Sunday 2 October 2011

साधेपणाचं जगणं बापूचं


रविवार, २ ऑक्टोबर, २०११
बापूंच्या आश्रमात आज लगबग नव्याने सुरु होती.. अखंडपणे सूत कातण्याचा उपक्रम सुरु झालेला.. एका बाजूला प्रार्थनेचे स्वर कानावर येत आहेत.. नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी जमलेली... पालकमंत्री राजेंद्र मुळक स्वत: चरख्यावर सूत कातायला जमिनीवर बसले आहेत हे चित्र आजचे गांधी जयंतीच्या निमित्तानं बापूंचा निवास राहिलेल्या सेवाग्राम आश्रमातले आहे.

आश्रमाच्या दारातून आत जातानाच आपण साधेपणा आपोआप जगायला लागतो याचा प्रत्यय या ठिकाणी नेहमीच येतो गांधी जयंतीच्या निमित्ताने सेवाग्राम आश्रमाचा हा परिसर गर्दीने फुलला होता तरी त्यात साधेपणाची झलक स्पष्टपणे जाणवत होती.

कुटीत बापूंच्या आसनासमोरील जागेवर बसून उपस्थित सर्वांनी प्रार्थना केली. सोबत जिल्ह्याचे खासदार दत्ता मेघे व इतरांचा समावेश होता. आश्रमाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे. असे आश्रम समितीचे अध्यक्ष मा.म.गडकरी यावेळी माहिती देत होते.

आपणही नकळत या वातावरणाने भारावून त्या जुन्या काळात जातो. १९३६ पासून १९४६ पर्यंतचा तो काळ बापूंचा इथं निवास होता आणि सा-या देशाचं केंद्रस्थानच वर्धा व सेवाग्राम बनलं होतं इथच प्रार्थना सभेत बापूंनी प्रथम चले जाव ची घोषणा केलेली.

अनेक चळवळींचा इतिहास इथच घडला आणि याच परिसरात अनेकांनी वास्तव्य केले. बापू नावानं जग आज त्यांना सारं जग ओळखतं... मोहनदास करमचंद गांधी यांचा बापू पर्यंतचा प्रवास खूप काही शिकवणारा आहे. महात्मा म्हणून ज्या व्यक्तीची ओळख निर्माण झाली ते महात्मा गांधी केवळ व्यक्ती नसून एक संस्थान, एक विद्यापीठ होते. भारतीय स्वातंत्र्याचं अधिष्ठान होते.

बापूंनी लावलेल्या हिंदीच्या रोपटयाचं रुपांतर आता जगातील अग्रगण्य भाषेचा वटवृक्ष होण्यापर्यंत झालय. खादीची चळवळीने ग्रामीण भागात आर्थिक सुबत्तेचा मार्ग दाखविला तर कुष्ठरोग्यांच्या सेवेने या समाजाबाहेर टाकलेल्या व्यक्तींना समाजात स्थान मिळाले.

एक ना अनेक बापूंचं कार्य याच ठिकाणी असलेल्या वास्तवात वाढतच होतं... या ठिकाणच्या प्रत्येक वास्तूला बापूंचा स्पर्श लाभलाय.

आजही आश्रमात ते साधंपण आणि तो दिनक्रम जसाच्या तसा जपला जातो. इथं नित्यनेमानं प्रार्थना होते आणि सूतकताई देखील होते. आश्रम परिसर स्वच्छ ठेवण्याचं काम या ठिकाणी राहणारे स्वयंसेवक करतात.

एकदा बापूंच्या वाढदिवसाला त्यांच्या पत्नी कस्तुरबा यांनी तुपाचा दिवा लावला त्यावेळी देशात अनेक घरात चूल पेटत नाही अशा स्थितीत आपण तुपाचा दिवा लावणं योग्य नाही असं बापूंनी सांगितलं होतं तेव्हा पासून साधेपणानं वाढदिवस होते आजही तो साधेपणा ठळकपणे जाणवत होत.

बापूंच्या आश्रमातून पुढील कार्यक्रमास निघताना देखील मनाचा हा भूतकाळातील प्रवास सुरुच होता.....

प्रशांत दैठणकर

No comments: