Sunday 28 August 2011

त्यांचं .. तू-तू..मै..मै.. !


महिला आज सर्व क्षेत्रात आपल्या गुणवत्तेवर पुढे जाताना दिसत आहे आणि खास भारतीय मनोवृत्तीने त्यांना खूप पुढे जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्नही आपणास दिसतो. यात अनेक घटक जबाबदार आहेत. मात्र कौटुंबिक पातळीवर जे कलह दिसतात त्यामध्ये स्त्री स्वत: स्त्रीच्यामार्गाने अडथळे आणण्याचा प्रयत्न करते असं चित्रण अनेक टि.व्ही. मालिका दाखवत असतात, अर्थात या दाखविण्यात अतिरेकीपणा असला तरी बहुतांशी हे सत्यदेखील आहे.
            घरातली पोर लहानाची मोठी करुन दुस-या  घरी द्यायची हे जसं प्रत्येक पालकाचं कर्तव्य मानलं जातं तसं सून म्हणून येणारी मुलगी तशीच आहे. असं मानलं जात नाही. परिणाम सासू-सून यांची अखंड चालणारी तू-तू मै-मै याला काही पर्याय आहे काय ? होय याला पर्याय आहे. मात्र त्यादृष्टीने प्रत्येक स्त्रीला आपली मानसिकता बदलावी लागेल. सूनेला मुलगी मानून जगणाऱ्या स्त्रिया आहेत. तुलनेत त्यांचं प्रमाण नगण्यच ठरतं म्हणूनच आदर्श सासू-सून हा पुरस्कार आणि बातमीचा विषय असतो.
            विवाहानंतरचं स्त्रीचं जीवन इतका कष्टप्रद असतं का ? याला दोन्ही बाजूंनी पटवून देता येत असलं तरी अंतिम सत्य हेच आहे की मनोभूमिका बदलल्या नसल्याने स्त्रिया याला अधिक कष्टप्रद करतात. सासू नेहमी खाष्ट असते अशी भूमिका अगदी भातुकलीच्या खेळातून संस्कारक्षम वयात मुलींच्या मनावर ठसविण्याचा प्रकार होतो आणि ही प्रतिमा पुसली जात नसते.
मानसशास्त्रीय दृष्टीकोणातून विचार करताना असं सांगता येतं की जन्माला आलेलं बालक पूर्णपणे निर्भय असतं. आपण भिती त्याच्या मनात जन्माला घालत असतो. त्या बालकाच्या संगोपनात आपण त्याच्या मेंदूच्या गतीला आपली गती जुळवू शकत नसल्यानं   झोपला नाहीस तर `भोकाडी` येईल असं सांगून किमान अल्पकाळासाठी स्वत:ची सुटका करुन घेतो. ही भिती त्याच्या मेंदूत एक प्रतिमा निर्माण करुन ठेवते आणि ती प्रदीर्घ काळ त्याच्यावर राज्य करते.         
            आपल मनं अर्थात आपल्या मेंदूच्या कप्प्यात असणा-या अनुभव, जाणीवा, भावना आणि उणिवा यांचा उलगडत जाणारा तरीही अनाकलनीय असा कप्पा असतो. यामध्ये बालवयात म्हणजे बालक जन्माला आल्यापासून माहिती जमा होत राहते. संगणकात होणाऱ्या डाटा एन्ट्री सारखा हा प्रकार असतो. ही माहिती देतानाच चुकीची दिली गेली तर काय होईल ! त्यावर आधारीत सर्वच माहिती चुकीची ठरत जाईल अशा स्थितीत मोठेपणी आपल्याला देण्यात आलेली माहिती चुकीची होती असं पटलं असलं तरी प्रारंभी फीड केलेल्या माहितीची प्रतिमा पुसली जात नाही आणि तिथं मनाची अवस्था दोलायमान होते. खरं काय  याचं संभ्रम निर्माण होाते. यातून कळतयं पण वळत नाही अशी स्थिती येत असते. याला जबाबदार अर्थात आरंभीची चुकीची माहिती असते. त्यामुळे संस्कारक्षम वयात बालकाची जिज्ञासा पूर्ण करण्याचा प्रयत्न अत्यावश्यक असतो.
            आपल्याकडील प्रचलित लोककथा आणि लोकगीतांमध्येही सासरचं वर्णन तसं आक्षेपार्ह आहे. सासू आणि सून यांच्यात असणारं वयाचं आणि त्यामुळे असलेला जनरेशन गॅप हा मुलगा आणि त्याच्या वडिलांमधील जनरेशन गॅप इतकाच असायला हवा. मात्र विविध माध्यमांमधून स्त्रियांची असणारी सासूची भूमिका आणि प्रतिमा समाजानं बिघडून आखलेली असल्यानं ती प्रतिमा सर्व समस्या निर्माण करते.
            माता आणि मुलगी यांचा भावनिक ओलावा ही नैसर्गिक बाब आहे. आपल्या उदरातून आलेला हा हाडा-मासाचा जीव म्हणून माता मुलीचं पोषण करते. हा ओलावा सासू-सून यांच्या नात्यात कधीच येणं शक्य नाही आणि ते अपेक्षितही नाही. कालपर्यंत अपरिचित असणारी व्यक्ती आपल्या घरात आल्यावर त्या व्यक्तीसोबत भावनाची बांधिलकी निर्माण व्हायला एक विशिष्ट कालावधी जावाच लागतो.सासू-सूनच काय पण पती-पत्नीच्या नात्यातही लग्न झालय म्हणून एका रात्रीतून भावनिक बंध तयार होत नसतात. ते एकमेकांच्या विश्वास आणि परस्परातील आदराने तयार करावे लागतात.
            येणारी सून ही नव्या पिढीची प्रतिनिधीत्व करीत असते. तर सासू अनुभवानं संपन्न असतं. माझ्या सासूनं मला त्रास दिला म्हणून मी सूनेला त्रास देणारे ही रॅगिंगची दूष्टचक्रांची भूमिका कोणतीही सासू बाळगत नसते. हे देखील महत्वाचे आहे. त्याच बरोबर सासू म्हणजे कजाग आणि खाष्ट असणार ही भूमिकाही सूनेनेही ठेवू नये. सहवासात येणारे सुख-दु:खाचे प्रसंग पुढील काळात त्या दोघीतील बंध निर्माण करतात आणि याला वेळ लागणार हे सर्वांनी समजून घ्यायला हवं. जुनी पिढी आणि नवी पिढी यातील विचाराचा संघर्ष चालतच राहणार आहे. त्यात सूवर्णमध्ये साधून पूर्वग्रहदुषितपणा सोडण्याची मानसिकता स्त्रियांनी ठेवली तर प्रत्येक सासू आदर्श सासू आणि प्रत्येक सून आदर्श  सून होवू शकते.                                
- प्रशांत दैठणकर

No comments: