Wednesday 6 July 2011

लेखन दिवस अर्थात 8 जुलै... !


      आपल्या मराठी भाषेचं वैशिष्टय म्हणजे आपल्या भाषेतल्या म्हणी होत. एका वाक्यात मोठं सांगण्याचं काम या म्हणीमधून होते ग्रामीण भागात लांबलचक संवाद न करता म्हणींच्या माध्यमातून संवाद म्हणजे आगळा आनंद असतो. हे सर्व सांगण्याचं कारण म्हणजे 8 जुलै अर्थात लेखन दिवस.
      दिसामाजी काही लिहित जावे, प्रसंगी अखंडीत वाचित जावे असं संतवचन आहे. लिहिणाराच नसेल तर वाचणारा काय वाचणार ? आपल्या कडे लिखाणाची मोठी परंपरा आहे. ज्यावेळी कागदाचा शोध लागला त्यावेळी या लिखाणाच्या कार्याने वेग घेतला असला तरी त्यापूर्वी लिखाण होतच होते.
      लिखाणाच्या या परंपरेचा वेध घेताना अगदी पूरातन काळात गुहेत माणूस रहात असायचा त्या काळात त्याने रेखाटलेल्या चित्रांचा पहिले लिखाण म्हणून उल्लेख करावा लागेल. अभिव्यक्ती साठी त्यावेळी ते उपलब्ध साधन वापरले गेले.
      नंतरच्या काळात आयुधांच्या मदतीने दगडांवर कोरिव काम करुन शिलालेख मोठया प्रमाणावर लिहिले गेले यातही राज घराणे आणि त्यांचा गुणगैारव मोठया प्रमाणावर असे ज्या काळात वेदांचे आणि उपनिषदाचे पठण सुरु झाले त्या काळापासून त्याचे लिखाण होईपर्यंतचा प्रवास हा मौखिकच होता.
      भूर्जपत्र हे माध्यम सापडल्यानंतर मोठया प्रमाणावर ग्रंथनिर्मिती शक्य झाली तरी धातूवर लिखाण करणे, दगडांवर लिखाण करणे अशी परंपरा कायम राहिली होती. कागदाचा शोध लागल्यानंतर लिखाणाला योग्य माध्यम मिळाले असे म्हणण्यापेक्षा लिखाण हे सामान्यासाठी अभिव्यक्तीचे नवे माध्यम बनले. कागदाचा शोधानंतर लागलेला महत्वाचा शोध अर्थातच मुद्रणाचा. या दोन महत्वाच्या शोधांनी जग ख-या अर्थानं बदलून टाकलं.
      लिखाणाची इच्छा असणं आणि प्रत्यक्षात लेखन करणं प्रत्येकाला जमतं असं नाही पण, लिहिलेलं वाचणं सा-या अक्षर प्रेमींना जमतं यातूनच साहित्याची परंपरा पुढे आली विविध क्षेत्रातील ज्ञान शब्दरुपानं कागदावर आल्यानंतर त्याला पुढच्या पिढीपर्यंत नेणं सोपं झाल. यातून शिक्षण पध्दतीतही बदल घडला गुरुकुलांची परंपरा जाऊन शाळा आल्या.
      शाळेतले शिक्षक असो की, चौथ्या स्तंभाचे शिलेदार अगदी साधा अकाउन्टंन्ट देखील या लेखनाच्या बळावरच प्रगती करु शकला हे विसरता येत नाही दुसरीकडे ज्यांच्या आयुष्यात लेखनाचा संबंधच आला नाही अशा ग्रामीण क्षेत्रातही भाषा सूत्र मजबूत राहिले.
      नावात काय असं विचारणारा विल्यम शेक्सपिअर असो की आपल्या शब्दातून     वाचणा-याला खळाळून हसायला लावणारे पुलं. या लेखनाची ही जादू आता तंत्रातील प्रगतीमुळे ज्याला लिहिता येतं तो लिहित आहे. फेसबूकसारख्या समुदायानं सा-या जगाला लिहितं केलं असा निष्कर्ष वावगा ठरणारा नाही.
      ज्याला जसं जमतय, जसं सूचतय तसं कोणतीही भीड न बाळगता लिहिणारे लाखोजण या माध्यमात दिसतील. माहितीच्या महाजालात विविध क्षेत्राची माहिती याच स्वरुपात आता आपल्याला उपलब्ध आहे. वेबसाईटस् आणि ब्लॉग्सनी लेखकांना नवं माध्यम दिलय. तंत्राच्या प्रगतीनं लेखनात जसं पुढचं पाऊल पडलं तसं ते नाटय सिनेक्षेत्रातही पडलय तंत्रानं आणखी एक बदल केला तो म्हणजे संगमंचावर घडणारं नाटय घरात टिव्हीच्या पडद्यावर आणलं ज्याचा रिमोट तुमच्या हाती असतो.
      वाचन क्षेत्रात ही तंत्रज्ञानानं बदल घडवले आहेत माहितीच्या महाजालात असंख्य ग्रं‍थ आज सर्वांसाठी खुले झाले. पुढचं पाऊल म्हणजे ई-बुक रिडरच्या रुपात किंडल सारखी उपकरणं सहजरित्या ग्रंथालय बाळगायला समर्थ झाली त्यासाठी एकच सांगणं ज्याला लिहिता येतं त्यानी ते लिहावं... लेखक व्हावं
                                                                        -प्रशांत दैठणकर 

2 comments:

Anonymous said...

खुप छान आहे.

Anonymous said...

शुध्‍द लेखनाकडे लक्ष द्यावे. बाकी सर्व ठीक