Wednesday 19 October 2011

बिना शटरची दुकानं


वर्धेत मी आलो त्याला आज 2 वर्षे पूर्ण होवून गेली आहेत. 2009 साली मी वर्धेला यायला निघालो त्यावेळी हे शहर नेमकं कसं असेल ? किती मोठं असेल ... अशा अनेक प्रश्नांची मालिका डोक्यात होती. 5 जुलै 2009 रोजी औरंगाबादहून सुरु झालेला प्रवास चालूच आहे.

वर्धेत आल्यावर या गावचं वेगळेपण मला जाणवलं. मोठ्या वृक्षाच्या सावलीत दुसरा मोठा वृक्ष जगू शकत नाही असं काहीसं वर्धेचं झालेलं आहे. नागपूर सारखं महानगर शेजारी असल्याने वर्धा म्हणावं तितकं विकसित झालेलं नाही.

गाव छोटं. टुमदार घरं आणि प्रेमळ माणसं इथ आहेत तरी काही दिवसात वर्धेचा आणखी एक चेहरा समोर आला. एक सदगृहस्थ माझ्याकडे येवून आपल्या एका संस्थेची माहिती देत होते. सामाज हितासाठी आपण कसं आयुष्य घालावं असं सांगताना त्यांच्या त्या सांगण्यामागचा हेतू जाणवत होता.

मला स्पष्टपणा आवडतो. त्या स्पष्टपणानं मी त्या इसमाला या सर्व कथनाचा हेतू काय हा थेट सवाल केला. आता थेट सवाल आल्याने त्याला माघार घेणं जमलं नाही. माझ्या सारख्या माणसाच्या संस्थेच्या कामाला महाराष्ट्र पातळीवर मान्यता मिळण्यासाठी प्रसिध्दीच्या माध्यमातून माझ्या कार्यालयाने त्याला राज्यस्तरावर न्यावं हा त्याचा हेतू त्याला सांगावाच लागला.

माझं काम अर्थातच शासकीय काम असल्यानं मी त्याला नकारच दिला. सुरुवातीच्या 3 महिन्यात अशा सहा ते सात जणांचा परिचय झाला.

वर्धा नव्या शतकात प्रवेश करीत आहे असं म्हणायचं की जगापेक्षा मागं आहे असं एकूण काय तर अर्थ तोच. याच काळात वावरताना काही कागदी योध्दे दिसले. कुणाचा पाठिंबा नाही आणि पाठबळ नाही तरी एकट्याच्या बळावर विविध कार्यालयांना निवेदनं द्यायची त्याच्या आधारे पेपरात प्रसिध्दी करुन घ्यायची असे हे कागदी योध्दे. थोड्याफार फरकानं सगळीकडेच असतात.

प्रसिध्दी मिळाली पाहिजे यासाठी निरनिराळ्या क्लुप्त्या लढविणारे अनेक जण या गावात आहेत. दरवेळी काही निराळं करणं ही खासियत. नगर पालिका असो की प्रशासन यांचा निवेदनांचा पाऊस संपत नाही. अशांना काय म्हणावं याचा विचार करताना अचानक शब्द सुचला बिनाशटरची दुकानं ...!

मध्यंतरी वाचलं होतं की स्वीट्झर्लँड मध्ये बिना शटरची दुकाने आहेत मात्र ती काच लावून बंद ठेवली जातात अशी सोय तिथं आहे.

भांडवल कागद आणि पेन, ऑफीस नको, त्याचा व्याप, भाडं, विजेचं बिल, काहीही नको. सकाळी चपला पायात सरकविल्या की पदयात्रा सुरु. या कार्यालयातून त्या कार्यालयात. आधीच्या निवेदनाचा फॉलोअप अन् दुस-या नव्या विषयाचं निवेदन द्यायचं .... आणि त्यांच्या प्रसिध्दीच्या मागे लागायचं... दुकान सुरु संध्याकाळी गुपचूप अन् पुन्हा सकाळी आपलं दुकान सुरु अशी ही सारी बिनाशटरची दुकानदारी आज समाजाचा एक अंगच बनलीय.

-प्रशांत दैठणकर

No comments: