Monday 4 July 2011

… साहेब रागावतील ना...!



            चिमुकल्यांचे चिमुकले बोल ऐकायला खूप चांगले वाटतात तसेच ते काही शिकविणारेही असतात असा प्रकार आपण ऐकतो पण त्याची नोंद घेत नाही असं अनेकदा होतं. आता असाच काहीसा प्रकार रविवारी म्हणजे काल घरी घडला.
     मास्टर वेदांतला त्याच्या मित्रांकडे जायचं होतं आता जायचं म्हणजे त्याला कुणीतरी नेवून सोडावं लागतं त्यानं त्यासाठी आजोबांना गळ घातली. आजोबा तयार झाले मात्र सकाळी झोपेतून उठल्यावर महाशय टिव्हीत कार्टून बघण्यात गुंगले आणि आजोबा त्यांच्या सवयीप्रमाणे सकाळी आवरुन रविवारी मित्र कंपनीला भेटण्यासाठी निघाले.
     आजोबांना तयार झालेलं बघून त्यानं सहाजिकच विचारंलं ` आजोबा तुम्ही कुठे जात आहात ?  त्यानं असं विचारलं त्यावेळी लगेच त्याच्या आईनं म्हणजे माझ्या सौ.नं. त्याला टोकलं `  ओ वेदांत असं बाहेर   जाणा-याला कुठे जाताय असं विचारु नये, त्यामुळे काम होत नाहीत.
     वेदांतनं ऐकूण तर घेतलं पण लाडीक आवाजात गा-हाणं मांडले. अगं आई आजोबा मला माझ्या फ्रेंडकडे सोडणार होते ना. त्याची आई सोबतची ही कुरकूर आजोबांच्या कानी पडली नाही मात्र तो काही गा-हाणं मांडतोय हे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी वेदांतला विचारलं कायरे कुठे जायचय तुला ?  त्यांचं ते वाक्य पूर्ण होतं न होतं तोच वेदांत त्यांच्याकडे वळून अगदी निरागसपणे म्हणाला ` आजोबा असं विचाराचं नसतं. अशानं कामं होत नाहीत ! घ्या ! याला म्हणतात गुरुची विद्या गुरुला. त्याचं ते वागणं अगदी निरागस होतं त्यानं हास्याची कारंजी फुटली नसती तर नवल.
     असा हा निरागसपणा आपल्याला का ठेवता येत नाही. या वयात असा सवाल पडतो. आता यावरुन मोठी कन्या जान्हवी अर्थात जानूचा एक किस्सा आठवला.
     मी माझ्या कार्यालयात प्रमुख आहे म्हणजे लोकांच्या दृष्टीने साहेब. जानू साधारण बोलायला लागलेली. तिचं बोलणं फोनवर ऐकायला छान वाटत असे त्यामुळे ऑफिसमधून मी दिवसातून एक-दोन वेळा फोन लावून बोलत असे.ती लहान आणि तिचं विश्वदेखील. मग गप्पा काय होणार जेवणं झाली का आणि काय खाणं झाले फार तर टिव्हीवर काय बघतेस इतकच. आणि तिला याचा कंटाळा येत असे.
     मी फोन लावला जानू बेटा काय करतेस ?   माझे प्रश्न सुरु साधारण मिनिटभर बोलणं झाल्यावर तिला कंटाळा आलेला. बोल ना बेटा असा माझा आग्रह सुरु. ती तिकडे वैतागली असावी. ती पटकन म्हणाली `बाबा किती बोलताय तुम्ही फोन ठेवा आता. तुमचा साहेब रागवेल ना  ! साहाजिकच मला हसू आलं होतं. पण फोन करताना आपण उगाच फोन का करावा असा प्रश्न समोर आला.
     फोनवर विनाकरण बोलणारी माणसं पाहिली की मला तिचं ते बोलणं आजही आवठवंत. फोन संपर्काचं साधन आहे. गप्पा मारायचं नाही हे तिच्या त्या चिमुकल्या बोलांनी कायमचं मनावर कोरले गेलय.

No comments: