Sunday 3 July 2011

कुटुंब व्यवस्थाच संकटात... !

व्यसनांमुळे आपल्या आयुष्यात खूप मोठं नुकसान होत आहे. याची जाणीव नसल्याने बहुतांश जण व्यसन करीत राहतात त्यात त्या व्यक्तीचं कुटुंबातील स्थान कुटुंबप्रमुखाचं असेल तर सारं कुटुंब विस्कळीत होवून जातं. तणाव हे व्यसनाधिनतेचं कारण आहे असं सांगितलं जातं मात्र त्याच्या व्यसनाने सारं कुटुंब तणावाखाली येतं याची त्याला जाणीव नसते.
     स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांमध्ये तंबाखूचं व्यसन लागण्याचं प्रमाण खूप अधिक आहे. गुटखा, खर्रा या स्वरुपात तंबाखू खाण्यास मुले सुरुवात करतात. प्रारंभी हे धाडसातून केलं असलं तरी नंतर याची सवय कधी लागते याची जाणिव त्यांना राहत नाही.
     तंबाखूमुळे कर्करोग होवू शकतो अशी सूचना छापणं शासनानं गुटखा उत्पादक आणि सिगारेट उत्पादक कंपन्यांवर सक्तीचं केल आहे. या सूचना बघूनही सर्रास डोळेझाक केली जाते, इतकच नव्हे तर टंचाई झाल्याच्या काळात एक गुटखा पुडी 25 रुपयांना घेतली असं सांगणारे आहेत.
     व्यसन जडल्यावर ते लवकर सुटत नाही. पहिले माणुस दारुला पितो आणि नंतर दारु माणसाला... असं म्हटलं जातं ते काही खोटं नाही. दारुच्या अंमलाखाली तणावापासून काही काळ सुटका होत असली तरी तणावाचं मुळ कारण संपत नसतं आर्थिक संकटाच्या स्थितीत मेहनत

आणि समस्येचा मुकाबला हे दोनच पर्याय असतात. त्यावेळी दारुचा हा एकच प्याला कामाला येत नाही हे आपण गांभीर्याने समजून घ्यावं लागेल.
     दारु मानवी मेंदूत संवेदना बोथट करते त्यामुळे हा एकच प्याला घरादाराला उध्वस्त करीत असतो. दारुच्या नशेत बायका-मुलांना मारहाण होते. त्यामुळे सारं कुटुंब तणावाखाली येतं अशा घरात नवरा म्हणजे संकट असतं. मुलांना दारुडा बाप म्हणजे असून नसल्यासारखा असतो. ज्या वयात मुलांना आई-बाप आदर्श असतात त्या वयात हा बेवडा आदर्श मुलांच्या व्यक्तिमत्वावर विपरीत परिणाम होतो. त्यांचं व्यक्तीमत्व सक्षमपणे उभं राहत नाही.
     घरात एकच प्याला शिरल्यानंतर कुटुंबात आवश्यक असणारे सहाजिक सौहार्दाचे वातावरण राहत नाही. कुटुंबात राहणं आगळा आनंद असतो मात्र हा आनंद कुटुंबातील एकाही व्यक्तीला मिळत नाही. मुलांना हवा असणारा जिव्हाळा आणि प्रेमाचा ओलावा कुटुंबातून मिळत नाही. यातून कुटुंब म्हणून असणारी मुलांची भावनिक नाळ तुटते व हा आनंद इतर मार्गातून प्राप्त करण्याचा प्रयत्न मुलं करतात आणि मुलं त्या कुटुंबापासून दूर जायला लागतात.
     आपला भारत देश कुटुंब व्यवस्था जपणारा आणि जगणारा देश अशी ओळख आहे. सध्या चित्र बदलत असल्याचे दिसत आहे. दारुचे व्यसन असल्याने वैतागून आणि मारहाणीला, छळाला कंटाळून स्त्री घर सोडण्याचे प्रमाण वाढत आहे. यातून मुलांची कुचंबणा होते आई-वडील हे नातं या एकाच प्यालाने दुरावल्याने मुलांचा विकास व्यवस्थित होत नाही.
     या व्यसनाधितेतून विवाहबाह्य संबंध निर्माण होणे, त्यातून गुन्हेगारी असाही प्रकार घडतो. दारुच्या नशेत भांडणे, मारामारी करणे यातून अनेकदा खूनासारखे गंभीर गुन्हे देखील घडतात. कुटुंब वाचवायचं असेल तर या विषयाबाबत गांभीर्याने विचार करुन व्यसनांचा नाद सोडणं आणि कुटुंब जवळ आणणं गरजेचं आहे त्यासाठी हा`एकच प्याला` सोडावाच लागेल.                                             -प्रशांत दैठणकर

No comments: