Saturday 15 October 2011

कबूतर जा जा जा...


     एक जमाना असाही होता ज्यावेळी घरी येणा-या त्या पोस्टमनला खूप महत्व होतं हा डाकिया शिक्षित आणि लिहू व वाचू शकणारी व्यक्ती होती आणि काळही संथ असल्याने त्यावेळी घराच्या दाराला पोस्टमनची वाट असायची. अनेक घरात हा डाकिया अर्थात खाकी वर्दीतला बाबू घरातील सदस्यच होता.
     संदेश वहन ही प्रत्येकाची गरज आहे. काही संदेश हे सांकेतिक तर काही सांगितीक पण हे आवश्यक. जुना काळ होता तो संदेश देण्यासाठी खास घोडेस्वार पाठवण्याचा ज्याला दूत म्हणायचे त्याचवेळी कबूतरला प्रशिक्षित करुन त्याच्या पायात संदेशाची चिठ्ठी दिली जायची असा संदेश देणारी भाग्यश्री आणि संदेश घेणारा सलमान याच कबूतराच्या साक्षीनं ' मैने प्यार किया ' म्हणताना आपण पाहिले.
     रोमन साम्राज्यात महत्वाचा संदेश घेऊन धावणारा दूत मॅरेथॉन या गावापासून स्पार्टा या गावापर्यंत पोहोचला तो काळ आणि तो कालावधी आणि त्यामुळेच तितकंच अंतर मोजून आज जगभर धावण्याच्या स्पर्धा होतात व त्या स्पर्धांना नाव आहे मॅरेथॉन.
     राजे शिवाजींना वाचवण्यासाठी बाजीप्रभू देशपांडयांनी खिंड लढवून पावन केली. राजे गडावर सुखरुप पोहोचले असा संदेश धडाडणा-या तोफांनी दिला त्याचवेळी बाजीप्रभूने प्राण सोडले हा देखील संदेश वहनाचा एक प्रकार होता.
     महाकवी कालीदासानं रामटेकच्या डोंगरावर आपल्या प्रेमाचा संदेश मेघांना घेवून प्रेयसीकडे पाठवलं या रुपकावर मेघदूत सारख्या महान ग्रंथाची निर्मिती झाली हे सृजन संदेश वहनातूनच आले.
     डाक बाबू आणि डाकिया हे मोबाईल क्रांतीपूर्वी खरोखरच जीवनाचा अविभाज्य घटक बनले आणि सर्वात स्वस्त असा मार्ग होता तो १५ पैशांच्या पोस्टकार्डाचा. पत्राचा मायना मोठा असेल तरच आंतरदेशीय पत्र आणि त्यापेक्षा अधिक असेल तर पाकिट असा प्रवास असे परंतु 95 टक्के भारतीयांचा व्यवहार 15 पैशांच्या कार्डवर व्हायचा.
     आजही घरात तारकेटवर ज्या जीर्ण पत्रांच्या गठ्ठयात कुणाचा जन्म तर कुणाच्या नोकरीचे संदेश सापडतात. मृत्यूचा संदेश आणणारे पत्र तसे कमीच असत पण ते आल्या आल्या फाडले जात ते घरात ठेवणं देखील अशुभ होतं. तार पाठविणे हा मृत्यू कळवण्याचा अर्जंट मधील प्रकार पोस्टमनवर प्रेम करणारं घर मात्र तार आणणा-या त्या तारघराच्या कर्मचा-याच्या वर्दीनं धडकी भल्यासारखं करायचं.
        घर सोडून दुस-या ठिकाणी राहणा-यांना घरची चिठ्ठी हा अश्रुचा धागा छेडणारी असायची आजही पंकज उधासचं ' चिठ्ठी आयी है ' हे गाणं डोळ्यात पाणी आणतं.
     या डाकियाचा वापर चित्रपटात चांगला झाला आहे. डाकिया डाक लाया हे गाणं त्या काळात खूप लोकप्रिय गाणं होतं डाकिया प्रधान गाणं येणं हा त्या छोटया पण महत्वाच्या पदाचा सन्मानच होता.
     अलीकडच्या काळात जे.पी.दत्ता यांनी 'संदेसे आते है' च्या रुपाने सैन्य दलातील सैनिकांच्या भावना आणि वेदना पडद्यावर आणली होती.
     काळ बदलला आणि हे सर्व चित्र बदललं दिवाळीच्या भेटकार्डांची जागा आता ई-मेल आणि एस.एम.एस. ने घेतली. संदेश न देता संपर्कात रहायचं साधन म्हणून बहुतेक जण मोबाईल च्या 'मिसड् कॉल' चा वापर करतात. पण आजही मला नोकरी लागल्याचा संदेश देणारा आणि वेळोवेळी प्रेमाची पत्रे पोहचविणारा तो पोस्टमन वारंवार घरी यावा असं वाटत राहतं किमान दिवाळीची पोस्त मागायला तरी तो येत राहतो तेवढाच बदलत्या काळाचा तो 'मिसड् कॉल'
                                     -प्रशांत दैठणकर

No comments: