Thursday 22 September 2011

Life begins @ 40


                       काही क्षण आयुष्याचे कधीच स्मृतीतून जात नाहीत. स्मृती हा प्रकार वेदनांशी अधिक जवळचा असतो हे देखील सत्य आहे. काळाच्या ओघात खूपकाही घडत असतं मात्र आपल्याला सुखाचे क्षण कमीच आठवतात. आठवण रहाते ती दुख-या क्षणांची.
     या प्रवासानं खूप काही दिलय. सर्वात महत्वाची ती अनुभवाची शिदोरी. अपेक्षा भंग होतो याचं मुळ कारण असतं अपेक्षा. या अपेक्षा जितक्या कमी तितकं अपेक्षा भंगाचं दु:ख कमी हा इथला न्याय. अपेक्षा दोन प्रकारच्या आपण इतरांकडून ठेवलेल्या अपेक्षा आणि इतरांना आपणाकडून असणा-या अपेक्षा.
     अपेक्षा ठेवताना त्या वास्तवाला धरुन असाव्यात जेणेकरुन निराशा होत नाही हे आपण इतरांबाबत सहज करु शकतो. मात्र इतरांनी आपणाकडून काय अपेक्षा ठेवावी याबाबत आपली भूमिका काहीच नसते. इतरांनी आपणाबाबत बाळगलेल्या अपेक्षा वास्तव की अवास्तव हे त्यांच्या मनातील आपल्या स्थानावर अवलंबून असते आणि यात आपल्याला त्रास असत नाही. अर्थात आपल्याकडून त्यांचा अपेक्षाभंग होणं ही त्यांच्यासाठी त्रासाची, चिंतेची बाब असते. एक मात्र खरं की आपण सर्वांच्या सर्व अपेक्षा कधीच पूर्ण करु शकत नाही.
     आपल्या अपेक्षांचं काय ?  याला उत्‍तर तेच जे आधी आलं आपल्या सा-या अपेक्षा देखील कधीच पूर्ण होत नसतात.
     अपेक्षा आणि अपेक्षाभंगाचा हा भावनिक खेळ वाढत्या आणि घटत्या मानसिक अंतरावर अवलंबून असतो.एखादी व्यक्ती खूप जवळ आली की खूप अपेक्षा वाटायला आणि वाढायला लागतात.
     जिव्हाळा, प्रेम आणि मैत्र यांचे बंध कधी इतके जवळ येतात की त्यात मुळ नातं आणि समोरची व्यक्ती यातलं अंतर प्रेमाची धुसर रेषा ओलांडतं आणि तिथं प्रभुत्ववाद शिरतो. प्रत्येकाचं व्यक्ती म्हणून असणारं व्यक्तीगत स्थान या प्रभुत्ववादानं संपल्यानं इथं पदोपदी अपेक्षा अन् अपेक्षाभंग असा उन-पावसाचा खेळ सुरु होतो अन् इथूनच `तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना `  असा नवा प्रवास नात्यांमध्ये दिसतो.
  भावनिक ओलावा, वात्सल्य आणि खंबीरपणाचं एक छत्र म्हणून उभं राहणा-यांना  भावनिक आंदोलनात उभं राहता येतं. यात हळवेपणा आला तरी मनाचा खंबीरपणा झालेल्या घटनांना समजून घेऊन अपेक्षाभंग पचवायचा आणि समोरच्याच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा मनाच्या तळापासून प्रयत्न करायचा असा प्रवास सुरु होतो. इथं त्याच नात्याचा नव्याने जन्म होत असतो.

                ग्रीष्मात पोळलेल्या झाडाचं
                पालवी फुटणं हे वेगळं .... !
                                    आशा-अपेक्षांचं बीज गळालं..
                मातीला मिळालं म्हणताना
                भावनेच्या धुंद वर्षावात
                ते प्रेम पुन्हा अंकुरणं वेगळं
                असतं प्रत्येक मनात हे
               कोंडलेलं असं एक स्वप्न
              वासनेतून वात्सल्याकडे जाताना
                 त्या भावनेचा तो ओलावा
              ते स्वप्नं त्या ओलाव्यानं अंकुरतं
            म्हणून कदाचित पुन्हा जीवन बहरतं !

            आणि यामुळेच कदाचित सारे जण म्हणत असतात मित्रांनो
                                                                  Life begins at forty.


                                                       प्रशांत दैठणकर
                                   

No comments: