Monday 16 January 2023

बहती हवा सा था वो.. !



कधी कधी आपणास आयुष्यात Deadlock स्थितीचा सामना करावा लागता अर्थात भावनांचा सागर मनात घेऊन चालताना अशी स्थिती सहाजिक असते. आपल्या मनाप्रमाणे सर्व घडावं असं वाटणं हे एक स्वप्न आणि ते कधीच न घडणं म्हणजे वास्तव. याला वास्तव न म्हणता मी जग त्याला स्वप्नांपलीकडे असं म्हणतो म्हणजे नकारात्मकता दूर ठेवता येते... 

स्वप्नांपलिकडलं जगताना लक्षात एकच ठेवायचं की वेदना सर्वांनाच असतात... कुणी दाखवतं.. बहुतेक सारे लपवतात.. सामाजिकतेची झूल पांघरुण आणि समाधानाचा मुखवटा घालून ही मंडळी कदाचित कृत्रिमपणे जगाकडे आणि आयुष्याकडे बघत असावीत...

गणितं भावनांची, आशा, अपेक्षा, निराशा आणि बरच काही असतात पण इथं गणितं मांडली जातात ती पैशांची.. पैशांवरुन पत जोखणं आणि त्याच आधारे गोतावळा जवळ करण्याची स्पर्धा उघडपणे सुरु असते. यात आपली स्थिती किती उत्तम हे दाखवण्याचा आटापीटा आणि सुखाची तोरण डोळयांच्या पापण्यांना लावून चेहऱ्यावर बेगडी हास्य मिरवण्यांची इथं गणना अशक्यच...

गणना शक्य आहे ती प्रामाणिक भावनांचे प्रतिबिंब चेहऱ्यावर ठेवणाऱ्यांची ... बालपण सरतं तसं मनातलं बालक अर्थात निरागसपणा जाऊन जगण्याला एक निगरगट्टपणा आणि शरिराला निब्बरपणा येतो अशा जगात भावनांचे प्रदर्शन हा विनोदाचा ठरत असता तरी ती जगण्याची शैली हा खरेपणा आहे... असं जगणं सहज सोपं असतं काल काय खोट बोललो याची आठवण ठेवावी लागत नसल्याने जगणं आणखी सुसह्य होतं... यासाठी मनातलं बालपण जपायचं... ती खरी साधी राहणी मग जग हसत हसेल तर हसू देत ना...

मारणाऱ्या हातांना अडवता येतं पण बोलणाऱ्या तोंडाना रोखता येत नाही आणि इथं गॉसिपींग करणाऱ्यांचे बहूमत आहे म्हणूनच आपलं वेगळेपण हे आपल्या मोकळेपणात आणि मोकळया मनात आहे...

आलं तसं जगणं ही वृत्ती जपणाऱ्या गर्दीत हवं तसं जगणारे किती जण आहेत याचं उत्तर प्रत्येकानं आरशात बघून देण्याचा प्रयत्न करावा.

बहती हवा सा था वो.... उडती पतंग सा था वो

कहां गया उसे..

असं जगानं म्हटलं पाहिजे असा हट्ट नाही पण तसं जगणाऱ्याला नाव ठेवत असले तरी त्याचं जगणं, असणं विसरता येत नाही किंबहुना अशा जगणाऱ्या व्यक्तीबाबत नकळत आसुया निर्माण करुन घेणारे असतात.

मला आठवणीत ठेवा असा आग्रह यासाठीच नाही की मला पूर्णपणे माहिती आहे. तुम्ही मला विसरु शकणार नाही.. आजवर अनुभवानं जाणलय की कारण शोधून अंतरं राखणारे देखील अहेतूक आणि सहेतूक शोध घेत असतात.. कृत्रिमपणा टिकत नाही आणि वास्तविकता संपत नाही हेच खरं आहे.

मुळात हे माझं असेल तर त्याला मी माझ्या व्याख्येत बसवलं पाहिजे.. इतरांच्या व्याख्येत बसवताना इतरांना आनंद वाटत असेल तर तो त्यांना लखलाभ म्हणून आपण निरपेक्ष वृत्तीनं स्वत:कडे बघणं म्हणजे आयुष्य. आपण अशा पध्दतीनं जगणं म्हणजे स्वार्थ असं कुणी म्हटल तरी चालेल कारण संतवचन आयुष्य सांगताना आधी स्वार्थ आणि नंतर परमार्थ असाच संदेश देतात.

संध्याकाळी किंचित मळभ दाटल्यावर गेल्या दिवसाचा विचार अनाहूतपणे मनात येतो... गेला दिवस मी काय केलं... इथं आल्यादिवस जगण्याचा आनदं न घेतात न बघितलेल्या आणि खात्री नसलेल्या येणाऱ्या दिवसाची चिंता करण्यात अर्थ नाही आणि ते जगणं देखील नाही

मनोभूमिका ... मन असतं कुठे शरिरात ... हा सारा मेंदुतील केमिकल लोच्या च ना... उद्याच्या वर्तमानात आपणास जगताना भावी स्वप्नं नसली तरी चालतील पण खंबीर अशी जिवंत जगलेल्या भूतकाळाची आठवण आणि त्या साठवणीची शिदोरी आवश्यक आहे

अर्थात 

दिवानों की यें बातें ..    दिवानें जानते है...

प्रशांत दैठणकर

#dpacific

No comments: