Thursday 29 September 2011

माझं नवरात्र १९८० सालचं

पहाटे चार वाजता थंडगार पाण्यानं आई अंघोळ घालायची अर्धवट झोपेतल्या स्थितीत बिटकोच्या काळया दंतमंजनने दात घासलेले, पाण्याचा पहिला तांब्या अंगावर पडताच खडकन सारी झोप उडून जायची आसपासच्या घरांमध्येही पहाटे पहाटे हीच लगबग हेच ते ऑक्टोंबरचे दिवस साधारण 1980-81 चा तो काळ.

औरंगाबाद शहर आज वेगात धावतय. त्यावेळी केवळ रेंगायला लागलं होतं दोन वेळा पाणी येणार गावात गर्दी नाही रस्ते मोकळे असं ते छोटेखानी शहर. सकाळची ही लगबग असायची कर्णपूरा येथील मंदिरात जाण्यासाठी.

संस्थान गणपती हे जसं ग्रामदैवत तसंच स्थान नवरात्रात कर्णपूरा येथील भवानी मातेच्या मंदिराला गल्लीतल्या सर्वच घरातून बायका-मुलांचे जथ्ये कर्णपु-याकडे जायचे त्यावेळी रहायचं ठिकाण होतं दलालवाडी येथून टिळकपथ ओलांडून एस.बी.कॉलनीतून समर्थनगर माधून या देवीभक्तांच्या टोळया मार्गस्थ व्हायच्या. समर्थनगर ओलांडताना एक अनामिक भिती बालमनात असे प्रचंड वाढलेला बाभळी आणि संपूर्ण कब्रस्थान असणारं हे समर्थनगर इतकं बदलेल असं त्यावेळी वाटलं नव्हतं.

समर्थनगरातून बाबा पेट्रोलपंपाच्या चौकातून वळलं की कर्णपु-याचा मार्ग सुरु साधारण एखाद किलोमीटर आत गेल्यावर ते कर्णपुरा देवीचं मंदिर. भक्तीभावाने माथा टेकून त्यालगत असलेला बालाजी मंदिराचं दर्शन आणि बाहेर पडताना कपाळावर चंदनाचा टिका सुंदर डिझाईन असणारे टिळे लावणारी मुलं तिथं उभी असायची आणि पाच पैशांमध्ये टिका लावायचे.

हा टिका वाळेपर्यंत वाटबघणे आणि तो तसाच मिरवत सकाळी शाळेत जाणे हा आवडता उपक्रम. पहाटे उठून कर्णपु-यात जाऊन आल्याची ती खूण असायची ना.

सुट्टीच्या दिवशी हा कार्यक्रम जरा मोठा व्हायचा कर्णपु-याच्या देवीचं दर्शन घेतल्यनंतर जिल्हा न्यायालयाच्या मागे मनीषा कॉलनीत असणा-या रेणुकामातेचं देर्शन घ्यायचं कार्टाच्या मागे असणारं हे मंदिर त्यामुळे लोक याला कार्टाची देवीच संबोधायला लागले ते आजवर कायम आहे.

दोन्ही मंदिरात देर्शन झाल्यावर तिथं वडाच्या झाडाखाली जेवण्याचा उपक्रम आटोपयचा यात्रा भरत आल्यावर तेथून टीप-टीप असा आवाज करणारं अंगठयानं दाबायचं खेळणं घ्यायचं आरंभी बरं वाटल तरी नंतर त्यामुळे अंगठा दुखायला लागायचा खरेदी करुन दिलेलं हे खेळणं तसं चांगलच इरिटेट करणारं असल्यानं आई साठी ती एक विकतची डोकेदुखीच ठरायची.

काही उत्साही तरुण त्याकाळी एक वेगळा प्रकार करित असत सायकलच्या कॅरिअरला लोखंडी डबा बांधायचा. ओली नारळाची दोर त्या डब्यापासून चाकाच्या एक्सलला लावला की फिरणा-या चाकाबरोबर एक वेगळा नाद येत असे तो. आवाज आणि ती कर्णपु-यापर्यंत नवरात्राच्या नऊ दिवसांची प्रभातफेरी आजही अगदी ताजी आहे मनात.
                                                             -प्रशांत दैठणकर

No comments: