Tuesday, 18 October 2011

दिन दिन दिवाळी .... !


  दिवाळी अर्थात दणक्याची दिवाळी असं काहीसं समीकरण गेल्या काही वर्षांमध्ये झालेलं आहे. फटाक्यांचा दणदणाट झाला नाही तर ती दिवाळी कसली असं आमच्या डोक्यात कायमचं बसलं आहे परंतू दिवाळी ही आतषबाजीची आणि फटाक्यांची हल्लीच्या काळात झाली त्यापूर्वी दिवाळी ही खरी मंगलमय क्षणांचा ठेवा होती.
     पहाटेच्या अंधाराचा मुकाबला करीत अंधाराला दूर सारताना ` तमसो मा ज्योतिर्गमय `  संदेश देणा-या अन परिसर उजळून टाकणा-या पणत्यांची रांग. त्यात अंगाला रगडून-चोळून उटण्याच्या त्या सुगंधात कढत पाण्यात थंडीत कुडकुडत केलेल्या अभ्यंग स्नानानं दिवाळीची पहाट घरात यायची.
     दिवाळीची तयारी अर्थातच दस-याच्या सणापासून सुरु झालेली. चमचमणारं स्टील आता आलं. त्यावेळी फक्त धमक सोनेरी पितळी भांड्यांचा जमाना. दिवाळी येणार म्हटल्यावर सारी पितळी भांडी चिंचेचा कोळ करुन राखेच्या सहाय्यानं लख्ख सोनेरी करीत अंगणात वाळायला घालणं आणि त्याच वेळी घरात होणारी `सफेदी` अर्थात भिंती चुन्यानं रंगवण.
     दिवाळीच्या निमित्तानं सारं घर स्वच्छ स्वच्छ व्हायचं, जाळी-जळमट झटकली व साफ केली जायची घराचा कोपरा-न-कोपरा उजळला जायचा.
     दिवाळीच्या आठ दिवस आधीपासून घरात फराळाच्या पदार्थाचा दखल सुरु होत असे. चिवडा हा खासच प्रकार. त्यासाठी मुरमुरे स्वच्छ करुन घेणे अर्थात हे मुरमुरे निजामाबादी असावे याचा कटाक्ष असे. निजामबादी मुरमुरे ही खास मराठवाडी आवड.  दुसरा पदार्थ म्हणजे चकली. सोबत करंजी आणि लाडू. अख्खं घर त्या फराळाच्या तयारीत गुंतलेलं असायचं.
      अभ्यंग स्थानात ब्रेक घेऊन पंचारतीने ओवाळण्याची पध्दत. त्या वेळी ओल्या अंगाला ती थंडी बोचायची.. आणखीनच हुडडुडी भरायची. सा-या वाड्याला ऐकू जाईल अशा आवाजात रेडिओवर सुरु असलेलं नरकासूर वधाचं किर्तन समजून पक्की होती. रेडिओवर त्या नकरासूराचा वध होण्यापूर्वी अंघोळ व्हायला हवी अन्यथा आपण नरकात जाणार. अंगभर चोपडलेल्या तेलावर जोवर मोती सॅन्डल साबण फिरत नाही तोवर दिवाळीचा फिलच येत नाही. या अंघोळीला साथ असायची ती आधी अंघोळ उरकून हातात उदबत्‍ती  घेउन लवंगी फटाके उडविणा-या मोठ्या भावंडांची.
    अभ्यंगस्नान ओटोपल्यावर सर्वांनी एकत्र बसून फराळ हादडायचा आणि त्यांनतर दिवाळी अंकांचा फराळ सुरु व्हायचा, दुपारी जेवणं झाल्यावर घरातली ज्येष्ठ मंडळी आराम करीत असताना टिकलीच्या डब्या घेऊन हातोडीच्या मदतीने तर कधी बंदूकीच्या मदतीने फाट ss  फाट आवाज करुन संगळयांची झोपमोड करायची.
             
             दिन दिन दिवाळी
                गाई -म्हशी ओवाळी
                गाई- म्हशी कोणाच्या ...?
             अशी दिवाळी गाण्यानं दिवाळी सुरु व्हायची साधी रहाणी असल्यानं दिवाळीचा बडेजाव कधीच जाणवायचा नाही. कामटया आणि रंगीत ताव आणून बनवलेला तो आकाश कंदिल आणि त्या कंदील बनवण्याच्या गमती-जमती आठवत या कोजागिरीला मी माझ्या शासकीय बंगल्यावर रेडीमेड आकाशदिवा लावताना मला बालपणातली दिवाळी आठवत होतो ...  मन काळाच्या वेगानं भूतकाळात जाऊन पुन्हा एकदा दिवाळी साजरी करीत होतं.




                                           प्रशांत दैठणकर

No comments: