आज प्रत्येक जण धावत....का आणि कशासाठी असं विचारुन आपण आपलं हसं का करुन घ्यावं..... कशासाठी पोटासाठी खंडाळयाच्या घाटात जाई...... हे बालगीत त्याचं उत्तर आहे.....काही अंशी तेच आहे पण त्याही पलिकडे काही कारणं आहेत ज्यासाठी प्रत्येकाची वेगळी धाव सुरु आहे.
मूड का बदलतो हे आपलं आपल्याला कळत नाही असं अनेकदा होत असतं पण आपला मूड बदलला हे समोरच्याला बघता क्षणी कळतं..... त्यांनी जाणवून दिल्यावरच आपल्याला कळणार आहे का हा बदललेला मूङ..... तसंही नाही आपल्यालाही जाणवतंच की, उशिराने का होईना......
हा मूड या धावपळीचं फलीत आहे आणि त्याचं रुपांतर अनेकदा रक्तदाब, हृदय विकार आणि तत्सम बाबीत होतं मग आपण सावरण्याचा प्रयत्न करतो...... जगण्याची धडपड मनाचे मूड नियंत्रित करण्याचा प्रयत्न करायला लागतो.... पण जगात चंचल असणारं मन आपला हट्ट सोडत नाही. विक्रम-वेताळासारख्या गोष्टी प्रमाणे ते पुन्हा मूड बदलायला लागतं...... मग अधिकच वैताग व्हायला लागतो. मी मानसिक दोलायमानता जी स्थिती निर्माण करते ते हळूहळू असहय होवून जाते ज्याला आपण मानसिक ताण किंवा स्ट्रेस म्हणतो.
मानसिक ताण हा आजच्या जीवनशैलीचा एक घटक बनत आहे. यातून काही मार्ग निघेल का.... आहे ना मार्ग... .स्थितप्रज्ञता हा मार्ग आहे.
Hypper होण्याची वृत्ती पाहून आजकालची पिढी ज्या भाषेत बोलते त्या भाषेत सांगायचं असेल तर म्हणावं लागेल Take a chill Pill. ... ओये ठंड रख....!
खरच मानसिक आंदोलन शांत करता येतील की नाही....... त्याचीही एक वेगळी चिंता.
आपल्याकडे माणूस आयुष्यात एकदाच धडधडून पेटतो..... तो फक्त सरणावर बाकी वेळा त्याचं परिस्थितीशी लढणं चालत राहतं. आपल्या मानसिक कुवत आणि ज्ञानाप्रमाणे आणि मग प्रत्यय येतो.
चिंता जाळी शरीर, चिंता जाळी मन
या उक्तीचा.... रोजच चिंता करणं म्हणजे रोज थोडं थोडं मरणं होय. ते टाळता आलं पाहिजे. सक्षम मन ही यशासाठीची गरज आहे. जे घडतय त्याला आपण काय आणि कशी प्रतिक्रिया देतो यावर आपल्या बाहय व्यक्तीत्वाचं रुप लोकांना दिसत..... मनात काय चालू आहे हे आपल्या स्वत:शिवाय कुणाला कळत नाही.
आत्मचिंतन आणि आत्मसंवाद उत्तम असेल तर समोर घडणाऱ्या प्रत्येक बाबतीत आपण क्षणात निर्णय घेऊ शकतो. ....
पौ बारा.... म्हणत आयुष्याचं प्रत्येक दान आपल्या पदरात पडण्याची अपेक्षा करायला आपण काही भारलेल्या कवडया वापरणारे कौरव आणि शकुनीमामा नाही.
मनासारखं घडलं तर आनंद वाटतो ना मग नेमकं मनाविरुध्द घडलं तर..... ठीक आहे..... होता है लाईफ मे अशी वृत्ती आपला ताण कमी करेल.
आपल्या स्वत:च्या क्षमतांची ओळख करुन घेणं अधिक महत्वाचं ते फक्त आत्मसंवादातूनच शक्य आहे.... क्षमता पुर्णपणे माहिती असतील तर ताण येत नाही.... जगात दोनच बाजू आहेत Yes or No. आपल्या क्षमतेत असेल तर आपण करु शकतो त्यात यश - अपयश याबाबत स्विकारण्याची तयारी असावी.
जी बाब क्षमतेबाहेत व इतरांवर किंवा परिस्थितीवर अवलंबून आहे ती बाब Yes झाली तर तो बोनस समजायचा. पण प्रयत्न जरुर करायचे. मनाची तयारी अगदी Try for the Best, Ready for the Worst अशी आहे. प्रश्न कर्माचा आहे, आपण कर्ते आहोत.
आयुष्यात यश मिळविणारे आणि अपयश पचवणारेच यशस्वी होतात. महत्वाकांक्षा आणि क्षमता यांची सांगड न घालता डोंगर उचलण्याचा प्रयत्न करुच नये.... मला याबाबत विचार करताना माही अर्थात कॅप्टन कूल एम.एस. धोनी नेहमी दिसतो....
सांगायला सारे सांगतात. सकाळी व्हॉटस्ॲपवर अशा संदेशांचा पाऊस पडतो.... यह भी पल जायेगा..... मात्र संध्याकाळपर्यंत पडणाऱ्या पांचट विनोद आणि व्हिडिओचा पाऊस बघितल्यावर जाणवतं लोक तणावाखाली आहेत. तणावातला माणूसच जास्त शोधात राहतो. विनोदाच्या किमान काही क्षण तरी हसण्याची ही केविलवाणी धडपड असते.
हर फिक्र को धुएं में उडाता चला गया
मै जिंदगी का साथ निभाता गया......
अर्थात तणाव मुक्ती.... मूड जरुर बदलेल पण प्रतिक्रिया आणि सूर बदलला नाही पाहिजे. जगताना साधं जगलं पाहिजे. म्हणजे खूप काही करण्याची महत्वाकांक्षा विनाताण साध्य होते. अगदी हसत खेळत.....
---प्रशांत दैठणकर
9823199466
2 comments:
छान.ताण हलका झाला
Thanks
Post a Comment