Tuesday 14 August 2012

विलासराव....

माणूस कसा असावा याचं उदाहरण म्हणजे विलासराव देशमख असं म्हणता येईल.विलासराव देशमुख यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात मी औरंगाबादला बदलीवर गेलो. माझी बदली तातडीच्या कारणाने झाली आणि लगोलग मला तिथं उपसंचालकपदाचा पदभार दिला गेला.
     मी औरगाबादमध्ये सततच्या दौ-यांमधून आणि कॅबिनेट बैठकांमधून विलासरावांच्या आसपास वावरलो.पत्रकार परिषदांच्या निमित्तानं अधिक जवळून परिचय झाला. एक राजस आणि लाघवी व्यक्तीमत्वाचे धनी मुख्यमंत्री म्हणून वावरायचे अतिशय रुबाबात पंरतु कधी आवाज चढला नाही पण जरब होती. आदरपूर्वक वचक कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे विलासराव असं म्हणता येईल.
     एकदा खरिपाच्या बैठकीनंतर वाल्मीत पत्रकार परिषद घ्यायची होती. त्यावेळी पत्रकार संघाच्या काही सदास्यांनी विनापरवानगी प्रमुख पाहुणे म्हणून विलासरावांचे नाव टाकले.आणि आग्रह केला. मात्र कार्यक्रम पत्रिकेत कार्यक्रमच नसल्याने विलासरावांना तिथं जाणं शक्य नव्हतं त्यामुळे त्यांनी स्पष्ट नकार दिला.
     तिथल्या एका कक्षात विलासराव आराम करत असताना बाहेर पत्रकारांनी घोषणाबाजी सुरु केली. मी आत- बाहेर अशा स्थितीत होतो. मी विलासरावांना विनंती केली की कार्यक्रमाला जाता आलं तर चांगल होईल त्यांनी पुन्हा नकार दिला. माझ्या चेह-यावरचे भाव बघून त्यांनी मला जवळ बोलावले आणि आश्वासकपणानं म्हणाले चिंता नको करु.काय ते तुझी तक्रारच करतील ना खातं माझ्याकडेचे आहे. तक्रार माझ्याकडेच येणार तू काळजी नको करु. मी निर्धास्त झालो.त्यांच्या शब्दातला धीर मनाला सुखावून गेलो.
     सायंकाळी राजस्थानी विद्यार्थी वसतीगृहाचं उद्घाटन होतं तिथं राजेद्र दर्डा आधी पोहाचले ते देखील राज्यमंत्री होते. त्यांच्या माझ्या मोबाईलवर फोन आला की कार्यक्रम ज्या ठिकाणी आहे तिथं डी. पी.खराब झाल्याने लाईट गेले आहेत.मी लगेचच विलासरावांना सांगितलं की किमान अर्धातास कार्यक्रम उशीरा होणार आहे. तेंव्हा पत्रकारांच्या कार्यक्रमास जाणं शक्य आहे. तेव्हा पत्रकारांच्या कार्यक्रमास जाणं शक्य आहे कृपया कार्यक्रमास जाऊ म्हणजे पत्रकार मंडळी खूश होतील.
     विलासरावांनी घडयाळ बघत लगेच होकार दिला आणि गाडयांचा ताफा मसापकडे निघाला. त्यांचे वक्तृत्व दिलखुलास आणि रंजक असायचं त्यांनी भाषणाला सुरुवातच मुळी....नारायण नारायण... ! आणि अर्धा तास जोरदार फटकेबाजी करीत पत्रकांराना खडे बोलही सुनावले. तसेच विनोदाची पेरणी करीत सर्वांना हसविले. आपणही वृत्तपत्र काढलं त्याचे किस्से त्यांनी ऐकवले. राजेंद्र दर्डांचा फोन येईपर्यंत हे भाषण सुरु राहिले. असं दिलखुलास व्यक्तीमत्व आज आपल्यात नाही त्यांना आर्वीत शेवटचं भेटलो त्यावेळी आपल्या नेहमीच्या पध्दती अरे तू इथं ... कसा मजेत ना असं विचारलं. इतक्या काळात ७ वर्षांचा खंड पडला तरी ओळख त्यांनी ठेवली याचा मला आनंद वाटला.
 ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो ही प्रार्थना
- प्रशांत दैठणकर

No comments: