Monday 21 August 2017

प्रेमाचं नाव... एक त्या प्रेमाचं गाव

मन किती वेडं म्हणावं...... त्या बहिणाबाईनी सांगितलय तेच खरं..... उभ्या पिकातल्या ढोराप्रमाणे पुन्हा पुन्हा एकाच दिशेला धावायला लागतं. ही ओढ नेमकी कशाची आणि ती आली कुठून..... कदाचित ते क्षण पूर्ण जगले किंवा कदाचित काही अपूरे पडले.....! कळत नाही, पण पण... हो पण मन त्या ठिकाणाहून कधी मागे वळत नाही.
बाहेर नभांच्या दाटीनं काळोख दाटून एव्हाना गडगडाट सुरु झाला अन् एक क्षणात मुसळधारांनी तो बरसायला लागला...... त्या पावसांच्या धारा धरणीकडे धाव घेत होत्या अन् त्या बरसत्या धारांना खिडकीत बसून बघताना मनातल्या भावनाचा प्रवास नेमका उलटा सुरु झालेला....., भावनांचं मळभ दाटून येतं....... भावना भरतीला येवून मनाच्या किनाऱ्यावर धडका मारत असतात. त्याचे तुषार अंगावर येत नाही अन् धारांमधून बरसणारा तो पाऊस देखील ओंजळीत थांबत नाही.....!

आयुष्य..... असच धो-धो बरसून गेलेले आणि ओंजळीतून निसटून गेलेले...... अशा निवांत क्षणी मग अचानक विचार ...... एक आगळाच कोलाहल होतो मनात.......कानात शब्द ते लहानपणीचे पिंगा घालू लागतात...... सहज मिटल्या पापण्यात मग ते बालपण स्पष्टपणे एखाद्या चित्रपटासारखं दिसायला लागतं........शांत ..... आणि निरागस......
अगदी नितळ पाणी कातळावरुन पसरत जाणारा एक झरा....... सारं स्पष्ट होत जातं. त्या निरागस क्षणात आपण होतो पण आसपास स्वार्थाचे चष्मे घालून आपल्याला हव्या त्या रंगांचे जग बघणाऱ्यांची गर्दी होती.......त्यावेळी जाणवलं नाही पण आज त्यानं कधी काळी संपलेल्या बालपणाला पुन्हा एक मोठा भूकंपासारखा हादरा बसतो.

प्रश्न....प्रश्न आणि प्रश्न..... मनात प्रश्नांचं एक अखंड असं रिंगण..... निरागस का होतो ? एवढा भावनाशील का होतो ? त्याही पलीकडे जाऊन पुढचा सवाल त्याच्या हातात हात घालून विचारतो. आजही तितकाच भावनाशील आणि संवेदनाक्षम . असा मी का आहे.....! कारण कदाचित हा मी असा आहे.... . चूकत असेल तर चुकू दे पण असं असणं काही गैर नाही...... मलाच धीर देणारं माझं मन.....! रिंगण वाढत असतं.

पावसाचा भर ओसरतो तसच काहीसं भावनांचं का होत नाही...... आसपास सारं स्वार्थी...... रुक्ष आणि कृत्रिम विश्व बघून का नाही वाटत की आपणही बदलावं स्वत:ला म्हणजे कदाचित वेदना कमी होतील....त्या वेदना उरात घेऊन जगताना क्षणभरही असा विचार मनाला शिवला नाही....... महत्वाचं काय बदल पण कशाचा...... स्वत:च्या प्रामाणिक भावनांमधला नाही शक्य म्हणत वेदनांना कुरवाळायचं.......! असं घडतं अधून मधून......पुन्हा त्याच इमारती दिसतात. कदाचित मनात चित्र कोरलं गेलय पुन्हा बालपणातले ते दिवस दिसतात..... कदाचित यातून मन बाहेरच पडलं नाही......अन् मग तो गंध....... हो तोच गंध तुझ्या
श्वासातून आसमंतात कस्तुरीची बरसात करणारा...... तो कसा येतो....... खेळ रे........ सारे मनाचे खेळ......!

तो गंधा-सुगंधाने भारलेला आठवणींचा डोलारा पाठलाग करत राहतो...... स्थान बदललं......वेळ अन् काळही बदलला......एव्हाना सारं सारं आठवणींच्या पडद्याआड जायला हरकत नव्हती..... पण असं होत नाही....!
तू पुन्हा वळतेस तुझ्या त्या सुंदर केसांच्या जाडजूड वेण्या पाठीवरुन गिरकी घेतात अन् खटयाळपणे उजव्या डोळयावर आकडा करणारी ती एक केसांची बट आणि तुझे शुभ्र डोळे चकाकतात......ओठ विलग होताना आतून मोत्यांची रास डोकावते..... तू हसत पुन्हा स्वागत करतेस अन् मी पुन्हा सारं...... सारं विसरुन तुझ्या प्रेमात तुझ्याच दिशेने नकळत चालायला लागतो...... नकळत.......

खिडकी बाहेर कडाडलेल्या विजेच्या आवाजासोबत झालेल्या शुभ्र लखलखाटाने आसमंत उजळून निघतो अन् जरासं मला माझ्या त्या धावण्यातून पुन्हा वर्तमानात हात खिडकी बाहेर सोडलेल्या स्थितीत मी बघत असतो..... हातावर पावसाचे थेंब नाचत....... नाचत निघून जातात.....
हात पावसात भिजला तरी मनाइतका चिंब झालेला नसतो..... पण..... याही वेळी तुझ्या आठवणीत माझा आजचाही पाऊस निघून गेलेला असतो..... निघून गेलेला असतो....... अगदी तुझ्या सोबतच काळाप्रमाणे.....!

- प्रशांत दैठणकर
9823199466

Friday 18 August 2017

" स्माईल प्लीज .......! "

प्रत्येक व्यक्तीला विचारा कुणावर प्रेम आहे तुझं ? याचं उत्तर निरनिराळया पध्दतीचं असू शकतं आणि ते रंजक देखील असतं मात्र त्या पलिकडेही जाऊन एक वैश्विक सत्य आपण मानलं पाहिजे प्रत्येक व्यक्तीला स्वत:वर सर्वाधिक प्रेम असतं आणि ते अगदीच सहाजिक व नैसगिंक आहे.

सांग दर्पणा मी कशी दिसते......?

वयात आलेला तरुणीनेच नाही तर कोणत्याही वयातल्या स्त्री ने विचारलेला सवाल असतो. आपल्याला आवड असते ती आपण स्वत: कसे दिसतो याची. यातूनच दर्पणाची संकल्पना आली.

बाळ श्रीरामाने ज्यावेळी चंद्रजवळ जाण्याचा हट्ट धरला त्यावेळी मातेने हा बालहट्ट पुरविण्यासाठी पाण्यातलं प्रतिबिब दाखवलं असा दाखला आहे. यातूनच पुढे दर्पण अर्थात आरसा आला.


दर्पणात बघून समाधान हे क्षणीक मात्र त्याला दीर्घकाळ चालवायचं तर कसं मग यातून तसबीर रेखाटनं सुरु झालं.. जुन्या राजांच्या अशा भव्य तसबीरी आजही आपणास बघायला मिळतात.

आपल्या दृष्टीस जे दिसतं ते पकडून ठेवण्याचा हा छंद तसा जुना. पण याला नवा आयाम मिळाला तो छाया प्रकाश संयोगाला प्रतिबिंबीत करुन जतन करुन ठेवण्याच्या तंत्रामुळे अर्थात छायाचित्र यानेकी फोटोग्राफ शोधामुळे. छायाचित्र करण्यामागे रसायनांचा वापर झाला आणि पहिल छाया-प्रकाश चित्र सर्वांसमोर आलं तो दिवस मोठा क्रांतीकारी आणि कोटयवधींच्या व्यवसायाला जन्म देणारा ठरला. यातून त्याच प्रमाणात व्यवसायासोबत रोजगाराच्या संधीनिर्माण झाल्या. आणि स्वत:वर सर्वाधिक प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने याला आपल्या आयुष्यात मानाचं स्थान दिलं.

आयुष्यात जगलेल्या क्षणांच्या आठवणींची साठवण या चित्रात आपणास जमा करता यायला लागली. पहिल्या छाया-प्रकाश चित्राचा हा प्रवास छायाचित्रांपासून, चलतचित्र अर्थात चित्रपट व्यवसायाच्या रुपाने मनोरंजन उद्योगात आणि 21 व्या शतकात आता
डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात स्मार्टफोन च्या रुपानं प्रत्येकाच्या हातात आला.

यातून पुढे आलेल्या " सेल्फी " च्या संकल्पनेने या छायाचित्रणास खूप मोठया उंचीवर नेलं त्यासोबत स्वत:वर प्रेम करणारे काही दुदैवी जीव याच "सेल्फी "च्या नादापायी प्राण गमावत आहेत. असा संमिश्र प्रवास या काळात झाला.

या साऱ्यांची सुरुवात आजपासून 200 वर्षांपूर्वी झाली निलोफर निसे नावाच्या खटपटया संशोधकाने सिल्व्हर आयोडाईडच्या थर असणाऱ्या एका तांब्याच्या तुकडयावर आयोडीनची वाफ देऊन पहिली छाया प्रतिमा कैद केली. हे जगातलं पहिल छायाचित्र होतं.... आज 200 वर्षात यात प्रचंड क्रांती झाली आहे. निसेने नंतर 2 वर्षे अधिक मेहनत करुन हे तंत्रज्ञान यंत्राच्या रुपात एका लाकडी खोक्यात बंदीस्त करुन कोठेही नेता येईल अशी सोय केली हा जगातला पहिला कॅमेरा होता.

प्रत्येकाचं स्वत:वर असणारं प्रेम या कॅमेऱ्याला संशोधनाच्या रुपानं आजच्या अतीअद्ययावत अशा स्मार्टफोन कॅमेऱ्यापर्यत घेऊन आलं आणि या काळात 200 वर्षात छायाचित्रण, छायाचित्रकार अशी स्वतंत्र व्यवसाय श्रेणी त्यात वेगवेगळया प्रकारच्या संधी निर्माण करणारं ठरलं. औद्योगिक असो की निसर्ग छायाचित्रण किंवा वन्यजीव छायाचित्रण, मॉडेलिंग असो की खाद्यपदार्थ छायाचित्रण प्रत्येक क्षेत्रात यात एक "करिअर" म्हणून देखील उत्तम संधी निर्माण करणारं ठरलेल्या या छायाचित्रणाची सुरुवात झाली तो दिवस 19 ऑगस्ट अर्थात जागतिक दिन होय.

या छायाचित्राची क्रेझ किती असू शकते याचा अंदाज आपणास सोशल नेटवर्कींग मधून येवू शकतो. प्रत्येकजण ना-ना प्रकारचे छायाचित्र फेसबूक सारख्या साईटस्‍ टाकताना आपणास दिसेल. फेसबूक ही सर्वात लोकप्रिय नेटवर्कींग साईट असेल असं आपणास वाटत असेल तर ते चुक आहे. जगात सोशल नेटवर्कींगच्या ज्या साईटस् आहेत त्यात ' इन्स्टाग्राम ' सर्वात लोकप्रिय आहे. एप्रिल 2017 अखेर या साईटस् च्या एकूण फॉलोअर्स ची संख्या 700 दशलक्ष इतकी होती. फॉलोअर्सच्या बाबतीत ही साईट सर्वात अव्वल आहे.

' इन्स्टाग्राम ' हे तसं म्हटलं तर फेसबूकचं अपत्य आहे. मार्क झुकरबर्गने 2004 साली फेसबूकची सुरुवात केली त्यानंतर 2010 साली 6 ऑक्टोंबरला ' इन्स्टाग्राम ' अवतरलं पण आज ' इन्स्टा' आघाडीवर आहे. कारण लिहीण्यापेक्षा फोटो हे अधिक सशक्त्‍ माध्य्म आहे.

हजार शब्दाचा निबंध लिहिणे शक्य्‍ आहे पण त्याहीपेक्षा अधिक बोलण्याची ताकद एखाद्या छायाचित्रात असते. साधारणपणे छायाचित्राचं असणारं वेड आता कुठल्या थराला जाईल याबाबत भारतात बोलणं अवघडच आहे. अनेकदा अंत्ययात्रेला उपस्थिती असाही फोटो दिसतो. त्यावेळी जरा खरं वाटते पण याला पर्याय नाही. व्य्‍क्ती तितक्या प्रकृती आणि प्रवृत्ती बाकी काय .

समोरुन कुणी फोटो काढावा यासाठी दुसऱ्या कुणाचं असणं आवश्य्क नाही असा प्रकार अर्थातच ' सेल्फी ' आताचा हा काळ सेल्फीचा काळ तोंडाचा चंबू करुन सेल्फी काढल्या आणि माध्यमात ' व्हायरल ' केल्या जातात. आजची पिढी त्यामुळे 'फोटो क्रेझी' आहे असं म्हणायला हरकत नाही.

छाया-प्रकाशाचं रुप कैद करुन कायमस्वरुपी त्याला जतन करणे आणि हव्या त्या वेळी त्या क्षणाला पुन्हा जिवंत करणे ही छायाचित्राची ताकद त्या छायाचित्रण कलेला आणि समस्त छायाचित्रकारांना .......शुभेच्छा देताना...... स्माईल प्लीज...... अन् क्लीक.......!

-प्रशांत दैठणकर
9823199466

Tuesday 15 August 2017

उदय नव्या महासत्तेचा......!


ज्याचा उल्लेख भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी आमावस्येच्या रात्री नियतीसोबत करार असा केला त्या आपल्या खंडप्राय देशाचा भाग्योदयाचा दिवस म्हणजे आपला स्वातंत्र्यदिन अर्थात 15 ऑगस्ट होय. त्यापासून चालत आपण आज याच स्वातंत्र्याचा 70 वा वर्धापनदिन साजरा करित आहोत. इतक्या वर्षात भारताने जो पल्ला गाठला तो खूपच कमी देशांना इतक्या छोटया कालावधीत गाठत आला आहे हे अभिमानाने सांगावं तितकं कमीच आहे.
या सत्तर वर्षांच्या कालावधीत पिढया बदलल्या आहेत मात्र आपण आजही काही बाबतीत आपल्या समाजाची मनोभुमिका बदलू शकलो नाहीत हे देखील आपणास यावेळी मान्य करावं लागेल.

भिन्न भाषिक प्रांतांमध्ये पसरलेला आणि अडीचशेहून अधिक संस्थांनांमध्ये विखूरलेला देश एकसंधपणे उभा करण्याचं आव्हान स्वातंत्र्याच्या क्षणी आपल्या देशासमोर होतं ते कणखरपणा दाखवत सरदार वल्लभभाई पटेल यांनी वास्तवात आणून दाखवलं. नंतरच्या काळात प्रगतीच्या टप्प्यात जी वाटचाल झाली त्यामागे फाळणीच्या जखमा घेऊनच आपण केली. मात्र आजही आपण त्या घटना विसरलो नाहीत हे देखील खरे आहे.

संघराज्य म्हणून देशाची ओळख प्रस्थापित करणारे संविधान अमंलात आणल्यानंतर खऱ्या अर्थाने आपल्या विकासाला दिशा मिळाली. पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून एकत्रित प्रयत्न झाले. या नंतरच्या काळात भाषावार प्रांतरचना आपण स्विकारली त्यानंतर आजपर्यंत अनेक ठिकाणी राज्या-राज्यात असणारे सिमा वाद आणि नद्यांचे पाणीवाटप याबाबत मोठी मतभिन्नता आपण बाळगत आलोय.

एक देश ....! एक कायदा....!
देशाला खऱ्या अर्थाने एकत्र जोडण्याचे काम गेल्या काही वर्षात झाले. याला मुख्यत्वे इतर देशांचा असणारा सहभाग देखील याला बळ देणारा होता. आंतरराष्ट्रीय पातळीवर इंटरनेटचा प्रसार झपाटयाने झाला. याच पार्श्वभूमीवर आपल्या देशाची वाटचाल अभूतपूर्व अशीच ठरली. या सायबर विश्वाने वास्तविक विश्वाच्या समांतर व्यवस्था निर्माण केली. त्याच चांगल्या बाजूची दुसरी बाजू अर्थात सायबर गुन्हेगारी देखील वाढीस लागली.

सायबर गुन्हेगारीला देशांच्या आंतरराष्ट्रीय सिमांचे बंधन नाही याची जाणीव ठेवत सायबर गुन्हेगारी रोखणारा कायदा आंतरराष्ट्रीय स्तरावर झाला हा पहिला कायदा होता. जो भारताचा भूभाग असून स्वतंत्र अस्तित्व जपणाऱ्या जम्मू आणि काश्मीर राज्यात एकाच वेळी लागू झाला.

काश्मीरमधील आजच्या स्थितीवर सोशल नेटवर्कच्या माध्यमातून भरभरुन अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पूर येतो. परंतु यापैकी किमान 90 टक्के जणांना नेमका प्रश्न काय आहे याची कल्पना आहे की नाही असा प्रश्न पडतो. कलम 370 आणि त्यामागची कारणं याचा अभ्यास किती जणांनी केलाय हा देखील एक संशोधनाचा विषय ठरावा.

यानंतर गेल्या महिन्यात जीएसटी अर्थात ' गुडस् ॲन्ड सर्व्हीसेस ' टॅक्स संपूर्ण देशात लागू झाला. खऱ्या अर्थाने एक देश एक कायदा ही संकल्पना अस्तित्वात आणण्याची कृती या निमित्ताने झाली. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर संपूर्ण देशाला एका सुत्रात बांधणारा कायदा म्हणजे जीएसटी असं माझं वैयक्तिक मत आहे.

विकसित देश आणि भारत यांची तटस्थपणे तुलना करताना जाणवतं की, विशिष्ट प्रसंगी येणारा राष्ट्रभक्तीचा पूर नंतर भाषा, प्रांत आणि धर्म व जातीच्या माध्यमातून आटून जातो. आपल्या राष्ट्रप्रेमात आपण सातत्य राखू शकत नाही. राजकारणात विकासाच्या विषयांना खोडा घालण्याचे काम केले जाते याचे भान आता नव्या पिढीत आले आहे. याचाच परिपाक देशाची सूत्रे अनेक वर्षांनी पूर्ण क्षमतेने एकाच पक्षाकडे देण्यात झाला आहे.

मतदानाचा दिवस सुटीचा दिवस मानणं ज्या दिवशी सर्वजण सोडतील त्या दिवशी प्रगतीचा मार्ग लवकर सापडतो आणि त्यातून विकास हा सर्वांचाच होणार आहे याचीही जाणीव नव्या पिढीत रुजली आहे याचाही आनंद आहे.

काळाची पावलं
काळाची पावलं नेमकी कोणत्या दिशेने जात आहेत याची माहिती घेऊन आपण काळाच्या पुढे वाटचाल करायला शिकलं पाहिजे. नव्या पिढीनं ते जाणलय. आज विमुद्रीकरण असो की, रोखरहीत अर्थव्यवस्था यात नवी पिढी अग्रेसर आहे ही देखील देशासाठी एक जमेची बाजू आहे.

याच वेळी काळाच्या प्रवाहात जुन्या पिढीने आपल्या धारणा बदलून किमान काळासोबत चाललं पाहिजे इतकी माफक अपेक्षा इथं व्यक्त करता येईल. आपण बदल स्विकारलाच पाहिजे अन्यथा आपण प्रवाहातून बाहेर फेकले जाऊ असे कळून घेण्याची आणि काळासोबत जुळवून घेण्याची वेळ आली आहे.

या निमित्तानं देशाला संगणकाची ओळख करुन देणाऱ्या पंतप्रधान राजीव गांधींची आठवण झाल्याशिवाय रहात नाही. त्यावेळी बँकांमधील कर्मचाऱ्यांनी संगणकावर काम करण्यास नकार दिला होता. अमेरिकेने चांद्रयानाव्दारे नील आर्मस्ट्राँगला चंद्रावर उतरवलं त्यावेळी वापरल्या गेलेल्या संगणकाच्या एकूण क्षमतेच्या सहापट अधिक क्षमता असणारे मोबाईल फोन आजची पिढी वापरत आहे हे वास्तव आहे. संगणकावर काम करण्यामुळे कामात आलेली गतीमानता हे प्रगतीचं पहिलं लक्षण आहे.

श्रीमद् भगवदगिता सांगते 'परिवर्तन ही संसार का नियम है '' गेल्या 70 वर्षांमध्ये याची प्रचिती आली . नव्याचा स्वीकार केला गेला त्यामुळे आज आपला हा भारत देश नवी महासत्ता म्हणून उदयाच्या मार्गावर आहे. एक राष्ट्रप्रेमी भारतीय या नात्याने प्रत्येकाने या विकासात आपापला वाटा उचलला तर हे स्वप्न वास्तवात यायला वेळ लागणार नाही.

स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा !

- प्रशांत दैठणकर
9823199466