Friday 14 October 2011

मनाचिये गुंती... !


      रिकामं मन सैतानाचं घर असं म्हणतात. मन हा आपल्या आयुष्यावर अधिराज्य करणारा एक अनभिषिक्त सम्राट असतो त्यामुळे आपलं आयुष्य त्याच्याच आसपास फिरत राहतं... सूचण्याचं कारण अर्थात छोटीसी बात  या हिंदी चित्रपटातील गाण्याची एक ओळ..

अचानक ये मन
किसी के जाने के बाद
करे फिर उस की याद
छोटी छोटी सी बात...

      खरच मनाची गती विश्वात सर्वाधिक अशी आहे. ध्यानधारणा करताना मनावर नियंत्रण मिळवायचं कसं याचं प्रशिक्षण दिलं जातं... मन हे चंचल आहे एक मिनिटात ते विश्वभ्रमण करुन येतं असं   म्हणतात की एका मिनिटाच्या या कालावधीत मानवी मनात 21 प्रकारचे विचार असतात.
      मन हे दुहेरी अस्तर असणारं वस्त्र आहे असं मला वाटतं आपण भौतिक रुपाने एका ठिकाणी आलो मन मात्र दुसरीकडे राहिलं या स्थितीत आपण अनेकदा स्वत:ला बघतो... शाळेत मुलांचे असं हात असल्यानं त्यांच्या डोक्यात अभ्यास शिरतच नाही अर्थात शाळेत असताना हे अनेक वर्षे अनुभवलेलं आहे.
      समाज हे मनाला घातलेलं बंधनच आहे या बंधनामुळे मन-मानेल तसं कुणालाच जगता येत नाही तरी काही जण मात्र तसं करतात.
      मन निर्मळ असतं .. पहाटेच्या वातावरणात जे पावित्र्य असतं त्या पावित्र्यासम निर्मळ मन हे फक्त मुलांचं असतं त्यांना खरं-खोट याची ओळख नसते आणि जगात कुणाची भिती देखली... अंधारात जायला मुलं घाबरत नाहीत आणि तेवत्या दिव्याची ज्योत धरायला देखील अनुभवानं चटका बसल्यावर ते सावध रहायला शिकतात तर अंधाराची 'भोकडीआपणच त्याच्या मनात वाढवलेली असते.
      शत्रू न चिंती ते मन चिंती असं म्हणतात. मन सकारात्मक कमी आणि नकारात्मक अधिक अश रुपानं चिंतन करतं त्यामुळेच कट्टर शत्रूच्या मनातही वाईट बाबी येणार नाहीत इतक्या वाईट बाबी आपणच आपल्या मनात आणत असतो म्हणूनच या मनावर नियंत्रण आणायला शिकलं पाहिजे.
      बहिणाबाई म्हणतात.
          मन वढाय वढाय
            जसं पिकातलं ढोर

      शरीराला सुखासिनतेची आवड लावणारं मनच असतं आणि एकदा ही आवड लागली की मन वारंवार त्याच गोष्टी करायला शरीराला भाग पाडत असतं.
          नाही निर्मळ मन
            काय करील साबण

      असं वचन आहे शारिरीक शुध्दी करण्यासाठी आपण साबणाने अंग धुवून टाकू शकतो मात्र आत असलेलं मन त्यानं धुतलं जात नाही त्यावर सुखासिनतेची पूटं चढतच जातात वाढत्या वयासोबत ते अधिक आग्रही आणि अधिक आडमुठ व्हायला लागतं.
      समर्थया मनाला नियंत्रित करण्यासाठी सांगतात
            'मना सज्जना भक्ती पंथेची जावे'
      मनाला चांगल्या विचाराची जोड देता आली पाहिजे भक्ती मार्ग हा त्यासाठी उत्तम उपाय हसू शकतो भक्तीत ती शक्ती निश्चितपणे आहे.
      माझे एक निवृत्त सहकारी युनुस आलम सिद्दीकी नेहमी सांगतात सुगंध हे मनाचं खाद्य आहे. ते आले की अत्तराचा फाया द्यायचे आणि म्हणायचे इसे रखा करो दोस्त अगदी बरोबर आहे. शरीराला खाद्य लागतं तसं मनालाही लागतंच ना. म्हणूनच सायंकाळी हातपाय धूवून देवापुढे उदबत्ती लावायची आणि परवचा म्हणायची.. त्या गंधित सायंसमयी पवित्रतेचा संचार होवून मन आपोआप प्रफुल्लीत होत जातं.
      आपल्याच मनाचा थांग लागत नाही अशा स्थितीत आपल्या विश्वातून बाहेर निघून    दुस-याच्या मनातलं जाणायचं म्हणजे मनकवडेपणाचं काम, असा मनकवडेपणा फार कमी जणांना जमतो.. पती पत्नीच्या नात्यात आणि मैत्रीत सहवासाने असं मन ओळखलं जातं.. अगदी माझ्या मनातलं बोललास बघ असं उत्तर त्याला मिळत असतं इतरत्र मात्र असं फक्त मनकवडयांनाच जमतं असं म्हणावं लागेल.
      आपल्या शब्दांनी समोरच्याच्या मनाला साद घालण्याची ताकद लेखक आणि कवीत असते नृत्य असो नाटय असो की चित्रकला प्रत्येक कलेत अशी साद घालण्याची ताकद आहे म्हणूनच त्याला तसा प्रतिसाद देखील मिळतो.
      या मनाची शांती संपत चाललीय नुसतं धाव-धाव धावायचं शरीर थकून जातं तसं मनही कोमेजून जात असतं. अशा स्थितीत ती शांती परत मिळवायची तर कलेचा अणि साहित्याचा आधार घेता येतो. गाण्याची एखादी अशीच लकेर मेंदूच्या हार्ड डिस्कवर आर्काइव्ह झालेली एखादी फाईल अचानक उघडून समोर आणतं त्यावेळी मनाचा स्क्रीन रंगीन रंगीन होवून जातो.
      मनाचा हा प्रवास तसा सोपा वाटला तरी तो खूप मोठा गुंता आहे.
          रंगूनी रंगात सा-या
            रंग माझा वेगळा
            गुंतून गुंत्यात अधिक
            पाय माझा मोकळा

      असं मोकळं मन ठेवणं हीच सुखाच्या एव्हरेस्टची पहिली पायरी आहे
                
                       -प्रशांत दैठणकर