास जाणं शक्य आहे. तेव्हा पत्रकारांच्या कार्यक्रमास जाणं शक्य आहे कृपया कार्यक्रमास जाऊ म्हणजे पत्रकार मंडळी खूश होतील.
     विलासरावांनी घडयाळ बघत लगेच होकार दिला आणि गाडयांचा ताफा मसापकडे निघाला. त्यांचे वक्तृत्व दिलखुलास आणि रंजक असायचं त्यांनी भाषणाला सुरुवातच मुळी....नारायण नारायण... ! आणि अर्धा तास जोरदार फटकेबाजी करीत पत्रकांराना खडे बोलही सुनावले. तसेच विनोदाची पेरणी करीत सर्वांना हसविले. आपणही वृत्तपत्र काढलं त्याचे किस्से त्यांनी ऐकवले. राजेंद्र दर्डांचा फोन येईपर्यंत हे भाषण सुरु राहिले. असं दिलखुलास व्यक्तीमत्व आज आपल्यात नाही त्यांना आर्वीत शेवटचं भेटलो त्यावेळी आपल्या नेहमीच्या पध्दती अरे तू इथं ... कसा मजेत ना असं विचारलं. इतक्या काळात ७ वर्षांचा खंड पडला तरी ओळख त्यांनी ठेवली याचा मला आनंद वाटला.
 ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो ही प्रार्थना
- प्रशांत दैठणकर

Thursday 2 August 2012

“ इक राधा इक मीरा.. दोनोंने श्याम को चाहा..

अंतर क्या दोनोंकी प्रितमें बोलों...? ”

गाण्याच्या या ओळी आठवण्याचं कारण अगदीच वेगळं.. औरंगाबादहून मी बुलडाण्याला येत होतो. जेवणासाठी चिखली येथे एका हॉटेलमध्ये पोहोचलो. छानपैकी जेवण झालं. तडका दाल आणि तंदूर रोटी हे माझं आवडतं भोजन. जेवण झालं आता मस्तपैकी पान खाण्याचं ठरवलं. पानाच्या टपरीवर त्याला पान सांगून उभा होतो. एक शाळकरी मुलगा टपरीवर आला.

‘मीरा आहे का ?’ अशी त्याने विचारणा केली... पानटपरी चालकाने त्याला “नही है…!” असं राष्ट्रभाषिक उत्तर दिलं.... लगेच त्या पोराने “ मग राधा आहे का? “ असा सवाल केला.. दुकानदाराने आपला सूर कायम ठेवत “ वो भी नही है “ असे उत्तर दिले.

त्या दोघांचा हा संवाद संपला. तो पोरगा लगेच दुस-या पानटपरीकडे निघाला. एव्हाना माझं कुतूहल जागं झालं होतं. राधा काय मीरा काय... मी त्या टपरीचालकाला विचारलं. त्याचं उत्तर ऐकून मी चाटच झालो. राधा आणि मीरा ही बंद पाकिटात विकल्या जाणा-या धनाडाळ प्रॉडक्टची नावे होती... राधा आणि मीरा यांचं श्रीकृष्णवरलं प्रेम सा-यांना माहिती आहे.. पण पानटपरीवर विकल्या जाणा-या पाकिटांवर ही नावं याचा धक्काही बसला... दुस-या खेपेत मला राधा आणि मीरा शेजारी शेजारी पाकिटांच्या माळांच्या रूपात लटकताना दिसल्यावर मी लगेच त्याचा फोटो काढला.

कोणी कशाचे नाव काय ठेवावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे मात्र यातून होणा-या गमती.. विसंगती.. विनोद याचं भानही आपण ठेवलं पाहिजे असं वाटतं.

नागपूर शहरात एक कपड्याचे दुकान आहे त्याचं नावं विसंगती आणि विनोद यांचा संगम आहे.. दुकानाचं नाव आहे... “ दिगंबर वस्त्रालय... “ ये हुई ना बात... बुलडाणा जिल्ह्यात धाड या गावाजवळ एक पाटी बघितली... “ गणपती वॉशिंग सेंटर “.... औरंगाबादकडे जाताना मेराचौकी गावाजवळ एक हॉटेल आहे त्याचं नाव आहे हॉटेल आठवण.... औरंगाबादेत एक दातांचा दवाखाना आहे श्रीराम चौकाजवळ... त्या डॉक्टरचं मला कौतुक वाटतं... त्या डॉक्टरांनी दवाखान्याचं नाव ठेवलं आहे “ एकदंत दातांचा दवाखाना “... आता बोला.. शेक्सपियर भारतात आला तर नक्की पुन्हा म्हणेल.... What’s in the NAME..!

प्रशांत दैठणकर
२ ऑगस्ट २०१२

Friday 20 July 2012

वेग


काळचा वेग आपण पकडू शकत नाही मात्र जाणारा हा काळ आपण आपल्या चांगल्या कामांनी मनात आठवणींच्या रुपात नक्कीच साठवू शकतो. माणसं बदलतात आणि गाव देखील बदलतं आणि उरतात त्या आठवणी.
आपण अनेकदा याचा अर्थ काय आणि त्याचा अर्थ काय याबाबत मनातच वाद घालत बसतो. आपण हे समजून घ्यायला हवे की काही बाबी अपरिहार्य असतात. आपण विनाकारण विचार करुन त्रास करून घेत आहोत हे आपल्या लक्षात आले तर आपण तणावापासून मुक्त राहू शकतो. सारं काही आपल्या हाती असतं तर आपणास इतरांची गरज वाटली नसती. आपण आपापसात बोलू शकतो आणि आपला ताण हलका करु शकतो याची आपण जाणीव ठेवायला हवी.



भिजले ओले हे मन..

म्हणता शब्द ओलावले

मग आयुष्य झेलता उरी

डोळे नकळत पाणावले

सुख मागावे का कुणी

कुणी ते का द्यायचे

ठेविले अनंते रे गड्या

तसेच तू रे रहायचे...

क्षण आजचा क्षण आज का..

नाही मना रे विचारायचे..

जगतो जगी आनंद मानुनी..

का रे उगा उदास व्हायचे..

प्रशांत दैठणकर २०-०७-२०१२

Thursday 24 May 2012

बदलला तो गाव











त्याची ती आणि तिचाच का तो
सवाल मनामनात सलत राहतो..
ती त्याची एक आठवण होती
आठवणीतच तो वाहत गेला
दिस आला नि दिस तो गेला
आठवणींचा बहर वाढतच गेला
बालपणात मन फिरत गेलं
आठवणींच्या पावसात भिजत भिजत
ती शाळा ते अंगण आता नाही
नभातले तारे बघत बघत रोज
राक्षस नि राजकन्येच्या गोष्टी
दोस्ता आता मात्र नाहीत..
गाव गेलं अंगणही, गावचा गेला पार
विकास गंगेत पाराचा झाला बियर बार
बदललं सारं वदललं रे गाव..
म्हणूनच वाटत मित्रा आता त्याला
आठवणींच्या त्या गावातच जगावं...
प्रशांत दैठणकर

Tuesday 24 April 2012

Life On Hold... Please..

याला काय म्हणायचं हे मात्र कळलं नाही.. जन्माला आणि मृत्यूला आपण आपल्या ताब्यात मिळवलं... काही प्रमाणात तरी आपण हे साध्य केलय मात्र याचा गैरफायदा तर आपण घेत नाही ना असं वाटलं...
      दवाखान्यातला तो क्रिटीकल केअर युनिटचा भाग.. स्क्रीन लावलेले.. यावर –हदयाचं आलेखन चालू होतं दुस-या बाजूला विविध यंत्रांमधून आयुष्य उधारीवर ओतून त्या देहात प्राण फुंकले जात होते.. का.., जगणं संपलं की नाही याची कल्पना नाही अशा स्थितीत व्हेंटीलेटरवर ठेवलेले ते शरीर.. माझ्या शरीरावरच रोमांच आले.. मन मला आठ वर्षे मागे घेऊन गेले.. आई.. हो आई होती ती माझी..
      आई.. झालं  तर ते संपवावं.. एका क्षणात संपायला हवं.. आप मरे दुनिया डुबे असं ती नेहमी सांगायची.. ब्रेन ट्युमरचं ऑपरेशन होवून  आठ दिवस झालेले.. पण आता ते जगणं रोजचं मरणं होतं.. अपंग होवून जगणं .. रोजचंच मरण ठरावं.. तिच्या मनानं ठरवलं आणि सर्व उपचारांना प्रतिसाद पुर्ण बंद झाला.. तिची इच्छा.. आपण त्याचा आदर केला पाहिजे.. नाही पटला हा निर्णय सा-यांना पण तो खंबीरपणाने घ्यावाच लागतो.. आज दोन्ही चित्र मनात उभी आहेत..     
काय बरं आणि काय चांगलं.. मनात प्रश्नांनी फेर धरला होता. मन वारंवार त्याच बाबीकडे धावत होतं. आपणास काय अधिकार आहे मरण रोखण्याचा.. मरणा-यालाही आपण वेटींगवर ठेवायचं हे मनाला पटत नाही. कृत्रिम यंत्रांनी माणसाला होल्डवर टाकता येतं.. हा काय मोबाईल फोन आहे का.. मरण हे देखील सुखानं यावं लागतं.. आज त्यालाही माणुस पारखा झालाय.. हेच खरं..
काळ आला पण वेळ आली नाही ...
हे मरण टळण्याचं कारण आपण अनेकदा बघतो आणि सांगतो.. पण आता
काळ आला आणि वेळही आली तरी त्यालाही पॉझ देता येतो ही स्थिती आणि आलेलं हे स्थित्यंतर मनाला सुन्न करणारं असंच होतं.. इथल्या व्यावहारीक जगात भावनांना महत्व नाही आहे ते आजच्या व्यवस्थेला आणि आपल्या सोईला.. त्यासाठी नैसर्गिक मरणही गैरसोय होता कामा नये इतकी सोय विज्ञानानं केलीय त्या फायदा घेतला तर वावगं ते काय ही प्रतिक्रीया देखील अशीच सुन्न करणारी.. आपण त्यात केवळ प्रेक्षक ही आणखी त्रास देणारी बाब इतकच..
प्रशांत दैठणकर

Thursday 19 April 2012

माठ

उन्ह वाढायला लागली आता पाण्याची गरजही वाढली. पाणी हवं ते गारच हवं वाटतं. माठ घ्यायचा विचार दोन आठवड्यांपासून करतोय पण सोबत कोणी नसल्यानं माठ टू व्हीलरवर आणणं अवघड होतं. आज अपार्टमेंटच्या खालीच गाडीवर माठ विकायला आले आणि महाग पडला तरी चालेल पण घेऊन टाकू म्हणत घेतला.. दहा लिटरचा तो माठ चक्क बारगेन करीत निम्म्या किंमतीला अर्थात १०० रूपयांना घेतला.. काय ही महागाई.. घरात आणल्या आणल्या माठाची रवानगी नळाखाली.. भिजला पाहिजे चांगला......
      माठात पाण्याची धार पडायला लागली आणि डोक्यात माठाचे उपयोग तरळायला लागले. पहिले आठवला तो कन्या जान्हवीच्या हातून फुटलेला माठ. असाच घरी आणला आणि पाणी  भरायचं म्हणून तिची एकच घाई. वय आठ आणि हातात न मावणारा माठ.. झालं.. तोल गेला आणि माठही, पन्नास रूपयांचा माठ आणि तिचं रडणं पाचशे रूपयांचं.. तिला समजावता समजावता नाकी नऊ.. दहा,, अकरा.. सगळे एकदम आले.
कितीही चांगले फ्रीज आले तरी माठाच्या पाण्याचा गोडवा आणि गारवा याची तोड त्याला येतच नाही. मातीतून घडवलेला हा माठ आपल्या भारतीय जीवनशैलीचं एक अभिन्न अंग आहे.
कृष्ण गोपिकांची खोडी काढताना मटकी फोडणारा जसा समोर येतो तसाच तो बाळगोपाळांना गोळा करून दही हंडी  दही पळवणाराही समोर येतो.
हिंदी सिनेमात जितेंद्र आणि कंपनीला घेऊन दहा वर्षे चित्रपटांचा रतिब लावणा-या दाक्षिणात्यांनी आपल्या चित्रपटात माठाचा भरपूर वापर केलेला आहे.
वर्गात एखाद्याला सर.. काय माठ आहे असं म्हणायचे त्यावेळी सारा वर्ग हसायचा आणि ते माठाचं लेबल एखाद्या गोंदणाप्रमाणे आयुष्यभरासाठी चिटकायचं... त्यावेळी गंमत वाटायची. आता ती मंडळी माठाप्रमाणे गोल झालेली पाहून सरांच्या दूरदृष्टीचं कौतुकच वाटतं....
लग्न असो की अंत्यसंस्कार तिथं माठाचं महत्व आहे नावात फरक पडतो इतकंच. लग्नात वापरताना त्याला मंगलमाथनी म्हणतात तर संक्रांतीच्या पूजेत सुगडे. जगाचा संबंध कायमचा संपल्यावर उरतं ते शव. याच्यावर अंत्यसंस्कार केले जातात त्यावेळी मडक्यात पाणी भरून प्रदक्षिणा मारून ते मडकं मागील बाजूस टाकून फोडतात. याच्या आवाजाला घटस्फोट म्हणतात. आता लग्नसंबंध तोडण्याच्या कृतीला हा शब्द कधीपासून आणि का वापरला जातो याची मात्र माहिती मला नाही.
मातीचं हे भांड म्हणजे माठ. याला आवा देखील म्हणतात हे अनेकांना माहिती नसेल. संक्रांतीला गावातल्या कुंभाराला सांगून अनेक माठ व इतर भांडी बनवायची. तिथं सर्व सुवासिनींना हळद कुंकू कार्यक्रमासाठी बोलवायचं. त्यानंतर त्या प्रत्येकीने आपल्याला हवं ते भांड लुटायचं म्हणजे आवा लुटायचा ही पध्दत आहे. काळाच्या ओघात हे अनेकांना माहिती नाही हे खरं.
आकाराप्रमाणे हा मातीच्या भांड्याचे नावही बदलते. छोटा आकार असेल तर बोळके हे दिवाळीत वापरतात. संक्रांतीला याचं नाव सुगडे होते. माठाची छोटी बहिण सुरई तर मोठा भाऊ म्हणजे रांजण होय. ग्रामीण भागात रांजण अर्धा जमिनीत गाडण्याची पध्दत आहे. तंदूरसाठी देखील याचप्रकारचा तोंड नसणारा रांजण वापरला जातो. कधी मडकं कधी माठ, हिंदीत याला मटका किंवा मटकी म्हणतात. हा मटका रतन खत्री नावाच्या वल्लीनं मराठीत आणला तो वेगळ्या रुपात. त्या मटक्यानं लाखोंना बरबाद केलय.
माठाचा माझा परिचय हा अगदी बालपणीचा.. पहिल्या पावसातला..
ये रे ये रे पावसा म्हणत पावसाला लाच देण्यापासून घर-घरात या जगात जगायचं कसं याचा धडा गिरवला जातो. यातच पावसाच्या सरीला मडके भरण्याचं आर्जव आहे... ये गं ये गं सरी.. माझे मडके भरी.. ते आर्जव  ऐकून सर धावून येते आणि मडके वाहून जाते... बालपणाचंही असंच असतं ते असच शिक्षणाच्या पावसात कधी वाहून जातं ते कळत नाही.
बुध्दी नाही तो माठ मात्र बुध्दीमत्ता काय हे समजावी यासाठी सांगण्यात येणा-या कथेत कावळा आणि माठच आहे. बिरबलाने माठात वाढवलेल्या भोपळ्याची बुध्दीमत्ताही या निमित्ताने आठवते. मानवी शरीरालाही देवानं घडवलेला माठच म्हणतात.. जसं
फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार..
विठ्ठला तू वेडा कुंभार..
सारं आठवताना माठ कधीच भरून वहायला लागला होता.. आपणही एका मर्यादेपर्यंतच कमवावं.. बाकी सारं वाहून जाणार असतं असा एक विचार मनात आला आणि मन  तिकडे वळलं..

Sunday 15 April 2012

जिंदादिल ललितदादा

काही घटना अचानक घडतात आणि आपण काही क्षण काय घडतय.. ते का घडतय असं आपल्याला विचारत राहतो.. उत्तर मात्र आपणाकडे काय तर कुणाकडेच असत नाही याचं उत्तर फक्त काळ हेच असतं. आजची सकाळ अशीच उजाडली... वर्तमानपत्र वाचत होतो.. अर्थात याला वर्तमानपत्र हा शब्द वापरणं चुक आहे असं माझं मत आहे. यात जे छापलेलं असतं ते घडून गेलेलं असतं म्हणजेच ताजा भूतकाळ यात असतो.. वृत्तपत्र हा काहीसा योग्य शब्द ठरावा... फेसबुकवर अनिरूद्दने लिहीलेलं वाचताना आपण काय वाचत आहोत हा सवाल मला पडला होता..
      काही व्यक्ती खरच इतरांपेक्षा वेगळया असतात.. जिंदादिल या शब्दाची व्याख्या जगणारं व्यक्तीमत्व असलेल्या ललित देशपांडे .. ललितदादा पुण्याला जाताना त्याला अपघात झाला आणि त्यात त्याचं या जगातलं भौतिक अस्तित्व संपलं... काही क्षण मन सुन्न होतं... दादा .. खरा दादा होता. आपण आपल्या आयुष्यात अनेकांना भेटतो. यातील अनेकजण आपल्या आयुष्यात बदल होईल अशी घुसखोरी करताना दिसतात. आपण त्यांना नाकारतो... काही असे की त्यांना आपण नकळत स्वीकारतो.. का.. याचं उत्तर देता येणार नाही पण हे घडतं... असं ललितदादाला माझ्या मनानं पहिल्याच भेटीत स्वीकारलं होतं हे आज जाणवतं. त्याचा स्वभावच मुळात तसा लाघवी होता..
      आयुष्याचं गाणं गायचं की त्याबाबत कुरकुरत रहायचं ही ज्याची त्याची मानसिकता असते. आव्हानं कमी नसतात.. ती स्वीकारणारी माणसं खुपच कमी असतात त्यापैकी दादा हा एक होता. त्याच्या वैयक्तिक आयुष्यात आव्हानांची मालिकाच दैवानं मांडली होती... यासाठी नशीबाला बोल न लावता आणि देवाशी न भांडता आहे त्यात आयुष्य किती सुंदर आणि ते उत्तमरित्या जगायचं कसं याचा परिपाठ तो घालत होता. हो... असही जगता येतं हे त्याच्याकडूनच मी शिकलो आहे असं सांगायला काहीच हरकत नाही.
      दादाची भेट अश्वीन देशपांडे या माझ्या मित्रामुळे झाली. ललित त्याचा चुलत भाऊ एकाच भेटीत तो माझाही भाऊच झाला.. परभणीला जायला निघताना पहिला फोन दादाला ही नंतर सवयच होवून गेली होती. तासा दोन तासांच्या भेटीत तो प्रसन्न करुन टाकायचा... दादा खरा दादा.. अचानक अर्ध्यावर मैफल सोडून निघाला यावर या क्षणीही विश्वास बसत नाही हे वेगळं सांगायला नको.. एक सलाम.. एक श्रध्दांजली.. दादा अलविदा...
प्रशांत दैठणकर

Wednesday 7 March 2012



मेळ हा रंगांचा, खेळही हा रंगांचा
निसर्गाची रंगपंचमी समेळ रंगांचा

काळ्या रंगातील हिरवा हा बहर..
रंग हा लाल ही त्याचीच लहर...

रुपेरी रूपेरी नभातला तो चांद..
सजणीला सजणा करी तो याद..

गहिरा गर्द सा-याच या छटा..
गो-या चेह-यावर काळ्या गं बटा..

अबोल बोलतो सांगतो गुलाबी..
डोळ्यात बघता होतो हा शराबी...

पांढरी शांतता निळ्या या नभात..
तमाला गं सारते..तांबडी प्रभात...

भगवा, हिरवा ,लाल, पिवळा, निळा
राजकारण सारे रंगांचा असे गोंधळ

सारं सारं विसरुन अंगांग रंगवावं..
रंगांचं हे सुख सा-या जगी वाटावं..

प्रशांत दैठणकर

Monday 9 January 2012

उड चली रे पतंग...


      साधारण पाचवी-सहावी दरम्यानचं तो काळ 1980-81 च्या आसपासचा सकाळी थंडीत काकडणं दुपारपर्यंत थंडी रहायची आणि उब वाढतेय वाटत असताना सुटणा-या वा-याने पुन्हा वाढायची. हा डिसेंबर संपल्यानंतर जानेवारीत सुटणारा मंद आणि थंड वारा.
     त्याकाळी टिळकपथावर बढई गल्लीत मी रहायचो गल्लीत एकाच वयोगटातल्या 30 ते 32 जणांची गँग. टिव्ही नाहीत. मनोरंजनासाठी फक्त रेडिओच असायचा. मग काय खेळण्याची धूम असे. एका कंपूची आवड गोट्या खेळण्याची काचेच्या त्या चमकदार गोट्या एका छोट्या हौद्यात फेकायच्या आणि नेम धरुन सांगितलेली गोटी अलगद मारायची की सारा डाव तुमचा. गँग इतकी मोठी होती की गोट्या हातांनी नाही तर ताटात घेऊन फेकायला लागायच्या.
     गल्लीत राममंदिरालगत एक विहिर होती त्या विहिरीच्या मोकळ्या जागेत पिंपळाच्या पाटालगत हा गोट्यांचा डाव रंगायचा. त्या खेळात गती नसल्याने आम्ही एक वेगळा कंपू घेऊन कोप-यावर असलेला ठाकूरांच्या बिल्डींगवर पतंगबाजीत रंगायचो.
    पतंग अर्थात कागदी तावाला बांबूच्या कामट्यांनी विशिष्टपणे बांधून त्याला दोरा लावून या जानेवारीच्या हवेत उडवायचं. त्यामुळेच संक्रांतीच्या या काळात पतंगबाजी जोरात चालायची.
    दोरा गुंडाळायची ती चक्री. ढीलका मांजा आणि काट का मांजा अशा दोन प्रकारचा मांजा वापरला जायचा. पतंगबाजीचे काही खास शब्द होते. `ढील देना` घिसतमतानी, रिग्गा, चिपडी, डुग्गा, रखते ही साफ, पोक्का, हिलगाना असे ते काही शब्द.
     पतंगबाजीत कटलेल्या पतंगाला आपल्या पतंगाच्या सहाय्याने हिलगावून खाली आणणे ही एक कला होती. रस्त्यावर उंच काठ्यांनी कटलेले पतंग हवेत पकडले जावे यासाठी विशिष्ट प्रकारची लग्गी घेऊन अनेकजण फिरायचे. या पतंगांवरुन भांडण आणि सशस्त्र हाणामा-याही व्हायच्या. मला तेंव्हाही पतंग उडवता आला नाही आणि आजही येत नाही पण तासनतास हातात चक्री पकडून पतंग उडवण्यास मदत करणे ही माझी खासियत होती वेळीच ढील देणे आणि गुंता न करता व्यवस्थित दोरा गुंडाळणे ही देखील एक कलाच आहे. त्यात मी त्यावेळी एक्स्पर्ट होतो.
      याच पतंगबाजीतून गल्लीतला गणेश दाभाडे आमचा गण्या, सामगांचा अमोल, नाईकांचा सुन्या आणि मी यांनी वयाच्या 12 व्या वर्षी पहिला व्यवसाय केला तो मांजा बनवण्याचा 2 रुपये 65 पैशांची गुंतवणूक प्रत्येकी केली होती. कोरपडीचा रस थम्सअपच्या बाटलीच्या काचेचा चूरा आणि धागा हा कच्चा माल.... त्या पतंगबाजीनं त्या वयात व्यवसायचं एक वेड दिलं ते आजतागायत कायम आहे.
           कागज अपनी किस्मतसे उडता है
           पतंग अपनी काबिलीयतसे ....
असं म्हणतात त्यामुळे आयुष्याच्या पतंगबाजीत काबिलीयत आणण्याचा प्रयत्न प्रत्येक क्षणी सूरु राहतो. आठवतात बालपणीच्या आकाशातले अपेक्षांचे ते पतंग.

-         प्रशांत दैठणकर