Thursday 12 July 2018

आत्मभान..... लक्षवेधी....!



' लक्ष्य ' चित्रपटातलं गाणं मला अधून मधून आठवतं आणि विचारात गुंतवून टाकतं.......

मै ऐसा क्यूं हूं ?.... मै ऐसा ही हूं . .!

अंतर्मनात प्रश्न जागा होतो आणि विचारांना गती मिळते . . . कोहम् अर्थात मी नेमका कोण आहे , पासून मी असा का आहे ! . . . अशी प्रश्नांची डबागाडी रेल्वे रुळावरुन बुलेट ट्रेन च्या गतीने धावायला लागते. .. असं प्रत्येकाच्या मनात होत असतं . . . थोडक्यात आपण स्वत:चाच शोध घ्यायला लागतो.

प्रत्येकाला ' स्व ' अधिक आवडतो . . एखादी मुलगी समोरुन येत आहे म्हटल्यावर डोक्यावर हात फिरवून केस बरोबर आहेत ना याची खात्री आपण करतो. . . मुलींच काही वेगळं नाही बरं कुणीतरी आपल्याकडे बघितलच नाही असं घडण्याच्या स्थितीत अनेकजणी विचलीत होतात.

. . आपण बोलत जरी नसलो तरी आपल्या देहबोलीतून संवाद घडत असतो.

डोळे हे जुल्मी गडे

रोखून पाहू नका मजकडे


अर्थात नजर का मिलाना. . हिंदीत याला छान शब्द आहे . .नैन मटक्का . . आता याच नजरेने होणाऱ्या संवादातून . . . मैत्री , प्रेम , खुन्नस , कमी लेखणे आदी बाबी अगदी न बोलता घडतात.

सैराट सिेनमातला फेमस झालेला संवाद याच नजर रोखण्यावर बेतला आहे.

मी बघू की कायबी करु . . . !

आता बोलायचं तर नजरेची भाषा सर्वात चांगली भाषा . . यातून आपल्याला नकळत साद देता येते. अर्थात प्रतिसादही मिळत असतो असाच . . !

कुणी आपल्याकडे लक्ष देत नाही असं जाणवंल तर मनात विचारांचे आंदोलन सुरु होते . . . . एक प्रकारे इथं प्रत्येक जण स्वत:चं मार्केटींग करीत असतो . . .

कोणत्याही क्षेत्रात एखादी व्यक्ती प्रसिध्दी मिळवते त्यामागे खूप कारणं असतात . . . त्यात सर्वात महत्वाचं म्हणजे आपण त्याला संमती देतो . . . वानगीदाखल चित्रपटांचं उदाहरण अगदी जवळचं उदाहरण आहे. प्रत्येक जण मनोरंजनासोबतच त्यातील नायक - नायिकांमध्ये आपलं प्रतिबिबं शोधत असतात . . . ज्याला जितकं जवळ पोहचता येतं रसिकांच्या तो खरा नायक होतो, तो सूपरस्टार होतो.

माझ्यातल्या ' मी ' चं प्रतिबिब जिथं दिसतं त्याला मी आयुष्यभर जवळ करण्याच्या , मनात जपण्याचा प्रयत्न करतो.


आपल्याला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आपण स्वत:चा शोध घेणं अधिक महत्वाचं असतं . . . मी नेमका कसा आहे . . . मी असा का आहे या प्रश्नापासून याची सुरुवात होते . . . त्या गाण्यात त्याचं स्विकारणं देखील मांडलय . . . मी हा असा आहे हे मी कबूल करणं आणि त्या ' स्व ' शी प्रामाणिक राहणं यशाच्या मार्गावरील पहिली पायरी समजतो . . . ' मी '

लहान मूल बोलू शकत नाही त्यावेळी त्याला रडता येते . . . लक्ष वेधले जावे यासाठी लहान मूल रडत असते. मी माझा मित्र अश्वीन याच्या घरी माझी कन्या जान्हवीसह गेलो होतो ज्यावेळी ती तीन वर्षांची होती.आम्ही उभयता गप्पा मारत असताना गप्पांमध्ये गुंग झालो होतो . . त्यावेळी ती रडायला लागली . . आमचं लक्ष गेलच नाही गप्पांच्या नादात . . . मग तीच मध्ये येवून जोरात म्हणाली.

माझ्याकडे लक्ष द्या ना . . . मी रडतेय ना . . . !

तिच्या या वाक्यानं सर्व जण हसले नसते तरच नवल . . . तिची ही ' लक्षवेधी ' सर्वांच्याच स्मरणात आयुष्यभर राहील.

इथं प्रत्येक व्यक्ती आपल्या देहबोली तून स्वत:चं जणू मार्केटींग करीत असते . . . आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला काय हवं असतं याबाबत अनेक जण वेगवेगळी उत्तरं देतील . . . संपत्ती , सुख , समाधान . . . माझं मत आहे. प्रत्येकाला प्रसिध्दी हवी असते . . .
कोट्टयवधींची कमाई आहे. पण समाजात आपणास कुणीच ओळखत नाही अशा व्यक्ती विविध प्रकारे स्वत:ला प्रसिध्दी मिळेल याची खबरदारी घेतात.

पोरानं नाव काढलं . तुमच्या . . . असं वाक्य कोणाच्याही माय-बापाला सुखावणांर असवं . . ती एक प्रकारे पावती असते त्यांच्या मेहनतीची . . त्यांच्या संगोपनाची ही पावती त्यांनी आयुष्यभर झेललेल्या कष्टांचा विसर पाडणारी असते . . नवी उभारी देणारी असते . .

- To get Recognized ! हे मिशन प्रत्येकामधील ' स्व ' समोर असतं . . स्वत:शी सतत संवाद साधण्याची प्रक्रिया यासाठीच महत्वाची आहे.

अजय देवगण च्या ' प्यार तो होना ही था ' या चित्रपटात त्याच्या तोंडी एक वाक्य सातत्याने दिलय . .. ' ऐसा ही हूं मै '

मी आत्मसंवादातून माझा शोध घेतो त्यावेळी मला माझी हळू हळू ओळख होते . .
मी कुठे कमी पडतो हे देखील कळायला लागतं तसेच जमेच्या बाजू देखील कळतात . . . याचा पूर्ण उलगडा होणं म्हणजे आत्मभान होय.माझ्या जमेच्या बाजू आणि मर्यादा याचा ताळेबंद मांडून मी आयुष्याची वाटचाल केली तर मला यश लवकर मिळू शकते इतकं सोपं हे गणित आहे.

खूप अभ्यास करणारेच यशस्वी होतात असं काही नाही.... यश मिळवणं हे आपल्या 'स्व' वर अवलंबून आहे. माझ्या यशाचा विचार करताना माझी तुलना मी इतरांशी का करावी.... बहुतेक जण हीच चूक करतात....

माझी तुलना फक्त माझ्याशी आणि माझी स्पर्धा माझ्याशीच आहे. कारण माझ्या सारखं दुसरं कुणी या जगात नाही..... जगातली प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे. प्रत्येक व्यक्ती अव्दितीय आहे....प्रत्येकाच्या ठायी हा 'स्व' जागा झाला पाहिजे....म्हणजे माझ्या या जगात येण्याचा अर्थ मला कळेल व त्यानंतर जगण्यातली मजा वाढेल. जगात येण्याचा अर्थ मला कळेल व त्यानंतर जगण्यातली मजा वाढेल.

एक सुरेख व्यंगचित्र बघण्यात आलं,... एक माणूस देवाकडे प्रार्थना करतोय.

God Please Give me Everything to Enjoy My Life.

देवाचं उत्तर खूप मार्मिक आहे.

Idiot I have given you life to Enjoy Everything.

....... आयुष्याचं असंच असते.....

तुझे आहे तूजपाशी .....! हेच आपल्याला उमगलं तर आनंद शोधावा लागत नाही.

संपन्नता ही केवळ पैशांमध्ये असत नाही ती व्यक्ती परत्वे वेगवेगळी असते. छंद, जगण्याची मुल्ये, दृष्टीकोण, शिस्त तसेच अनुभव याबाबतीत संपन्नता असू शकते.
आपण आयुष्याचा या Angle ने कधी विचारच केलेला नाही.

आपली शिक्षण पध्दती केवळ विशिष्ट अशी बुध्दीमत्ता तपासते. हा शिक्षण पध्दतीचा सर्वात मोठा दोष आहे. यात गुणवंत असल्यानं जगणं सोपं होतं असा भ्रम आपण निर्माण करतोय असं माझं मत आहे. व्यक्तीपरत्वे त्याची बुध्दीमत्ता वेगळी असते.

आपल्याला गौतम बुध्दासारखी ज्ञानप्राप्ती होण्याची अपेक्षा नाही. ती उंची आपणास गाठता येणे अशक्य आहे. परंतु आपण 'स्व' जाणला आणि मानला तर यशाचा मार्ग सुकर व्हायला वेळ लागत नाही... किमान माणूस म्हणून चांगलं जगायला आपण शिकतो.

मै ऐसा ही हूं असं म्हणत आपण त्याला जोडून म्हटलं पाहिजे I am Unique…… अगदी आपण ज्या पध्दतीने सांगतो....... हम नही सुधरेंगे.....!
---प्रशांत दैठणकर

9823199466





No comments: